Showing posts with label मरण. Show all posts
Showing posts with label मरण. Show all posts

Sunday, January 2, 2022

जयंत पवार स्मृती विशेषांक- वसा दिवाळी अंक २०२१

       जयंत पवार ऑगस्ट २०२१ मध्ये गेले. वसा २०२१ चा दिवाळी अंक त्यांच्याबद्दल, त्यांच्या मरणाबद्दल आहे.
       पवारांची ऋजुता, स्वतःला ठाम भूमिका असूनही आक्रस्ताळी न होण्याची त्यांची पद्धत, आणि शेवटी मृत्यूची शक्यता विस्तारत जाऊन अटळ बाब बनतानाही त्यांचं composure ह्या बाबी काही लेखातून खूप नीट उमजतात. त्यांनी एकाला सांगितलेलं ‘now it is between doctor and my body’ हे वाक्य ते स्वतःकडे बघण्याच्या प्रक्रियेत कुठे पोचले होते हे दाखवतं.

I wish I can have this composure when I will enter the region where death is mere a formality left, but I must wait for the due process to end. मला हे माझ्यासाठी होईल तेव्हा मी काय करेन ह्यापेक्षा जेव्हा हे माझ्या जगण्याच्या सवयींच्या, प्राधान्याच्या वर्तुळात असलेल्या माणसांसाठी करायला लागेल तेव्हा कसं होईल ह्याची जास्त काळजी वाटते. असो. पवारांच्या बद्दलच्या दिवाळी अंकाचे निमित्त करून स्वतःबद्दल बोलणारा मी एकटाच तर नाही, I am in good company!
दिवाळी अंकात अनेक लेख हे बादरायण आहेत. म्हणजे ते जयंत पवारांबद्दल, त्यांच्या मरणाबाबत नाहीतच. समजा ‘अधांतर नाटकाशी संबंधित कोणी गेले असते तरी हाच लेख कमी-जास्त प्रमाणात लिहिला गेला असता असे लेख. लिहिणाऱ्याला हे दिसत नाही का कि तो आत्मलेख लिहित चाललाय आणि मेलेला माणूस केवळ एक निमित्त होऊन बसला आहे स्वतःबद्दल बोलण्याचं.
म्हणजे अशा आत्ममग्नतेला बरं-वाईट म्हणण्याची बाब नाही. कदाचित अशी आत्ममग्नता ही फारच स्वाभाविक मानवी बाब असावी. पण लिहिणारे अशा स्वाभाविक मानवी गुणधर्मांच्या पलीकडे सरकत नाहीत का? असं सरकणं हा लिहिण्याचा एक मक्सद असतो ना?
पवारांसाठी ते घडलं होतं. त्यांचे त्यांच्या मित्रांशी बोलून, whatsapp द्वारे शेवटच्या दिवसांत झालेले संवाद हे दाखवून देतात. त्यांना शक्य असतं ते अगदी सरतेशेवटी, म्हणजे असण्याची रेष ओलांडून आपण नसण्यात जातो, तेही त्यांनी लिहिलं असतं. त्यांच्या शैलीत लिहिलं असतं, ज्यांत माणसांच्या आयुष्याबद्दलचा जिव्हाळा, त्यांच्या निवडी-आवडी ह्याबाबत एक विरक्त कारुण्य आहे.
त्यांचे चळवळींशी संबंध, भूमिका ह्याबद्दल लोकांनी लिहिलं आहे. ते conservative, उजवे नव्हते किंवा अशा गटांना सहानुभूती असलेले नव्हते हे स्पष्ट आहे. पण आपल्या राजकीय-सामाजिक भूमिकांसाठी लिखाण माध्यम वापरणारे ते होते असं मला त्यांच्या कथांमधून वाटलं नाही. (मी त्यांची नाटके पाहिलेली किंवा वाचलेली नाही.) त्यांची भूमिका ही त्यांच्या लिखाणाची परिणती होती.

असो. पवार नाहीत आता, आणि त्यामुळे त्यांच्या नव्या लिखाणाची शक्यताही नाही.      

