Showing posts with label वैचारिक. Show all posts
Showing posts with label वैचारिक. Show all posts

Monday, September 12, 2022

आवाज, आकडे, आणि अंदाज

  

अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच तर त्यात थोडा विचारही आहे.   

दि. ११ सप्टेंबर २०२२ च्या लोकसत्तात ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाबाबत काही आकडेवारी होती. त्यातली अधिक लक्षवेधक आणि तितकीच निष्फळ आकडेवारी म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीत आवाजाने गाठलेल्या पातळीबाबतची. फेसबुकवरही अनेकजण ह्या आवाजाबाबत तीव्र मते व्यक्त करताना आढळले. अर्थात ही मते प्रातिनिधिक नाहीत, कारण फेसबुक एको चेंबर आहे.

फेसबुकवरील प्रतिक्रियांच्याबाबत दोन निरीक्षणे. गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांत पुण्यातील लोक जास्त आहेत. आणि आवाजाबद्दल त्रस्त प्रतिक्रिया देणारे लोक हे उजवीकडे झुकलेले असण्याची शक्यता कमी आहे. पण ह्या उजव्या कालच्या लोकांच्याही (पुण्यातील) आवाजाबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. ह्या दुसऱ्या निरीक्षणाबाबत मी जास्त काही बोलणार नाही. त्यातून मला एवढंच कळलं कि गोंगाट खरंच असावा.

पहिले निरीक्षण आश्चर्यकारक आहे कारण मुंबईतही विसर्जन मिरवणुकीत दणादणाट नोंदवला गेला आहे पण मुंबईतील मिरवणुकीतील आवाजाबाबत त्रस्त प्रतिक्रिया उमटलेल्या दिसत नाहीत. ही बाब ध्वनीप्रदूषणापेक्षा दोन्ही शहरातील फरकावर अधिक आधारित असावी असं वाटतं. मुंबईचे ‘चलता है स्पिरिट मुंबईकरांना गोंगाटाला आपलेसे करायला मदत करते का? का मुंबईत अन्य दिवसांतही इतका आवाज असतो कि गणेशोत्सवात त्यात होणारी वाढ विशेष त्रासदायक ठरत नाही? का मुंबईकरांनी मी बरा माझे टीचभर स्क्वेअर फीट बरे हेच जीवितध्येय मानल्याने ते उगाच जिथे आपल्या मताचा काडीमात्र उपयोग नाही तिथे ते द्यायला जात नाहीत? का ते प्रवासात एवढे व्यस्त आहेत कि त्यांना फेसबुकवर ‘व्यक्त व्हायला वेळच मिळत नाही? ध्वनीप्रदूषणाचा त्रास विसरायला लावेल असा हा शहरांच्या तौलनिक अभ्यासाचा मुद्दा आहे. हा विचार करतच मी अनंतचतुर्दशीचा डॉल्बी सहन केला आहे.

मजेचा भाग सोडला तर गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाज हे आपल्या सामाजिक निवडीचे कोडे आहे. त्याबाबत एलिट राग आहे आणि मासेसची मिरवणूक आहे. आवाजाने त्रस्त लोक हे कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवात कार्यरत असण्याची शक्यता नसते. (अर्थात पूर्वी ते होते असं होऊ शकतं.) कारण आपण ज्यांत सहभागी आहोत त्याचे परिणाम आणि आपल्याला त्याचा जाणवणारा उपद्रव हा पेच.

सार्वजनिक कामातील समंजस कार्यकर्त्यांची अवस्था वस्त्रहरणाच्या वेळच्या भीष्म-द्रोणासारखी असते. आपण कार्यकर्तापण स्वीकारले आहे तर आपल्याला आपण ज्यांना कामाला लावतो त्यांच्या पाशवी आनंदाच्या मागण्या मान्य कराव्या लागतील आणि त्यांचे समर्थन, किंवा गेला बाजार त्यांच्यातील उणिवांच्या बाबतीत आपलेच दात आपलेच मौन असा पवित्रा तरी घ्यावा लागेल हा विवेक (का निब्बरपणा?) समंजस कार्यकर्त्यांना असावा लागतो. किंवा मग त्यांना एक्स-कार्यकर्ते होऊन चिंतन (आणि मौन किंवा दुर्लक्ष) स्वीकारावे लागते.

गोंगाटाने त्रस्त एलिट असा प्रश्न विचारत नाहीत कि शेकडो लोक हा गोंगाट एन्जॉय कसा करतात. विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण नसते असा माझा मुद्दा नाही. ते आहेच. कळीचा मुद्दा हा आहे कि त्याबद्दल प्रतिकूल मत इतके तोकडे का आहे.

The key fact is not many regards loud sound as a nuisance. गणपती विसर्जन किंवा रोजमर्रा दिवस, ही बाब आपल्याला दिसून येते. म्हणजे एकतर गोंगाटाचा अभाव ज्यांना हवा आहे असे लोक हे कायमच एकूण लोकांत थोडे असतात. किंवा स्वच्छ हवेसारखी शांतता ही पण एक लक्झरी गुड आहे. पेडर रोडला ते उपलब्ध आहे, पण हमरस्त्यावर नाही. म्हणजे लोक पुरेसे धनिक झाले कि परिसरातील शांतता ही त्यांची राजकीय मागणी बनेल किंवा ते अशी शांतता manage करू शकतील. ह्याचा अर्थ (implication) असा कि कदाचित पुण्याचा सरासरी मराठीत व्यक्त होणारा फेसबुककर हा मुंबईच्या तश्याच फेसबुककरापेक्षा श्रीमंत आहे, म्हणून तो जास्त करवादतो आहे.

अजून एक शक्यता अशी कि ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम अजून पुरेसे स्पष्ट नाहीत. वर्तमानपत्रे कोण्या एखाद्या नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांचा बाईट छापून आणतात ज्यांत संभाव्य दुष्परिणामांची जंत्री असते. पण जर शास्त्रीय शोधनिबंधांची एक प्राथमिक छाननी केली तर असं दिसतं कि ध्वनीप्रदूषणाचे शारीरिक दुष्परिणाम हे धूम्रपानाच्या दुष्परिणामांसारखे जोरदार सिद्ध झालेले नाहीत. लोक आवाजाशी जुळवून घेऊ शकतात (adopt) ही दुष्परिणाम फिके करण्यातली मोठी बाब असावी. धूम्रपानाबाबत उत्पन्नपातळीवर अवलंबून नसलेले प्रतिकूल जनमत आहे आणि त्यामुळे धूम्रपान हे सामाजिक स्पेसमधून झपाट्याने हद्दपार झाले आहे, होत आहे. पण गोंगाटाबाबत अशी व्यापक जनप्रतिकूलता नाही.

मी आवाजाशी कसा जुळवून घेऊ लागलो ह्याचा अनुभव सांगतो. (त्यानेच हा लेख पुरेसा अवैचारिक होतो आहे.) मागची अनेक वर्षे गणेशोत्सवाचा काळ तसेच उन्हाळ्यातील लग्नसराईचा काळ मी अत्यंत ताणाखाली घालवतो. रात्री उशिरापर्यंत चालणारे वाद्य-संगीत ह्यामुळे मला हा ताण सहन करावा लागतो. असा आवाज निर्माण करणाऱ्या आणि त्याचा आनंद घेणाऱ्या लोकांना विकृत ठरवावे, त्यांना वाईट परिणाम सहन करायला लागावेत अशी मनोकामना करावी अशा प्रतिक्रिया माझ्या मनात ह्या आवाजाने झोप न आल्याने चिडचिड होऊन उमटत असतात. पण ह्यावर्षी गणपती विसर्जनाच्या प्रमुख दिवसांत मी बाहेरून असे आवाज येत असतानाही गाढ झोपून गेलो. कारण त्या आवाजाची पर्वा करता येणार नाही इतका जास्त मी थकलेलो होतो. (हे लेख लिहितानाची अवस्थाही थोडी तशीच होती. बाहेर डॉल्बीचा थरथराट सुरु होता, त्याने मला डिस्टर्ब होत होते, पण लिहिताना मला आवाज तेवढा जाणवला नाही. अर्थात पुरेसा जास्त आवाज असेल तर माझी ही स्युडो-शांती टिकली नसती हे आलेच, पण तो मुद्दा नाही.) माझ्या १५ महिन्याच्या अपत्याला हा आवाज कसा झेपेल ह्याबद्दल मी साशंक  होतो. पण अपत्य हा गोंगाट जणू अस्तित्वातच नाही अशा प्रकारे आहे. पंधरा वर्षापूर्वी माझी हृदयरोगग्रस्त आजीही ह्या विसर्जन दिवसात तिचा टीव्ही पहात असायची, जो खरं तर तिला त्या आवाजात तितका ऐकूही यायचा नाही. तिच्या घराच्या भिंती, पलंग आवाजाने हादरत असायचा. पण ती म्हणायची आपण रागावून काय होईल. आपण आपलं काम सुरु ठेवावं.



उपद्रवाला तोंड देण्याचा हा प्रतिसाद मला तेव्हा अत्यंत दुबळा वाटला होता. पण आज मला तिच्या approach चं नीट appreciation करता येतं आहे. I am too turning oblivious to the noise that I have despised so much. The trick about nuisance you cannot change is to not mind it अशी माझी स्थिती होते आहे.

In some sense, it is an essential self-delusion that we all do with ourselves so as not to live an unhappy life. (अर्थात आपलेच नाही तर इतरांचेही असमाधान आपल्यावर ओढवून घेत सगळ्यांनीच त्या असमाधानासाठी क्लेश घेऊन आत्मशुद्धि करावी असे वाटणारे काही अपवाद सोडून.) पण हा सिनिकल पवित्रा बाजूला ठेवून विचार केला तर जाणवणारी गोष्ट ही कि गणपती विसर्जनातील आवाज ह्याविरुद्ध जनमत बनत नाही कारण अनेकांना, बहुतेकांना ह्या आवाजाचा त्रास होतच नाही. काही थोड्यांना तो होतो. अनेकांना त्याची जाणीवच होत नाही किंवा तसे ते राहू शकतात. आणि काही थोड्यांना त्यातून सुखच मिळते.

गोंगाटाच्या बाबतीत प्रतिकूल भूमिका असलेल्यांनी गोंगाट किंवा जास्त आवाज (आपापले मत!) हा तुम्ही त्रास माना किंवा नाही पण तुमची हानी होते आहे हे सिद्ध करणारा पुरावा गोळा केला पाहिजे. Onus is on us! आणि तसा पुरावा गोळा करायला लागणारा प्रयोग गणेशोत्सव आहेच. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आणि आणि ह्या मार्गांच्या लगतचे पण मिरवणूक जात नसलेले रस्ते येथील बालके, विद्यार्थी, प्रौढ आणि वृद्ध ह्यांच्या तौलनिक अभ्यासाने गोंगाट का गोंगाट और परंपरा कि परंपरा सुट्टे करायला मदत होईल. (सध्या ते न निस्तरणारे झांगडे झाले आहे आणि त्यात काही बहाद्दर कार्यकर्ते ‘हा करतो आवाज, कोलला तुम्हाला, आम्हीच धावून येतो वेळप्रसंगी, करा आमचा कल्ला सहन असे वीरश्रीयुक्त आणि समजमुक्त जम्बुरकेही सोडू लागले आहेत.) अर्थात असा तौलानिक अभ्यास सरकार फंड करेल अशी जर कांक्षा असेल तर तो फंड वारला असेच समजावे लागेल.

लोकांचे पुरेसे प्रतिकूल मत निर्माण होत नाही तोवर विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे सामाजिक निवड असेच बघावे लागेल. आपण जसे आपण मत न दिलेल्या सरकारला ‘हे माझे सरकार नाही असे म्हणू शकत नाही (असे म्हणणारे, निवडणूक म्हणजे काय ह्याची समज नसलेले ‘जागृत लोक असतात!) तसेच विसर्जन मिरवणुकीतील आवाजाकडे बघावे/ऐकावे लागेल. शेवटी रस्ता हा सामाजिक रिसोर्स आहे आणि बहुमताची दंडेली हा त्याच्या वापराचा किमान चुकीचा आधार असू शकतो. असो. ह्यावर्षीच्या आवाजाला इथेच निरोप देऊया.

डेसिबलच्या आकडेवारीशिवाय अजून एक इंटरेस्टिंग आकडेवारी म्हणजे २०१९च्या तुलनेत २०२२ मध्ये जवळपास १६% (सहातील एक) कमी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले. तसं ह्यात आश्चर्य काही नाही. सार्वजनिक गणेशोत्सव हा काही आता वर्गणीने साजरा होणारा हिशेबी सामाजिक कार्यक्रम नाही. तो राजकारण्यांनी फंड केलेला राजकीय कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाला लागणारा किमान खर्चही वाढता आहे. त्यामुळे जरी फंड करू शकणारे इच्छुक राजकारणी बरेच असले तरी ते ही गुंतवणूक परताव्याच्या प्रमाणात योग्य ठिकाणीच करत असतात. दुसरं, ज्या सार्वजनिक गणेशोत्सवांना वलय आहे तिथे प्रायोजक, वर्गणी हे केंद्रित होतात आणि ह्या वलयाच्या स्पर्धेत मागे पडलेल्या मंडळांना तेवढे रिसोर्स उरत नाहीत. तसंच हा उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यकर्ता गटही घटत जातो आहे. अनेक जुन्या निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांत अशा कार्यक्रमांना आवश्यक मनुष्यबळ शिल्लक नाही. आणि वर सरकलेल्या एक्स-मध्यमवर्गाला (जो स्वतःला चाणाक्षपणे आजही ‘मध्यमवर्ग म्हणवतो) सार्वजनिक होण्यात विशेष रस नाही. त्यांची संस्कृती आहे ती आपापल्या इन्स्टावर.      

म्हणजे पुरेसे पुढे, म्हणजे जिथे भारताचा demographic dividend संपला आहे अशा अवस्थेत, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव कदाचित नसतील. असतील त्यांचेही स्वरूप बदलेलेले असेल. आपल्याला वाटतं त्यापेक्षा आधी आणि त्यापेक्षा नंतर हा बदल येईल. तेव्हा डॉल्बी वाजेल का? झिंगाट, बोटीने फिरवणारा नाखवा तेव्हा असेल का? तेव्हा गणेशोत्सव पावसाळ्यात असेल का उन्हाळ्यात? आपण असू का? (आणि ती श्रेष्ठ कादंबरी तोवर तरी आलेली असेल का?)

हं. एवढे मनोरंजन सध्या पुरे आहे.

