Showing posts with label अण्णा'ज स्कूल अॅट लालचौकी. Show all posts
Showing posts with label अण्णा'ज स्कूल अॅट लालचौकी. Show all posts

Sunday, July 26, 2015

द गोल्डफिंच

     केव्हातरी आलेल्या सणकेत मी असं ठरवलं की इंडियन इंग्लिशच वाचायचं. कारण बाकीचं इंग्लिश आपल्याला परकं आहे. मार्खेज असेल किंवा बोलानो, शेवटी ते वास्तवाचे जे तुकडे जगले त्यांचा आपल्याशी ओढून ताणून संबंध आहे. थेट काही नाही. मुराकामी थोडा जवळचा असेल, पण शेवटी वेस्टर्न म्युझिक ऐकणारी आणि बीअर सिप करणारी त्याची रिअॅलिटी आपली नाही. आता असं ठरवण्याला काही अर्थ नाही. वाचन हे कसलीही ठाम युटिलिटी नसलेली गोष्ट आहे आणि तिच्याकडे एक कमी-जास्त तीव्रतेचे व्यसन म्हणून बघणे अधिक बरोबर आहे. पण असे निष्कर्ष फार काळ तग धरत नाहीत, आणि परत आपल्या कृतीत सामाजिक, वैयक्तिक अशी काहीतरी युटिलिटी मी शोधू लागतो. मग मी विचार करतो की कशाला वाचायचं? समजून घ्यायला!! काय चाललंय आपल्या आजूबाजूला ते समजून घ्यायला (हा!हा!!) त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या जातकुळीशी जुळणारी पुस्तकं मी वाचायला हवीत. मग मी इंडियन इंग्लिश नावाच्या ढिगात स्वतःला लिमिट ठेवायला बघतो.
       ह्यांत काही चूक नाही असा कौन्सीलरी सल्ला मी माझाच मला देऊ शकतो. आणि अर्थात इंडियन इंग्लिशमध्ये काही खरोखर हिडन जेम्स आहेत. जसं ‘लिटनीज ऑफ डच बॅटरी’. किंवा मनू जोसेफ किंवा फॅमिलीज अॅट होम.
       पण बाकी बऱ्याच पुस्तकांना आणि वर म्हटलेल्या पुस्तकांना एक ठाम पॅटर्न असल्यासारखा आहे. लिहिणारा हा सरकारी नोकर किंवा प्राध्यापक/अॅकॅडमिक किंवा पत्रकार आहे. आणि त्याच्या बालपण-तरुण आयुष्याच्या अनुभवांवर त्याने त्याचं बेस्ट लिखाण केलेलं आहे. म्हणजे हा अगदी पक्का प्रकार नाही. मानू जोसेफने त्याच्या कादंबऱ्या ह्या बऱ्याच अभ्यासाने, रेफरन्स घेऊन लिहिल्या आहेत. त्याच्या पेशाचा स्वाभाविक रेफरन्स त्यात तसा थोडा येतो, पण त्याच्या पत्रकारितेचा त्याला फायदा झालेला आहे.
       आणि ह्यातून कसे भारतीय इंग्लिश लेखक नल्ले असंही म्हणायचं नाहीये. बालपण-तरुणपण हेच कदाचित लिहायच्या प्रक्रियेची सुरुवात आणि इंधन असतं. नंतर जे लिहिलं जातं ते केवळ इथे तयार झालेल्या मुळातल्या आकाराला अधिकाधिक सुबक करणं असंही आपण म्हणू शकतो. आणि हे साऱ्याच लेखकांना लागू असेल.
       असो. सांगायचा मुद्दा हा की इंडियन इंग्लिशच्या ह्या गाठोड्याचा नंतर मला कंटाळा येऊ लागला. त्यात डोक्यात जाणारी आणि घुसळून काढणारी किक फार काही नाही असं मला जाणवायला लागलं. तेच, तेच, तसेच मवाळ हळवे सूर असलं.. थोडक्यात माणूस असण्याचं ठाम लक्षण असलेला कंटाळा आला.
       मग लॉर्ड ऑफ द रिंग्स. जंप इन टू फँटसी. आपल्यातल्या वेगाने बथ्थड होत जाणाऱ्या संवेदनेला काल्पनिक हाय. एस्केप रूट.
       पण मग फ्रोडो जातोच ग्रे हेवन्सना. आणि मीही लोकल ट्रेन्समध्ये परत.
(‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ च्या मराठी अनुवादाबद्दल मला असलेलं स्वारस्य ‘स्वामी मुद्रीकेचे’ ह्या नावाने बऱ्यापैकी थोतरीत बसल्यागत झालेलं आहे. आणि बुकगंगावर मला अनुवाद मिळालेही नाहीत.)
       मग आता? काहीतरी थिअरी? का माहिती, इतिहास, इंटरप्रिटेशन आणि काउंटर इंटरप्रिटेशन. बौद्धिक हस्तमैथुन. आहा... बोअर होईपर्यंत.
       नोप, नोप. वयाच्या तीशीला तुम्हाला स्वतःच्या सवयींना आणि कमकुवत दुव्यांना सिरीयसली घ्यावं लागतं.
       कमकुवत दुवा: लोकल ट्रेनमध्ये स्पार्टन आणि उंदीर वर्तन करणे. किंवा अशा वर्तनात न पडता वृक्षासनाच्या व्हेरिएशन्स करीत वेळ काढणे.
       आवश्यक सोल्युशन: वेळ काढणे.
       उपलब्ध पर्याय: पिक्चर किंवा पुस्तक, थोडक्यात स्टोरी.
मग मी पुस्तकाचा पर्याय निवडतो. कारण वेगाच्या अपरिहार्य नशेने पकडलेल्या फास्ट लोकल ट्रेनमध्ये इअरफोन आणि हातातील स्क्रीन ह्यांचे जवळचे नाते सांभाळणे हे काहीवेळा जिकीरीचे ठरते. आणि समजा सिनेमात कोणी  एकमेकांच्या जवळ आले की आपले सहप्रवाशीसुद्धा जवळ येऊ शकतात. आणि कानात घातलेले असल्याने काही हुकमी संवाद आणि ज्ञानशिंतोडे ह्यांपासून वंचित अवस्था येते.
       म्हणजे पुस्तक. कुठलं?
--
       द गोल्ड्फिंच मी अगोदर छान विकत घेतलेलं ई-बुक. पण मग मॅनहटन, आणि तिथे पडणारा पाऊस आणि आई आणि ह्या सगळया आठवणी अॅमस्टरडॅममधल्या एका हॉटेलात. असल्या ग्लोबल गोष्टींशी आपल्याला काही घेणं-देणं नाही असं ठरवून मी ते पुस्तक परत करून सारे पैसे परत मिळवले.
       मग कोणाला तरी एकदम हे पुस्तक हाताला लागलं आणि त्यांनी जवळपास रात्रभर पुस्तक कसं वाचलं हे माझ्या वाचनात आलं. मग मला वाटलं की आपल्या कमकुवत दुव्यावरचा उपाय हा तर नाही!
       मग मी पायरसी केली आणि परत सुरू.
       आणि धिस टाइम देअर इज नो कमिंग बॅक. एस्केपरूट आणि मनोरंजन, पर्पज सर्व्हड.
       शेवटापर्यंत जवळपास मी ह्याच निष्कर्षाला होतो. लेखिकेची प्लॉटवर कमांड हुकमी आहे, कसं आणि किती सांगायचं ह्याचा सराईतपणा आहे, निरीक्षणं, विशेषतः आवाज किंवा वातावरणाची व्हेरिएशन्स सांगताना त्याला ती जी विशेषणे देते ते तर अफलातून आहे. म्हणजे वयाच्या १४ ते २५ वर्षांत थिओच्या आयुष्यात ही गोष्ट घडत असल्याने सगळया सांगण्याला अधिरा पण ताकदवान यंग आवाज देण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे. पण हे तर सगळं समीक्षकी झालं.
       गोष्टीच्या शेवटी असं होतं की शेवट होतो पण सांगणं संपत नाही, किंवा उरतं शेवट व्हायचं काहीतरी. आणि तिथे सांगणारी स्टाईल, निष्कर्ष, कथेचा वेग सगळं सोडून देऊन बस्स आपल्याला सांगायला लागते. एकदम चांगदेव पाटीलसारखा किंवा ‘चाळेगत’ च्या सुरुवातीला येणारा मोनोलॉग. धबाबा सांगत जाणं, जे जसं भिडून दिसलं आहे, आणि मग तिथे लिहिलेलं, लिहिणारा अगदी पारदर्शक होत होत आपल्याला दिसतं की हे आपल्याबद्दल आहे. कदाचित हे इल्यूजन असेल, पण इट इज कॅप्टीव्हेटिंग.
       मी माझ्या आजूबाजूचे लोक बघतो. मागच्या काही दिवसांत मी ट्रेनमध्ये पाहिलेली पुस्तकं कोणती? सायन ऑफ ईश्वाकू, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज, नोट्स. सगळ्यात जास्त लोक काय करतात, तर तत्कालीन सिनेमे मोबाईल वर बघतात. नाहीतर व्हॉटस अॅप किंवा गेम्स. किंवा मग सवयीच्या ग्रुप बडबडी. एस्केप रूट आणि मनोरंजन.
       पेंटींग्जवर केंद्रित पुस्तकं कोणती? माय नेम इज रेड.
       मराठीत ऋषिकेश गुप्ते ह्यांची एक कथा पेंटिंग भोवती आहे, ‘त्या वर्षी’ मध्ये काही आहे. ‘ऑक्टोबर एंड’, पण ते तितकं माहित नसलेलं.
--
       ‘शोध’ नावाचं नवं मराठी पुस्तक वाचायचं मी ठरवतो आहे. सोशल मिडिया आणि पी.आर. रेफरन्सेस असल्याने.
       किंवा मी ‘२६६६’ किंवा मार्खेज परत वाचेन. किंवा सॉंग ऑफ आईस अँड फायर.
       माझा कलिग माझ्याशी चर्चा करतो की कशी वाचनाची आवड घटत चालली आहे आणि त्याचे केवढे तोटे आहेत? मी त्याला माझं मत सांगतो की वाचनाची कोणतीही ठाम युटिलिटी नाही. वाचन हे स्पष्ट, तर्कशुद्ध  विचारांची नेसेसरी किंवा सफिशिअंट कंडीशन नाही. एकतर आपले विश्वास ठाम होण्यासाठी आपण प्रपोगंडा काही वाचावं आणि ठाम विश्वासाच्या पायावर आंधळ्या कृतींना निश्चिंत व्हावं. किंवा मग काय चाललंय, कशाला चाललंय अशा झांगड्गुत्त्याला गुंगारा द्यायला वाचावं, जसं गर्दुल्ले अभावितपणे करीत असावेत. माझा कलिग माझ्याकडे सहानुभूतीने बघतो.

       टी.व्ही.वर लोकांच्या उद्धारासाठी जीवन वेचलेल्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेल्या पिक्चरचे प्रोमोज लागतात. सतत गळा भरून येणाऱ्या थोर अभिनेत्याच्या त्या जाहिरातींनी मला आधी चीड, मग शीण आणि शेवटी कर्तव्याच्या थोर गाळात रुतलेला काहीही न वाटलेपणा येतो. पण त्या आधी मला असं वाटतं की इह-परलोकी कारणी लागण्याचं गाढव आपल्या मागे लागल्याने आपण असे आहोत, गाढवालाही मजा नाही, आपल्यालाही नाही, बस केवळ शर्यत.                          