Saturday, December 24, 2011

शोकाचे प्रहर उमलता

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. तुला मी सांगतोय ते सांगितल्याने तू काही उतारा सुचावशील आणि हे सलत जाणारे दुख आणि गुदमरवणारी शांतता जाऊन खेळत्या हवेचा विलक्षण आल्हाद येईल म्हणून नाही. उलटी केली कि कसं बरं वाटतं तसं जे सांगायचं ते बाहेर पडलं कि वाटतं म्हणून सागतोय...कारण नुसते माझ्याच माझ्यात हे शब्द घुमून, माझ्या शरीराच्या, धमन्यांच्या भिंतीवर निनादून माझ्या आत त्यांच्या प्रतीध्वनिन्च्या लाटा येऊन मी पार बुडून बुडून... ऐक , नुसतं ऐक, नाहीतर तुला सांगताना मी माझ्यात गुरफटून माझ्यातल्या पोकळीशी माझ्या बुबुळातला प्रकाश गिरवत बोलू लागलो कि चुपचाप निघून जा... पण जाताना काही म्हणजे काही सांगू नकोस... 
      काल असं झालं कि मी रात्री एकदम उठलो. माझ्या घरात किंवा मी ज्यांच्या घरात राहतो ते बाकीचे सगळे झोपले होते. मला एकदम वाटलं कि असेच एक दिवस सगळ्यांचे मृतदेह ठेवलेले असतील, दगडी स्थिर. कोणी रडत असतील, कुणी मुके उमाळे स्फुंदत असतील आणि काहीवेळा त्या प्रेताच्या थंड शरीर होऊन जाण्यात तुटून गेलेले आठवणींचे तुकडे कधीतरी एकदम ओलसर हळवे होऊन येतील. भर रस्त्यावर मध्ये चालत असताना तुम्हाला गेलेले माणूस आठवेल, त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवतील, त्याचे हावभाव, त्याच्या शरीराच्या हालचालींची लकब, त्याचे राग, लोभ, सवयी, तिरस्कार, माया सारे एकदम गळ्याशी दाटून येईल, अगदी गर्दीच्या मध्ये डोळे भरून येतील, धाय मोकलून रडावेसे वाटेल, जे चालले आहे ते सारे आता केवळ जिवंत असण्याच्या स्वाभाविक गृहितकाने ढकलले जाते आहे, पण जे होऊ शकत होते ते सारेच त्या माणसाच्या जाण्याने मिटून संपून पार पुसून नुसते कल्पनेच्या नाजूक दुनियेचे होऊन बसले आहे...
   पण हेही फसवे आहे. असे एकमेकांचे मृतदेह बघूनही, एकमेकांना जाळून, पुरून, राख करूनही माणसे परत हसताना दिसतात. परत त्यांना हवेहवेसे, नकोनकोसे वाटण्याएवढे आयुष्याचे आकर्षण रहाते. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे ते दुखाला निष्ठुर दाबत जातात. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे परत ते निवांत शांत झोपू लागतात, चवीने खाऊ पिऊ लागतात, देवभक्ती वगैरे करून, इतरांच्यात जीव वगैरे लावून परत नव्याने दुखाचा डंख घ्यायला ताजेतवाने होतात. 
   इतके वर-खाली झुलत राहूनही आपण उत्साहात, उमंगीत जगू पाहतो...ही सारी केव्हातरी जगणे खाऊन जातील इतके भव्य वाटलेल्या दुखाची थट्टा आणि ही निगरगट्ट असोशी हाच तेवढा जगायचा एकमेव तोडगा... आपण जसे असे आहोत तोच आपला खरा उपहास आहे आणि तेच आपले खरे असणे आहे... 
    आणि आता हे इतके सारे स्पष्ट दिसूनही तू माझ्याकडे पुढच्या दिवसांच्या सावलीची, रात्रीच्या चादण्यांची अनुमाने मागतेस..तूही एकदा अशी पडणारच थंडगार, दगडी, निर्जीव लाश होऊन...किंवा केव्हातरी तुझ्या जगण्याची अपरिहार्यता तुला माझा अटळ श्रोता होऊ देणार नाही आणि मग माझा तुला गृहीत मानून आपल्याच सावलीत आपल्या असण्याचे गूढ उकल्यणाचा धंदा बंद पडेल. मग हे असेच सैरभैर दिवस, ह्या अशाच पुढच्या दिवसाची हूल आणि भय देत सरकन संपून जाणा-या रात्री. हे असेच सगळे शब्द, शब्द, शब्द, श्वासात, हालचालीत, बंद-खुल्या डोळ्यांत, अंघोळ करताना , कमोडवर, रस्त्यात, अंथरुणात, आपल्याच असण्याचे आपल्यालाच नकोसे ओझे वाहताना ते आपल्याला हवेहवेसे वाटत रहाण्याचा भयानक खेळ आणि आपण एकच वेळी त्यात खेळत खेळत हारत जाणारे, आपणच तो खेळ बघत टाळ्या वाजवणारे आणि आपणच त्या खेळाचे धावते समालोचन करणारे.     
शोकाचे प्रहर उमलता 
दुखाचा शिशिर बहरतो 
संदिग्ध होऊनी दृष्टी 
अंधार मंद पसरतो 

