Showing posts with label वेडसर. Show all posts
Showing posts with label वेडसर. Show all posts

Saturday, May 1, 2021

The Disciple नंतर

‘प्रेस्टीज’ च्या सुरुवातीला आपल्याला कळतं कि कोणत्याही जादूच्या प्रयोगाचे तीन भाग असतात, the pledge, the turn and the prestige. एक दाखवलं जातं, मग त्याला अनपेक्षित कलाटणी मिळते आणि मग अपेक्षित आणि अनपेक्षित जुळून येतं. ‘The Disciple’ हा तसा प्रयोग आहे, फक्त जादूचा नाही, तर माणसाने आपली औकात समजून घेण्याच्या चिरंतन प्रश्नाचा. त्यासोबत ‘कला नावाचा प्रकार आणि मार्केटशाहीच्या युगात त्याची peer reviewed system पासून मतदान/लाईक्स सिस्टीम पर्यंत होणारी वाटचाल ह्यावर चित्रपट बकुबी भाष्य करतो. हे भाष्य subtle आहे, आणि त्यामुळे प्रभावी आहे. पण ह्या subtle approach मुळे हा चित्रपट एका मर्यादित वर्तुळाचा असणार आहे. Netflix वर रिलीज करून त्यांनी ह्या दृष्टीने अचूक काम केलेलं आहे.   

चित्रपटात जोशी नावाच्या माणसाचे काही मिनिटाचे संवाद आहेत तो चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही हे ‘सांगणं हे मला गरज आहे हे सांगणंच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे. राजकीय नेते जेव्हा होणार नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ शक्यता आहे असा असतो, शक्य आहे म्हणजे करायला सुरुवात केली आहे असा असतो आणि जे करणार आहेत ते सांगतंच नाहीत, कारण अनपेक्षित असणं हेच प्रतिस्पर्ध्याला चकवायला महत्वाचं असतं तसं ‘मला नकोय अमुक अमुक हे सांगण्यात मला हवंय हाच सिग्नल असतो. ज्याला अशी गरज नाही तो सांगायला म्हणून तरी कोणाला का शोधेल? कलाकाराची आत्ममग्नता हा त्याच्या परफॉर्मन्सचाच भाग असतो आणि तो परफॉर्मन्स हा दुसऱ्या कोणासाठीच असतो. कलेच्या व्याख्येतच ती निर्माण करणारा आणि तिचा आनंद घेणारा अशी दोन टोके आहेत.

पण ह्यातल्या एका टोकाला वाटतं कि ते स्वायत्त आहे. त्यांचा असा गंड सांभाळणारे लोकही असतात, जे खरं दुसरं टोक असतात, पण ते स्वतःला अदृश्य करतात. त्यांना पहिल्या टोकाकडून मिळणारं मनोरंजन पुरेसं असतं.

संगीताच्या बाबतीत सोशल मिडियामुळे कोण कलाकार ह्याची व्याख्याच बदलली आहे. आधी तुम्ही पुरेसे कलाकार आहात का नाही ह्यावर तुमच्या जेष्ठ peers चा बराच प्रभाव होता. मुळात शिष्याचे कौशल्य आणि कारागिरी ही शिक्षकांच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून होती. आणि त्यांच्या हाती असलेल्या ह्या पॉवरमुळे ह्या जेष्ठांचा आदर ही आवश्यक नीती होती. तुम्हाला सुरुवातीला मिळणारा रिलीज हा ह्या रेफेरीजच्या तुमच्या बद्दलच्या मतांवर, feedback वर अवलंबून होता. तुम्ही कलाकार आहात का नाही हे तेच ठरवणार होते. दुसरा पर्याय काय होता? लोकांनी वाहवा दिली असती, पण उपजीविका?

आज तर मी ‘कलाकार आहे का नाही हा स्वतःच ठरवायचा मामला आहे. मला वाटत असेल मी अमुक अमुक करू शकतो तर मी तो आहे असं आपण म्हणतोच. आणि एखाद्याला तू तसा नाहीस हे सांगणं म्हणजे हिंसाच हेही नवे मूल्य आपण आणलेले आहे. क्रिटीकल, मन दुखावणारा feedback देणं हे आपण सुजाण व्हायच्या नादात थांबवलेलं आहे. आणि कोणी दिलाच असा feedback तर आपण दुसऱ्या कोणाला तरी गाठू शकतो. फी दिली कि मला हो म्हणणारा कोणीतरी असेलच. आणि कोणी हवा कशाला, मी थेट स्वतःला रिलीज करून लोकांच्या लाईक्सचा सर्वोच्च निकष थेटच ताडून पाहू शकतो.

शिक्षकांची, जेष्ठ peers ची सद्दी ही अनेक क्षेत्रांत संपुष्टात येते आहे. तुम्ही स्वतःला स्पर्धेत थेट सहभागी करू शकता. कोणीतरी तुम्हाला निवडायची गरज नाही. अर्थात काही क्षेत्रांत अजूनही निवडीच्या शुक्राचार्यांना वाव जास्त आहे (खेळ, academia इत्यादी.)

लोकांच्या रिंगणात थेट उतरताना कौशल्य आणि रंजकता ह्याचं मिश्रण तुमच्याकडे असायला लागतं. पण दर्दी लोकांच्या खाजगी रिंगणात रंजकतेला फारशी किंमत नाही. लोकप्रिय आणि उत्कृष्ट ह्यांचे नाते असे विचित्र आहे. एखादी गोष्ट उत्कृष्ट आहे कि नाही हे ठरवायला तिला मोठा ट्रायल पिरीयड लागू शकतो. पण लोकप्रियतेच्या बेभान स्टेडीयमला एवढा वेळ नाही. जिंकण्या-हरण्याच्या स्पर्धेची प्रत्येक आवृत्ती थोडाच वेळ आहे आणि तुम्हाला मर्यादित attempts आहेत. आणि परत जे उत्कृष्ट असेल ते रंजक असेल असे नाही.

हा क्वालिटीचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जास्त फंडामेंटल आहे. तो म्हणजे  How to make peace with one’s own mediocrity. You are good at something and maybe you touch the best at time, but not consistently to call yourself best. मग तो बेस्टचा पाठलाग करायचा का त्याला खुबसुरत मोड देकर सोडून द्यायचं? आपला आणि त्या विलक्षण क्षणांचा संबंध आपल्या आनंदापुरता ठेवायचा आणि स्पर्धेतून अलगद अदृश्य व्हायचे? का गिरवत रहायचे, अपयश हे यशाची पायरी असे अपयश दाबत दाबत वर सरकायचे? पण हा वर सरकायचा स्पीड पुरेसा नसेल तर? मग करायचं काय?

लोक साधना, सत्य वगैरे ढाचे देऊ शकतात, पण ही सगळी आंबट द्राक्षांची वाईन. त्याचीही मजा आहे, पण वाईन बनून टुन्न होईपर्यंत फार उलाघाल.

किंवा मग आपलं काही न झाल्याचा कडवटपणा मनात ठेवून आपल्या अस्तित्वात तो हळूहळू मुरू द्यायचा. तसं उघडपणे काही म्हणायचं नाही, पण होईल तसा जगावर सूड उगवायचा, जो/जे समोर असेल त्याच्यामार्फत.

संजय मांजरेकरचं आत्मचरित्र ह्याबाबतीत मला फार आवडलं. त्याने फार प्रामाणिकपणे त्याची असूया, असुरक्षितता मांडली आहे. आणि कडवट अस्तित्वाचे तो एक उत्तम उदाहरणही आहे कदाचित!

काहीही करून, आपल्याला आपल्या तोकड्या असण्याच्या जाणिवेचे काहीतरी करावेच लागेल. एकतर तोकडे नसण्याच्या किनाऱ्याला जायला, without rope वगैरे छलांग मारावी लागेल (जसं batman करतो, माई म्हणतात), किंवा खुबसुरत मोडवर मागे परतून आपल्यापुरते आनंदाचे वर्तुळ आखायला लागेल, किंवा कडवट, सिनिकल होत जाण्याचा स्वाभाविक मार्ग.

असं करूनही केव्हातरी आपल्याला ते खुणावतच राहील, what it could have been, how beautiful it can be.

Well done, चैतन्य ताम्हाणे. I will be looking forward to your next.    

Monday, April 26, 2021

आयपीएल झालीच पाहिजे

 आयपीएल आपल्या सर्वांच्या अत्यंत आवडीची द्वेष करण्याची बाब आहे. कधी राज्यात पाणी परिस्थिती गंभीर आहे म्हणून आयपीएल सामन्यांना बंदी अशी तद्दन बिनडोक मागणी केली गेली होती. म्हणजे राज्यात पाणी कमी म्हणून लोकांना एका दिवसाआड एक आंघोळ करा अशी मागणी कधीही कोणीही केल्याचे ऐकिवात नाही, पण राज्यातील एका मैदानावर मारल्या जाणाऱ्या पाण्याने राज्याचा पाणी प्रश्न सुटण्याची नैतिक जादू आपण काही वर्षांपूर्वी केली होती.

तर ह्या वर्षी देशात कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू असतान कशी काय आयपीएल खेळवली जाते ह्या प्रश्नाने आपल्याला आयपीएलला शिव्या घालायच्या आहेत. ह्यातला पहिला मुद्दा आहे कि कशी काय एवढ्या भीषण अवस्थेत आयपीएल आणि आयपीएलच खेळवली जाते.

 आयपीएलच का ह्या प्रश्नाचे उत्तर एकच आहे – पॉवर! सध्या BCCI हा आर्ष भारतीय संस्कृतीचा भाग आहे, किंबहुना ‘हा जय नावाचा इतिहास आहे हे वाक्य काही दिवसांनी BCCI च्या इतिहासाच्या सुरुवातीलाच लिहावे लागेल. त्यामुळे ज्यांचे कासोटे हे संस्कृतीउद्धारासाठी सदैव कसलेले असतात ते पुंगवही ‘तेढा है पर मेरा है’ प्रमाणे आयपीएलकडे नैतिक दुर्लक्ष करत असतात. ते आयपीएल बघतच नसल्याने त्यांना आयपीएलचा चीनी प्रायोजक दिसत नाही, पण त्यांना बाजारातील दिव्यांच्या माळा मात्र दिसतात. हा त्यांचा भोंदूपणा असे म्हणू नका, आपल्या पथावर सदैव कार्यरत राहण्यासाठी स्वतःतील विसंगती पचवायची क्षमता ही अंगी असावीच लागते. ज्याला स्वतःला फसवता येत नाही असा मनुष्य राजकारणाचे वारांगन कसे सांभाळेल. असो. तर आयपीएल हे थेट दैवी महापुरुषांचेच काम आहे आणि ते झालेच पाहिजे हे एकदा कळल्यावर आपला प्रश्न बराचसा सुटतोच.

