Showing posts with label नाटक. Show all posts
Showing posts with label नाटक. Show all posts

Sunday, July 16, 2017

मकरंद साठे ह्यांचे ‘काळे रहस्य’ आणि बाकी काही वाचले-पाहिलेले

प्रतिमा सौजन्य: बुकगंगा 

मकरंद साठे ह्यांचं ‘अच्युत आठवले आणि आठवण’ हे मी वाचलं आहे. पण जेव्हा ‘सध्या नवी कोणती मराठी पुस्तके वाचावीत’ ह्या एका फेसबुक पोस्टमध्ये (जी माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमधली नव्हती) त्यावर कुणीतरी लिहिलेल्या १५-२० पुस्तकांच्या यादीत मला ‘काळे रहस्य’ आणि त्याच्या लेखकाचं नाव दिसलं तेव्हा मला ह्यांनीच ‘अच्युत आठवले आणि आठवण’ लिहिलं आहे हे अजाबात क्लिक झालं नव्हतं. हे क्लिक झालं मध्येच केव्हातरी पुस्तक वाचताना. मग ते कन्फर्म करायला पुस्तकाच्या सुरुवातीला पाहिलं तर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक पण मकरंद साठे ह्यांनी लिहिलं आहे हे पण माझ्या लक्षात आलं आणि ‘काळे रहस्य’ ची पुस्तकाच्या नूराशी एकदम फटकून असणारी, भावनिक वाटू शकेल अशी ‘अर्पणपत्रिका’ (किंवा ‘ह्यांना’ पत्रिका) हीपण लक्षात आली. 