 

Tuesday, January 28, 2020

मराठीतील फिक्शन क्षीण होते आहे का: चारचौघांची चर्चा आणि हौशी क्ष-किरण

(मराठीतील फिक्शन, म्हणजे कथा आणि कादंबरी, क्षीण होते आहे का ह्यावर पॉडकास्ट सदृश्य काही बनवावं असा विचार मेघना, आदित्य, नंदन आणि मी केला. त्यातून बनलेले तीन ऑडिओ 
मेघनाने घेतलेली पंकज भोसलेची मुलाखत 
फिक्शन क्षीण होते आहे का – बेसिक मांडणी 
मागच्या 25 वर्षातील लक्षणीय फिक्शन 
ह्या चर्चा रेकॉर्ड करण्याच्या आधी मी मला नेमकं काय वाटतं ह्याबद्दल काही नोट्स काढल्या होत्या. त्या पुढे शेअर करतो आहे. )

मराठी फिक्शनबाबतचा प्रश्न मी माझ्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ च्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मांडला. माझ्या मनात आलेला प्रश्न हा प्रामुख्याने मराठी कादंबऱ्याबाबत होता. त्यातही मी मला झपाटून वाचाव्याश्या मराठी कादंबऱ्या फारच कमी येत आहेत अशा प्रकारची मांडणी केलेली होती. कथा हा विषय माझ्या डोक्यात अजिबातच नव्हता. ह्याचं कारण, subconsciously मला मराठीत फारच जास्त कथा लिहिल्या जातात असं वाटतं हे होतं हे नंतर स्वतःच्या निरीक्षणातून माझ्या लक्षात आलं. 
मी पेशाने समीक्षक नाही. (समीक्षक असणं हे सौंदर्य निर्माण करण्याची कुवत नसल्याने सौंदर्याबद्दल बौद्धिक मैथुन करून आनंद घेण्यासारखं आहे असं काहीकाहीवेळा मला वाटतं. पण अर्थात आनंद नसण्यापेक्षा कसलाही आनंद बराच!) त्यामुळे माझं माझ्या ह्या साहित्यिक प्रश्नाकडे बघायचं फ्रेमवर्क हे माझ्या सामाजिक शास्त्रातील संशोधक असण्याच्या पेशाने प्रेरित झालेलं आहे. ‘मराठी फिक्शन क्षीण होते आहे का? मरू घातली आहे का?’ ह्या प्रश्नाचं उत्तर डिमांड-सप्लाय फ्रेमवर्कमध्ये आणि डिमांड-सप्लाय बनण्याचा प्रक्रियेत आहे असं मला वाटतं. पण मराठीत फेमस असलेले व्यक्तीसापेक्ष क्ष-किरण टाकून व्यक्तीसापेक्ष निदान करण्यापेक्षा वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांचा हार्ड डेटा घेऊन ह्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या ह्या टिपणाच्या शेवटी मी ह्याबाबत जास्त बोलेन. 
मी, मेघना, नंदन आणि आदित्य, हा जो आमचा गट आहे ज्याने थोडा अधिक पद्धतशीर धांडोळा घ्यायचा ठरवला आहे त्या चर्चेत आणि मेघनाने पंकज भोसले ह्यांच्यासोबत केलेल्या चर्चेत फिक्शन घटली आहे ह्यावर एकमत आहे आणि त्याची काही कारणेही पुढे आलेली आहेत. 
त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे: -फिक्शन हे प्रामुख्याने मनोरंजनासाठी केलं जाणारं वाचन आहे. आणि मनोरंजनाचे नवे पर्याय (टीव्ही, स्ट्रीमिंग) हे निर्माण झाल्याने पुस्तकांची स्पेस घटली. हे सारे बदल लक्षणीयरित्या घडले ते १९९० च्या आर्थिक उदारीकरणानंतर. 
 मला स्वतःला हे कारण सुरुवातीला पटलं. पण नंतर विचार करता त्यात थोडी विसंगती आहे असंही वाटलं. 
आर्थिक उदारीकरणानंतर मराठी शिकलेले लोक आणि त्यांची क्रयशक्तीही वाढली. शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोचले, महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-नाशिक त्रिकोणात मध्यमवर्गी आर्थिक सुबत्ता आली. मग हे नवे लोक आणि त्यांचा पैसा वाचनाकडे आलाच नाही का? का फिक्शनकडे आला नाही, पण बाकी मराठी साहित्याकडे विशेषतः सेल्फ-हेल्प, प्रेरणापर, माहितीपर साहित्याकडे गेला? 
समीक्षक आणि क्रिटीकल वाचकांच्या वर्तुळात नावाजली जाणारी फिक्शन आणि बाकी वाचकांना वाचावीशी वाटणारी फिक्शन वेगळी आहे का? उदाहरण घ्यायचं असेल तर ‘कोसला’ चं घेता येईल किंवा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ चं. ‘कोसला’ वर म्हटलेल्या क्रिटीकल वर्तुळात नावाजलेली आहे. पण माझी आजी, जी तिच्या आयुष्याची ७०+ वर्षे सातत्यपूर्ण वाचक होती तिने कोसला वाचलेलं नव्हतं. माझे वडील दर आठवड्याला एक मराठी पुस्तक, प्रामुख्याने फिक्शन(!) वाचतात, त्यांनी कोसला वाचलेली नाही. (त्यांना एकदा देऊन बघावी वाचायला असा प्रयोग डोक्यात येतो आहे!)
म्हणजे कदाचित माझ्या डोक्यात असलेली फिक्शन, जिला आपण ‘तात्विक फिक्शन’ म्हणूया, ती आणि बऱ्याचश्या वाचकांच्या वाचनातली फिक्शन वेगळीच असू शकते. 
ही तात्विक फिक्शन घटली आहे का वाढली आहे हे बघायचं झालं तरी कसं बघणार? एक प्रकार म्हणजे मराठीत १९९५ च्या आधी किंवा १९९० च्या दशकाच्या अगोदर काय अवस्था होती? तेव्हा खरोखरच, उपलब्ध क्रिटीकल वाचकांच्या डिमांडच्या प्रमाणात अशी फिक्शन बरीच येत होती का? का तेव्हाही तोकडी जाणीव होतीच? 
मेघना, नंदन आणि आदित्य ह्यांनी बनवलेल्या यादीत १४२ कादंबऱ्या आहेत. २५ वर्षांत १४२ कादंबऱ्या म्हणजे सरासरी साधारण ६ दरवर्षी. पण ह्या यादीत लोकफिक्शन नाही, म्हणजे विश्वास पाटीलांची ‘चंद्रमुखी’ नाही, ‘लस्ट फॉर लालबाग’ नाही, रहस्यकथा, भयकथा नाहीत, वसंत वसंत लिमये नाहीत. त्यांत आहेत ती सिरीयस वाचकांना भावलेली पुस्तके. 
मग वर्षाला ६ हा आकडा कमी का जास्त? मला स्वतःला असं वाटतं कि माझ्या मराठी वाचनाच्या भुकेला हा आकडा वाईट नाही. पण एखाद्या अधिक कमिटेड वाचकाला तो कमी वाटेल. आणि मुळात प्रश्न आहे कि १९९५ च्या आधी अशी सरासरी काय होती? 
दुसरी तुलना अशी शक्य आहे कि मराठीसारख्या दुसऱ्या भाषेत मागच्या २५ वर्षांत काय अवस्था आहे. मला वाटतं कि कन्नड आणि तमिळ ह्यांची मराठीशी तुलना योग्य राहील. ह्या दोन्ही ताकदवर प्रादेशिक भाषा आहेत, त्यांना मोठा भूभाग आहे, ह्या राज्यांतील शहरीकरण आणि मध्यमवर्ग ह्यांचा महाराष्ट्राशी सारखेपणा असण्याची दाट शक्यता आहे. इंग्रजी शिकणं ही उन्नतीची शिडी हे ह्या राज्यांतील मध्यमवर्गाने मानलेलं असावं. मध्यमवर्गाचा उपजीविकेचा प्रकारही सारखा असावा. पण ह्या राज्यांत भाषिक वैविध्य कमी आहे कारण हिंदी भाषिक कमी आहेत. त्यामुळे ह्या भाषांतील साहित्य व्यवहार अधिक ताकदवान असण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या भाषांची अवस्था ही चांगले टोक (upper bound) अशा अर्थाने वापरता येऊ शकते. 
वर केलेल्या विवेचनाचा दुसरा एक भाग असा कि मी मुळात क्षीण होण्याचा प्रश्न हा तात्विक फिक्शनलाच लावून पहावा. किंवा ‘मला झपाटून टाकणाऱ्या अशा तात्विक फिक्शनलाच’ लावून पहावा. इथे फारच व्यक्तीसापेक्षता आहे आणि त्याची मला जाणीव आहे. झपाटून टाकणं हे बदलत राहू शकतं आणि झपाटल्यागत वाचलं जाणं हाच काही पुस्तक आवडायचा एकमात्र निकष नाही. पण तो एक जोरदार निकष मात्र नक्की आहे. 
--
मी माझ्या ब्लॉगवर सुरु झालेल्या प्रश्नाचा नीट विचार केला. तो प्रश्न अशा मांडणीतून आला कि ७०० ते हजारभर पानांची कादंबरी मराठीत पुढच्या काही वर्षांत निर्माण होण्याची शक्यता काय? असे प्रोजेक्ट किमान २-३ वर्षांचे असू शकते. तेवढा वेळ आपल्या उपजीविकेला सांभाळून देऊ शकतील असे कोण मराठी लेखक आहेत? तेवढी बौद्धिक क्षमता असणारा मनुष्य मराठी कादंबरीकडे वळण्याची काय शक्यता आहे? असं होणार नाहीये असं मला म्हणायचं नाहीये. माझा संशोधकी पेशा मला ठाम विधाने करण्यापासून परावृत्त करतो. ‘असं व्हायची शक्यता कमी आहे’ असा माझा सुरुवातीचा कयास (null hypothesis) आहे. 
असं मला वाटतं ह्याचं कारण मुख्यतः सप्लाय साईडला, म्हणजे लिहिणाऱ्या लोकांच्या बाजूला आहे. वर म्हटलं तसं ज्या पद्धतीने उपजीविकांचा दाब (त्यात घालवायला लागणारा वेळ, शहरी प्रवास, टिकून राहण्यासाठी लागणारे उत्पन्न इ.) वाढतो आहे त्यापासून स्वतःला insulate करून लिहिणारे किती येतील? मागच्या काही दशकांत प्राध्यापकी पेशाने ही मुभा दिली असावी, पण नव्या काळात तशी मिळणार आहे का? आणि ज्यांना मिळणार आहे त्यांना लिहायचे आहे का? 
मला असं वाटतं कि मराठीत लिहू शकणारे लोक प्राध्यापकी पेशांत जायची शक्यता १९९० नंतर कमी झाली आहे. क्षमता असलेल्या मनुष्याला भौतिक उन्नती साधणं हे उदारीकरणाने सोपं करून सोडलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणाच्या निवडीतच ही बाब दिसून येत असावी. थोडीही समज असणारा मनुष्य हा विज्ञान, कॉमर्स अशा शाखा निवडू पाहतो आणि अशी महाविद्यालये खालपर्यंत बनलीही आहेत. (माझ्या मांडणीचा अर्थ आज अकॅडेमिक उपजीविका असणारे मराठी लेखक हे कमी प्रतीचे आहेत असा नाही. आज असे करणारे लोक 1990 च्या आधीच्या प्रमाणाहून कमी आहेत असा आहे.)
हा कयासही तपासता येई. कला शाखेत नावाजलेल्या महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेचा डेटा पाहून हे सांगता येईल. 
मराठीत लिखाण हा हौसेचा मामलाच आहे, विशेषतः मजबूत लोकप्रियतेच्या प्रतलाच्या खाली असलेल्या लेखकांना. (म्हणजे अच्युत गोडबोले, पु.ल. देशपांडे अशी लोकप्रियता!) पंकज भोसल्यांनी त्यांच्या ऑडीओमध्ये हा मुद्दा मांडला आहे. हौस ही वेळेवर आणि स्पेसवर अवलंबून असते. ही वेळ आणि स्पेसच दुर्मिळ झाली आहे. केवळ उपजीविकेच्या दाबानेच असं नाही. कदाचित व्यक्ती म्हणून आपण अधिक impatient झालो आहोत, आपल्याला अधिक रंजक आकर्षणे उपलब्ध आहेत, समविचारी लोकांसोबत वेळ घालवणे शक्य आहे आणि सोशल मिडिया आहे. 
एकूणच का लिहावं (त्याचे आत्मिक-भौतिक फायदे) आणि काय लिहावं (शहरी मराठी लेखकांचे एकजिनसी विश्व आणि ग्रामीण-शहरी किंवा ग्रामीण अशा लेखकांचे वेगळे पण परत एकजिनसी विश्व ह्यांत नाविन्य येणार ते कुठून? बरं, ह्या दोन्ही गटांत फिक्शनला वैयक्तिक साठमारी, जात आणि इतिहास ह्यांवर प्रहार करायचे अस्त्र म्हणून वापरायची ही खास मराठी खुमखुमी आहे तो वेगळा एकजिनसीपणा.) ह्या बेसिक घटकांत आलेला कमकुवतपणा हाच क्षीण प्रवाहाचे कारण असेल का?   
का लिहितात आणि काय लिहितात हे मोठेच तात्विक प्रश्न आहेत. त्यांची ठाम उत्तरे आपल्याकडे नाहीत. पण जगभरातल्या अभ्यासावर हे दिसतं कि जर लेखकांची सांपत्तिक स्थिती बरी होत असेल तर ते अधिक आणि अधिक गुणवत्तेची निर्मिती करतात. आणि त्यांना ही बरी अवस्था पुस्तकांच्या मानधनातूनच मिळत असेल असे नाही. शिष्यवृत्त्या, पाठ्यवृत्त्या ह्यांतूनही त्यांना लिखाणाला लागणारी स्पेस मिळू शकते. अशा सपोर्ट स्ट्रक्चरची उपलब्धता ही समाजाच्या भौतिक आणि बौद्धिक संपन्नतेवर अवलंबून असावी. 
मराठी वाचक, विशेषतः मध्यमवर्गीय वाचक हे भौतिकदृष्ट्या तर संपन्न आहेत. मग वाचनाची डिमांड का घटते आहे? डिमांड घटते आहे हे तसं स्पष्ट आहे. मागच्या दोन महिन्यांत दोन नियतकालिके बंद पडली. (अक्षरधारा आणि अजून एक, ज्याच्या संपादकाने फेसबुकवर आपली भूमिका मांडली होती.) माझ्या शहरातील खाजगी वाचनालये बंद पडली. 
वाचनालयांचा प्रश्न मराठीपुरता मर्यादित नाही. शहरातील जागांचे भाव बघता वाचनालय हा जागेचा वाईट बाजारी उपयोग ठरतो. जागेचा अपव्यय वाचवावा म्हणून मुंबईतील ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीनेही आपली लायब्ररी केवळ ऑनलाईन कॅटलॉग चाळून पुस्तके मागवणे अशी मर्यादित केलेली आहे. 
डिमांड घटण्याचा सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची घटती गुणवत्ता. मध्यमवर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळल्याने मराठी पुस्तकांची, लेखकांची शालेय वयात होणारी ओळख कमी होते. घरातून वाचनाचे बाळकडू असेल तर काही अपवाद असू शकतात. पण फिक्शनमध्ये वापरली जाऊ शकणारी लवचिक मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मराठी पाठ्यपुस्तकातील बाळबोध मराठी हे एकमेकांशी जुळत नाहीत. त्यात जर विद्यार्थी अप्रादेशिक बोर्ड्स (जसे CBSE) असेल तर मराठीची पालकांमुळे तोंडओळख एवढाच प्रकार उरतो. मुंबईतील दाक्षिणात्य कुटुंबातील प्रादेशिक इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या मुलांचा जसा त्यांच्या मातृ-पितृ भाषेशी प्रामुख्याने संवादभाषा म्हणून संबंध राहतो तसं ह्या मुलांचं होतं. नवे मराठी वाचक बनण्याची शक्यता कमी होते किंवा बनतच नाहीत. 
जे मराठी माध्यमांत आहेत तिथे रोल मॉडेल क्रायसिस आहे. मुले इतरांचे पाहून शिकतात. आज मराठी माध्यम हे बहुतांश हुकलेल्या पालकांचे आहे. (पुण्या-मुंबईचे काही अपवाद सोडून!) हे पालक स्वतः फिक्शनवाचक असण्याची शक्यता नाही. ह्या हुकलेल्या पालकांतील महत्वाकांक्षी पालक वाचनाकडे भौतिक उन्नतीची शिडी वेगाने चढायचे साधन म्हणून पाहतात. फिक्शन ह्या शिडीत येईल का, जितके माहितीपर किंवा सेल्फ-हेल्प लिखाण येईल? 
मराठी माध्यमांच्या सुरकुतत चाललेल्या शाळांमधून कसे आणि किती वाचक येतील? प्रादेशिक इंग्रजी माध्यमातून किती येतील? आणि अप्रादेशिक माध्यमातून किती येतील? ह्याची उत्तरे आपल्याला माहित नाहीत. पण ती नकारात्मक असावीत असं मला वाटतं. 
--
मी वर मांडलेले मराठी फिक्शनच्या एका उपविभागाबद्दल मांडलेले कयास हे कदाचित सगळ्याच मराठी फिक्शनला लागू पडत असावेत. पंकज भोसल्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित लोकफिक्शनलाही तो लागू पडत असावा. त्यांनी दिलेलं शृंगारिक साहित्याचे उदाहरण चपखल वाटते. मराठी शृंगारिक साहित्याच्या घटत्या निर्मितीला दृश्य माध्यमाची वाढती उपलब्धता जबाबदार असावी असं वाटतं. डिमांड घटली आणि मग सप्लाय घटला. 
वाचनाची क्षमता असणाऱ्या व्यक्तीची वाचनाची स्पेस घटली आहे. ही घट दोन प्रकारची आहे, फोकस आणि वेळ. लोकांच्या उपजीविका ह्या अधिकाधिक बौद्धिक ताण देणाऱ्या होत आहेत, ज्याने फोकस घटतो आहे. वाचन ही श्रमाची बाब आहे, तात्विक फिक्शन वाचणं ही अधिक श्रमाची. उपजीविकांचा वेळ वाढलेला आहे आणि गंभीर व्यक्तीलाही तात्विक रंजनाच्या बऱ्याच जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. पण अर्थात वाचनाला रंजन म्हणून घेऊ शकणारे लोकही वाढले आहेत. त्यामुळे नक्त इफेक्ट काय आहे हे एखाद्या सर्व्हेनेच समजू शकेल. नितीन रिंढे ह्यांनी नेमकी हीच गरज त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत व्यक्त केली कि वाचणाऱ्या लोकांच्या वर्तनावर अधिक प्रकाश पडायला हवा आहे.
--
मराठी साहित्य, भाषा ह्यांच्याशी आधारित उद्दिष्टांवर कार्यरत संस्था, अशा विषयांत स्वारस्य असणारे लोक ह्यांनी फिक्शनच्या निर्मितीबाबतच्या प्रश्नांना डेटा वापरून उत्तरे देता येण्यासाठी रिसोर्स उभे केले पाहिजेत. विशेषतः वाचकांची निर्णयप्रक्रिया आणि वाचकांच्या विविध उपस्तरांची निर्णयप्रक्रिया समजून घेण्यासाठी विविध भौगोलिक-सामाजिक स्तरात पोचणारे सर्व्हे आवश्यक आहेत. 
का करावा असा अभ्यास? वर म्हटलं तसं, बौद्धिक रंजन म्हणूनच. त्यातून भाषा आणि व्यक्ती संबंधावर अधिक प्रकाश पडेल हे नक्की. पण आपण मराठी भाषा, मराठी लिखाण ह्यांना वृद्धिंगत करणारे फार काही करू शकू असे नाही. 
लोक धोतर सोडून विजारी वापरू लागले, सहावारी सोडून नववारी साडी, साडीच्या ऐवजी ड्रेस वापरू लागले कारण अधिक सोयीचे आहे. तसे लोक भाषेशीही करतील. एकदम प्रोफेटिक व्हायचं झालं तर, मराठी प्रामुख्याने बोलीभाषा होण्याच्या प्रवासात (म्हणजे पुढच्या शतकभरात वगैरे) त्यातली गंभीर/तात्विक फिक्शन कशी क्षीण होऊन एके दिवशी संपली ह्या ह्रासाचा वारसा लिहिणं ही बौद्धिक गंमत, पण उदास करणारी!   

