Showing posts with label कंटाळा. Show all posts
Showing posts with label कंटाळा. Show all posts

Thursday, December 1, 2011

पांडुरंग सांगवीकर यांस,

पांडुरंग सांगवीकर यांस,

     अर्धवट पडलेले कॉलेजचे वर्ष सोडून तुम्ही गावातच आहात का अजून? कुठेही असं, पण अशी माझ्या मानगुटीला बसण्याची काही गरज नाही. आपलं झालं थोडं आणि त्यात तुमच्या 'stream of consciousness' चं घोडं असला प्रकार होतोय...आणि तरीही जगण्याच्या सगळ्या टवक्यांकडे टक्क उघड्या डोळ्यांनी बघत त्यातली निरर्थ झिंग घ्यायची खाज जात नाही...आणि म्हणून सांगवीकर मी माझ्या होस्टेलच्या एकांड्या खोलीत परत परत तुम्हाला भेटत रहातो...
    आपल्याला लहानपणी मेलेली बहिण नाही, बाप व्यवहारी, कपटी, कुटील, कसबी असा कोणीही नाही.. फक्त जाणिवांचे संवेदनशील तंतू घेऊन जगत राहण्याच्या अफाट लाटेवर तरंगणारा मी आहे... आपल्याला गाव नाही, भाषेच्या २-४ वाटा-वळणांचे ज्ञान नाही... पूर्ण रिकामा रिकामपणा आणि अगदी मध्याशी पोकळ असणारा रिकामपणा असे दोन भाग केले तर आपण पहिल्या भागात आणि तुम्ही दुस-या... 
पण एक बिलकूल खरं आहे कि काही करून मैदान मारण्याची इच्छा नसली कि उरणारे बघेपण तेवढे तुमच्या भागातही आहे आणि माझ्याही...  
    तुमची गोष्ट वाचून संपली...संपली किंवा पुढे पाने नव्हती वाचायला...ती तुमची गोष्ट आहे का नाही हाही वादाचा मुद्दा आहे. पण तरंगत राहायच्या अवस्थेत तुमचे सांगणे वाचत जाण्याच्या काडीने मी झक्क तरंगतो आहे. माझ्या आजूबाजूला फार हुशार माणसे आहेत. त्यांनी 'प्रवाह'नावाची काही तरी गोष्ट बनवली आहे. मग त्यातले आम्ही प्रवाहात पुढे आहोत असे म्हणत झपाझप पोहत आहेत आणि काहीजण आम्ही थोडेच प्रवाहाच्या विरुद्ध असे म्हणून पोहत आहेत. मी असाच आजूबाजूला तरंगतो आहे. आता तरंगताना मी कधी प्रवाहात असतो तर कधी विरुद्ध... आपल्याला काय आहे... बालपणाची सुखरूप होडी या हिशेबी जगाच्या लाटांनी तुटली कि आपण सगळे एकच अथांगात फेकले जातो, आणि कितीही हात-पाय मारले तरी तसेच शेवटी नाका-तोंडात पाणी जावून मारतो...जे लागतात किना-याला ते दिसत तर कधी नाहीत...मग आहोत तिथे बुडलो काय आणि काही फर्लांग दूर जाऊन बुडलो काय... शेवटी आपल्या यश-अपयशाच्या निकषांचा प्रकाशही पोचणार नाही अशा एकाच अंधारात आपण पोचणार आहोत... कदाचित तुम्ही तिथे आधीच पोचला असाल... 