Tuesday, June 3, 2014

सिटीलाईट्स: (थोडा/माझा) गंडलेला फोकस

       एकच गोष्ट सांगणारा चित्रपट दोन भाषांत पाहणं ह्यात म्हटलं तर तोचतोचपणा आहे. नवा शॉक काही नाही, नवी किक नाही. पण समजा ती गोष्ट नव्या संदर्भाने सांगायचा प्रयत्न असेल तर मग त्यात उत्सुकता आहे. कारण कुठल्याही गोष्टीत एक असतं घडणं आणि एक असतं तिचे संदर्भ. म्हणजे ‘द गुड, द बॅड अँड ड अगली’ हा चित्रपट पाहिला तर त्याची स्टोरी आहे आणि ती घडते त्या भूगोलाचे, तिथल्या राजकारणाचे, तिथल्या लोकांच्या वागण्यात काही ठाशीव पॅटर्न असतील त्याचे संदर्भ आहेत. जेव्हा केव्हा एखादी स्टोरी दुसऱ्या भाषेत आणि दुसऱ्या संदर्भांत बनवायचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिला नवे संदर्भ कसे दिले जातात हे इंटरेस्टिंग असते. काही वेळा निव्वळ भाषा बदलली जाते. (केवळ भाषा बदलून पण सेम संदर्भात चित्रपट म्हणजे ‘द गर्ल विथ द द ड्रॅगन टॅटू’. पण त्याच्या इंग्लिश व्हर्जन पेक्षा स्वीडिश मूळचा चित्रपट जाम भारी आहे.)
       मध्ये मी असंच ठरवलं की अमेरिकन मूव्ही उगाच काहीतरी ठोकळेबाज स्टोरी आपल्याला दाखवत चालले आहेत. त्यामुळे थ्रिलर असेल, त्यात काहीतरी अनपेक्षित घडण्याची किक असेल तर पहायचं. उगाच त्यांची श्रीमंत पर्सनल दुःख, किंवा आशावादी स्ट्रगल असले ठोकळे पहायचे नाहीत. पण नंतर मला असं जाणवलं की मी ज्या वेब साईट वरून चित्रपटांबद्दल माहिती मिळवत होतो त्याचा केंद्रबिन्दूच अमेरिका असावं असं दिसतंय. ऑस्कर वगैरे पण खरे देशी, केवळ मजा येईल एवढा विदेशी तडका दिलेले प्रकार असं मला वाटू लागलं. माझे गेस खरे आहेत का नाहीत ह्यावर संशोधनपर होण्यापेक्षा मी गुगल सर्च बॉक्स मध्ये कोणत्याही एका देशाचे नाव आणि बेस्ट मुव्हीज असं शोधायला सुरुवात केली. आधी ठळक आठवणाऱ्या देशांची नावे झाल्यावर मग रोमानिया, युक्रेन, चिली अशी नावं करता करता मला अनेक चित्रपट मिळाले. पण गुगल वर चित्रपट कसा असेल ह्याबद्दल रिलाय करणं काही वेळा फसवतं. मग मला आठवलं की माझ्या एका मूव्ही ब्लफ वाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या (पण आता जीवनमानाच्या रेट्याने तसे न उरलेल्या) मित्राने सांगितलेली साईट आठवली, सनडान्स फिल्म फेस्टिवल. आणि तिथे एक नाव मिळालं, आणि थोडकं वर्णन, मेट्रो मनिला.
       इंटरनेटवर (अर्थात कॉपीराईटची मारून) सिनेमा आणि त्याबद्दल सारं काही असेल.
       राजकुमार राव मला आवडला होता तो ‘शैतान’ मधला करप्ट इन्स्पेक्टर आणि ‘गॅंगस् ऑफ वासेपूर’ मधल्या त्याच्या रोलमुळेही. आर्थिक शिस्तीचे प्रयोग आणि वाईट पायरेटेड कॉपी ह्यामुळे त्याचा ‘शाहीद’  बघायचा राहिला. एकदा दररोजचा न्यूजचा ब्रेकफास्ट घेताना मला दिसलं की ‘सिटीलाईट्स’ रिलीज होतो आहे, आणि म्हटलं आहे की शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ वर आधारित आणि मुंबईत घडणारी गोष्ट. चित्रपटाचा ट्रेलर बघून मला वाटलं की कदाचित बऱ्यापैकी फ्रेम टू फ्रेम मेट्रो मनिला उचलला आहे का. परिणाम: मी ‘सिटीलाईट्स’ बघताना सुरुवातीपासून क्रिटीकल होतो.
       चित्रपट आवडला का नाही असा निष्कर्ष न काढता समीक्षकी होण्याचा (आणि मग वैचारिक उत्सर्जन आणि त्यातून निष्कर्ष करण्याचा) चष्मा मला लागलेला आहे. आणि त्या चष्म्यातून, म्हणजे जो पूर्णतः माझा आणि बऱ्यापैकी मी बनवलेला चष्मा आहे त्यातून मला सिनेमा गंडला आहे असं वाटलं. अगदी एक वाक्यात म्हणजे एका महानगरात एका माणसाची गोष्ट असं असणारा मेट्रो मनिला इथे आर्थिक विषमता आणि मुंबईचे स्टिरिओटाईप चित्रीकरण ह्यात जातो. राजकुमार रावला वापरायचा आणि दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्याने त्याला न्यायही दिलेला आहे. पण काहीवेळा तपशिलांच्या मला वाटलेल्या गलत्या इंटेन्सिटी कमी करतात. जसे गावाहून केवळ दोन मिडीयम साईज बॅगांमध्ये कपड्यांचा प्रचंड साठा, भांडी आणि कोरलेल्या भुवया घेउन आलेली बायको, सैन्यात नोकरी केला आहे ह्याबद्दल एक फोटो दाखवला तर बाकी काही विश्वसनीय नसलेला हिरो, १५ हजाराच्या पगारात डान्सबार मध्ये मनसोक्त पिणारे लोक(आपलं असं करायचं राहून गेलं हंसल भाय!), जात आणि सोशल नेटवर्क ह्यांना अनुक्रमे शून्य आणि चुटपुटता केलेला स्पर्श, एका पात्राचे घर दाखवताना दोन वेगळया प्रसंगात दोन वेगळी घरं वापरली गेली अशी माझी वैयक्तिक आशंका, एक वगळलेली उपगोष्ट, हिंदी चित्रपट म्हणजे असलेच पाहिजे अशा सांस्कृतिक बाण्याचे पार्श्वसंगीत आणि मूळ कथेत शेवटी जो हलवू शकेल असा धक्का आहे त्याची केलेली मिळमिळीत अवस्था. असो. उत्तेजनार्थ शाबासकी देता येईल, पण तपशील आणि कथेच्या साच्याबद्दल आणि त्यातून बघणाऱ्याला मिळू शकणाऱ्या रंजकतेच्या परिणामाबद्दल काटेकोरपणा ही बेसिक अट हवी. अर्थात माझ्या निष्कर्षांत मी अगोदर मूळ चित्रपट पाहिला असल्याचे भरपूर मीठ आहे. (आणि तशी एक शंका पण आहे की ‘मेट्रो मनिला’ आणि ‘सिटीलाईट्स’ ज्या प्रकारचा सेक्युरीटी बिझनेस दाखवला आहे तसं मुंबईत करायला मान्यता आहे का? त्यापेक्षा ए.टी.एम. साठी कॅश घेऊन फिरणारे गार्ड्स दाखवता आले असते का?))
--
       माझ्या डोक्यात नंतर एक विचार आला. ‘मेट्रो मनिला’ पाहिल्यावर हे मनिलामध्ये राहणाऱ्या गरीब, व्हल्नरेबल लोकांची प्रातिनिधिक कथा आहे असं मी एकदम गृहीतच धरलं होतं कदाचित. आणि ‘सिटीलाईट्स’ बघताना मी अशा कुरापती काढण्याचा प्रयत्न करत होतो की अरे ही काही प्रातिनिधिक वगैरे स्टोरी नाही. लोक तर ह्यापेक्षा खूप वेगळं जगत आहेत. कदाचित मी चुकतो आहे. मला मनिला बद्दल काही माहिती नाही. कदाचित मूळ चित्रपट ही सुद्धा एक वन ऑफ स्टोरी असेल.
       हे प्रातिनिधिक असण्याचे विचार ही मला माझ्या एैदू शैक्षणिक वाचनाने दिलेली देन आहे. त्याला काही अर्थ नसावा. पण असं वाटतंच मला की खरंच किती लोकांच्या सुखी किंवा भौतिक दृष्ट्या सुखी आयुष्यांत अशी काही गोष्ट असते. फारच कमी. बहुतेक ठिकाणी एक साचा असतोच जगायचा, आणि थोडाफार फरक करता सगळे तेच साचे रेटत नेतात. गोष्ट कुठे असते तर जिथे कोणीतरी एका गतानुगातिक साच्यातून दुसऱ्या साच्यात जायला बघतो, खरचटतो, पोचतो किंवा संपतो. पण असे किती?
       ‘सिटीलाईट्स’ वर एक ऑब्जेक्शन तर मी नक्की घेईल की त्यात गटारे आणि पाईपलाईन, चिंचोळ्या कचऱ्याने भरलेल्या गल्ल्या, १० बाय २० ची घरे आणि त्यांचे पोटमाळे, सार्वजनिक संडास आणि गटार, रस्ता अशा कुठल्याही कडा, कुपोषित प्रकाशात चाललेल्या स्वैंपाक आणि रात्री संबंधित अन्य घडामोडी हे सारं कुठे येत नाही. कुरुपतेचा, माणसाला चिणून त्याचा एका बटबटीत व्यवस्थेतील एक नियमित थडथडणारा प्रत्यय कुठे येत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’ किंवा कॅथरीन बू चे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स’ ह्यात तो आहे, पुस्तकात तर जबरी आहे. आणि तो नसेल तर मुंबईच्या तिसऱ्या स्तराच्या स्लमची गोष्ट, कधी प्रातिनिधिक किंवा जड शब्द घ्यायचा तर वास्तववादी होणर नाही असं मला वाटत राहतं. ‘सिटीलाईट्स’ राजकुमार राववर गोष्टीपेक्षा जास्त प्रमाणात फोकस करते, त्यांचे गावातल्या घरातले, मुंबईमधले आनंद स्लोमोशनमध्ये खास संगीतासह बघताना मला एकदा असंही वाटलं की एवढे आनंदी होते गावांत, स्वतःच्या अंगण, गच्ची असलेल्या घरात मिया-बीबी-मुलगी एवढेच राहणारे कुटुंब, सैन्यात ड्रायव्हर म्हणून नोकरी केलेला (आणि सोडलेला, आणि आधीच्या नोकरीचे काही पर्क्स मिळतायेत असं काही नसलेला) नवरा, मग खरंच कशाला आले मुंबईत? धंद्यात खोट येऊन कर्जात बुडायचा एक प्रसंग थेट शहरात धाडतो का? असं असतं का ह्या थाटाचे एवढे प्रश्न का विचारावेत असंही आहे. ‘चक्रव्यूह’ नावाचा प्रकाश झाचा सामाजिक जाणीवेची शेव पेरलेला भेलपुरी प्रकार पाहून लोक माओवादाबद्दल जाणीवेच्या ढेकर देताना मी पाहिलं आहे. आणि कळला बरं आपल्याला नक्षलवाद अश्या उथळ जी.के. ढेकरांचा मला नंतर त्या ऐकून ऐकून जाम त्रास झाला. त्यामुळे अगोदरच माहितीपूर्ण सामाजिक कायम चूर्णाच्या फैरी मी झाडून ठेवत आहे. होऊ दे साफ..
       गाव, तिथले लोक ह्यांच्याबद्दल एक फुकाचा आनंदी, हूळहूळणारा नॉस्टॅल्जिक दृष्टीकोन मी अगोदर मनात पाळून असे. जसं, जीवनाचं ध्येय काय असेल तर गावांत जाऊन काही सामाजिक स्वरूपाचं काम करणं, गाव खरं, शहर खोटं, खरा भारत खेड्यांत, खेड्यातले लोक कसे साधे, आनंदी, कोणालाही सामावून घेणारे. पुढे माझा च्युत्यापा माझ्यासाठी उघड झाला. त्यातले काही ज्ञानाचे फुगे म्हणजे:
१.       गावातले सगळ्यात गरीब हे काही मायग्रेट करीत नाहीत शहरांत. ते जवळपासच्या प्रदेशांत वर्तुळाकार मायग्रेशन करीत राहतात. गावातील मध्यम स्तरातले घरात थोडी बहुत शेती असलेले, शहरांत काही ना काही नेटवर्क असलेले लोक प्रामुख्याने मायग्रेट करतात. पोटासाठी किंवा स्वप्नांसाठी शहरात येणारे नाहीत असे नाहीत. पण एकूण मायग्रेशनच्या संख्येत ते काही एक अंकी पर्सेंट असतात. मुंबईत प्रत्येक उपनगरात, किंवा महत्वाच्या नाक्यांवर सकाळी हातात पिशवी, जुने शर्ट घेऊन उभे बाया-बापे दिसतात. कोणी साईबाबा किंवा तत्सम भक्त त्यांना सकाळी चहा वगैरे पाजत असतो. मग एक एक करून कोणी कोणी येऊन त्यांना, बहुतांश वेळा गटा-गटाने दिवसभराच्या मजुरीसाठी हायर करतो. ह्या गटात असे पोटासाठी आलेले आणि शहराच्या जवळपासच्या गावांतून ट्रक, टेम्पो मध्ये होलसेल बसून आलेले दोन्ही प्रकार असतात. जातीच्या हायरार्कीमध्ये तळाला असलेले लोक.