Tuesday, June 27, 2017

'आउटलायर्स' बाय Malcolm Gladwell

       ‘कशामुळे विद्यार्थी शालेय अवस्थेत आणि त्यानंतर, ज्याला आपण ढोबळ सामाजिक अर्थाने ‘यशस्वी’ म्हणतो तसे होतात?’ ह्यावर चर्चा चालू असताना माझ्या विद्यार्थ्याने मला ‘आउटलायर्स’ ह्या  Malcolm Gladwell ह्यांच्या पुस्तकाबद्दल सांगितलं.
       पुस्तक वाचून झाल्यावर मी निश्चितपणे असं सांगू शकतो कि आपल्या दृष्टीकोनात बदल घडवून आणायची शक्ती असलेल्या पुस्तकांत मी ‘आउटलायर्स’ चा समावेश करेन. माझी अशा पुस्तकांची यादी तरी काय आहे असं कोणी विचारलं तर मी त्याला त्या यादीतील काही पुस्तकांचीच नावे सांगेन: जसं ‘Zen and the art of motorcycle maintenance’, डॉ. अतुल गावंडे ह्यांचं Being Mortal, युवल हरारी ह्यांचं Sapiens, Abhijeet Banerjee ह्यांचं Poor Economics असं. माझ्या स्वतःच्या काही प्रश्नांच्या दृष्टीने पुस्तके वाचणारा वाचक ही माझी अवस्था तशी नुकतीच आलेली आहे, त्यामुळे ही यादी छोटी आहे.
       ‘आउटलायर्स’ ची मध्यवर्ती थीम काय आहे? ‘आउटलायर्स’ म्हणजे एखाद्या क्षेत्रात टोकाचे यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या ‘यशाच्या’ कारणांची चिकित्सा. वानगीदाखल ह्यात बिल गेट्स आहे. पण त्यामुळे ह्या व्यक्तींवर हार-फुले उधळून त्यांचं दैवतीकरण करण्याच्या खाशा परंपरेच्या अगदी विरुद्ध टोकाशी हे पुस्तक आहे. काही नशिबाने उपलब्ध झालेल्या संधी, पालक आणि कम्युनिटी ह्या स्तरांवर असलेला वारसा आणि काही सामाजिक रचना ह्यांच्यामुळे क्षमता असलेल्या काही व्यक्ती ह्या आपल्याला ‘आउटलायर्स’ अशा यशस्वी झालेल्या दिसतात. पण खरंतर त्यांच्यासारख्याच क्षमतेच्या अनेक व्यक्ती वरील तीन पैकी एका किंवा अनेक घटकांच्या अभावाने मागे फेकल्या गेलेल्या असतात. ह्या सामाजिक रचना म्हणजे जातीनिहाय विषमता किंवा आर्थिक विषमता नाही, तर शालेय प्रवेशासाठी लागणारे किमान वय अशा अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या सुरुवातीच्या जीवनावर परिणाम करतात आणि नंतर हा परिणाम न भरून येणारे अंतर बनतो.
       Malcolm Gladwell ह्यांची उदाहरणे, ज्याच्या अनुषंगाने त्यांनी मांडणी केली आहे, ती प्रामुख्याने अमेरिकन आहेत. पण त्यांची चिकित्सा ही भारतात लागू ठरणार नाहीत असं अजिबात नाही. किंबहुना पालक आणि अधिक रुंद असे नातेवाईक-जातीविशिष्ठ कम्युनिटी ह्यांचे वर्तुळ ह्यामुळे मिळणारे default फायदे ही बाब भारताला व्यवस्थित लागू पडेल.
       Malcolm Gladwell ह्यांच्या मांडणीत आढळलेली एक बाब म्हणजे ‘यशस्वी’ म्हणजे कोण ह्याबाबतीतल्या व्याख्येत त्यांनी केलेला उपलब्ध निकषांचा स्वीकार. हे जे उपलब्ध निकष असतात ते प्रामुख्याने भौतिक समृद्धी, उत्पन्न आणि प्रसिद्धी ह्या तीन घटकांवर आधारित असतात. Malcolm Gladwell त्यावर खल करत नाहीत. पर्यायी व्याख्या, पर्यायी जीवनपद्धती अशी टीचभर त्रिज्येत लागू असणारी ‘थेरे’ करण्यापेक्षा लोक म्हणून जे काही असतात त्या विस्तृत मैदानात मानल्या जाणाऱ्या चलनांवर Malcolm Gladwell काम करतात. ही बाब मला महत्वाची वाटते. आपल्याला जर संधींपासून वंचित, भौतिक जीवनाच्या किमान पातळीच्या खाली असलेल्या कुटुंबांना ही तफावत मिटवण्यासाठी मदत करायची असेल तर त्यांना नेमकं काय उपलब्ध करून द्यायचं आहे ह्याबाबत स्पष्टता हवी. सुदैवाने खेड्यातच खरा भारत आहे[1], उत्तम शेती-मध्यम व्यापार-कनिष्ठ नोकरी अशा धादांत काल्पनिक फुग्यांतून भारतातले विचार करणारे बाहेर पडतायेत असं दिसतंय. शैक्षणिक प्रयोग वगैरे करणारेही अनेकदा चुकीच्या सैद्धांतिक फ्रेमवर्कमुळे यशस्वी होऊ शकत नाहीत, किंवा त्यांची मूळ उद्दिष्टे भरकटून ‘वेगळे काही करणारे’ असं प्रसिद्ध होणं एवढाच भाग उरू शकतो. ‘शिक्षण’ ह्याबाबतीत तर जे तथाकथित विचारवंत[2] आहेत त्यांची मांडणी आणि समाजातील लक्षावधी लोक त्यांच्या निर्णयांतून मांडतायेत ती भूमिका ह्या अत्यंत विसंगत असतात. उदाहरणार्थ: शिक्षणासाठी कोणती भाषा माध्यम म्हणून असावी हा विख्यात प्रश्न. ह्या भाषेबद्दलही एक इंटरेस्टिंग प्रकरण ‘आउटलायर्स’ मध्ये आहे.
       शिक्षणाचे माध्यम हा इथला विषय नाही, पण शिक्षणाचे माध्यम हे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील व्यक्ती म्हणून असणाऱ्या जीवनावर दोन प्रकारे परिणाम करते: एक परिणाम हा ‘पिअर ग्रुप’ मुळे येतो आणि तो खरंतर भाषेचा परिणाम नाही. आजच्या घडीला इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे व्हर्न्याक्युलर माध्यमातील पालकांपेक्षा माहिती, संधी आणि नेटवर्क ह्यांत चांगले असतात आणि हाच फरक विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होतो. दुसरा परिणाम हा भाषेचा आहे. कुठल्याही दोन भाषा ह्या माध्यमच असल्या तरी त्या perfect substitute नसतात. भाषा हे माध्यम एका सांस्कृतिक अवकाशात विकसित होते. आणि त्यामुळे भिन्न सांस्कृतिक अवकाशात विकसित झालेली माध्यमेही मूलभूतपणे वेगळी असतात जरी त्यांना ‘संवाद’ ह्या एकाच क्रियेचे माध्यम म्हणून वापरले जाते. आपण कितीही नाकारलं तरी भौतिक सुखांच्या  किंवा व्यक्तीने स्वतःसाठी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पाठलागावर आधारित व्यक्तिकेंद्री (व्यक्ती हे मूलभूत एकक मानणारी) स्पर्धा हे वितरणाचे साधन मानणारी मूल्यव्यवस्था हीच आधुनिक जगाची मूल्यव्यवस्था आहे. ज्या भाषेच्या आधाराने मूल जगाकडे बघू लागणार आहे त्या भाषांच्या मुळाशी हीच मूल्यव्यवस्था असेल असे नाही.  Gladwell ह्यांनी एक विलक्षण उदाहरण वापरून ही बाब मांडली आहे.
       सो, ‘आउटलायर्स’ हे एक नॉन-फिक्शन आहे.  ते पुराव्यांवर आधारित मांडणी करतं आणि काही टोकदार निष्कर्ष मांडतं. पण ते अवास्तव जड, गंभीर नाही.            



[1] खेड्यांना समस्या नाहीत असा ह्या वाक्याचा अर्थ नाही. तर शहरीकरण ही काही कृत्रिम, रोगट अवस्था आहे, त्यातल्या समस्या ह्या मुळात शहरीकरण ह्या समस्येनेच उद्भवल्या आहेत अशा स्वरूपाच्या भूमिकेबाबत हे वाक्य आहे. भारतात आजमितीला जवळपास २/३ लोकसंख्या ग्रामीण आहे, त्यामुळे समस्यांतही मोठा भाग ग्रामीण समस्यांचा असेल ह्यांत काही वादच नाही. पण शहरातील मनुष्य वर्तन आणि ग्रामीण मनुष्य वर्तन ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत हे एक मिथ आहे. शहरी मनुष्य वर्तन आणि ग्रामीण मनुष्य वर्तन ह्यापाठी एकाच मानवी स्वभावप्रक्रिया आहे असे मांडायचे आहे.
[2] भारतात 'विचारवंतांना' डेटा, पुरावे, पूर्वीचे रिसर्च अशा क्षुल्लक गोष्टींची गरज नसते. ‘मेरे मनको भाया, मै थिअरी किंवा पॉलिसि बनाया’ असं अजूनही चालतं. मुळात माहितीवंतांना किंवा सोशल मिडीयावर प्रकट होणाऱ्यांना विचारवंत समजणं ही एक गल्लत आपण करतोच. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ह्यापेक्षा ‘प्रकटला तो अभ्यास केलेलाच’ असं उलटं मापन अनेकजण करतात. मांडणी करणारे आक्षेपांना तोंड द्यायला तयार नसतात. ह्यार्थाने तथाकथित. ह्यापेक्षा वरची अवस्था असे काहीजण हे ‘प्रयोग’ केलेले असतात. पण अनेकदा ह्या ‘प्रयोगांची’ काटेकोर मोजणी आणि यश-अपयशाचे मापन झालेले नसते. सुदैवाने सी.एस.आर. च्या पौष्टिक प्रवाहाबरोबर मोजणीचा आग्रहही येऊ लागलेला आहे.  

