Showing posts with label मुक्त. Show all posts
Showing posts with label मुक्त. Show all posts

Tuesday, January 18, 2022

Chinua Achebe ह्यांची Things Fall Apart

 नुकतीच मी Chinua Achebe ह्यांची Things Fall Apart ही कादंबरी वाचून संपवली. १९५८ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आफ्रिकन इंग्रजी साहित्यातील महत्वाची कादंबरी मानली जाते.

नायजेरियातील Igbo लोकसमूहाचे जीवन, त्यांच्या श्रद्धा आणि मूल्ये, आणि युरोपियन वसाहतवादातून येणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या दबावाने ह्या श्रद्धा आणि मूल्यांत होणारे बदल – प्रामुख्याने त्यांचे ढासळत जाणे ह्याचं चित्रण कादंबरीत आहे.

प्रतिमा - इथे 

For all the fame of the novel, it is a very straightforward and compact read. पेपरबॅक आवृत्तीत कादंबरी १५२ पानांची आहे. गोष्ट अगदी मोजक्या पण अचूक तपशीलांतून आपल्यासमोर येते. अनेक Igbo संज्ञा आणि नावे असूनही त्याचा वाचताना फार त्रास होत नाही. Igbo म्हणी/वाक्प्रचार चपखलपणे जागोजाग येतात. It is a beautiful quick read that can lead to some deep reflections, if it reaches to one.

--

मला पुस्तक वाचताना आठवलेली अन्य पुस्तके/सिनेमे म्हणजे महाबळेश्वर सैल ह्यांची तांडव, द लास्ट समुराई (सिनेमा) आणि अनिल बर्वे ह्यांचं डोंगर म्हातारा झाला. तांडवला Things Fall Apart सारखीच वसाहतवादी धर्मांतरणाची पार्श्वभूमी आहे. पण तांडवमध्ये प्रचंड आक्रोश आहे. Things Fall Apart is in that sense is a creation of higher order. त्यांत क्रोध आहे, पण तो धुमसणारा नाही. क्रोधाचे, त्यातून येणाऱ्या कृतीच्या प्रेरणेचे, आणि आपली कृती किती थिटी, किती य:कश्चित, जे चाललं आहे त्याला तसूभरही न बदलणारी आहे ह्या जाणीवेतून येणाऱ्या कडवट शांततेचे चित्रण प्रचंड निर्विकारपणे केलेले आहे. ह्या निर्विकार चित्रणाला शेवटी एका अचूक फटकारा तेवढा दिलेला आहे. तांडव – त्या तुलनेत बंबाळ आहे, आणि वाचताना हा प्रश्नच पडतो कि हे लोक एवढे रडत राहिले, तेव्हा लढले का नाहीत? आपल्याला मोलाचे आपल्याकडून हिरावले जात असताना त्या बदलाचा हुंदके देत स्वीकार करणं ही निवड बुचकळ्यात पाडते. There is no fight.

द लास्ट समुराई किंवा डोंगर म्हातारा झाला मध्ये ही फाईट आहे. आपल्या कृतीने आपले वांछित ध्येय गाठायला काहीही मदत होणार नाही किंवा परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही हे दिसत असतानाही आपण जे करू शकतो ते झोकून देऊन करण्याची irrational but spectacular निवड ही फारच striking गोष्ट आहे.

--

आपल्या आधुनिक व्यक्तिवादी मूल्यांत अशा वेडेपणाला फार जागा नाही. The concept of standing one’s ground for one’s beliefs is lost to us. हवंतर जे हरवणार, संपणार आहे त्याचा शोक करावा, अगदी अशा शोकाची नशा करावी, पण आपल्या आयुष्यात तसूभर फरक न पडू द्यावा असे आता आपण जगतो.

आपल्याभोवती जे चाललं आहे त्याचं वर्णन करणारी जी मॉडेल्स असतात त्यातलं एक मॉडेल आहे ते म्हणजे – anywhere आणि somewhere चं. आपली आधुनिक मूल्ये ही anywhere वाल्यांची आहेत. खूप औपचारिक शिक्षण घ्या, खूप वाचा किंवा पहा, आपल्याला जे हवं ते करण्यासाठी – जे आपणच ठरवायचं आहे – जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण कुठलेही होऊ नका, कायम fluid अशी नैतिकता ठेवा, कशाला कमिट होऊ नका, कारण आपण बुडत्या बाजूला असू तर आपलेच नुकसान असे हे anywhere लोक. ह्या निखळ स्वनिर्धारित मूल्यवस्थेत मी कोणत्याच बाह्य गोष्टीला अनुसरून जगत नाही. त्यांची प्रसंगोपात नैतिक भूमिका हीही त्यांच्या करिअरचा एक भाग असते, it is just an act they choose to play and can abandon if there are enough incentives.

--

ज्या William Yeats च्या कवितेतून Chinua Achebe ने आपल्या कादंबरीचे नाव दिले आहे, त्या कवितेत हा हरवण्याचा सूर जबरी आहे. Chinua Achebe ने आपली कादंबरी इंग्रजीत लिहिली, प्रादेशिक भाषेत नाही, just a point to note.

 

The second coming by William Yeats (इथून घेतली आहे – लिंक) – पुढे दोन कडव्यांपैकी पहिले आहे.

 

Turning and turning in the widening gyre  

The falcon cannot hear the falconer;

Things fall apart; the centre cannot hold;

Mere anarchy is loosed upon the world,

The blood-dimmed tide is loosed, and everywhere  

The ceremony of innocence is drowned;

The best lack all conviction, while the worst  

Are full of passionate intensity.

Saturday, May 1, 2021

The Disciple नंतर

‘प्रेस्टीज’ च्या सुरुवातीला आपल्याला कळतं कि कोणत्याही जादूच्या प्रयोगाचे तीन भाग असतात, the pledge, the turn and the prestige. एक दाखवलं जातं, मग त्याला अनपेक्षित कलाटणी मिळते आणि मग अपेक्षित आणि अनपेक्षित जुळून येतं. ‘The Disciple’ हा तसा प्रयोग आहे, फक्त जादूचा नाही, तर माणसाने आपली औकात समजून घेण्याच्या चिरंतन प्रश्नाचा. त्यासोबत ‘कला नावाचा प्रकार आणि मार्केटशाहीच्या युगात त्याची peer reviewed system पासून मतदान/लाईक्स सिस्टीम पर्यंत होणारी वाटचाल ह्यावर चित्रपट बकुबी भाष्य करतो. हे भाष्य subtle आहे, आणि त्यामुळे प्रभावी आहे. पण ह्या subtle approach मुळे हा चित्रपट एका मर्यादित वर्तुळाचा असणार आहे. Netflix वर रिलीज करून त्यांनी ह्या दृष्टीने अचूक काम केलेलं आहे.   

चित्रपटात जोशी नावाच्या माणसाचे काही मिनिटाचे संवाद आहेत तो चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही हे ‘सांगणं हे मला गरज आहे हे सांगणंच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे. राजकीय नेते जेव्हा होणार नाही म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ शक्यता आहे असा असतो, शक्य आहे म्हणजे करायला सुरुवात केली आहे असा असतो आणि जे करणार आहेत ते सांगतंच नाहीत, कारण अनपेक्षित असणं हेच प्रतिस्पर्ध्याला चकवायला महत्वाचं असतं तसं ‘मला नकोय अमुक अमुक हे सांगण्यात मला हवंय हाच सिग्नल असतो. ज्याला अशी गरज नाही तो सांगायला म्हणून तरी कोणाला का शोधेल? कलाकाराची आत्ममग्नता हा त्याच्या परफॉर्मन्सचाच भाग असतो आणि तो परफॉर्मन्स हा दुसऱ्या कोणासाठीच असतो. कलेच्या व्याख्येतच ती निर्माण करणारा आणि तिचा आनंद घेणारा अशी दोन टोके आहेत.

पण ह्यातल्या एका टोकाला वाटतं कि ते स्वायत्त आहे. त्यांचा असा गंड सांभाळणारे लोकही असतात, जे खरं दुसरं टोक असतात, पण ते स्वतःला अदृश्य करतात. त्यांना पहिल्या टोकाकडून मिळणारं मनोरंजन पुरेसं असतं.

संगीताच्या बाबतीत सोशल मिडियामुळे कोण कलाकार ह्याची व्याख्याच बदलली आहे. आधी तुम्ही पुरेसे कलाकार आहात का नाही ह्यावर तुमच्या जेष्ठ peers चा बराच प्रभाव होता. मुळात शिष्याचे कौशल्य आणि कारागिरी ही शिक्षकांच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून होती. आणि त्यांच्या हाती असलेल्या ह्या पॉवरमुळे ह्या जेष्ठांचा आदर ही आवश्यक नीती होती. तुम्हाला सुरुवातीला मिळणारा रिलीज हा ह्या रेफेरीजच्या तुमच्या बद्दलच्या मतांवर, feedback वर अवलंबून होता. तुम्ही कलाकार आहात का नाही हे तेच ठरवणार होते. दुसरा पर्याय काय होता? लोकांनी वाहवा दिली असती, पण उपजीविका?

आज तर मी ‘कलाकार आहे का नाही हा स्वतःच ठरवायचा मामला आहे. मला वाटत असेल मी अमुक अमुक करू शकतो तर मी तो आहे असं आपण म्हणतोच. आणि एखाद्याला तू तसा नाहीस हे सांगणं म्हणजे हिंसाच हेही नवे मूल्य आपण आणलेले आहे. क्रिटीकल, मन दुखावणारा feedback देणं हे आपण सुजाण व्हायच्या नादात थांबवलेलं आहे. आणि कोणी दिलाच असा feedback तर आपण दुसऱ्या कोणाला तरी गाठू शकतो. फी दिली कि मला हो म्हणणारा कोणीतरी असेलच. आणि कोणी हवा कशाला, मी थेट स्वतःला रिलीज करून लोकांच्या लाईक्सचा सर्वोच्च निकष थेटच ताडून पाहू शकतो.

शिक्षकांची, जेष्ठ peers ची सद्दी ही अनेक क्षेत्रांत संपुष्टात येते आहे. तुम्ही स्वतःला स्पर्धेत थेट सहभागी करू शकता. कोणीतरी तुम्हाला निवडायची गरज नाही. अर्थात काही क्षेत्रांत अजूनही निवडीच्या शुक्राचार्यांना वाव जास्त आहे (खेळ, academia इत्यादी.)

लोकांच्या रिंगणात थेट उतरताना कौशल्य आणि रंजकता ह्याचं मिश्रण तुमच्याकडे असायला लागतं. पण दर्दी लोकांच्या खाजगी रिंगणात रंजकतेला फारशी किंमत नाही. लोकप्रिय आणि उत्कृष्ट ह्यांचे नाते असे विचित्र आहे. एखादी गोष्ट उत्कृष्ट आहे कि नाही हे ठरवायला तिला मोठा ट्रायल पिरीयड लागू शकतो. पण लोकप्रियतेच्या बेभान स्टेडीयमला एवढा वेळ नाही. जिंकण्या-हरण्याच्या स्पर्धेची प्रत्येक आवृत्ती थोडाच वेळ आहे आणि तुम्हाला मर्यादित attempts आहेत. आणि परत जे उत्कृष्ट असेल ते रंजक असेल असे नाही.

हा क्वालिटीचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जास्त फंडामेंटल आहे. तो म्हणजे  How to make peace with one’s own mediocrity. You are good at something and maybe you touch the best at time, but not consistently to call yourself best. मग तो बेस्टचा पाठलाग करायचा का त्याला खुबसुरत मोड देकर सोडून द्यायचं? आपला आणि त्या विलक्षण क्षणांचा संबंध आपल्या आनंदापुरता ठेवायचा आणि स्पर्धेतून अलगद अदृश्य व्हायचे? का गिरवत रहायचे, अपयश हे यशाची पायरी असे अपयश दाबत दाबत वर सरकायचे? पण हा वर सरकायचा स्पीड पुरेसा नसेल तर? मग करायचं काय?

लोक साधना, सत्य वगैरे ढाचे देऊ शकतात, पण ही सगळी आंबट द्राक्षांची वाईन. त्याचीही मजा आहे, पण वाईन बनून टुन्न होईपर्यंत फार उलाघाल.

किंवा मग आपलं काही न झाल्याचा कडवटपणा मनात ठेवून आपल्या अस्तित्वात तो हळूहळू मुरू द्यायचा. तसं उघडपणे काही म्हणायचं नाही, पण होईल तसा जगावर सूड उगवायचा, जो/जे समोर असेल त्याच्यामार्फत.

संजय मांजरेकरचं आत्मचरित्र ह्याबाबतीत मला फार आवडलं. त्याने फार प्रामाणिकपणे त्याची असूया, असुरक्षितता मांडली आहे. आणि कडवट अस्तित्वाचे तो एक उत्तम उदाहरणही आहे कदाचित!

काहीही करून, आपल्याला आपल्या तोकड्या असण्याच्या जाणिवेचे काहीतरी करावेच लागेल. एकतर तोकडे नसण्याच्या किनाऱ्याला जायला, without rope वगैरे छलांग मारावी लागेल (जसं batman करतो, माई म्हणतात), किंवा खुबसुरत मोडवर मागे परतून आपल्यापुरते आनंदाचे वर्तुळ आखायला लागेल, किंवा कडवट, सिनिकल होत जाण्याचा स्वाभाविक मार्ग.

असं करूनही केव्हातरी आपल्याला ते खुणावतच राहील, what it could have been, how beautiful it can be.

