Showing posts with label च्युxxकथा. Show all posts
Showing posts with label च्युxxकथा. Show all posts

Thursday, May 23, 2013

च्युXX कथा-२ : विक्रम वेताळ -१


             इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

         तर महिना अखेरच्या शुक्रवारच्या रात्री, एका आय.ची. कंपनीत काम करणारा विक्रम सिग्नेचरचे २.५ पेग टाकून त्याच्या झुणे शहरातील प्राचीन घराकडे जाऊ लागला होता. खरेतर पिवळ्या प्रकाशाने लगडलेला रस्ता सोडून तो ह्या आड रस्त्याला आला कशाला?  आणि तेही केवळ आजच्या या शुक्रवारी नाही. मागचे सहा महिने, दर मंथएंडला येणाऱ्या विकेंडला विक्रम या आड रस्त्याला येतो. त्याला  त्याचे प्रोजेक्ट आठवत नाही, त्याला त्याच्या बाबांची औषधे आणि अपॉइंटमेंट आठवत नाही. कंपनीतून बाहेर पडला की तो थेट  एक निप, शेंगदाणे आणि त्या नंतर एक रँडमली सिलेक्टेड सब्जी आणि दोन रोटी अशा नेमस्तपणे पितो. किंबहुना ही त्याची त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, वैयक्तिक अशा साऱ्या च्युत्याप्यापासूनची एक्झिट असल्यागत तो ह्या कृती करताना हरवत हरवत जातो. मग तो ग्लोव्हज घालतो, हेल्मेट घालतो, एक आडबाजूच्या बंद दुकानाच्या मागच्या दारातून एक देशी दारूची बाटली आणि चणे घेतो, आणि त्याची युनिकॉर्न घेऊन निघतो. कुठे? कशाला? शिक्षण, शिक्षणाच्या प्रवासात वाटेत नोकरीचं अॅडव्हान्स बुकिंग, नोकरीच्या प्रवासात लग्नाचे अॅडव्हान्स बुकिंग, लग्नाच्या प्रवासात संततीचे आणि म्हातारपणाचे अॅडव्हान्स बुकिंग आणि त्याच्या अध्ये-मध्ये ट्रेक्स, सिनेमे, पुस्तके, परदेश प्रवास, फोटोग्राफी, स्टेटस अपडेट आणि लाईक्स अशा मार्गावर जाणारा हा मुलगा असा भरकटला कसा? ते आपण जाणून घेऊया.
(तुम्ही आता पार्श्वसंगीत इमॅजिन करू शकता, मालिकेचे नावही इमॅजिन करू शकता, जसे खाली पडला झोका...)
         विक्रमचे झुणे शहरातील घर हा खरेतर इसवी सनाच्या वजा चौथाव्या शतकातील विक्रमादित्य राजाचा महाल असे. नंतर जसे जुन्या वस्तू ह्या आपोआप ऐतिहासिक होत जातात असा तो अशाच महत्वपूर्ण ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र होत असे. सध्या तिथे इतके वेगवेगळे अवशेष होते की ते प्राचीन घर हे परसाकडे जाणाऱ्या माणसाचे चित्र असलेली आदिमानवाची गुहा किंवा महाराष्ट्रातील एक आणि एकाच थोर माणसाच्या बालपणी त्यांचा जिवलग सवंगडी जिथे पहिल्यांदा त्याच्या बायकोच्या भावाला पिठलं-भाकरी खाण्यास घेऊन आला ती जागा किंवा क्रांतिकारी विचारांचे झुणेरी तरुण, कालनिरपेक्षपणे आपल्या क्रांतिकारक निर्मिती केल्यावर मिसळ आणि ताक घेण्यास थांबत ती झुणे-५७ नावाची जागा आहे असे काहीही सिद्ध करता येऊ शकत होते. पण खरेतर विक्रमाचे अत्यंत खट असे चुलत-मावस काका अडून बसल्यामुळे अजून रीडेव्हेलप व्हायचे राहिलेले ते एक जुने घर होते. खरेतर विक्रमला पूर्वी त्या घराबाबत किळस, शरम, घृणा किंवा असे काहीही वाटत असे. त्याच्या आय.ची. कंपनीतील मित्रांना ह्या घरी आल्यावर इतिहासात आल्यासारखे वाटे, पण त्याच्या मैत्रिणी काही फार येत नसत. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही 'वाव सो कूल' म्हटले तरी विक्रमाला काही मुलभूत मुद्द्यांमध्ये नको तेवढा थंडावा येत होता. अश् त्याची सॉफ्टवेअर मधली हार्ड जिंदगी चालू असताना एका विकेंडला कुठे ट्रेक नसल्याने, कोणाची पार्टी नसल्याने, कुठले भाषण, नाटक किंवा परिसंवाद किंवा संमेलन नसल्याने विकुल एकाकी असा विक्रम ओल्ड मॉंक मारून घराकडे परतत होता. त्याच्या घराच्या रस्त्यावर, म्हणजे आयफेल टॉवर हापशीच्या पुढे एक पिंपळाचे झाड होते. सकाळी त्यावरून बेसुमार पक्षी शीटत. त्यामुळे विक्रम दुसऱ्याच एका रस्त्याने आपली घोडी (वाचा युनिकॉर्न) घेऊन जाई. पण त्या रात्री, जसा की दैवयोगच, की विक्रम त्या पिंपळाच्या झाडाखालून जाऊ लागला. आणि एकूणच सरबरीत असा विक्रम त्या खडबडीत रस्त्यावरून जात असताना त्याच्या खांद्यावर धाडकन काही पडले. त्याने त्याच्या एकूण वंशाचा, इतिहासाचा आब ठेवत बाईक पडू दिली नाही. स्वतःला सावरले. त्याला त्याक्षणी एकदम 'बचेंगे ती और भी लढेंगे'  असे सारे काही आठवतही होते. आणि त्याचक्षणी मल्टी-टास्किंग करत तो कोण शिटले असेल एवढे धबडकन हेही शोधत होता. एवढे ताकदवान हागू शकणारा पक्षी इथे असेल तर त्याला कॅमेरात कॅप्चर कसे करावे, कोणता अँगल लावावा, आणि मग फेसबुकावर त्या पिकला काय नाव द्यावे असा विचार तो करत असताना त्याला कण्हण्याचा आवाज ऐकू येवू लागला.