Sunday, May 4, 2014

गोंगाटचिंतन

       माझ्या एका मित्राचा मला आज सकाळी फोन आला. आदल्या रात्री १२.३० वाजता त्याने पोलिसांना फोन करून त्याच्या बिल्डिंगजवळ चालू असलेल्या डी.जे. बद्दल सांगून तो आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वेळाने फोन उचलला गेला आणि नंतर फोन उचलणेच बंद झाले. मी हा अनुभव अगोदर घेतलेला आहे.
       पोलिसांना असे किती फोन गेले होते ह्याचा काही डेटा नाही. आणि अर्थात पोलिसांनी काही केलेले नाही हे स्पष्ट आहे. कारण १२.३० पर्यंत डी.जे. चालू होता ही घटनाच ते दर्शवते. माझ्या मित्राचा प्रश्न साधा आहे की जर पोलिसांनीच अशा पद्धतीने फाट्यावर मारले तर मग काय करायचे?
       काय करायचे ह्याचे पर्याय नाहीत असे नाही. आपल्यात खाज असेल तर आपण कायदेशीर मार्ग वगैरे वापरू शकतो. पण स्वाभाविकपणे त्यात अनेक मर्यादा आहेत. म्हणजे त्या असा मार्ग वापरू शकणाऱ्या माणसाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक मर्यादा आहेत. कायद्याचे हात तर लांब कितीही होऊ शकतात, पण ते इतके खेचायची क्षमता आहे का हा खरा प्रश्न आहे.
       मुळात असा गोंगाट होतो आहे हे पोलिसांना माहित नाही असं नाही. पोलिसांचे पथक रात्री रस्त्यावर फिरत असते आणि त्यांना किमान रस्त्यालगत असणाऱ्या भागांत काय काय चालू आहे ह्याची माहिती असते. ह्यातून काही निष्कर्ष संभवतात. पाहिला म्हणजे गोंगाट करणाऱ्याचे आणि पोलिसांचे सूतगूत. दुसरा म्हणजे पोलिसांनी तक्रार यायची वाट पाहिली आणि कोणी १२.३० पर्यंत ती केली नाही. अर्थात हा प्रश्न उरतोच की १२.३० वाजता पोलिसांनी का दखल घेतली नाही. त्यामुळे असे मानायला वाव आहे की वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून गोंगाट चालू ठेवायला पोलिसांनी हातभार लावलाच.
       मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाहीये. व्यक्तिशः मला पोलिसांच्या मदतीचे चांगले अनुभव आहेत. पण ह्या अनुभवांचे निष्कर्ष काढले तर काय दिसतं की मला व्यक्ती म्हणून मदत केली गेली नाही. एका अनुभवात स्त्रियांच्या छेडछाडीचा प्रसंग होता तर दुसऱ्या प्रसंगात मी अमुक एका इन्स्टिट्यूटमधला आहे ह्यावरून मला मिळालेली वागणून आणि सल्ला ठरला. मी जेव्हा गोंगाट/आवाज थांबवण्यासाठी फोन केला तेव्हा माझ्या मित्राला आलेल्या अनुभवाच्यासारखाच अनुभव मला आलेला आहे.
       पण मी असेही प्रसंग अनुभवले आहेत जिथे मी गोंगाट निर्माण करणाऱ्या गटात होतो आणि साडेदहा वाजता पोलीस येऊन म्हटले की आम्हाला आसपासहून फोन येत आहेत की दहा वाजून गेले तरी गोंगाट होतो आहे. आवाज होत होता तो फेअरवेल पार्टीच्या आवाजाचा आणि फोन केला होता आमच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या एका प्रोफेसरने.
       म्हणजे ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाचे मुद्दे दोन आहेत. एक आवाज निर्माण करणारे एक नगण्य प्रकारचे लोक हवेत आणि आवाजाचा त्रास होणारा हा आर्थिक, सामाजिक, संस्थात्मक बाजूने दांडगा माणूस हवा.
       काहीजण असे म्हणू शकतील की वरचे दोन मुद्दे हे ध्वनिप्रदूषण नव्हे तर साऱ्याच कायद्यांना लागू आहेत. मी म्हणेन की अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे राजकोय उपद्रवमूल्याचा. ध्वनी प्रदूषण ह्या मुद्द्याला काहीही राजकीय उपद्रवमूल्य नाही. गोंगाटाच्या तक्रारीने राज्य किंवा केंद्रशासनाची प्रतिमा डागाळणार नाही, वर्तमानपत्रे एखादा कॉलम किंवा एखादा प्रक्षुब्ध लेख ह्यापलीकडे ध्वनीप्रदूषणाला कव्हर करणार नाहीत.
       परत, मला मिडीयालासुद्धा काही शिव्या द्यायच्या नाहीत. कारण मुळात मलाही हे जाणवतं की गोंगाट, आवाज ह्यांनी होणारा त्रास ह्याचे उपद्रवमूल्य वेगळया प्रकारचे आहे. गोंगाट चालू असताना त्याच्या आजूबाजूच्या सर्वांनाच सारख्या प्रमाणात त्रास जाणवेल असेही नाही आणि जाणवेलच असेही नाही. दुसरी बाब सवयीची की समजा मला होतोय आज त्रास, पण सतत त्या आवाजात राहून मला त्याचं काहीच वाटेनासं होईल. गोंगाटाचे शारीरिक, मानसिक परिणाम ह्याबाबत भयावह वाटणारी आकडेवारी आहे. पण तो केवळ गोंगाटाचा परिणाम आहे का गोंगाट, जीवनशैली, आहार ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ह्याबद्दल किती तर्कशुद्धपणे आकडेवारी वापरता येईल ह्यात मला शंका आहे. त्यामुळे आवाजाचा, गोंगाटाचा त्रास हा वेगळा ठरतो.
--
       मी स्वतः एका महामार्गाच्या बाजूच्या घरात वाढलो. आमच्या घरी येणारे पाहुणे कायम त्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या आवाजाबद्दल बोलायचे, तर आम्ही सांगायचो की इथून रिक्षा फार सहज मिळतात. आमच्या आजूबाजूला फार आवाज आहे ही गोष्ट मला जाणवली नव्हती कारण आजूबाजूला शांतता असलेल्या भागात राहणं म्हणजे काय हे मला ठाऊक नव्हतं. माझ्या पालकांनाही जाणीव नव्हती कारण त्यांच्यासाठी आवाजाची पातळी एकदम वाढली नव्हती. ती हळूहळू वाढत गेल्याने तिची धक्का पोचवायची क्षमताच संपली होती कदाचित. जी गोष्ट आवाजाची, तीच स्वतःच्या स्पेसची. टी.व्ही. चालू असताना अभ्यास करणं, आजूबाजूला कोणी झोपले असताना कॉम्प्युटरवर काम करणं ह्या गोष्टी सवयीच्या होत्या.
       मी नंतर स्वतःची खोली असलेल्या, आजूबाजूला शांतता, झाडे वगैरे असलेल्या एका होस्टेलवर राहू लागलो. आणि त्यानंतर मला आवाज, स्वतःची स्पेस ह्या गोष्टी जाणवू लागल्या. आणि आता मला परत आधी मला ज्या सवयी होत्या त्या परत मिळवणं जवळपास अशक्य वाटतं.
       पण असं ज्यांचं झालेलं नाही त्यांना जर आवाज, छोट्याश्या जागेत दाटीवाटीने राहणं ह्याची तक्रार वाटत नसेल तर नवल काय? मुंबईतल्या स्लमस् मध्ये सर्व्हे करताना मला असं दिसलं की आम्ही जिथे राहतो आहोत ते वाईट आहे असं तेच लोक म्हणतात ज्यांना झोपडीपेक्षा वेगळया जागेत रहायचा अनुभव आहे. बांद्र्याच्या बेहरामपाडा मध्ये आता अशी कुटुंबे आहेत ज्यांची तिसरी पिढी तिथेच वाढते आहे. ते लोक तक्रार करत नाहीत, तर सांगतात की इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, सरकारी स्कूल जवळ आहे, सब सहुलीयत है.
       कदाचित ह्यात थोडा सिलेक्शन बायस आहे. असे लोक असणार झोपडीत राहणारेसुद्धा ज्यांना तिथे रहायचं नाही. पण मग ते तक्रार करत तिथे राहणार नाहीत. ते जे काही करून बाहेर पडायचं तसे बाहेर पडतील. जे राहतील ते सारी सहुलीयत असणारेच. सगळ्याची सवय पडलेले, स्थितीशील.
--
       पण दादरला झालाय की सायलेन्स झोन का काय ते! आणि त्याची स्पष्टीकरणे पण सोपी आहेत. मुंबईच्या आर्थिक व्यापाला खेटून वाढणाऱ्या एका धर्मशाळा शहराला (जिथे लोक आठवड्याचे पाच-सहा दिवस रात्री झोपायला असतात असे शहर) शिवाजी पार्कची वैशिष्ट्ये असणार नाहीत. इथे राहणाऱ्यांना अपरिहार्यतेची विलक्षण जाणीव आहे. आणि फारच झालं, तर ते आपला त्रास कमी करून घेण्यापेक्षा ते अशा त्रासात उडी घेणं पसंत करतात. म्हणजे रस्त्याची गर्दी, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रिक्षा नको ना, मग गाडी घे असं. त्रास होणाऱ्यांचा हतबल भाग होण्यापेक्षा त्रास देणाऱ्यांचा निब्बर भाग होणं कधीही बेटर आहे.
       परत एकदा, ह्यात कसलाही क्लास कॉन्शसनेस वगैरे नाही. मला हे सगळं घडतं ते प्रचंड नैसर्गिक वाटतं. म्हणजे पोलिसांनी माझा, माझ्या मित्राचा फोन न घेणं, मिडीयाने गोंगाट कव्हर न करणं, रस्त्यावर वाहनांची दाटी वाढतानाही आजच्या पादचाऱ्यांना, रिक्षा-बस प्रवाश्यांना दुचाकी, चारचाकी घ्यावाशी वाटणं. प्रत्येकजण त्याच्या समोरच्या इंसेंटिव्हना प्रतिसाद देतो आहे. कायदा पाळून, माझ्या तक्रारीची दखल घेतल्याने मिळणारं आत्मिक वगैरे समाधान जाणवणारे पोलीस कथा-कादंबऱ्यांत असतात. प्रत्यक्षात गोंगाट घालणारा  स्थानिक बाहुबली जे देऊ शकेल त्याचं भौतिक मोल जास्त महत्वाचं असतं. मिडीया तर प्रॉफीट मॅक्सिमाइझ करणारा व्यवसाय आहे. आणि ध्वनी प्रदूषणाच्या स्थानिक स्वरूपाच्या तक्रारीने मिळणारा फायदा आणि त्याच जागेत अन्य काही छापून, किंवा न छापून मिळणारा फायदा ह्याचं गणित ते करत असतील. आठवड्याला पाच-सहा दिवसांची नोकरी करणारा माणूस भौतिक समृद्धीचा, बाकीच्याच्या भौतिक उपभोगाशी गती मिळती राखण्याच्या प्रयत्न करेल.
       पण मला तर होतो आहे आवाजाचा त्रास. मग मी काय करायचं?
१.       आपल्या गांडीत कुठवर खाज आहे हे बघून कायद्याने लढायचं.
२.       आपण काही ना काही एक मार्गाने स्थानिक बाहुबली बनायचं, आणि मग आपल्या एका फोन सरशी पोलीस येतील किंवा येणार नाहीत.
३.       निघून जायचं शांततेच्या शोधात.
४.       ह्यापैकी काहीही नाही. स्थितीशील, सवयशील होत सहुलीयत घेत रहायची.
वेळ चिकार आहे, उद्या, आज ज्यांच्याकडे हलदी असेल त्यांचा डी.जे. अजून वाजू लागलेला नाही. निवडणुकांचे निकाल लागलेले नाहीत, गणेशोत्सव, दिवाळी यायची आहे. ह्यांच्या अध्ये-मध्ये माझ्याकडे असलेल्या शांततेच्या फाटक्या चादरीवर उडत उडत मला पर्याय ठरवायचा आहे.     