    छे... ही खंत-बिंत बिलकूल नाही माझी... इथली गम्मत बघणे आणि मग हळूहळू त्या गमतीपासूनही मोकळे होत जाणे ह्याचीच मला गम्मत वाटते आहे. हं..अध्ये-मध्ये जाऊन चार पत्ते टाकून आपणही दोन डाव मारून यावेत अशी खुमखुमी येते... पण असा हवं तेव्हा निघा आणि हवं तेव्हा घुसा करण्याचा निब्बरपणा अजून जमलेला नाही. पापणी न मिचकवता हे करडे-कोरडे जग बघत राहण्याची सवय लागण्याच्या आधी माझ्या आई-बापानी, मास्तर-मास्तरणीनी, पुस्तक-कथा-कविता-गोष्टी-पोवाडे यांनी जे हळवे, कोवळे जग माझ्या बुबुळात पेरले होते त्याचे आंधळेपण अजून पुरते फिटले नाही. तुमच्या भेटींनी त्याला टरटरीत तडा जातो आहे एवढे पक्के.. पण काहीवेळा तो तडा परत बुजून येतो आणि पुढे येणा-या दिवसांच्या एकसलग माळेत ह्या करड्या-कोरड्या प्रकाराला छेडून जाणारे काही आहे असे उगाच वाटू लागते...आणि मग दिवस सरकत जातात, थोडे भराभर.. आणि मग असे काहीच नाही, हे आहे असे आहे, ही माणसे आहेत, ही गर्दी आहे, हे वारंवार बुडू पाहणारे आणि तरीही वाचणारे जग आहे, ही प्रवाहात आणि विरुद्ध पोहणारी माणसे आहेत, हे आपले कल्पनांचे इमले आहेत आणि त्याच्या काल्पनिक मजल्यांवर हाशहूश करत पळणे आहे, हे पाहणे आहे, ह्या पाहण्याचा शून्य सारांश आहे...आणि परत एकदा तुमची भेट आहे...
   आपल्या पोटात खानेसुमारीची ओळ तर येणार नव्हती...आपण आलो नसतो तरी ओळीला फारसा फरक नसता... आपले दुखही साले येडझवे आहे...ते आपल्याच अंगाभोवती गुंडाळून त्याच्या उबेत झोपावे तर ते फारच मोठे आहे आणि त्यात जीव उबून जातो... आणि ते पसरवून पार क्षितिजापर्यंत त्याचाच मऊ-मायाळू अंधार करावा तर ते तोकडे आहे... नेमके दुख असणे हे नेमके सुखही आहे... सांगवीकर, इथे तुम्ही-आम्ही एकाच वाटेवर पुढे-मागे आहोत... 
    तरी तुम्ही सगळ्याचे पुस्तक लिहिलेत हे बरे केलेत...म्हणजे जसे शिलालेखामुळे मागे जे राजे होते ते कसे होते याचे अदमास अनेक थोर माणसे काढतात तसे अगदी नाही झाले तरी कंटाळ्याची रेषा ही सातत्याने वाहते आहे आणि त्या रेषेवरून दिसणारे जग तेव्हाही तसेच दिसत होते, आत्ताही तसेच आहे...एवढा अदमास तर नक्कीच घेता येतो... 
   आता बेडकासारखे पार जमिनीखाली जाऊन घुसणार आहे. सांगवीकर तुमच्या वेळेत माहितीचा स्फोट झाला नव्हता. इथे मागच्या काही वर्षात, का दशकांत जिथून तिथून माहिती बनते आहे. ती इथे-तिथे आवाज, चित्र, अक्षर असे काहीही बनून दे दणाणा जमते आहे. तिच्या ढिगाखाली मी आता जाऊन बसणार आहे. वर वर सगळे जमत राहील. आणि इतक्या गोष्टींच्या अस्तित्वाचे ओझे घेत घेत मी असण्याचे निव्वळ जीवाश्म  होईन... काहीही नसलेले आणि तरीही दगडावर आपला ठसा सोडलेले... 
     किंवा एकदा या निरर्थाच्या निमुळत्या कड्यावर छाती काढून उभा राहीन..मला आठवतील ती गाणी-कविता पार घसा बसे-पुसे पर्यंत म्हणेन आणि मग जी छलांग मारेन समोरच्या काळोख्या दरीत, सांगवीकर, कि ....
       
('कोसला'च्या 'न' व्या भेटीनंतर....)             