Well done, चैतन्य ताम्हाणे. I will be looking forward to your next.    

Friday, April 20, 2012

निषिद्ध वळणापाशी


बोलून बोलून शब्द थकतात आपले, 
आणि खूप काही खुणावणारे मौन तरंगत राहते 
रात्र थांबते, रेंगाळते, उद्या वाटतो खूप दूर 
खरा नकोच असतो तो यायला, 
निग्रहाने जपलेले अन्तर एकदाच ओलांडून जावे
आणि...

होत नाही असं आणि गळा घोटणार्या शांततेला फोडावं म्हणून 
आपण परत हे-ते बोलू लागतो..
आपण कोण आहोत, एकमेकांचे?
काळ-वेळ जुळून आलेले सहप्रवासी, 
जे वेडसर एकटेपण रोखून ठेवण्यासाठी एकमेकांची सोबत देतायेत..
आणि सोबतीची सवय झाली तरी तिला काहीच नाव देत नाहीयेत...
आई-बाप नसलेल्या पोरासारखे क्षण आपले,
वेगळे झालो कि नव्हतेच काही म्हणायला मोकळे ठेवणारे..
सोय आणि सवय यांच्यामध्ये 
परत एकदा आलेली शांतता..
मला कुशीत शिरायचं तुझ्या..
मला तुझं बोट धरून तुला शोधायचय, तुझ्या गंधित मोकळ्या देहात...
मी यातलं काहीच सांगत नाही, 
आणि तूही काहीच बोलत नाहीस.. 

यापुढे दोन वाटा जातात जानम, 
एक तुझ्या त्वचेच्या तप्त कल्लोळात हरवणारी, 
मांसल, तलम वळणे घेत असोशीच्या क्षणिक तृप्तीशी जाणारी वाट...
आणि तिच्या पुढे, 
तू जगलेल्या पुरुषांच्या यादीत माझे एक नाव,
आपल्या आधीच केलेल्या करारांशी विश्वासघात
आणि एकमेकांशी अनोळखी होऊन सुट्टे सुट्टे, मोकळे श्वास घ्यायची धडपड...
मी उठतो, 
खिशात हात घालून खांदे उडवतो, 
कसाबसा निरोप घेऊन दुसरी वाट पकडतो, 
जी पहिल्या वाटेला निरखत निरखत 
तुझ्यापासून दूर जाते...

Saturday, December 24, 2011

शोकाचे प्रहर उमलता

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. तुला मी सांगतोय ते सांगितल्याने तू काही उतारा सुचावशील आणि हे सलत जाणारे दुख आणि गुदमरवणारी शांतता जाऊन खेळत्या हवेचा विलक्षण आल्हाद येईल म्हणून नाही. उलटी केली कि कसं बरं वाटतं तसं जे सांगायचं ते बाहेर पडलं कि वाटतं म्हणून सागतोय...कारण नुसते माझ्याच माझ्यात हे शब्द घुमून, माझ्या शरीराच्या, धमन्यांच्या भिंतीवर निनादून माझ्या आत त्यांच्या प्रतीध्वनिन्च्या लाटा येऊन मी पार बुडून बुडून... ऐक , नुसतं ऐक, नाहीतर तुला सांगताना मी माझ्यात गुरफटून माझ्यातल्या पोकळीशी माझ्या बुबुळातला प्रकाश गिरवत बोलू लागलो कि चुपचाप निघून जा... पण जाताना काही म्हणजे काही सांगू नकोस... 
      काल असं झालं कि मी रात्री एकदम उठलो. माझ्या घरात किंवा मी ज्यांच्या घरात राहतो ते बाकीचे सगळे झोपले होते. मला एकदम वाटलं कि असेच एक दिवस सगळ्यांचे मृतदेह ठेवलेले असतील, दगडी स्थिर. कोणी रडत असतील, कुणी मुके उमाळे स्फुंदत असतील आणि काहीवेळा त्या प्रेताच्या थंड शरीर होऊन जाण्यात तुटून गेलेले आठवणींचे तुकडे कधीतरी एकदम ओलसर हळवे होऊन येतील. भर रस्त्यावर मध्ये चालत असताना तुम्हाला गेलेले माणूस आठवेल, त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवतील, त्याचे हावभाव, त्याच्या शरीराच्या हालचालींची लकब, त्याचे राग, लोभ, सवयी, तिरस्कार, माया सारे एकदम गळ्याशी दाटून येईल, अगदी गर्दीच्या मध्ये डोळे भरून येतील, धाय मोकलून रडावेसे वाटेल, जे चालले आहे ते सारे आता केवळ जिवंत असण्याच्या स्वाभाविक गृहितकाने ढकलले जाते आहे, पण जे होऊ शकत होते ते सारेच त्या माणसाच्या जाण्याने मिटून संपून पार पुसून नुसते कल्पनेच्या नाजूक दुनियेचे होऊन बसले आहे...
   पण हेही फसवे आहे. असे एकमेकांचे मृतदेह बघूनही, एकमेकांना जाळून, पुरून, राख करूनही माणसे परत हसताना दिसतात. परत त्यांना हवेहवेसे, नकोनकोसे वाटण्याएवढे आयुष्याचे आकर्षण रहाते. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे ते दुखाला निष्ठुर दाबत जातात. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे परत ते निवांत शांत झोपू लागतात, चवीने खाऊ पिऊ लागतात, देवभक्ती वगैरे करून, इतरांच्यात जीव वगैरे लावून परत नव्याने दुखाचा डंख घ्यायला ताजेतवाने होतात. 
   इतके वर-खाली झुलत राहूनही आपण उत्साहात, उमंगीत जगू पाहतो...ही सारी केव्हातरी जगणे खाऊन जातील इतके भव्य वाटलेल्या दुखाची थट्टा आणि ही निगरगट्ट असोशी हाच तेवढा जगायचा एकमेव तोडगा... आपण जसे असे आहोत तोच आपला खरा उपहास आहे आणि तेच आपले खरे असणे आहे... 
    आणि आता हे इतके सारे स्पष्ट दिसूनही तू माझ्याकडे पुढच्या दिवसांच्या सावलीची, रात्रीच्या चादण्यांची अनुमाने मागतेस..तूही एकदा अशी पडणारच थंडगार, दगडी, निर्जीव लाश होऊन...किंवा केव्हातरी तुझ्या जगण्याची अपरिहार्यता तुला माझा अटळ श्रोता होऊ देणार नाही आणि मग माझा तुला गृहीत मानून आपल्याच सावलीत आपल्या असण्याचे गूढ उकल्यणाचा धंदा बंद पडेल. मग हे असेच सैरभैर दिवस, ह्या अशाच पुढच्या दिवसाची हूल आणि भय देत सरकन संपून जाणा-या रात्री. हे असेच सगळे शब्द, शब्द, शब्द, श्वासात, हालचालीत, बंद-खुल्या डोळ्यांत, अंघोळ करताना , कमोडवर, रस्त्यात, अंथरुणात, आपल्याच असण्याचे आपल्यालाच नकोसे ओझे वाहताना ते आपल्याला हवेहवेसे वाटत रहाण्याचा भयानक खेळ आणि आपण एकच वेळी त्यात खेळत खेळत हारत जाणारे, आपणच तो खेळ बघत टाळ्या वाजवणारे आणि आपणच त्या खेळाचे धावते समालोचन करणारे.     
शोकाचे प्रहर उमलता 
दुखाचा शिशिर बहरतो 
संदिग्ध होऊनी दृष्टी 
अंधार मंद पसरतो 

माझ्या ओळी आणि त्याच्या आत परक्या कवीचे, परक्या लेखकाचे अस्तित्व...साले जन्मापासून आपण असेच ह्याचे त्याचे शब्द वाचत ऐकत पहात मोठे होणार, आणि मग आपल्यात ओरिजिनल काय. नुसती मुळाक्षरे शिकवून, ऐकवून सोडून दिले तर आपण काय सांगू बोलू तेच खरे, पण आता हे असे एवढ्या वर्षांचे कम-अस्सल सारे साठून बसले आहे. आपण काहीही म्हटले तरी इसवी सनाच्या आगे-मागे किंवा समुद्राच्या ऐल-पैल पसरलेल्या देशांमध्ये कोणी ना कोणी तसे काही म्हटलेलेच असते. म्हणजे आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पण आपल्या खाजगी मालकीचे नाही. ते साले आधी कोणी तरी चितारलेले. हे साले शब्दांचे असे फुटके नशीब. चित्र, गाणे, नाच, शिल्प अशा बाकी चौसष्ट वगैरे कलांत असे फार होत नसावे. ज्याच्या रेषा त्याच्या रेषा, ज्याची पावले त्याची पावले, ज्याची तान त्याची तान... पण लिहिणारा असं दस्तुरखुद्द स्वतः नाहीच. तो असाच ह्याच्या त्याच्या गडद-फिकेपणाचे नाजायज पोर. आणि तरीही तो तेच शब्दांचे शस्त्र, शब्दांच्या कुबड्या, शब्दांचा एनिमा, शब्दांचा वेन्तिलेतर लावून आपल्या जगण्याची थडथडती नस पकडू पहाणारा. 
  हे वर्षानुवर्षांच्या शब्दांचे पर्वत ओलांडून गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडचे ध्वनींचे, हालचालींचे, सूचक संकेतांचे बर्फाळ निद्रिस्त अरण्य ओलांडून आपले असणे आपल्याला जाणवण्याच्या निखळ किना-याशी पोचले पाहिजे. अर्थांची सारी पुटे खरवडून जे आहे ते तसे बघायचा झरोका मोकळा केला पाहिजे. टक्क उघड्या डोळ्यांनी पार भिडून पाहीले पाहिजे जगणे भय-भीतीचे आदिम कुंपण तोडून. चव, नाद, स्पर्श, अर्थ असे साऱ्यातून येणारे सुखाचे फसवे हुंकार पचवत पाहिलं पाहिजे कि आपल्या आत खरंच तो आपला आवाज वगैरे आहे का का सारेच एका रिकाम्या पोकळीवर उभारेलेले वेष्टन आहे. आणि ह्या अंतिम प्रश्नाची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सगळ्या येडझव्या पायपिटीची, त्यातल्या एकारलेल्या भयाण पल्ल्यांची कहाणी मध्ये मध्ये ओरडत राहिली पाहिजे. आठवणीचे शेवाळे साचले कि जगणे कुठेच वाहत नाही. असे शेवाळे न जमू देता, स्वप्नाच्या उंच कड्यावरून कोसळून आपले दिवस आधीच्या दिवसांच्या गाळाने संपृक्त करत जाण्याचे नदीपण येईपर्यंत मागे मागे गेले पाहिजे. जगणे पुढे जाते असं सार्वत्रिक समाज असला तरी शहाणी माणसे मागे बघतात तेव्हाच शहाणी असतात, पुढे बघून ते मागच्या रेषेला स्वप्नील समाधानी दुनियेचे काल्पनिक टोक लावू पाहतात आणि मग त्याचे सारे शहाणपण विसरले जाऊन त्यांना येणारे दिवस कसे गेलेल्या दिवसांसारखेच आहेत हे समजले नाही ही ठसठशीत चूक तेवढी त्यांची खूण बनून रहाते. आपल्याला मागे नको- पुढे नको, आपल्याला तात्विक अवगुंठना नको, आपल्याला आपले अस्सल शब्द हवे. आपली पैज अमृताशी नको, आपली ओल्ड मोन्कशी पैज बरी. पण आपले शब्द नशा होवो, आपले शब्द शेकोटीचा जाळ होवो, आपल्या शब्दांत जिवंत होवो जगण्याची विलक्षण विजिगीषा आणि तिच्याखाली खोल खोल पुरले जाणारे विरोधाभास., आपले शब्द कल्लोळ होवोत, उग्र भडक वाद्यांचा आणि ते वाचणा-याला अस्वस्थ करून सोडोत, आपले पसायदान नाही, आपले अभंग नाहीत, आपले शब्द बुडून वर ना तरंगोत, आपले शब्द वाचणा-याच्या काळजाशी पोचोत, त्याच्या वेदनेच्या कुळाला स्पर्श करणारे निरागस अल्लड कण बनोत, आपले शब्द धूळ  धूळ बनून वा-यावर विरत जावोत, आपले शब्द आपले थडगे बनून न राहोत, आपले शब्द आपल्यापाठोपाठ मार्गस्थ होवोत, आपले शब्द आणि आपण कोणीच सोडून जावू नये एकमेकांना ... आपण होऊन जावे अस्तंगत संध्याकाळच्या क्षणिक अशब्दी रंगझळाळासारखे जे दिसतात पण नावाच्या यादीत अडकत नाहीत...
   हे असे प्रार्थनांचे उद्घोष, जगणे म्हणजे आहे पेक्षा व्हावे असे कोते पिकलेपण.. आणि मग कुठेतरी आजूबाजूला रटरटणा-या जगाच्या भट्टीचा चटका, कुठेतरी तो क्षण जिथे जाणवणारी हवे आणि आहे यांच्यातली जीवघेणी पोकळी, कुठेतरी ही हवे हवे चे मंत्र जपत सारे चेचत जाणारी एककलमी गर्दी, हे एकमेकांना बिलगणा-या पंडितांचे संकटकालीन अलार्म, हे पदोपदी मांडून ठेवलेले माहितीचे पुंज आणि मग हे असेच परत आपल्या आतल्या एकाट शांततेच्या निर्वातात सावकाश बेहोष होत जाणे.  
देहावर चढते भूल 
देहाला येते फूल 
देहाच्या खडकावरती 
माझीच जमते धूळ 
हे असे काही कामाचे नाही. असे मध्ये मध्ये अर्धे-मुर्धे खुळावत जाणे, अध्ये-मध्ये असे लिहिण्याचे तात्कालिक मोड फुटणे, अध्ये-मध्ये जीवितार्थाची उभारी येवून आपले बंदे नाणे खण खण वाजवायची मर्दुमकी वाटणे, असे अध्ये-मध्ये माणसे जमवून काही एक खेळ थाटून बघणे...एक काही तो प्रकार नेटाने केला पाहिजे. हेच तर सारे अशिक्षित, अर्ध, उच्च, अतिउच्च शिक्षित माणसांच्या आपले झेंडे रोवून आपल्या पुढच्या २-३ पिढ्या समृद्ध करून जाण्याचे गमक आहे. हेच तर एक खुले सत्य आहे, जिकडे तिकडे प्रकाशून असलेले. एकच एक काही केले पाहिजे, ते करत करत गेले पाहिजे... परिपूर्ण वगैरे होत गेले पाहिजे. 
ऐक भाऊ एक मार्ग भला 
इकडे-तिकडे हुंगशी
तू वेडा का खुळा
सन-थोर चालले 
रस्ता धरूनी नेटाने 
तुही पकड ऐक दिशा 
चाल कडेकडेने 
अशा तर अशा पण कविता येतच राहिल्या हव्यात, जगावर प्रकाशझोत मारून नवे नवे काही बाहेर आलेच पाहिजे, जरी माणसे आदिम काळापासून तशीच आहेत असे वाटले तरी तसे न म्हणता आधी खोटेच काही म्हणून मग जड जड शब्दांनी ते हळूच चुकले असे म्हटले पाहिजे. होतेच तर आहे असे, त्या दूर पश्चिमेच्या देशात युनीवरसीट्या मध्ये नवे नवे हररोज येते आहे, सूट-बूट टाय लावून माणसे तेजाळ होत देशचे देश इकडे तिकडे नेत आहेत, इतिहास नव्याने कळतो आहे, भूगोल नव्याने बदलतो आहे, इकडे तिकडे पृथ्वीसारखा ग्रह मिळतो आहे, नव्या कादंबऱ्या, नवे टीकाकार, नवे कवी, नवे संदिग्ध साहित्यिक, नवे, नवे असे क्षणाक्षणाला बनून अवघ्या मानवजातीवर कोसळते आहे. असे सतत सतत नवे मिळत राहणे हेच तर खरे, हेच सत्य, हेच ते जे आपण पिढ्या-पिढ्या चिरंतन शोधत आलो, ते हेच कि जे शोधतो ते नवे नवे बनून आले पाहिजे..
जिकडे तिकडे ह्या सत्याचा परीसस्पर्श मिळत आहे. इंटरनेट, टीव्ही, नाके जिकडे तिकडे नव्या नव्या प्रगतीचे मंत्र ऐकवणारे महंत आहेत. आणि ते इतके हवेतच. फार थोड्यांनी खरे काय ते सांगितले कि त्याला भलतीच किंमत येऊन ते एकदाच मुरवून परत परत वापरले जाईल. पण फार माणसे उच्च रवाने सांगू लागल्याने ते खरे आहेच असे वाटणेही बंद होते आणि मग ते परत परत शोधायला अर्थ राहतो. ते शोधणा-याचे जीवन सार्थकी वगैरे कुठेतरी लागून जाते... असे व्हायलाच हवे. दशावतार, व्यास, बुद्ध, शंकराचार्य, सोक्रेटीस, अरीस्टोटल, प्लेटो,  सोफेक्लीस, शेक्सपीअर, थोरो, थिरूवल्लूर, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, पॉपर, केन्स आणि अजून असे मृत, हयात, ज्ञात-अज्ञात, त्याचे शिष्य, अभ्यासक, वाचक, प्रकाशक, चिंतक असे सगळेच होऊनही नवे नवे सारे काही सापडतेच आहे...सापडो सापडो
मी तर चाललो आहे, मला तो धुक्याच्या दाटीआडचा आश्वस्त आवाज ऐकू येतो आहे, मला आता कोणी नको आहे माझे काही ऐकायला, मला काही विचारायला, मला दारू, गांजा, सिगरेट, बिडी, बाई, आई, मांजर, कुत्रा, मित्र, माणसे कोणी नकोत. 
मी हे हिवाळ्याच्या रात्रीचे निशब्द चांदणे आपल्या त्वचेत पेरून घेतो आहे, मी हे शहर मागे पडताना गाढ होत जाणारी शान्तता भरून कानाची रंध्रे बुजवतो आहे, तुझी शरीराच्या तृप्तीने क्लांत छबीची वितळती मोहर लावून मी डोळे मिटले आहेत, स्मरणाच्या सुया माझ्या रक्ताचा थेंब थेंब टचटचणा-या अबोध दुखांच्या नावे झेलून घेतायेत,  मी घेतो आहे आटोकाट हवा काठोकाठ  फुफ्फुसात भरून आणि मग ह्या हिरव्या-निळ्या अफाट जळात सूर मारतोय, शब्द, नाद, स्पर्श,दृश्य, संवेदना 
सा-याच्या पलीकडचे असणे झाकोळून जाणारी जाणीव मला कवेत घेताना..                               .              