२.       ज्याला इनफॉर्मल सेक्टर म्हटलं जातं किंवा फॉर्मल सेक्टर मधली जी कॉंट्रॅक्चुअल नोकरी असते त्यात येणारे मायग्रंट हे ग्रामीण आर्थिक स्तरांमध्ये मध्ये कुठेतरी, अल्प किंवा मध्यम भू धारक, एक्स्टेंडेड  कुटुंबाचा थोडा बहुत आर्थिक आधार आणि शहरांत अपने जात का, अपने गाव का असे नोकरी/धंदा  लावून देण्याइतपत असलेला कोणी का कोणी असलेले असतात. थोडेफार कर्ज, त्याची सोयीस्कर परतफेड ह्या सवलती त्यांना मिळू शकतात.
३.       आनंदी होण्याचा चान्स असलेले लोक तर शेवटी तेच असतात ज्यांचे आई-बाप त्यांच्यासाठी पोटभर  मागे ठेवून जाण्याचा चान्स असलेले असतात. बाकीचे एकतर सतत रडत असतात किंवा अधून-मधून. किंवा आपल्याला काही रडायला नाही म्हणून बाहेरची रडणी उधार घेत असतात.
--
       ‘मेट्रो मनिला’ मध्ये बायको पेसो (फिलीपिन्स चे चलन) भरलेली बॅग घेऊन गावाकडे परतते, हातात नवऱ्याने दिलेलं काहीएक पकडून, मुसमुसत. कदाचित तिच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न सुटला असं एवढं तरी आपण म्हणू शकतो.
       नंतर मी ‘ब्रेकिंग बॅड’ बघून संपवली. आणि आता मला प्रश्न पडतो की समजा एकदम असे लाखो, करोडो रुपये, पेसो, डॉलर्स मिळाले तरी प्रश्न सुटत नाहीत. त्यांची अकाऊंटेबिलीटी हा प्रश्न उरतोच आहे. किंवा मग हे पैसे अगदी सावकाश, नजरेत भरणार नाहीत अशा मार्गाने वापरणं आलं. किंवा मग ते काळ्या अर्थव्यवस्थेत गुंतवणं. म्हणजे ‘सिटीलाईट्स’ मध्ये शेवटी गावी परतलेल्या राखीला पुढचे प्रश्न पडणार आहेत. कदाचित त्याच्याबद्दल काढलेला चित्रपट अस्सल भारतीय असेल आणि प्रातिनिधिकसुद्धा.
       ही एक चोरीची, कोणाला उघड सांगता येणार नाही अशा मार्गाने मिळवलेल्या पैशांची कोड्यात टाकणारी गंमत आहे. असा पैसा मिळवणं हे कठीण म्हणावं, तर त्याचा खरोखर वापर हे अजून कठीण. किंवा मग तो पैसा मिळण्याचा स्पीड एवढा नगण्य हवा की तो वापरताही येईल, आणि उघडकीस येणार नाही. पण मग काय फायदा?
       त्यामुळे मला असं कायम वाटतं की मोठे-मोठे दरोडे, चोऱ्या ह्या काही फक्त चोर करत नसणार. त्याच्यापाठी मिळालेलं घबाड चॅनेलाइज करणाऱ्यांची व्यवस्था असणार. (आठवा:शॉशॅंक रिडेम्प्शन) आणि चोर सापडले तरी ही व्यवस्था सापडणार नाही. ती नावं, जागा बदलत चालूच राहणार. चोरांना काय मिळत असेल अशा चोऱ्या, दरोड्यातून? ५०%, ४०%,३०%?
--
       हे बरंच भरकटून झालं.
       मुंबई, तिची विषम संधींची निर्दय किंवा अनप्रेडिक्टेबल दुनिया, तिच्यातल्या माणसांचं वागणं हा चित्रपटांचा, पुस्तकांचा आवडता विषय आहे. काही पुस्तकं मी वाचली आहेत, काही सिनेमे पहिले आहेत, काही सर्व्हे केले आहेत. मला प्रश्न पडतात:
मुंबईची (बेट आणि उपनगरे) लोकसंख्येची घनता आहे जवळपास २३००० प्रति चौरस किलोमीटर. अगदी मुंबई महानगर प्रदेश (MRR)  पकडलं तरी लोकसंख्येची घनता आहे १८०००. मुंबईची तुलना फार वेळा झाली आहे त्या शांघायची लोकसंख्या घनता आहे ३८००. शांघाय लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठं शहरी एकत्रीकरण (Urban Agglomeration) आहे. ढाकाची लोकसंख्या घनता आहे ४५००० आणि हे मुंबईहून छोटं शहर आहे. दिल्ली शहर एकत्रीकरणाची लोकसंख्या घनता आहे ७४०० आणि शहराची जवळपास ११०००. मेट्रो मनिलाची लोकसंख्या घनता आहे जवळपास १९०००. न्यूयॉर्कची लोकसंख्या घनता आहे १०७००. लंडनची लोकसंख्या घनता आहे ५३००. कलकत्ताची लोकसंख्या घनता आहे २४०००. टोकियोची लोकसंख्या घनता ६०००. (सर्व आकडे विकिपीडिया)
कशाला हे आकडे बघतोय मी? हे आकडे बघून मला केव्हा केव्हा वाटतं की आपण एक अशक्यतेचा पाठलाग करीत आहोत. शहराच्या विस्तारात किती माणसाना किती दर्जाचं आयुष्य देता येईल ह्याच्या काही सांख्यिक मर्यादा असतील. त्याच्यापलीकडे जाऊन जर माणसे शहरात असतील तर त्यांना आपण काय देऊ शकू?
असं निराशावादी असणं चांगलं मानलं जात नाही आणि असा निराशावाद सिद्धही करता येत नाही. कदाचित अशी एक प्रचंड समृद्ध अवस्था असेलही की भौतिक गरजांच्या वस्तूंचं, कच्च्या मालाचं इतकं उत्पादन होईल की त्याची काही वानवा राहणार नाही. स्पर्धा करण्यासाठी जी टंचाई मुळाशी असावी लागते तीच संपून जाईल. पण असं होत नाही तोवर समृद्धीचं स्वप्न, आपल्यापुरता एक निवांत कोपरा बनवून राहण्याचं स्वप्न ह्यावर लाखो, करोडी लोक डाव लावत राहणार. आणि त्यांनी लावलेल्या डावावर राजकारण, साहित्य, चित्रपट, समाजसेवा अशा बाकी गोष्टींचे डाव लागणार. त्यामुळे नसलेल्यांनी असलेल्यांची स्वप्नं बघत राहणं ह्याला पर्याय नाही. ह्या स्वप्नांमधून, त्यांच्या पाठी धावण्याच्या, धडपडण्याच्या तडफडीमध्ये, त्यात येणाऱ्या वैफल्य, फसवणूक, आणि हाताला लागता लागता राहिलेले समाधान ह्यांच्या मधल्या स्पेसमध्ये आक्रंदणारी गोष्ट.
असं आहे का की ज्यांना कधी अशा तडफडीत जावं लागत नाही असा गट ह्या गोष्टींची चव घेण्यात जास्त मजा घेतो. फेसबुकवर माझ्या एका अतिउच्चशिक्षित,फिनान्स मध्ये वगैरे महिन्यास लाख रुपयांची नोकरी करून सध्या बाल संगोपनाचे लोभस फोटो अपलोड करणाऱ्या परिचिताने असा उसासा टाकला होता की हिरोपंतीला अधिक गर्दी होती, सिटीलाईट्स रिकामाच. असं होण्यात काही नैतिक चूक आहे का? असं होतं आहे ह्यांचं एक कारण कदाचित सिटीलाईट्स एका मूलभूत निष्कर्षावर माती खातो तो म्हणजे एन्टरटेनमेन्ट. ‘मेट्रो मनिला’ असं करत नाही. मनिलाच्या हाउसिंग इनइक्वॅलिटी किंवा आर्थिक विषमता ह्यांचे दृश्य किंवा मौखिक धडे देण्यापेक्षा ‘मेट्रो मनिला’ थंड, कोडगी गोष्ट सांगतो. तिचे तपशील साचेबद्ध बांधतो. ‘सिटीलाईट्स’ उगाच गरम अवस्थेत जातो (अर्थात भट्ट कॅम्प आहे म्हणा!) आणि जिथं खरी बीभत्स भीषणता आणता आली असती तिथे नुसतं चुकचुकल्यासारखे करून सोडतो. थोडा अजून रिसर्च, थोडी अजून प्रत्ययकारक ठिकाणी शूटिंग करण्याची निवड असं असतं तर ‘सिटीलाईट्स’चा पुणे-५२ झाला नसता.(हा हा)
समीक्षा (!) अपार्ट, पण तो प्रश्न राहतोच की भौतिक समृद्धीच्या, जीवनाच्या किमान पातळीच्या शाश्वतीच्या अभावात जगणाऱ्या माणसांचा अभाव नष्ट करता येईल असं खरंच शक्य आहे का? समजा असं मानलं की शक्य आहे जर आपण आपल्याला उपलब्ध संसाधने वापरू लागलो, प्रचंड उत्पादन करू लागलो, लोकांना मोठया मोठया कारखान्यात कामं मिळाली असं सगळं. पण मग प्रश्न दुसऱ्या बाजूला जातो, जे ओरबाडले जातील, जे ओरबाडलं जाईल त्याचं काय? आणि समजा कोणीही ओरबाडले न जाता बदल होतील अशी व्यवस्था बनेल असं मानलं तर मग कशाने सुरुवात करणार? आत्ता आहे तो संधींच्या दुर्मिळतेचा साचा बदलण्यासाठी कुठेतरी हातोडा मारावाच लागेल. तो कसा? अर्थात सध्या अवतारपुरुष आलेले असल्याने ह्या प्रश्नांना काही अर्थ नाही. पण आपण आपली धोब्याची भूमिका करू, ती स्वाभाविकपणे येते.
--
       मुंबईतील झोपडपट्ट्या (ज्यांना बहुतेक ठिकाणी चाळ म्हणतात! हा शब्द ऐकल्यावर मला माझ्या मराठी मध्यमवर्गीय सांस्कृतिक ठेव्याचा घोर अनादर केल्यागत झालं होतं. असो!), त्यातील अर्थव्यवस्था, त्यातील इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न्स ह्यांचा वापर विक्रम चंद्राचे ‘सेक्रेड गेम्स’ आणि कॅथरीन बू ह्यांचे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ ह्यांत आहे. सुकेतू मेहता ह्यांचे ‘मॅक्सिमम सिटी’ ह्यातही. माझ्या मते ‘बिहाईंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ सर्वात जबरी. (अर्थात विविध प्रकारच्या साहेबांबद्दल मनात सतत ठुसठुसणारा किंवा सुप्त आदर असलेल्याना पचावयास जड किंवा घातक लिखाण. आणि लोक असे साहेब, भाऊ, दादा का डोक्यावर घेऊ इच्छितात ह्याबद्दल ट्रिव्हिअल थिअरी असलेल्या हस्तीदंती लोकांस मोक्याच्या जागी गुदगुल्या करणारे लिखाण). थोडं अॅकॅडमिक व्हायचं असेल तर राजनारायण चंदावरकर ह्यांचे लिखाण आणि मीरा कोसंबी.
--
       असं होतं रस्त्यावर चालताना कधी, की एखादी चालणारं किंवा कडेला घेतलेलं मूल असलेली बाई, कधी कधी हातात आणि डोक्यावर बॅगा असलेला तिचा नवराही रस्त्यात हरवलेले असल्यागत सामोरे येतात. ‘गावाहून आलोय. काही खायला नाही.’,’गावी परत जायचं आहे, तिकिटाला पैसे नाही’,’वडापाव खायचा आहे’ असं काही ते म्हणत असतात. बहुतेक लोक, त्यांना विविध स्त्रोतातून मिळालेल्या माहितीमुळे असा पवित्रा घेतात की खोटारडे आहेत हे, अॅक्टिंग करतायेत. आणि पैसे देत नाहीत.
       एकदा माझ्या एका मित्राने अशा एका तिकिटासाठी पैसे मागणाऱ्या माणसाला अगदी बारीकसारीक तपशील विचारले, कुठे जायचंय, किती आहे तिकीटाची किंमत. आणि तो माणूस बरोबर सांगतोय हे कळल्यावर त्याला स्टेशनला जाऊन तिकीट काढून दिले.
       असे मागणारे खरे आहेत का खोटे असा विचार न करता मी दरवेळी पैसे देतो किंवा मी काही खात असेन तर खायला. आणि मग परत निवांत माझे एथिकल पझल्स चघळतो.
       ह्या शहरातल्या अशा मागणाऱ्या, गंडलेल्या, खऱ्या-खोट्या सगळ्या लोकांना...
--
(विशेष आभार: कॅफे अण्णा आणि अंतर्देशीय पत्रांच्या काळापासूनचे जुने मित्रवर्य)  