पण आता आयपीएलमधील काही खेळाडूच ह्या वर्षीची स्पर्धा सोडून जाऊ लागलेले आहेत आणि त्यात नवल म्हणजे एका भारतीय खेळाडूनेही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा खेळाडू कोव्हीड-१९ च्या काळात स्वतःच्या परिवारासोबत राहण्यासाठी स्पर्धा सोडतो आहे. हा ‘आतला आवाज ऐकून स्पर्धा सोडायची सजा ह्या खेळाडूला मिळते का एवढी गुस्ताखी त्याला माफ होते हे बघायचं. बाकी पैशाला पासरी मिळणारे परदेशी खेळाडू ही आवृत्ती सोडून जातील आणि काही लाखाला पुढच्या वर्षी परत येतील किंवा दुसरे कोणी. भारतीय खेळाडू काहीही झाले तरी स्पर्धा सोडणार नाहीत. भारतीय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय ते स्थानिक, एवढे कर्मयोगी आहे कि खेळाडू आपले कुटुंबीय मेले तरी सामन्यांतून मागे हटत नाहीत. केवळ, आणि तेही कधीतरी, जेव्हा विश्वात नवे जीवन आणण्याचा मुद्दा असतोच तेव्हाच ते कधी ब्रेक घेतात. भारतीय खेळाडूंच्या भावना एकमेकांशी एवढ्या जोडलेल्या आहेत कि त्यांची tweets सुद्धा एकसारखी असतात. एका राष्ट्राची (पोटफोड्या ‘ष आहे लक्षात घ्या!) अशी एकत्र अनुभूती येणे विरळच.

आयपीएल सुरू राहिलीच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात लंडनमध्ये बॉम्ब पडतानाही तिथे क्रिकेट सुरूच होते. मागच्या वर्षी लॉकडाऊन होता आणि लाखो माणसे गावी परतायच्या विवंचनेत होती तेव्हा आपण dalgona कॉफी, केक, आंबे चोपत होतो. मागच्या वर्षी काही हजार केसेस असताना केवळ भीरुता म्हणून आपण आयपीएल भारतात होऊ दिली नाही. ह्यावर्षी अशी कायरता नाही. आत्मा हा शाश्वत आहे आणि तो कपडे बदलावे तशी शरीरे बदलतो. मग अशा अशाश्वत शरीरांच्या नव्हे कपड्यांच्या ऑक्सिजनअभावी मरण्याने, किंवा होलसेल दहनाने आपण आत्म्याला रंजनाने तृप्त करणे सोडायचे आहे का? सारा आटापिटा मनोरंजन करायला असताना ट्वेंटी-ट्वेंटीसारखे निष्काम मनोरंजन सोडून कोव्हीडच्या आकड्यांसारखे गिधाडी मनोरंजन कोणी विकृतच निवडू शकतो.

कोणी म्हणेल कि शेकडो लोक आरोग्यसुविधेच्या अभावाने तडफडत असताना तुम्ही खेळू कसे शकता? तुम्ही सुपर ओव्हर कशी एन्जॉय करू शकता? ह्या प्रश्नाला कायमचे ऐतिहासिक उत्तर देण्याची संधी आपल्याकडे आहे.  स्वतःच्या, परक्यांच्या दुःखांचा धिंडोरा वाजवणे ह्या आधुनिक मूल्याला, ज्यामुळे आपण सारे सदैव हा ना त्या सामूहिक रुदनाचा भाग बनलेलो असतो त्याला ठोस पर्याय म्हणून, अत्यंत stoic असा अत्यंत दारुण सामूहिक दुःखाच्या काळातही मनोरंजनाला अग्रक्रम देण्याचा मार्ग आपण चोखाळला पाहिजे. केवळ आयपीएल नव्हे तर बायो-बबल सांभाळून करता येतील अशा अनेक रंजक गोष्टी आपण सुरू केल्या पाहिजेत आणि त्या टीव्हीवरून थेट प्रक्षेपित केल्या पाहिजेत. आयपीएल थांबवा नाही, तर आम्हालाही रिझवू द्या लोकांना अशी मागणी वेगवेगळ्या गटांनी करायला हवी. उदाहरणार्थ एखाद्या बिलेनिअरने सारे वऱ्हाड बायोबबलमध्ये ठेवावे आणि नंतर लग्नाची सारी रस्मे telecast करावीत, जेणेकरून हम आपके है कौन च्या आफ्टरइफेक्टमध्ये जन्माला आलेल्या पिढीला त्यांचा हम आपके है आयसोलेटेड कौन हा नवा मार्ग मिळेल.

आपण आपले मनोरंजन करण्यासाठी ह्या जगात आहोत हे सत्य जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ तेवढे आपण बऱ्याच गुंत्यांतून मोकळे होऊ. एकमेवाद्वितीय विश्वगुरु म्हणून आपले हे कर्तव्य आहे कि अशाश्वत ते सोडा आणि शाश्वत जे मनोरंजन ते धरा हे सत्य आपण जगाला दोन्ही हात उभारून सांगू. जसे रस्ते कोणतेही असोत सत्य एकच असते तसे टीम्स कोणत्याही असोत, ट्वेंटी-ट्वेंटी ही रंजक होतेच. एवढा तीव्र सत्यानुभव, ज्यांत प्रेक्षक नसतानाही दुमदुमलेल्या मैदानाची अनुभूती आहे, त्यापासून करोडो लोकांना वंचित करण्याचे पाप करू नका.