Saturday, December 4, 2010

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो...
हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण डॉक्टर.... (थोडक्यात गरिबी हे मरण्याचे कारण बाद) ह्याचे एका परधर्मीय मुलीवर प्रेम होते आणि ह्याच्या आईचा लग्नाला विरोध होतं... (ऐकल्यासारखी वाटते ना गोष्ट) मागची तीन वर्षे ह्याचे आईबरोबर झगडे होत होते आणि तो नोकरीनिम्मित दुसर्या शहरात रहात होतं. मरण्यागोदर त्याचं आई आणि प्रेयसी दोघांबरोबर भांडण झालेलं. आणि मग....
त्याने गळफास लावला...खाली खुर्ची नव्हती.... आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते.... हा जेव्हा मेलेला सापडला तेव्हा त्याचे गुडघे दुमडलेले होते.... आणि शरीर निळे पडलेले ....
माझ्या मित्राच्या मते हे मरण्याचे झ्याटू कारण आहे.... त्या मुलीशी लग्न करून भांडत भांडत आईला समजावता आला असतं....
माझ्या मते आत्महत्या करणारे कायमच बरोबर असतात.... फक्त तर्काच्या दोर्या वापरून त्यांच्या बरोबर असण्याच्या मुळाशी पोचता येत नाही.... its on altogether different plain... आणि त्यांना भित्रे वगैरे म्हणणे म्हणजे जगत रहाणार्यांनी आपल्या भोंदू गांडूपणाला जोडलेली शौर्याची बेगडी शेपटी आहे.... त्यांना मरावासा वाटलं ते मेले.... जे हवं होतं ते मिळत नव्हतं हे मरण्याचं सबळ कारण आहे.... ते कधी ना कधी मिळेल किंवा त्यापेक्षा बरं मिळेल किंवा ते दुखच संपून जाईल अशा तथाकथित 'आशावादाला' चिकटून जगत राहणं कि खरंच चांगली निवड आहे का.... आता मी अजून जिवंत आहे आणि तरी असे म्हणतो आहे... मग मी मरत का नाहीये.... बरोबर आहे तुमचा प्रश्न.... त्याबद्दल नंतर कधीतरी.... आता विषय वेगळं आहे.... (सोयीस्कर!)
आता हा इसम मेल्यावर त्याच्या आईचा आणि प्रेयसीचा काय.... त्याच्या प्रेयसीने पण आत्महत्येचा प्रयत्न केला अशी ऐकीव बातमी.... पण आईचं काय....
एखादा माणूस,,, अगदी निराशावादी माणूसही आपल्यामुळे मेला आहे हे जाणवत राहून जगत राहणं हा काय प्रकार आहे....
आता कदाचित ह्या इसमाचे लग्न झाल्यावर त्याने एक वर्षात घटस्फोट घेतला असतं... किंवा त्याच्या बायकोने आत्महत्या केली असती.... किंवा ह्या माणसाला मुळाशीच काही पोकळपणा असणार... म्हणून त्याने आई-बाई अशा शुल्लक प्रकाराने आत्महत्या केली.... किंवा प्रेमात पडल्याने आणि उभं न रहाता आल्याने....
आम्ही दोघं त्या मृत इसमाचे सहानुभूतीदार आहोत का तटस्थ निरीक्षक.... जे एकूणच ह्या मृत्युच्या तात्विक पार्श्वभूमीचे विश्लेषण करत आहेत....
त्याला मरण्याच्या शेवटाच्या काही क्षणात काय वाटलं असेल.... कारण खुर्ची वापरून गळफास हा तुलनेने मरण्याचा कमी त्रासदायक प्रकार आहे... मणका तुटतो... आणि खल्लास... (मित्राकडून आलेली माहिती) ...आता इथे हा लटकत होता... प्रयत्नपूर्वक गुडघे दुमडत असणार.... पण मग तो आधी बेशुद्ध झाला आणि हळूहळू ... का मरेपर्यंत त्याने गुडघे टेकलेच नाहीत...मरणासमोर.... का काळा-निळा पडण्याच्या शेवटच्या क्षणात जगण्याच्या इच्छेचा डोंब उसळून आला आणि तिथे कोणी नव्हतंच.... त्या मुलीला कधी कळलं नाही कि हा असा टोकाला जाऊ शकतो.... का असे टोकाला जाऊ शकतो वाटणारे कुठे जाणारे नसतातच....जे जातात ते असे झटकन....
त्याला हे का कळलं नाही कि प्रेम ही भावना हळूहळू विरत जाईल आणि सोयीस्कर तडजोडीने तो समाधानाचा घरगुती अंगरखा पांघरू शकेल....
शक्यतांच्या जाळ्यात न येणारी घटना एवढंच म्हणून हा 'इवेन्ट' सोडून द्यावा लागेल का.... मेळघाटात माणसे जगतात, हजारो किलोमीटर अंतर तोडत जगण्याची नवी मुळे पकडतात, बकाल दारिद्र्यात जगतात, एकवेळचे जेवण खाऊन जगतात.... म्हणजे ऑन एवेरेज माणसाच्या जगण्याचा आशेचा तंतू प्रबळ असताना हा असा का..... किंवा बाकीचे असे का..... अख्या भारतात मागच्या वर्षी असे ३७००० आहेत.... कोट्यावधींच्या जगण्यात, जे दरवर्षी ९%ने समृद्ध (!) होते आहे त्यात हे उदास जीव का....
जे हवं आणि जे आहे यांच्या मधलं अंतर कधी कधी इतकं न संपणारं का असतं....
त्याच्या आणि त्यांच्या आत्महत्येनंतर माझे हे वांझोटे प्रश्न....

