Saturday, December 24, 2011

शोकाचे प्रहर उमलता

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. तुला मी सांगतोय ते सांगितल्याने तू काही उतारा सुचावशील आणि हे सलत जाणारे दुख आणि गुदमरवणारी शांतता जाऊन खेळत्या हवेचा विलक्षण आल्हाद येईल म्हणून नाही. उलटी केली कि कसं बरं वाटतं तसं जे सांगायचं ते बाहेर पडलं कि वाटतं म्हणून सागतोय...कारण नुसते माझ्याच माझ्यात हे शब्द घुमून, माझ्या शरीराच्या, धमन्यांच्या भिंतीवर निनादून माझ्या आत त्यांच्या प्रतीध्वनिन्च्या लाटा येऊन मी पार बुडून बुडून... ऐक , नुसतं ऐक, नाहीतर तुला सांगताना मी माझ्यात गुरफटून माझ्यातल्या पोकळीशी माझ्या बुबुळातला प्रकाश गिरवत बोलू लागलो कि चुपचाप निघून जा... पण जाताना काही म्हणजे काही सांगू नकोस... 
      काल असं झालं कि मी रात्री एकदम उठलो. माझ्या घरात किंवा मी ज्यांच्या घरात राहतो ते बाकीचे सगळे झोपले होते. मला एकदम वाटलं कि असेच एक दिवस सगळ्यांचे मृतदेह ठेवलेले असतील, दगडी स्थिर. कोणी रडत असतील, कुणी मुके उमाळे स्फुंदत असतील आणि काहीवेळा त्या प्रेताच्या थंड शरीर होऊन जाण्यात तुटून गेलेले आठवणींचे तुकडे कधीतरी एकदम ओलसर हळवे होऊन येतील. भर रस्त्यावर मध्ये चालत असताना तुम्हाला गेलेले माणूस आठवेल, त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवतील, त्याचे हावभाव, त्याच्या शरीराच्या हालचालींची लकब, त्याचे राग, लोभ, सवयी, तिरस्कार, माया सारे एकदम गळ्याशी दाटून येईल, अगदी गर्दीच्या मध्ये डोळे भरून येतील, धाय मोकलून रडावेसे वाटेल, जे चालले आहे ते सारे आता केवळ जिवंत असण्याच्या स्वाभाविक गृहितकाने ढकलले जाते आहे, पण जे होऊ शकत होते ते सारेच त्या माणसाच्या जाण्याने मिटून संपून पार पुसून नुसते कल्पनेच्या नाजूक दुनियेचे होऊन बसले आहे...
   पण हेही फसवे आहे. असे एकमेकांचे मृतदेह बघूनही, एकमेकांना जाळून, पुरून, राख करूनही माणसे परत हसताना दिसतात. परत त्यांना हवेहवेसे, नकोनकोसे वाटण्याएवढे आयुष्याचे आकर्षण रहाते. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे ते दुखाला निष्ठुर दाबत जातात. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे परत ते निवांत शांत झोपू लागतात, चवीने खाऊ पिऊ लागतात, देवभक्ती वगैरे करून, इतरांच्यात जीव वगैरे लावून परत नव्याने दुखाचा डंख घ्यायला ताजेतवाने होतात. 
   इतके वर-खाली झुलत राहूनही आपण उत्साहात, उमंगीत जगू पाहतो...ही सारी केव्हातरी जगणे खाऊन जातील इतके भव्य वाटलेल्या दुखाची थट्टा आणि ही निगरगट्ट असोशी हाच तेवढा जगायचा एकमेव तोडगा... आपण जसे असे आहोत तोच आपला खरा उपहास आहे आणि तेच आपले खरे असणे आहे... 
    आणि आता हे इतके सारे स्पष्ट दिसूनही तू माझ्याकडे पुढच्या दिवसांच्या सावलीची, रात्रीच्या चादण्यांची अनुमाने मागतेस..तूही एकदा अशी पडणारच थंडगार, दगडी, निर्जीव लाश होऊन...किंवा केव्हातरी तुझ्या जगण्याची अपरिहार्यता तुला माझा अटळ श्रोता होऊ देणार नाही आणि मग माझा तुला गृहीत मानून आपल्याच सावलीत आपल्या असण्याचे गूढ उकल्यणाचा धंदा बंद पडेल. मग हे असेच सैरभैर दिवस, ह्या अशाच पुढच्या दिवसाची हूल आणि भय देत सरकन संपून जाणा-या रात्री. हे असेच सगळे शब्द, शब्द, शब्द, श्वासात, हालचालीत, बंद-खुल्या डोळ्यांत, अंघोळ करताना , कमोडवर, रस्त्यात, अंथरुणात, आपल्याच असण्याचे आपल्यालाच नकोसे ओझे वाहताना ते आपल्याला हवेहवेसे वाटत रहाण्याचा भयानक खेळ आणि आपण एकच वेळी त्यात खेळत खेळत हारत जाणारे, आपणच तो खेळ बघत टाळ्या वाजवणारे आणि आपणच त्या खेळाचे धावते समालोचन करणारे.     
शोकाचे प्रहर उमलता 
दुखाचा शिशिर बहरतो 
संदिग्ध होऊनी दृष्टी 
अंधार मंद पसरतो 