Sunday, October 16, 2016

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.
       माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणतो, त्यांच्या जातीचे एवढे लोक आहेत विधानसभेत-परिषदेत, त्यांनी मोर्चा काढू नये. म्हणजे जात मानावी, मोर्चा काढू नये.
       काही म्हणातात, आमची जात बघा, आमचा गट बघा. आम्ही संवैधानिकरित्या भांडू. पण आरक्षण हवंच.
       काही जण म्हणतात, जात नकोच, जात चुकीची. पण आमचा तेवढा एक गट वेगळा ठेवा, आमच्या अन्यायाचं परिमार्जन अजून झालं नाही.
       एकजण त्याच्या जातीतल्या मुलींना सांगतो, जातीत लग्न करा. एक मुलगी त्याला जाहीर अन्फ्रेंड करते. त्याचे मित्र पुढे ह्याच्या-तिच्या बाजू घेऊन वाद जारी ठेवतात.
       काहीजण तर थेट आहेत, घेतल्याशिवाय राहणार नाही.
       काही अजूनही थेट असतील, कदाचित माझं आडनाव,जात, वंश त्यांचा काळ्या यादीत असेल. अजूनतरी मला अशी व्यक्ती भेटलेली नाही. पण अशा व्यक्ती असतील असं मला वर्तमानपत्र वाचून वाटतं.
       मी खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा ५०% पोस्टर्स वर असलेला एकुलता एक ऐतिहासिक महापुरुष बाकी पोस्टर्स वर असलेल्या तत्कालीन महापुरुष आणि स्त्री-पुरुष ह्यांना निर्विकार बघत असतो, किंवा त्याची करारी नजर आकाशाकडे कोन करून असते.
       फेसबुकच्या, ब्लॉगच्या काही ओळींतून प्रश्नाची ना चिकित्सा होईल ना तोडगा.
       पण ते नकोच आहे मला.
       माझ्या अवती-भवती हे सारे होर्डिंग्ज, रिक्षातून फिरणाऱ्या जाहिराती, जातीच्या नावाचे सळसळते झेंडे हे सगळं मी पाहतो तसं १४-१५ वर्षाची मुलं-मुली पहात असतील. त्यांच्यावर कोण जातीचा शिक्का आहेत, कोण आपले-कोण त्यांचे हे तसं त्यांना समजावला जात असेलच बहुदा. पण राहताना, शाळेत, सोबत त्यांचे मित्र-मैत्रिणी असतील, ते सगळेच काही त्यांचे-आपले होत नसतील. पण आता ह्या झेंड्यांनी, मेसेजनी, त्यांचे २०-२५ वयाचे नातेवाईक, काका, बाबा, आई, मावशी साऱ्यांना पाहून, एकीची, अभिमानाची, आवेशाची हवीहवीशी जाणीव घेऊन ही मुलं-मुली त्यांच्या जगाचीही वाटणी सुरू करतील, आपल्या वाट्यासाठी सरसावतील, त्यांना का- मला का नाही, माझ्या जातीचे थोर लोक, त्यांचं असंच. मग ते ह्याच चष्म्यातून त्यांचे जोडीदार निवडतील.
       ह्या शहराने, अर्थव्यवस्थेच्या नव्या फेऱ्याने, उपभोगाच्या, स्वतःच्या जगण्याला अधिकाधिक पुष्ट करण्याच्या स्पर्धेने एक झरोका बनवला होता. ही मुलं त्या झरोक्यात जगत होती, कदाचित त्यांनी हा झरोका मोठाही केला असता. पण आता ते ठामपणे ह्या झरोक्याकडे पाठ वळवतील. त्यांनी जिकडे तोंड केलंय तिथे त्यांना त्यांच्या पूर्वजांची रांगच दिसत असेल.
       ह्या मुलांना, त्यांच्या मित्रांना त्यांच्या जगाचे जातीनिहाय कप्पे पाडायला भाग पाडलं जातंय त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे.
       पण मी त्याचं उत्तरही शोधात नाहीये.
       माझ्यासारखा विचार करणारे, हे जे चाललंय त्याने तडफडणारे लोक बाकीही असतील. त्यांना हेही जाणवत असेल कि त्यांच्या कुठल्याही भूमिकेचा, निषेधाचा, स्पष्टीकरणाचा झ्याट फरक पडणार नाही. त्यांच्या अड्ड्यावरचे लोक माना हलवतील, विरोधी अड्ड्याचे एक एक शब्द, वाक्य, त्यांचे वैयक्तिक अनुभव घेऊन त्वेषाने भांडतील, हिडीस विनोद करतील, मग नवं काही घडेल, आणि हीच दारू नव्या भांड्यात ओतून आपण तर्र होऊ. किंवा अशा तर्र लोकांच्या लीला पाहत राहू, पाहत राहण्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून.
       किंवा अगतिक झपाट्याने ते रोमँटिक छोटे छोटे बदल करू. वंचित मुलांना शिकवू, महिलांना बचत करायला लावू, एखाद्या समजदार मुलीला शिकवायला मदत करू. मग ती तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला येईल, आमच्या जातीतला आहे, शहरात घर आहे स्वतःचं. तिला अशी सात्विक सात्विक पुस्तकं वगैरे भेट देऊन आपण बरं वाटून घेऊ.
       किंवा तिने पळून जाऊन लग्न केल्यावर तिच्या आई-बाप-भावांच्या जळत्या नजरा पाहू, त्यांच्या गुड बुक्स मधून, त्यांच्या वस्तीतून निष्कासित होऊ. मनात उसासा टाकू, मुलगी सुखरूप असल्याचा.
       आपल्या कलीग्ज, नातेवाईकांना सांगू कशी जात चुकीची आहे ती. ते त्यांच्या जातीत नसलेल्या लोकांनी केलेल्या गुन्ह्याचे पझल्स आपल्याला घालतील. आपल्या पोटतिडकीला आवश्यक सहानुभूती देतील. मग let’s agree to disagree अशा लिबरल तोडग्यावर आपण त्यांच्यासोबत आपला वेळ काटू.  
       आपण आशावाद ठेवू कि होतोय बदल, होतोय, आणि त्यावेळी आपलं बेट ऐतिहासिक सातत्याची वाढती पातळी गिळंकृत करत जाईल.
       माझे ओळखीचे परदेशस्थ लोक दोन गटात आहेत, एक अभिमान ग्रुप आणि दुसरा म्हणजे वर्षातून २-३ फेसबुक अपडेट देणारा ग्रुप.
       पहिल्या गटातले लोक मी नेहमी पाहतो. मी त्यांच्याशी निरुपद्रवी गोष्टी वगळता काही बोलू शकत नाही किंवा त्यांच्या नॉन-अभिमान, नॉन-आवेश मोड मध्ये काही गाणी,पुस्तके असं. कधीकधी मला वाटतं कि ह्या साऱ्यांना वसई रोड स्टेशनला विरार-अंधेरी लोकल ट्रेन मध्ये सोडावं. त्यांना ह्या गर्दीचाही अभिमान वाटेल काय? स्क्वेअर फुटामागे चिणून बसलेल्या गर्दीच्या आवाजावर, स्पर्शावर, तिच्या कोपऱ्या-कोपऱ्यात ओघळत येणाऱ्या विद्रूप तहानेवर ह्यांच्या कडे काही दार्शनिक तोडगा आहे काय? का हे प्रश्न इतिहासाच्या, सनातन संस्कृतीच्या जाज्वल्य पानांत तळटीप म्हणूनही नाहीत?
       बंदच करतो मी काही पाहणं. डिमांड-सप्लायच्या मूलभूत कोड्यात डोकं घालतो. मग मला प्रश्न पडतात, मॉडेल्सचे, गृहीतकांचे. माझे रफ कागद संपतात. माझ्या कामात अव्याहत चालू असलेली गाणी ऐकताना मध्ये पाकिस्तान कोक स्टुडीओची गाणी ऐकतो तेव्हा मला हा देशद्रोह आहे का नाही असा पेच पडत नाही. माझे शब्द, वाक्यं एडीट करतो. मी माझ्या डेटासाठी कोणतं टेक्निक वापरावं ह्याचा विचार करतो. माझं रिझनिंग, माझं अधिकाधिक अचूक लिहिणं, त्या लिहिण्याने एखाद्या आजवर न सुटलेल्या कोड्याची काहीतरी उकल होणं हा आनंद मला जाणवत जातो. मला प्रश्नही पडतो कि मी हा आनंद सोडून बाकी कशालाही डोक्यात जागाच का देतो. आपण सगळ्याकडे फक्त डेटा असंच बघायला हवं. मला विचार करणाऱ्या माणसाचा अपरिहार्य कोडगेपणा आल्यागत वाटतं. बाहेरचा सगळा राडा म्यूट झालेला माझा कोपरा.  
        माझा मेंदू थकतो. मी जॉगींगला बाहेर पडतो तेव्हा रस्त्याला जिकडे-तिकडे वाहनं फुटलेली असतात. पार्कात मित्राचे बाबा मला म्हणतात, आहे का कोणी ओळखीत आमच्या मुलाला, काही अट नाही, फक्त आपल्या जातीची हवी. मी ओशाळा होऊन पळतो, माझ्यावर त्यांनी लावलेला टॅग ओरबाडून काढायला बघत.
        तेव्हा मला परदेशस्थ लोकांचा दुसरा गट आठवतो. मला जाणवतं कि एक वाट आहे जिने गेलं कि ही उसनी, बिनकामाची तडफड थांबेल.
       मी माझं वय, माझा बँक बॅलन्स ह्याची त्रैराशिके मांडतो.

       माझ्या सभोवती वाहनांचे हॉर्न वाजत राहतात. मध्येच एक बलिष्ठ चारचाकीवाला भर रस्त्यात थांबतो, मागच्याला बुकलतो, बाकीचे हॉर्न वाजवत राहतात. पोस्टर्स फडफडतात. त्यावरचा ऐतिहासिक महापुरुष धीरोदात्त नजर लावून आकाशाकडे बघतो. मोर्च्यात जाण्यासाठीचा मोबाईल नंबर खाली दिलेला असतो.    