Tuesday, November 30, 2010

रिकामटेकडा

खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या स्पर्शाने त्याची झोप चाळवली. थंडी पडायला सुरुवात झाली होती आणि पांघरूणात गुरफटून घेऊन झोपावं असं त्याला वाटत होतं.. पण त्याचं लक्ष आपसूक घड्याळाकडे गेलं. ८.३० वाजत आले होते..आणि हा शनिवार किंवा रविवार नव्हता .... त्याने कूस बदलली आणि बाजूला पाहिलं तर त्याचा १ मित्र उठून स्वतःच्या घरी गेला होता आणि एक उठून अंथरूण आवरत होता... तोही उठला....रात्री फूटबॉलचा सामना बघून केव्हातरी तो झोपलेला.... त्या आधी जग-दुनियेच्या चर्चा, इकडे-तिकडे फिरायला जायचे बेत आणि मग आपण काही ना काही करण्यात गुंतलेल्या जगातले काही शेवटचे रिकामटेकडे लोक आहोत अशी भोवर्यात अडकल्यासारखी जाणीव..... आपण अजूनही एखादा पिक्चर बघून त्यावर तासन-तास गप्पा मारतो, एखादा लेख वाचून त्याच्यावर समीक्षक मारामारी करू पाहतो, मग शेवटी माणूस असा का करतो ह्याच्या आंधळ्या टोकाला पोचतो, कुठेतरी पोटभर चरतो, कधीतरी आपला दिवस येईल याची उमदी स्वप्ने पाहतो आणि रात्री आपली घरात उंची मावत नाही आणि पिचत जाणार्या घरात साराच जीव ठेचाकाळला जातो म्हणून असे कुठेतरी येऊन लपतो.... उद्यावर ढकलतो आज रिकामं असण्याची तगमग, जिथे असायला हवं तिथे नसल्याचं हरवलेपण त्वेषाने सामाजिक फुत्कार टाकून भरतो आणि झोपतो....स्वप्नांच्या हल्ल्यात दचकतो आणि दर सकाळी जागे होतो एका नवीन दिवसाचा तेच तेच ओझं डोक्यावर घ्यायला....
त्याने फटाफट अंथरूण-पांघरूण आवरलं....दाराशी आलेल्या पेपरावर एक नजर फिरवली.... दिल्ली ते गल्लीच्या घोटाळे, कपात आणि खटला अशा बातम्या पाहून पेपर बाजूला टाकला . ... आपली पोतडी उचलली, मित्राला येतो म्हणून तो बाहेर पडला.....
आज मंगळवार आहे आणि आज किमान सही तरी केली पाहिजे ऑफिसात जाऊन.... म्हणजे जे काही महिन्याचे हातात लागतात ते तरी कटणार नाहीत.... पण म्हणजे आता लोकल मध्ये चढा, गरम दमट डब्यात २ तास घालवा, मग बसमध्ये चढा हळूहळू.... मग पोचा, अपराध्यासारखी सही करा....थोडावेळ इकडे, तिकडे घुटमळा, चहा प्या, भूक असेल तर नाश्ता करा, फार कोणी ओळखीचं असेल तर उसन्या अवसानाने गप्पा मारा, मग होस्टेलच्या खोलीत काही न बोलणारं एकटेपण आहे, त्याच्यात घुसून निपचित पडून राहा,,,एक दिवस अजून वजा...किंवा एकही दिवस नाही....आज असं अस्तित्व असायला काही घडल्याची खूण उमटायला हवी, ती कुठे आहे आपल्या दिवसांवर....