'विक्रमा, विक्रमा...' असे तो आवाज अस्पष्टपणे म्हणत होता. हे आपले चुलतमावस काका तर पडले नाही ना पिंपळावरून म्हणून विक्रम सुखावला. आणि तो परत बटन स्टार्ट करून जायला निघणार तोच तो आवाज म्हणाला, '
'अरे, एवढे एपिसोड केलेस तू माझ्याबरोबर. आणि आज तुला माझी आठवणही येत नाही.'
आता विक्रमाला वाटले की त्याने त्याच्या एकटेपणाच्या कैफात २ खंबे मारले असावेत त्यानेच त्याचे कान आपोआप वाजू लागले आहेत.
'नाही, नाही, विक्रमा. हा आवाज तुझ्या मानगुटीवरून आहे. आणि तो तू कित्येक अमावास्यांच्या रात्री ऐकला आहेस. पण मागची ही काही वर्षे तुझ्या माझ्यात दुरावा आला. '
मानगुटी, अमावस्येची रात्र हे ऐकून विक्रम चक्रावला. पण मग त्याला लाभलेल्या आणि त्याने संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत जोपासलेल्या स्मरणशक्तीच्या देणगीने त्याला चांदोबा मासिक आणि त्यात वाचलेल्या विक्रम-वेताळाच्या गोष्टी आठवू लागल्या. पण आपण तो विक्रम आणि हा आवाज म्हणजे तो मानगुटीवर बसणारा वेताळ, तो कूट नैतिक प्रश्न टाकणारा वेताळ म्हणजे हा असला कुपोषित आवाज! साला हा चायना वेताळ की काय, की साला कोणी 'मायग्रंट' ह्या झाडावर आलेला आणि संत्रा मारून पडलेला!!
'विक्रमा, प्रश्न मी विचारणार आणि तू उत्तरे देणार हा रिवाज. आणि आज तुलाच एवढे प्रश्न कसे विक्रमा? पण साहजिक आहे. कुठे ते अक्राळ-विक्राळ वेताळ, त्याची भयावह पिशाच्च अवस्था आणि कुठे माझे हे बापुडवाणे स्वगत. पण आज विक्रमा, मला तुझ्याशी असे बायोग्राफिकच बोलायचे आहे. आणि माझी तुला कळकळीची विनंती आहे की तू ते ऐकून घ्यावेस.'
वेताळाचे असे भावूक पैशाच्ची बोलणे ऐकून विक्रम भारावून गेला आणि आपसूकच त्याने मानगुटीवरच्या आवाजाला मनातच बोल असे म्हटले.
'विक्रमा, असे पिंपळाखाली नको. चल, तिकडे थोड्या दूरवर चायनीजवाल्याने आजची हाडे टाकली आहेत. मला कित्येक दिवसांत असे मनाजोगते अन्नही मिळालेले नाही. चल. '
(स्मशानातून जंगलात चालत जाणारा विक्रम, आणि जुन्या वाड्याच्या पिंपळाखालून चायनीजच्या गाडीवरून फेकलेल्या अवशेषांकडे जाणारा विक्रम. हे असे दिवस, ह्या अशा रात्री. माणसे काय, पिशाच्चेही बदलली असा उसासा सोडण्यास आता हरकत नाही.)
            त्या झाडझडो-यात एक रिकामा कोपरा धरून विक्रमने आपली बाईक लावली. आणि वेताळाला त्याने त्याची जी काय हाडे घ्यायची ती घेऊन मागच्या सीटवर बसायला सांगितले. त्या निऑन अंधारात जेव्हा विक्रमाने निरखून बघितले तेव्हा त्याला वेताळ थोडाफार दिसू लागला. त्या चांदोबाच्या मासिकातले कथेप्रमाणे खूप वेळा वापरून धुवून दिसलेल्या पांढऱ्या कपड्याप्रमाणे हा वेताळ होता. पण आता तो कपडा जिकडे तिकडे विरलाही होता.