Thursday, March 24, 2016

बघ्या, होळी आणि आवाहनांना आलेले रंग

        बघ्याचा एक मित्र बघ्याला सांगत होता, अरे, अनेक पंचांगकर्त्यांनी येऊन लोकांना आवाहन केलं आहे की प्रतीकात्मक होळी खेळा. केवळ टीळा लावा वगैरे. पुढे बघ्याच्या मित्राला आत्यंतिक धार्मिक आनंद झालेला की बघ आपला धर्म कसा युगानुकूल आहे वगैरे. बघ्याने आपल्या मित्राकडे नीट बघितलं आणि तो एकूणातच आपल्यापेक्षा च्युत्या आहे हे ठरवलं. मग तो दार्शनिक वगैरे अविर्भाव आणून म्हणाला की अरे युगानुकूल वगैरे नाही, तर केवळ ह्यावर्षी पाण्याची टंचाई असल्याने पैसे वाचवण्याचा हा गतानुगतिक मध्यममार्ग आहे. ह्यावर्षी मान्सून नीट होतो तर पुढच्यावर्षी छान सार्वजनिक होळी खेळली जाईल.
       बघ्याने आपल्या मित्राकडे बघितलं तेव्हा त्यांच्यात एवढंतरी होतं का, चमत्कारावर लिहिलेला अग्रलेख गायब होण्याचा चमत्कार असे सगळे प्रश्न आपल्या मित्राच्या जिभेवर ओथंबलेले पाहून बघ्याने पळ काढला. आणि पळता पळता कुठल्याही सार्वजनिक चर्चेत आपले मत न नोंदवण्याचे मत अधिक ठाम केले.
       पळत पळत आपल्या उपजीविकेच्या दैवताच्या नित्य नियमाच्या पाट्या किंवा प्रदक्षिणा उरकून बघ्या आपल्या बिळाकडे आला. तर तिथे लोकांचे घोळके २-३-४ च्या पुंजक्यात उभे असून चेहऱ्यावर हसणे येणार नाही ह्याची दक्षता घेऊन अनुक्रमे मृत माणूस आणि त्याचे कुटुंबीय, मग वाढती उष्णता, मग नोकरी, मग आप्तेष्ट, मग खरेदी-गुंतवणूक अशा विषयांवर चर्चा करीत उभे होते. बघ्यानेही चेहऱ्यावर सचिंत भाव आणत नेमके कोण मेले ह्याची माहिती घेतली आणि मग समाजहितार्थ तो ही माहिती पसरवू लागला. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या एका पुंजक्याकडून त्याने मृत इसमाच्या मरणाबद्दल तपशील मिळवले.
       त्यानंतर तेथील अन्य सह-शोक प्रदर्शकांसोबत शिळोपा करण्यापेक्षा अंत्यविधीसाठी प्रेत आणि अन्य घटक तयार करणे ह्या कामाला बघ्या लागला. एकूणातच आय.टी., फायनान्स, ह्युमन रिसोर्स अशा स्कीलमध्ये पारंगत लोक धार्मिक रूढीने प्रेत जाळणे ह्या स्कीलकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि त्यामुळे बघ्यासारखे लोक अत्यंत फायद्याचे ठरतात, जे पोटतीडीकीने प्रेताची शेवटची गरज, जसे जाळून घेण्यासाठी तयार होणे ह्यावर काम करीत रहातात. हजारो वर्षाच्या धर्मामुळे प्रेताला जाळणे ही क्रियाही सोपी राहिलेली नाही. पीठ, मीठ, दगड, ब्लेड, बांबू, काथ्या, मडके, काही किलो लाकडे आणि ती इकडून तिकडे पोहचवणे, मृत व्यक्ती मृत आहे ह्याची विविध जिवंत प्रमाणपत्रे, पंचे, फुले-हार, चंदन, बुक्का, अबीर आणि हे सर्व दबत्या कुजबुजत प्रकारात करणे ह्या आणि अशा अनेकविध गोष्टींचा अंतर्भाव ह्या सगळ्यात आहे. बघ्याच्या मनात हे सगळे शाब्दिक प्रवाह उमटून असताना वरकरणी त्याने घट्टपणे दोरीने प्रेत तिरडीला बांधले. त्यांनतर नातेसंबंधांच्या उतरंडीप्रमाणे लोक खांदे देऊ लागले तसा आपले कपडे झटकत झटकत बघ्या बाजूला झाला.
       बघ्याच्या बाजूला त्याच्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि गुरखा होते. सेक्रेटरी गुरख्याला उद्या पाणी कसे सोडणार हे समजावून सांगत होता. त्यावर गुराख्याने ह्यावर्षी टँकर नाही का असे विचारताच एकदम ब्लास्फेमीचे भाव आणून बघ्याकडे आणि मग सात्विक संतापाने गुराख्याकडे बघत सेक्रेटरीने टाकीचा कॉमन नळही बंद ठेवण्याची सूचना केली. बच्चोंको खेलने दो और डी.जे. भी उस साईड बजाव असं ठरवून सेक्रेटरी आणि बघ्या अंत्ययात्रेत मार्गस्थ झाले.
--
       बघ्याला ह्या नॅचुरल एक्सपिरिमेंटसाठी उत्सुक होऊन राहिला होता. आज ही एक व्यक्ती मेली आहे. ह्या व्यक्तीची इच्छा, जी बघ्याने मृत इसमाकडूनच ऐकली होती ती म्हणजे त्याच्या मुलाचे लग्न ती बाकी आहे. त्यात मरणाअगोदर फसक्या शस्त्रक्रियेवर आणि रुग्णालयात राहणे नि तपासणी अशावर ३ एक लाख रुपये उडालेले आहेत. पाठी एक काल तुळतुळीत गोटा केलेला मुलगा, जो बाकीवेळ अन्य गोटा केलेले लोक आणि पितर किंवा देव ह्यांच्यामध्ये एजंट म्हणून काम पाहतो, एक ३५० स्क्वेअरफीट ब्लॉक, एक अर्धांगवायूने त्रस्त बायको, एक अद्याप अपग्रेड न झालेला टी.व्ही. ज्यावर मृत इसम बातम्या आणि सिरीयल बघत असे, आणि थोडे पेन्शन, आणि अन्य घटक ज् बघ्याच्या सिनिकल फिटमध्ये सापडलेले नाहीत असे शिल्लक आहे. पण आजूबाजूच्या लोकांना काय आहे?
       आजूबाजूचे लोक जसे एक कुटुंब जे मियां, बीबी आणि एक मुलगा आहे, अजून एक कुटुंब जे थोडे गरीब मियां-बीबी आणि एक मुलगी आणि मुलगा आहेत, अजून एक कुटुंब जे एक आजी-आजोबा, आणि दोन जोडपी मुलगा-सून आणि प्रत्येकी एक अपत्य असे आहेत. आणि वरील वर्गीकरणात मोडणारी बाकी कुटुंबे आणि बघ्या. म्हणजे एकूणात भारत हा तरुणांचा देश असल्याने, आणि ह्या तरुण-तरुणींचे एकमेकांशी विवाह होऊन अनेकानेक अपत्ये निर्माण झाल्याने अपत्यांचाही देश आहे. आणि त्यात परत अनेक तरुण-तरुणी त्यांचेच आई—बाप अजून तेजतर्रार असल्याने काहीच पर्याय नसल्याने मजा करीत आहेत पण त्याचवेळी ते पालक बनून गेल्याने त्यांना आता संस्कार वगैरे पण करावयाचे आहेत.
       म्हणजे हे सगळे संस्कारोत्सुक आई-बाप आपल्या मुलांना उद्या सहज सांगू शकतात की ह्यावेळी होळी नाही कारण
-    आपल्या शेजारील मृत इसम आणि त्याच्या घराचे अद्याप ताजे फडफडते दुःख
-    आपल्या जवळील धरणांत नसलेले पाणी, जे पर्यायाने सोसायटीच्या टाक्यांत कमी येत आहे. (पण तू घाबरू नकोस, आपण सिंटेक्स लावली आहे. – दमलेला बाबा आणि आईही)
-    दुष्काळात होरपळणारे शेतकरी (जसे भेगा पडलेल्या जमिनींचे फोटो, असे नाना आवाहन करणारे कलाकार वगैरे)
-    काश्मीरप्रश्न आणि .....
(वरील कारणे एखाद्या क्रमाने दिसल्यास तो योगायोग समजावा!)
त्याचवेळी हे सगळं न सांगण्याचीही सबळ कारणे आहेत.
-    हे सांगण्यासाठी आपल्याला काही माहित/वाटत असणे हेच होत नसणे.
-    सोसायटीमधील इतर व्यक्तींना रंग लावण्याचा पूर्ण बिनडोक आनंद
-    लहान मुलांना मुलांशी, वयात येणाऱ्या मुला-मुलींना अन्य वयात येणाऱ्या मुली-मुलांशी, तरुण-तरुणींना तशा अन्य तरुण तरुणींशी रंग बरसे करण्याचा मौका मौका
-    रस्त्यावर घोळक्यात फिरणे, एखाद्याच्या घरी टोळधाड करणे, भांग आदी नशा करून तर्र आनंद अनुभवणे अशी पाशवी सुखे मिळवणे
-    माझी उपजीविका, माझे कुटुंब, माझे पैसे, माझे सुख वगैरे वगैरे कर्तुत्ववान असणे.
होळीच्या दिवशी बघ्या सकाळी बाहेर पडतो तो त्याला मुलांचे आनंदी चीत्कार ऐकू येऊ लागतात. त्यांनतर तळ-मजल्याचासारा भाग रंगीत झालेला दिसू लागतो. पुढे मुलांचे-मुलींचे टोळके सोसायटीत ज्याला त्याला रंगवत असते. मागच्या वर्षी ह्या प्रचारकी टोळक्याकडे असलेल्या बादल्या आणि पिशव्या ह्यावर्षी नसतात. ती मुले बघ्यालाही आपल्या घोळात घेतात आणि त्याचा चेहरा रंगवून टाकतात.
पुढे सोसायटीमध्ये डी.जे. चालू झालेला असून तिथे शांताबाई वगैरे तत्कालीन सांस्कृतिक गाणी सुरु आहेत. त्यात मुळातच रंगात दंग झालेले ५-६ बापे नाचत असून बाकी लोक हळूहळू आपण आणि आपण ज्यांच्यावर नजर ठेवून आहोत असे बाकी कोणी हे सगळेच नाचू अशा आशावादाने आजूबाजूला रंगून घेत उभे आहेत. बघ्या सोसायटीमधून बाहेर पडताना फलकावर पाहतो – आपल्या सोसायटीतील जुने रहिवासी...
--
       रस्त्यावर लोकांचे रंगीन जथ्थे चालत होते. कोपऱ्या-कोपऱ्यांवर लोक सेल्फी काढत होते. त्यात एकाने बघ्याला ओळखले आणि त्याला रंगवायला सुरुवात केली.
       ते झाल्यावर बघ्याने पाहिलं तर ह्याच इसमाच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर काल पाणी वाचवायचा संदेश फिरत होता.
       त्या संदेशाप्रमाणे हा इसम आणि त्याचे साथी हे ड्राय होळी खेळत होते.
       त्यांचा अंगा-कपड्यांचा रंग, त्यांनी रंगवलेली वाहने आणि कंपाऊड हे सगळे थेट पावसाळ्यात धुतले जाणार आहे. आजची होळी ही ड्राय होळी.
       बघ्या बघत निघाला तो त्याला सगळीकडे असेच सांस्कृतिक वातावरण पसरलेले दिसले. म्हणजे-
-    लोक पंचांग वाचत नसावेत.
-    लोकांना होळीची गंमत हवी आहे, म्हणजे हवी आहे.
-    पाणी नसल्याने लोक ड्राय होळी खेळत आहेत. म्हणजेच त्यांना समज आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी पाणी असेल तर लोक पाणी, चिखल, फुगे अशा सगळ्याने होळी खेळातील. रेन डान्स करतील. म्हणजेच पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्हज. आहा, शाश्वत सत्य!!   
म्हणजे आपण लोकांबद्दल काय म्हणू शकतो?
बघ्या काहीच म्हटला नाही. तो स्वतःलाच म्हणाला, च्युत्या!!
बघ्याला आठवलं की मध्ये एके ठिकाणी त्याने एक बोर्ड वाचलेला की अमुक एका स्त्रीला स्थानिक महिला मंडळातर्फे आयोजित खेळांमध्ये पहिले बक्षीस. त्या नावाने बघ्याला आठवलं की ह्या महिलेची मुलगी वयाच्या २८व्या वर्षी डेंग्यूने मेली, सुमारे वर्षभरापूर्वी. ह्या बाई खेळायला लागल्या.
   ही त्यांची जगण्याची जिद्द की काळापरिणीत अपरिहार्य निब्बरपणा?
   तसे हे रंग खेळणारे लोक. आपल्या शेजाऱ्यांचे दुःख आपले नाही, असे असेल. पण मग कोणाचे दुःख आपले आहे? आणि कोणाला खरेच दुःख आहे? ज्याचा बाप गेला तोही परवा-तेरवा आपापले सुख पाहिलच.
   मग हे संस्कार काय आहेत, जर आपण त्यात संवेदनशीलता शिकवत नाही?
   आपल्याला पडलेल्या प्रश्नाच्या नैतिक टोनने बघ्या एकदम गडबडून जातो.
--
       एकदम आलेल्या नैतिक पावित्र्याला शह द्यावा म्हणून बघ्या एक निकोटीन कांडी शिलागवतो आणि पुढे होणाऱ्या लंग कॅन्सरची नेमकी प्रोबॅबिलिटी काढत हळूहळू हलका होऊ लागतो.
       त्याच्या काही सोशल मिडिया फ्रेंडनी सगळ्या आवाहनाला डीच मारून लोकांनी केलेल्या सणाने त्रस्त कमेंट्स टाकल्या आहेत. बाकीचे सामाजिक बदलकर्ते लॉंग विकेंड पकडून बाहेर गेले आहेत. आपापल्या लोकेशन्सचे फोटो ते टाकत आहेत.
       होळी खेळलेले आपापले सेल्फी टाकत आहेत.
       बघ्या समोर हुल्लड करणाऱ्या जथ्यांकडे बघत सावकाश धूर बाहेर सोडत राहतो.
       त्याला जाणवतं की ह्याच मुलांत उद्याचे पालक, उद्याचे फेसबुक युजर्स, उद्याचे सोसायटी सेक्रेटरी, उद्याचे स्थानिक नगरसेवक, उद्याचे एन.आर.इन्व्हेस्टर्स, उद्याचे गुंड, उद्याचे च्युत्ये, उद्याचे शेती-जवान-देश-संस्कृती कैवारी, उद्याचे भांग पिणारे, उद्याचे पाणी वाचवणारे, उद्याचे मरणारे, उद्याचे खांदा देणारे, उद्याचे पितर, उद्याची भुते आणि उद्याचे बघे..
       बघ्या थोटूक चिरडतो, नेमस्तपणे उचलून कचऱ्यात टाकतो.
       लोक होळी खेळत राहतात.       