माझ्या ओळी आणि त्याच्या आत परक्या कवीचे, परक्या लेखकाचे अस्तित्व...साले जन्मापासून आपण असेच ह्याचे त्याचे शब्द वाचत ऐकत पहात मोठे होणार, आणि मग आपल्यात ओरिजिनल काय. नुसती मुळाक्षरे शिकवून, ऐकवून सोडून दिले तर आपण काय सांगू बोलू तेच खरे, पण आता हे असे एवढ्या वर्षांचे कम-अस्सल सारे साठून बसले आहे. आपण काहीही म्हटले तरी इसवी सनाच्या आगे-मागे किंवा समुद्राच्या ऐल-पैल पसरलेल्या देशांमध्ये कोणी ना कोणी तसे काही म्हटलेलेच असते. म्हणजे आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पण आपल्या खाजगी मालकीचे नाही. ते साले आधी कोणी तरी चितारलेले. हे साले शब्दांचे असे फुटके नशीब. चित्र, गाणे, नाच, शिल्प अशा बाकी चौसष्ट वगैरे कलांत असे फार होत नसावे. ज्याच्या रेषा त्याच्या रेषा, ज्याची पावले त्याची पावले, ज्याची तान त्याची तान... पण लिहिणारा असं दस्तुरखुद्द स्वतः नाहीच. तो असाच ह्याच्या त्याच्या गडद-फिकेपणाचे नाजायज पोर. आणि तरीही तो तेच शब्दांचे शस्त्र, शब्दांच्या कुबड्या, शब्दांचा एनिमा, शब्दांचा वेन्तिलेतर लावून आपल्या जगण्याची थडथडती नस पकडू पहाणारा. 
  हे वर्षानुवर्षांच्या शब्दांचे पर्वत ओलांडून गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडचे ध्वनींचे, हालचालींचे, सूचक संकेतांचे बर्फाळ निद्रिस्त अरण्य ओलांडून आपले असणे आपल्याला जाणवण्याच्या निखळ किना-याशी पोचले पाहिजे. अर्थांची सारी पुटे खरवडून जे आहे ते तसे बघायचा झरोका मोकळा केला पाहिजे. टक्क उघड्या डोळ्यांनी पार भिडून पाहीले पाहिजे जगणे भय-भीतीचे आदिम कुंपण तोडून. चव, नाद, स्पर्श, अर्थ असे साऱ्यातून येणारे सुखाचे फसवे हुंकार पचवत पाहिलं पाहिजे कि आपल्या आत खरंच तो आपला आवाज वगैरे आहे का का सारेच एका रिकाम्या पोकळीवर उभारेलेले वेष्टन आहे. आणि ह्या अंतिम प्रश्नाची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सगळ्या येडझव्या पायपिटीची, त्यातल्या एकारलेल्या भयाण पल्ल्यांची कहाणी मध्ये मध्ये ओरडत राहिली पाहिजे. आठवणीचे शेवाळे साचले कि जगणे कुठेच वाहत नाही. असे शेवाळे न जमू देता, स्वप्नाच्या उंच कड्यावरून कोसळून आपले दिवस आधीच्या दिवसांच्या गाळाने संपृक्त करत जाण्याचे नदीपण येईपर्यंत मागे मागे गेले पाहिजे. जगणे पुढे जाते असं सार्वत्रिक समाज असला तरी शहाणी माणसे मागे बघतात तेव्हाच शहाणी असतात, पुढे बघून ते मागच्या रेषेला स्वप्नील समाधानी दुनियेचे काल्पनिक टोक लावू पाहतात आणि मग त्याचे सारे शहाणपण विसरले जाऊन त्यांना येणारे दिवस कसे गेलेल्या दिवसांसारखेच