'कुपोषण, विक्रमा, कुपोषण. अरे, पूर्वी, जंगले असत. भोळी-भाबडी माणसे असत. कुठेतरी एखादे देऊळ असे. वेशी-वेशीला माझे दगड असत. कोणाला झपाटणे इतके सोपे होते. आणि आता लटकायला झाडे उरली नाहीत. झाडे आहेत तिथे जावे तर जिकडे तिकडे मंदिरे, मंदिरे नसतील तर देव-देवतांच्या कॉलर ट्युन्स, स्टीकर्स, अरे आणि बाबा-भगत, जो पूर्वी १० गावांत एक सापडायचा तो तर मी ऐकलंय एका शहरात लोकल का काय असते तिच्या प्रत्येक डब्यात सापडून राहिलाय. अरे, जेवढे समंध, पिशाच्चे, भूते उरली नाहीत त्याहून अधिक तर हे तांत्रिक झाले. आणि त्यांच्या मोर पिसा-यांचा मार खाऊन खाऊन माझे सारे एजंट गेले रे. आता ते सारे आपली दाद मागायला दिल्लीत गेले आहेत. आणि त्यांना साऱ्याच प्रांतांचे साथीदार मिळाल्याने त्यांनी आपली गाऱ्हाणी जोरदार मांडायला सुरुवात केलीये विक्रमा. शेवटी, भारत माझा देश आहे विक्रमा.'
असे म्हणून वेताळाने खिशात हात घातल्यासारखी हालचाल करून एक बाटलीसारखी दिसणारी वस्तू काढली. आणि तिचा एक जोरदार घोट मारला.
'विक्रमा, अरे काही वर्षामागे मी गौड-बंग प्रांतातल्या भ्रांतीनिकेतन मधल्या आवारात एका शेकडो वर्ष जुन्या झाडावर होतो. मग तिथे एका तरुणाच्या मानगुटीवर मी बसलो. आणि तो मला जाम सोडेना. तो जंगलात काय गेला, त्याने तीर-कमान काय चालवली, त्याने तांबडे झेंडे काय लावले, आणि सारा वेळ त्याने त्याच्या झोळीशी माझे पाय जाम बांधून ठेवले. मग एक दिवस खाकी वेशातले आणि पांढऱ्या वेशातले लोक आले. त्यांनी लोकांच्या बोटांवर ५ वर्षांनी एकदा ठिपके देऊन सारी बाधा घालवली. तोवर हा तरुण चाळीशीला गेला होता. आणि मी त्याच्या झोळीत निपचित. एक दिवस तो रस्त्येच्या कडेला मेला. तेव्हा मी त्याच्या फाटक्या झोळीतून कसा-बसा  निसटलो. तेव्हा त्याच्या हातात हा मोहाच्या दारूचा बुधला होता. बघ, बघ, हा बघ.'
विक्रमाने त्या बुधल्याजवळ नाक नेले आणि त्या भयंकर उग्र भपका-याने त्याला जाम गरगरू लागले. आणि त्याचवेळी वेताळाने त्याच्या मानगुटीवर पकड कसली आणि त्याला आपल्या खास पैशाच्ची आवाजात फर्मावले,' कसा च्युत्या बनवला विक्रमा तुला? अरे, हॉरर शो तर आता तुम्ही पैसे देऊन देऊन बघता. इमोशनल स्टोरी आली, देशभक्ती आली, समाज आला, नॉस्टाल्जिया आला की मात्र साले तुमची सारी अक्कल जाते xxx. मी अजून थोडावेळ बोललो असतो तर तू तर मेणबत्ती घेऊन गेलाच असता इंडिया गेटला. चल, चल, आता चुपचाप स्टेशनाकडे चालू लाग.'
वेताळाच्या तावडीत चांगलाच सापडलेला विक्रम स्टेशनाकडे जाऊ लागला. स्मशान सोडून हा वेताळ स्टेशनाकडे कुठे घेऊन चालला असा प्रश्न विक्रमाला पडू लागला तेव्हा वेताळ परत खदाखदा हसून म्हणाला, 'विक्रमा, अरे त्या विद्युत दाहिनीच्या स्मशानात काय xx उपटणार मी? आत्ता खरे भयावह असतात ते दिवसा सर्वात गजबजलेले भागच. आणि तुला ही फुकाची चिंता हवी कशाला? तुला एकतर आता मौन ठेवायचे आहे आणि त्याचवेळी माझ्या प्रश्नांचे उत्तरही द्यायचे आहे. वाचला आहेस ना चांदोबा आणि आता तर सिरीयलपण आहे युट्यूब वर सगळी. मार निवांत डाऊनलोड. हा हा हा हा'
विक्रम चुपचाप स्टेशनाकडे चालू लागला. आणि त्या झपाटल्या मंथएंडच्या विकेंडपासून विक्रम दर मंथएन्डच्या विकेंडला त्या रस्त्याकडे जातो आहे. कंपनीतून बाहेर पडला की तो थेट  एक निप, शेंगदाणे आणि त्या नंतर एक रँडमली सिलेक्टेड सब्जी आणि दोन रोटी अशा नेमस्तपणे पितो. किंबहुना ही त्याची त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, वैयक्तिक अशा साऱ्या च्युत्याप्यापासूनची एक्झिट असल्यागत तो ह्या कृती करताना हरवत हरवत जातो. मग तो ग्लोव्हज घालतो, हेल्मेट घालतो, एक आडबाजूच्या बंद दुकानाच्या मागच्या दारातून एक देशी दारूची बाटली आणि चणे घेतो, आणि त्याची युनिकॉर्न घेऊन निघतो. त्याचवेळी धुवट विरल्या देहाच्या वेताळालाही जाग येते.        
इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

Tuesday, March 26, 2013

च्युXXकथा-१ : होळी रे होळी


इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.
   
च्युXXकथा-१ : होळी रे होळी

      अम्या आणि पम्या हे खास मित्र होते. म्हणजे त्यांचे बालपण, त्यांची शाळा, त्यांचे तरुणपण हे सोबत गेले होते. पण त्यापलीकडे जाऊन ते एकाच प्रकारच्या पालकांच्या पोटी जन्माला आले होते. त्यांना एक एक धाकटी वगैरे बहिण होती. त्यांना शाळेत ८० ते ९० टक्केच्या दरम्यान मार्क मिळत. त्यांच्या आयांना ह्या गोष्टीचा सुप्त अभिमान वाटे. त्यांचे वडील तेच सरकारी ऑफिसात प्रामाणिक, निस्पृह असे (किंवा बाकी काही म्हणत तसे नेभळट किंवा गांडू) कार्यरत होते. त्यांच्या आधीच्या पिढ्या तश्याच कोणत्या गावी वगैरे असत, पण आता हे सारे पिढ्यान-पिढ्या नोकऱ्या करत कृथार्थ होत रिटायर होत. काही फरकही होते. जसे अम्या आणि पम्या हे कोणीही सरकारी कर्मचारी नव्हते. ते दोघेही जसे त्याच्या जवळपासचे सगळेच होत तसे इंजिनीअर होते. ते तसेच एखाद दोन वर्षे अमेरिकेत वगैरे जाऊन आले होते. त्यांना तसेच थोडेफार पोट, थोडे गाल आले होते. काही ठळक फरकही होते. जसे अम्याची आई त्याला नोकरी लागल्यानंतर लगेच वारली, किंवा गेली, किंवा मेली. त्यामुळे अम्या हा लगेच कर्ता, किंवा सवरता बनला. म्हणजेच त्याचे एका वर्षात लग्न झाले. ही मुलगी एक सूक्ष्म नोकरी करत असे. पण लग्नानंतर अम्याचे प्लानिंग का का जे असते ते फसलेच, आणि एकदम त्याची बायको गरोदर झाली. मग तिने सूक्ष्म नोकरी सोडली. त्यामुळे एकूणच अम्याच्या आर्थिक उन्नतीत त्याच्या खास मित्रांच्या तुलनेत फरक पडू लागला होता. त्यामुळे अम्या तेव्हाच अमेरिकेत गेला. तिथल्या दोन वर्षांच्या अनुभवाने आणि आर्थिक उबेने त्याला परत आल्यावर त्याच्याच शेजारात  नव्याने होऊ घेतलेल्या बिल्डींगीत एक हजारो स्क्वेअर फूटांचा फ्लॅट घेता आला होता. अर्थात अम्यावर त्याचे कर्ज होतेच. पण त्याचवेळी त्याच्या आजूबाजूंच्या अगोदर तो उन्नतीची शिडी चढू लागला होता.
      पम्याची गोष्ट इथे थोडी वेगळी होती. त्याची आई काही अशी वारली वगैरे नव्हती. त्यामुळे तो आधी २.७ वर्षे महाराष्ट्रातल्या एका विद्वान शहरात आणि नंतर आपसूक अमेरिकेतील एका ठिकाणी अशी नोकरी करत राहिला. त्याकाळात त्याने थोडे थोडे जग पाहिले. पण कुठेही तो आपल्या मार्गापासून ढळला नाही. म्हणजे तो नेमस्तपणे रहात असे, इथे-तिथे खर्च करत नसे. शक्य तितक्या स्वतात घरी फोन करत असे, स्वस्त तिकिटे मिळवत असे. मग त्याचे यथावकाश अशाच पद्धतीचे जीवन असणाऱ्या, पण मुलगी असणाऱ्या व्यक्तीशी लग्न झाले. त्याचे एक मोठेसे घरही झाले. आणि मग त्याला एक अपत्यही झाले.
      तर आता अम्याचे अपत्य, जे एक मुलगा आहे , ते सुमारे ११ वर्षांचे आहे तर पम्याचे अपत्य जेही मुलगाच आहे ते ५ वर्षांचे आहे. अम्याची पत्नी ही आता सुखवस्तू देहयष्टी (यष्टी हा शब्द इथे चुकतोच आहे) वगैरे असलेली आहे. त्याचा मुलगा अम्या सारखाच चांगली स्मरणशक्ती असलेला आहे. तोही ९० ते ९३.३७ ह्याच्या मध्ये पर्सेंट मिळवत असतो. पण अम्याच्या बायकोला, जी घरी असते, आणि त्यामुळे वर्तमानपत्रे, टी.व्ही., बिल्डिंग मधील इतर घरातील घडामोडी अशा रोचक विषयांची अपडेट ठेऊन असते तिला एकूणच तिच्या अपत्याच्या शैक्षणिक भवितव्याची आणि त्यानंतरच्या त्याच्या भवितव्याची आणि त्यानंतर त्याच्या पोटी येणाऱ्या नातवंडांच्या भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. आणि त्यावर तिने आमटी, पोळी, कोशिंबीर बनवताना, किंवा दुपारी बाजूच्या बाईंच्या अमेरिकेतील मुलाच्या प्रगतीची साठा उत्तरी सफळ कहाणी ऐकताना उपायही माहित करू ठेवला आहे. आणि आता तिच्या मुलाला त्या उपायाच्या मार्गावर दौडवणे हेच तिच्या जीवनाचे ध्येय आहे.