            

Thursday, February 11, 2016

स्मार्ट सिटी आणि च्युत्या बघ्या

बघ्या सकाळी आपल्या झोपेच्या आणि भयंकर दृकश्राव्य स्वप्नांच्या झांगड्गुत्त्यात असताना बेल वाजली. तसं आपल्या चड्डी-बनियानमध्ये बघ्याने किलकिलं दार उघडलं. तेव्हा वॉचमन म्हटला, आज पानी नही.
       बोचा.
       काल सकाळी वॉचमन असेच शब्द बोलला होता. थोडे आशावादी, २ घंटा पानी आयेगा असे.
       बघ्याने तपासणी केली तर पाण्याची अर्धी बाटली, एक टमरेल आणि १ पिंप. ह्यात दात घासायचे, हगायचं, कॉफीचं भांडं धुवून मग धुवून कॉफी करायची, अंघोळ करायची. बघ्याने सुरू होताच गांड लागलेला दिवस अशी काल्पनिक फुली मारून अशा अनेक दिवसांच्या सुकलेल्या चळतीत हाही दिवस टाकला. मग उपजिविकेस जाण्याच्या क्रिया उरकून अपरिहार्य ताजातवाना होत धुरके आणि थेंबभर विरका हिवाळा ह्यातून तो रस्त्याला लागला.
       रस्त्याच्या कोपऱ्याला रिक्षा दाटल्या होत्या. त्यांचा स्टँड सोडून त्यांनी इकडे दाटी का केली ह्याचं कारण एकदम वाजू लागलं. भक्तीपर गीतांच्या आवाजाने बघ्याच तोंड वळलं तिकडे भंडाऱ्याचा मांडव पडलेला होता. बाया-बापड्या पाया पडायला येत होत्या. रस्त्याच्या समोरच्या बाजूला हार-फुले विकायला आलेल्या कुटुंबांनी बस्तान मांडलं होतं. बाया-पोरी फटाफट हार बनवत होत्या. बापे बिडी पीत मांडणी करत होते. काही पोरं आईला लुचत होती, बाकीची झोपली होती. लोकही जमेल तसे विविध भावमुद्रा आणि योगमुद्रा, जसे छातीला उजवा हात टेकवून मान तुकवणे, उजव्या हाताचे बोट दोनदा तोंडासमोर हलवणे आणि मग छातीला लावणे, काही क्लासिक नमस्कार, काही सुपर चपला काढून देवळाच्या बाहेरून नमस्कार असे आपापल्या श्रद्धेची नोंद करत होते. नावाला जागून बघ्याने हे पाहून घेतलं. मग नुकत्याच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत टपरी हरवलेल्या आणि त्यामुळे सरतेशेवटी एकदम रस्त्यावर आलेल्या चहावाल्याकडे चहा पीत तो समोरील मंदिराकडे पाहू लागला.
       एक भव्य कमान, त्यावर एक पूर्ण पुरुष, बाकी शुभेच्छुक मुंडकी. जवळ कार्यक्रम पत्रिका. त्यात संध्याकाळी याग. आणि बाजूला भंडारा.
       म्हणजे संध्याकाळी ह्या चौकात ट्राफिकचा राडा अशीही नोंद बघ्याने केली. तेवढयात भडजी लोकांचा जथ्थ्या तिथे आला. आपापल्या दुचाक्या पार्क करून, तिथेच पुढे मांडवाच्या कडेला, आपापल्या पिशव्या घेत ते मांडवात प्रवेश करते झाले.
       आपल्यालाही असंच लोकल काम असतं तर कित्ती मज्जा असं दैनंदिन हळहळत बघ्या रस्त्याला लागला.
       पुढे रिकामी भांडी, बादल्या, बुधले, पिंप असं घेऊन बाया, बुढया, घरात उरलेली पोरं असे सगळे लाईन लावून उभे होते. मागच्या दुकानांचे रखवालदार त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत होते.
       वाट पाहणं आणि आणि मग लाईन लावून त्या वाट पाहण्याची मेरिटोक्रसी बनवणं हे ह्या शहरात कायम घडतं. मग कोणीतरी स्मार्ट येतं, रांगेच्या बाजूने. रांगवाले आपल्या च्युत्येपणाची उघड-वाघड सिद्धता बघत राहतात. आपल्या ह्या मूलभूत स्टेटस अपडेटवर बघ्याला बरं वाटू लागलं. 
       पुढे फ्लेक्स होता. स्मार्ट सिटीबद्दल निबंध आणि लोगो स्पर्धा.
--
       लोकल ट्रेनमध्ये हातातले पुस्तक, बाकीच्यांच्या मोबाईलवरील पिक्चर आणि चर्चेचे उष्टे तुकडे ह्या सगळ्यांत बघ्या यथेच्छ डुंबत होता. जमेल तश्या पुढच्या मागच्याला ढुश्या देत होता. आणि आपली अच्छी सीट कधी येणार ह्याकडे काटेकोर लक्ष ठेवून होता.
       बायका आणि सेक्स ह्यांबद्दलचे नियमित जोक झाल्यावर कोणीतरी म्हटलं, आमच्याकडे पाण्याची बोंब आज.
       द्या अजून कमळाला मतं.
       आता पाऊस काय कमळ पाडतं का? काय बोलता..
       मग तू टॉवेल आणि चड्डी घेऊन ऑफिसमध्ये अंघोळ करणार का? हागतो तर रोज तिथेच. ह्यावर न राहवून बघ्यापण हसला.
       नाही रे. पण अजून चार महिने जायचे आहेत. कसं होणार?
       स्टोअर करा. मी दुसरी टाकी लावली आहे घरात.
       अरे पण धरणात पाणी नको का? तू टाकी लावून काय फायदा?
       त्यात एक अनेक वर्षाचे अनुभवी सरकारी नोकर, घरी चार एसी आणि १६००० महिना इलेक्ट्रीसिटी बिल असलेले म्हटले, अहो पाणी आहे. आणि तुम्ही सोसायटीवाले मिळून सगळे नगरसेवकाला घ्या कोपऱ्यात. देईल तो टँकर. निवडणुका होत्या म्हणून आधी भरपूर पाणी दिलं. आता टँकर देईल.
       पुढे एकदम स्टेशन आलं. परत गर्दी हिंदकळली. परत थोडे सेक्सचे, थोडे दारूचे, थोडे आज न आलेल्या माणसांचे जोक्स झाले. मग परत लोक आपापल्या मोबाईलमध्ये बुडून गेले.
       बघ्या विचार करत राहिला, धरणात नेमकं पाणी किती शिल्लक आहे? आणि हा मान्सूनपण वाईट गेला तर? म्हणजे एल निनो तर उष्ण आहे, प्रेडिक्शन आहे तसं भयंकर उन्हाळा आणि...
       बघ्या कासावीस झाला. च्युत्या..
--
       बाकी ऑफिसात ए सी होता. बघ्याचे प्रश्न निवले. त्याचा बॉस म्हटला की अरे स्मार्ट सिटीच्या फंक्शनमध्ये एक सेमिनार आहे मुंबईवर. तुझ्याकडे आहेत का काही पॉइंट्स.
       बॉस साला जुहू मध्ये राहतो. बॉस मुळातच स्मार्ट आहे.
       ह्या टॉवरमधले लोक स्मार्ट आहेत. क्रेडिटकार्डधारी फॉर्मल. एम.बी.ए. आणि तद्भव किंवा तत्सम अशा डिग्र्यानी परिपूर्ण. ह्यांनाच ह्या शहरात रहायचा हक्क आहे. ह्यांनाच पाणी मिळायला हवे. चोवीस तास. स्वीमिंग पूल. डीस्ट्रेस व्हायला शॉवर.
       माझ्याकडे पॉइंट आहे बॉस. प्राईज रॅशनलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा. वापरेल तो पैसे देईल आणि पैसे देईल तो वापरेल.
       बॉस सखुश हसला. बघ्या म्हटला मनात, पगार वाढतो तर काय घेऊ?
       मग बाकी दिवस गेला सैल सैल. बाया-पोरी, त्यांच्याकडे बघणारे बापे, झुंडीने सिगरेट पिणारे पुरुष आणि थोडक्या बाया, इडली-सांबार किंवा हाफ मिल.
--
       मग परतीच्या वाटेवर, दिवसाचे थोडे तास उरले ते तरी आपले आपले जगू ह्या शीळपट उत्साहाने बघ्या नेमकी लोकल बघून त्यात दमदार चढाई करून टेचाने बसला. मग त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं. तसे परत सगळे मोबाईलला जुगलेले किंवा माना पाडून झोपी गेलेले.
आपल्या सराईत मिडीऑकर होण्याचं बघ्याला एकदम भडभडून आलं.
बघ्याने आपलं अपरिहार्य वाढत गेलेलं वय परत एकदा खुंट्याला लावलं. वापरायच्या आधीच कापायची घाई केलेल्या साऱ्या दोरांना श्रद्धांजली वाहिली. मग त्याने हेडफोन काढले. बर्फ पडणाऱ्या, भला मोठा एच.डी.आय. असलेल्या देशातला मानवी नातेसंबंधांचे तरल वगैरे पेच दाखवणारा एक मूव्ही सिलेक्ट केला. आणि प्रतिमांच्या भिरभिर नशेवर, डौलदार बिल्डिंग आणि मोकळ्या रस्त्यांच्या आयुष्यांना सहा इंची स्क्रीनवर पहात पहात तो आपल्या बिळाकडे निघाला.
--
       चौकात यागाचा धूर झालेला. बाया हार विकायला बसलेल्या, पोरं परत लुचलेली किंवा झोपलेली, बापे बिड्या पीत मागे निर्विकार.
       तेवढयात एका वाहनाने स्मार्ट पद्धतीने वाहन वळवलं. त्याची बायको उतरली. तिने हार घेतले. मग दोघेही गाडीतून उतरून यागाच्या रांगेत उभे राहिले.
       एक आजोबा हळहळले, राँग साईड, पार्किंग काही नाही असं. मग त्यानंतर टाकायचा तो नेमस्त सुस्कारा टाकून त्यांनी हातातला पुडका हार विकणाऱ्या बायांना दिला. चॅरिटीच्या हलक्या आनंदाने त्यांनी देवाला हात जोडले.
       हार विकणाऱ्या बाईच्या पोऱ्याने बिस्किटं खायला सुरुवात केली.
       रांगेतले स्मार्ट जोडपे दर्शनाच्या चरम सीमेला पोचले. कळकट शर्ट आणि अदृश्य चड्डी घातलेल्या अधाशी पोराच्या आईने बनवलेले हार त्यांनी पुजाऱ्याला दिले. मग ते क्षण-दोन क्षण हात जोडून उभे राहिले.
--
       बघ्याला वॉचमन दिसला आणि त्याच्या पोटात गोळा आला. एकदा गांड आणि एकदा तोंड धुता येईल एवढंच पाणी बाकी आहे.
       ‘साब, पानी छोडा था दो घंटा पहिले. आप थे नही.’
       आता उद्या सकाळची वाट पाहणं आलं.
       बघ्याने बिसलेरीच्या दोन बाटल्या विकत घेतल्या. स्मॉल टॉक करताना दुकानदार त्याला राजस्थान किती भयंकर हे सांगू लागला.
       आपल्या काडेपेटीकडे बघ्या जात असताना नेबरने बघ्याला छान स्माईल दिलं. आणि मगासचच वॉचमनने सांगितलेलं मर्फी लॉचं सत्यही.
       बघ्याला दुहेरी वाईट वाटलं, आपल्याकडे पाणी नाही आणि शेजारच्याकडे आहे.
       आपले डेली एक्झिस्टेन्शिअल ओझे आणि सोबत दूध, ब्रेड, अंडी, केक घेऊन बघ्या घरी परतला. बिळात आल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याने झपाट्याने नळ फिरवले. त्यातून थोडे थेंब पडले.
       उद्या, पुढचे चार महिने, राज्यातला दुष्काळ, एल निनो, मान्सून, हांडे, पिंपे घेऊन वाट पाहणारे लोक हे सगळं पाहून बघ्याला एकच वाटलं, जे नेहमीच वाटतं. च्युत्ये आहोत आपण.
       ह्या प्रश्नांना बगल देऊन निघून जा आणि निखळ वैचारिक सहानुभूतीदार व्हा. किंवा सारं काही विकत घेण्याचे पॅकेज मिळवा. स्टोअर करा. स्टोअर करा.

