Monday, February 15, 2021

अरुणा ढेरे ह्यांचे 'विवेक आणि विद्रोह'

हे काही तसं नवं पुस्तक नाही. वर्तमानपत्रातील किंवा अन्य पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह करण्याच्या हमखास युक्तीचे हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या नावाने वाटेल तशी वैचारिक मांडणीही ह्या पुस्तकात नाही.  विद्रोह शब्दाने जे आपल्याला आज वाटेल तसं काही नाही. १८५०-१९५० मधील सुधारक (जे त्या काळाचे विद्रोही!) आणि त्यांचा विवेक अशा अर्थाने नाव असावं.  १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या पूर्वाधात जी 'सुधारक' मंडळी होऊन गेली त्यांच्याबद्दलचे व्यक्तिचित्रणात्मक स्युडो-वैचारिक लिखाण असं हे पुस्तक आहे. स्युडो-वैचारिक म्हणायचे कारण लेखांची शब्दबंबाळ भावुकता. 

सौजन्य:- बुकगंगा 


अर्थात तरीही मला मजा आली. माझ्या माहितीत आणि १८५०-१९५० काळातील महाराष्ट्र ह्या आकलनात भर पडली. वर्तमानपत्रात पूर्वप्रसिद्ध लेख असल्याने संदर्भ नीट दिलेले नाहीत ही गोष्ट मला खटकत राहिली. पुस्तक काढताना संदर्भ जोडणं योग्य ठरलं असतं, विशेषतः तळटीपा. 

लक्षात राहिलेली बाब म्हणजे ह्या लेखांतील व्यक्ती ह्या एका मर्यादित भूगोलातील आहेत. बहुतेक पुण्यातील. १८५०-१९५० ह्या काळातील पुणे हे फार रंजक शहर असणार, म्हणजे सुधारक-सनातनी झगडे, त्यांचे कार्यक्रम, विविध संस्था ह्यांचे उल्लेख वाचल्याने असं वाटतं. मुळात सुधारक-सनातनी' हा झगडा अनेक पैलूंवर ब्राह्मण जातीचा अंतर्गत वाद अशाच स्वरूपाचा होता हेही दिसतं. आणि लोक जात, धर्म ह्यांना लिखाणात वापरायला, म्हणजे स्वतःला तसे identify करायला, कचरत नसत हेही कळतं. आज दुर्दैवाने तसं होत नाही. अमुक एक प्रकारचा वारसा असेल तर त्यासोबत identify न करणं हा नकळत norm बनलेला आहे. आजची आधुनिक भूमिका ही स्वतःला स्वतःच्या उच्चवर्णीय जातीसोबत identify करत असाल तर तुम्ही आधुनिक नाहीच अशी आहे. पण ही भूमिका कालसापेक्ष नाही. एका टप्प्याला सुधारक म्हणवले जाणारे लोक स्वतःला स्वतःच्या जातीसोबत identify करत होते. त्यांचे सुधारकपण ह्यात होते कि ते जातींचे संकेत व्यक्तिवादी दृष्टीने परखत होते आणि त्या दृष्टीला अयोग्य वाटणारे संकेत धुडकावत होते. पण असे न वाटणारे संकेत ते बहुतेकदा पाळत होते. किंबहुना अशा acceptable संकेतांबाबत ते कर्मठच होते. 

एक रोचक माहिती म्हणजे १९३१ साली शिकलगार समाजातील काही व्यक्ती विहिरीवर पाणी भरायला मिळावे ह्यासाठी मुसलमान झाल्या. असे बरेच माहितीपुंज पुस्तकात आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वीचा महाराष्ट्र (म्हणजे पुणेच प्रामुख्याने!) ह्याबाबत अधिक जाणून घ्यायला हवं! 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...