Sunday, May 8, 2011

दम मारो दम.....

संध्याकाळ होत येते... दिवसभर घातलेला शहाणपणाचा अंगरखा डाचायला लागतो... जगात दोन नाही तीन प्रकारची माणसे असतात....एक आहोत तिथेच बघणारी..एक आहोत त्याच्या थोडं पुढे बघून कुठे पाऊल टाकायचं ते ठरवणारी....आणि तिसरी म्हणजे या पहिल्या दोघांकडे आणि खूप दूर बघणारी आणि कदाचित कुठेच न जाणारी....खूप दूर पाहिलं कि सगळी पावलं सारखीच भरकटलेली वाटतात. थोड्या अंतरात अर्थाची सुसंगती असते. पण अशी अंतरं जोडून एक लांब पल्ल्याची शहानिशा करू पाहिलं कि एकमेकांत गुंतलेल्या अटळ विरोधाभासांची भोवळ तेवढी येते.
    जाणीव, आपण काय करतोय असा प्रश्न हा शाप असतो. कारण त्याला उत्तर नसतं. त्याला फक्त उत्तर म्हणून उभे केलेले तात्पुरते बचाव असतात. प्रश्नाचा जोर वाढला कि ढासळणारे, बदलणारे आणि प्रश्नांचा अजून खोल रुतत जाणारा बाण.... लहानपणापासून प्रश्नाला उत्तर असतं अशी एक अंधश्रद्धा बिंबवली जाते मनावर. मोठं झाल्यावर बहुतेकजण हे पाखंड चालू ठेवतात. पण प्रश्नांना, मित्रानो , तोडगे असतात, तडजोडी असतात किंवा प्रश्न नाहीसे करावे लागतात. पण प्रश्नाचे समाधान करणारे उत्तर असा प्रकार फक्त भारताची राजधानी कुठली अशा प्रश्नांनाच असतो. माणसाच्या कृतीच्या अगम्य मुळात एकदा का प्रश्न घुसले कि प्रश्नाला उत्तर नसतं,,,अनेकदा प्रश्नही एखाद्या धूसर अंधार्या वाटेत जाणवणाऱ्या अनाम भयासारखा असतो. 
   खोल जात चाललेली संध्याकाळ....आणि या इमारतींच्या जाळ्यात बचावलेला हलका वारा.... शहाण्या माणसाचा मळलेला अंगरखा....
   ही आता magic  पोएट्री ची वेळ.... म्हणजे संदिग्धतेची भुरभूर वाळू आणि अशब्द संवेदनांची झुळूक यांत दिसणारं ते दूर  क्षितीज....एका क्षणाचा उत्त्फुल आनंद आणि त्यानंतर अव्याहत कोसळत जाणे....आनंदाची जाणीव ही माणसाच्या एकटेपणाची मुलभूत जाणीव....ती कशातच येत नाही.....ती देताही येत नाही आणि घेताही येत नाही ....शब्दांचा सारा  पसारा ह्या जाणीवेच्या परीघापाशी येऊन थांबतो...पुढे आपण एकटच जायचं, एकटच भोगायचं...आणि एकटच रितं होऊन यायचं किंवा यायचच नाही.... 
    magic पोएट्री ची पहिली ओळ....मी आता रस्त्यावर दिसणाऱ्या कुठल्याही माणसाकडे बघून मस्त हसणारे....
    magic पोएट्री ची दुसरी ओळ....मी शहाणपणाचा मळका अंगरखा काढून माझ्या असण्याच्या सुरंगी जाणीवेत फिरणारे.....
    संध्याकाळ आता पार खोल अंधाराच्या पोटात गुडूप.... माणसांच्या गरजा, वासना, इच्छा, उत्कंठा, पिपासा, तृषा अशा असंख्य जाणिवांच्या interconnected समुद्रात बेटासारखं उगवलेलं शहर.....
  आणि चारी बाजूला या बेटाला तरंगवणारा आणि त्याच वेळी पोटात ओढू पहाणारा तोच interconnected समुद्र. निर्मितीच्या हातात अल्लड खेळणारा विनाश.... 
    हा हा....ही बोलण्याची तहान आहे ती या समुद्रात कुठेही भागणार नाही.... ही तहान नाही...ही नशा आहे.... बोलत राहणं, सांगत राहणं, ऐकत राहणं.... कोण कोणाला आवाज देणार मी.... 
    magic पोएट्री...इथे मीच माझ्याशी गप्पा मारतोय.... मी काळाच्या अनंत किनार्यावर उमटलेली माझी पाऊले पाहतोय....मी प्रत्येक पावलाशी कवितेची श्रद्धांजली देत चाललोय.....
   उद्या, परवा, काल , आधीची हजारो वर्षे, येणारी कोण जाणे किती....माझ्या खांद्यावर मला एकही क्षण नकोय..... मी format मारतोय हार्ड डिस्क.... आता फक्त magic पोएट्री चे जीवाश्म इथे उमटनारेत....शहाणपणाचा व्हायरस त्यांना डीलीट करे पर्यंत....
    दम मारो दम....मिट जाये गम.... चुकलास मित्रा.....मिट जाये गम तर मग उरणार काय? 
    दुखाची कलाबूत आहे मित्रा, अगदी नाजूक पण पक्की.... हे सारे निर्मितीचे हुंकार, स्वर, व्रण त्या कोणालातरी चिरत गेलेल्या प्रश्नांच्या बाणाचे, सांगण्याच्या तहानेचे आहेत.... माणसाच्या एकटेपणाचे, त्याच्या भोवतीच्या अर्थहीन खेळाचे दुख जर मिटले तर?  
   ही माणसे लगबगीने पळतायेत, एकमेकांशी बोलतायेत, ह्या शहराच्या नाकपुड्यात ते त्यांच्या हालचालींचा ऑक्सिजन भरत चाललेत आणि शहर इकडे तिकडे फेकत चाल्लय माणसे एकेका उच्छ्वासासरशी.... मला कुठलाच अर्थ लागत नाहीये ह्या सगळ्या गोंधळाचा....उसन्या घेतलेल्या क्षणभंगुर स्वप्नांवर, नात्यांच्या एकमेकांना गुंतवत जाणार्या जाळ्यांवर पोसली जाणारी, अडकणारी आणि त्या अडकण्यालाच सापडणं म्हणत जल्लोष करणारी माणसे.... आणि मध्येच एकमेकांच्या असण्याची किंवा नसण्याची सवय मोडली कि अर्थहिनतेच्या निर्वात पोकळीत गुदमरणारी माणसे....आणि मग कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊन त्या अर्थहिनतेच्या निर्वात पोकळीतून बाहेर पडायची धडपड,,,त्या धडपडीला अर्थपूर्णतेचे कपडे चढवायची धांदल....हा हा हा 
    सगळ्यात वाईट व्यसन म्हणजे जगण्याचं, त्या खालोखाल दुसर्या कोणाच्या असण्याचं...जाम सुटत नाहीत ह्या गोष्टी... 
   जरा कधी बाथरूम मधलं फिनेल पिऊन बघा...ती चव किंवा बेचव जशी घशातून खाली जाईल ना तसे फक्त आढ्याकडे बघत पडून राहा....मग मळमळ होईल, ओकारी येईल,,,,थोडं अजून प्या....मग बघा कोणालातरी हाक मारायची लाट उसळून येते अंगभर...पोटात गेलेलं, जगून झालेला किबा जगायचं राहिलेलं सगळं बाहेर पडू पाहता....हात-पाय आपोआप बचावाच्या हालचाली सुरु करतात....आणि आपण मरत नाही फिनेलने .....पण जगण्याचं व्यसन किती पक्कं ते कळेल....
    आणि दुसरं कोणी असण्याच्या व्यसनाबाबत तर काय बोला.....आपल्या असण्याची आपल्याला खात्री असते कारण दुसर्या कोणाचा संदर्भ आपण आपल्या असण्याला देऊ शकतो....तो संदर्भ सोडला तर आपली सारी गृहीतके कोसळतात.....
    आता गोड काळोख आहे सोबतीला....मी खिडकीच्या चौकटीतून दिसणारे आजूबाजूच्या अस्तित्वाचे आवाज ऐकतोय... 
     दम मारो दम....   मी आता एक गच्च कश मारतोय गांजाचा....आणि आता मला समोरच्या कोड्याचे अर्थ उकलू लागतील....
     हद हद जाये हर कोई...अनहद जाये ना कोई....
     हद अनहद के बीच मे रहा कबीरा सोये....
   माणसाळलेलं असण्याची हद्द ओलांडली जातीये....संस्कारांचे केविलवाणे आवाज धुंदीच्या बेलगाम हाकांना कुठे पुरे पडणारेत..... दुसरा कश.... आणि आता अनहद.....
   कबीरा....कुठे झोपलायेस बाबा....जरा मलाही पथारी पसरू दे......
   निवत चाललीये शहराची रटरटती  भट्टी....आणि ही उरलेली घोटभर शांतता....थांब जरासा वेळ तोवरी....
   आता कश मोजलेले नाहीत....आणि magic पोएट्रीच्या किती ओळी झंकारून गेल्यात.....
   शब्दांचे किनारे मागे पडतायेत....स्मरणाचे काटे कुठेही खुपत नाहीयेत..... बोलायच्या तहानेला कवितांचे झरे येऊन मिळतायेत आणि मीच मला सांगत चाललोय, पहात चाललोय उमलणार्या, आणि त्याच क्षणात मनात शोषल्या जाणार्या गाण्यांच्या ओळी.....
    निर्मम, निखळ एकटेपण....मायाळू, समंजस मौन.... स्वप्नांचे आवाज ऐकू न येणारी शांत झोप.....  
    आकाशाच्या निर्विकार कृष्णतेला नव्या दिवसाच्या प्रकाशाची धडक बसतीये....  आटत चाललीये त्वचेला स्पर्शणारी उब....माझे डोळे मिटत चाललेत.... शेवटचा कश.... जाणीव कोसळत चाललीये शांततेच्या खोल डोहात....कानाशी ऐकू येणारा हे एक शेवटचं गाणं...
     Have no fear for when I'm alone
I'll be better off than I was before