माझ्या ओळी आणि त्याच्या आत परक्या कवीचे, परक्या लेखकाचे अस्तित्व...साले जन्मापासून आपण असेच ह्याचे त्याचे शब्द वाचत ऐकत पहात मोठे होणार, आणि मग आपल्यात ओरिजिनल काय. नुसती मुळाक्षरे शिकवून, ऐकवून सोडून दिले तर आपण काय सांगू बोलू तेच खरे, पण आता हे असे एवढ्या वर्षांचे कम-अस्सल सारे साठून बसले आहे. आपण काहीही म्हटले तरी इसवी सनाच्या आगे-मागे किंवा समुद्राच्या ऐल-पैल पसरलेल्या देशांमध्ये कोणी ना कोणी तसे काही म्हटलेलेच असते. म्हणजे आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पण आपल्या खाजगी मालकीचे नाही. ते साले आधी कोणी तरी चितारलेले. हे साले शब्दांचे असे फुटके नशीब. चित्र, गाणे, नाच, शिल्प अशा बाकी चौसष्ट वगैरे कलांत असे फार होत नसावे. ज्याच्या रेषा त्याच्या रेषा, ज्याची पावले त्याची पावले, ज्याची तान त्याची तान... पण लिहिणारा असं दस्तुरखुद्द स्वतः नाहीच. तो असाच ह्याच्या त्याच्या गडद-फिकेपणाचे नाजायज पोर. आणि तरीही तो तेच शब्दांचे शस्त्र, शब्दांच्या कुबड्या, शब्दांचा एनिमा, शब्दांचा वेन्तिलेतर लावून आपल्या जगण्याची थडथडती नस पकडू पहाणारा. 
  हे वर्षानुवर्षांच्या शब्दांचे पर्वत ओलांडून गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडचे ध्वनींचे, हालचालींचे, सूचक संकेतांचे बर्फाळ निद्रिस्त अरण्य ओलांडून आपले असणे आपल्याला जाणवण्याच्या निखळ किना-याशी पोचले पाहिजे. अर्थांची सारी पुटे खरवडून जे आहे ते तसे बघायचा झरोका मोकळा केला पाहिजे. टक्क उघड्या डोळ्यांनी पार भिडून पाहीले पाहिजे जगणे भय-भीतीचे आदिम कुंपण तोडून. चव, नाद, स्पर्श, अर्थ असे साऱ्यातून येणारे सुखाचे फसवे हुंकार पचवत पाहिलं पाहिजे कि आपल्या आत खरंच तो आपला आवाज वगैरे आहे का का सारेच एका रिकाम्या पोकळीवर उभारेलेले वेष्टन आहे. आणि ह्या अंतिम प्रश्नाची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सगळ्या येडझव्या पायपिटीची, त्यातल्या एकारलेल्या भयाण पल्ल्यांची कहाणी मध्ये मध्ये ओरडत राहिली पाहिजे. आठवणीचे शेवाळे साचले कि जगणे कुठेच वाहत नाही. असे शेवाळे न जमू देता, स्वप्नाच्या उंच कड्यावरून कोसळून आपले दिवस आधीच्या दिवसांच्या गाळाने संपृक्त करत जाण्याचे नदीपण येईपर्यंत मागे मागे गेले पाहिजे. जगणे पुढे जाते असं सार्वत्रिक समाज असला तरी शहाणी माणसे मागे बघतात तेव्हाच शहाणी असतात, पुढे बघून ते मागच्या रेषेला स्वप्नील समाधानी दुनियेचे काल्पनिक टोक लावू पाहतात आणि मग त्याचे सारे शहाणपण विसरले जाऊन त्यांना येणारे दिवस कसे गेलेल्या दिवसांसारखेच