Friday, July 30, 2010

कथेतला लेखक

लेखकात कथा कुठे उगम पावते? कथा त्याच्या कल्पनेत असते का त्याच्या अनुभवाची घुसळण होऊन ती जन्माला येते? कथेच्या मुळाशी निर्मिनार्याचे अनुभव अपरिहार्यपणे असतात का? का निव्वळ कल्पनेच्या सदिश मुक्ततेत कथा उमटत जाते? लेखकाची मनोवस्था आणि आयुष्य दुसर्या कोणाला पूर्णपणे उलगडणे शक्य नाही, आणि म्हणून ह्या प्रश्नांच्या बाबतीत काही ढोबळ अनुमानेच करतं येतील. पण कथेत लेखक कुठे असतो असं विचार केला तर काही सापडू शकेल असं मला वाटतं. मला भावलेल्या काही कथांच्या ( इथे कथा म्हणजे पानांची मर्यादा अशी व्याख्या न ठेवता कथानक अशा ढगळ अर्थाने कथा हा शब्द वापरला आहे) आधारे मी कथेत सापडणारा लेखक मांडणार आहे. अर्थात हा मी घेतलेला, किंवा आपसूक घडलेला शोध आहे आणि ह्यात कोणत्याही साहित्यिक सत्याचा दावा नाही.
ज्या कथांत असं लेखक मला दिसलेला आहे त्या माणसाच्या वागण्यातले विरोधाभास, काही मुल्यांवर विश्वास असणाऱ्या माणसांतला वैचरिक संघर्ष आणि स्वतःच्या विचाराने जागू पाहणाऱ्या माणसात, मध्यवर्ती पत्रांत येणारी घुसळण आणि द्वंद्व मांडणार्या कथा आहेत. John Steinbeck ची In Dubious Battle वाचताना मुळात लेखकाचे असे प्रतिबिंब कथेत असू शकते अशी कल्पना माझ्या मनात डोकावली. In Dubious Battle हि John Steinbeck ची तशी मध्यम दर्जाची कृती म्हणता येईल. California मधल्या सफरचंद बागांत सफरचंद झाडांवरून उतरवण्याचे काम करणाऱ्या मजुरांचा संप संघटीत करणाऱ्या, मालकांच्या संघटीत आणि पूर्वनियोजित विरोधापुढे हरणाऱ्या अमेरिकन कम्युनिस्टांची हि कथा. Mack आणि John Nolan हि दोन मध्यवर्ती पात्रे आहेत. Mack अनुभवी संघटक आहे. पार्टीत नवा असलेल्या नोलानाला तयार करण्याच्या हेतूने Mack त्याला सोबत घेऊन शेतांत जातो. तो अनुभवी असला तरी त्याची मते काम्युनिझामावाराच्या श्रद्धेतून बनलेली आहेत. नोलान पार्टीत नवीन असला तरी तो मजुराचा मुलगा आहे. त्याचे वाचन आणि स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण करण्याची क्षमता दांडगी आहे. ह्या दोघांच्या कल्पनेपेक्षा वेगळी परिस्थिती त्यांना अनुभवायला मिळते. सुरुवातीला ते मजुरांच्या असंतोषाचा सहज वापर करत संप सुरु करतात. पण नंतर ह्या मजुरांना साम्पातल्या नव्या नव्या कामांसाठी उमेद देत राहणे आणि त्यांची रहायची व खाण्या-पिण्याची व्यवस्था, त्यांचे ढासळते मनोधैर्य आणि स्थानिक प्रशासन हाताशी धरून पद्धतशीर दबाव वाढवणारे बागमालक ह्या सगळ्या आघाड्यांवर लढताना त्यांच्या विचारांचा, जमत जाणार्या मैत्रीचा आणि इतरांबरोबर असणाऱ्या