I've got this light
I'll be around to grow
Who I was before
I cannot recall

Long nights allow me to feel...
I'm falling...I am falling
The lights go out
Let me feel
I'm falling
I am falling safely to the ground
Ah...

I'll take this soul that's inside me now
Like a brand new friend
I'll forever know

I've got this light
And the will to show
I will always be better than before

Long nights allow me to feel...
I'm falling...I am falling
The lights go out
Let me feel
I'm falling
I am falling safely to the ground

Tuesday, January 11, 2011

प्रिय मी,

प्रिय मी, 
तू काय करतोयेस असं प्रश्न पडल्याने आता असे पत्र पाठवण्याची वेळ आली आहे....
                     तू वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून अस्वस्थ वगैरे होतोस, आणि मग पुस्तकांच्यात वगैरे डोकं
खुपसून वर्तमानपत्रातल्या प्रश्नंची उत्तरे शोधू पाहतोस....
त्या वर्तमानपत्रात असणारा वर्तमान केव्हाच पळवला गेला आहे, आणि तिथे मायावी भविष्यकाळ पुरवला जात आहे
वर्तमान म्हणून.... लख्ख उजळ किंवा गडद अंधारा....
ज्यांच्या बापाने स्वतःच्या पायाने चालणं सोडून कित्येक वर्षे झाली आहेत आणि जे छान सोनेरी पाळण्यात जन्मले होते,
ज्यांच्या वाटा आणि त्यावरची संकटे गोष्टीतल्या राजकुमार-राजकुमारी सारखी होती तेच आता
रस्त्यांवर चालणाऱ्या आणि पाऊलभर सावली जपून ठेवणाऱ्या लोकांच्या आयुष्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढतायेत....
त्यांच्या भरपेट ढेकरांमध्ये कसे तुला अदृश्य आयुष्याचे आवाज ऐकू येतील?
पानोंपान अक्षरात दिवेसेन दिवस पिचत जाणार्या माणसांची स्वप्ने, तोकडे आनंद आणि अनंत अतृप्त इच्छा उमटत नाहीत....
त्या जगून पाहाव्या लागतात आणि त्यांचे वळच आयुष्याच्या वाटांना आकार देतात....
हे लिहिणारे, स्तंभ, सदरे आणि अग्रलेख ह्यांच्या चरबितला एक हिस्साही वितळणार नाही  डाळीची किंवा कांद्याची किंमत वाढल्याने...
जाहिरातींच्या बांबूवर तोललेले हे लोकशाहीचे स्तंभ आता इतके उंच झाले आहेत कि त्यांना दिसितीये समृद्धीची मठ्ठ सूज तेवढी....
बाबारे, व्यवस्था बदलायला व्यवस्थेच्या सुस्त बैलाला द्यावा लागतो एक निष्पक्ष, निस्पृह रट्टा..
हे हस्तिदंती मनोरे त्या बैलांवरची गोचीड, ते प्रेमळ चावेच घेणार... आणि बैल सहज विसरून जाणार....
   जाऊ दे, विषयांतर झालं.... तुला पडलेल्या 'आपण का जगतो आहोत' अशा घनघोर प्रश्नांबाबत कळलं....
   पूर्वीही असे प्रश्न पडत....आणि अशा प्रश्न पडणाऱ्या येडझव्यांकडे माणसे पहात कौतुकाने....
   आता असे प्रश्न पाडू नयेत याची तजवीज करतात पार आधीपासूनच....आणि पडला तर डबल डीजीट बर्फी खाऊ
घालून पार सुस्त करतात....पोट भरलं कि प्रश्न गार पडतातच.....
तर लक्षात घे.... धोपट मार्ग सोडू नको....मार्ग धोपट, पैसा चौपट....
अगदीच थांबली नाही प्रश्नांची मळमळ तर जात, धर्म, इतिहासाच्या उत्थानाचे झेंडे घे खांद्यावर....
शहामृग बन भूतकाळाच्या वाळूत डोकं खूपस....पण भाऊ, जे चाल्लय ते काय असं विचारू नकोस.....
तुझा प्रश्नही ते सहज विकत घेतील, तुला शाल-श्रीफळ देऊन करतील आपल्यातला एक आणि मग
हळूहळू तुझ्या प्रश्नांकडे न मरणाऱ्या म्हातारीची बडबड जसं कोणीच ऐकत नाही तसं कोणीच ऐकणार नाही....
जग....हळूहळू मजा येतेच....
अरे राजा....स्वार्थच खरा अर्थ आहे... आणि स्वार्थाच्या टोकाला परमार्थ म्हटले जाते....केव्हा कळणार तुला, आता २५ वर्षाचा होशील...
छान रहावं, गाड्या वगैरे घ्याव्यात, चर्चा कराव्यात चकण्याच्या डिश उडवत आणि देणगी द्यावी एक स्मरणार्थ....
तेवढाच असतो वाटा आपला....उगाच मोठ्या बदलांच्या दिवस्वप्नांवर आपले आणि इतरांचे जीव वाया घालवू नयेत....
देव तुला सदबुद्धी देवो आणि तुझ्या वडलांना गुंतवणुकीवर १८% रिटर्न्स....
तुझाच....


ता.क. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी धमाकेदार आवाजच करावा लागतो असं भगतसिंग वगैरे कोणी म्हणून गेला होता

Thursday, November 25, 2010

सूर्यास्त

समोर उंचच उंच इमारती आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपरस... आणि ही संध्याकाळ आहे.... काही दिवसांपूर्वी 'जल' नावाच्या चक्रीवादळाच्या कारणाने वातावरण ढगाळ होतं... पण आता ते चक्रीवादळ हे कारण उरलेलं नाही..पण वातावरण ढगाळ असतं....रात्री पाउस पडतो...दिवसभर तो ओलसरपणा उरतो....उन्ह कुठेच नसतं.... आणि मग संध्याकाळ येतं....दिवस होतं एवढं दर्शवण्यापुरता उन्ह स्पर्श करून जातं.... आणि त्या उन्हाच्या उबेचा स्पर्श साठतोय तोच संध्याकाळ येते.... संध्याकाळ अस्ताची एक जाणीव असते....जे आहे, सुंदर आहे किंवा आहे ते संपणार आहे त्याची जाणीव....माणसाच्या मर्यादित अस्तीवाची, जाणिवांची जाणीव.... त्यात उदास होणं आहेच, पण समजूतदारपणे जर ते उदास होणं टाळला तरी एक निस्तब्धता उरतेच....समोर अस्ताला जाणारे सूर्यबिंब आहे आणि मला कोणाला तरी सांगावासा वाटतंय जे माझ्या मनात उचंबळून येतंय हा समोरचा सूर्यास्त पाहताना.... माझ्या डोळ्यातून पाहावा कोणीतरी हा क्षण....माझ्या शब्दांत कोणीतरी भोगावा हा क्षण.....
समोर दोन उंच इमारती आहेत....त्यांचं बांधकाम चालू आहे अजून.... किमान २० मजल्यांच्या आहेत ह्या इमारती.... आणि अजून तरी क्षितिजरेषेवर कोणीच नाही त्यांच्या एवढं उंच.... आजचे सूर्यबिंब नेमके ह्या इमारतीच्या मागे आहे.... आणि आता अस्ताला जाताना ते ह्या इमारतींच्या मागे अस्ताला जाईल...अस्ताला जाईल म्हणजे? मला काहीकाळ दिसणार नाही प्रकाश..अंधार नावाची एक जाणीव व्यापून राहील... पण उद्या असणार आहे..... परत प्रकाश, परत दिवस, परत तेच आशांच्या हिंदोळ्यावर झुलणं... आणि मग हा अस्ताचा क्षण.... संपण म्हणजे काय? मरणं म्हणजे काय? पुन्हा कधीही नसणं म्हणजे काय?
माणसाने कायम स्वतःच्या मर्यादाना आव्हान दिलं आहे...ह्या समोरच्या इमारती म्हणजे एक आव्हान आहे....माणसाच्या उंचीच्या कितीतरी पट उंच ह्या इमारती..क्षितीजालाही उंचावणाऱ्या....आणि आता तर त्या त्यांच्या मागे त्या साक्षात सूर्यबिंब दडवातायेत.... म्हणजे माणसाने काही कायमस्वरूपी बदल केला का? एवढी उंची वाढवून त्याने स्वतःच्या अटळ नष्ट होण्यात एखादा चिरस्थायी क्षण जमा केला का? उद्या असणार नाही का? उद्या म्हणजे? आज म्हणजे?
प्रश्नाचे आवर्त स्थिरावले आहे ह्या क्षणापुरते..... समोरचे केशरी लालसर सूर्यबिंब झपाट्याने त्या इमारतींच्या उंचीमागे लपते आहे.... दिसेनासे होते आहे.... कदाचित ह्या प्रचंड शहरात असाच कोणीतरी हा सूर्यास्त पहात असेल....उदासीच्या ओलसर काळोखात बुडून जाताना त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असेल.... आणि त्याच्या समोर ह्या इमारती नसतील तर कदाचित अंधाराच्या स्तब्ध, नितळ प्रवाहात मिळून जाण्याचा क्षण त्याच्यासाठी थोडा अजून लांबला असेल...पण येईल.... सगळ्यासाठी एक दिवस हा दिवस संपेल.... म्हणजे जगण्याच्या नष्टप्राय होणार्या प्रवाहात स्वतःची खुण सोडण्याचा अजून एक दिवस संपेल....
....मला आठवण येतीये तुझी.... शक्यतांच्या व्यापक पाट चाचपताना वाटतंय कि तू असतीस आत्ता बाजूला तर हा क्षण एवढा जाणवला असता का? तुझं नसणं हे माझ्या संवेदनांच्या टोकदार असण्याचा कारण आहे.... कदाचित काही नसणं हे असण्याची धडपड अजून अजून तीव्र करत जातं.... पण जेव्हा मिळतं तेव्हा ते मिळालं हे जाणवतही नाही....जाणवतं ते हे कि नसण्याची मायाळू जाणीव हरवत चालली आहे....
माणसाला 'आहे' हे समजतंच नाही कधी.... काय 'नाही' तेच टोचत रहाते, डाचत रहाते....
बघ 'उद्या' येईल....म्हणजे आपण आपल्या नष्ट होण्याची अटळ जाणीव पुढे ढकलू.... आशांचे मोहर येतील.... त्यांच्या क्षणभंगुर फुलांवर आपण आपला जीव ओवाळून टाकू.... आणि एकदम असा एखादा क्षण येईल... माणसांच्या शक्यतांच्या उंचीसमोर अस्ताला जाणारे हे सूर्यबिंब सार्या व्याकूळ जाणीवा सोबत आणेल.... आणि मग समोरच्या सौन्दर्यासमोर निशब्द होताना आपल्या आठवणींचे कढ येतील, चुरल्या-विरल्या स्वप्नांचे ढीग विरत जातील आणि एक निरव जाणीव ओथंबून जाईल जीवात....