आहेत हे समजले नाही ही ठसठशीत चूक तेवढी त्यांची खूण बनून रहाते. आपल्याला मागे नको- पुढे नको, आपल्याला तात्विक अवगुंठना नको, आपल्याला आपले अस्सल शब्द हवे. आपली पैज अमृताशी नको, आपली ओल्ड मोन्कशी पैज बरी. पण आपले शब्द नशा होवो, आपले शब्द शेकोटीचा जाळ होवो, आपल्या शब्दांत जिवंत होवो जगण्याची विलक्षण विजिगीषा आणि तिच्याखाली खोल खोल पुरले जाणारे विरोधाभास., आपले शब्द कल्लोळ होवोत, उग्र भडक वाद्यांचा आणि ते वाचणा-याला अस्वस्थ करून सोडोत, आपले पसायदान नाही, आपले अभंग नाहीत, आपले शब्द बुडून वर ना तरंगोत, आपले शब्द वाचणा-याच्या काळजाशी पोचोत, त्याच्या वेदनेच्या कुळाला स्पर्श करणारे निरागस अल्लड कण बनोत, आपले शब्द धूळ  धूळ बनून वा-यावर विरत जावोत, आपले शब्द आपले थडगे बनून न राहोत, आपले शब्द आपल्यापाठोपाठ मार्गस्थ होवोत, आपले शब्द आणि आपण कोणीच सोडून जावू नये एकमेकांना ... आपण होऊन जावे अस्तंगत संध्याकाळच्या क्षणिक अशब्दी रंगझळाळासारखे जे दिसतात पण नावाच्या यादीत अडकत नाहीत...
   हे असे प्रार्थनांचे उद्घोष, जगणे म्हणजे आहे पेक्षा व्हावे असे कोते पिकलेपण.. आणि मग कुठेतरी आजूबाजूला रटरटणा-या जगाच्या भट्टीचा चटका, कुठेतरी तो क्षण जिथे जाणवणारी हवे आणि आहे यांच्यातली जीवघेणी पोकळी, कुठेतरी ही हवे हवे चे मंत्र जपत सारे चेचत जाणारी एककलमी गर्दी, हे एकमेकांना बिलगणा-या पंडितांचे संकटकालीन अलार्म, हे पदोपदी मांडून ठेवलेले माहितीचे पुंज आणि मग हे असेच परत आपल्या आतल्या एकाट शांततेच्या निर्वातात सावकाश बेहोष होत जाणे.  
देहावर चढते भूल 
देहाला येते फूल 
देहाच्या खडकावरती 
माझीच जमते धूळ 
हे असे काही कामाचे नाही. असे मध्ये मध्ये अर्धे-मुर्धे खुळावत जाणे, अध्ये-मध्ये असे लिहिण्याचे तात्कालिक मोड फुटणे, अध्ये-मध्ये जीवितार्थाची उभारी येवून आपले बंदे नाणे खण खण वाजवायची मर्दुमकी वाटणे, असे अध्ये-मध्ये माणसे जमवून काही एक खेळ थाटून बघणे...एक काही तो प्रकार नेटाने केला पाहिजे. हेच तर सारे अशिक्षित, अर्ध, उच्च, अतिउच्च शिक्षित माणसांच्या आपले झेंडे रोवून आपल्या पुढच्या २-३ पिढ्या समृद्ध करून जाण्याचे गमक आहे. हेच तर एक खुले सत्य आहे, जिकडे तिकडे प्रकाशून असलेले. एकच एक काही केले पाहिजे, ते करत करत गेले पाहिजे... परिपूर्ण वगैरे होत गेले पाहिजे. 
ऐक भाऊ एक मार्ग भला 
इकडे-तिकडे हुंगशी
तू वेडा का खुळा
सन-थोर चालले 
रस्ता धरूनी नेटाने 
तुही पकड ऐक दिशा 
चाल कडेकडेने 