तो रस्त्याला आला सोसायटीचे गेट ओलांडून.... रस्त्यावर लगबग, वर्दळ कुठेतरी निघालेल्या माणसांची.... कितीवेळा हा रस्ता चाललोय आपण.... घरापासून १० पावलांवर.... ही जागा ओळखीची आहे म्हणून उबदार वाटते का ओळखीची आहे म्हणून आपण असे कोणाचीही नजर पडू नये असे चाललो आहोत.... भीती वाटते कि कोणीतरी भेटेल, काय करतोस असा अटळ प्रश्न विचारेल, आणि मग आपण चाचरू, मी करतोय काहीतरी असं त्यांना किंवा स्वतःलाच दाखवण्याची धडपड करू, मग समोरची व्यक्ती सांगेल, नव्या नोकरीबाबत, नव्या घराबाबत, किंवा लग्नाबाबत, किंवा अजून कोणाच्या ह्याच गोष्टींबाबत.... हेच खरे सुखी असण्याचे अक्षांश-रेखांश....आपण एक भरकटलेले जहाज, नव्हे होडी आहोत.... जहाज तर शेकडो लोकांना अंगा-खांद्यावर खेळवते....आपण स्वताच्याच एकट्या असण्यातही कोलमडणारी फुटकी होडी आहोत....चुकलेली, आणि एखाद्या लाटेने बुडून जाणारी....
घरी जायचं....मग आई, ती काही बोलणार नाही, पिंजारलेले केस पाहून, जागरणाने सुजलेले डोळे पाहून, किंवा आता आपण जी पिणार आहोत त्या सिगरेटचा वास आला तरी.... ती विचारणारही नाही कदाचित अजून घरीच का आहेस... किंवा फोन का बंद आहे.... ती काहीतरी खायला देईल, आणि तिच्या डोळ्याखालची वर्तुळे, सतत कामात असणारे हात घरात बसू देणार नाहीत.... पोपडे उडणार्या भिंती, सतत येणाऱ्या धुळीचा घरातल्या प्रत्येक वस्तूवर साठलेला तवंग, आणि त्याहीपेक्षा हे असं घुसमटून टाकणारा जगणं स्वीकारलेली माणसे,,,, जगण्याला असे लुचत का राहतो आपण....
तो टपरीवर पोचला.... सिगारेट शिलगावली, अण्णाला एक चहा सांगितला....इथेपण भेन्च्योत माणसे भरलेली... आणि ह्याच्या दररोज चर्चा...इथली जमीन, तीकरची जमीन, ह्याची बायको, त्याचा बंगला...आणि मध्ये-मध्ये चहा...एक कटिंग, एकात दोन.... म्हणजे इथेतरी निवांत बसून जरा शब्द घासून-पुसून घ्यावेत, किंवा काळजाला धग देणारे दोन कश मारावेत तर ही माणसे, मग त्यांच्या चेहेर्यांना सांभाळून धूर सोडा, लपलप चहा प्या....