संबंधांचा कस लागतो आहे. त्या दोघांबरोबर संपामध्ये बर्टन नावाचा डॉक्टर आहे. तो फारसा बोलत नाही. संपूर्ण कादंबरीत दोनदाच तो त्याचे विचार काहीश्या स्पष्टपणे मांडतो आणि सम्पातल्या कोसळत्या टप्यात अचानक पकडला जाऊन नाहीसा होतो. तो पार्टी वर्कर नाही. पण तरीही डॉक्टर त्या संपाच्या जिवंत राहण्यातला एक महत्वाचा घटक आहे. आता या सगळ्यात लेखक कुठे येतो? वरकरणी नोलानामध्ये किंवा Mackमध्ये लेखक आहे असं वाटतं. पण बर्टन एका ठिकाणी संप, लढा याबाबत बोलताना शरीरातले आजार आणि त्यांच्याशी लढणाऱ्या पेशी अशी तुलना करतो. डॉक्टर मानवी वागण्याच्या निर्विकार निरीक्षक आहे. चांगलं किंवा वाईट अशी विभागणी करणं हे त्याला माणसांच्या वागण्याला मर्यादित करण्यासारखा वाटतं. तो Mackच्या विचारातली विसंगती दाखवू शकतो आणि त्याचवेळी संघर्षाची अपरिहार्यताही ओळखतो. डॉक्टर मला लेखकाचं प्रतिबिंब वाटतो. Steinbeckचा खरोखर एक डॉक्टर मित्र होता आणि त्याच्या बरोबर होणार्या अनेक भेटी आणि प्रवास ह्यात त्याला अनेक कथा सापडल्या. Cannery Rowsमध्ये असाच एक डॉक्टर आहे. तो सगळ्यांपासून सारख्याच अंतरावर आहे. तो स्वतःच्या biological specimen गोळा करण्याच्या कामात दंग आहे. पण त्याचवेळी चवीने जगायला तो विसरत नाही. सगळ्या गावाचं तो लाडका डॉक्टर आहे, खरतर तो संशोधनातून डॉक्टर झालं आहे, वैद्यकीय शिक्षणातून नाही. पण लोकांनी त्याला आजारपण बरं करणारा इलाज केला आहे. डॉक्टरनेही हि जबाबदारी आणि प्रेम स्वीकारले आहे, प्रसंगी त्यात त्याला नुकसान होत असूनही. थोड्याफार सारख्या प्रकाराने चित्रित केलेले हे 'डॉक्टर' फारसा बोलत नाहीत. त्यांच्या मनात इतरांबद्दल असणारी कळकळ त्यांच्या वागण्यातून दिसते, पण त्यांच्या मनाचे पीळ फारसे उलगडत नाहीत.
हे दोघे मला त्या त्या कथांमधले लेखक वाटतात. Steinbeckला कम्युनिस्ट विचारसरणीचा असणारं आकर्षण In Dubious Battle मध्ये जरी लपत नसलं तरी त्याचवेळी सामान्य कष्टकरी माणसे ह्या वावटळीत टिकू शकणार नाहीत, त्यांची लहान आयुष्ये तत्वनिष्ठतेचे ओझे पेलू शकत नाहीत हेही तो जाणून होता. त्याच्या कथा ह्या नुसतंच हे ताण आणि विरोधाभास टिपणं नाही. त्याला स्वतःचा एक सूर आहे. आणि तो लेखकाने डॉक्टर च्या पात्रांतून व्यक्त केला आहे. हा सूर एकांगी असणं शक्य नाही. तसा असतं तर त्या कथाही एका निश्चित शेवटाकडे झुकल्या असत्या. कोणीतरी हरलं असतं, कोणीतरी जिंकला असतं. त्या तशा न जातं एका अबोल करणाऱ्या शांत शेवटला जातात, कारण त्यापाठी लेखकाची एक भूमिका आहे. आणि Steinbeckने मोठ्या खुबीने ती काही ठिकाणी उतरवली आहे.