मला पुस्तक आवडलं का नाही असा एकदम ढोबळ प्रश्न घेतला तर ‘आवडलं’ या बाजूला झुकणारं उत्तर मी देईन. पण त्याचवेळी जसं मला ‘शोध’ हे पुस्तक आवडलं, किंवा अरुण साधू ह्यांचं ‘सिंहासन’ किंवा ‘मुखवटा’ आवडलं तसं आवडलं का असं विचारलं तर मला ‘नाही’ कडे झुकणारं उत्तर द्यावं लागेल. 
आपल्या जगण्याबाबतच्या निरीक्षणांना गोष्टीच्या मिषाने निबंध-कम-संवाद-कम-निरीक्षण-कम-सिनिसिझम अशा अत्यंत फ्लुइड अशा स्वरुपात सरकवणं/सादर करणं ह्या जॉनरला काय म्हणतात? ‘क्वाझाय(quasi) -कथा’ असं त्यांना म्हणता येईल. असं जॉनर करावं लागेल असं म्हणायला मी सध्या वाचतोय ते आनंद जातेगावकर ह्यांचं ‘अस्वस्थ वर्तमान’. 
‘काळे रहस्य’ सणसणीत सुरू होते. प्रारंभापासूनच वर्णनाची खोचक शैली लक्ष वेधून घेते. त्या सुरुवातीनंतर ती थोडी मंदावते, फैलावते, वेगवेगळ्या व्यक्तींची, जशी ‘चांगदेव चतुष्टय’ किंवा ‘हिंदू’ मध्ये धुतली आहेत तशी धुणी धुतली जातात (आपल्या समकालीन आणि सहमार्गी लोकांन फिक्शनलाईझ करून त्या बाहुल्यांना खेळवणं हा काव्यगत न्याय का!) आणि एकदम ब्रिस्क अशा पद्धतीने ‘काळे रहस्य’ संपते. एका अवास्तव भासणाऱ्या बिंदूभोवती निरीक्षणपूर्ण वास्तविक मांडणी करणं आणि त्यात गोष्ट सांगू पाहणं हे ‘काळे रहस्य’ करू पाहतं. हे वेगळेपण जसं ‘काळे रहस्य’ ला ताकदवान करतं तसंच त्याचं अपिलही मर्यादित करतं. बलाढ्य भावनाविवश संवाद नसलेल्या पण काटेकोर उभ्या केलेल्या नाटकाची शिस्त एकेकदा ‘काळे रहस्य’ मध्ये जाणवते, पण काहीवेळेला ते उगाच घोटाळत राहतं. 
सुरुवातीपासूनच ही नुसती गोष्ट नाही, कमेंट आहे, गोष्ट सांगण्याचा प्रयोग आहे हे सगळं सांगण्याचा कधी त्रयस्थ, काही थेट लेखक-वाचक संवाद असा पवित्रा लेखक घेत राहतो. ही गोष्ट काय आहे, ही कमेंट काय आहे हे अत्यंत तटस्थपणे नोंदवून देण्याचा प्रयत्न लेखक करतो. हा तटस्थपणा आणि त्यातून नोंदवायची सिनिकल अशी अप्रत्यक्ष कमेंट लेखकाला साधली आहे. पण ही गोष्ट नाही. ही एक अस्वस्थता आहे. ह्या अस्वस्थतेचं तात्पर्य सोप्पं नाही, पण तिच्यावर आपल्यापरीने एक उपाय करण्याचा थॉट एक्सपिरिमेंट म्हणून गोष्ट लिहावी असं ‘काळे रहस्य’ आहे. त्या प्रयोगाच्या रचनेने आलेली स्वाभाविक रंजकता एवढीच ‘काळे रहस्य’ च्या रंजकतेची व्याप्ती आहे. बाकी ‘काळे रहस्य’ वाचताना येणारी मजा ही सखोल आहे, स्वाभाविक पुस्तक-वाचनाच्या रंजकतेची नाही. 
--