        

                   

Friday, March 14, 2014

बघ्या: प्रोलॉग आणि झवती गाढवं

      बघ्या त्रस्त आहे, म्हणजे दर काही दिवसांनी त्याला असं वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक प्रकारचं झवतं गाढव पाठी लावून घ्यायची हौस आहे. किंबहुना थोडा थेरॉटिकल दृष्टीकोन घेतला तर बघ्या हा आपल्याला जे केलं पाहिजे ते न करणं, त्याऐवजी भलभलत्या गोष्टींकडे असं नाही तर तसं असं बघणं आणि मग त्या पाहण्याला उगाच काहीही प्रश्न विचारणं ह्या स्थिर अवस्थेत स्वतःला कायम ठेवायचा प्रयत्न करून असतो.
      दिवसभर बघ्या त्याच्या वैयक्तिक स्पेसमध्ये सिगारेटी फुंकत, कॉफ्या किंवा चहा पीत, जमेल तसे जेवत, सिनेमे किंवा सिटकॉम बघत स्वतःला कसलीतरी फंडामेंटल प्रेरणा यायची वाट बघत असतो. बघ्यासाठी हे एक जेन्युइन पाउल पुढे जावं म्हणून अनेक पावलं चालायची टाळणं आहे, म्हणजे स्वतःबद्दल मजेशीर वाटण्याच्या अवस्थेत त्याला असं वाटतं. ही अवस्था नसते तेव्हा बघ्याला बहुतेकदा जीव द्यावासा किंवा दारू प्यावीशी वाटत असते.
      ह्याशिवाय बघ्या मांजरी पाळतो आणि त्याच्या घरच्यांकडून पाळला जातो. मांजरी बघ्याच्या मांडीवर निवांत झोपतात, त्याच्या गादीत तो नसताना हागतात आणि तरी त्या त्याच्या पावलाला मान घासायला लागल्या कि बघ्या त्यांना काहीही करून दूर लोटू शकत नाही. म्हणजे तो तसं करू शकतो, पण त्याने उगा तसं नाही करायचं असं ठरवलं आहे. नाहीतरी कामू म्हटला होता, माणसं देवावर विश्वास ठेवतात, लग्न करतात किंवा प्राणी पाळतात.
      बघ्याची चाळ त्याच्या आजीसारखी ८० वर्षाची आणि तशीच जर्जर आहे. दोघींचं कंबरडं मोडलं आहे, दोघी अंथरुणाला खिळून आहेत, आणि दोघी जबरी मौल्यवान आहेत.
      बघ्याची आजी २३००० पेन्शन घेणारी खडूस म्हातारी म्हणून बॅंकेत फेमस आहे. बघ्याची चाळ मोक्याची जागची भरपूर भाव येईल अशी जागा म्हणून. दोघी अजून असण्याचं मुख्य कारण सरकार आहे, चाळीला रेंट कंट्रोल आणि आजीला पे कमिशन देऊन.
      बघ्याला दोघीही मरतील ह्या भीतीचे पोपडे काढण्याचा गंमतीचा खेळ खेळतो. आजी मेली तर आपल्या भूतकाळाचा मोठा तुकडा कापला जाऊन आपण एकदम वर्तमानकाळात फेकले जाऊ असं बघ्याला वाटतं. तो आजीची बडबड तासंतास ऐकतो, उगाच मानसोपचारतज्ज्ञ कशाला म्हणून बाकीचेही काही म्हणत नाहीत. चाळ मेली तर मांजरी कुठे जातील ही बघ्याची भीती आहे. चाळ आणि बिल्डींग ह्यांच्यातले काही फरक बघ्याने हेरले आहेत, त्यातला एक मुख्य म्हणजे चाळीला विद्रूप असण्याची साहजिक गरज असते तशी बिल्डींगला देखणं असण्याची. बिल्डींगचा अजून एक मुख्य गुणधर्म म्हणजे ती त्यातल्या प्रत्येकाला आपापला घाण, ओंगळ, विसविशीत आणि नागडा भाग झाकण्याची मुभा देते. त्याचा फायदा उन्मुक्त होऊ घातलेल्या कामजीवनास किंवा असहाय्य होऊ चाललेल्या म्हातारपणास होतो. पण ह्या मुभेची दुसरी बाजू म्हणजे बिल्डींग मधील जिना, पार्किंग, कंपाऊंड अशा सर्व गोष्टींना सार्वजनिक महत्व प्राप्त होते, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचे नैतिक दडपण सर्वांस घ्यावे लागते. ह्या नैतिक आणि आर्थिक उन्नत अवस्थेचा स्वाभाविक परिणाम म्हणून केवळ पाळीव माणसे आणि कुत्रे किंवा पाळीव माणसे आणि पाळीव कुत्रे अशांनाच बिल्डींग हा स्टेट्स प्राप्त होतो.
      जेलस बघ्या! आंबट द्राक्ष्यांच्या बागेचा रखवालदार बघ्या!!
      सिरीयसनेस अपार्ट, मांजरी ह्या स्वतंत्र असतात, आणि एकाच वेळी निष्पाप आणि संधिसाधू होण्याचे नाजूक आणि पारदर्शक कसब त्या ठेवू शकतात. किंबहुना हा निष्पापपणाचा आपोआप येणारा भाग आहे कि निष्पाप असणाऱ्या गोष्टींमध्ये जीवघेणा त्रास द्यायची प्रचंड क्षमता असते. त्याचमुळे शाळा, स्पर्धा, संस्कार अशा यंत्रांमधून निरागसपणाला व्यवहारकुशल निब्बरपणात बदलायचे कारखाने चालवले जातात.
      मांजरी नसणं हा आपला का नेमका लॉस आहे ह्याचा विचार बघ्या करतो. १. सवय मोडण्याचे दुःख २. त्यांचे आग्रही म्यांव म्यांव न ऐकता येणे ३. नेमके ज्या दिवशी बघ्या त्याचे घर सोडेल नेमके त्या दिवशी मांजरी काय करतील हा इमोशनल ताण, म्हणजे समजा त्याच्या मांजरींचा ताफा दरवाज्याशी आला, लोळला, पाय ताणून आळोखे पिळोखे देऊन ओरडू लागला, मान पुढच्या पायांवर ठेवून, मध्ये मध्ये कूस बदलून बदलून झोपला आणि तरीही कोणी दार उघडले नाही तर? ४. तसे बघ्या अनुभवातून शिकला आहे कि माणसासारखा तद्दन पाळीव प्राणीसुद्धा कितीही सवयी तुटल्या, सोबत संपली तरी आपोआप परत नव्याने पाळीव होतो आणि सरासरी जगात जातो तिथे मांजरे जगणार नाहीत काय! पण तरीही बघ्याला एक गोष्ट टोचत टोचत जाते, जशी काफ्का ऑन द शोअर मधल्या नकाटाला टोचते, कि सुरक्षित अवस्थेतून एखाद्याला परत व्हल्नरेबल अवस्थेत ढकलणं ह्यात काहीतरी चूक आहे, आणि तेही मांजरींना ज्यांना आपण सांगू पण शकत नाही पुरेशे अगोदर कि अमुचा रामराम घ्यावा. ५. आणि समजा जेव्हा जिथे मांजरी निवांत हुंदडल्या, सावलीत झोपल्या, अंधारात जुगल्या, कोपऱ्यांत व्यायल्या, कोवळ्या वयांत मेल्या तेव्हा झाडांखाली पुरल्या गेल्या, चोरट्या आणि रतीबाच्या दुधावर सुस्तावल्या तो चाळीचा आकार कोसळून मलबा बनेल तेव्हा मांजरी तिथे काही शोधतील का, का त्या नुसत्याच ओरडतील, मूक बघत बसतील, आणि एका क्षणाला पाठ फिरवून, शेपूट वर करून जातील, जसा बघ्या आणि बाकीचे करत आले.
--
      हा बघ्याचा सेन्स ऑफ लॉस. एवढंच बघ्याचं होऊ घातलेलं विस्थापन. बघ्या ज्या छटाकभर शहरात वाढला त्याचं गर्दीने तट्ट फुगून गेल्याने जिकडे तिकडे गर्दीच्या साचलेपणाआड येणारा शांततेच्या, निवांत रस्त्यांवर चालत गेल्याने येणाऱ्या स्तब्ध अवस्थेच्या अकाली मृत्यूचा सडेल वास आणि त्याने होणारी बघ्याची घुसमट एवढीच बघ्याची डेव्हलपमेंटबद्दल तक्रार.
--
      तरी बघ्या विचार करतो कि डेव्हलपमेंट मॉडेलचं आपण नेमकं काय करायचं, आपल्या कोणकोणत्या गरजा छाटायच्या का आपणच इथून दुसरीकडे कलम व्हायचं. मग बघ्या बिन इस्त्रीचे कपडे घालतो, महिनाभर एक जीन्स घालतो, बादलीतून अंघोळ करतो, हाताने कपडे धुतो. ह्या झ्याटू डिसीजन्स.
      बघ्या ठरवतो कि गर्दी नको. दररोज माणसांच्या एका गतिमान गोळ्याला चिकटून घ्या, सुट्टे व्हा, काही तास आपल्यासारख्या माणसांच्या महत्वाकांक्षा आणि समस्या ह्यांच्या गॉसिपात घालवून मध्ये मध्ये आपला ज्याच्याशी संबंध नाही अशा काही गोष्टी करा, परत माणसांच्या थकलेल्या, चिडचिड्या गोळ्याला डकवून घ्या, एक गोळा संपला कि दुसरा पकडा आणि मग परत तंतू तंतूमय अलग होत आपल्या काडेपेटीत हुकमी काडी बनून कधीही पेटात्से झोपा, ७०-७५% दिवस असं करा आणि उरलेल्या वेळात आहार, निद्रा, भय, मैथुन, प्रजनन, प्रतिक्षिप्त क्रिया, बाल संगोपन, मतदान, देशभक्ती, निसर्गरम्य स्थळी मानवेल अशी गर्दी करून आनंदी फोटोग्राफ्स आणि वारसा मागे ठेवून अहेव इच्छांसह मरण. बघ्या त्याच्या अॅबस्ट्रॅक्शनने थरथरतो. सही काळ,वेळ,मित्र असते, बघ्या प्रतिथयश असता. परत द्वेषमूलक बघ्या, खुसपट्या बघ्या!!
      बघ्याचा निश्चय पाहून शहर खदखदून हसतं. आणि आपल्या लक्झरी आणि नेसेसिटी नावाच्या दोन शुडांनी उचलून त्याला गरगर फिरवतं.
--
      बघ्याचा मित्र आणि बघ्या फुफ्फुसात टार भरायला बसतात, तेव्हा मित्र त्याचा टाय काळजीपूर्वक काढून ठेवतो. परवा हेड ऑफिसला जायचंय, तेव्हा लागेल म्हणून.
      त्यांच्या बाजूच्या टेबलावर ३ बाया आणि ४.५ पोरांचा कळप येतो, आणि टोटल ६ कटिंग मागतो. ०.५ मुलगी अर्धा चहा आणि स्वतः सांडते तेव्हा जेष्ठ बाई म्हणते, जीयेगी या मारेगी रांड. अब येहीच जिंदगी अपनी.
      बघ्या मोबाईलवर ताज्या बातम्या आणि नित्य नियमित पौष्टिक लेख बघतो.
      निर्भया खटल्यात चौघांची फाशी हायकोर्टात कायम. सत्यमेव जयते. क्लीशेड, क्लीशेड..
      मित्र म्हणतो, कोण आपल्याकडून, अर्धे का मुर्धे? बघ्या म्हणतो १५ मारले नक्षलवाद्यांनी, मित्र म्हणतो छपन्न इंच येईल तोच काहीतरी देईल करारा जबाब.
      बघ्या ह्याला मानवतावादी ऑब्जेक्शन घेऊ शकतो, बघ्या वाद टाळतो, होळीला करू म्हणतो
.
      बघ्याचं स्मार्टफोन, बघ्याचं वाढदिवसाचं गिफ्ट, त्याने मार्क केलेला लेख दाखवतं. लेख खुळचट विकासवादाच्या केविलवाण्या बळींबाबत बोलतो.
      बघ्याने फावल्या वेळेत वाचून ठेवलंय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आणि सहृदय होत तो म्हणू चाहतो कि शहरीकरण आणि कामगार कायदे बदलणे ह्यांना पर्याय नाही, हिंसेने काही सुटणार नाही. बघ्या ह्यावर रेफरन्स देऊ शकतो.
      बघ्या संपूर्ण शहरी बनावटीचा आहे. त्याला शेत, सावकार, भूमिहीन शेतमजूर, प्रकल्प, विस्थापन आणि पुनर्वसन ह्या सगळ्याबाबत काय करायचं हे कधी कधी उमगत नाही, मग तो आपत्कालीन एक्झीट शोधतो, ती उघडतो तेव्हा माहितीचा लोट येतो आणि बघ्याला लांब घेऊन जातो.
      दर सकाळी बघ्या हिरीरीने बसतो त्याच्या प्रश्नांचा साकल्य आणि नाविन्य अशा तेजस्वी तरीक्याने सुलझाव करायला. मग तो लिटरेचरच्या ढोलक्याचा दोन्ही बाजूंनी आनंद घेतो, ढोलकं थांबतं तेव्हा बघ्या नव्याने दिग्मूढ होतो.       
--
      बघ्या बघतो तेव्हा त्याच्या इमारतीच्या कळपातले नव म्हातारे-म्हाताऱ्या त्यांच्या नव नातवांना शाळेत सोडतात-आणतात. येताना मुले पेप्सी मागतात, मोठी मुले डेरी मिल्क, त्याहून मोठी एक छोटा.
      म्हातारे मध्ये मध्ये कट्ट्यावर बसतात, रेल्वे, राजकारण, पेन्शन, महागाई अशी चर्चा करतात. त्यावेळी ते समोरून जाणाऱ्या भिन्नलिंगीय तरण्या प्रजातीस न्याहाळतात.
      त्यांचे नातू संध्याकाळी त्या कट्ट्यावर बसतात तेव्हा त्यांच्या वर्गातल्या मुलीला ते चिडवतात. ती सलज्ज हसते आणि जाते. त्यावेळी मुलांच्या आया, आज्या आणि उरलेले ‘होणार सून मी ह्या घरची’ बघतात. त्याचवेळी भारतात काही एक सांख्यिकी वेगाने स्त्रियांवर अत्याचार होतात.
      बघ्या आपल्या फुफ्फुसात टार भरत त्या मुलांना पुढच्या टाइममध्ये प्रोजेक्ट करतो. त्यातला एक होतो नगरसेवक, एक चाईल्ड मॉलेस्टर, एक सरकारी नोकर, एक आय टी वर्कर, एक सी.ए. आणि एक बेवडा. सलज्ज हसणारी मुलगी अमेरिकेत निघून जाते.
--
      बघ्या घाबरून आपल्या सिगारेट कडे बघतो, गांजा तर नाही ना? तेव्हा नेपाळी गुरखा त्याला सलाम करतो.
--
      दोन बीअर आणि वर एक कॅन मध्ये, सोबत काही दर्दभऱ्या गाण्यांसह बघ्या आपले चिंधी दिवस आंबवत ठेवतो. त्यावर भरघोस दिलदार टीप देऊन, साऱ्या ओरिसीअन वेटर्सचे अदबी सलाम घेत बघ्या पिवळ्या सुस्त रस्त्याला येतो.
      चायनीजवाल्याने कचरा कुंडीपाशी फेकलेल्या हाडांना कुत्री आशेने न्याहाळतात, कुत्र्यांना एकमात्र छुपा बोका मत्सरयुक्त भीतीने. पोलिसांच्या थांबलेल्या गाडीला मघाच्या गुराख्याचा चुलत भाऊ सलाम करतो आणि त्याचा मुलगा चटपटीत पणे एक आर.सी. आणि स्टार्टरचे पार्सल गाडीत आणून ठेवतो. गाडी छू.
      बघ्याचा स्मार्ट फोन म्हणतो ‘चिन्मया सकलहृदया’. बघ्याच्या आईने परवा टी.व्ही.वर ऐकलान आणि बघ्याला शोधायला लावलान.