अशा तर अशा पण कविता येतच राहिल्या हव्यात, जगावर प्रकाशझोत मारून नवे नवे काही बाहेर आलेच पाहिजे, जरी माणसे आदिम काळापासून तशीच आहेत असे वाटले तरी तसे न म्हणता आधी खोटेच काही म्हणून मग जड जड शब्दांनी ते हळूच चुकले असे म्हटले पाहिजे. होतेच तर आहे असे, त्या दूर पश्चिमेच्या देशात युनीवरसीट्या मध्ये नवे नवे हररोज येते आहे, सूट-बूट टाय लावून माणसे तेजाळ होत देशचे देश इकडे तिकडे नेत आहेत, इतिहास नव्याने कळतो आहे, भूगोल नव्याने बदलतो आहे, इकडे तिकडे पृथ्वीसारखा ग्रह मिळतो आहे, नव्या कादंबऱ्या, नवे टीकाकार, नवे कवी, नवे संदिग्ध साहित्यिक, नवे, नवे असे क्षणाक्षणाला बनून अवघ्या मानवजातीवर कोसळते आहे. असे सतत सतत नवे मिळत राहणे हेच तर खरे, हेच सत्य, हेच ते जे आपण पिढ्या-पिढ्या चिरंतन शोधत आलो, ते हेच कि जे शोधतो ते नवे नवे बनून आले पाहिजे..
जिकडे तिकडे ह्या सत्याचा परीसस्पर्श मिळत आहे. इंटरनेट, टीव्ही, नाके जिकडे तिकडे नव्या नव्या प्रगतीचे मंत्र ऐकवणारे महंत आहेत. आणि ते इतके हवेतच. फार थोड्यांनी खरे काय ते सांगितले कि त्याला भलतीच किंमत येऊन ते एकदाच मुरवून परत परत वापरले जाईल. पण फार माणसे उच्च रवाने सांगू लागल्याने ते खरे आहेच असे वाटणेही बंद होते आणि मग ते परत परत शोधायला अर्थ राहतो. ते शोधणा-याचे जीवन सार्थकी वगैरे कुठेतरी लागून जाते... असे व्हायलाच हवे. दशावतार, व्यास, बुद्ध, शंकराचार्य, सोक्रेटीस, अरीस्टोटल, प्लेटो,  सोफेक्लीस, शेक्सपीअर, थोरो, थिरूवल्लूर, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, पॉपर, केन्स आणि अजून असे मृत, हयात, ज्ञात-अज्ञात, त्याचे शिष्य, अभ्यासक, वाचक, प्रकाशक, चिंतक असे सगळेच होऊनही नवे नवे सारे काही सापडतेच आहे...सापडो सापडो
मी तर चाललो आहे, मला तो धुक्याच्या दाटीआडचा आश्वस्त आवाज ऐकू येतो आहे, मला आता कोणी नको आहे माझे काही ऐकायला, मला काही विचारायला, मला दारू, गांजा, सिगरेट, बिडी, बाई, आई, मांजर, कुत्रा, मित्र, माणसे कोणी नकोत. 
मी हे हिवाळ्याच्या रात्रीचे निशब्द चांदणे आपल्या त्वचेत पेरून घेतो आहे, मी हे शहर मागे पडताना गाढ होत जाणारी शान्तता भरून कानाची रंध्रे बुजवतो आहे, तुझी शरीराच्या तृप्तीने क्लांत छबीची वितळती मोहर लावून मी डोळे मिटले आहेत, स्मरणाच्या सुया माझ्या रक्ताचा थेंब थेंब टचटचणा-या अबोध दुखांच्या नावे झेलून घेतायेत,  मी घेतो आहे आटोकाट हवा काठोकाठ  फुफ्फुसात भरून आणि मग ह्या हिरव्या-निळ्या अफाट जळात सूर मारतोय, शब्द, नाद, स्पर्श,दृश्य, संवेदना 
सा-याच्या पलीकडचे असणे झाकोळून जाणारी जाणीव मला कवेत घेताना..                               .              