आहेत हे समजले नाही ही ठसठशीत चूक तेवढी त्यांची खूण बनून रहाते. आपल्याला मागे नको- पुढे नको, आपल्याला तात्विक अवगुंठना नको, आपल्याला आपले अस्सल शब्द हवे. आपली पैज अमृताशी नको, आपली ओल्ड मोन्कशी पैज बरी. पण आपले शब्द नशा होवो, आपले शब्द शेकोटीचा जाळ होवो, आपल्या शब्दांत जिवंत होवो जगण्याची विलक्षण विजिगीषा आणि तिच्याखाली खोल खोल पुरले जाणारे विरोधाभास., आपले शब्द कल्लोळ होवोत, उग्र भडक वाद्यांचा आणि ते वाचणा-याला अस्वस्थ करून सोडोत, आपले पसायदान नाही, आपले अभंग नाहीत, आपले शब्द बुडून वर ना तरंगोत, आपले शब्द वाचणा-याच्या काळजाशी पोचोत, त्याच्या वेदनेच्या कुळाला स्पर्श करणारे निरागस अल्लड कण बनोत, आपले शब्द धूळ  धूळ बनून वा-यावर विरत जावोत, आपले शब्द आपले थडगे बनून न राहोत, आपले शब्द आपल्यापाठोपाठ मार्गस्थ होवोत, आपले शब्द आणि आपण कोणीच सोडून जावू नये एकमेकांना ... आपण होऊन जावे अस्तंगत संध्याकाळच्या क्षणिक अशब्दी रंगझळाळासारखे जे दिसतात पण नावाच्या यादीत अडकत नाहीत...
   हे असे प्रार्थनांचे उद्घोष, जगणे म्हणजे आहे पेक्षा व्हावे असे कोते पिकलेपण.. आणि मग कुठेतरी आजूबाजूला रटरटणा-या जगाच्या भट्टीचा चटका, कुठेतरी तो क्षण जिथे जाणवणारी हवे आणि आहे यांच्यातली जीवघेणी पोकळी, कुठेतरी ही हवे हवे चे मंत्र जपत सारे चेचत जाणारी एककलमी गर्दी, हे एकमेकांना बिलगणा-या पंडितांचे संकटकालीन अलार्म, हे पदोपदी मांडून ठेवलेले माहितीचे पुंज आणि मग हे असेच परत आपल्या आतल्या एकाट शांततेच्या निर्वातात सावकाश बेहोष होत जाणे.  
देहावर चढते भूल 
देहाला येते फूल 
देहाच्या खडकावरती 
माझीच जमते धूळ 
हे असे काही कामाचे नाही. असे मध्ये मध्ये अर्धे-मुर्धे खुळावत जाणे, अध्ये-मध्ये असे लिहिण्याचे तात्कालिक मोड फुटणे, अध्ये-मध्ये जीवितार्थाची उभारी येवून आपले बंदे नाणे खण खण वाजवायची मर्दुमकी वाटणे, असे अध्ये-मध्ये माणसे जमवून काही एक खेळ थाटून बघणे...एक काही तो प्रकार नेटाने केला पाहिजे. हेच तर सारे अशिक्षित, अर्ध, उच्च, अतिउच्च शिक्षित माणसांच्या आपले झेंडे रोवून आपल्या पुढच्या २-३ पिढ्या समृद्ध करून जाण्याचे गमक आहे. हेच तर एक खुले सत्य आहे, जिकडे तिकडे प्रकाशून असलेले. एकच एक काही केले पाहिजे, ते करत करत गेले पाहिजे... परिपूर्ण वगैरे होत गेले पाहिजे. 
ऐक भाऊ एक मार्ग भला 
इकडे-तिकडे हुंगशी
तू वेडा का खुळा
सन-थोर चालले 
रस्ता धरूनी नेटाने 
तुही पकड ऐक दिशा 
चाल कडेकडेने 