     पम्याची बायको तशी कूल आहे म्हणता येईल. अर्थात इथे अम्याच्या आणि पम्याच्या बायकोची तुलना करण्यात अर्थ नाही. अम्याची बायको ही दुपारी तिसरीतील मुलांच्या शिकवण्या घेते तर पम्याची बायको तेव्हा वातानुकुलीत ऑफिसात काम (आणि फेसबुक) करत असते. अम्याची बायको ही संध्याकाळी गणपतीच्या देवळात जाऊन प्रदक्षिणा, गणपती स्तोत्र आणि मुलाच्य शैक्षणिक यशाची आराधना करत असते, तर तेव्हा पम्याची बायको लोकल मधून उतरून जिम मध्ये जाते.
      अम्या आणि पम्याच्या अशा आयुष्यातील एका समकालीन घडामोडीवर आपण येऊया. त्या आधी त्यांच्या अशा आदर्शवत आयुष्यातील एक काळी- किंवा धुरकट बाजू जाणून घेऊ. ती म्हणजे अम्या आणि पम्या हे दोघेही दिवसातून तब्बल तीन सिगरेट ओढत. म्हणजे आधी ते हव्या तेवढ्या सिगरेटी ओढत. पण नंतर जसे, जसे ते मोठे होऊ लागले तसे त्यांनी सिगारेट सोडायचे, किंवा कमी करायचे जे प्रयत्न केले त्याचे, किंवा त्याच्या बायकांच्या भावनिक दडपणाचे वगैरे परिणाम म्हणजे ते दुपारी पोळी-भाजी खाल्यावर, मग संध्याकाळी ऑफिसातून परतून घरापाशी आल्यावर आणि रात्री जेवणानंतर अशा तीन सिगारेटी ओढत. आणि रात्री अर्थातच त्यांना अत्यंत मानसिक तणावाखाली हे करावे लागे. केवळ रविवारी, जेव्हा अम्या आणि पम्या एकमेकांना भेटत तेव्हा चहाचा एक एक कटिंग आणि दोन सोगारेती आणि त्यासोबत चर्चा अशा सुखद आनंदाचा ते अनुभव घेत. अर्थात हेच सुख कधी कधी रविवार सोडून बाकीच्या सुट्टीच्या दिवशीही त्यांना मिळे.
      हा असाच एक दिवस आहे. ही धुळवडीची जिला आपण सगळे रंगपंचमी असेही म्हणतो त्या दिवसाची संध्याकाळ आहे. अम्याचा चेहरा हा किंचित लाल रंगाने रंगलेला आहे तर पम्याचा चेहरा हा आज होळी नव्हतीच असा आहे. थोडी पर्शाभूमी द्यायची झाली तर मागच्याच रविवारी, ह्या वर्षी होळी खेळावी ती कशी, किंवा ती खेळावी का नाही अशीही त्यांची चर्चा झाली होती. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की मुळात असं तात्विक वादात पडणं ही अम्याची किंवा पम्याची, किंवा त्याच्या ह्या शहरात नोकरी करत कृतार्थ रिटायर झालेल्या खानदानांची पद्धत नाही. त्यांची पद्धत आहे सोय. म्हणजे जे करायचे आहे असे वाड-वडिलांनी सांगितले आहे ते सगळे करायचे, आणि त्याचवेळी ते सोयीच्या पद्धतीने वळवायचे असं. उदाहरणार्थ, पम्याच्या लग्नात मुहूर्त फारच उशीरचा आल्याने जेवणे, किंवा हस्तांदोलने आणि हसणे, किंवा काही काही भेटवस्तू नको नको म्हणत घेणे हे सारे आधीच पार  पडून मग उरलेले विधी केले गेले होते. किंवा अम्याची बायको तिसरीच्या मुलांना इतिहास शिकवताना मध्येच व्यंकटेश स्तोत्राच्या ओळी म्हणत असते. किंवा पम्याची बायको ही गणपतीत मोदक, किंवा होळीला पुरणपोळ्या हे सारेच आपल्या प्रकारच्या एका, ज्या गरजू असतातच, अशा बाईंकडून विकत आणते, किंवा अम्याच्या बहिणीच्या लग्नात अम्याला व्हिसाच न मिळाल्याने, पण त्याचवेळी होऊ घातलेला नवरा हाही प्रगतीच्या शिड्या सत्वर चढणार असल्याने त्याच्या अनुपस्थितीतच मंगल मुहूर्तावर लग्न झाले होते असे. अर्थात ह्यात काय चुकीचे म्हणा. गरजेप्रमाणे सोय ही छोट्या छोट्या बदलांची आया आहे असे म्हणता येईल.

