Thursday, February 13, 2020

किरण गुरव ह्यांचे लिखाण: बाळू आणि जुगाड


किरण गुरव ह्यांच्या ‘जुगाड ह्या कादंबरीला नुकताच महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. काही दिवसांपूर्वी मी आणि माझ्या काही समप्रश्नी मित्रांनी मराठीतल्या समकालीन फिक्शनबद्दल चर्चा/podcast केली होती त्यात किरण गुरव ह्यांचं नाव आलं होतं. त्यामुळे मी त्यांची पुस्तके वाचायचं ठरवलं. 
त्यांचे ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह) आणि ‘जुगाड (कादंबरी) मी वाचले. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ मधली ह्याच नावाची दीर्घकथा तर अधाश्यासारखी वाचली. हाच बाळू/बाळ्या/बाळासाहेब पुढे शशा होऊन ‘जुगाड मध्ये येतो कि काय असं वाटू शकतं! ‘बाळू मधल्या उरलेल्या दोन कथा श्याम मनोहर घाटाच्या आहेत. म्हणजे मेटाकथा टाईपच्या. मलातरी त्या जाम बोअर झाल्या. त्यातला कोडगा सिनिसिझाम आणि अदृश्य तात्विक झोंबी कधीकधी मजेदार असते, पण बहुतेकदा ती सारखी सारखी होते. पण ‘जुगाड मला जाम आवडली आहे.
--
मराठीच्या लेखकांना जवळपास अपरिहार्य असे दोन गुण जुगाडमध्येही आहेत, एक म्हणजे पुणे आणि दुसरे म्हणजे कोसलासदृश घाट. पण जुगाड पहिल्या भागात हे दोन्ही गुण दाखवते आणि मागे सारते. त्यानंतरची कादंबरी ही लेखकाची स्वतःची आहे, अर्थात stream of consciousness सदृश भाग येतातच. पण वर्णन करतानाची ती अपरिहार्यता आहे. विशेषणांचे झुबके लावण्यापेक्षा थंडगार थेट वर्णन कधीही भारी!
तांत्रिक वर्णनांना मराठीत पेश करणे हे जुगाडचे वैशिष्ट्य आहे. मिलिंद बोकिलांच्या ‘यंत्र नावाच्या कथेत अशी वर्णने येतात. असेम्ब्ली लाईन, प्लांट उभारतानाची एकेक टप्प्याची बारकाई गुरवांनी सावकाश उभी केलेली आहे. त्यांचा नायक ह्या कामांना एन्जॉय करणारा, काम उभे राहण्याच्या आनंदाला शोधणारा मनुष्य आहे. तो उगाच तात्विक, ऐतिहासिक भोवरे असलले मोनोलॉग मारत नाही. शिक्षण-नोकरी-भौतिक उन्नती अशी सिधी लाईन मनात असलेला त्यांचा नायक आहे. पण त्याला वाटलं तशी ही सिधी लाईन नाही. टेम्पररी-पर्मनंट-कंपनी बंद ह्या आधुनिक कोड्यात सापडलेला सुशिक्षित श्रमजीवी ‘जुगाड मध्ये सापडतो. मला तसा आधी मराठी कादंबरीमध्ये सापडला नव्हता.
तशी जुगाडला गोष्ट नाही, किंवा आहे ती एकदम छोटी. त्यात मजा आहे ती त्यातल्या मध्यवर्ती पात्राच्या नजरेतून गोष्ट उलगडण्याचीच. सावकाश वर्णने करण्याचा पेशन्स आणि त्याचवेळी गोष्टीतून काळ सरकावण्याचे पानवलकरसदृश्य कसब हे दोन्ही गुरवांच्या लेखनात आहे. त्यामुळे जुगाड वाचताना किक येते.
जुगाड ही आधुनिक कादंबरी म्हणता येईल. कारण त्यातला काळ हा एक दशकभरापूर्वीचा आहे. त्यात स्मार्टफोन नाहीत म्हणून ती अगदी आजच्या काठावरची गोष्ट नाही. जुगाड आधुनिक आहे ती वर म्हटलं तसं ती अगदी खरेखुरे तांत्रिक तपशील गोष्टीत आणू इच्छिते. दुसरं, तिच्यात मागच्या सांस्कृतिक अडगळीचे अर्थ लावण्याचा खास मराठी अट्टाहास नाही. त्यातला नायक हा एक व्यक्ती आहे, गावात वाढलेला आणि आधुनिक इंडस्ट्रीमध्ये उपजीविका शोधणारा. सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, प्रोफेसर, सतत एकामागोमाग एक अडचणींना तोंड देणारा शेतकरी, ह्या खास मराठी पात्रांहून वेगळा!
--
जुगाडची किक अशा समीक्षेत शोधता येणार नाही. आपण ज्या जगात जगतो आहोत त्यात जगताना सतत लागणारे व्यवधान, कायम पुढच्या स्कीम्स आणि त्याची तजवीज, वर जायची ईर्ष्या आणि पडलो तर इन्शुरन्स हे करू पाहण्याचा ताण आपल्यावर आहे. त्या ताणाने खेचलेल्या प्रत्यंचेसारखे आपण कायम बाण सोडायला सज्ज आहोत. पण हे करायचं नसेल तर? आपल्याला आपल्यापुरत्या आनंदाच्या वर्तुळात जगायचे असेल तर? आपल्याला उद्या काय, परवा काय हे प्रश्न सोडून शरीर आणि मनाला मजा देणाऱ्या आजमध्ये जगायचे असेल तर?
जुगाड असे प्रश्न विचारात नाही. पण हे प्रश्न त्या कथेच्या, कथनाच्या पाठी आहेत. उपभोगांची वाढती साखळी, ते उपभोग भोगायला दीर्घायुष्य, त्यातला वेळ भरायला मनोरंजन आणि हे सगळे उत्पन्न करण्यासाठी सट्टेबाज भांडवल. ह्या जगड्व्याळ खेळात प्रत्येकाला टिकायचा जुगाड करायचा आहे. काही जणांना तो सोपा आहे आणि काही जणांना अवघड. पण जुगाड करायला टिकून रहायचं आहे, कारण ते मूळ निसर्गाने भरलेलं आहे आपल्यात, टिकून राहणं, जुगाड करायला.
--
जुगाडचा शेवट चांगदेव चतुष्टयमधल्या शेवटांची आठवण करून देणारा आहे. त्या मध्यवर्ती पात्राला येणारी प्रखर जाणीव आणि तिचे आपल्याकडे येणारे चमचमते तुकडे. त्या ठिणग्या आपलीही जाणीव, आपले प्रश्न झळाळून टाकतात, क्षणभर आपल्याला आपल्यासारखा कोणी असल्याची सुखजाणीव होते आणि मग परत आपण आपल्या रोजमर्रा जिंदगीकडे परततो, मध्ये थोडावेळ असतो, बाहेरचा प्रकाश मालवत जाणाऱ्या आणि घरातले दिवे न लावलेल्या संध्याकाळीसारखा. तिथे नेऊन ठेवलं जुगाडने मला.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...