       आपल्याला होणाऱ्या सत्याच्या विलक्षण पण सवयींच्या साक्षात्कारात बघ्या झोपून जाईल. उद्या नळातून सवयीच्या घूरघुरीची पाण्याची धार येईल आणि त्यात सारे साक्षात्कार वाहून सराईत मिडीऑक्रीटी तेवढी तवंग बनून राहील.                      

Saturday, June 27, 2015

किल्ला

दोन दिवसांत दोनदा बघितला मी पिक्चर. कशासाठी? चिन्मय आणि त्याचे मित्र ह्यांच्या सीन्स साठी, त्या सीन्सपाठच्या म्युझिकसाठी, आणि आपल्या मानेमागे हात ठेवून रेलून शब्द नसलेले क्षण आपल्या मनात निनादण्याचे, त्यांच्या येण्याने निर्माण होणाऱ्या बिंब-प्रतिबिंबाच्या साखळीचे सुख अनुभवण्यासाठी.
       माझ्यासाठी काही हा नॉस्टॅल्जिया नाही. मी अशा शाळेत, अशा गावात कधीच नव्हतो. मला असे मित्रही कधी नव्हते आणि मी किंवा त्यांच्यातला कोणी बाकीच्यांना सोडून जाण्याबद्दल सुद्धा मला काही अनुभव नाही.
       मला माझी शाळा आठवते तेव्हा काय आठवतं? स्पर्धा, अगदी तीव्र स्पर्धा, माझ्या मनातली, माझ्या पालकांच्या, आजूबाजूच्या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली, त्यांच्या अॅम्बिशन्स. मग आठवते ती कळप म्हणून असण्याची क्रूरता. फुलपाखरू, गोगलगाय, चतुर, गांडूळ अशा आपल्यापेक्षा कःपदार्थ गोष्टींना संपवण्याची. आणि मग आपल्यातल्या दुबळ्या, नेभळ्या मित्रावर फोकस होणारी. मग सेक्स, थेट नाही, पण मनातला, सगळीकडे भरलेला.
       पण मला त्याचं फार वैषम्य वाटत नाही. आणि असंही नाही की मी ती फेज एन्जॉय केलेली नाही. क्रिकेट नावाची एक गोष्ट आणि त्या गोष्टीने वेडावलेले मित्र ह्यामुळे कायमच त्या साऱ्या दिवसांना मजा होती.   शाळा म्हटली की माझ्या मनासमोर दुपार येते. निवांत जडावून पसरलेली दुपार. फार रखरखीत नाही, पण चकचकीत. वर्गात फिरणारे पंखे, आणि मागच्या बाकांपैकी एका बाकावर बसून कधी खिडकीकडे, कधी वर्गातल्या बाकीच्यांकडे बघणारा एक मुलगा, आणि गोठून गेल्यासारखी वेळ.
       स्वतःबद्दल बोलावसं वाटणं हे न संपणारं व्यसन. त्याला फिक्शनमध्ये टाकून सामाजिक ग्राह्यता मिळवता येते.
--
       कधी कधी वाटतं की आपल्या भोवती एका शिस्तशीर कुरूपता भरत चालली आहे. आणि कोणालाच ह्या शिस्तशीर, पठडीबाज कुरुपतेने आपली स्पेस व्यापली जाण्याची पडलेली नाही. आपण बोलावून बोलावून सांगतो आहोत की हे कुरण, हा नदीकाठ, हा डोंगर, हा बाजूला चार बाकं टाकलेला शांत अरुंद रस्ता, इथे तुम्ही घरं बांधा उंच उंच सिमेंटच्या काडेपेट्यांची. आणि आम्ही त्यातल्या कशाकशाने तरी घासून पेटणा-या काड्या बनू. आम्ही भाषेने पेटू, आम्ही देशाने पेटू, आम्ही जातीने पेटू, आम्ही वर्गकलहाने पेटू. पण आमच्या भोवतीची ही शांतता भरून टाका. कारण त्यात आम्हाला काही सुचत नाही. आम्हाला आमच्या शांततेचे मालकी हक्क द्या आणि टूरिस्टि तुकडे द्या. पण बाकी वेळ आवाजाने, जाहिरातीने, पुढे कसं होईल माझं, माझ्या पुढच्याचं, माझ्या मागच्यांचं ह्या भीतीने, विकत घेण्याच्या पाशवी भुकेने भरा. आम्हाला शांतता नको. येऊ दे, येऊ दे, निळ्या काचांची कॉंक्रिटी स्काय्स्क्रेपर कुरूपता येऊ दे. येऊ दे, येऊ दे, फ्लायओव्हर्सची, मेट्रो आणि मॉलची भरधाव कुरूपता येऊ दे. आमची गर्दी, आमची वखवख साऱ्याला सामावून घेईल.
मी जेव्हा ‘किल्ला’ बघतो, आणि जेव्हा त्यातले समुद्राच्या पार्श्वभूमीचे, तंतुवाद्याच्या स्वरांनी तोललेले क्षण पाहतो तेव्हा मला असं काही वाटत नाही. मी कुरुपतेच्या व्यापत्या जाणीवेला गुंगारा देतो.
सुख. असण्याचे, असू शकण्याच्या अलवार शक्यतांचे सहन न होणारे हळवे, हलके सुख.
--
       आपण खरोखर जेव्हा ८-९-१० वर्षाचे असतो तेव्हा निरागस असतो, म्हणजे निरागस क्रूर, निरागस कुतूहल असलेले, निरागस चिडके, निरागस दुखावले जाणारे, निरागस भित्रे. आपण कसं असावं ह्याचं काहीच आपण आपल्यावर पांघरलेलं नसतं. पण हळूहळू आपल्याला कळतं की आपण कोणता मुखवटा निवडायचा. ज्याला लवकर कळतं तो लवकर शहाणा होतो. किंवा येऊन बसतोच एखादा मुखवटा आपल्यावर, आपण काढून दुसरा काही लावेपर्यंत. आपण त्याला मोठं होणं का म्हणतो, खोटं होणं का म्हणत नाही?
--
       ‘लंपन’ मोठा झाला असता तर तसाच राहिला असता का? का जगानं त्याची घे घे मजा घेऊन त्याला वेगळाच करून सोडला असता? माझ्यातला सिनिक म्हणतो की लंपन मोठा होऊन गेला असता परदेशात, आणि त्याला कायमच नॉस्टॅल्जियाग्रस्त राहायची मुभा राहती. शेवटी नोस्टॅल्जिया म्हणजे काय, स्पेस किंवा टाईम बदलला की बाकी राहणाऱ्या इमेजेस.
--
       शाळेत एक धडा होता, ललितलेख असं त्याचं वर्गीकरण होतं. त्यात एका कवीची शेवटची इच्छा होती, त्याच्या बागेतल्या झाडांखाली झोपून मरण येण्याची.
       मला वाटतं कधीकधी की वयाच्या अशा एका टोकाला येऊन लटकलो आहे की माझ्याकडे सेल्फडील्यूजन करण्याची ताकद नाही, माझ्याकडे गर्दीच्या प्रवाहात स्वतःला सोडण्याची हिंमत नाही आणि कुठल्याही मॅडनेसचा बबल नाही. मी गुदमरत जातो आणि कुठल्याही निवडीची दोरी न मिळाल्याने कोसळतही. मला काहीतरी निवडलं पाहिजे किंवा सगळ्या निवडी संपवण्याची निवड. इट्स सो फक्ड अप.
       दहावीला ‘कोसला’ होता, कादंबरीचा तुकडा असलेला एक धडा. घिरट्या घालत येणारे दुःख आणि झोपलेला बुद्ध, अजंठा मधला. आणि मर्ढेकर, घोटभर उरणाऱ्या गोड हिवाळ्याचे.
       मी माझ्या घराच्या सिलिंगकडे बघत विचार करतो, मरणाचा. अ फिलोसॉफीकल पर्स्पेक्टिव. मरण म्हणजे कशाची भीती वाटते नेमकी? बहुतेक सारं, त्याच परिघात, त्याच आवर्तनात सुरू राहील आपल्यामागे. आपण सुटलो काय, आपण असलो काय.
       पण आपल्याशी उरून राहिलेले केवढे क्षण आहेत, उबदार प्रकाशाचे, मंद, आश्वस्त. आणि त्यांच्यापाठी एक म्युझिकपण, आपले आपल्यालाच ऐकू येणारे.
--
       ‘विहीर’ पहिल्यावर, ‘लिटील प्रिन्स’, पाडस’ वाचल्यावर मला वाटलेलं की आपण आपल्या आतल्या हरवून गेलेल्या, कदाचित आपल्या कल्पनेचाच खेळ असलेल्या एका स्पेसला स्पर्शत आहोत. शक्य असतं तर त्या बबलमध्येच आपण राहिलो असतो.
       पण बबल जातो, फुटत नाही, बस त्यातली स्पेस सवयीच्या, हव्यासाच्या शिस्तबद्ध कुरुपतेने भरून जातो. आणि मग त्याच जड नशेत आपण घरंगळत राहतो.
       कुठेतरी थांबतो, आणि आपल्याशी बेवफाई न करणाऱ्या वेळचा तुकडा पांघरून निवांत होतो, असोशी आणि सुखाच्या हद-अनहद मध्ये.  