अशा लेखकाच्या प्रतीबिम्बाचे मला आवडणारे उदाहरण म्हणजे 'रारंग ढांग' मधला मिनू खंबाटा. अर्थात 'रारंग ढांग' ला इतके पदर आहेत कि त्यात अनेकात तो लेखक सापडेल. रूढार्थाने विश्वनाथ 'रारंग ढांग' चा नायक किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. तिला टोक आहे, धार आहे, स्वतःच्या विवेकाने स्वीकारलेल्या मार्गावर चालताना येणारे ओरखडे सहन करायची हिम्मत आहे. पण हि लेखकाची निर्मिती आहे, तो स्वतः नाही. कारण विश्वनाथाच्या सहज स्पर्शणार्या आणि ठाम वाटणार्या आयुष्याला प्रत्यक्षात जगणं काय असेल हे कर्नल राईट किंवा शेवटच्या कोर्ट मार्शलच्या प्रसंगात लेखकाने दाखवलं आहे. 'तुला जे स्वातंत्र्य हवं आहे ते तुला बाहेरच्या जगात तरी मिळेल का? ' हा विश्वनाथला विचारलेला प्रश्न नाही, तर लेखकाला जाणवलेली मर्यादा आहे. मिनू खंबाटा आनंदात जगण्यापलीकडे कोणताच तत्वज्ञान सांगत नाही. आपल्या सभोवतालच्या माणसांच्या अडनिड्या किंवा तर्हेवाईक स्वभावांशी तो फिट होऊन गेला आहे. पण तरीही त्याचे डोळे उघडेपणाने माणसांकडे, त्यांच्या चांगल्या-वाईट वागण्याकडे, प्रसंगी कातडी बघतायेत. त्याचं स्वभाव खरतर शिस्तीच्या रुक्ष धबडग्यात कोमेजायाचा. पण त्या शिस्तीच्या दडपणातही पुटू करण्याची मोकळीक तो बनवू शकतो. काचत जाणार्या शिस्तीत स्वंतंत्र माणसावर येणारा ताण त्याला म्हणूनच कदाचित समाजात असावं, नव्हे समाजालाच, म्हणून तर तो 'friend of accused' म्हणून स्वतःहून नाव देतो. त्याचं आनंदी एकांडेपण आणि त्याचवेळी तो आनंद वाटायची आणि दुसर्याच्या अडचणीत निशब्द साथ द्यायची वृत्ती हि कथेतल्या कुठल्याही तात्विक भागापेक्षा मला अधिक खरी वाटते. मेजर बंब, कर्नल राईट आणि विश्वनाथ यांसारखी प्रसंगी विरोधी तर पूरक व्यक्तिरेखा उभं करणारा लेखक या सगळ्यात मिनू खंबाटा बनूनच सामावून जाऊ शकेल ना!
हरमान हेस्सेच्या 'सिद्धार्थ' मध्ये वसुदेव नावाचा नावाडी आहे. त्याचं नावाडी असणं हीच मुळात खुबीने केलेली निवड आहे. ज्या नदीवर तो नावाडी आहे, ती नदी म्हणजे संसाराचे पाश तोडून एकांत साधनेत स्वतःला शोधू पाहणारे साधक आणि उपभोगांच्या नव्या नव्या सुखसंवेदनात स्वतःच्या शोधाची बोचरी जाणीव हरवलेलं जग ह्याच्या मधला प्रवाह आहे. वसुदेव नदीच्या एका तीरापासून दुसर्या तीरावर जाण हे काम करतो आहे, व्यक्तिगत सुख-दुख, कंटाळा, बदलाची गरज अशा कशानेही त्याच्या ह्या व्रतस्थतेत खंड पडलेला नाही. आणि त्याचा एकमेव अविरत संवाद, खरतर स्वतःशीच, चालतो तो त्याच्यासारख्याच अविरत वाहणाऱ्या नदीशी. 'नदी कधीच सारखी नसते. जरी एकच प्रवाह आपण नेहमी पहात असलो तरी तो प्रवाह वाहता असतो.' हि जाणीव त्याने त्याच्या नदीबरोबर चालणाऱ्या संवादांतून मिळवलेली. वेदविद्या पारंगत तेजस्वी ब्राह्मण युवक, शरीराच्या सगळ्या इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न करणारा साधक, 'Will you give me kiss for my poem' असं म्हणून भोगांच्या लालस जगात स्वतःला शोधू पहाणारा, 'That is why I am going my own way not seek another or better doctrine, for I know there is none, but to leave all doctrines and all teachers and to reach my goal alone- or die' असं Illustrious One ला सांगून बाहेर पडणारा अशा विविध रुपात चितारलेला सिद्धार्थ अखेर येवून स्थिरावतो तो वसुदेवापाशी. वसुदेव त्याला काहीच शिकवत नाही, फक्त सांगतो जे त्याने नदीच्या या तीरापासून त्या तीराला जाताना आणि परत येताना केलेल्या संवादातून त्याला गवसलंय. कथा सिद्धार्थची आहे, कथेत सिद्धार्थाने घेतलेला, वरकरणी निष्फळ वाटणारा शोध आहे, त्याने स्वतःला विचारलेले भौतिक जगात निरुपयोगी पण टोकदार प्रश्न आहेत, उत्तरांचा आभास आणि नंतर त्या आभासानच स्वतःपुरती शाश्वतता म्हणून शरण जाणे आहे. ग्रेसने 'मितवा' मधल्या लेखात हे 'सिद्धार्थपण' छान मांडलं आहे. पण हेस्सेला जे सांगायचं ते सिद्धार्थ कुठेच सांगत नाही. किंवा हेस्सेला मुळात काही सांगायचाच नाहीये. त्याला दाखवायचाय तो निरंतर प्रवास, वरकरणी एका वर्तुळाच्या परीघावर असल्यासारखा पण खरतर खोली वाढत जाणार्या विवारासारखा. आणि वसुदेवासारखा नावाडी त्याने ठेवलाय, आभासी जाणिवांच्या सतत बदलत्या नदीवरचा स्थिर साथीदार.