Saturday, November 6, 2010

दिव्या दिव्या दिपत्कार

या दिवसात दुख वगैरे गोष्टींची आठवणच यायला नको. उदास वाटायला नको, चुकीच्या जागी अडकून पडलो आहोत असं वाटायला नको, जवळपास खूप माणसे असण्याचा कंटाळा यायला नको, अगदी जवळचं माणूसही गाभ्याशी आपल्याशी अनभिज्ञ आहे असा साक्षात्कारही व्हायला नको. होतोय एवढं खरं, असं वाटतंय एवढं खरं...
काल लोकलमधून येत होतो. एक भिकारीण, थकलेली, त्वचेवर सुरुकुत्यांचा जाळे , अनेक वर्षापूर्वी डोळ्यांवर आलेला आणि आता काहीही कामाचा न उरलेला चष्मा, विरलेली, विटलेली आणि तरीही अंग झाकून असलेली साडी, खांद्याशी एक प्लास्टिकची मातकट पिशवी, हाताची ओंजळ पुढे पसरलेली, आणि किनार्या दुखर्या आवाजात सवयीने म्हटलं जाणारं दीनवाणा गाणं....दिवाळीचे दिवस हे बोनस मिळण्याचे किंवा अर्थव्यवस्थेची पातळी उंचावण्याचे असतात अशाने म्हणून कि काय भिक मागणारे एकूणच शहरात वाढलेले आहेत सध्या....तान्ही पोरं थानाशी घेतेलेल्या तरण्या बाया, आंधळे, जुनिअर कडकलक्ष्मी, हिजडे, पांगळे आणि अनेक प्रकार.... कदाचित ह्या आजी हंगामी नसाव्यात... त्यांना द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. दहा रुपयाची नोट द्यावी असं वाटत नव्हतं आणि अशी भिक मागून जगण्यापेक्षा मेली तर बरी असही त्यांच्याकडे बघून वाटत होतं... अर्थात हे सगळं माझा पोटभरीचा ज्ञान.... लोकलच्या वेगाशी जमवत, पाय सरकवत सरकवत आजी माझ्याजवळून गेल्या....त्या म्हणत असलेली ओळ होती,, 'वाट माहेरची दूर''
कुठला माहेर आठवत असेल आत्ता तिला...ज्याने कोणी ही ओळ लिहिली त्याला कदाचित पारमार्थिक अर्थ अभिप्रेत असेल, पण आत्ता ह्या बाईच्या रखरखीत संदर्भात 'माहेर' कुठे आहे....महाराष्ट्राच्या उण्या-पुर्या ३० जिल्ह्यात ४० एक वर्षापूर्वी असलेल्या एखाद्या लहानश्या गावात, का या शहराच्या एखाद्या अंधार्या कोपर्यात तगून राहिलेल्या तिच्या कुडीत
का एकाही उजळ रेषा दिसत नसलेल्या तिच्या उदयात..... का काहीच आकळत नाही म्हणून माहेर दूर आहे....जगण्याचा तंतू तुटत नाही म्हणून माहेर दूर आहे का....
आत्ता रात्री ती काय जेवेल...तिला ढास लागली तर भांडभर पाण्यासाठी ती काय करेल, कोणी असेल तिच्या सोबत.. ती मेल्यावर आपली म्हणून म्हणून तिला जळणारा वगैरे....हे प्रश्न माझे नाहीत, तिचं अंधारही माझा नाही...कारण तिच्या वंशरेशेने मला छेडलेला नाही.... पण तिने माझ्यावर चरा तर सोडला आहे....
मागच्या वर्षी असंच एका रोशानाईत मग्न रस्त्याच्या कडेने चालणारा एक लंगडा म्हातारा दिसला होता... हातात एक पिशवी, कुबडी आणि आपल्याच पायात घुटमळत जाणारी पराभूत नजर....त्याच्या कोसळलेल्या आयुष्यात काहीच नाही आता पेटण्यासारखा कदाचित.... आठवणींची काजळी जपत खंगत तेवढं जायचं असंच असेल कदाचित....
असं विचार करत राहीला तर कोणालाच आनंदी रहाता येणार नाही... माणसाचं आयुष्य काळाच्या रेषेवर सरळ जसं पसरलेलं असतं तसं त्याच्या अवती-भवती ते अडवारलेलही असतं....त्याचा काल आणि उद्या त्याच्या आजूबाजूला नांदत असतो...अगदी त्याचा नाही, पण त्याच्याहून खास वेगळाही नाही.... आपण तो बघत नाही, बघितलं तर सोयीस्कर अर्थ लावतो, दुखला-खुपला तर शहामृगासारखी आपल्या वाळूत मान घालतो किंवा पिढ्यान-पिढ्या जपत आलेल्या उद्याच्या स्वप्नांवर अर्थ नसण्याचं दुखरेपण सोडून देतो....
एक मैत्रीण सांगत होती कि लहानपणी ती खूप आवडीने फटके लावायची...मग एक दिवस तिच्या लक्षात आलं कि आपण एकच क्रिया परत-परत करतो आहोत...एका ठिकाणाहून आग घ्यायची, दुसर्या ठिकाणी लावायची आणि आवाज ऐकायचा किंवा प्रकाश पाहायचा....आणि मग तिला फटके लावावेसेच वाटेनात....पर्यावरणाची काळजी वगैरे थोर काही नाही....बस कंटाळा.... कळायला लागलं कि अर्थहीनता जाणवते....आपलं सुख किंवा दुख आपण अगोदर मनाशी जुळवलेल्या किंवा जुळवायच्या राहिलेल्या जगाच्या प्रतिमेवर अवलंबून असतं... ते सुख किंवा दुख मुळात नाहीचे, ते आपल्या आतल्या प्रतिमेची सावली किंवा पोकळी आहे असं जाणवलं कि काहीच जाणवत नाही....फक्त 'मग काय' असं कृष्णविवर... अर्थाभासाच्या आकर्षणात जाणीवेचा सारा प्रकाशही खेचून घेणारं...त्याच्या मुळाशी काही असेलही,,,पण ते कोणी कोणाला न सांगू शकणारं....अगदी अगदी माझं....
जगणं स्थिर होऊ नये हेच बरं किंवा खरं....म्हणजे मग ते कशावर स्थिर आहे.... इंद्रियांच्या सुस्त जाणीवांवर का खर्या-खुर्या सुखावर असला भयाण प्रश्न पडत नाही.... जगणं स्थिरावला तरी ते एखाद्या वेडसर लयीच्या आवर्तांवर असावं.... ती लय ओसरावी आणि असणंही मालवून जावं...
शहराच्या उजळून निघालेल्या, स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या लहान मुलीसारख्या आत्म-निमग्न आनंदात चाचपडणारी, अंधारी आयुष्ये दिसतही नाहीयेत.... त्यांच्या काजळ-कोपर्यांचे ठसे तेवढे शब्दांवर राहिलेत माझ्या.... फटाक्यांच्या आवाजात मला त्या म्हातारीचा 'वाट माहेरची दूर' एवढं कापरा आवाज ऐकू येतोय, हळू-हळू विरत जाणारा.... जल्लोषाच्या वैभवी नृत्यात मला ठेचाकालणारा म्हातारा दिसतोय.... सारी लय हरवून हळू-हळू गोठत जाणारा....
आयुष्याच्या गर्तांची जाणीव खोल उमटो माझ्यावर . ... आयुष्याचा दिवा जळो... आणि विझाण्याधी त्यातून जाणीवेचा एखादातरी प्रकाशकण प्रकटो ...
दिव्या दिव्या दिपत्कार....

Saturday, October 16, 2010

त्या अंधाराचं काय

त्या अंधाराचं काय,
शब्द उधळून झाल्यावर सांगायच्या राहिलेल्या अर्थाचा अंधार....
माणसांच्या असण्याच्या ओझ्याने गुदमरलेल्या शहरात
सापडणारे विरळ एकटे कोपरे.. आणि हळूहळू त्यांच्याही साम्राज्यावर
पडणारा गर्दीचा एकरकमी घाला....
इतके चेहेरे, गोरे, काळे, देखणे, फेन्गाडे, रंगीत, कोरे-करकरीत
अवयवांच्या लयीत सामावलेले इच्छांचे स्वैर संगीत
त्यातल्या कुठल्याही चेहेर्यावर नाही ओळखीचं प्रतिबिंब
कुठल्याच ओठांच्या कडांवर नाही दुमडलेले स्मित
कुठल्याच सुरात नाही आपल्यासाठीची दोस्तीवजा हाक.....
ही पराग्रहाची वस्ती कि काय.... का हे क्लोन फिरणारे
आपल्याच अंशांची स्वायत्त अनोळखी अभिव्यक्ती मिरवत

बाजूला पाहतो तो काळाच्या अक्षावर सरकून मीच दिसतो मला
मोठा होण्याच्या अलवार स्वप्नात गुंगलेला छोटा मुलगा
त्याचे कोवळे विश्वास मला कुठेच सापडत नाहीत माझ्या सद्य काटेकोर तार्कीकतेत
मान वळवतो दुसया बाजूला तेव्हा दिसतात आपणच कोणाला सांगितलेले शब्द
झुकल्या खांद्यानी थकून भागून माझ्याकडे परत येणारे
शहाणपणाचे कुंपण लावून मी अडवून धरतोय त्यांना
टाळतोय आजूबाजूला कुठेही बघायचं
नजर लावून धरलीये पायाखालच्या मातीच्या तुकड्याशी घट्ट
तीही सरकली तर....

Monday, September 27, 2010

न सापडलेल्या जगण्याचे दंश

अवेळी जन्मलेल्या बालकासारखा सुरु होणारा
प्रत्येक दिवस, आणि जागं होण्याच्या पहिल्या क्षणावर
उमटलेले डंख, कुस्करलेल्या स्वप्नांचे
मग त्यानंतर निसटत जाणारा दिवस, स्वतःच्या प्रतिमांच्या
लंपट पाठलागात
स्पष्टीकरणे आणि गनिमी कावे यांनी उभारलेली सोयीस्कर तटबंदी

गुरफटून घेणं स्वतःला एखाद्या बिनडोक चादरीत
आणि आढ्याकडे बघून प्रोजेक्ट करत राहणं नकोनकोसा भूतकाळ
हव्याहव्याश्या उद्यामध्ये
स्वतःभोवती आखत राहणं मिस्टिक वर्तुळे आणि झाकत राहणं आतला
फाटका कारभार
शब्दांच्या ढीगभर उदबत्त्यांच्या धुरात
शब्दांच्या वळत जाणार्या हारात
दररोज निरोप देणं स्वतःला, आणि नंतर स्वतःच्याच मानगुटीला बसणं
त्रस्त समन्धासारखे

दररोज घेणं वर्तमानपत्री दैनिक उत्तेजक
आणि पळवू पाहणं आपला घोडा भरधाव
शाबित करू पाहणं आपलं त्यांच्यातलं एक असणं
त्यांच्या स्पर्शाचा विटाळ जपत बसताना

अर्थहीन वारुळांच्या गावात बीळ करून राहणं
उपमा-उत्प्रेक्ष्यांच्या काल्पनिक जगात फणा उभारणं,
वास्तवाच्या विस्तवावर पोळलेली कातडी कात म्हणून टाकत

चिंचोळ्या खिंडीवर पहारा देत राहणं
रसद देत राहणं स्वतःला जगत असण्याच्या हमीची

खुरट्या वेदनांच्या लंगड्या कल्लोळात
ओरबाडून घेणं स्वतःला
आणि उसने घेणं बाकीच्यांचे घाव
न सापडलेल्या जगण्याचा दंश होत नाही म्हणून

Sunday, September 26, 2010

यार...