अशा तर अशा पण कविता येतच राहिल्या हव्यात, जगावर प्रकाशझोत मारून नवे नवे काही बाहेर आलेच पाहिजे, जरी माणसे आदिम काळापासून तशीच आहेत असे वाटले तरी तसे न म्हणता आधी खोटेच काही म्हणून मग जड जड शब्दांनी ते हळूच चुकले असे म्हटले पाहिजे. होतेच तर आहे असे, त्या दूर पश्चिमेच्या देशात युनीवरसीट्या मध्ये नवे नवे हररोज येते आहे, सूट-बूट टाय लावून माणसे तेजाळ होत देशचे देश इकडे तिकडे नेत आहेत, इतिहास नव्याने कळतो आहे, भूगोल नव्याने बदलतो आहे, इकडे तिकडे पृथ्वीसारखा ग्रह मिळतो आहे, नव्या कादंबऱ्या, नवे टीकाकार, नवे कवी, नवे संदिग्ध साहित्यिक, नवे, नवे असे क्षणाक्षणाला बनून अवघ्या मानवजातीवर कोसळते आहे. असे सतत सतत नवे मिळत राहणे हेच तर खरे, हेच सत्य, हेच ते जे आपण पिढ्या-पिढ्या चिरंतन शोधत आलो, ते हेच कि जे शोधतो ते नवे नवे बनून आले पाहिजे..
जिकडे तिकडे ह्या सत्याचा परीसस्पर्श मिळत आहे. इंटरनेट, टीव्ही, नाके जिकडे तिकडे नव्या नव्या प्रगतीचे मंत्र ऐकवणारे महंत आहेत. आणि ते इतके हवेतच. फार थोड्यांनी खरे काय ते सांगितले कि त्याला भलतीच किंमत येऊन ते एकदाच मुरवून परत परत वापरले जाईल. पण फार माणसे उच्च रवाने सांगू लागल्याने ते खरे आहेच असे वाटणेही बंद होते आणि मग ते परत परत शोधायला अर्थ राहतो. ते शोधणा-याचे जीवन सार्थकी वगैरे कुठेतरी लागून जाते... असे व्हायलाच हवे. दशावतार, व्यास, बुद्ध, शंकराचार्य, सोक्रेटीस, अरीस्टोटल, प्लेटो,  सोफेक्लीस, शेक्सपीअर, थोरो, थिरूवल्लूर, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, पॉपर, केन्स आणि अजून असे मृत, हयात, ज्ञात-अज्ञात, त्याचे शिष्य, अभ्यासक, वाचक, प्रकाशक, चिंतक असे सगळेच होऊनही नवे नवे सारे काही सापडतेच आहे...सापडो सापडो
मी तर चाललो आहे, मला तो धुक्याच्या दाटीआडचा आश्वस्त आवाज ऐकू येतो आहे, मला आता कोणी नको आहे माझे काही ऐकायला, मला काही विचारायला, मला दारू, गांजा, सिगरेट, बिडी, बाई, आई, मांजर, कुत्रा, मित्र, माणसे कोणी नकोत. 
मी हे हिवाळ्याच्या रात्रीचे निशब्द चांदणे आपल्या त्वचेत पेरून घेतो आहे, मी हे शहर मागे पडताना गाढ होत जाणारी शान्तता भरून कानाची रंध्रे बुजवतो आहे, तुझी शरीराच्या तृप्तीने क्लांत छबीची वितळती मोहर लावून मी डोळे मिटले आहेत, स्मरणाच्या सुया माझ्या रक्ताचा थेंब थेंब टचटचणा-या अबोध दुखांच्या नावे झेलून घेतायेत,  मी घेतो आहे आटोकाट हवा काठोकाठ  फुफ्फुसात भरून आणि मग ह्या हिरव्या-निळ्या अफाट जळात सूर मारतोय, शब्द, नाद, स्पर्श,दृश्य, संवेदना 
सा-याच्या पलीकडचे असणे झाकोळून जाणारी जाणीव मला कवेत घेताना..                               .              