      आणि मग आपल्या अल्कोहोलिक उमाळ्याचे आरपार अश्रू बघ्या पुसतो, तेव्हा चुलत गुरखा नेपाळी गाण्यावर मान डोलावतो, मुलगा कोंबड्यांना उचलून आत ठेवतो, एक कलकलते. 

Saturday, March 8, 2014

गांडू असण्याचे साक्षात्कार

    बघ्या ट्रेन मधून प्रवास करत होता. त्याच्या सोबत त्याची ९२ वर्षाची, न मेलेली आणि अजून हे हवं, ते हवं असं म्हणणारी, स्मरणशक्ती शाबूत असलेली आजी होती. त्याने अगोदर रिझर्व्हेशन केल्याने सुखावह वाटत बघ्या आपल्या वरच्या बर्थवर सिकुडत होता. त्याची आजी सर्वात खालच्या बर्थवर स्वेटर, कानटोपी, शाल असे थंडीचे जामनिमे चढवत होती. तेवढ्यात भांडणाचे आवाज यायला लागली.
      ट्रेनमध्ये भांडणाचे आवाज येतातच. मालकी हक्क दाखवणे आणि त्यासाठी झगडणे हे मानवाचे मूलभूत कर्तव्य आहे. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने या मूलभूत हक्काच्या बजावणीचा सुनहरा मोका येतो. त्यातून जमलेच तर थोडे शारीरिक शिक्षणाचे प्रकारही पहावयास मिळतात. बघ्या नावाला जागून, बर्थवरून उतरून भांडण बघण्यास पोचला.
      एक धष्टपुष्ट मनुष्य, त्यासोबत धष्टपुष्टता आणि जाडेपणा ह्यांच्या सीमेवरचा एक, हात फाकवून बलिष्ठ उभा असलेला एक तरुण आणि एक तरुणी हे डब्याच्या दारात बसलेल्या एका कुटुंबाला हुसकावून लावत होते. हुसकावून लावण्याचे मुद्दे म्हणजे, बिना तिकीट येणे, तेही रिझर्व्हेशन डब्यात येणे, वर तिथे अंघोळ न करता येणे आणि त्याने प्रचंड दुर्गंधी निर्माण करणे, त्यासोबत विडी-गांजा ह्यांचे सेवन आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे ह्या सर्व बाबी असताना हे कुटुंब हुसकावून लावण्याची क्षमता आणि रिझर्व्हेशन केल्याने आलेला अधिकार असलेल्या ह्या तिघांजवळ कुठेतरी आले.
      हुसकावून लावण्यात येणाऱ्या कुटुंबातील पुरुषांना काही उमगत नव्हते. त्यात एक पुरुष एक संपूर्ण आणि बाकी थोटका पाय असलेला होता. तो तर निव्वळ लोळत होता. अजून एक पोरसवदा बाई एका मुलाला पकडून बसली होती. आणि उरलेली एक बाई भांडत होती.
      त्या बाईच्या मते आम्ही तुम्हाला काही त्रास तर देत नाहीये, तुमच्या जागेवर तर येऊन बसत नाहीये. मग तुम्ही आम्हाला कशाला त्रास देताय.
      ह्यावर हुसकावून लावणारे परत वास, गांजा, बिना तिकीट,
      परत ती बाई, आम्ही त्रास तर देत नाही..
      मग हुसकावणारे, आता निघता का नाही असे निर्वाणीला येवून, त्यांच्यातला मूळ धष्टपुष्ट पुरुष त्या थोटक्या माणसाची काठी खेचू लागला. तशी भांडणारी बाई अजून हिरीरीला आली.
      तोवर बघ्या सोबत अजून काही लोक हे सारे भांडण बघत होते. बघ्या नुसते बघत नव्हता, तर तो नेहमीप्रमाणे रीकामचोट तात्विक खाजवाखाजवी करत होता, स्वतःशीच. तेवढ्यात बघणाऱ्यांमधला एक जण त्या भांडणात पडला आणि धष्टपुष्ट पुरुषाला थांबवून राहिला. ह्या नव्या कृतीचा फायदा घेऊन बघ्या पुढच्या डब्यात गेला, अजून पुढच्या डब्यात गेला आणि तिथे असलेल्या रेल्वे पोलिसाला त्याने वरील भांडणाची बघिकत सांगितली. त्यासरशी रेल्वे पोलीस, कमालीच्या कार्य तत्परतेने त्याच्या सोबत आला.
      बघ्या आणि रेल्वे पोलीस मूळ ठिकाणी पोचले तेव्हा धष्टपुष्ट आणि त्याचे साथी, भांडणारी बाई आणि मध्ये पडलेला माणूस ह्यांनी आपापली पोझिशन मेंटेन ठेवली होती. पोलीस येत क्षणी धष्टपुष्ट माणसाला आगळा हुरूप आला. त्याने लगेच आपण कोण आहोत हे दर्शवले, तसेच सोबतचे आपले साथी हेही सद्रक्षणाय काम करतात हेही स्पष्ट केले. एवढी मोरल अॅथॉरिटी पाहून रेल्वे पोलिसानेच त्या कुटुंबाला हाकलायला सुरुवात केली. भांडणाऱ्या बाईने हा बदललेला बॅलन्स पहिला, मध्ये पडलेला माणूस गप्प झाला, धष्टपुष्ट माणसाने परत काठीला हिसका द्यायला सुरुवात केली. भांडणाऱ्या बाईने त्या सगळ्यांना डोळ्यानेच उठायची खूण केली. आणि मग सावकाश आपली बोचकी, पोरे सावरीत ते कुटुंब डब्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला गेले. पोलीस धष्टपुष्ट माणसाशी बोलत तिथेच बसला, धष्टपुष्ट माणूस आणि त्याचे साथी ह्यांच्यासोबत असलेल्या बायका तमाम कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागल्या. बघणारे परतले. एव्हाना थंडीशी मुकाबला करायला जय्यत तयार आजीनेही आपला नातू कुठे गेला ह्याची चौकशी सुरू केली होती. बघ्या परतला.
      मग बघ्या नेहमीप्रमाणे पश्चात उंगली करू लागला. म्हणजे जे घडलं ते चूक का बरोबर हे त्याला उमगेना. पण आता तो ह्या रिडल्सना सरावला आहे. त्याने हे नीट ठरवलं कि जे घडलं त्यातली दांडगाई चूक होती. आणि मग एकदम आपल्या गांडू असण्याचा भपकारा त्याला आला. दांडगाई घडली आणि आपण ती पहात राहिलो. आपण एकदाही त्या धष्टपुष्ट माणसाचा हात अडवला नाही. आपण त्याला एकदाही तो जे करतोय ते चूक करतोय असं मध्ये पडून सांगितलं नाही. कारण त्याने जर आपल्याला मारलं, आपल्याला एखाद्या कायदेशीर बखेड्यात अडकवलं तर काय ह्या भीतीने. आपण उगा कनवाळू आव आणून जे घडलं ते पहात राहिलो, बाकी चुकचुकले.
      आपल्याकडे स्मार्ट फोन असायला हवा होता, मग आपण हा व्हिडियो व्हायरल केला असता असं मलम बघ्या लावू लागला. आणि मग तर्काच्या पारंब्या पकडून टारझन सारखा उड्या मारत बघ्या स्मार्ट फोन कसा घ्यावा ह्याचाच विचार करू लागला. तोपर्यंत धष्टपुष्ट आणि त्याचे साथी चादरी ओढून झोपले, त्याची आजी शालीत गुरफटली. बघ्या परत उतरून डब्याच्या दुसऱ्या टोकाला गेला तोपर्यंत ते कुटुंबही निवांत पथाऱ्या पसरून झोपलेलं. बघ्या बर्थवर आला, आपले सामानसुमान चाचपून राहिला आणि मग निवांत स्वतःला तात्विक उंगली करू लागला.
      पहिले बघ्याने आपले संवेदनशिलतेचे साधा लूक दिलेले महागडे कपडे उतरवले, त्यासरशी गांडू असण्याचा बोचरा वारा त्याला झोंबायला लागला. त्याला इथे संवेदनशील कपड्यांचा खरा फायदा जाणवला. त्याने ते कपडे उलटे-पालटे करून पहिले. कुठे सामजिक जाणिवेचे अस्तर लावलेले, कुठे वैयक्तिक संघर्षाची टीप मारलेली, मूळ कपडा फुकट्या रिकाम्या वेळेचा, त्याला जमेल तसा लिबरल, ह्युमॅनिटेरियन रंग मारलेला, वर एक जाकीट, विदेशी पुस्तकांच्या वाचनाचं.
      आता दात वाजतील एवढा गांडू असण्याचा वारा झोंबून राहिला. आपल्या इंटेलेक्चुअल चड्डीला घट्ट पकडून बघ्याने एखाद्या गर्भावस्थेत असलेल्या अर्भकासारखी पोझिशन केली.
      तेवढ्यात कुठूनतरी आशावादाची उबदार शाल त्याच्यावर उडत उडत येवून पडली, आणि केव्हातरी आपण असे गांडू राहणार नाही अशी फिकट स्वप्ने पहात बघ्या झोपी गेला.
---
      बघ्या आपल्या वेळ घालवणे ह्या मूलभूत कामांत गर्क होता, म्हणजे तेव्हा तो त्याला आवडलेला एक चित्रपट परत दुसऱ्यांदा बघत होता. तो बघून झाल्यावर बाहेर पडताना त्याच्यासोबत साक्षात्कार घडला.
      एक सहा-सात वर्षाचा मुलगा बाबाला म्हटला कि बाबा, पिक्चर मध्ये मजा येईल म्हटलेला तू, कुठे आली मजा. मुलाची आई आपल्या आपल्यात हसली. आपल्या सोबत असलेल्याला दिग्दर्शकाने जन गण मन चा सीन कसा परफेक्ट घेतला आहे असं समजावणारा बाबा उगा पाडून हसला. बघ्याने पार्किंगमधून आपली बाईक काढली आणि तो झोपायच्या जागी पोचला.