Wednesday, August 21, 2013

बघ्या, दाभोलकर आणि मंगळागौर

बघ्या सकाळी मित्रासोबत चहा पीत असताना त्याला दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या केली असं कळलं. त्याला धक्का बसला. का?
  १. तो केव्हातरी दाभोलकरांच्या नात्यातल्या जवळच्या कोणालातरी भेटला होता.
  २.  त्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्या अशा छोट्या-मोठया ओळखीत खून झालेलं त्याने पहिल्यांदा ऐकलंय.
  ३.  त्याला हेही एकदम जाणवलं की महाराष्ट्राच्या, किंवा भारताच्या सामाजिक, राजकीय घडामोडींत असे खून क्वचित होतात. अपवाद/उदाहरणार्थ: बिल्डर्स, नगरसेवक आणि शहरपातळीवरचे राजकारणी, गँगस्टर्स, एक पत्रकार सुमारे दीड एक वर्षांमागे. कदाचित हे त्याला माहित असलेले, आठवत असलेले.
मग बघ्या दिवसभर ह्याच घटनेवर तरंगत राहिला. फेसबुकवर शोकाचे, श्रद्धांजलीचे, महाराष्ट्रातील, देशातील लोकशाहीच्या अधःपतनाचे, स्वातंत्र्यावर घाला येण्याचे स्टेटस अपडेट वाचत राहिला. होईल तसा आपलेही पसा-दोन पसा योगदान देत राहिला. त्याला ठाऊक होतं की त्याचं बरचसं वाईट वाटणं बेगडी आहे, दिखाऊ, सवयीचा भाग आहे. तो त्याचं म्हणून एक जे व्यक्तिमत्व जोपासू पाहतो आहे त्यात अशी हळहळ हा एक पैलू आहे.
पण त्याला एक प्रश्न पडत राहिला, तो म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यांचा. बघ्या आधी जाम श्रद्धाळू होता. म्हणजे इयत्ता तिसरीत त्याचा आठवा क्रमांक हुकला याचं कारण होराभूषण शास्त्री यांच्या दर रविवारी छापून येणाऱ्या भविष्यानुसार त्याला असलेली साडेसाती हे होतं. मग तो त्यासाठी शनिस्तोत्र वाचू लागला. मग तो परीक्षेच्या अगोदर हातावर दही घेऊन बाहेर पडू लागला. पण ही काही श्रद्धा नव्हती हे आज बघ्या सांगू शकतो. ही असली तर भीती होती, किंवा खंडणी.
मग बघ्या हळूहळू अश्रद्ध बनत गेला. म्हणजे तो उघड नास्तिक झाला नाही. पण त्याने अस्तिक असण्याचे जे आचार-विचार बाळगावेत ते सोडले, ते केले नाहीत तर काय ह्याची भीती सोडली. पण बघ्या निर्भय झाला नाही. बघ्याची गांड फाटायची. पण तो कोणाला न दाखवता एकटा मनात टाके घालायचा. पण काही-कधी काही जाम झेपायचं नाही. मग बघ्या भगवद्गीता वाचायचा, किंवा मनाचे श्लोक म्हणायचा. म्हणजे तो थेट देवाला वेठीस धरायचा नाही, पण त्याच्या जाणीवेबाहेरचा, आकलनापलीकडचा एक बिंदू आधाराला धरून तो हलके हलके स्थिर व्हायचा. मग गांड फाटायची थांबली की परत तो अधांतरीचा बिंदू सोडून आपल्या नेहमीच्या धंद्यांना लागायचा.
किंवा कधी-कधी बघ्याला स्वतःचा तिटकारा यायचा. म्हणजे आपण वासना, आळस, इर्षा, मांद्य ह्यांनी बनलेला मांसल लिबलिबित गोळा आहोत असा. आणि त्याला कळायचं नाही कि स्वतःची त्वचा तरातरा ओढून मोकळं व्हायची जी तहान लागते, जी वेडीपिशी तगमग होते तिचं काय करायचं? मागे फिरायचे रस्ते बंद, आणि पुढे असली येडझवी अवस्था, त्याच्या मध्ये बघ्या परत स्वतःला शांत करायचे आध्यात्मिक उपाय करायचा. मग बघ्या शांत व्हायचाही. पण बघ्याला ही स्वतःच्या स्केप्टिकल, रॅशनल होऊ पहाण्याशी केलेली प्रतारणा वाटायची.
   आता बघ्या मुर्दाड आहे. तो स्वतः स्वतःची अवहेलना करत नाही की पाठ थोपटत नाही. तो सामाजिक जबाबदारीने पोक घेत नाही की उच्छृंखल मुक्तपणाने उनाडूनही जात नाही. तो फक्त बघतो, जसं आज त्याने दाभोलकरांचं मरणं बघितलंय.
--
   बघ्या विचार करू पाहतो की का झाली असावी ही हत्या, का वध, का खून? बघ्या शब्दच्छल सोडतो आणि फोकस्ड होतो. पण बघ्या पोलिटिकल अॅनालिस्ट नाही, बघ्या विकेंड पुरवणीत सिरीयस दिसणारे, सामाजिक, राष्ट्रीय धोक्याचा भोंगा वगैरे देणारे लेख लिहीत नाही. बघ्याला उत्सुकता आहे एवढंच.
१.       त्यांनीच मारलं. तेच जे त्यांच्या विरोधी होते. संपवला त्यांनी. खत्तम. वध आहे हा त्यांच्या दृष्टीने, जसा कृष्णाने जरासंधाचा, अर्जुनाने कर्णाचा, शिवाजी शहाजी भोसल्यांनी अफजलखानाचा, आणि __श्यांनी ... . तसा वध आहे हो. हा निद्रिस्त समाज/धर्म जागा झाला की की तो असे बळी गिळतोच असं म्हणतील ते. त्या वधकर्त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष समर्थन देतील, मदत देतील. आणि ज्यांनी ही सुपारी दिली ते सावकाश त्यांच्या साथीदारांसमोर हे आम्ही केलं ह्याचं क्रेडीट घेतील. गर्जना करतील, शंखनाद करतील. पण वरकरणी ते हळहळतील. अगदी अश्रूही ढाळतील.
२.       पण त्यांना मारून काय झालं? मारणारा हुतात्मा होईल का, का रोल मॉडेल? अगदी त्यांच्या कट्टर अनुयायात? म्हणजे मोहम्मद अट्टा, किंवा लादेन जसा काहींच्या लेखी असेल तसा तो होईल का? का मारणाऱ्याला धर्म पालनाचं समाधान मिळेल, सगळ्या भौतिक समाधानाच्या पलीकडचे समाधान, सूडाचे, क्रूर कर्तव्यपूर्तीचे समाधान? पण त्याचं हे समाधान बाकीच्यांना कसं समजेल? आणि समजलं तरी स्वीकारलं जाईल?
३.       दाभोलकरांच्या आणि त्यांच्या विरोधाच्या चळवळीचे काय फायदे तोटे? एक बडा मोहरा मारल्याने ती बाजू नामशेष होईल का उफाळेल? विरोधाची चळवळ सरकारी परिप्रेक्ष्यात येईल आणि कमकुवत होईल? का विरोधी चळवळीला वाढता जनाधार मिळेल? आणि ज्यासाठी होत आहे अट्टाहास, त्या जादूटोणा विरोधी बिलाचं, बाबा-फकीर-दुवावाल्यांचं काय होईल?
४.       का त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीच्या गणितातला एक मोहरा म्हणून मारला? म्हणजे मग एका बाजूला xxध, xxध असं म्हणता येईल. आणि मग विकासाचे नारे का सेक्युलर सरकार हे जुनेच कोडे घालून गंडवता येईल? आणि दुसऱ्या बाजूला पण इनडिरेक्ट कळतंच आहे की हे विकास, गव्हर्नन्स वगैरे नारे फार अल्ट्रा-मॉडर्न झाले. शेवटी परत धर्म, संस्कृती, इतिहास, प्रथा, परंपरा आणि ग्लोरीयस पुनर्निर्माण हवंच. एवढी कडक अफू तर कुठेच नाही, आणि चिलीम पेटवायला थोडे निखारे तर हवेच. मग जसा इथे हा मोहरा, आपसूक. बाकी यात्रा, मंदिर, दंगे आणि पोग्राम तर चालूच आहे वर्षानुवर्षे?
५.       एकूणच कुठल्याही राजकीय, सामाजिक हत्येचा उद्देश काय असतो? दहशत, विरोधाची बाजू चिरडणं? मग तो इथे साध्य होतोय? का असं थंड डोक्याचं गणित नाहीच आहे मागे? आहे ती भावनांची उकळ आणि लख्ख मानसिक क्लॅरिटी, की ह्याला मारायलाच हवा? दाभोलकरांच्या किंवा ते ज्या बाजूने होते त्या बाजूत इतकी प्रसिध्द, इतकी प्रभावशाली रिप्लेसमेंट आहे? का आता दुय्यम निर्नायकी? तसं असेल तर हा वर्मी घाव म्हणायचा. पक्का हिशोब.
बघ्या रिसर्चर नाही, बघ्याकडे कुठली फेलोशिप नाही, बघ्याकडे आतल्या गोटातले परिचय नाहीत. बघ्या एवढेच तार्किक तारे तोडू शकतो आणि मग सट्टा लावल्यागत कुठला लागतो ह्यातला म्हणून उत्सुक राहू शकतो.
--
बघ्या त्याच्या आईला सांगतो की दाभोलकरांना गोळी घातली. आई म्हणते कशाचे डॉक्टर होते ते? बघ्या शांतपणे पोळी खातो, भाजी खातो, हात धुतो आणि चलतो, काय हवंय का घरात विचारतो. आई म्हणते, बस प्रसाद खा. मग तो दारात उभा राहतो, उजव्या हातात प्रसाद घेतो तेव्हा आई म्हणतो अजून कोणीतरी गेले ना, तर तो म्हणतो ते कालनिर्णयवाले. आई म्हणते पण कोणीतरी भास्कर होते ना गेले ते. तो निघतो.
       आई उपवास करते बघ्या नीट लाईनीत यावा म्हणून. त्याने आजूबाजूच्या शे-सव्वाशे पोरांसारखी इस्त्रीची शर्ट-पँट घालावी, बूट घालावे, नियमाने दाढी करावी, लोकल पकडावी, महिन्याला ३०-४०-५०-६०-७० हजार पगार आणावा, आपल्या जातीत बायको करावी, बायकोने सारे सणवार करावे, बघ्याची सिगारेट सुटावी, बघ्या सुखी रहावा आणि बाकी जनरल...
       आई विद्युतपुरवठा खंडीत झाला की स्वामींना साकडं घालते, बाबांना यायला उशीर झाला की व्यंकटेश स्तोत्र म्हणते, आणि बाबांना कधी ऑर्डर्स नाही मिळाल्या मनासारख्या की महाराजांची पोथी वाचते. पण ती काम करायची थांबवत नाही. आणि होईल तेव्हा बाबांना, बघ्याला त्यांच्या क्रमशः अश्रद्ध किंवा आळशी कामचलाऊ श्रद्धेबाबत टोमणे मारणंही. ती वर्षातून एकदा सत्यनारायण करते. तिने बघ्यासाठी, तिच्या काहीही फुफाटा न करता अग्नी दिलेल्या सासूसाठी नारायण नागबळीही केलाय.
       बघ्या आईला आधी समजावू पहायचा, मग त्याला कळलं की आई ऐकतच नाहीये. ती फक्त बघ्याला बोलू देतीये. तिच्या भोवती तिच्या काल्पनिक कठीण परिस्थितीचे, तिला न मिळणाऱ्या भौतिक सुखांचे, तिच्या परिश्रमपूर्वक जगण्याचे, तिच्या स्वामी, बाबा आणि देवांचे जे कवच आहे त्यात प्रश्न घुसूच शकत नाही आणि त्या कवचात आई सुखरूप आहे.
       आता बघ्या आईला जे ती वांछील ते करू देतो, जोवर ते त्याच्या आड फारसे येत नाही. फार कधी प्रसंग आलाच तर मांडवली केल्यासारखा तो मिनिमम काही करतो आणि मोकळा होतो. जसे, एकदा बाबा गावी गेले आणि आईला जमणार नाही म्हणून तो शंकराला बेल वाहून आला. पण त्याने तिथे बसून बोर्डावर लिहिलेले स्तोत्र काही वाचले नाही.
       पण त्यावेळीही बघ्या एका सूक्ष्म नैतिक द्वंद्वात सापडलाच. १२-१२.३० च्या त्या दुपारी देऊळ निवांत होते. त्याच्या पाठी एक जुनाट तळे होते जे पाहून बघ्या थोडा काव्यमय हळवा झाला आणि देवळाच्या खिडकीपाशी उभे राहून त्या जीर्ण, मरू घातलेल्या तळ्याकडे पाहतानाही त्याला शांत, हलके वाटले. हे काय? म्हणजे आपल्या आत खोल असली प्रतिकहीन आस्तिकता असतेच का? का सगळे त्या कोण एका/एकीवर सोडून मुक्तपणे कृतीला न्याय द्यायची ट्रिक भावते आपल्याला? मग बघ्या बाहेर आला, त्याला आधी काही तरुणी आणि मग एक व्हील चेअर वरचे आजोबा दिसले तेव्हा आधीचे द्वंद्व जाऊन अधिक शारीर द्वंद्वात बघ्या सापडला. असो!
       पण बघ्याला सकाळचा प्रश्न, श्रद्धेचा, आठवलाच परत. आणि त्याला एक कोरोलरीही. की भले आपण आपल्यापुरता निवडा केला ह्या श्रद्धेचा, त्याचा प्रचार-प्रसार का करावा? बघ्याला जाणवलं की हा प्रश्न इतका क्षुल्लक नाही. तो मुळात एका अवाढव्य प्रश्नाचा भाग आहे. तो प्रश्न म्हणजे-
       माणसाने कसं जगावं, का जगावं ह्याची काही अंतिम उत्तरं आहेत का आपल्याकडे? आणि ही अंतिम उत्तरं, त्यांच्या वाटा ह्या वैयक्तिक आहेत का सामूहिक?
       बघ्याला वाटतं की त्याला मंदिरात जे शांत वाटलं, त्याला अधांतरीच्या बिंदूचं जे आकर्षण वाटतं, त्याला अद्वेष्ट सर्वभूताना म्हणताना जे वाटतं, त्याला निर्वाणषटक ऐकावसं वाटतं, त्याला काही दिवस सगळ्यांशी सगळं बोलणं सोडून आपल्यात गुंतावासा वाटतं ते ह्याच प्रश्नाशी जोडलेला आहे. पण ही खरी जाणीव का निष्क्रियतेची गुंगी हे बघ्या जाणत नाही. बघ्या तिथे हताश आहे.
       पण म्हणजे आपण किती विचार करून आपल्या कृती ठरवणार? आणि त्यात किती जणांना किती दुखवायचं? आणि असं करून जे काही हाती लागेल ते फक्त आपलं आपल्याशी राहणार असेल, त्याला सर्वांना पटणारा अर्थ नसेलच, तर मग एकूणातच हे उद्योग, हे प्रश्न का? आपण कोण कोणाचे नेमके कोण लागतो? आणि त्यांच्या श्रद्धा डोळस का आंधळ्या हे ठरवायला जाणं हे कितपत बरोबर?  
       म्हणून बघ्याने हत्येचा निषेध केलेला नाही. त्याला हिंसेचे कुतूहल आहे, कदाचित आजवर तो अशा कशात सापडला नाही म्हणून. पण त्याने अशी हत्या, आजवर तो जसा जगला तेवढ्याने तरी केली नसती असं तो सांगू शकतो. बघ्याला दाभोलकरांच्या समाजाच्या बैलाला चुचकारून अंगावर घ्यायच्या धाडसाचं कौतुक वाटतं, हेवा, इर्षाही. पण त्याचवेळी कायदा बनवायला जाणं हा त्याला स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या लेखी जो चुत्याप आहे तो करायच्या बेसिक फ्रीडमवर आघात वाटतो, जसं थेटरात येणारी धूम्रपान विरोधी फुफ्फुसात एवढा टार सांगणारी जाहिरात.
--
       बघ्या दिवसभर एवढा सगळं बौद्धिक तलम गांजा मारून रात्री एका नव-विवाहित मित्राकडे होऊ घातलेल्या मंगळागौरीस जातो. तिथे तो जेवतो. मग तो खेळ बघू लागतो. त्याचा दोस्त बॅटमॅनने करावी तशी एक फुगडीही घालतो. बघ्या तिथे जमलेल्या नव, जून आणि पोक्त विवाहीतांचे खेळ बघू लागतो. त्यातल्या गाण्यांचे बोल ऐकू लागतो. मोड्युलर किचन मध्ये जगणाऱ्या, लोकल ट्रेनने जाणाऱ्या, मराठी सिरियल्स पाहणाऱ्या संसारिक सुखी स्थूल स्त्रियांचे खेळ. मग भरल्या पोटी ढेकर द्यावे तसे प्रश्न: ही श्रद्धा का अंधश्रद्धा? का पूर्वी हा खेळ म्हणजे संसाराचे कष्टाळू गाडे ओढणाऱ्या बायकांची स्पेस होती? म्हणजे युटिलिटी? आपला धर्म, किंवा प्रथा-परंपरा म्हणजे निव्वळ सामूहिक स्तराच्या गंमतीचा संरक्षित पाशवी आनंद का माणसांना एकत्र जमून पेन्ट अप करण्याची सोय? आपल्या ह्या रुढी-परंपरा किती खोल घुसल्या आहेत, काळात आणि स्थळातही? आणि ह्यातल्या किती बायकांना ठाऊक आहे दाभोलकर गेले? कितींना त्या माहितीने बरं-वाईट असं वाटलंय? का ह्या भव्य,भयानक रगाड्यात अशी एक हत्या काही नाही. १२५ करोड माणसांना, किंवा १२ करोड माणसांना, किंवा ५ करोड शहरी महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना किती सोयर-सुतक असतं असल्या सार्वजनिक परिघात घडलेल्या गोष्टींचं? मला किती आहे? खरंच किती आहे?
       बघ्याला समोरचे खेळ तद्दन खोटे वाटू लागतात. ह्या बायका उद्या कशा कण्हत असतील, सांधे दुखत असतील असं त्याला वाटतं. त्या बायकांचे मोबाईलवर शूट करत असलेले नवरे त्याला मजेशीर वाटतात. त्याला कळप म्हणून जगण्याचे सुख दिसते. आणि मग त्याला मनापासून वाईट वाटतं की दाभोलकरांना गोळी घातली गेली. त्याला मनापासून स्वतःचा गांडूपणा जाणवतो. त्याला त्याची दाभोलकरांचे वाक्य कोट केलेली स्टेटस अपडेट आठवते, पण नेमकी अपडेट आठवत नाही.
       बघ्या मंगळागौरीतून निघतो. बघ्या रस्त्यावर येतो आणि फुफ्फुसांत टार भरू लागतो. तेव्हा बघ्याला वाटतं की या आजूबाजूच्या सगळ्याला फाट्यावर मारूनही त्याबद्दल झिडकारा, घृणा न ठेवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, मग तुम्ही कशासाठीही फाट्यावर मारलेलं असू दे आणि शेवटी तुम्हाला गोळी लागलेली असू दे.                  