Saturday, December 17, 2011

मांजर: एक दीर्घांक


मांजर असते एक आयुष्य, भले माणसाचे नसले तरी 
तेही चालते पायांवर, तेही आवाज काढते तोंडातून, 
तेही खाते आणि उत्सर्जन करते 
तेही देते प्रतिसाद त्याच्या भवतालाला
आणि एक दिवस तेही जाते होऊन भाग 
निश्चेष्ट अनाकलनीय अंधाराचा

मांजर असू शकते काहीही एखाद्या माणसासाठी 
अनोळखी आसपास वावरणा-या व्यक्तीसारखे 
किंवा मध्येच एकदा रस्त्यात भेटून हसणा-या ओळखीएवढे
किंवा ते असू शकते जगण्याची सवय 
एकटेपणाचा तात्कालिक तोडगा 
किंवा एकपात्री संवादांचे एकमात्र गिऱ्हाईक 

मांजर खाऊ शकते काहीही 
ते लपालपा दूध पिऊ शकते 
ते खाऊ शकते भात, चपाती, फरसाण, वेफर्स आणि असे तत्सम चकणे
ते खाऊ शकते उंदीर, मासे, कबूतर, सरडे 
किंवा ते नुसतेच घुटमळू शकते पायाशी 
भाव खात

मांजर वावरू शकते त्याच्या वयानिशी त्याच्यावर लादले जाणारे सारे अर्थ घेत 
ते मऊसर निरागस होऊन झोपू शकते तुमच्या कुशीत 
ते होऊ शकते बिलंदर आणि येऊ शकते तुमच्या घरात कामापुरते 
ते होऊ शकते गोल गरगरीत मठ्ठ बोका आणि बोचकारू 
शकते तुमच्या वर्षानुवर्षे असलेल्या पालकत्वाला
आणि त्याही पलीकडे जाऊन ते होऊ शकते एक इवले छोटे आयुष्य 
आणि तुमच्या घराच्या खोबणीत खुशाल बसू शकते पिल्लांना चाटत

मांजर हळूहळू होत जाते जिवंत अर्थांचे अबोल पात्र
त्याच्या     म्यांव म्यांव ना येऊ शकतात कुठलेही आकार 
त्याच्या हालचालींना येतात सवयींचे संदर्भ 
ते बनत जाते असण्याचा धडधडता हिस्सा 
त्याच्या सा-या ब-या- वाईट सवयींसह

तरीही आपण आखून असतो एक रेष, आपल्या आयुष्यातील 
मांजर आणि माणसांमध्ये 
आपण आपल्या सुख आणि दुखांच्या तीव्रता करून ठेवतो खुज्या 
आणि  मांजराला होऊ देत नाही मांजरापेक्षा अजून काही 
मांजराचे सुख, मांजराचे दुख 
आपण वेगळे काढतो माणसांच्या सुख-दुखापेक्षा 
मांजरांच्या स्पर्शाचे निराकार मऊसूत सुख तेवढे शोधता येत नाही कुठे 
माणसांच्या स्पर्शांना लगडून आलेले असतात अपार अर्थ 
मांजर तेवढे बिलगून जाते अबोल मागणीचे दावेदार होत 