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

      तर त्या संध्याकाळी अम्या आणि पम्या भेटले. तेव्हा त्या सकाळी कशी काय झाली होळी हा त्याच्या चर्चेचा विषय होतंच. पण त्यातील खरं विषय होता तो त्यांची अपत्ये होळी बाबत प्रचंड एन्थू  असताना, आणि अम्या आणि पम्या हे होळीतील पाण्याच्या वापराबाबत चिंतीत असताना ह्या सगळ्या तात्विक गोंधळाचा काय जुगाड लागला. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की अम्या आणि पम्या, किंवा ते ज्या एका वेगाने वाढणाऱ्या गटाचे चिन्ह आहे, त्यांच्या नैतिक घडणीकडे लक्ष दिले पाहिजे. १. तात्विक प्रश्नात न पडणे
२. त्याचवेळी आपण जे वागणार आहोत ते वागणे अडचणीत येईल असे न बोलणे (म्हणजेच वागे तैसा त्यातील थोडेफार बोले)
हे त्यांच्या नैतिकतेचे दोन प्रमुख घटक आहेत. मागच्या रविवारी हे दोन्ही घटक त्यांच्या चर्चेत आले होते. चर्चा सुरु झाली जेव्हा अम्याने पम्याच्या हातातील पोस्टर पाहिले जे पम्या आपल्या सोसायटीत लावणार होता. त्यावर कसे लोक पाण्यावाचून तडफडणार किंवा तडफडत आहेत, आणि आपण कसे पाणी उधळत आहोत, तर मग आपण कसे पाणी वाचवले पाहिजे, आपण कसे होळीत पाणी वापरणे टाळले पाहिजे, आपण कशी निव्वळ रंगानी होळी खेळली पाहिजे असे सारे मुद्दे असून त्यावर उपाय म्हणजे ‘यावेळी नको होळी, पर्यावरणाला द्या झळाळी’ असे यमकवाक्यही होते.
      अम्या त्या पोस्टरने प्रभावित झाला. अर्थात अशा कोणत्याही प्रभावाखाली फार वेळ न राहता बाहेर पडावे हा त्याचा स्वाभाविक गुणधर्मही जागा झाला. पण त्याचवेळी सिगारेटच्या ओढीने त्यांच्या आजूबाजूला जमलेल्या काही महानुभावांचे लक्ष त्या पोस्टर कडे गेले आणि चर्चेस प्रारंभ झाला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे, की बाकीच्या आयुष्यात आपले कुटुंब आणि अपत्य, आपले जातभाई, आणि तद्नंतर किंवा सोबत आपले इष्ट-मित्र (आणि एवढेच) अशा प्रायोरिटी जरी असल्या तरी तंबाखू, सिगारेट किंवा दारू अशा व्यसनांत हे सर्व लयास जाऊन नशेच्या तरल अवस्थेचा जो अल्पकालीन बंधुभाव प्रस्थापित होतो त्यात कोणीही कोणाशी बोलू शकते.   
महानुभाव १: खरंय( पोस्टर कडे पाहून). अरे माझी बहिण आहे ...... तिथे शंभर रुपये देऊन दररोजचे पाणी द्यावे लागत आहे.
महानुभाव २: मग त्यांनी तिकडे होळी खेळू नये. आपल्याकडे पाणी आहे, आपण टँकर मागवू शकतो, मग आपण का होळी नाही खेळायची?
या प्रश्नावर तसे सारेच गप्प झाले. म्हणजे पैसे आहेत तो काहीही करेल ह्या सर्वमान्य तत्वाला तसा पटकन कोणता विरोधी मुद्दा सुचेना. तसे तिथे असलेले बहुतेकजण मुबलक, किंवा व्यवस्थित समृद्धी असलेले किंवा ती नसल्याने एक प्रकारचा नपुंसक नैतिक जळफळाट असणारे होते. पण तिथे अजूनही एक महानुभाव होते. त्यांनी एक बिनतोड मुदा मांडला.
महानुभाव ३: पण आज तिथे जे होतंय ते उद्या आपल्याकडे पण होईल. आणि तेव्हा हजारो रुपयांचा टँकर घेण्यापेक्षा आज काही शे रुपयांचं पाणी वाचवणं जास्त योग्य नाही का?
या व्यावहारिक नैतिक मुद्द्यावर माना डोलून एक प्रकारची सर्वसमावेशक शांतता आली. पण त्याचवेळी  महानुभाव २, ज्यांना तात्कालिक माघार घ्यावी लागली होती त्यांनी एक जबरी पेच टाकला.
महानुभाव २: पण लहान लहान मुले तर होळी एवढी एन्जॉय करतात. त्यांना काय सांगायचं? त्यांच्या आनंदाला काय पर्याय देणार?
इथे परत हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे महानुभाव २ ह्यांच्या प्रश्नासाठी काही उत्तरे असतील, जसे नैसर्गिक रंग, किंवा होळी ऐवजी एकत्र येऊन मुलांना एकत्र करून दम शेरास खेळणे आणि शेवटी बोधपर कथाकथन घेणे. पण इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की तोंडाला रंग माखण्याची, पाठीवर जोरात फुगा फेकण्याची, किंवा चिखलात वगैरे लोळण्याची किंवा लोळवण्याची जी मजा आहे ती झ्याटभरही त्याच्या पर्यायांत नाही. किंबहुना आपले जे संस्कार वगैरे वाटतात ते बहुसंख्य मुलांना अत्यंत कंटाळवाणे असतात. किंवा माणसांत एकमेकांना छोटे छोटे सहन होण्याजोगे त्रास देऊन किंचित क्रूर आनंद घेण्याची वृत्ती आहेच. आणि सिगारेट प्यायला येणारी माणसे ही वरील तीन किंवा त्याच्या अन्य सब-प्रकारात येण्याची अत्याधिक शक्यता असल्याने महानुभाव २ ह्यांच्या प्रश्नावर खरेच सर्वजण गप्प झाले.