       ‘किल्ला’ साठी.                              

Thursday, June 12, 2014

अ लोनली अँड फ्रेंडली जिबरीश

सकाळी हगताना माझ्या डोक्यात दिवसभराच्या अडाणचोटपणाचे प्रश्न येत असतात. माझ्या मते माझ्या भिरभिरत जगायची सवय झालेल्या मेंदूला कालच्या दिवसाचा हँगओव्हर उतरत असताना आज साठी काहीतरी चढवून घ्यायची गरज असते. मग मी असे प्रश्न घेतो.
       तर हा प्रश्न काय होता की आपण सत्य असं जे काही असतं त्याला फिक्शनने सबस्टिट्यूट करू शकतो काय. सकाळी सकाळी वाटतं तसं मला हा प्रश्न एकदम फंडामेंटल वाटला. मग ब्रश करताना, दातांचे एक एक प्रकार टप्प्याटप्प्याने घासताना मी माझ्या प्रश्नाचा तुकड्या-तुकड्याने आणि टप्प्या-टप्प्याने विचार करू लागलो. आणि पहिल्या टप्प्याला हिंदकळलो.
       तुम्ही गेस केलं असेल तर हा पहिला तुकडा म्हणजे ‘सत्य’ काय असतं बुवा. म्हणजे ह्यावर थोर थोर विचारवंत वगैरे खल करून गेले आहेत. आणि आपला काही असला पाड नाही. पण म्हणजे काही गोष्टी मला माहिती आहेत, मी त्या ऐकल्या-पाहिल्या आहेत, आपल्या त्वचेने, जिभेने अनुभवल्या आहेत. पण उद्या तुम्ही मला विचारलात की हं, कर पाहू सिद्ध आता तुला सत्य वाटणाऱ्या ह्या गोष्टी तर मी त्यातल्या काही गोष्टी सिद्ध करूच शकणार नाही. आता हे सिद्ध करणं काय आहे? तर म्हणजे तुम्ही तुमच्या तर्काच्या आधाराने निष्कर्ष काढू शकाल असं काहीतरी पुराव्यासारखा मी तुम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे मी अमुक एक बाईचे अपत्य आहे हे सिद्ध करायचं आहे मला तर मी तुम्हाला डी.एन.ए. टेस्ट वगैरे करून त्याचे निर्णय देऊ शकतो. पण वयाच्या अमुक एक वर्षी मी पहिल्यांदा हस्तमैथुन केलं ह्याचा काही पुरावा सद्यस्थितीत मी तुम्हाला देऊ शकणार नाही. हे उदाहरण थोडं असांस्कृतिक आहे, पण ते जबरी असल्याकारणाने दिलं होतं. थोडं मधलं घ्यायचं म्हणाल तर मी अमुक एक दिवशी अमुक एक माणसाबरोबर चित्रपट पहायला गेलो होतो ह्याच पुरावा मी तुम्हाला काय देऊ शकतो? माझ्याकडे आता त्या शोचे तिकीट तर नाही. पण मग मी तुम्हाला त्या अमुक माणसाचे होकारार्थी उत्तर देऊ शकतो. पण आता हे सत्य तुम्ही मी अमुक एक बाईचा मुलगा आहे ह्या सत्याच्या एवढेच पक्के सत्य मानाल का थोडे कच्चे सत्य मानाल? कारण असं असू शकतं की त्या माणसाने अंदाजे हो म्हटलं आहे किंवा तो धादांत खोटं बोलत आहे. सत्याच्या अशा पातळ्या असतात काय? सत्य हे वैयक्तिक अनुभवांचा भाग असते का सार्वत्रिक? म्हणजे आम्ही ३ मित्रांनी मिळून ग्रहण पहिले होते ह्याला तीन वैयक्तिक सत्ये मानायची का एक सार्वत्रिक सत्य?
       आधी म्हटलं तसं हे अडाणचोट प्रश्न आहेत आणि त्यांचा व्यवहारकुशल माणसाला काही उपयोग नाही. व्यवहारात सत्य ही पॉप्युलर चॉईस सारखी गोष्ट असते. म्हणजे ५०० रुपयाच्या नोटेचे मूल्य ५०० रुपये आहे कारण आपण सगळे तसं मानून चालतो आहोत. उद्या समजा ५०% लोकांना एकदम असं वाटायला लागलं की नाही, बहुतेक ५०० रुपयाच्या नोटा ह्या खोट्या आहेत तर तिची किंमत १०० च्या ५ नोटा अशी राहणार नाही. किंवा शाळेत माझा एक मित्र असे प्रश्न विचारून मार खायचा, की तीनला तीन का म्हणतात, चार का नाही, खडूला खडू का म्हणतात असं. पण असं काही नाही.
       माझे एक शिक्षक म्हणायचे की सत्य असं काही नसतं. प्रत्येक विधान हे संभाव्यता असतं. म्हणजे खरंतर आपण बतुतेक, बऱ्याचदा असे शब्द वापरून बरीचशी वाक्ये बोलली पाहिजेत. जसं मी बहुतेकदा च्युत्याप करतो. किंवा ‘क्ष’ व्यक्ती हा बहुतेकदा महापुरुष होता. पण काही वाक्य आपण निर्विवाद सत्य म्हणून सांगू शकतो, जसं मी होमो सेपियन आहे. मी नर आहे. अमुक एक माणूस माझा बाप आहे. इथे बहुतेक वगैरे नको.
       पण अमुक एक माणूस माझा खापर पणजोबा होता असं म्हणताना मी हे विधान सत्य का नाही हे कसं पारखावं? म्हणजे माझ्या घरात त्या माणसाचे फोटो आहेत, त्यांच्या नावाचे दस्ताऐवज आहेत. पण तरी हा माणूस माझा खापर पणजोबा आहेत ह्याचा थेट जैविक पुरावा मौजूद नाही. मग इथे काय करावं? हा माणूस बहुतेक माझा खापर पणजोबा आहे असं म्हणावं का माझ्या निर्विवाद सत्य होऊ शकणाऱ्या बापावर विश्वास ठेवावा? का तो खापर पणजोबा नाही असे सिद्ध करणाऱ्या पुराव्याच्या अभावाने सध्यातरी त्याला माझा खापर पणजोबा मानून चालावं?
       म्हणजे काही सत्ये अशी असतात का ज्यावर आपण विश्वास ठेवल्याने ती सत्य होतात? का असत्य म्हणून न दाखवता आल्याने उरलं काय ते सत्य अशी रेसिड्यूअल भूमिका घेऊन आपण सत्य काय ते ठरवतो? पण मग असत्य म्हणजे काय ते आपण कसं ठरवतो? म्हणजे तर्काच्या आधाराने आपण काहीतरी एकच जाणून घेऊ शकतो, सगळी साखळी नाही. सुरुवातीचा बिंदू म्हणजे आपला विश्वासच, बऱ्याचदा ठोकून घट्ट बसलेल्या खुंट्यासारखा.
पण हे एवढे प्रश्न आले कुठून? सत्य म्हणजे काय? आणि एखादी गोष्ट सत्य आहे का नाही हे माहीत  नसेल पण तरीही ती गोष्ट बोलायची असेल तर? माझा एक मित्र म्हणायचा, की आपण अॅबसुल्युटली फ्री नसतो. दुसऱ्यांना हानी न करता येईल एवढंच आपलं फ्रीडम असतं. म्हणजे आपलं सत्य आहे का नाही ह्याची शाश्वती नसलेलं काही बोलायचं फ्रीडम कुठपर्यंत आहे, तर दुसऱ्यांची हानी त्यात होत नाही तिथपर्यंतच? आणि कोणाची हानी होतीये म्हणजे नेमकं काय होतंय, हानी होते म्हणणारा खरंच हानी होतीये म्हणून म्हणतोय का, आणि न म्हणणाऱ्या कोणाची खरंच हानी होतीये एवढं सगळं तपासून घेईपर्यंत काय बोलायचं शिल्लक राहणार? बोलायचं असतं ते जिकीर करून, फिकीर करून नाही असं का?
असा सत्य वगैरे गोष्टींचा काही उपयोग असतो का लोकांना? माझा एक अॅस्ट्रॉनॉमी करणारा मित्र म्हणतो की काय उपयोग ह्या रिसर्चचा? आपण शोधलेल्या एखाद्या गोष्टीचा उपयोग, म्हणजे ती ओरबाडून आपल्या भुका भागवायला काही एक प्रकार अस्तित्वात येईपर्यंत आपल्या किती पिढ्या संपतील, त्यापेक्षा फिनान्स करावा. औषधं शोधणारे लोक असं म्हणत नसतील. व्हायग्रा नसती आली तर तोटा झालाच असता. आणि ती येण्यासाठी सत्य कळावं लागलंच. असं म्हणू नये खरं, पेनिसिलीन म्हटलं असतं तरी चालतं.
पण साहित्यिक, ऐतिहासिक सत्यांचा काय उपयोग असतो? म्हणजे महापुरुष क्र.१०४ हे दिवसातून ५ वेळा चहा पीत असं त्यांच्या किराणा मालाच्या बिलावरून आपण ९५% आत्मविश्वासाने म्हणू शकतो असं कळल्याने काय होईल? आणि समजा असं झाल्याने, आजवर ते दिवसातून दोनदाच चहा पीत असं वाटणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या तर? ५% च्या नसलेल्या आत्मविश्वासाला एवढे बळी? हे अगदीच फाचाट हायपोथेटिकल आहे म्हणा, सिरीयस काय लिहिणार आपण ते सत्य आहे का नाही हे ठाऊक नसताना. मूळ प्रश्नाशी दगाबाजी नाही.
खूप झालं सत्याबद्दल. आता फिक्शनबद्दल बोलू.
--