त्या आधी ‘कोसला+चांगदेव’ चं आधुनिक पण अपडेट केलेलं आणि थोडं सोबर व्हर्जन वाटावं अशी ‘नामशेष होणारं माणूस’ वाचली. एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे कि नेमाड्यांच्या लिखाणाबरोबर तुलना हा लेखकाला कमी लेखायचा भाग नाही. हा लेखनाच्या वर्गीकरणाचा टॅग आहे. अर्थात कोसला+चांगदेवमध्ये टोकदार व्यक्ती पर्स्पेक्टीव्ह आणि आजूबाजूचे कंगोरेदार पण दुय्यम फोकस केलेले सामाजिक-राजकीय संदर्भ अशी रचना आहे. ‘नामशेष होत जाणारं माणूस’ मध्ये हे कंगोरे अधिक धारदार होतात, प्रसंगी तेच गोष्ट बनतात. कादंबरीचा नायक एका राजकारणातून निवृत्त झालेल्या, पण पीळ राखून असलेल्या नेत्याच्या आत्मचरीत्राबाबत त्याच्याशी भेटतो-बोलतो हा धागा ‘नामशेष..’ ने चांगला डेव्हलप केला आहे. ‘नामशेष..’ ने पृष्ठसंख्या आणि कादंबरी नायकाचा प्रवास ह्याबाबतीत अजून थोडी मजल मारली असती तर मजा आली असती असं वाटतं. 
--
काल ‘प्रीथ्वी’ नाट्यगृहात, अत्यंत हिप अशा क्राउड आणि माहौलमध्ये ‘गजब कहानी’ हे नाटक पाहिलं. 
प्रतिमा सौजन्य: http://www.mumbaitheatreguide.com
५०० रुपये तिकीट गेल्याने हा नाटकाबाबत काही शब्द बोलणं भाग आहे! सारामागोच्या ‘एलीफंट’स जर्नी’ ह्या कादंबरीवर आधारित हे नाटक होतं. मध्यंतर नसलेला २ तासाचा प्रयोग खरंतर जरा जास्त वाटला. (हे ‘पृथ्वी’ला ९ चा शो असल्याने झालं काय?) नेपथ्य, मंचावर जे घडणार त्याचे व्हिज्युअलायझेशन अशा अर्थाने आणि ‘पृथ्वी’ ला अत्यंत जवळ बसून नाटक बघणं ह्या अनुभवाने मजा आली. पण आपल्याला काही हिट(लागणं अशा अर्थाने) होत नाही, जसं ‘हंडाभर चांदण्या’ बघताना होतं. 
सारामागोची मी वाचलेली आणि थॉट एक्सपिरिमेंटचा एक बाप प्रकार म्हणून म्हणता येईल अशी कादंबरी म्हणजे ‘ब्लाइन्डनेस’. मी ‘एलीफंट’स जर्नी’ वाचलेलं नाही. 
थेट नाटक लिहिणं आणि कथा-कादंबरी ह्यांचं नाट्य-रुपांतर ह्यांमध्ये काही मूलभूत फरक राहतातच का? 
नाटक हे दृश्य, प्रेक्षक त्यांच्या भौतिक, जिवंत डोळ्यांनी पाहणार असं माध्यम आहे. जरी 
लिखाण वाचताना होणारं व्हिज्युअलायझेशन हे वाचणाऱ्याच्या मनात आहे.
जरी नाटकही सरतेशेवटी मनाशीच पोचणार असलं तरी त्याच्या दृश्य मानसिक प्रतिबिंबाला प्रत्यक्ष नाटक कसं दिसलं ह्याचाच बेसिस राहणार आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकाला मिळणाऱ्या अनुभवाला एक स्वाभाविक चौकट आहे. हत्ती, मांजर, टेबल बोलणं, व्यक्त होणं हे अवास्तव नाटकात उघडं पडतं. तुलनेने कादंबरी ह्या अवास्तवाचा अवकाश जास्त ताकदीने मांडू शकते. कारण कादंबरीचा-कथेचा अनुभव हा तेव्हा उघड होणाऱ्या कुठल्याही फिजिकल क्ल्यूवर जन्मलेला नाही. वाचणाऱ्याच्या अगोदरच्या अनुभवांच्या उरलेल्या सांगाड्यातच कथेचा खेळ उलगडणार आहे. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ फॅंटसी नाटकाला झेपेल का? नाटकातील नेपथ्याने पुरेशी मजल गाठली की नाटक म्हणून लिहिलेलं नाटक आणि कथा-कादंबरीतून अंतरित केलेलं नाटक ह्यांच्यात असू शकतो असा फरक नष्ट होईल का? 
--                   