काय हवंय आणि काय आहे ह्यांच्या मधली ही पोकळी कशी ओलांडायची.... आणि हे जे झपाट्याने मागे पडतोय आपण शर्यतीत त्याचं काय.... रस्तावर नजर टाकली कि शहर सांडतय प्रत्येक रस्ता, बोळ, गल्ली मध्ये... चौखूर उधळलेली वाहने मग भिडली आहेत एकमेकांना... माणसे मिळेल त्या कोपर्यात, चालत, धावत, रेंगाळत, रडत-रखडत.... आणि होईल तसं हे शहर जुन्या शांततेचे सारे अवशेष व्यापून टाकतंय.... इमारतींच्या रांगांमागून रांगा.... आणि त्यात साचून दबा धरून बसलेली माणसे.... दिवसभर शहराच्या काही डबक्यात ही माणसे काम म्हणून जमणार....तिथे ह्यांच्या आकांक्षा, इच्छा एकमेकांना दाबत, सांभाळत जिवंत राहणार...गर्दीच्या लोंढ्यात हे 'हर हर महादेव' करणार....दोन दिवस सुट्टीचे तिथे झोपणार, गच्च जेवणार, किंवा स्वतःच्या अनंत प्रतीकृत्या शहरात आहेत त्यातल्या अजून कोणाला भेटणार....पण येत्या आठवड्यासाठी मोर्चेबांधणी करून तयार.... हे सारं शहर आक्रमक होत चाल्लय, मैत्री-आनंदाच्या पडद्याआडून प्रत्येक जण इतरांशी पावलं मिळवून चालायच्या धडपडीत आहे.... छुपे रस्ते, पळवाटा शोधून प्रत्येक जण अंगाला जाणवणाऱ्या समाधानाची जी थोडी बेटे ह्या शहरात आहेत तिथे पोचायची धडपड करतोय... आधी आपण, मग आपले, मग कदाचित थोडे दूरचे आपले.... आणि त्यावेळी मंद गंधित फुलांचे ताटवे असलेले ते रस्ते आक्रसत चालले आहेत.... पानांचे कोवळे पोपटी रंग गाड्यांच्या बंध-रहित रेषात हरवले आहेत.... आणि आपण या शहराच्या तुकडे-तुकडे जमवण्याच्या कोड्यात कुठेही न बसणारा एक तुकडा आहोत, अजून कुठल्याही तुकड्याच्या कडांशी न जुळणारा, आणि तरीही ह्याच कोड्याचा अविभाज्य भाग....
सिगरेट संपली.... दिवस भर वेगात पळतो आहे, माणसांनी त्यांची त्यांची लय पकडली आहे, पोरं, म्हातारे, तरणे, पांगळे जे ते आपल्या आपल्या लढाईला तयार झाला आहे, लक्षावधी माणसांच्या स्वार्थ-परमार्थांच्या उभ्या-आडव्या रेषात, आपले-परकेपणाच्या भिंती-पडद्यात प्रत्येकाला एक संदर्भ मिळाला आहे, आपल्या वाट्याचा अंधार उद्याच्या कुशीत येणाऱ्या तलम हिरवळीवर सोडत अनेक जण आपली आपली एक एक वीट रचतायेत, शहराच्या रेशमी, आरस्पानी टोकांवर पोचलेले कुंपण उभारण्यात मग्न आहेत... गर्दीचा ओहोळ दररोज सीमा विस्तारत जातो आहे, आणि प्रत्येकावर शिक्का ठोकतोय, पळण्याचा, काहीतरी असण्याचा, हळूहळू स्वतःभोवती वस्तूंची, माणसांची जाळी जमत जातायेत....
आणि आपण उभे आहोत इथे फक्त.... कुठे न जाणारे, कुठे जायचय हे माहित नसणारे, आणि जिथून आलो ते गाव, त्या स्तब्ध वेळा, ती हसणारी- न खुपणार्या ओळखीच्या नजरा असणारी माणसे या गर्दीत अजूनही शोधत बसणारे...

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...