      

Monday, September 20, 2010

Grapes of Wrath

Grapes of Wrath ही जॉन स्टीनबेकची masterpiece मानली जाणारी कलाकृती. अर्थात जॉन स्टीनबेकला असं One piece wonder समजणं चुकीचं आहे. असो. नेहेमीप्रमाणे हा पुस्तक परीक्षण किंवा समीक्षेचा प्रयत्न नाही. मध्ये नुकत्याच मराठीत आलेल्या एका चर्चित कादंबरीवरची मत-मतांतरे वाचत होतो. त्यावर विचार करतानाजाणवलं कि समीक्षा म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या संगड्याची, तिच्या मासांची मीमांसा नव्हे. वीट वीट सुट्टी केल्याने, किंवा प्रत्येक मनोर्याची अलग चिकित्सा केल्याने एखाद्या महालाचे सौंदर्य सापडणार नाही. एखाद्या गोष्टीच्या सौंदर्याची अनुभूती ही तिच्या मनात पडणाऱ्या प्रतीबिम्बावर, पर्यायाने मनाच्या नितळ-गढूळपणावरही अवलंबून असते. आणि जगात खात्रीने बोलायला सर्वात कठीण किंवा अशक्यच गोष्ट कुठली तर दुसर्या माणसाच्या, विशेषतः मनाचे अनेक स्तर असणर्या लेखाकसादृष्य माणसाच्या मनाचं अनुभूती काय असते हे समजणं. त्यामुळे काही वस्तुनिष्ठ मापदंड लावून सौंदर्य अजमावता येईल किंवा त्याची तुलना करता येईल हा निव्वळ कल्पनाविलास. एखाद्या कलाकृतीने भाषेला काय दिलं हे सांगू पाहणं म्हणजे सिंहगड बांधल्याने महाराष्ट्राचा काय फायदा झाला असं काही विचार करण्यासारखे आहे. असो. मला धुळवड खेळायची नाही. पण सौंदर्य हे त्याला पूरक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं कितीही सुंदर असलं तरी ते विवाहात वाजवत नाहीत. सांगायचं उद्देश हा कि जे लिहितोय ते सौंदर्याची चिकित्सा नाही, तर त्यातली मजा घ्यायला मदत करणारी पार्श्वभूमी मांडायचा प्रयत्न आहे.
Grapes of Wrath ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत शेतकरी कुटुंबांची जी massive स्थलांतरे झाली त्याची लाक्षणिक आणि तरीही खूप मोठा आवाका असलेली गोष्ट. लेखकाने कादंबरीची रचना एका गुम्फणीने केली आहे. जणू अमेरिकेच्या वेगवेगळ्या टोकांपासून कालीफोर्नियाकडे जाणार्या कुटुंबांच्या तांड्यावर आकाशातून कोणी बघतो आहे. मग त्यांचे तांडे, रात्रीच्या त्यांच्या वस्त्या, त्यांचा दाटीवाटीने राहणं, त्यात उमटणारे त्यांचे हेवे-दावे, हळूहळू एका मोठ्या दुखाशी जुळत जाणारी त्यांची छोटी-छोटी सुख-दुखे, त्यांचा क्षोभ, त्यांचा तुटत जाणे आणि एका क्षणी त्यांच्यातल्या काही जणांनी या अनावर अगतिकतेला त्यांच्या त्यांच्या परीने तोंड फोडणं. एका आड एक प्रकरणात लेखक हा macro view मांडतो. त्याच्या मधल्या प्रकरणात उमटत रहाते जोड कुटुंबियांची गोष्ट. ही गोष्ट प्रातिनिधिक आहे, पण त्याचवेळी पडझडीच्या कोसळक्षणी सुद्धा जिवंत राहणाऱ्या मानवी आशेची, एकमेकांना सांभाळत जगू पाहणाऱ्या साध्य पण पक्क्या माणसांची exceptional कहाणीही आहे. काही ओळीत सांगता यावं इतक्या सोपी आवाक्याची गोष्टच नाहीये ही. जी.ए. कुलकर्णी म्हणतात, तसे ह्यात लावलेले स्टेक्स इतके भव्य आहेत कि ते पाहूनच छाती दडपून जावी. मग ह्या स्टेक्स मधून काय निघतंय हे पाहणं अजून वेगळी गोष्ट. स्टीनबेकने कहाणीचे कोपरे खुबीने उभे केले आहेत. मोठी-मोठी वाक्ये, शब्दांची आतिषबाजी ही त्याची शैली नाही. सुरुवातीच्या प्रकरणात, एक संपूर्ण प्रकरण रस्त्यावरून चालणाऱ्या कासवाच्या वर्णनात आहे. त्याची एक एक हालचाल त्याने शब्दबद्ध केली आहे. आणि नंतर हीच अचूकता त्याने माणसांच्या हालचाली, भावना पकडताना ठेवली आहे.
माणसाचे 'मी' आणि 'आम्ही' आहे दोन स्तर असतात. ते नेमके कुठे आणि किती घट्ट एकमेकांशी जोडलेले असतात हे सांगणं कठीण आहे. Aristotle ने म्हटल्याप्रमाणे It is difficult to be a man and a citizen at the same time. शेवटी कुठलीही भव्य कलाकृती ही अशा अनेक 'मी' आणि 'आम्ही' ह्यांच्यातला संघर्ष असते. माणसाचे अंतिम साफल्य पूर्णपणे 'मी' होण्यात आहे का अंतिमतः तो 'मी' एका 'आम्ही' चा अंश आहे याची जाणीव होण्यात आहे, ह्याचा धांडोळा कुठलाही खरा लेखक घेऊ पाहतो. समाजाचा विचार करणारी अनेक माणसे 'आम्ही' च्या कृत्रिम रचना उभ्या करू पाहतात. आणि अंतिमतः त्या रचना स्वार्थाच्या म्हणजे 'मी' च्या गोंधळाने कोसळतात. Cannery Rows, In Dubious Battle यामध्येही स्टीनबेकने याच 'मी' आणि 'आम्ही' चा शोध घेतला आहे. आणि या शोधात शेवटी एक सत्य नाही, तर एक परस्परविरोधी, वेदनादायी पण सुंदर अशी जाणीव गवसणार आहे याची त्याला जाणीव आहे. हा 'मी' आणि 'आम्ही' चा खेळ दाखवायला इथे लेखकाने Tom Jode आणि त्याची आई, कथेत 'मा' ही दोन पात्रे वापरली आहेत. Tom चार वर्षे तुरुंगवास भोगून घरी येतो तेव्हा बाकी कुटुंबीय सामान-सुमान बांधून कालीफोर्नियाला जाण्याची तयारी करत असतात. Tom त्यांच्या बरोबर जायला निघतो. इथवर त्याच्यात 'आम्ही' कुठेच नाहीये. पण रस्त्यात त्याला त्यांच्यासारखी हजारो कुटुंबे पोटापाण्यासाठी आणि सुखी आयुष्याच्या स्वप्नासाठी हजारो मैलांचा प्रवास करताना, कोलामाडताना, पिचताना, आणि तरीही चिवटपणे जगताना दिसतात. तिथे त्याच्या आतला 'मी' हळूहळू विचार करू लागतो. गोष्टीच्या शेवटी अशा कुटुंबाना संघटीत करून लढा द्यावा अशा वेडाने तो कुटुंब सोडून जातो. 'मा' मधला 'मी' सुरुवातीला कुठेच उमटत नाही, एक अलवार क्षण सोडून, जेव्हा ती घर सोडण्याआधी माहेरून आणलेली एक पेटी बघते. पण मग ती ती पेटी तिथेच सोडते आणि परत 'मा' बनते. रस्त्यात तीच सार्या कुटुंबाला एक धरून ठेवते, खरंतर ह्याच प्रवासात हे कुटुंब हळू-हळू विखरत जातं. आधी तिचे सासरे, मग सासू मरतात. एक वेडसर मुलगा मी नदिकीनार्यालाच राहणार असं ठरवून निघून जातो. जावई गर्भार बायकोला सोडून पळून जातो. नवरा खचतो. दीर वेडसर होतो. Al, Tom चा धाकटा भाऊ होऊ घातलेल्या बायकोच्या कुटुंबाबरोबर रहायचे ठरवतो, आणि शेवटी Tom ही निघून जातो. उरते ती मृत मुलाला जन्म दिलेली मुलगी, खचलेला नवरा, वेडसर दीर, संपलेले पैसे, संपलेलं अन्न, आणि पुराच्या तडाख्यात वाहून गेलेला रोजगार. आणि तरीही 'मा' 'मा'च राहते. कादंबरीचा शेवट विलक्षण आहे, इतक्या टोकाच्या क्षणीही माणसातली माणूसपणाची जाणीव टिकू शकते, आणि 'मा' सारखी खरंतर एक सामान्य गृहिणी अशा जाणीवेने कृती करू शकते हे सगळंच मनावर उमटून जातं...
कथेच्या ह्या प्रवासाएवढेच मध्ये मध्ये स्टीनबेक जे milestone देतो तेही लक्षात राहून जातात. ह्या गोष्टीत जेव्हा जेव्हा आनंद उमटतो, तेव्हा हा क्षणभंगुर आहे ही जाणीवही उमटते. ती हजारो पिचली माणसे सुखाचे काही क्षण जगू पाहतात. वाड-वडील जिथे वर्षानुवर्षे जगले तिथून आपण निखळलो, दोन वेळचा पोटभर जेवण मिळत नाही, मुलांना हवं ते खेळणे घेऊन देता येत नाही, बायकोला मिठी मारण्याइतकीही मोकळी जागा स्वतःची नाही, गळणारं पाणी थांबवता येत नाही आणि कोरड्या जागेचं घर नाही अशी सगळी माणसे. पण आपण राबू, काहीतरी शिकू, मुले शाळेत जातील, मग केव्हा ना केव्हा परत एक छोटं घर उभं करू, एकत्र राहू, we are fambly ही त्याची स्वप्ने मरत नाहीत. मिळेल तिथे ते गातात, नाचतात, खचानार्याना सावरतात, आणि एका क्षणी स्वतः कोलमडतात. तरी परत उठतात, ४० सेंट तर ४० सेंट, नाहीतर ३० नाहीतर २० अशा कुठल्याही मजुरीवर काम करतात, बटाटे उकडून खातात, पीठ तळून खातात, आणि दरवेळी डोळ्यात चिमुकली आशा ठेवून राहतात कि एक दिवस हे आयुष्य असं असेल कि त्याची घृणा येणार नाही, तेसाजरं असेल, जगावंसं वाटेल...
माझा आवडता एक परिच्छेद देऊन मी थांबतो...
and always, if he could have little money, a man could get drunk. The hard edges gone and the warmth. then there was no loneliness, for a man could people his brain with friends, and he could find his enemies and destroy them. sitting in a ditch, the earth grow soft under him. Failure dulled and there was no threat. And hunger did not skulk about, but the world was soft and easy, and a man could reach a place he started for. The star came down wonderfully close and the sky was soft. Death was a friend, and sleep was death's brother. The old times came back, a girl with pretty feet, who danced one time at home- a horse- a long time ago. A horse and a saddle. And the leather was carved. When was that? Ought to find a girl to talk to. that's nice. Might lay her with too. But warm here. And stars down so close, a sadness and pleasure so closed together, really the same thing. Like to stay drunk all the time. Who says its bad? Who dares says its bad? Preachers- but they got their own kinda drunkenness. Thin, barren woman, they are too miserable to know. Reformers- but they don't hit deep into the living to know. no-the stars are close and dear and I have joined the brotherhood of the worlds. And everything is holy-everything, even me.