Sunday, February 26, 2017

हंडाभर चांदण्या


       मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता.
      
प्रतिमा: https://www.pahawemanache.com/review/handabhar-chandanya-marathi-experimental-drama-review
नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि प्रश्न ह्यांची गुंफण ‘हंडाभर चांदण्या’ ला उत्तम जमली आहे.
       नाटक बघताना मला जाणवलं की नाटकाच्या शेवटच्या थोडासा आधी नाटकाचा सर्वात वरचा, सर्वात तीव्र भिडणारा बिंदू येतो. तिथेच नाटक थांबवून प्रेक्षकाला भिरकावून देणं अधिक परिणामकारक झालं असतं असं माझं मत आहे. अर्थात नाटकाचा शेवट हाही फिटिंग एंड आहे, पण तीव्रतर बिंदू आणि शेवट ह्यांच्यामधला प्रवास हा एकदम भावनागच्च प्रकाराने होतो. थंड, निर्विकार स्टोरी-टेलिंगकडे मी बायस असल्याने कदाचित माझं असं मत असेल.
       कदाचित नाटक लिहिणाऱ्याने ज्या वस्तुस्थिती, ज्या निरीक्षणांवर नाटक लिहिलं त्यात असणारी अस्वस्थता, त्यात असणारी प्रश्न तडीस लागावा ही निकड ह्याचा विचार केला तर शेवट योग्यच आहे असं मला नंतर जाणवलं.
--
       ह्या वर्षी पाण्याचा प्रश्न बिकट नाहीये. होळीला पाणी जपून वापरा, क्रिकेट मैदानांवर पाणी वाया घालवू नका, पाण्याचे लोडशेडींग ह्या बातम्या आपण ह्या वर्षी वृत्तपत्रांत वाचणार नाही. ह्या साऱ्या बातम्या अडवून ठेवण्याचा पाणीसाठा महाराष्ट्रातील धरणांत ह्यावर्षी आहे, मराठवाड्यातही आहे. त्यामुळे ह्यावर्षी नुसतंच उकडणार आहे. आत्ता हे लिहितो आहे तेव्हा माझ्या माथ्यावर एक शक्तिहीन पंखा भिरभिरतो आहे. खिडकीतून येणारी हवा हळूहळू गरम होणार आहे. मोबाईलवर आजचे कमाल तापमान ३८.५ डिग्री सेल्सियस असं दिसतं आहे. महाभिकार, अंथरुणावर टेकलेली शरीराची पंख्याला दुरावलेली बाजू भिजवून टाकणारे चिकचिकीत दिवस आणि त्यात हे गरगर चालणारं गर्दीचं शहर.
       २०११ ची जनगणना सांगते कि २०११ साली महाराष्ट्रात २५.५ लाख ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरापासून १ किमीहून अधिक अंतरावरून प्यायचं पाणी आणायला लागत होतं. शहरी भागात ५.५ लाख कुटुंबांना ५०० मीटरहून अधिक अंतरावरून प्यायचं पाणी आणायला लागत होतं. ग्रामीण भागात ३२% कुटुंबांना तर शहरी भागात ८६% घरांना प्रक्रिया केलेले पाणी नळाने मिळत होते. ६ वर्षानंतर ह्यात किती बदल झालेला असेल? ह्यावर्षीचा मान्सून नीट झाला नाही तर पुढच्या वर्षी किती आक्रोश होईल?
--
       नाटकांत कवनंसदृश्य गाणं वापरणं हे ‘हंडाभर चांदण्या’ चं एक वैशिष्ट्य आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ नेही गाण्यांचा उपयोग फर्मास केलेला होता.
       मी हे नाटक बघू शकलो कारण मराठी भाषा, नाट्यसंस्कृती वगैरे गोष्टीची जपणूक करण्यासाठी स्थापन झालेल्या एका संघटनेने अशी सुंदर, छान नाटके दाखवण्याचा उपक्रम हातात घेतलेला आहे. ते १०० रुपयांत नाटक दाखवणार असतील तर मी त्यांची सुरुवातीची आणि शेवटची ‘सुंदर, छान, भाषेची-नाटकांची जपणूक, शहरी अस्मितेवर फुंकर (....करांचे प्रेम फेम), हा आमचा प्रयत्न, (आणि कुख्यात असे) ह्या ठिकाणी’ असे शब्द असलेली कमाल १० मिनिटाची आत्मस्तुती ऐकण्यास तयार आहे. पण ‘हंडाभर चांदणे’ पाहून त्याला सुंदर, छान असे म्हणू शकणाऱ्या लोकांबाबत किंवा मग माझ्या नाटक समजण्याच्या क्षमतेबाबत माझा मनात जी आशंका आहे ती काय जाणार नाही.
--
       आपण नाटक कुठे बघतो ह्याचा नाही म्हटलं तरी एक छोटासा रोल असतोच. पृथ्वीला नाटक बघणं, एन.सी.पी.ए.ला experimental theatre ला नाटक बघणं, आणि अमुक महान मनुष्य नाट्यगृह अशा नाट्यगृहांत नाटक बघणं हे वेगवेगळं होऊन जातं. बसण्याची रचना, नाटक आणि आपल्यातलं अंतर हे घटक त्यांचं काम करत असतात. ह्या भौतिक घटकांच्याइतकाच महत्वाचा भाग असतो बघायला आलेले लोक.