महानुभाव २ यांच्या प्रश्नाला उत्तर येत नाही असे दिसताच तेथे निर्माण होऊ पाहणाऱ्या तात्विकदृष्ट्या पेचदार शांततेची कोंडी तोडायला ‘नोस्टाल्जिया’ नावाच्या गोष्टीचा वापर सुरु झाला. म्हणजे आपल्या वेळेला कशी होळी आदर्श होती, आपण कसे पिचकाऱ्या वापरून कुरुक्षेत्रावरील धर्मायुद्धाप्रमाणे रंग खेळत असू, आता कसे कोणीही कुठूनही कुठेही पिशवी मारू शकते, तेव्हा कसे फुगे नळाला लावून लावून भरेतोच (फुगा आणि अन्य) फाटे, पण फुगा कसा कचकन लागे अशा नैतिकदृष्ट्या स्वच्छ भूतकाळापासून मग आपण कसे गच्चीवरून टाकलेला फुगा एका बाईच्या डोक्यावर पडला, तिने रस्त्यात कसा गहजब केला आणि मग असे केल्याबद्दल सलूनवाल्याने आपल्याला फुकट केस कसे कापून दिले, किंवा कसे होळीच्या निमित्ताने मुलींच्या गालाला, अंगाला आणि (...) स्पर्शता येत असे (असे न बोलता मनात हुळहुळणारे ), किंवा तेव्हा कसे पाणी मुबलक असे, कुठेच दुष्काळ नसे, अगदी भर उन्हाळ्यातही नळ धबधबा वाहत असे अभिमानास्पद सार्वजनिक, किंवा कशी लाकडे चोरली जात, कसे अंडी, सडकी फळे, चिखल, शेण यांचा वापर कॉलनीतील मुलांच्या सक्तीच्या चिखल लोळणीमध्ये होत असे असे तथ्यशील इंडिअन कन्फेशन आणि आता कसे सारेच बदलत काही मजा नसलेले होत चालले आहे असा सार्वत्रिक सुस्कारा आणि धूर टाकला जाऊ लागला. इथे अम्या आणि पम्या यांच्यातील अजून एक फरक लक्षात घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण बदलायच्या नसतात, त्यांबाद्द्दल तक्रार करायची नसते तर त्यांच्याप्रमाणे बदलून नोकऱ्या करून आपल्या आई-वडिलांच्या आणि मुलांच्या पुढील २० वर्षांची सोय पाहायची असते हे अम्या आणि पम्या अनुवांशिकरित्या शिकले होते. त्यामुळे इथे ते नोस्टाल्जिया मध्ये सामील न होता मुलांनी होळी खेळावी का नाही, आणि ह्याबाबत जे काही ते (अर्थात वैयक्तिकरित्या) ठरवणार आहेत ते त्यांच्या कुठल्याही अन्य गोष्टीला धक्का न लावता कसे करता येईल याचा सूक्ष्म विचार करू लागले.
अम्या: हे पोस्टर बरोबर आहे. पण एकदमच होळी खेळू नका कसं म्हणणार? म्हणजे शेवटी सण आहे तो आपला.
पम्या: अरे हे सण आपण ‘त्यांचं’ बघूनच करतो आहोत. तिथे मुबलक पाणी वाहतं उन्हाळ्यात. सण तर फक्त होळी पेटवण्याचा आहे.
पम्याच्या ह्या प्रगतीशील बोलण्याने अम्या गप्प झाला. अम्या आणि पम्याच्या मध्ये ही एक दरार आहे. म्हणजे कदाचित लग्न उशिरा झाल्याने, किंवा अमेरिकेत ३.६४ महिन्यांचा जास्त काळ राहिल्याने, किंवा त्याच्या मित्र-परीवारामुळे पम्या हा त्याच्या प्रकारची अन्य कुटुंबे जे करतात त्यापासून बदलत चालला आहे. म्हणजे असे अम्याला वाटते. म्हणजे पम्याने आता गणपतीची कायमस्वरूपी मूर्ती आणली आहे आणि तीच तो दरवर्षी वापरतो. अम्या इथे शाडू मातीची मूर्ती आणू लागला आहे. पम्याने त्याच्या प्रकारचा बिल्डर किंवा लोक राहतात अशी नव्याने होऊ घातलेली बिल्डिंग सोडून एका ते सगळ्या प्रकारचे लोक राहतात अशा बिल्डिंग मध्ये जागा घेतली आहे. आणि त्यामुळेच तो असं काही बोलू लागला आहे.
पम्या: (अम्याची शांतता भेदत) अरे सणामागे उद्देश असतील पूर्वी, पण आता केवळ प्रथा आहेत. आणि शेवटी वी शुड थिंक अबाउट सस्टेनेबल फ्युचर (इथे एक जोरदार कश) आणि शेवटी तिथे दुष्काळात आहेत दोज आर अवर ओन पीपल यार.