Friday, July 30, 2010

कथेतला लेखक

लेखकात कथा कुठे उगम पावते? कथा त्याच्या कल्पनेत असते का त्याच्या अनुभवाची घुसळण होऊन ती जन्माला येते? कथेच्या मुळाशी निर्मिनार्याचे अनुभव अपरिहार्यपणे असतात का? का निव्वळ कल्पनेच्या सदिश मुक्ततेत कथा उमटत जाते? लेखकाची मनोवस्था आणि आयुष्य दुसर्या कोणाला पूर्णपणे उलगडणे शक्य नाही, आणि म्हणून ह्या प्रश्नांच्या बाबतीत काही ढोबळ अनुमानेच करतं येतील. पण कथेत लेखक कुठे असतो असं विचार केला तर काही सापडू शकेल असं मला वाटतं. मला भावलेल्या काही कथांच्या ( इथे कथा म्हणजे पानांची मर्यादा अशी व्याख्या न ठेवता कथानक अशा ढगळ अर्थाने कथा हा शब्द वापरला आहे) आधारे मी कथेत सापडणारा लेखक मांडणार आहे. अर्थात हा मी घेतलेला, किंवा आपसूक घडलेला शोध आहे आणि ह्यात कोणत्याही साहित्यिक सत्याचा दावा नाही.
ज्या कथांत असं लेखक मला दिसलेला आहे त्या माणसाच्या वागण्यातले विरोधाभास, काही मुल्यांवर विश्वास असणाऱ्या माणसांतला वैचरिक संघर्ष आणि स्वतःच्या विचाराने जागू पाहणाऱ्या माणसात, मध्यवर्ती पत्रांत येणारी घुसळण आणि द्वंद्व मांडणार्या कथा आहेत. John Steinbeck ची In Dubious Battle वाचताना मुळात लेखकाचे असे प्रतिबिंब कथेत असू शकते अशी कल्पना माझ्या मनात डोकावली. In Dubious Battle हि John Steinbeck ची तशी मध्यम दर्जाची कृती म्हणता येईल. California मधल्या सफरचंद बागांत सफरचंद झाडांवरून उतरवण्याचे काम करणाऱ्या मजुरांचा संप संघटीत करणाऱ्या, मालकांच्या संघटीत आणि पूर्वनियोजित विरोधापुढे हरणाऱ्या अमेरिकन कम्युनिस्टांची हि कथा. Mack आणि John Nolan हि दोन मध्यवर्ती पात्रे आहेत. Mack अनुभवी संघटक आहे. पार्टीत नवा असलेल्या नोलानाला तयार करण्याच्या हेतूने Mack त्याला सोबत घेऊन शेतांत जातो. तो अनुभवी असला तरी त्याची मते काम्युनिझामावाराच्या श्रद्धेतून बनलेली आहेत. नोलान पार्टीत नवीन असला तरी तो मजुराचा मुलगा आहे. त्याचे वाचन आणि स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण करण्याची क्षमता दांडगी आहे. ह्या दोघांच्या कल्पनेपेक्षा वेगळी परिस्थिती त्यांना अनुभवायला मिळते. सुरुवातीला ते मजुरांच्या असंतोषाचा सहज वापर करत संप सुरु करतात. पण नंतर ह्या मजुरांना साम्पातल्या नव्या नव्या कामांसाठी उमेद देत राहणे आणि त्यांची रहायची व खाण्या-पिण्याची व्यवस्था, त्यांचे ढासळते मनोधैर्य आणि स्थानिक प्रशासन हाताशी धरून पद्धतशीर दबाव वाढवणारे बागमालक ह्या सगळ्या आघाड्यांवर लढताना त्यांच्या विचारांचा, जमत जाणार्या मैत्रीचा आणि इतरांबरोबर असणाऱ्या संबंधांचा कस लागतो आहे. त्या दोघांबरोबर संपामध्ये बर्टन नावाचा डॉक्टर आहे. तो फारसा बोलत नाही. संपूर्ण कादंबरीत दोनदाच तो त्याचे विचार काहीश्या स्पष्टपणे मांडतो आणि सम्पातल्या कोसळत्या टप्यात अचानक पकडला जाऊन नाहीसा होतो. तो पार्टी वर्कर नाही. पण तरीही डॉक्टर त्या संपाच्या जिवंत राहण्यातला एक महत्वाचा घटक आहे. आता या सगळ्यात लेखक कुठे येतो? वरकरणी नोलानामध्ये किंवा Mackमध्ये लेखक आहे असं वाटतं. पण बर्टन एका ठिकाणी संप, लढा याबाबत बोलताना शरीरातले आजार आणि त्यांच्याशी लढणाऱ्या पेशी अशी तुलना करतो. डॉक्टर मानवी वागण्याच्या निर्विकार निरीक्षक आहे. चांगलं किंवा वाईट अशी विभागणी करणं हे त्याला माणसांच्या वागण्याला मर्यादित करण्यासारखा वाटतं. तो Mackच्या विचारातली विसंगती दाखवू शकतो आणि त्याचवेळी संघर्षाची अपरिहार्यताही ओळखतो. डॉक्टर मला लेखकाचं प्रतिबिंब वाटतो. Steinbeckचा खरोखर एक डॉक्टर मित्र होता आणि त्याच्या बरोबर होणार्या अनेक भेटी आणि प्रवास ह्यात त्याला अनेक कथा सापडल्या. Cannery Rowsमध्ये असाच एक डॉक्टर आहे. तो सगळ्यांपासून सारख्याच अंतरावर आहे. तो स्वतःच्या biological specimen गोळा करण्याच्या कामात दंग आहे. पण त्याचवेळी चवीने जगायला तो विसरत नाही. सगळ्या गावाचं तो लाडका डॉक्टर आहे, खरतर तो संशोधनातून डॉक्टर झालं आहे, वैद्यकीय शिक्षणातून नाही. पण लोकांनी त्याला आजारपण बरं करणारा इलाज केला आहे. डॉक्टरनेही हि जबाबदारी आणि प्रेम स्वीकारले आहे, प्रसंगी त्यात त्याला नुकसान होत असूनही. थोड्याफार सारख्या प्रकाराने चित्रित केलेले हे 'डॉक्टर' फारसा बोलत नाहीत. त्यांच्या मनात इतरांबद्दल असणारी कळकळ त्यांच्या वागण्यातून दिसते, पण त्यांच्या मनाचे पीळ फारसे उलगडत नाहीत.
हे दोघे मला त्या त्या कथांमधले लेखक वाटतात. Steinbeckला कम्युनिस्ट विचारसरणीचा असणारं आकर्षण In Dubious Battle मध्ये जरी लपत नसलं तरी त्याचवेळी सामान्य कष्टकरी माणसे ह्या वावटळीत टिकू शकणार नाहीत, त्यांची लहान आयुष्ये तत्वनिष्ठतेचे ओझे पेलू शकत नाहीत हेही तो जाणून होता. त्याच्या कथा ह्या नुसतंच हे ताण आणि विरोधाभास टिपणं नाही. त्याला स्वतःचा एक सूर आहे. आणि तो लेखकाने डॉक्टर च्या पात्रांतून व्यक्त केला आहे. हा सूर एकांगी असणं शक्य नाही. तसा असतं तर त्या कथाही एका निश्चित शेवटाकडे झुकल्या असत्या. कोणीतरी हरलं असतं, कोणीतरी जिंकला असतं. त्या तशा न जातं एका अबोल करणाऱ्या शांत शेवटला जातात, कारण त्यापाठी लेखकाची एक भूमिका आहे. आणि Steinbeckने मोठ्या खुबीने ती काही ठिकाणी उतरवली आहे.
अशा लेखकाच्या प्रतीबिम्बाचे मला आवडणारे उदाहरण म्हणजे 'रारंग ढांग' मधला मिनू खंबाटा. अर्थात 'रारंग ढांग' ला इतके पदर आहेत कि त्यात अनेकात तो लेखक सापडेल. रूढार्थाने विश्वनाथ 'रारंग ढांग' चा नायक किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. तिला टोक आहे, धार आहे, स्वतःच्या विवेकाने स्वीकारलेल्या मार्गावर चालताना येणारे ओरखडे सहन करायची हिम्मत आहे. पण हि लेखकाची निर्मिती आहे, तो स्वतः नाही. कारण विश्वनाथाच्या सहज स्पर्शणार्या आणि ठाम वाटणार्या आयुष्याला प्रत्यक्षात जगणं काय असेल हे कर्नल राईट किंवा शेवटच्या कोर्ट मार्शलच्या प्रसंगात लेखकाने दाखवलं आहे. 'तुला जे स्वातंत्र्य हवं आहे ते तुला बाहेरच्या जगात तरी मिळेल का? ' हा विश्वनाथला विचारलेला प्रश्न नाही, तर लेखकाला जाणवलेली मर्यादा आहे. मिनू खंबाटा आनंदात जगण्यापलीकडे कोणताच तत्वज्ञान सांगत नाही. आपल्या सभोवतालच्या माणसांच्या अडनिड्या किंवा तर्हेवाईक स्वभावांशी तो फिट होऊन गेला आहे. पण तरीही त्याचे डोळे उघडेपणाने माणसांकडे, त्यांच्या चांगल्या-वाईट वागण्याकडे, प्रसंगी कातडी बघतायेत. त्याचं स्वभाव खरतर शिस्तीच्या रुक्ष धबडग्यात कोमेजायाचा. पण त्या शिस्तीच्या दडपणातही पुटू करण्याची मोकळीक तो बनवू शकतो. काचत जाणार्या शिस्तीत स्वंतंत्र माणसावर येणारा ताण त्याला म्हणूनच कदाचित समाजात असावं, नव्हे समाजालाच, म्हणून तर तो 'friend of accused' म्हणून स्वतःहून नाव देतो. त्याचं आनंदी एकांडेपण आणि त्याचवेळी तो आनंद वाटायची आणि दुसर्याच्या अडचणीत निशब्द साथ द्यायची वृत्ती हि कथेतल्या कुठल्याही तात्विक भागापेक्षा मला अधिक खरी वाटते. मेजर बंब, कर्नल राईट आणि विश्वनाथ यांसारखी प्रसंगी विरोधी तर पूरक व्यक्तिरेखा उभं करणारा लेखक या सगळ्यात मिनू खंबाटा बनूनच सामावून जाऊ शकेल ना!
हरमान हेस्सेच्या 'सिद्धार्थ' मध्ये वसुदेव नावाचा नावाडी आहे. त्याचं नावाडी असणं हीच मुळात खुबीने केलेली निवड आहे. ज्या नदीवर तो नावाडी आहे, ती नदी म्हणजे संसाराचे पाश तोडून एकांत साधनेत स्वतःला शोधू पाहणारे साधक आणि उपभोगांच्या नव्या नव्या सुखसंवेदनात स्वतःच्या शोधाची बोचरी जाणीव हरवलेलं जग ह्याच्या मधला प्रवाह आहे. वसुदेव नदीच्या एका तीरापासून दुसर्या तीरावर जाण हे काम करतो आहे, व्यक्तिगत सुख-दुख, कंटाळा, बदलाची गरज अशा कशानेही त्याच्या ह्या व्रतस्थतेत खंड पडलेला नाही. आणि त्याचा एकमेव अविरत संवाद, खरतर स्वतःशीच, चालतो तो त्याच्यासारख्याच अविरत वाहणाऱ्या नदीशी. 'नदी कधीच सारखी नसते. जरी एकच प्रवाह आपण नेहमी पहात असलो तरी तो प्रवाह वाहता असतो.' हि जाणीव त्याने त्याच्या नदीबरोबर चालणाऱ्या संवादांतून मिळवलेली. वेदविद्या पारंगत तेजस्वी ब्राह्मण युवक, शरीराच्या सगळ्या इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न करणारा साधक, 'Will you give me kiss for my poem' असं म्हणून भोगांच्या लालस जगात स्वतःला शोधू पहाणारा, 'That is why I am going my own way not seek another or better doctrine, for I know there is none, but to leave all doctrines and all teachers and to reach my goal alone- or die' असं Illustrious One ला सांगून बाहेर पडणारा अशा विविध रुपात चितारलेला सिद्धार्थ अखेर येवून स्थिरावतो तो वसुदेवापाशी. वसुदेव त्याला काहीच शिकवत नाही, फक्त सांगतो जे त्याने नदीच्या या तीरापासून त्या तीराला जाताना आणि परत येताना केलेल्या संवादातून त्याला गवसलंय. कथा सिद्धार्थची आहे, कथेत सिद्धार्थाने घेतलेला, वरकरणी निष्फळ वाटणारा शोध आहे, त्याने स्वतःला विचारलेले भौतिक जगात निरुपयोगी पण टोकदार प्रश्न आहेत, उत्तरांचा आभास आणि नंतर त्या आभासानच स्वतःपुरती शाश्वतता म्हणून शरण जाणे आहे. ग्रेसने 'मितवा' मधल्या लेखात हे 'सिद्धार्थपण' छान मांडलं आहे. पण हेस्सेला जे सांगायचं ते सिद्धार्थ कुठेच सांगत नाही. किंवा हेस्सेला मुळात काही सांगायचाच नाहीये. त्याला दाखवायचाय तो निरंतर प्रवास, वरकरणी एका वर्तुळाच्या परीघावर असल्यासारखा पण खरतर खोली वाढत जाणार्या विवारासारखा. आणि वसुदेवासारखा नावाडी त्याने ठेवलाय, आभासी जाणिवांच्या सतत बदलत्या नदीवरचा स्थिर साथीदार.
वर उल्लेखलेल्या ३ कथांपैकी, खरा तर कोणतीच नाही, पण 'रारंग ढांग' आणि 'सिद्धार्थ' ह्या नायकप्रधान कथा आहेत. अर्थात हे दोन्ही कथाकार इतक्या ताकदीचे आणि समजाचे आहेत कि वास्तवात अशी एका बाजूने नेहेमी योग्य असणारी स्थिती शक्य नाही हे त्यांना जाणवणार नाही. 'सिद्धार्थ' लिहिण्यागोदर हेस्से भारतात आलेला ते पौर्वात्य तत्वज्ञानातील अनुभूतीची ओढ घेऊन. ती त्याला मिळाली नाही, पण वैदिक तत्वज्ञान, त्यातले न पटणारे सिद्धांत नाकारून उभा राहू पहाणारा बौद्ध धर्म, त्यातही हेस्सेला जाणवलेली पोकळी, कदाचित पाश्चिमात्य विचारसरणीच्या पायाने नाकारता न आलेल्या ऐहिक प्रेरणा पण त्यात न गवसणारे अंतिम साध्य, आणि हेस्सेच्या वैवाहिक जीवनात त्यावेळी असलेली अशांतता ह्या सार्या सरपणावर 'सिद्धार्थ' उभी आहे. त्यात नायक हा सादरीकरणाची गरज, सोय म्हणून आहे. आणि हेस्से, जो तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता, तो सिद्धार्थ केवळ जे घडत आहे ते पाहून मांडण्याचे माध्यम म्हणून उभा करत नाही. खरेतर कोणीतीही साधी गोष्ट, अगदी आद्य चिऊ-काऊची गोष्ट, हि पण काहीतरी सांगण्यासाठीच बनते. त्यामुळे 'सिद्धार्थ' चा प्रवास खरतर कुठेच न जाणारा ठरला तरी त्यात हेस्सेला काही सांगायचाच नाहीये, किंवा नुसती व्यर्थता दाखवायची आहे असं वाटत नाही. व्यर्थता दाखवायला एवढं तात्विक उहापोह का? माणसे एवढ्या-तेवढ्यावरून सुस्कारे टाकताच असतात. पण हे सांगणं थेट नाहीये, किंबहुना चांगला लेखक कधीच एखाद्या निर्विवाद सत्याचा सेल्समन नसतो. तो मुळात एक जागा पकडतो, तिथून चालायला लागतो, चालताना दिसणारं जग, भेटणारी माणसे, वाटांचे गुंते, थकवा, कंटाळा, आनंद, भ्रम, चीड, वैफल्य मांडतो आणि त्यात कुठेतरी स्वतःला जे सांगायचं ते खुबीने ठेवून देतो. 'जे बरोबर आहे ते दर्शवता येत नाही. चूक गोष्टीच दाखवता येतात.' ह्या तत्वाज्ञानातल्या falsification सिद्धान्तासारखं कथांमधले वरकरणी वाटणारे नायक-नायिका हे शोध मांडतात, त्या शोधाचा शेवट नाही. ते बरोबर नसतात, ते काहीतरी बरोबर शोधण्याच्या अविरत प्रवासातली अजून एक पायवाट दाखवतात. त्या पायवाटेचा अर्थ त्या वाटेवर न चालता ती वाट पाहणाऱ्या दुसर्या कोणाला गवसलेला असतो. मग तो Steinbeck चा डॉक्टर असतो, मिनू खंबाटा असतो किंवा नदीशी बोलणारा वसुदेव असतो.