मांजर असत असत जाते आठवणीचे थर देत 
आणि एक दिवस मांजर घेते उडी असण्याच्या सलग रेषेतून 
नसण्याच्या दिक्काल खोलीत 
आणि तिथे जाणवत रहाते 
मांजर नुसते मांजर नव्हते 
त्याच्यापाशी जडलेले कोवळे, बरे, नुसतेच आठवणींचे व्रण 
लसलसतात चार दिवस 
आपले माणूस तुटावे तश्या सवय तुटण्याचा साऱ्या जळण्याचे 
चटके देते मांजराचे मरणेही
आपण घेतो शहाणपणाचा डोस आणि मांजरच तर होते 
म्हणून सोडून देतो 

बुद्धाला जाणवला होता जगाच्या चित्राचा फसवेपणा 
एका वृध्द आयुष्याच्या अंताने 
मांजराच्या मरणाने जगाच्या नश्वरतेला छेडणारा 
महात्मा आपल्याला ठाऊक नाही 
मांजर घेत असावे सात किंवा नऊ जन्म 
म्हणूनच ते असावे इतके कोडगे 
कि एका जन्मात मरूनही
ते येत असावे परत पायाशी घुटमळत 
आणि त्याच्या निष्पाप भासणा-या आपलेपणाला
कवेत घेण्यापलीकडे रहात नसावे फारसे पर्याय 

मांजराच्या   निमित्ताने इतका झाला नसता उहापोह 
जर ते निपचित पडले असते ९-१० वर्षांच्या 
चक्रनेमिक्रमीय आयुष्यानंतर  
ते झाले असते मंद, थकाऊ आणि बसले असते जाऊन एका कोप-यात 
आणि दिसले असते केव्हातरी मान टाकून निघून गेलेले 
तर औषधे खात जगणारी तद्दन म्हातारी मेल्यावर होते 
तसे तुटले असते काही आणि सावरले असते सारे 
असे व्हायचेच अशा सोयीस्कर आशावादात

जेव्हा मांजर मारते त्याचा विलोभी निरागसपणा 
कुठलाही आकार घेण्याआधी 
तेव्हा ते सोडून जाते चरचरता दाह 
ते घालून जाते निरगाठ 
बोबड्या बालिश बालपणाशी 
जेव्हा पोक्त होण्याच्या मुत्सद्दी दिवसांत 
आपले-परके सारेच तोलले जातात
हिशोबी  निब्बर बरे-वाईटपणात
तेव्हा अजून असे काहीच न झालेले मांजर 
तेवढे शिल्लक खूण असते 
जगाच्या संकेतांचे बेरकी आकार न आलेल्या 
केवळ असण्याची 
जे आपले काही शोधत रहाते 
ते कुशीत शिरते भय-भीतीचे पुंजके डावलून 
ते हिंडते-फिरते त्याच्या शरीरात निसर्गाने आखलेला कित्ता गिरवत 
आणि एक दिवस ते सहज पार करून जाते 
मरणाची क्रूर रेषा 
त्याच्या जगण्याच्या शेवटच्या क्षणात 
त्याच्या डोळ्यांसमोर येणारी भेसूर खाई
ते लोटून देते  तुमच्या कुशीत
आणि एका क्षणी होऊन जाते एक फक्त हाडा-मासाचा गोळा

मांजर होऊन जाते आठवणीचा विरघळता ठिपका 
त्याच्या मातीआड लोटलेल्या देहाबरोबर 
ते होत जाते अस्पष्ट निशाणी 
आणि आपण परत जगू लागतो 
देत पांगळे स्पष्टीकरण 
मांजराच तर होते, एवढे काय...