Saturday, December 4, 2010

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो...
हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण डॉक्टर.... (थोडक्यात गरिबी हे मरण्याचे कारण बाद) ह्याचे एका परधर्मीय मुलीवर प्रेम होते आणि ह्याच्या आईचा लग्नाला विरोध होतं... (ऐकल्यासारखी वाटते ना गोष्ट) मागची तीन वर्षे ह्याचे आईबरोबर झगडे होत होते आणि तो नोकरीनिम्मित दुसर्या शहरात रहात होतं. मरण्यागोदर त्याचं आई आणि प्रेयसी दोघांबरोबर भांडण झालेलं. आणि मग....
त्याने गळफास लावला...खाली खुर्ची नव्हती.... आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते.... हा जेव्हा मेलेला सापडला तेव्हा त्याचे गुडघे दुमडलेले होते.... आणि शरीर निळे पडलेले ....
माझ्या मित्राच्या मते हे मरण्याचे झ्याटू कारण आहे.... त्या मुलीशी लग्न करून भांडत भांडत आईला समजावता आला असतं....
माझ्या मते आत्महत्या करणारे कायमच बरोबर असतात.... फक्त तर्काच्या दोर्या वापरून त्यांच्या बरोबर असण्याच्या मुळाशी पोचता येत नाही.... its on altogether different plain... आणि त्यांना भित्रे वगैरे म्हणणे म्हणजे जगत रहाणार्यांनी आपल्या भोंदू गांडूपणाला जोडलेली शौर्याची बेगडी शेपटी आहे.... त्यांना मरावासा वाटलं ते मेले.... जे हवं होतं ते मिळत नव्हतं हे मरण्याचं सबळ कारण आहे.... ते कधी ना कधी मिळेल किंवा त्यापेक्षा बरं मिळेल किंवा ते दुखच संपून जाईल अशा तथाकथित 'आशावादाला' चिकटून जगत राहणं कि खरंच चांगली निवड आहे का.... आता मी अजून जिवंत आहे आणि तरी असे म्हणतो आहे... मग मी मरत का नाहीये.... बरोबर आहे तुमचा प्रश्न.... त्याबद्दल नंतर कधीतरी.... आता विषय वेगळं आहे.... (सोयीस्कर!)
आता हा इसम मेल्यावर त्याच्या आईचा आणि प्रेयसीचा काय.... त्याच्या प्रेयसीने पण आत्महत्येचा प्रयत्न केला अशी ऐकीव बातमी.... पण आईचं काय....
एखादा माणूस,,, अगदी निराशावादी माणूसही आपल्यामुळे मेला आहे हे जाणवत राहून जगत राहणं हा काय प्रकार आहे....
आता कदाचित ह्या इसमाचे लग्न झाल्यावर त्याने एक वर्षात घटस्फोट घेतला असतं... किंवा त्याच्या बायकोने आत्महत्या केली असती.... किंवा ह्या माणसाला मुळाशीच काही पोकळपणा असणार... म्हणून त्याने आई-बाई अशा शुल्लक प्रकाराने आत्महत्या केली.... किंवा प्रेमात पडल्याने आणि उभं न रहाता आल्याने....
आम्ही दोघं त्या मृत इसमाचे सहानुभूतीदार आहोत का तटस्थ निरीक्षक.... जे एकूणच ह्या मृत्युच्या तात्विक पार्श्वभूमीचे विश्लेषण करत आहेत....
त्याला मरण्याच्या शेवटाच्या काही क्षणात काय वाटलं असेल.... कारण खुर्ची वापरून गळफास हा तुलनेने मरण्याचा कमी त्रासदायक प्रकार आहे... मणका तुटतो... आणि खल्लास... (मित्राकडून आलेली माहिती) ...आता इथे हा लटकत होता... प्रयत्नपूर्वक गुडघे दुमडत असणार.... पण मग तो आधी बेशुद्ध झाला आणि हळूहळू ... का मरेपर्यंत त्याने गुडघे टेकलेच नाहीत...मरणासमोर.... का काळा-निळा पडण्याच्या शेवटच्या क्षणात जगण्याच्या इच्छेचा डोंब उसळून आला आणि तिथे कोणी नव्हतंच.... त्या मुलीला कधी कळलं नाही कि हा असा टोकाला जाऊ शकतो.... का असे टोकाला जाऊ शकतो वाटणारे कुठे जाणारे नसतातच....जे जातात ते असे झटकन....
त्याला हे का कळलं नाही कि प्रेम ही भावना हळूहळू विरत जाईल आणि सोयीस्कर तडजोडीने तो समाधानाचा घरगुती अंगरखा पांघरू शकेल....
शक्यतांच्या जाळ्यात न येणारी घटना एवढंच म्हणून हा 'इवेन्ट' सोडून द्यावा लागेल का.... मेळघाटात माणसे जगतात, हजारो किलोमीटर अंतर तोडत जगण्याची नवी मुळे पकडतात, बकाल दारिद्र्यात जगतात, एकवेळचे जेवण खाऊन जगतात.... म्हणजे ऑन एवेरेज माणसाच्या जगण्याचा आशेचा तंतू प्रबळ असताना हा असा का..... किंवा बाकीचे असे का..... अख्या भारतात मागच्या वर्षी असे ३७००० आहेत.... कोट्यावधींच्या जगण्यात, जे दरवर्षी ९%ने समृद्ध (!) होते आहे त्यात हे उदास जीव का....
जे हवं आणि जे आहे यांच्या मधलं अंतर कधी कधी इतकं न संपणारं का असतं....
त्याच्या आणि त्यांच्या आत्महत्येनंतर माझे हे वांझोटे प्रश्न....