Wednesday, June 23, 2010

११३ वर्षे आणि भुसभुशीत जाणीव

प्रत्येक काळात जगण्याकडे बघायची, स्वतःच्या आणि आपण ज्या समूहात स्वतःला identify करतो त्या समूहाच्या म्हणून असणाऱ्या जगण्याची एक धाटणी असते. प्रत्येक माणूस जरी असं विचार करून जगत नसलं तरी त्याच्या निर्णयांमध्ये त्याने हे implicit norms पकडलेले असतात. मला काय हवं आणि काय नको हे प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धीने ठरवत नसतो, किंवा प्रत्येक गोष्टीत ठरवत नसतो. अशा वेळी त्या त्या काळात असणारे चांगल्या-वाईटचे निकष लावून निर्णय घेतला जातो. अर्थात हे निकष मान्य नसणारे कोणी ना कोणी समाजात असते. मग केवळ बंडखोरी म्हणून काही संकेत धुडकावून लावले जातात. काही वेळा 'मी हे का करतो आहे' ह्या मूलभूत प्रश्नाला साद घालून प्रस्थापित आणि दृढ वाटणार्या संकेत किंवा नियमांविरुद्ध काही जण वागतात. जेव्हा समाजातले काही स्वतःच्या कृतीतून, स्वतःला आलेल्या अनुभवातून नियम धुडकावण्याची किंवा समाजमान्य नसलेले आचरण करण्याची कृती करतात तेव्हा ताबडतोब समाज त्यांच्या पाठी उभं रहात नाही. पण समाज हा कधीही पूर्णपणे स्थिर अशा अवस्थेत नसतो. प्रत्येक माणूस हा त्याच्याभोवतीच्या बदलांचा धांडोळा घेतच असतो. त्या बदलांना दिले जाणारे प्रतिसाद माणसागणिक बदलत राहतात. अगदी ताबडतोब पचनी न पडणारे बदलही कालांतराने रुजतात कारण सर्वसामान्य माणूस किंवा त्या बंडखोरीला सहानभूती असणारे प्रस्थापित छोटे छोटे बदल घडवतात. समाजात होणारा बदल हि बहुतेकवेळा एक सलग चालणारी प्रक्रिया असते. त्यात सुरुवातीचे, समाजाचा रोषही पत्करू शकणारे जितके महत्वाचे असतात तितकेच हा रोष अंगावर न घेता शक्य तितके स्वतःला बदलत जाणारे आणि ह्या पहिल्या दोन टप्प्यांना पाहून जुन्या व्यवस्थेला शेवटचा धक्का देणारे अशा सगळ्यांनी बदल पूर्ण होतो किंवा नव्या बदलाकडे जातो. मागचा १५० वर्षात महाराष्ट्रातच घडलेल्या कुठल्याही सामाजिक बदलात हि प्रक्रिया दिसेल किंवा अजूनही घडत असेल. स्त्री-शिक्षण, अस्पृशता निर्मूलन, पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली, आंतरजातीय किवा विधवा पुनर-विवाह अशा अनेक ठळक सामाजिक बदलात या प्रक्रिया दिसतील.
'न्याय' हि एक भुसभुशीत संकल्पना आहे. तिची काल-किंवा स्थल निरपेक्ष व्याख्या करणे कठीण आहे. तसेच एखादी कृती हि अनेक बाह्य संदर्भांवरून आणि करणाऱ्याच्या हेतूनुसारही न्याय्य किंवा अन्याय्य ठरते. पण हि भुसभुशीत संकल्पना समाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक सूक्ष्म नियम बनवून 'न्याय' आणि त्या अनुषंगाने माणसाचे deviant वर्तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न कोण करतं? तर त्या त्या वेळी राज्य करणारी शासन व्यवस्था किंवा समूह. जर शासन व्यवस्था हि अंतिमतः लोकाभिमुख (answerable to people) असेल तर 'न्याय' हा भुसभुशीत असला तरी त्याला सामाजिक नेतृत्वाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आधार मिळतो. जर शासन हे एखाद्या गटाच्या हितासाम्बंधाशी निगडीत असेल तर 'न्याय' नावाची भुसभुशीत जाणीव आणि सरकारी प्रक्रियेची ताकद यांची मिळून एक दलदल निर्माण होते. मग काहीजणांना स्वतःला त्यात रूतावतच, प्रसंगी विसर्जित करत, चालता येईल अशी जमीन बनवावी लागते. तत्वाद्यानाचा एवढा मोठा डोस द्यायचे कारण म्हणजे आज चाफेकर बंधूंनी केलेल्या Rand हत्येला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत.
चाफेकारांचे हे कृत्य हा त्या वेळच्या समजत असणाऱ्या असंतोषाची परिणीती होती. जरी ह्या हत्येमागचे तात्कालिक कारण हे चाफेकरांचा वैयक्तिक क्षोभ हे असले तरी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर शासन काही लादण्याचा प्रयत्न करत आहे, हि बाबही त्यांच्या क्षोभाला कारणीभूत होती. त्यांच्याकडे ब्रिटीशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून कोर्ट-कचेरी करण्याचा मार्ग होता. किंवा अन्य मार्गांनी स्वतःचा निषेध नोंदावायचाही विचार त्यांना करता आला असता. चाफेकरांनी हिंसा शेवटचा पर्याय म्हणून निवडली किंवा अन्य पर्यायांचा विचार न करता निवडली हे आज सांगता येणार नाही. पण मला ११३ वर्षानंतर ह्या घटनेच्या तपशिलाची चिकित्सा करायची नाही किंवा भूतकाळातून एक नवा नेता आणि पर्यायाने अनुयायांची आंधळी गर्दीही उभारायची नाही. मला महत्वाची वाटते ती चाफेकरांनी त्यांच्या भोवतालच्या घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया. मला, मी ज्यांच्या सोबत जगतो आहे त्यांना, त्यांना मान्य असलेल्या पद्धतीप्रमाणे जागू न देता, त्यांच्या बळजबरीने बदल लादला जात असेल किंवा त्यांना बदल हवा असता करू दिला जात नसेल, त्यांच्या जगण्याच्या मूलभूत सुरक्षिततेलाच जर धोका निर्माण होत असेल आणि शासन ह्या सार्यात सहभागी असेल, निष्क्रिय किंवा जाणीवपूर्वक शिथिल असेल तर मला हि विस्कटलेली प्रक्रिया परत सुरळीत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी हे केलं. असं करणारे ते काही पहीले नव्हते. आणि त्यामुळे हा त्यांच्या कृतीचे ढोल वाजवण्याचा प्रयत्न नाही. पण आज आपण काही विसरतो आहोत त्याची ह्या दिवसाचे निमित्त करून आठवण करून द्यायचा प्रयत्न आहे.
भोपाल वायूगळतीच्या खटल्याचा निकाल आणि त्यानंतरची धूळवड आपण वाचतो, पाहतो आणि विसरतो आहोत. २६ वर्षाच्या दिरंगाईनंतरही परत एकदा न्यायालायांचाच दरवाजा ठोठावला जात आहे. मला कोणत्याही मार्गाने हा न्यायसंस्थेवरचा विश्वास वगेरे वाटत नाही. हि शुद्ध हतबलता आहे. जेव्हा तथाकथित 'न्याय' ज्यांच्याकडून मिळतो तेच अन्यायाच्या उभारणीचे वाटेकरी असतात, तेव्हा स्वतःच्या सारासार विचाराने न्याय-अन्याय्य ठरवायचे असते. वायू गळतीत जे मेले ते परत येणार नाही आहेत. कंपनीच्या अधिकार्यांना शिक्षा व्हावी हि मागणी जरी रास्त असली तरी त्यात मृतांच्या नातलगांची सूडभावना किती आणि हि शिक्षा उदाहरण बनून असे निष्काळजीपणाचे प्रसंग टाळावेत असं विचार किती? जर सूड हवाच असेल तर तो काय न्यायालय घेऊन देणार नाही. तो ज्याला हवा आहे त्याने परिणामांची पर्वा न करता स्वतःच घ्यायला हवं. उधमसिंगने जालियानवाला बाग हत्याकांडाचा सूड घेताना रस्ता दाखवलाच आहे. आणि ११३ वर्षापूर्वी चाफेकरानीही. अशी हत्या, वैयक्तिक क्षोभातून केलेली राजकीय किंवा व्यापक सामाजिक सूडहत्या हि कितीही क्रूर वाटली तरी बेलगाम आणि स्वार्थी शासनावरचा शेवटच अंकुश तोच आहे. मुळात अशी हत्या हि अजूनही समाजातल्या दररोज शांतपणे जगणाऱ्या माणसाचे मन त्याच्या भवतालासाठी संवेदनशील आहे आणि वेळप्रसंग पडल्यास, हिंसेचा धाक म्हणून वापर करण्यास सिद्ध आहे ह्याची निदर्शक आहे. 'खटासी असावे खट, उद्धटसी उद्धट' ह्या व्यावहारिक सत्याचाच तो क्रूर अविष्कार आहे.
मी अशा रीतीने हिंसेचे समर्थन करतो आहे ते मी हि हिंसा अनावर होऊ शकते हे विसरून गेलो आहे म्हणून नाही. अनेकजण स्वतः घाबरत असतात आणि स्वतःचा भित्रेपणा लपवण्यासाठी हिंसा किंवा संघर्ष वाईट अशी भूमिका निर्माण करतात. ह्या on average घाबरटपणाचा फायदा घेऊनच काही थोडे जण अनेकांना वाकवत असतात. आपल्यातली हिंसा कुठेच गेलेली नाही. ती आपला मूळ भागच आहे. तिच्यात स्व-संरक्षणाची क्षमता आहे. कदाचित आता ह्या सुरक्षिततेची काळजी नसल्याने आपण हिंसेकडे एक कृत्रिम प्रवृत्ती म्हणून पहात असू तर तो आपल्या सुखासिनतेचा परिणाम झाला. स्वतःच्या आयुष्याची, नात्यांची किंवा सामाजिक स्थानाची, म्हणजे कशाचीच ओढ नसणारा निसंग माणूसच अहिंसक होऊ शकेल. बाकी जो कोणी समाजात आहे त्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने हिंसेला स्वीकारलेच आहे. पोलीस हे हिंसेचेच नियंत्रित रूप आहे (काही भागात अनियंत्रित!) शासन जर समाज टिकेल, मिळवेल आणि मिळवलेले टिकवून वाढवेल अशा प्रकाराने वागत नसेल तर असे शासन उलथून टाकावे लागते. सैद्धांतिक दृष्ट्या हे उलटणे मतपेटीद्वारे करावे लागते. पण प्रत्यक्षात शासन विविध स्तरावर आहे, एकच मतपेटी सारे स्तर बदलू शकत नाही आणि हे सारे स्तर सुसंघटीत नाहीत. निवडणुका आणि सत्ता टिकवण्यासाठी करावयाच्या उलाढालींचा खर्चच एवढा आहे कि उद्योगांना favor दिल्याशिवाय पक्ष चालूच शकणार नाहीत. आणि हि बाब भारतात नाही तर सर्वच देशांत लागू आहे. प्रश्न असं आहे कि अशा उलाढाली होताना त्यात अनेक सामान्य लोक चिरडले जातील अशा तडजोडी होऊ नयेत.
भोपाल वायू गळतीशी थोडीफार सारखी घटना मेक्सिकोच्या आखतात घडते आहे, ती म्हणजे बी.पी. च्या तेलाविहीरीच्या गळतीची. याविरुद्ध अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अध्यक्षांनी ठराविक मुदतीसाठी मेक्सिकोच्या अखातातील तेल काढण्याची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बी.पी. कडून बंद पडणाऱ्या तेल विहिरीचे कर्मचारी, बेकार झालेले मच्छिमार आणि वेटर, किनारपट्टीचे नुकसान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय भरून काढण्यासाठी २० billion dollars घेण्यात येणार आहेत. फ्री मार्केट व्यवस्था लोकांचा विचार करत नाही असे नाही आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील. अमेरिकेत असे घडू शकते कारण अशा घटनेनंतर तिथे माणसाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून विचार केला जातो. अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे लेख पाहीले तर घटनेच्या किती बाजूंचा विचार मांडला जात आहे ते दिसतं. पण ह्या विचाराबरोबरच अशी कृती व्हावी म्हणून राजकीय दबावही निर्माण केला जातो. बी.पी. च्या C.E.O.ला अमेरिकन संसदेसमोर शपथेवर बोलावे लागते आणि Anderson भारत सरकारच्या विमानातून जातो. बी. पी. हि ब्रिटीश म्हणजे अमेरिकच्या पिल्लू देशातील कंपनी आहे आणि तरीही तिच्याकडून नुकसान वसूल केले जाईल असे बराक ओबामांनी म्हटले आहे. चीदम्बरमनी नुकसान भरपाई वाढवली आहे आणि ती सरकारच देणार आहे. Dow ने भरपाईची जबाबदारी घ्यायला नकारच दिला आहे. आणि त्याबद्दल सरकारकडून काहीही विधान नाही. हि चूक सरकारची नाही. आपली आहे. आपण प्रतिक्रिया द्यायला हवी. ज्या स्केलवर आपल्याला शक्य आहे तिथे. प्रतिक्रिया हि स्वतःला तोशीस पाडूनच द्यावी लागेल.
त्यात निदर्शने असतील, लिखाण असेल, भाषणे असतील, राजकारणात सहभाग असेल, अ-सरकारी संस्थांमध्ये काम असेल आणि निर्वाणीचा उपाय म्हणून 'गोंद्या आले रे' हि वापरायला लागेल.
भगत सिंगच्या डायरीमध्ये एक वाक्य होतं- I am a man and whatever affects mankind affects me. हि mankind म्हणजे समस्त मानवजात असली तरी तिचं सर्वात जवळचं रूप मी ज्यात जगतो तो भवताल असतो. आणि तो जगण्याला अनुरूप ठेवण्याची, त्याला विकसत ठेवण्याची जबाबदारी माझी असते. कोणी जर यात अडथळा आणत असेल तर तो दूर करण्यात मी सहभागी झालो पाहिजे. माझ्या कृतीतून मी विरोधाचे पर्याय निर्माण केले पाहिजेत.
झोपलेत माळ अजून तापवित काया
असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया
अजून हे अपार दुख वाट पाहताहे
अजून हा प्रचंड देश भिक मागताहे
-केव्हातरी ह्या ओळी खोट्या ठरायला हव्यात....

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...