      आता जसं बहुतेकांचं आहे तसं बघ्या जिथे झोपतो तिथे त्याचे आई-बापही झोपतात. बघ्या तिथे खानावळीसारखं जेवतो, जमेल तिथे परतफेड करतो, आणि बहुतेकदा आपल्या तद्दन तात्विक चोदू विवंचना लपवत राहतो.
      तो जेवताना आई त्याला पिक्चर बद्दल विचारते. बघ्या सांगतो तेव्हा आई म्हणते, आमच्या गावातही असायचे ते लोक आणि काय वास यायचा त्यांना, जाम दूर पळायचो आम्ही.
      मघाच्या साक्षात्काराची किक उतरावी एवढा डोस बघ्याला होतो. तो परत सरावी बनेल रीस्पोंस देतो आणि फुफ्फुसात टार भरण्यास निघतो.
      बघ्या पाहतो तो त्याला अनेक चेहरे खिडकीत उभे दिसतात. त्यातल्या एका चेहऱ्याजवळ तो जातो. तेव्हा तो चेहरा त्याला म्हणतो कि मला पण असं नव्हतं रे व्हायचं, पण काय करू, आई-बाबांना आवडलं नसतं, दुसरा चेहरा म्हणतो त्यांची जबाबदारी होती माझ्यावर, तिसरा म्हणतो, संस्कृती आहे आपली, चौथा म्हणतो, शेवटी त्यांना कोण आहे आपल्याशिवाय. पाचवा चेहरा तर त्या मागच्या मजा न आलेल्या मुलाच्या बापाचा असतो. एक एक करून चेहरे मागे जातात, मुखवटे होतात, आणि सिरीयल बघू लागतात, सजातीय, सक्लासीय, सनोकरीय विवाहांच्या वेबसाईट बघू लागतात, फेसबुक करू लागतात, आणि काही सेक्स वगैरे करून झोपी जातात. बघ्याही परत येतो आणि घालून ठेवलेल्या अंथरुणात पडतो. परत तात्विक उंगली जागी होते. बघ्याला झोपू देत नाही. बघ्या ‘द डॉक्टर अँड द सेंट’ वाचू लागतो. ऐतिहासिक संदर्भांच्या खुंटीवर कधीच्या टांगून ठेवलेल्या सोशल रिव्होल्युशनच्या तुतारीकडे पहात बघ्याला निखळ वैयक्तिक झोप लागते.
----
      बघ्या एका मित्राकडे आहे. मित्र ‘सत्यमेव जयते’ बघतो आहे. बघ्याला अमीर खान बघवत नाही. बघ्याला ‘रंग दे बसंती’ मधला डीज्जे जाम आवडतो, गेट के इस पार आणि उस पार मध्ये पूर्ण बदलून जाणारा डीज्जे.
      एक वकील म्हणते, कि आठवीची परीक्षेला गैरहजर राहिलो तर परत देऊ देत नाहीत, मग न्याय नावाच्या गोष्टीच्या बाबतीत घरी सत्यनारायण आहे, कुत्रा आजारी आहे असं सांगून वकील टाळाटाळ करू शकतात हे कसं. ती म्हणते कि ह्या दिरंगाईमुळे न्याय व्यवस्थेचा दरवाजा ठोकणाऱ्या महिलांत एक आग धगधगते आहे. कि ह्या न्यायावर विसम्बण्यापेक्षा आपणच काहीतरी करून टाकावे. त्या वकील बाईच्या शांतपणे सांगितलेल्या शब्दांनी बघ्याचा तात्विक निष्क्रिय बेस डूचमळतो. परत अमीर खान चे जाणीवपूर्वक उच्छ्वास आणि हरकती चालू झाल्यावर तो त्या डूचमळल्या बेसकडे बघतो.
      बघ्याच एक मित्र मागे म्हटला होता कि बलात्काराच्या केसमध्ये आरोपीला कठोर, झटपट शिक्षा व्हावी असं मागणारे लोक आदिवासींच्यासाठी अशीच न्यायालये चालवणाऱ्या नक्षलवाद्यांना का पाठींबा देत नाहीत. अर्थात त्याच्या ह्या फेसबुक स्टेटसवर बरीच धूळ, बरीच गरमी आणि किंचितसा प्रकाश निर्माण करणारी चर्चा झाली.
      एक बाई सांगते कि तेरा वर्षे झाली घटनेला, पण आरोपी फरार म्हणून न्याय नाही.
      एक बाई सांगते, कि दरवेळी विचारतात, घटनेचे तपशील, सविस्तर वर्णन कर
      वकील बाई म्हणते कि कुठल्याही सभ्य समाजात अशी अपेक्षा असेल कि ज्या महिलेबरोबर असं काही घडलं ती ते विसरेल, परत मोकळी जगू लागेल. पण इथे आपण तिला सांगतो कि लक्षात ठेव बाई, मुली, तुला हे वारंवार बोलायचं आहे, तेव्हा एक क तपशील लक्षात ठेव. हा ह्या बायकांचा प्रश्न नाही, पण कोणत्या प्रकारचा समाज आहोत त्याचा प्रश्न आहे.
      तेव्हा बघ्याच मित्र व्हॉटसॅप करत असतो, तिथे तो एका स्त्रीच्या पार्श्वभागाचा बहुचर्चित फोटो पहात असतो, त्याखाली कमेंटची रीघ असते. मग मित्र परत सत्यमेव जयते’ पाहू लागतो.
      पुढे अजूनही पुस्तके, सिनेमे, चर्चा आणि शब्द ह्यांनी धक्का बसण्याचे पंगुत्व राहिलेल्या किंवा तसे दाखवू इच्छिणाऱ्या लोकांसोबत बघ्या चर्चा करू लागतो.
      एक म्हणतो, आपण कुठल्याही मुलीबद्दल काही गैर बोलणंच थांबवलं पाहिजे, त्यातूनच पुढे चुकीचे पर्स्पेक्टीव्ह निर्माण होतात.
      दुसरा म्हणतो, पण आधी आपण असे का बोलायला लागतो, तर आपल्याला कोणी का कोणी पॉर्न दाखवतो.
      तिसरा म्हणतो, कि ज्याच्या त्याच्यात नंतर शहाणपणा येतोच कसं बघावं बाईकडे, आणि मुख्य म्हणजे कसं वागावं. त्या मर्यादांच्या बाहेर येणारा पशूच. त्याला मारलाच पाहिजे. दोन महिन्यांची मुलगी आणि ९४ वर्षाची बाई ह्यांबाबत असं वाटूच कसं शकतं.
      परत पहिला म्हणतो, कि चोरी आणि बलात्कार ह्यात हिसकावून घेणं हेच आहे. त्यामुळे त्या स्त्रीची अवहेलना करणं चुकीचं आहे. ते थांबायला हवं. सेक्शुअल लिबरेशन यायला हवं.
      दुसरा म्हणतो, आपल्यात कोणाच्या बहिणीबरोबर काही झालंय, किंवा आपण असं करणाऱ्या कोणाला ओळखतो का, तसे बाकीचे थोडे कमी-जास्त माना हलवतात.
      तिसरा म्हणतो, माझी बायको बाईक चालवते तिच्या एन. जी. ओ चं काम करताना, तिचा फोन नाही लागला संध्याकाळी    कि आपली फाटते. मग मी फोन करायलाच जात नाही तिला.
      पहिला म्हणतो, म्हणून का लोक सतत एवढे एकमेकांना फोन करत असतात.
      बघ्या एकदम म्हणतो कि डोळ्यास डोळा हाच न्याय, त्याने सारं जग काही आंधळं होणार नाही, उलटे बरेच फुटणारे डोळे वाचतील. बघ्याच्या डोळ्यांना काय बोटालाही कोणी कधी धक्का लावलेला नाही, त्याच्या परीचयातही नाही.
      बघ्याला शाळेत असताना एका मित्राने गर्दीचा फायदा घेऊन काय काय करता येतं हे दाखवलं होतं, आणि मग त्याचा एकपात्री प्रयोगपण.
      बघ्याच्या मैत्रिणीने त्याला एकदा बोलावलेलं रेल्वे स्टेशनला तिच्यासोबत सहप्रवाश्याने केलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत. तेव्हा तो माणूस म्हटलेला हवं तर कानाखाली वाजवा पण पोलिसांत नका जाऊ. पुढे त्या माणसाची आई आणि बहीणही असं म्हटल्या. मग मैत्रीण म्हटली, जाऊ दे, माफी मागतोय ना. नंतर टी.सी. म्हटला कि तुमची मैत्रीण नसेल, पण काही मुलीच उठवळ असतात. आम्ही बघतो ना एक एक प्रकार.
      बघ्याने काहीही प्रकार बघितलेले नाहीत. बघ्याने त्या माणसाला, त्या टी.सी. ला कानाखाली तरी मारायला हवी होती असं म्हणतो एक जण.
      बघ्याला वाटतं उगीच बोललो, मग बाकीच्यांनाही वाटतं. ते सर्व मिळून आपण गांडू आहोत ह्यावर मुंडी हलवतात.
-----
      अरे ला कारे म्हणायचं, का ‘काय झालं भाऊ’ म्हणायचं का काहीही न म्हणायचं...
      आपल्यासोबत झालं तरच म्हणायचं, का कोणाच्याही सोबत झालं तरी म्हणायचं...
      सूडाचे समाधान हे जेन्युईन समाधान आहे का सर्वात निष्क्रिय समाधान...
      सूड आपापला घ्यावा का एकमेकांसाठीही घ्यावा..
बघ्या आपल्याशी काहीतरी घडण्याची आणि मग त्याला प्रतिसाद देण्याची निखारी उमेद बाळगून आहे. त्याला आपल्या भवतालाच्या बाहेरच्या जगाची केवळ गंमत वाटते, त्याच्याशी जिवंत घेणं-देणं वाटत नाही.
      बघ्याने व्यवस्थेशी पंगा घेतला नाही. तिच्या दुर्लक्षित आचळांना चुपत बघ्या तगून आहे. पोट भरतं तेव्हा बघ्या गम्मत बघतो.
      केव्हातरी व्यवस्थेची दुभती गाय गोचिडीसारखी बघ्याला झटकून देईल. तेव्हा बघ्याची गंमत होईल.
      तोवर बघ्या आपल्या गांडू असण्याचे प्रत्यय घेत राहील आणि हे केव्हातरी बदलेल अश्या उबदार धाबळीत हात-पाय दुमडून झोपेल.           