अम्या: अरे पण मी माझ्या अपत्याला ती स्टेनगनवाली पिचकारी आणेन असं प्रॉमिस केलं आहे.त्याला कुठे हे सांगू सस्टेनेबल किंवा दुष्काळ वगैरे?
पम्या: आमच्या सोसायटीत आम्ही नॅच्युरल कलर्सची होळी ठेवली आहे १५ वर्षांखालील मुलांसाठी. पण पाणी नाही.
अम्या: पण घरी आंघोळीला लागेल ते?
पम्या: ते घरात होईल ना ज्याच्या-त्याच्या. प्रश्न एकत्र येऊन पाण्याची नासाडी करण्याचा आहे.
अम्याला तसा हा मुद्दा पटत नव्हता. पण तो प्रचंड सोयीचा आहे हे त्याला कळलं. आणि त्याने एकूणच चर्चा क्रिकेट, मार्केट, शेअर्स, मित्र, मृत व्यक्ती अशा हमखास मुद्द्यांकडे नेली होती.
      तर ही झाली होळी अगोदरच्या रविवारची पार्श्वभूमी. आणि आता होळीच्या संध्याकाळी अम्या आणि पम्या हे चहाचा कटिंग आणि दोन सिगारेटी असे सुख मिळवायला आलेले आहेत. अम्याचा चेहरा किंचित लालसर आहे तर पम्याचा अजिबात रंगलेला नाही. पण पम्या मध्ये एक सूक्ष्म बदल आहे. जो नंतर येईलच.
पम्या: काय रे खेळला वाटतं होळी?
अम्या: फक्त चेहऱ्यावर. ते पण खास ग्रामीण भागातून आलेल्या नैसर्गिक रंगांनी.
पम्या: आणि तुझे अपत्य?
अम्या: अरे तो तर एक किस्साच झाला. सकाळी सकाळी तो हट्ट करायला लागला स्टेनगन आणा, त्याचे मित्र एकत्र जमून खेळणार आहेत तिकडे न्या असा. आणि त्याच्या आईला जाम चालत नाही असं. त्याच्या मित्रांना एकतर ८५ ते ८८.४७ पर्सेंट किंवा ९३.७८ ते ९५.२३ पर्सेंट पडतात आणि अशा मुलांमध्ये त्याने अजिबात खेळू नये असं आहे तिचं.
पम्या: का रे?
अम्या: अरे खेळता खेळता ते सगळं विचारून घेतील तर त्याच्याकडून.
पम्या: काय?
अम्या: तेच, म्हणजे अभ्यास, अजून १७ महिन्यांनी कुठले कोर्सेस तो घेणार आहे, किंवा काय...
पम्या: ओह. मग?
अम्या: त्याची आई तर त्याला सोडत नव्हती बाहेर. मग आम्हीच बाथरूम मध्ये जुने कपडे घालून होळी खेळलो. म्हणजे असंच थोडं.
पम्या: त्याने ऐकलं एवढ्या लगेच?
अम्या: नाही रे. तो रडायलाच लागला होता. मग तो आंघोळीला गेला तेव्हा मी गुपचूप जाऊन त्याला थोडा नैसर्गिक रंग लावला. जुने कपडे दिले आणि जुनी पिचकारी पण दिली.
पम्या: पण हे तरी त्याने कसं अॅकसेप्ट केलं यार?
अम्या: कुठे केलं? पण आम्ही बाथरूम मध्ये असतानाच त्याच्या आईचा आवाज ऐकायला आला. त्यात गणपती स्तोस्त्राच्या ओळी हाय पीच मध्ये होत्या. मग आम्हाला दोघांना सिग्नल मिळाला. आणि नंतर मी त्याच्यासोबत चेस खेळलो. मग स्वारी खुश. आणि मग पुरणपोळ्या.
पम्या: त्या तर वाहिनी सॉलिड करतात यार.
त्यानंतर पम्या एकदम खोया खोया वाटू लागला. इथेच तो थोडा वेगळा वागतो आहे याची शंका अम्याला येऊ लागली. मग त्याने प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली.
अम्या: तू काय केलं?
पम्या: नाही खेळलो. आपण पोस्टर लावलेले, आपणच कसे खेळणार यार?
अम्या: आणि अपत्य?
पम्या: हा हाहा. मी तर त्यालाही कार्टून लावून दिलं होतं डीव्हीडीवर. आणि मग गेम झोनला नेईन म्हटलेलं दुपारी.
अम्या: मग?
पम्या: तेवढयात सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ताडकर. ते आले. सोसायटीच्या कमिटीसाठी खास थंडाई होती आणलेली.
अम्या: मग?
पम्या: जाम इनसिस्ट करतात यार. आणि त्यांनीच सगळं कलर्स वगैरे अरेंज केलेले. मग घेतला ०.३५६ ग्लास.
अम्या: मग?
पम्या: घरी गेलो तेव्हा ही जस्ट बाथ घेऊन आली होती. मग अपत्याला म्हटलं, कलर्स मध्ये खेळायची मजा कुठेच नाही. जा, सर्वांना नीट कलर्स लाव. तो तर तयारच होता.
अम्या: (घशातच) हं,हं,. हह.
मग सिगारेटी आणि चहा संपवून ते घरोघर परतले.  

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

विशेष धन्यवाद: धवल जोशी, अच्युत आठवले आणि आठवण 

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...