मांजर काय ,माणसे काय 
आपले आपल्याला फसवणे तेवढे शाश्वत आहे 
जेवढे    शाश्वत आहे मांजराने म्यांव करणे...

Thursday, December 1, 2011

पांडुरंग सांगवीकर यांस,

पांडुरंग सांगवीकर यांस,

     अर्धवट पडलेले कॉलेजचे वर्ष सोडून तुम्ही गावातच आहात का अजून? कुठेही असं, पण अशी माझ्या मानगुटीला बसण्याची काही गरज नाही. आपलं झालं थोडं आणि त्यात तुमच्या 'stream of consciousness' चं घोडं असला प्रकार होतोय...आणि तरीही जगण्याच्या सगळ्या टवक्यांकडे टक्क उघड्या डोळ्यांनी बघत त्यातली निरर्थ झिंग घ्यायची खाज जात नाही...आणि म्हणून सांगवीकर मी माझ्या होस्टेलच्या एकांड्या खोलीत परत परत तुम्हाला भेटत रहातो...
    आपल्याला लहानपणी मेलेली बहिण नाही, बाप व्यवहारी, कपटी, कुटील, कसबी असा कोणीही नाही.. फक्त जाणिवांचे संवेदनशील तंतू घेऊन जगत राहण्याच्या अफाट लाटेवर तरंगणारा मी आहे... आपल्याला गाव नाही, भाषेच्या २-४ वाटा-वळणांचे ज्ञान नाही... पूर्ण रिकामा रिकामपणा आणि अगदी मध्याशी पोकळ असणारा रिकामपणा असे दोन भाग केले तर आपण पहिल्या भागात आणि तुम्ही दुस-या... 
पण एक बिलकूल खरं आहे कि काही करून मैदान मारण्याची इच्छा नसली कि उरणारे बघेपण तेवढे तुमच्या भागातही आहे आणि माझ्याही...  
    तुमची गोष्ट वाचून संपली...संपली किंवा पुढे पाने नव्हती वाचायला...ती तुमची गोष्ट आहे का नाही हाही वादाचा मुद्दा आहे. पण तरंगत राहायच्या अवस्थेत तुमचे सांगणे वाचत जाण्याच्या काडीने मी झक्क तरंगतो आहे. माझ्या आजूबाजूला फार हुशार माणसे आहेत. त्यांनी 'प्रवाह'नावाची काही तरी गोष्ट बनवली आहे. मग त्यातले आम्ही प्रवाहात पुढे आहोत असे म्हणत झपाझप पोहत आहेत आणि काहीजण आम्ही थोडेच प्रवाहाच्या विरुद्ध असे म्हणून पोहत आहेत. मी असाच आजूबाजूला तरंगतो आहे. आता तरंगताना मी कधी प्रवाहात असतो तर कधी विरुद्ध... आपल्याला काय आहे... बालपणाची सुखरूप होडी या हिशेबी जगाच्या लाटांनी तुटली कि आपण सगळे एकच अथांगात फेकले जातो, आणि कितीही हात-पाय मारले तरी तसेच शेवटी नाका-तोंडात पाणी जावून मारतो...जे लागतात किना-याला ते दिसत तर कधी नाहीत...मग आहोत तिथे बुडलो काय आणि काही फर्लांग दूर जाऊन बुडलो काय... शेवटी आपल्या यश-अपयशाच्या निकषांचा प्रकाशही पोचणार नाही अशा एकाच अंधारात आपण पोचणार आहोत... कदाचित तुम्ही तिथे आधीच पोचला असाल... 