इथे आलो तेव्हा संध्याकाळ कधीच ढळून गेलेली. मित्रांसोबत गप्पात रंगलो तेव्हासुद्धा एका कोपर्यात कधीही वेडसर होणारा एकटेपण ढुश्या मारत होतं. अर्थात आपलं पैसा जात नव्हता खाण्या-पिण्यात, बस मित्राची बडबड ऐकून घ्यावी लागत होती. आणि तेही बरोबर आहे म्हणा, ते माझी वटवट सहन करतात, मला पार्टी देतात, या सगळ्याचा कृतज्ञ म्हणून ऐकलच पाहिजे. किंवा तिथे आहोत असं भासवून आपल्या भोवती न दिसणाऱ्या तंतूंचा एक जग विणत राहिलं पाहिजे, मध्ये मध्ये हसून, एखादी कोटी करून असणं निभावून नेलं पाहिजे. समोरच्याची स्वप्नं पुरी होत असल्याच्या जल्लोषाची मैफिल आहे ही दोस्त, तिथे आपण एक रिकामी जागा भरली पाहिजे, दोन पेग रक्तात मिसळल्यानंतरच्या उष्ण सुखद धुंदीत आपणही एखाद्या अप्रप्याला स्पर्श करून पाहिलं पाहिजे. उद्या जग येईल तेव्हा जे जाणवेल ते जाणवेल, आत्ता तरी आपल्या आतली रिकामी जागा स्वप्नाच्या क्षणिक फुलोर्याने विसरली पाहिजे. आणि मग मित्र निघून गेल्यावर विरळ माणसांची एक लोकल पकडून इथे समुद्रापाशी येऊन बसला पाहिजे. इथल्या वाळूत उरलेल्या रेघात आधी असणारी जिवंत सळसळती बोटे, ओल्या वार्यावर उडणार्या केसांना सावरणारे हात, दूरच्या दिवांच्या तलम धगीवर शिजत आलेले संवाद या साऱ्यांपासून सांभाळून बसलं पाहिजे एका अस्पर्श कोपर्यात... एकही आठवण आठवायला नको या आधी इथे आल्याची....आणि आली तरी केवळ तोंडओळख असलेल्या माणसाकडे फक्त हसून पाहून आपण आपला रस्ता धरतो तसं पुढे जाता आलं पाहिजे....
पोकळ आहे यार जगणं आतून... हे असे पुस्तकांचे, सिनेमांचे, कवितांचे, जगाबद्दलच्या बाष्कळ शुष्क कुतूहलांचे त्यावर चढलेले पापुद्रे...ही समृद्धी नाही यार... हे एखाद्या जीर्ण घरात डागडुजी करून रहावं तसं आहे...घर सोडून बेघर होता येत नाही म्हणून...आपल्या अगदी जवळच्या माणसाचाही सारांश काढता नाही येणार आपल्याला, त्याच्या अशा चार छटा राहतात ज्या आपल्याला पटत, समजत, उमजत नाहीत. मग आपण ज्यांच्या आयुष्यातला एक नेमका दिवसही नाही आहोत अशा असंख्य आयुष्यांचा काय अर्थ लावणार? एखादा प्रश्न जेव्हा सुटत नाही ना खूप दिवस, तेव्हा एक तर तो प्रश्न तितका थोर कठीण असतोच किंवा त्याला आपल्या अर्थाच्या जाळीत सापडणारे उत्तर नसतंच.... ही माणसे अशी का वागतात, पिसाळतात, पाळीव बनतात, लाचार बनतात, स्वार्थाच्या टोकांना जातात, स्वतःला फेकून देतात, आपल्या पुरतंच कुंपण उभारतात, दुसर्याच्या जगण्यात बदल करायच्या ईर्ष्येने झपाटतात, स्वतःला लांघू पाहतात, जगण्याच्या फडताळातला अंधार स्पष्ट करू पाहणारी तत्वज्ञाने उभारतात, आणि मग त्यांचीच तोकडी चादर जिकडे तिकडे ओढू पाहतात. का? याचं उत्तर आज नाही, मागच्या हजारो वर्षाच्या प्रयत्नांना नाही, मग? नसेल उत्तर असं मानलं तर? एक ना एक दिवस येईल उत्तर म्हणून आपण आजच्या अपुर्णतेवर समाधान मानतो, जुगार खेळतो उद्या उद्याच्या अनिश्चिततेवर...आणि हळूहळू पोकळ होत जातो आपल्या केंद्राशी, समोरच्या अपार कंटाळ्याला ढकलायला किडूक-मिडूक धास्त्या आणि त्यांचे किडूक-मिडूक आनंद बनवतो, स्वतःला बेमालूम फसवायला शिकतो आणि झिजत जातो आतमधून...
स्वप्न हवं यार... आणि एका कोवळ्या क्षणी ते सहज पापण्यांवर उतरून जावं... त्याच्या आतुर बोलावण्यावर आयुष्य ओघळून जावं...स्वप्न शोधत नसतात यार...ते रुजून यावा लागतं शिंपल्यात येणाऱ्या मोत्यासारखा....आपल्या शिंपल्यात तो स्वातीचा थेंब अलगद यायला तेवढी एक जागा हवी....
शोधून सापडेल आपलं स्वप्न एवढा दम धरवत नाही आता... अशा शोधानार्यांचीही एवढी गर्दी इथे आणि नंतर त्यांच्या अंदाजे जगण्याचे वरवर कलाबुती पण आतून भयाण कोपरे... असं एक नको यार... त्यापेक्षा खिशात एखादी कविता ठेवून रस्त्यावरचं बेवारस प्रेत होण्यात जास्त मस्ती आहे दोस्त.... हे दुसर्याच्या आयुष्याचे, त्यांच्या नजरेला गवसलेल्या बिलोरी क्षणांचे लोलक लावून मला नाही सजवायचं आपलं आयुष्य,,,अशाने येणार्याला दिपवून टाकता येतं, संदर्भांच्या आतषबाजीने थोडावेळ उजळूनही निघता येतं, पण आपल्या गाभ्याशी असणारा अंधार आपणच जळत उजळायला लागतो.... ती ठिणगी कुठून आणणार? दुसर्यांच्या दुखांच्या शेकोट्या उब देतील एकटेपणाला, पण त्याने आपलं दुख पेट नाही घेत....
चल सोड, बस इथे... ही पश्मिनी रात्र सारं कवेत घेते, हा लाटांचा आवाज सार्या गाण्यांना छेडून उरलेल्या शांततेचा... ह्या वार्यातला स्पर्श, आपल्या माणसाच्या सारं जाणणाऱ्या स्पर्शासारखा... किती वेळ ह्या अपूर्ण शब्दांच्या असंबद्ध दुनियेत धडपडणार दोस्त... किती वेळ...

Friday, September 24, 2010

नको पाठवू असे कितीदा

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

कवयित्री - इंदिरा संत


एकदम हे पत्र वगैरे का आठवलं मला ते आठवत नाहीये, कदाचित तेच जी.ए. -सुनीताबाई वाचत बसण्याचं व्यसन असावं... पण ही कविता वेगळी आहे.... विशेषतः ३ रे कडवे 'शब्दामधूनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन , नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण' आणि शेवट.... वाचायचे राहून जाते....


आपल्याला दुसरं माणूस काय म्हणून माहित असेल ह्याचं उत्तर बदलत चाल्लय... म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो असे कित्येक जण माझ्यासाठी फोन नंबर किंवा मेल आयडी एवढेच आहेत... प्रत्यक्षात भेटले तर कदाचित मी अडकेनच बोलायला... माध्यम समोरच्याकडे बघायचा नजरिया देतं कदाचित... किंवा ते माध्यमच एकूण त्या संवादाची identity बनून जातं

मला समोरासमोर बोलायचय लोकांशी... बोलताना त्यांचे डोळे, नाक, खांदे, बोटं पाहायचेत... कानात त्यांचे वेगवेगळ्या पोताचे आवाज ऐकायचेत... त्यांच्या खांद्यावर थाप मारायची आहे... किंवा आपल्या जगण्याचा सल सांगताना ओलावलेले डोळे पाहायचेत...

उद्यावर विश्वास नाही माझं... आजची तहान आज भागवावी ना... उद्याच्या पावसाने आजची तडफड कशी शमेल... निब्बर व्रण उरेल तिचा... उपहासाची एकटी धार असलेला...

माझ्या शब्दातला काल्पनिक माणूस नाही व्हायचं मला... किवा माझ्या शब्दांची सपाट सावलीही...

.

सार्त्र म्हटलाय एके ठिकाणी 'live your passions before you analyze them' .तुला असं वाटतं का कि एका अर्थाने आपण आपल्या आयुष्यातली माणसंही जगून टाकत असतो...किंवा जगत असतो.. समोरचा माणूस analyze करण्याजोगा झाला कि मला काहीतरी संपल्यासारखा वाटतं... समोरच्यात जितके न समजणारे आणि तरीही बोलावणारे कोपरे राहतात तितके गुंतून राहतो आपण त्या माणसात...आणि इतकी खोल माणसे काही ढीगभर मिळत नाहीत...खरतर आपल्या आयुष्यातले बहुतेक जण रंगीत घोटीव कागदांसारखे काही घड्यात उलगडतात म्हणा, पण नंतर सवयीने आपण त्याच त्याच घड्या बदलून , दुमडून नवं काही शोधू पाहतो...मग तसं काही नाही म्हणून कंटाळतो, चांगले राहायच्या ओझ्याने गिरवत राहतो ओळख... असं माणूस निघून गेला कि दुखावते ती सवय,मिळायचं, सापडायचं सगळं, जवळपास सगळं संपलेलच असतं...


मला सगळंच सांगायचं नाहीये तुला... एखादं पुस्तक कसं संपावं अस वाटत नसतं, मग ते पुरवून पुरवून वाचतो ना आपण... तसं मला आता पुरवत राहिलं पाहिजे आपलं बोलणं. मला लोकांना हात हलवून कोरड्या चेहऱ्याने निरोप द्यायचा ना जाम कंटाळा आलाय... पण तू जर माझी पूर्वीची पानं चाळलीस तर तुला माझं माझ्यांतर्गत होणारं विस्थापन जाणवेल...


Ignorance is bliss म्हणतात ते एकदमच खरय. कळलं कि कंटाळाही येऊ लागतो. कळायला सुरुवात झाली कि हे सगळं संपणार हेही कळतच.. ठाम रोवून ठेवलेल्याखूणेसारखा..


शेवटी मी कोणाशीही बोलतो ते एखादा गर्दुल्ला नशा विकत घ्यायला तडफडतो तसंच... बोलत राहण्याची सवय, मग व्यसन असं झालंय... अगदी स्वतः स्वतःला सांगतानाही मी शब्द वापरतो...दुकानदाराने घरातले किराणा सामान दुकानातून विकत घ्यावे, पावतीसकट तसं...

पत्रही तेच... मला सलग बोलायला एक स्पेस उभी करणं, आणि मग त्या स्पेस मध्ये असण्या-नसण्याची एक आभासी दुनिया विणत जाणे, .... त्या पत्रात गहिरं काही नाही, लीपिरेषांची जाळी नाही, अक्षरांचा ढीग, त्यावर वाढलेले खुरटे गवत.... वाचणारा म्हणजे अगदी आपलं प्रतिबिंब असावा असं समजून लिहित जाण्यात काय होत असेल? वाचणार्याला कळतच नाही, हे कोणाला लिहिलंय नेमका, का चुकीच्या पत्यावर आलंय...

स्वतःच्या दुखाचे अक्षांश-रेखांश बदलले म्हणजे लेखक होता येतं... आणि स्वतःचं सांगणं कोण एकाला न सांगता कागदावरून किवा कसंही करून अंतराळात प्रसारित केलं कि ते वाचता येतं... कारण मग त्या दुखाशी जोडून घ्यायची, त्याला प्रतिसाद द्यायची सक्ती उरात नाही... काय सोय आहे असं लेखक होण्यात... किंवा वाचक होण्यात... पण पत्र वगैरे लिहू नये... किंवा बोलायला जाऊ नये कोणाशी... आपल्या दुबळ्या सांध्यांना आधार द्यायला इतरांच्या असण्याच्या कुबड्या का हो...


सोकावत जातो ना आपण जसे जसे संपलेल्या अनेक संवादांचे सांगाडे आपण स्मरणाच्या काळोख्या दरीत ढकलून देतो... मग नव्या माणसाशी बोलताना आपण अदमास घेत राहतो... लांबवू पाहतो कंटाळा किंवा संपूर्ण उलगडणं...अनेक धागे ठेवतो अस्पष्ट लोंबकळत ... आणि अनेक नाद उमटणार नाहीत याची दक्षता घेतो... निरोप देत नाही पण बोलवतही नाही कुणाला...

तुटण्याच्या वेदनांना इतके घाबरतो आपण... जोडले जाण्याचं विष भिनूच देत नाही पुरते...