Sunday, September 12, 2010

पुनरागमनाय च

समोर दीड दिवसाच्या गणपतीची उत्तरपूजा चालू आहे. मागची काही वर्ष मनातली श्रद्धा खुरटून सुकून गेली आहे. कुणा एका नावावर, मूर्तीवर, मंत्रावर श्रद्धा उरलेलीच नाही. तरीपण अजून पार बुडखा साफ झाला आहे असं वाटत नाही. श्रद्धा ओरबाडली गेली तरी विश्वास कोसळलेला नाही. 'हेची दान देगा देवा' ऐकताना हा देव आहे का नाही हा प्रश्न डाचत नाही, तर तो असेल किंवा नसेल त्याच्याकडे सारं काही सोडायचा अन सारं काही मागायचा आर्त विश्वास जाणवतो. पंढरपूरला जावसं वाटत नाही, पण त्या विठलापायी वेडावलेल्या संतांच्या भक्तीला, रूढार्थाने केवळ दुख मिळत असतानाही त्यालाही 'बरे झाले देवा' म्हणण्याच्या घट्ट रुजलेल्या विश्वासाचा नवल वाटतं. आता उत्तरपूजा संपेल, परडीतली फुले समोरच्या गणेशाच्या मूर्तीवर वाहिली जातील, आणि शब्द उमटतील, 'पुनरागमनाय च' ..... विसर्जित हो नाही, जा आत्ता पुरता, परत येण्यासाठी....
दुख थेट पत्करतच नाही आपण. लहान मुलाला घरात कोणाचा मृत्यू झाला कि त्या मृत्यूची आडवळणाने ओळख करून दिली जाते. देवाघरी म्हणजे कुठे तर खूप लांब, आकाशात, किंवा अशा ठिकाणी जिथे काही दिवसांनी सगळेच परत एकत्र येणारेत. घरातून बाहेर पडताना, आपल्या किंवा दुसर्याच्या, येतो म्हणावा, जातो नाही हे शिकवलं जातं. का? तर म्हणावं असं. जे एक अटळ सत्य आहे तेवढं टाळून बोलायचं. 'जगलो वाचलो तर भेटू' असं म्हणून जर सगळे एकमेकांचा निरोप घ्यायला लागले तर बघा कसं वाटेल. आशेचा गळ लावून ठेवला कि मृत्यूची थंडगार भीती जरा रोडावते. मृत्यू वगैरे तर बराच मोठा प्रकार झाला. समजा पाहुण्यांकडे गेलो आणि पहिल्या क्षणी असा विचार मनात आला कि दोन दिवस जातील खरे मजेत इथे, पण मग यांचा निरोप घ्यायचाच आहे, मग ते दोन दिवस तरी मजेत घालवता येतील का. संपण्याची जाणीव तीव्र आणि धारदार आहे, एकदा ती उमटली मनात कि जेवढा वेळ ती रहाते तेवढा वेळ सारं रिकामं करत जाते. थेट न बोलतं, चर्चा न करतासुद्धा आपण कायम मरणाची, स्वतःच्या किंवा आपल्या जिवलगांच्या, जाणीव जवळ बाळगून असतो. म्हणून तर आपण विमा उतरवतो, नोमिनीज देतो आणि कुठे कुठे हात जोडत राहतो.... जेव्हा केव्हा ते होईल तेव्हा ते होईल तेवढा सुसह्य व्हावं, किंवा त्याचा विचार न करता आपण सरकत जातो.... त्याच अटळ टोकाकडे