    छे... ही खंत-बिंत बिलकूल नाही माझी... इथली गम्मत बघणे आणि मग हळूहळू त्या गमतीपासूनही मोकळे होत जाणे ह्याचीच मला गम्मत वाटते आहे. हं..अध्ये-मध्ये जाऊन चार पत्ते टाकून आपणही दोन डाव मारून यावेत अशी खुमखुमी येते... पण असा हवं तेव्हा निघा आणि हवं तेव्हा घुसा करण्याचा निब्बरपणा अजून जमलेला नाही. पापणी न मिचकवता हे करडे-कोरडे जग बघत राहण्याची सवय लागण्याच्या आधी माझ्या आई-बापानी, मास्तर-मास्तरणीनी, पुस्तक-कथा-कविता-गोष्टी-पोवाडे यांनी जे हळवे, कोवळे जग माझ्या बुबुळात पेरले होते त्याचे आंधळेपण अजून पुरते फिटले नाही. तुमच्या भेटींनी त्याला टरटरीत तडा जातो आहे एवढे पक्के.. पण काहीवेळा तो तडा परत बुजून येतो आणि पुढे येणा-या दिवसांच्या एकसलग माळेत ह्या करड्या-कोरड्या प्रकाराला छेडून जाणारे काही आहे असे उगाच वाटू लागते...आणि मग दिवस सरकत जातात, थोडे भराभर.. आणि मग असे काहीच नाही, हे आहे असे आहे, ही माणसे आहेत, ही गर्दी आहे, हे वारंवार बुडू पाहणारे आणि तरीही वाचणारे जग आहे, ही प्रवाहात आणि विरुद्ध पोहणारी माणसे आहेत, हे आपले कल्पनांचे इमले आहेत आणि त्याच्या काल्पनिक मजल्यांवर हाशहूश करत पळणे आहे, हे पाहणे आहे, ह्या पाहण्याचा शून्य सारांश आहे...आणि परत एकदा तुमची भेट आहे...
   आपल्या पोटात खानेसुमारीची ओळ तर येणार नव्हती...आपण आलो नसतो तरी ओळीला फारसा फरक नसता... आपले दुखही साले येडझवे आहे...ते आपल्याच अंगाभोवती गुंडाळून त्याच्या उबेत झोपावे तर ते फारच मोठे आहे आणि त्यात जीव उबून जातो... आणि ते पसरवून पार क्षितिजापर्यंत त्याचाच मऊ-मायाळू अंधार करावा तर ते तोकडे आहे... नेमके दुख असणे हे नेमके सुखही आहे... सांगवीकर, इथे तुम्ही-आम्ही एकाच वाटेवर पुढे-मागे आहोत... 
    तरी तुम्ही सगळ्याचे पुस्तक लिहिलेत हे बरे केलेत...म्हणजे जसे शिलालेखामुळे मागे जे राजे होते ते कसे होते याचे अदमास अनेक थोर माणसे काढतात तसे अगदी नाही झाले तरी कंटाळ्याची रेषा ही सातत्याने वाहते आहे आणि त्या रेषेवरून दिसणारे जग तेव्हाही तसेच दिसत होते, आत्ताही तसेच आहे...एवढा अदमास तर नक्कीच घेता येतो... 
   आता बेडकासारखे पार जमिनीखाली जाऊन घुसणार आहे. सांगवीकर तुमच्या वेळेत माहितीचा स्फोट झाला नव्हता. इथे मागच्या काही वर्षात, का दशकांत जिथून तिथून माहिती बनते आहे. ती इथे-तिथे आवाज, चित्र, अक्षर असे काहीही बनून दे दणाणा जमते आहे. तिच्या ढिगाखाली मी आता जाऊन बसणार आहे. वर वर सगळे जमत राहील. आणि इतक्या गोष्टींच्या अस्तित्वाचे ओझे घेत घेत मी असण्याचे निव्वळ जीवाश्म  होईन... काहीही नसलेले आणि तरीही दगडावर आपला ठसा सोडलेले... 
     किंवा एकदा या निरर्थाच्या निमुळत्या कड्यावर छाती काढून उभा राहीन..मला आठवतील ती गाणी-कविता पार घसा बसे-पुसे पर्यंत म्हणेन आणि मग जी छलांग मारेन समोरच्या काळोख्या दरीत, सांगवीकर, कि ....
       
('कोसला'च्या 'न' व्या भेटीनंतर....)             

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...