Thursday, September 16, 2010

घटकाभर गम्मत

'भले-बुरे काहीतरी बोलायला कुणी नाही' ... कोणाच्या नसण्याला शंब्द वापरून भरून काढायचं....बोलायला कोणी नाही म्हणून लिहायचं...कोण एका अज्ञात वाचकाला, गणितात 'क्ष' मानून गणित सोडवतात, तसं मला जे सांगायचं आहे ते त्याला कळेल, असं समजून लिहायचं. पण संध्याकाळी कोणासोबत चालत सहज होणार्या गप्पा संध्याकाळी कागद-पेन घेऊन बसलं तर लिहिता येतील? आधी वाचलेल्या गोष्टी, कविता हातात घेतो, परत वाचू पाहतो, त्यातही काही सापडत नाही. मला माझं आयुष्य भोगायचं आहे, जगायचं आहे, दुसर्या कोणाच्या कितीही खोल विचारांनी मी माझ्यातली असोशी भरून काढू शकत नाही. माझ्या अंगात उसळू पाहणाऱ्या जाणीवांना मी दृक-श्राव्य माध्यमे वापरून कितीकाळ थोपवू शकेन? आणि मग एक असेल असा उद्या जेव्हा अशी तगमग उरणार नाही, जेव्हा प्रत्येक कृतीमागे विषादाचा झाकोळ असणार नाही अशा आशेवर तरंगत रहायचं, हात-पाय मारत राहायचे. 'Every misery is in some sense deserved one'... हे म्हणजे कर्मविपाक प्रकारात झालं. आधी चूक म्हणून आत्ता चूक, आणि म्हणून याच्या पुढेही... मग स्वतःला संपवून का टाकायचा नाही... का जगावं याचं उत्तर मिळत नाही आणि का जगू नये याचंही नाही.....आणि नसणारच याचं उत्तर....हीच Camus ची Absurdity....कशाचंच उत्तर नाहीये.... म्हणजे असं प्रश्नांचा टळटळत घेऊन जगणं हेच प्राक्तन तर...म्हणून आधीपासूनच प्रश्न पडू नयेत, चाकोरीबाहेर जावसं वाटू नये....जसं आयुष्य येईल तसं वागावं, त्याला आकार द्यायचा प्रयत्न करू नये.... हा तर Fatalism. साला स्वतःच्या दुखला स्वतःचं नावही देता येऊ नये....सगळी नावं साली आधीच कोणीतरी वापरून टाकलेली.... आधी कोणी एक बुद्ध झालेला...आधी कोणी एक थोरो...एक कामू...एक मार्क्स....त्यांनी आयुष्याला तसू तसू सोलत सगळं सालं मांडून ठेवलं...आता नुसता त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायच्या....घोटभर उथळ आयुष्य, ते असं त्यांनी लिहून ठेवलेलं...आता दुखाला अजून डेप्थ नाही...त्याचा नवा आयाम नाही...बाजारात विकत ठेवलेल्या अनेक गोष्टी क्रमाक्रमाने घेत राहणं, त्यासाठी एका टप्प्यात स्वतःला विक्रीयोग्य बनवणं आणि कधीतरी ह्या चक्रनेमिक्रमाचा कंटाळा आला कि असं दिसेल तिथे ओकण. कुणी सापडला तर त्याला, कुणी नाही सापडला तर तर असं 'क्ष' मानून.... किंवा मग आठवणींच्या फडताळात उडी मारायची.. त्यातला बोचत राहिलेलं काही होईल तसं सांगून मोकळं होऊ पाहायचा....म्हणजे मग बाकीचे म्हणणर वा! वा!! आपण मोकळे होणार तर नाही.. वर आपल्या आतल्या सलाला लोकांनी वा वा म्हटल्याचं जखमेवर मीठ आहेच.... पण तरी बर...नुसत्या जखमेपेक्षा मिठासकट काय वाईट! चरचरेल, ओरडवासा वाटेल... कुठे ओरडणार....घाल आपल्याच गुडघ्यात डोके.... दाब कढ...दाबून ठेव..... हम्म अस्सं.... स्टेनबेक म्हणालेला ना anybody can break. It takes a man not to....आठव आठव अजून अशी उत्तेजक....जिवंत ठेव आशा भौ....आशेशिवाय तरणोपाय नाही... नाहीतर ह्या घुम्या एकटेपणालाच दोस्त मान आपला.... बस आपली आपल्या पावलापुरती दुनिया.... अशी जायची नाही ती कोणाबरोबर बोलायची उर्मी....तेवढंच तर करत आला तू.... स्वतःचं प्रश्नचिन्ह शोधलं पाहिजे भौ, म्हणजे मग कोणीतरी त्या सारं व्यापणाऱ्या, शोषणाऱ्या विराट प्राश्नाखालचा टिंब तरी होऊ शकतं. प्रश्न शोध, तूच तुझं... बाकी कोणाचे प्रश्न चालणार नाहीत.... हे पण आधी कोणी लिहिलंय म्हणतोस... लिही ना का...तू तुझाच शोध घेतोयेस ना भौ.... हे पण स्वप्नच... बरोबर आहे.... किंवा चूक... आहे ना.. असणं महत्वाचं....
गालिब याद कर भाऊ...
जिंदगी यूँ ही गुजर जाती थी
क्यों तेरा राहगुजर याद आया...
काही नाही भाऊ.... हे असं एकटाच आपलं आपलं आहे... आणि एक दिवस जायचाही... आरती प्रभूंच्या कवितेसारखा... 'तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार सोडूनी मी जाईन दूर गावा'.... कुठे जायचं हे ठाऊक नसतच कधी... काय सोडून जायचं एवढं मात्र आपल्याला सुरुवातीपासून ठाऊक असतं...आणि गम्मत म्हणजे तेच तेवढं हवं असतं आपल्याला... हे एवढंच दुख...
बराय भाऊ... मजा आली...घटकाभर गम्मत...

Tuesday, September 14, 2010

मी मलाच सांगितलेली एक कविता



समुद्रावर जाऊन उभं रहावसं वाटतंय...
आता कोणीच नसेल समुद्राजवळ... लाटा निवांत येऊन किनार्याच्या खांद्यावर आपलं मन मोकळं करत असतील
थंडगार वारा वाळूवर त्याने वाहून आणलेल्या कविता उमटवत असेल आणि एका वेडसर क्षणी सारं पुसूनही टाकत असेल..
चांदणं झिरपत असेल ओल्या वाळूत, परतणाऱ्या लाटांत, ओलसर झुळूकीत
मंत्रमुग्ध करणारा मंद हळवा प्रकाश...
मागच्या निर्मनुष्य रस्त्यावर एखादं क्षण येणारी अस्तिवाची खूण
नाहीतर सारंच तरल, नितळ, स्तब्ध आणि म्हणून शब्दांत न येणारं
मी आहे का नाही याचाही प्रत्यय न यावा...
पावलांना स्पर्शत जावं पाणी..चांदण्याच्या प्रतीबिम्बांचे भासस्पर्श
समोरच्या क्षितिजाच्या काजळरेषेवर थांबलेले काही प्रकाश...

ये धूप किनारा शाम ढले,
मिलते हैं दोनो वक़्त जहाँ,
जो रात ना दिन, जो आज ना कल,
पल भर को अमर, पल भर में धुआं

विरघळत जावं या आरस्पानी जाणीवेत....
अगदी आपणही आपल्याला काही सांगू शकणार नाही अशा शांततेत

स्वतःला उलगडणं एवढं सोपा नाहीये प्रश्न...माझा असणं म्हणजे माझ्या भोवतालच्या या लक्षावधी माणसांचा असणं
अस्तित्वाचा अर्थ लावायचा म्हणजे केवळ माझ्या एकेरी अस्तिवाचा नाही
क्षणी विस्मित करणारी, क्षणी गुदमरवून टाकणारी एकमेकांच्या असण्याची ही पिंजण
तिलाच उलगडायचं आहे...

कोणाच्याच मनात डोकावून बघता येत नाही...
उमटलेल्या कृती किंवा शब्दांतूनच अदमास घ्यावा लागतो...
दुसरं माणूस समजणं म्हणजे त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या मनावर उमटणा..एकाही हेलाकाव्याशिवाय
आणि अशा असंख्य प्रतीबिम्बातून काही गवसेल सांगता येत नाही...
कदाचित काहीच नाही...हे सारं का आहे कारण आहे म्हणून एवढंच एक गोल गोल उत्तर
कुत्रा, मांजर, चिमणी, पोपट, वाघ, बकरी, घार आणि माणूस
का माणूस, फक्त माणूस
तो, ती, ते, बाकीचे म्हणून मी का मी, फक्त मी
प्रश्नांचं वाढत जाणारा वारूळ...

का माणसे एवढं काही सांगत जातात एकमेकांना,
स्वतःच्या असण्याच्या एवढ्या खुणा निर्माण करतात
इतिहासाच्या पानांत वर्तमानाची कारणीमिमांसा करू पाहतात
भूगोलाच्या स्थिरतेवर आकांक्षांची नक्षी कोरु पाहतात
आणि मग हरप्पा बनून मातीत जातात...

एका कवी म्हणे कविता लिहायचा आणि ठेवून द्यायचा
तो मेल्यावर सापडल्या कविता...याचं अर्थ म्हणे त्याने केवळ स्वतःसाठी लिहिलं
स्वतःसाठी लिहिलं तर स्वतःच्या मनावरच का नाही लिहिलं
त्याच्यासोबत त्याच्या कविताही मिटल्या असत्या
एक खूण ठेवायची असते...एक संवाद साधायचा असतो...
माहित नसेल पण एक तीर गाठायचा असतो...

हे सारे शब्द, माहिती, संदेश, अर्थ, प्रतिमा, संकेत...
कशासाठी...
कोण कोणाला काय सांगतंय नेमकं
का सांगणारा शोधू पाहतोय स्वतःलाच
कारण स्वतःच्या आत त्याला बघतच येत नाहीये....

म्हणून ह्या गर्दीत पळतयेत का सगळे..
कि एक दिवस ते टोक गाठता येईल...

जाऊ दे... गेला तो दिवस... सगळे निवांत झोपले आहेत...
येणाऱ्या उद्याच्या आशा-निराशांचे असंख्य तंतू
एकमेकांना द्यायच्या घ्यायच्या अगणित शब्द अन अर्थांच्या आधी
उरलेल्या या निवांत शांततेत पाहून घेऊ दे माझंच मला
आणि मग शब्दांच्या पार घेऊन जाणारी एक लाट
येऊ लागलीये चांदण्याने अधोरेखित क्षितिजापासून
तिच्यात सामावून जाऊ दे
अलवार जाणीवेच्या या क्षणांचे निर्माल्य
मी मलाच सांगितलेली एक कविता बनून

(
प्रतिमा सौजन्य http://www.panoramio.com/photo/१८१२४९५ )

Sunday, September 12, 2010

पुनरागमनाय च

समोर दीड दिवसाच्या गणपतीची उत्तरपूजा चालू आहे. मागची काही वर्ष मनातली श्रद्धा खुरटून सुकून गेली आहे. कुणा एका नावावर, मूर्तीवर, मंत्रावर श्रद्धा उरलेलीच नाही. तरीपण अजून पार बुडखा साफ झाला आहे असं वाटत नाही. श्रद्धा ओरबाडली गेली तरी विश्वास कोसळलेला नाही. 'हेची दान देगा देवा' ऐकताना हा देव आहे का नाही हा प्रश्न डाचत नाही, तर तो असेल किंवा नसेल त्याच्याकडे सारं काही सोडायचा अन सारं काही मागायचा आर्त विश्वास जाणवतो. पंढरपूरला जावसं वाटत नाही, पण त्या विठलापायी वेडावलेल्या संतांच्या भक्तीला, रूढार्थाने केवळ दुख मिळत असतानाही त्यालाही 'बरे झाले देवा' म्हणण्याच्या घट्ट रुजलेल्या विश्वासाचा नवल वाटतं. आता उत्तरपूजा संपेल, परडीतली फुले समोरच्या गणेशाच्या मूर्तीवर वाहिली जातील, आणि शब्द उमटतील, 'पुनरागमनाय च' ..... विसर्जित हो नाही, जा आत्ता पुरता, परत येण्यासाठी....
दुख थेट पत्करतच नाही आपण. लहान मुलाला घरात कोणाचा मृत्यू झाला कि त्या मृत्यूची आडवळणाने ओळख करून दिली जाते. देवाघरी म्हणजे कुठे तर खूप लांब, आकाशात, किंवा अशा ठिकाणी जिथे काही दिवसांनी सगळेच परत एकत्र येणारेत. घरातून बाहेर पडताना, आपल्या किंवा दुसर्याच्या, येतो म्हणावा, जातो नाही हे शिकवलं जातं. का? तर म्हणावं असं. जे एक अटळ सत्य आहे तेवढं टाळून बोलायचं. 'जगलो वाचलो तर भेटू' असं म्हणून जर सगळे एकमेकांचा निरोप घ्यायला लागले तर बघा कसं वाटेल. आशेचा गळ लावून ठेवला कि मृत्यूची थंडगार भीती जरा रोडावते. मृत्यू वगैरे तर बराच मोठा प्रकार झाला. समजा पाहुण्यांकडे गेलो आणि पहिल्या क्षणी असा विचार मनात आला कि दोन दिवस जातील खरे मजेत इथे, पण मग यांचा निरोप घ्यायचाच आहे, मग ते दोन दिवस तरी मजेत घालवता येतील का. संपण्याची जाणीव तीव्र आणि धारदार आहे, एकदा ती उमटली मनात कि जेवढा वेळ ती रहाते तेवढा वेळ सारं रिकामं करत जाते. थेट न बोलतं, चर्चा न करतासुद्धा आपण कायम मरणाची, स्वतःच्या किंवा आपल्या जिवलगांच्या, जाणीव जवळ बाळगून असतो. म्हणून तर आपण विमा उतरवतो, नोमिनीज देतो आणि कुठे कुठे हात जोडत राहतो.... जेव्हा केव्हा ते होईल तेव्हा ते होईल तेवढा सुसह्य व्हावं, किंवा त्याचा विचार न करता आपण सरकत जातो.... त्याच अटळ टोकाकडे
जर माणसाला आशा ठेवणं माहीतच नसतं तर शेवटाच्या जाणीवेने जाणवणारा कोसळलाच असता. आशावाद सारं संपणारं आहे, क्षणभंगुर नसेल पण नाशिवंत आहे ह्या स्वच्छ जानिवेतच जन्माला येतो. 'even this will pass' हे न समजत उमटणारी आशा ही फारसा भक्कम पाया न बांधता उभारलेल्या इमारतींसारखी आहे. एखादी वावटळ आणि मग आयुष्यभराची काजळी. पण एका क्षणी हे सगळं मिटेल हे जाणवूनही जेव्हा जगावंसं वाटतं तेव्हा 'कशासाठी जगायचं' जी असहाय्य व्यर्थता किंवा वैफल्य घेऊन जगताच येणार नाही. असं वैफल्य एका बेसावध क्षणी स्वतःच्या चिंधड्या उडवूनच संपेल. अर्थात वैफल्याच्या एवढ्या टकमक टोकालाही कोण जातात? अनेकांना अशी जाणीव होत नाही हे चांगलंच आहे, नाहीतर आयुष्यभर सुतक पालानार्यांची एक मोठी जमात जन्माला आली असती. अनेकांना हे जाणवत नाही ही त्यांची कमतरता नव्हे, तर देणगीच. म्हणून तर दीड दिवसासाठी का होईना लोकांनी मातीची एक मूर्ती घरात आणली नसती, तिच्यात प्राण उतरले अशी समजूत करून घेतली नसती, आणि मग डबडबल्या डोळ्यांनी तिला पाण्यात सोडताना 'पुनरागमनाय च' असं म्हटलंच नसतं.
पण हे सारं संपणार जरी असेल तरी एखादं धुंद क्षण असं असेल कि आयुष्य केवळ क्षणांचा गुंता किवा सरळ दोरा उरणार नाही. त्या आयुष्याची वाट करून त्याला उजळत संपवणारे एखादे बेभान वेड त्याला लागेल आणि मग हे सगळं असो किंवा नसो, त्या धुंदीत उरणं एवढा एक सरळ सोपा हिशोब राहील. मुळात काही संपेल ही जाणीव जास्त कुरतडते, त्रागा करायला लावते, पण तो कोसळीचा क्षण झाला कि तितका काटेरी वाटतच नाही. एक कोरडेपण तेवढं रहात. त्या कोरडेपनापेक्षा इतर सार्या जाणिवांच्या पार घेऊन जाणारे काही एक ना एक दिवस समजेल ही आशा का वाईट?
ती आशा आहे म्हणून ही लक्षावधी माणसे जेवढा वेळ आहेत तेवढा वेळ जगू पाहतायेत. स्वप्ने पाहतायेत, कोसळत, पडत-झडत चालत राहतात. ही दुर्दम्य आशा टिको, वाढो, आणि एखाद्या क्षणी ती संपली अशी वाटेल तर कोणीतरी पुन्हा म्हणो, 'पुनरागमनाय च' .