मी एका पुस्तकात वाचलं होतं की फिक्शनल गोष्टी खऱ्या गोष्टींहून अधिक वास्तववादी असतात. अशा वाक्यांना मैलाचे दगड मानायच्या अडाणचोट दिवसांत वाचलेलं. अजून काय लिहिणार फिक्शनबद्दल.
--
पण म्हणजे काय पुस्तकांवर बंदी घालावी काय? माझा एक मित्र म्हणतो की बंदी घातलेल्या गोष्टींची डिमांड वाढते खरंतर. दुसरा म्हणतो की असं काही नाही. डान्सबारवर बंदी नव्हती तेव्हा मी पण जायचो, आता परवडत नाही.
पहिला म्हणतो की पण मुळात टेक्स्टबुक आणि रेफरन्स सोडले तर बाकी पुस्तके तर मनोरंजन म्हणूनच असतात. दुसरा म्हणतो असं काही नाही, जसं आध्यात्मिक. पहिला म्हणतो तसं मी हे तुला दाखवू शकतो, माझ्या व्याख्या वापरून की सगळंच मनोरंजन असतं पण जाऊ दे. दॅट विल बी टू मच.
पहिला म्हणतो की भले एका ठराविक भाषेत आजपर्यंत एकही उपयोगी पुस्तक नसेल, पण येणार नाही का ह्यापुढे. बंदी घातली तर समाजोपयोगी प्रतिभा वाया जाईल. दुसरा म्हणतो यू ब्लडी युटिलेटिरियन.
पहिला म्हणतो की का रे पण असं की एका भाषेत फिक्शन नाहीच. दुसरा म्हणतो की जिथे नशेला मान नाही, तिथे फिक्शनला कुठे. फिक्शन नशा यार, फिक्शन मॅजिक.
पहिला म्हणतो असं काही नाही यार. वी हॅव टू मॅच डिफरंट करंटस्. आपलं सोडून आपण सगळं असं दुसऱ्याचं कसं घेणार? दुसरा म्हणतो तुझं म्हणजे काय, युर पास्ट, ऑर युर फादर’स पास्ट का तुझी ही बॉडी, तुझी त्वचा, तुझी भूक, तुझी तहान, तुझे प्रश्न का तुझी मेमरी? वी आर डिफाइंड इन सो मेनी मॅनर्स माय फ्रेंड, ओन्ली कनक्ल्यूजन अॅव्हेलेबल टू अस इज टू मेनी कनक्ल्यूजनस्.
पहिला म्हणतो आय अॅग्री टू डीसअॅग्री. दुसरा म्हणतो यू फकिंग लिबरल. कम ऑन फाईट.
--
फिक्शन आणि सत्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? डोन्ट आस्क बिग क्वेश्चन्स फॉर सच अ पेटी मॅटर. आपले पेचात टाकणारे नैतिक प्रश्न आपण मोक्याच्या वेळेसाठी राखून ठेवू.
पण तुला हा श्रद्धा, बहुतेकांचे पत, न्यायनिवाडा आणि लिहिणाऱ्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवावाच लागेल.
चील ड्यूड. तुला एक सांगू, हे लिहिणं, विचार ही अशी गोष्ट आहे ना जिचं मोठेपण सेल्फ प्रोक्लेमड आहे. तू जर दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये टाकलंस तर तुला खरी गंमत दिसेल. इट्स कमोडिटी माय फ्रेंड. अ ड्युरेबल कमोडिटी. आणि इतर कुठल्याही कमोडिटीसारखी तिच्या डिमांडमुळे तिच्या इनपुट्सची किंमत ठरते. तिच्यात इंन्ट्रिसिक महत्वाचे काही नाही. असे महत्व हा फक्त मार्केटिंगचा प्रकार आहे, अ व्हेरी सक्सेसफुल मार्केटिंग. पण इथले लोक सगळं जाणून आहेत. म्हणूनच ते अग्रलेख सगळ्यात जास्त वाचतात, त्या खालोखाल इतिहास आणि उरलेले बाकीचे. दे नेव्हर बॉट धिस मार्केटिंग.
टू मच ड्यूड. यू टेक इट टू फार. मी तर एवढंच म्हणतोय की एव्हन फॉर अ कमोडिटी, यू कॅननॉट स्टॉप प्रड्यूसर जस्ट कॉज समवन हॅज अ साइड इफेक्ट. पॅसिव्ह स्मोकिंगने त्रास होतो म्हणून सिगरेट्सवर बंदी नाही घालत.
रीडीक्युलस उदाहरण, पण मुद्दा पोचला. पण तू श्रद्धेला अंडरएस्टिमेट करतोयेस मित्रा. मी तुला एक मूलभूत प्रश्न करतो मित्रा. जर तुला एखाद्या माणसाला विचार किंवा श्रद्धा ह्यापैकी एकच शिकवू शकणार असशील तर काय शिकवशील?
आह, हे असलं गुळचट नको मित्रा, डोळस श्रद्धा वगैरे. श्रद्धा इज फकिंग श्रद्धा, त्यात डोळस-अंध काही नाही. तुमचा विश्वास की असं एक ठाम काहीतरी आहे जे तुमच्या आयुष्यातले स्पष्टीकरण ण देता येणारे एक्स-फॅक्टर्स कंट्रोल करतं. आणि असं जे ठाम आहे ते बरोबर तुमचा हात पकडून तुम्हाला तुमच्या नियोजित आणि इप्सित ठिकाणी ठेवेल. आणि विचार म्हणजे तुम्ही असं एक्स-फॅक्टर काही मानणार नाही. फॉर यू, इट्स कॉज आणि इफेक्ट किंवा सरळ अर्थहीनता. त्यांच्या त्यांच्या प्युअर फॉर्मस् मध्ये ह्या दोन गोष्टी एकमेकांबरोबर जाऊच शकणार नाही. सो सांग मला, काय शिकवशील, स्केप्टिकल, सोलत सोलत जाणारा विचार का श्रद्धा?
तुझा सायलेन्स काय सांगतोय माहितीये की जरी तुला ‘विचार’ सांगावसं वाटत असलं तरी तुला असं ठाम सांगता येत नाही की श्रद्धेपेक्षा विचार बरा. कारण तू विचार करतोस. पण जर तू श्रद्धावान असतास तर तुझं उत्तर सोपं होतं. आणि इतक्या सगळ्यांना इतकं सगळं सोपं, सहज, गुळगुळीत ज्याने घसरता यावं आणि सावरताही यावं असं करून देणारी गोष्ट सोडून तू विचारांचं स्वातंत्र्य वगैरे सांगायला जातोस आणि खरंतर तुलाही माहिती नाही की ह्यातलं लोकांना जास्त उपयोगी काय.
       कदाचित. पण म्हणजे तू छुपा संस्कृतीरक्षक तर नाहीस? असे हुशारीचे शब्द वापरून तू मला जाळ्यात अडकवतोयेस आणि सांगतोयेस की जाळ्यातच भलाई आहे.
       नाही. तुझ्यासारखा मी पण कोड्यात पडलेला आहे, एका कोड्यातून दुसऱ्या कोड्यात. पण मला असं दिसतंय की श्रद्धेचे, विश्वासाचे हे सारे भक्कम अडसर का आहेत, त्यांच्या आड काय एवढं सांभाळलं जातं हे तर मला आधी शोधायला लागेल. पण म्हणून मी ते अडसर मोडून टाकत नाही की त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. असं केलं तर? समजा आपण असं ठरवलं की ह्यापुढे असं होतं का नाही असे प्रश्नच सोडून दिले तर? आपण ह्या सगळ्या गोंधळाला फिक्शनलाइज केलं तर? कदाचित ते जास्त खरं असेल का?
       पळतोयस तू
       असेल. आहेच कदाचित. पण असंही असेल की तपशिलांचे टवके उडवले की आतला सगळा कंटेंट मला मिळेल. कदाचित मी निवड करतोय आणि तू अडेलतट्टूपणा.
--
       चल आपण नॉस्टेल्जिक होऊ. शाळेत कसं शिकवलं तसं सुरुवात नाही पण शेवट कवितेच्या एका ओळीने कर. आणि नॉस्टेल्जिक होतोयेस तरी मुद्रण हक्क वगैरे एथिकल हवं बरं. चल सांग.
साल्या, कॅपिटलिस्ट, ऐक, तुकाराम महाराज म्हटलेले बरं असं, बाकी ठाऊक नाही, हवं तर खटला टाक.
काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले
हा,हा. माझ्या लिबरल शहामृग मित्रा, तू असा इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून राहणार आणि तरीही म्हणणार की मला नवं दिसतं. अर्धी वापरलीस, पुढच्या ओळीसकट घेतास तर वेगळा राहता अर्थ.  काही म्हणूच नकोस पुढे, आपण इथेच मारू आधुनिक झेंडा आणि जाऊ मॅजिक पोएट्री चे प्याले रिचवायला.
जगती की शीतल हाला सी पथिक, नाही मेरी हाला
जगती के ठंडे प्याले सा पथिक नाही मेरा प्याला
ज्वाला सुरा जलते प्याले में दग्ध हृद्य की कविता है
जलने से भयभीत न हो आए मेरी मधुशाला
(काळ बदलले, भाषा, तरी अर्थ कसे जुळतात अशी कुजबुज मागे फक्त..)
१  १.  http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता
२ .‘http://www.ics.uci.edu/~ashish/madhushala.pdf’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता 

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...