जर माणसाला आशा ठेवणं माहीतच नसतं तर शेवटाच्या जाणीवेने जाणवणारा कोसळलाच असता. आशावाद सारं संपणारं आहे, क्षणभंगुर नसेल पण नाशिवंत आहे ह्या स्वच्छ जानिवेतच जन्माला येतो. 'even this will pass' हे न समजत उमटणारी आशा ही फारसा भक्कम पाया न बांधता उभारलेल्या इमारतींसारखी आहे. एखादी वावटळ आणि मग आयुष्यभराची काजळी. पण एका क्षणी हे सगळं मिटेल हे जाणवूनही जेव्हा जगावंसं वाटतं तेव्हा 'कशासाठी जगायचं' जी असहाय्य व्यर्थता किंवा वैफल्य घेऊन जगताच येणार नाही. असं वैफल्य एका बेसावध क्षणी स्वतःच्या चिंधड्या उडवूनच संपेल. अर्थात वैफल्याच्या एवढ्या टकमक टोकालाही कोण जातात? अनेकांना अशी जाणीव होत नाही हे चांगलंच आहे, नाहीतर आयुष्यभर सुतक पालानार्यांची एक मोठी जमात जन्माला आली असती. अनेकांना हे जाणवत नाही ही त्यांची कमतरता नव्हे, तर देणगीच. म्हणून तर दीड दिवसासाठी का होईना लोकांनी मातीची एक मूर्ती घरात आणली नसती, तिच्यात प्राण उतरले अशी समजूत करून घेतली नसती, आणि मग डबडबल्या डोळ्यांनी तिला पाण्यात सोडताना 'पुनरागमनाय च' असं म्हटलंच नसतं.
पण हे सारं संपणार जरी असेल तरी एखादं धुंद क्षण असं असेल कि आयुष्य केवळ क्षणांचा गुंता किवा सरळ दोरा उरणार नाही. त्या आयुष्याची वाट करून त्याला उजळत संपवणारे एखादे बेभान वेड त्याला लागेल आणि मग हे सगळं असो किंवा नसो, त्या धुंदीत उरणं एवढा एक सरळ सोपा हिशोब राहील. मुळात काही संपेल ही जाणीव जास्त कुरतडते, त्रागा करायला लावते, पण तो कोसळीचा क्षण झाला कि तितका काटेरी वाटतच नाही. एक कोरडेपण तेवढं रहात. त्या कोरडेपनापेक्षा इतर सार्या जाणिवांच्या पार घेऊन जाणारे काही एक ना एक दिवस समजेल ही आशा का वाईट?
ती आशा आहे म्हणून ही लक्षावधी माणसे जेवढा वेळ आहेत तेवढा वेळ जगू पाहतायेत. स्वप्ने पाहतायेत, कोसळत, पडत-झडत चालत राहतात. ही दुर्दम्य आशा टिको, वाढो, आणि एखाद्या क्षणी ती संपली अशी वाटेल तर कोणीतरी पुन्हा म्हणो, 'पुनरागमनाय च' .

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...