       भारतातल्या, किंवा अलम दुनियेतल्याच म्हणा बहुतेक गोष्टी ह्या सोशल नेटवर्कने प्रभावित असतात. म्हणजे माझ्या सिनिकल दुनियेत तर सारं काही ‘मित्रोक्रसी’ वरच चालतं. नाटक बघायला कोण येतं ह्यातही अशा सोशल नेटवर्कचा भाग असतो. जनरली मी ज्या अमुक महापुरुष नाट्यगृहात नाटक बघतो तिथे व्यावसायिक नाटकांना जो क्राउड असतो त्यात अर्धे लोक बिन नातेवाईक लग्नांना जावं तसे दिसणारे असतात आणि बाकीचे मॉलमधले मध्यमवर्गीय दिसतात तसे असतात. ते नाटकातल्या प्रसंगांना काही फार दाद वगैरे देत नाहीत, पण खोचक उपजातीय/भाषिक/भंपक शहरी आयडेंटिटी जोक्सना मनमुराद हसतात. आठवड्याचे पाच-सहा दिवस उपजीविकेचे कुरण चर-चर चरल्यावर तोंड पुसायला टिश्यू पेपर घ्यावा तसे लोक शेवटच्या दिवसाला काही करतात. त्यातला एक हुच्च टिश्यू-पेपर म्हणजे व्यावसायिक नाटके बघणे.
       पण आठवड्याचे सारेच दिवस वीकेंड नसल्याने काही वेळेला ‘हंडाभर चांदण्या’ सारखा प्रकार येतो. मेन स्ट्रीम तिकिटांच्या १/३, १/२ दर. त्यात शहरात अनेक नाटकग्रुप, आयोजकांचे तगडे सोशल नेटवर्क. त्यामुळे नाटकाला दोन गट येतात, एक आपण अभिनय करतो, नाटकवाले आहोत ह्या कैफातील तरुण गट, आणि आपलं कोणीतरी आहे ह्या नाटकात म्हणून आलेले कबिले, ज्यांची वयाची रेंज १-८० वर्षे. काही नामचीन लोक आणि त्यांचे ऐकायला आतुर काही त्यांच्या आजूबाजूला. १०० रुपये तिकिटाचे नाटक असल्याने ४० रुपयाला २ समोसे विकणारा मात्र बंद.
       अर्ध्याहून अधिक प्रेक्षक हे नाटकाच्या मध्यात तुटल्यासारखे झालेले, वरकरणी विनोद, पण आतून सिनिकल, वेदनादायी कमेंट करणाऱ्या संवादांना खळखळून हसणारे लोक.
       अर्थात मला आजूबाजूला कोण नाटक बघतायेत हे फार वेळ जाणवलं नाहीच. समोरचं नाटक मला खेचून गेलं.
       अर्थात प्रेक्षकांचं तुटणं हे काही अमुक ठिकाणीच होतं असं नाही. पाच-एक वर्षापूर्वी मुंबईतल्या एका हुच्च ठिकाणी नसरुद्दिन शहाचे ‘वेटिंग फोर गोदो’ बघताना पब्लिक असंच गंडलं होतं. त्यात ‘नसरुद्दिन शाह है यार’ असं म्हणून आपण आणि सोबत आपण इम्प्रेस करू इच्छित असलेले पार्टनर घेऊन आलेले लोक तर ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ मध्ये गेलेले. आपण खर्च करीत असलेल्या एक-एक रुपयाबद्दल विचार करणारा आणि तेव्हा महिना १.५ लाख रुपये कमावणारा माझा एक मित्र, ज्या आमच्या मित्राने हा बेत मुळात केलेला, त्याला म्हटला, ‘this is last time I am watching something like this.’ इंग्लिश कविता लिहिणारा एक मित्र म्हटलेला, ‘I am trying to figure out what has happened’.
--
       डाऊनलोड करून पाहणं हा माझा सिनेमा पाहायचा फेवरीट मार्ग आहे कारण गरिबी. पण नाटकाला काय असं करू शकत नाही. पण मुंबईत इकडे-तिकडे जाऊन नाटकं बघणं झेपत नाही. त्यामुळे केव्हातरी आपल्या गावात काही वेगळं आलं कि आपण एवढा ताव मारतो.
मास्तर आणि संभा - नाटकातील एक प्रसंग प्रतिमा: https://www.pahawemanache.com/review/handabhar-chandanya-marathi-experimental-drama-review


       ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं नसेल आणि बघायची संधी आली तर ‘हंडाभर चांदण्या’ बघणं चुकवू नका असा खास बोधप्रद अभिप्राय मी सुंदर-छान आयोजक आणि त्यापरत्वे माझा स्वार्थ आणि फार नाव व्हायची संभाव्यता दिसत नसतानाही कसके काम करणारे मास्तर, संभा आणि बाकीचे कलाकार ह्यांना आठवून देतो.   

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...