Tuesday, September 7, 2010

काय म्हणताय राव

या! या!! बरेच दिवसांनी दर्शन दिलात. साहजिक आहे म्हणा, आणि अशा प्रश्नाने सुरुवातीलाच तुम्हाला अडचणीत टाकले आहे मी. राहू द्या, लोकांना अडचणीत टाकणे आणि मग वळचणीत लपणे असं स्वभावच आहे माझा. बसा.
महाराज, दोन चहा घे रे. नको, गरम वगैरे काही म्हणू नका. तो सगळ्या नावानी मुळातला एकच चहा देण्याइतपत अध्यात्मिक आहे. त्यामुळे राहू दे.. सिगारेट पिणार? मग तुम्ही जाऊन आणा. आणि २ आणू नका, जरा जास्त आणा. एवढे दिवसांनी अवतरलात, २ उदबत्यांची ओवाळणी पुरेल का? हा. हि खरी. बाकी नुसते साले जळणारे कागद. हा खरा दम. नाही, बिडी खरी हे बरोबर आहे, पण समजा सिगारेट्स हाच सेट पकडला तर हीच खरी, दम पण भारी आणि जळण्याचा वेळही. गाणी बिनी लावा भाऊ. हि अशी आळशी सकाळ, हा असं कोमट चहा, आणि हे असे.... बरं जाऊ द्या. काय लावताय? 'सरकारच्या आईचा घो' ....अरे सोड ना. जी लढाई लढत नाही, तिचे विश्लेषण कशाला. काही दुखेल असे लाव, जरा हा दिवस अजून मागून सुरु होऊ दे. किंवा स्वप्नांच्या चार चकमक ठिणग्या उडतील असे काही ऐकव. नाही असं काही.... बर थांब. माझ्या मोबाईलमध्ये आहे. ऐक....
काय वाचलास? काहीच नाही? का रे, इतका बीजी होता का काय? लग्न वगैरे करतोयेस? नाही.
मग काय पिक्चर पाहिलेस कि काय? तेही नाही. मग, काय कासवासारखा सारे संवेदनांचे तंतू पार आत लपवून निव्वळ जगण्याचा वगैरे निखालस अध्यात्मिक प्रयोग करतोयेस कि काय?
कंटाळा!! कशाचा? पार सगळ्याचा? काय चावलं तुला? मजा नाही येते? कशात?
हं!! दुसर्या कोणाला सुखी बघून तुझं रिकामेपण जळतय का भाऊ?
तुला कसं काय ठाम माहित, कि अशी मजा असतेच म्हणून? existential विचारू नको म्हणतोस, पण तुला आलेला कंटाळाही existential च आहे ना भौ. मग त्याला उपायही त्याच जातीचा जालीम हवा ना.
वेड नाही लागते असं म्हणतोस? पण जोवर कळतंय तोवर वेड कसं लागणार ना भू!
कुठे दूर निघून जावं म्हणतोस.... हं हं.... वाचलीये मी तुझी कविता... पण काय आहे ना राव, हे असं सगळ्यांना सांगून का सुटेल तुझा प्रश्न? कोणी बरं म्हटल्याच्या क्षुल्लक आनंदाने तू कंटाळा भरू पाहतो का भौ. बहुत नाइंसाफी है रे. ...
मरायची भीती वाटते... आणि जगायचं कंटाळा....फंडामेंटल पराडोक्स वगैरे मांडतोय कि काय तू? अरे यार, ह्यात पण तुला ओरिजिनल काय मिळणार नाही. हे सगळं आधीच लिहून चुकले लोक. आता आपण फिरून फिरून तिथेच येतोय.
म्हंजे आता सध्या नवीन असं काहीच येत नाही असं म्हणतोस. तुला नवीन हवंय का तुझं असं हवंय. बघा राव, हे दोन निराळे प्रश्न होऊन राहिले आता. जे तुझं असं असेल ते कदाचित आधीच उमटलेलं असेल. मग लोक त्याला कॉपी केली असं म्हणतील. आता नवीन प्रश्न काढून राहीला ना तू भाऊ. कि लोक काय म्हणतील आणि त्यांनी काय म्हटले पाहिजे. अरे तुला तुझ्याशी काय बोलायचं ते समजत नसताना लोकांनी तुला काय म्हणावा तेही ठरवून ठेवायचं म्हणजे परत एक फंडामेंटल पराडोक्स आला ना रे भौ. असं कसं चालेल राव!
बर, मग फक्त तुझं असं काही मिळाल्याने तुझं तळीराम शांत होईल. मग शोध ना. आता वय झालं म्हणतोस. आणि आपण तसा अंगजात वेडेपण लाभण्याएवढे नशीबवान नाही असं म्हणतोस. मग दे कि जीव. अशा वाटण्याने जीव दिलेला तरी पहिलाच होशील बहुदा तू, आणि मग मेल्यावर लोक म्हणतील ना ओरिजिनल!
जगतानाच असं ऐकून घ्यायचय. बघ, परत प्रश्न बदलून राहीला तू भौ. तुझं असं काही शोधायला निघाला आणि दुसरीकडेच गेला...
हा लपवलेला आशावाद नको देऊ म्हणतोस. म्हणजे परत फंडा... कोसळतोय म्हणून आरडा हि करतोस, आणि पकडू गेलो तर पडू दे म्हणतोस....
अरे, अरे,,,,असं रडू नकोस.... तू काय एकटाच आहे वाटलं का तुला अशी बाधा झालेला.... असं आपण एकटेच दुर्दैवी असं वाटणं ह्यानेही बरं वाटतं ना तुला..खरा सांग.... पण तेही नाही नशिबी तुझ्या....
हे सगळं का म्हणतोस.... हे सगळं म्हणजे... म्हणजे पार हे जग अस्तिवातच का आला म्हणतोस.... का हे सगळं असं का चालू आहे आणि याचं अर्थ काय असं म्हणतोस.... अरे मी चिंधी माणूस, मी काय सांगणार राव.... पण एक कामू नावाचा लेखक म्हणून गेला भौ कि हि सगळी absurdity आहे म्हणून. absurdity म्हणजे काय? आता परत मी पडलो..... बर, मी देतो एक दोन दाखले.... मग त्याने जुळतंय का....
नाही आता माणसाचा स्वभाव मुळात चांगला का वैट? नाही सांगता येत,,,, पण समजा उत्तर द्यावाच असं फोर्सच केला तुझ्यावर तर? दोन्ही म्हणतोस....मग आता हे तुझं उत्तर का absurdity... म्हणजे एक असं उत्तर असेल असं धरून प्रश्न विचारला आणि हाती आला कि दोन्ही एकच वेळेस आहे....
विरोधाभासालाच अंतिम सत्य मानावे असं म्हणतोस.... मग absurd म्हटल्याने काय वेगळा अर्थ लागतो का भौ.... का उत्तर येणारच नाही असं स्वीकारायाना म्हणजे समस्त मानवजातीची वगैरे मन खाली घालणं आहे असं कि काय....
जातो म्हणतोस.... जा आता.... अजून कुणी येणारच इथे.....
मी असं का बसून आहे असं विचारतोस..... ऑफ ह्युमन बोन्डेज तर वाचलाच असशील तू.... नाही.... मग ये वाचून.... पुढच्यावेळी.... बघू म्हणतोस.... साहजिक आहे राव... तुम्ही बुवा बीजी माणसा.... बराय बराय....भेटू

Wednesday, September 1, 2010

खूप दिवसानंतरचे उन्ह

पडताच होतं पाउस मागचे किती दिवस. म्हणजे फारसे दिवस नसावा. पण ढगांनी सारं आकाश ताब्यातच घेतलेला. आणि वेळ नुसती संथपणे घरंगळत होती एकापुढे एक. म्हणून वाटलं असं कि बरेच दिवस पडतंच होता पाउस. थेंब-थेंब सुरुवात झाली, पण सतत, न थांबता सतत येणारे थेंब. मग मध्येच त्यांची द्रुत लय, थडा-थडा वाजणाऱ्या खिडक्या, दारे, गळणाऱ्या पागोळ्यांच्या आवाजात प्रसरण पावणारा पाउस. मग कधी विजा,गडगडाट , मग छपराच्या उबदार संरक्षणात उभ्या माणसांच्या चेहेर्यावर प्रश्न, कुठे कोसळला असेल हा लोळ? मग परत एक संथ अनिवार लय, थेंबांचा रिप-रिप आवाज, मध्येच येणारा थंडगार वारा, ओलसर भिंती, न वाळलेले कपडे, केस कोरडे ठेवत निथळत्या छात्र्यामध्ये ओलावणारी माणसे, चहा, गप्पा, गाणी, आणि शेवटी या पावसाचा कंटाळा.
पाउस नुसतंच येत नाही, सोबत मळभ असतं एक. थोडं वेळ ते मळभ सुखावतही. सार्याच गोष्टी स्पष्ट दिसत असतील तर मग इकडे-तिकडे विचार कराच कशाला. सगळं एका आखलेल्या मार्गाने चालेल. पण फारकाळ हि विचारांची स्पष्टता पेलत नाही. मन स्वप्नांच्या धूसर-तलम जगात किंवा आठवणींच्या गूढ-गढूळ डोहात जायला उत्सुक असतंच. त्यात असं पाउस असेल, जिथे थेंबांच्या संदिग्ध पडद्याआड सारी स्पष्टता लपली आहे, तिथे मन उरतंच नाही आहे त्या क्षणात.
दिवसाचा अशक्त प्रकाश संपून रात्र, पण सार्या आकाशात ढगांचा कायम वेढा, कुठलीही फट नसणारा. कंटाळा आलेला गाणी ऐकून, कुठे बाहेर जावं तर भिजायचं ह्या विचारानेच होणारी सर्दी. आरोग्यास हानिकारक अशा गोष्टींच्या भडीमाराने दर्दावलेला घसा, आणि सारे विचारही सततच्या ओलाव्याने उबून गेलेले, त्यावर चढलेली तेच-तेच पणाची बुरशी. फुटलेले मोडही भूतकाळ आणि भविष्याच्या सांधणीत जपायचे राहून गेलेले. पाउस उन्हाळा आणि हिवाळा जोडत नाही, त्याची स्वतःची अशी निरंकुश सत्ता असते. तो माणसांच्या आयुष्याला यकश्चित करून वाहून नेवू शकतो, किंवा धान्याच्या दाणेदार दाण्यातून त्यांच्या पोटात शिरू शकतो. ढगाच्या पोटातला स्वैर, मुक्त भूतकाळ, वार्याच्या भूलावणीने केलेली उनाड भटकंती, आणि मग एखाद्या एकांड्या उंच शिलेदार्याच्या अंग-खांद्यावर झोकून देणं, मग जमिनीवर येताना जमिनीची तृप्ती बनणं, शेतात जाऊन एखाद्याची भूक बनणं, किंवा मुरत-साचत जाऊन शेवटी त्याच अथांगतेचा हिस्सा होणं जिथे मुळात आकाशाचा अंश व्हायचे स्वप्न उन्हाने शिकवले होते. उन्हाळा आणि हिवाळा जोडणारा पाउस म्हणजे खूप स्वप्न डोळ्यात घेऊन घर सोडणाऱ्या मुलाने जगात तावून सुलाखून परत आपल्याच मुळच्या घराच्या उंबर्याशी परतणे.
...पाउस थांबलाय. उन्ह तापलय. अजून घर आलेला दिसत नाही.
चिखल सुकत चाललाय, भिंतींवरचे ओघळ आता ओलसर खुणा तेवढ्या ठेवून आहेत. दूरवरच टेकाड आता गच्च हिरवा आहे. अजून चुकार काळे ढग जमू पाहतायेत, पण आता त्यांची मान्सूनी रसद तोकडी पडते आहे. रस्ता गजबजला आहे परत, कपड्यांच्या कोपर्यात घामही जमतो आहे.
कंटाळा आलेला काल रात्री पाउस ऐकताना. काही रुजून येणारही वाहून जाईल एवढं पाउस. ठेवलेल्या पावलाची खूणही उमटणार नाही इतका चिखल. निथळून जाणारे शब्द, गारठलेला अर्थ, शहरे आणणाऱ्या वार्यात निघून जाणार्या कोणाला शेवटचा हातही नाही दाखवता आला...
खिडकीतून उन्ह दिसतंय बाहेरचा, सकाळी सोनेरी, आणि आत्ता शुभ्र तडफदार. कालची रात्र खूप दूर गेल्यासारखी वाटतीये. हि नवी चमक, तजेलेदार शहर, मोकळा श्वास.....
पुन्हा ढग येण्याआधी, पुन्हा झाकोळ येण्याआधीचे हे उन्ह...

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...