Friday, February 28, 2014

शिळी कढी आणि रिकामचोट टाहो

      टाहो फोडणं हा आपला आवडीचा उद्योग आहे, किंबहुना जन्मजात जोपासलेली सवय. आणि एकाने फोडला की त्याला जोड देणारे टाहो किंवा त्याचा कसा फोल असा टाहो फोडणं हा पण. आणि असे टाहो फोडून जीव सुकला की त्याला अभिमान किंवा तत्सम थोर गोष्टींची कलमे लावणे. तर अशा आपल्या रुढीला अनुसरून आपण आज मराठी भाषेविषयी टाहो फोडूया आणि सरतेशेवटी अभिमान वगैरे व्यक्त करून आपापल्या वाटेला लागुया.
       तर काल रात्री मराठी भाषा माझ्या स्वप्नात आली. मी उशाशी किंडल ठेवून झोपतो. आणि त्यात एक इंग्लिश पुस्तक वाचत झोपलो होतो. तिने आधी मला थोबाडीत मारली आणि मग तिने टाहो फोडला. सकाळी उठून पाहतो तर ह्या दृष्टान्ताशी जुळणारे काही पेपरात, फेसबूकात.  
       मग तर मी अख्खा थरकापलो. म्हणजे एवढं आध्यात्मिक वगैरे पोटेन्शिअल असलेली भाषा आणि ती अशी दुःखी. अरं, रं, रं. आणि का तर म्हणे ती मृतप्राय होत आहे, इंग्लिश का इंग्रजी का आंग्ल भाषा तिच्यावर चहू बाजूने आक्रमण करून राहिली. लहान-लहान मुले इंग्रजी माध्यमात जाऊन राहिली. आणि ही लहान मुले पुढे मराठी कशी बोलतील ह्या विवंचनेने ही भाषा आज मरू लागली. टाहो, टाहो, थोर टाहो.
       छोट्या छोट्या शहरात इंग्लिश स्पिकिंग येऊन राहिलं. बीजगणित-भूमिती जाऊन अल्जिब्रा- जॉमेट्री आलं. आता कसं ह्या भाषेत संशोधन होणार? अमृताशी पैजा घेणारी ही भाषा, आता सोलकढी आणि मसाला ताकावर तरी पैजा घेईल का? टाहो, टाहो.
       एवढे सगळे टाहो अंगावर घेऊन मी बेभान इतस्ततः पळू लागलो. आणि रस्त्यावर आलो. तिथे रिक्षावाले हिंदी बोलून राहिले, भाजीवाले हिंदी बोलून राहिले, ऑफिसात इंग्रजी. मराठी कुठे, मराठी कुठे?
       मराठी दुबईत, मराठी कॅलिफोर्नियामध्ये, मराठी विले-पार्ले मध्ये, मराठी सदाशिव पेठेत. अशी कशी आकुंचन पावली ही बहुप्रसवा, प्रसरणशील भाषा. अशी कशी लोपू लागली ही संस्कृतोद्भव आणि प्राकृतोत्सव प्राचीन भाषा?
       आता तर माझी पुरती सटकली आणि मी नंगा होऊन सरकार समोर उभा राहिलो. अरे भिकारड्या, का तू अशी तुझ्या आईची दैना करतो असा आक्रस्ताळा आक्रोश करू लागलो. सरकार शरमिंदे होऊ लागले, त्याचा जीव कासावीस झाला, अरे इथे पाणी पुरेना, वीज टिकेना, शेती होईना, उद्योग चालेना, आणि हे तू कुठे नवे गाऱ्हाणे आणतो राजा.
       कुठे जायचं आता? मायबाप सरकारने असे बोलून लाथ मारली. आता कुठे, आता कुठे?
       तेवढयात कोणीतरी माझ्या अंगावर घोंगडी टाकली आणि मला बलदंड उचलून, माझा श्वास कोंडेस्तोवर उचलून एक कोपऱ्यात आणून टाकले. मी बेशुद्ध होतात्से शेवटचा चेहरा पाहिला तर तो मराठी चित्रपट निर्माता वाटू लागला. बेहोश.
---
       माझी बायको मला गदागदा हलवून उठवत होती. तिचा भयचकित चेहरा पाहिला आणि मग आजूबाजूला पाहिलं तर मी रातोरात टेबलावर येऊन हे सगळं वरचं खरडून ठेवलेलं. तिने पाणी आणलं. मला शब्द फुटेना, माझी मराठी भाषा माझ्या तोंडातून वदली जाईना. बायकोने लिहिलेलं सगळं वाचलं आणि फाडून फेकून दिलं. मग म्हणाली, दूध आण, कॉफी करू.
--
       कॉफी प्यायली, नाश्ता केला आणि भाषेच्या सखोल विवंचनेत बाहेर पडलो. मध्ये एक मित्र भेटला, फिजिक्स पी एच. डी. ,आत्ताच लघुरुद्र आटपून आलो घरी, चल चहा घेऊ.
       मी त्याला माझे स्वप्न सांगितले, तर म्हटला अरे मलाही काल असेच स्वप्न पडले. पण त्यात मराठी भाषा येऊन म्हटली की उद्या तुला तुझा रड्या मित्र भेटेल, लक्ष देऊ नको, त्यापेक्षा मॉलमध्ये जा, मराठी पिक्चर बघ.
       टू मच. थट्टा करू नकोस.
       चल मी निघतो. शो आहे ११.३० चा.
--
       मी दिग्मूढ तिथेच थांबलो. तो अजून एक मित्र आला. हा मराठी सिरीयलची कामं करतो. तो म्हणाला दोन नव्या असाइनमेन्ट आहेत, बीटा मराठी नावाचा चॅनेल येतोय, आणि ते दोन नव्या अतिमालिका आणतायेत. अतिमालिका, काय हे? हो अरे, दर अर्ध्या तासाने भाग. आणि मधल्या अर्ध्या तासात? म्हणून तर दोन आहेत ना अतिमालिका, च्युत्या आहे रे तू, म्हणून तो परत हसला.
----
         नाही, नाही, असं भरसट उपयोगाचं नाही. थोडं चिंतनपर झालं पाहिजे. उत्तरे नसलेले खोल प्रश्न खेळवले पाहिजेत.
       सरकार मराठी भाषेसाठी काय करतं किंवा करत नाही? त्या खालचा प्रश्न, सरकारने भाषेसाठी वगैरे काही करायचं असतं का?
       हे सगळं कोण म्हणत असतं? ह्या विवंचना कोणाच्या? ते जे कोण लिहिणारे असतात ते किंवा रिकामचोट पेन्शनर. कदाचित ते लिहून फार श्रीमंत होत नाहीत ह्याची खुजली ते भाषेसाठी रडं मांडून करत असावेत. खवचट झालं थोडं, नव्हे पूर्णच. पण ह्यातले बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांत किंवा सरकारी पैशाने चालणाऱ्या उपजीविकेत का असतात? जसा मी. गर्दुले, हॉटेल चालवणारे, पार्टटाईम नोकऱ्या करून लिहिणारे, गुंडाई करणारे मराठीत पुस्तकं छापत असतील ती कुठे मिळतात?
       भाषा आणि साहित्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध? भाषा आणि लिपी ह्यांचा? भाषा आणि एक्स्प्रेशन्स ह्यांचा? माणसांनी एकमेकांशी बोलणं, सांगणं, भौतिक आणि मानसिक समाधान मिळवणं ह्यापलीकडे भाषेचं पर्पज काय? आणि मग ह्या समाधानाची साधने कमी-जास्त प्रमाणात कालबाह्य होतात, जसे हातपंखे, मेणबत्या, बोरूची लेखणी, भूर्जपत्रे, दगडी हत्यारे, मण्यांची पाटी, चाळी, वाडे तर भाषा का नाही? भाषेला आयडेन्टिटी म्हणून बघणं आणि त्याचवेळी अशा आयडेंटिटीच्या, म्हणजे जात, धर्म, देश अशा प्रकारांकडे साहित्यातून नकारात्मक बघणं हा दुटप्पीपणा नाही का? एकीकडे लिहिण्याला कमोडिटीजचे नियम लावायला धडपड करायची, त्याचं मार्केट हवं असं म्हणायचं आणि त्याचवेळी सरकारने ह्या कमोडीटीच्या उत्पादकांना गोंजारत राहावं असं गाऱ्हाणं करायचं, पण असं मागू किंवा करू पाहणाऱ्या बाकी जगाकडे कुत्सित तात्विक हिनतेचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नजरिया ठेवायचा हा दुटप्पीपणा नाही का? का हे स्वातंत्र्य? मग भाषेला मारायचं किंवा हवं तसं तिचा वापर करायचं किंवा न करायचं हजारो-लाखो लोकांचं स्वातंत्र्य आहे ते?
       मला दिसतं की माझ्या लेखी शब्द, भाषेचे नियम हे केवळ माध्यम आणि साधन आहे, मला जे सांगायचं आहे त्या एंडसाठी. त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर आणि मला सांगून काय करायचं आहे त्याच्यावर माझं माध्यम आणि साधन ह्यांचा वापर अवलंबून राहील. माध्यम-साधन जपावं असा भावनिक च्युत्यापा हा सगळ्यांनी करावा ह्या टाहो फोडण्याला काय म्हणणार? का दुर्लक्ष करणार?
--
       मला स्वतःला इंग्लिश आणि मराठी ही इनकॉम्पॅटिबल निवड वाटते, म्हणजे मला एक्सप्रेस करण्याच्या दृष्टीने. मी जेव्हा सतत मराठीत लिहितो, तेव्हा स्वाभाविक माझ्या डोक्यातला त्याबद्दलचा विचार, त्यातल्या प्रतिमांमध्ये वापरली जाणारी भाषा ही मराठीच राहते. पण गणित, इकोनॉमिक्स ह्या विषयांच्या बाबतीत माझे विचारच मुळात इंग्लिशमध्ये होतात, ते मराठीतून मी करूच शकत नाही, जरी शाळेत मी हे विषय मुळात मराठीत शिकलो आहे. मुद्दा असा आहे की आपले मेंटल रीसोर्स मर्यादित आहेत, आणि मग ते कुठे द्यावेत ह्याची निवड आपण केली पाहिजे. आणि जर ते आपण कमी भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकू इच्छित असू, तर त्यासाठी लागणारी तयारी ही डिसिजन घेणाऱ्या माणसांत हवी. आणि ज्यांत ती नसेल, ते आपले रीसोर्स स्वाभाविकपणे अधिक भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकणार, ही एक रॅशनल निवड आहे. हे सगळं रीझनिंग अर्धवट झालं आहे, पण मला कोणी विचारलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू मुलाला का मराठी तर मी इंग्रजी सांगेन.
       मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असलेले विद्यार्थी मराठी उरत नाहीत हा हायपोथिसिसच एक जोक आहे. आई-वडील घरात काय करतात, बोलतात, वाचतात ह्यावरून मुलाच्या भाषिक आवडी-निवडी ठरतात असं मला वाटतं. शाळेची निवड ही भाषा, आत्म्याचा विकास, मूल्यशिक्षण, संस्कृती अशा जड ओझ्यांनी न करता उपजीविकेचे उत्तम प्रशिक्षण एवढ्या एकाच उद्देशाने करावी, उपजीविका उत्तम असली की बाकी साऱ्या दगडांना शेंदूर लावता येतो, नुसते दगड कोणालाच पावत नाहीत.
       मराठीचा टाहो फोडताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर शरसंधान करणारे लोक काही दिवसांनी ‘भाषिक लव्ह जिहाद’ बद्दलही बोलतील. मग, तेही आपण दुर्लक्षून घेऊ.
--
       मराठीत सारस्वत किंवा साहित्यिक वर्तुळात (खाजखुजली वर्तुळ म्हणावं असं मला वाटतंय, पण त्यात माझा केवळ द्वेषाचा भाग असेल) नामवंत होऊ घातलेल्या एका माणसाशी बोलताना त्याने अशी सांख्यिक तुलना केली की मराठी भाषिक अमुक एक करोड आहेत, त्यात वाचनालयांचे सभासद किती, त्यातून एका पुस्तकाच्या किती प्रति विकल्या जाऊ शकतात असा सगळा अंदाज बांधला होता. हा प्रश्न माझ्या डोक्यात राहिला, की करोडो लोक कशी-बशी किंवा चांगली जी भाषा बोलतात त्यात वाचणारे किती, कोण.
       एका राष्ट्रीय इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना, सायन्स, एम,बी,ए. नाही, तर इकोनॉमिक्स, मी एकटाच होतो जो १०वी पर्यंत पूर्णपणे प्रादेशिक माध्यमात शिकला आहे (व्हर्नाक्युलर). मला माझ्या इंग्रजीवर पूर्ण कमांड नसल्याचा त्रास दोनदा झाला, एकदा आय.आय.एम. चे जी.डी. देताना (आता ते बंद झालेत L) आणि नंतर अॅनॅलिटिक्स मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे इंटरव्ह्यू देताना जेव्हा थोडे सेल्फ एक्स्प्रेशन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. माझ्याकडे शब्द असले तरी उच्चार आणि युसेज ह्या दोन गोष्टीत इंग्रजीमध्ये मी कच्चा आहे. आणि मला वाटतं ह्याचं कारण माझी निवड आहे. मी इंग्रजीवर फोकस करेन, तर मी मराठीवरची ग्रीप सोडेन आणि जर मला मराठीत लवचिकपणे, हवं तसं लिहायचं आहे तर आपोआप माझा फोकस इंग्रजी वरून हटेल. मला दुसरी भाषा कळणार नाही असं नाही, पण माझी एक्स्प्रेशनची भाषा एकावेळी एकच राहू शकते, जरी चालून जाण्याइतपत कोणी कितीही भाषा बोलू शकेल. कदाचित ही माझी लिमिटेशन आहे. पण मला कायम हा कमांडचा इश्यू जाणवला आहे. माझे काही बंगाली मित्र आहेत, ते बंगाली व्यवस्थित बोलतात, पण त्यांची बेस्ट एक्स्प्रेशन्स ते इंग्लिश मध्येच देऊ शकतात. कदाचित त्यांचा नजरिया डेव्हलप होण्यात मुख्य आधार इंग्लिश पुस्तके, सिनेमे, वृत्तपत्रे, शिक्षक हा असेल, म्हणून असं असेल. अमर्त्य सेन ह्यांचं संशोधन ते बंगाली किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये करू शकले असते असं मला वाटत नाही. कदाचित हे सगळं एकदम वैयक्तिक आणि चूकच असेल. पण मला भाषा हा प्रकार सिरीयसली महत्वाचा वाटतो, एस्पेशली त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी स्वतःची एक्स्प्रेशन्स, वैचारिक-भावनिक हा जगण्याचा आणि उपजीविकेचाही मुख्य आधार आहे.
       परत त्या वरच्या साहित्यिक प्रश्नाकडे. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मला जाणवलं की सारेच उच्चडिग्रीत प्रोफेसर्स हे काही चांगले रीडर्स नाहीत. काहीजण काहीच वाचत नाहीत, काहीजण प्रसिद्ध आणि रंजक लिखाण वाचतात, काहीजण काहीही वाचतात, तर काहीजण सिरीयस, निवडीने वाचणारे आहेत. विद्यार्थ्यामध्येही असंच डिस्ट्रिब्यूशन आहे.
       पण भाषेच्या बाबतीत डिस्ट्रिब्यूशन वेगळं आहे. जे यशस्वी, क्वांटीटी आणि क्वालिटी दोन्हीपैकी कोणत्याही एका निकषावर, आहेत त्यांची भाषेवर कमांड आहे. ते त्यांना हवं ते एकदम नीट सांगू शकतात. कदाचित हा सोशल सायन्स रिसर्च आणि टिचिंगचा एक भाग असेल, पण भाषा इथे एक मुख्य घटक आहे, जरी प्रोग्रामिंग हा वेगाने मुख्य घटक बनत असला तरी.
       मुद्दा असा की वाचन, वाचनाचे प्रकार आणि भाषेची कमांड आणि तिचा वापर हे फार काही निगडीत घटक नाहीत. वाचल्याचे भौतिक फायदे किंवा भाषेवर ग्रीप यायला होणारे फायदेही फार सिद्ध करता येण्याजोगे नाहीत. भाषा ही मूलतः विचारांशी निगडीत आहे, आणि जो नीट विचार करू शकेल तो आपोआपच नीट बोलू शकेल, तो वाचक वगैरे असणं अजिबात जरुरीचं नाही. अगदी लंगोटाला हात घालून म्हणायचं झालं तर मृत्युंजय वाचणारा, कोसला वाचणारा आणि केवळ व्हॉटस् अॅप करणारा ह्यातल्या कोणाची मराठी भाषा (व्यक्त होणं ह्या निकषावर) चांगली असेल हे काही सांगता येणार नाही.
       वाचणारे मनोरंजनासाठी, आपला तळीराम शांत करायला वाचतात, लिहिणारे त्यासाठीच लिहितात. बाकी सारी नंतर लावलेली भरजरी ठिगळं.
       पण ह्या मनोरंजनात बौद्धिक रीसोर्स गुंतवावे लागतात, थोडा फोकस लागतो, आणि बौद्धिक स्वरुपाची किक यावी लागते. माझ्या मते हे सर्वांना नसतं, जसं प्रत्येकाला फुटबॉल एन्जॉय करता येणार नाही, कबड्डी, गोल्फ, क्रिकेटही नाही, तसं.
       प्रत्येक लोकसंख्येत एका ठराविक प्रमाणात हे बौद्धिक मनोरंजन करून घेऊन शकणारे लोक असणार. मराठी भाषिक लोकसंख्येतही असणार. मग जर मराठी भाषिक करोडो आहेत, तर हा गटही मोठा असेल ना. असेल, नक्कीच.
       पण त्याच्या रिडरशिप बनण्याच्या वयात तो अशा ठिकाणी असतो जिथे त्याच्या वेळेवर प्रचंड ताण आहे, म्हणजे इंजिनिरिंग किंवा मेडिकल किंवा सी.ए. किंवा आर्किटेक्ट किंवा भरपेट पगार देणारी लाईन. तो आर्ट्स करायचे चान्स कमी. मी इथे स्पष्टपणे हा असं म्हणतो आहे की शाळेतील टक्केवारी ही एक वर्गवारीची  योग्य सिस्टीम आहे. त्यातून बौद्धिक रीसोर्स कसे वाटले गेले आहेत हे काही ना काही प्रमाणात दिसतंच. त्याचे अपवाद सिद्ध होऊ शकतात, पण ह्या ट्रेण्डला तोडणारा ट्रेण्ड सिद्ध होणार नाही. त्यामुळे ह्या टक्केवारीवर पुढे त्यांचे होणारे वर्गीकरण हे वाचनाच्या प्रमाणवर प्रचंड प्रभाव पाडते.
       माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मला प्रचंड मोकळा वेळ असे,पण तेच जर मी इंजिनीअर वा डॉक्टर होत असतो तर हा वेळ मला मिळाला नसता. माझं वाचन डेव्हलप करणं मला कठीण झालं असतं. त्याचवेळी माझ्या सोबतचे बहुतेकजण एवढं काही वाचत नसत. लायब्ररी तर होती, त्यांना वाचायचं नव्हतं.
       थोडक्यात वाचन हे सवय म्हणून डेव्हलप व्हायची क्षमता असलेले शिकायच्या वयात लोक अशा ठिकाणी जातात जिथे ही सवय डेव्हलप व्हायची मुभा कठीण असते. त्यामुळे एकदम गरम डेडीकेटेड गटच वाचतो, बाकी नाही.
       आणि त्यातही जे वाचू लागतात, त्यांना इंग्रजी नावाचा अफाट प्रकार खुला होतो.
       इथे एक फरक मला जाणवतो. गुजराथी पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं आणि जर्मन पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं ह्यात फरक आहे. गुजराती पुस्तक, जे गुजराती भूगोलाशी निगडीत आहे असं धरून चालू, त्या भूगोलाशी माझी स्वाभाविक जुळवणी होऊ शकते. पण तसं जर्मन पुस्तकाशी होणार नाही. पण तेच जर्मन पुस्तक इंग्रजीत वाचतांना हे अंतर बरंच घटतं. सगळ्या भाषा काही एकमेकांना जुळत नाहीत, सांबार इडलीबरोबर जुळतं आणि बिर्याणीबरोबर नाही तसं, ह्यात सवय किती आणि तथ्य किती!
       पण इंग्रजीमध्ये जी एन्टरटेनमेन्ट आहे ती मराठीत नाही, भाषांतराने आली तरी मग ती तोकडी उरणारच. आणि सिरीयस रीडिंग ग्रुप हा एन्टरटेनमेन्टशी जुळून येतो. इथे एन्टरटेनमेन्ट म्हणजे गॅंगस् ऑफ वासेपूर किंवा कहानी, बोलबच्चन नव्हे. म्हणजे आता मी हा जो एवढा बौद्धिक गांजा मारून राहिलो आहे त्यानुसार जेव्हा मराठी लिखाणाच्या एन्टरटेनमेन्टची कुवत आणि निर्मिती वाढेल तेव्हा त्याचा सिरीयस वाचक वर्गपण.    
---
       एवढी झोकली. आता गरगरू लागलं.
       ही एवढी इंग्रजीची सावली पडली, त्यांत उपजीविकेचा खंदा दणकट कुत्रा अंगावर सोडलेला, आणि मराठीचं मांजर असं म्यांव म्यांव करत सरकारी दूध शोधत हिंडतय, माझ्या पायाशी येतंय, मी उगाच कसनुसा होतोय आणि मग सगळे न बोलून शहाणे मजकडे  बघून किंवा न बघून म्हणतात, नया है वह.

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...