वर उल्लेखलेल्या ३ कथांपैकी, खरा तर कोणतीच नाही, पण 'रारंग ढांग' आणि 'सिद्धार्थ' ह्या नायकप्रधान कथा आहेत. अर्थात हे दोन्ही कथाकार इतक्या ताकदीचे आणि समजाचे आहेत कि वास्तवात अशी एका बाजूने नेहेमी योग्य असणारी स्थिती शक्य नाही हे त्यांना जाणवणार नाही. 'सिद्धार्थ' लिहिण्यागोदर हेस्से भारतात आलेला ते पौर्वात्य तत्वज्ञानातील अनुभूतीची ओढ घेऊन. ती त्याला मिळाली नाही, पण वैदिक तत्वज्ञान, त्यातले न पटणारे सिद्धांत नाकारून उभा राहू पहाणारा बौद्ध धर्म, त्यातही हेस्सेला जाणवलेली पोकळी, कदाचित पाश्चिमात्य विचारसरणीच्या पायाने नाकारता न आलेल्या ऐहिक प्रेरणा पण त्यात न गवसणारे अंतिम साध्य, आणि हेस्सेच्या वैवाहिक जीवनात त्यावेळी असलेली अशांतता ह्या सार्या सरपणावर 'सिद्धार्थ' उभी आहे. त्यात नायक हा सादरीकरणाची गरज, सोय म्हणून आहे. आणि हेस्से, जो तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता, तो सिद्धार्थ केवळ जे घडत आहे ते पाहून मांडण्याचे माध्यम म्हणून उभा करत नाही. खरेतर कोणीतीही साधी गोष्ट, अगदी आद्य चिऊ-काऊची गोष्ट, हि पण काहीतरी सांगण्यासाठीच बनते. त्यामुळे 'सिद्धार्थ' चा प्रवास खरतर कुठेच न जाणारा ठरला तरी त्यात हेस्सेला काही सांगायचाच नाहीये, किंवा नुसती व्यर्थता दाखवायची आहे असं वाटत नाही. व्यर्थता दाखवायला एवढं तात्विक उहापोह का? माणसे एवढ्या-तेवढ्यावरून सुस्कारे टाकताच असतात. पण हे सांगणं थेट नाहीये, किंबहुना चांगला लेखक कधीच एखाद्या निर्विवाद सत्याचा सेल्समन नसतो. तो मुळात एक जागा पकडतो, तिथून चालायला लागतो, चालताना दिसणारं जग, भेटणारी माणसे, वाटांचे गुंते, थकवा, कंटाळा, आनंद, भ्रम, चीड, वैफल्य मांडतो आणि त्यात कुठेतरी स्वतःला जे सांगायचं ते खुबीने ठेवून देतो. 'जे बरोबर आहे ते दर्शवता येत नाही. चूक गोष्टीच दाखवता येतात.' ह्या तत्वाज्ञानातल्या falsification सिद्धान्तासारखं कथांमधले वरकरणी वाटणारे नायक-नायिका हे शोध मांडतात, त्या शोधाचा शेवट नाही. ते बरोबर नसतात, ते काहीतरी बरोबर शोधण्याच्या अविरत प्रवासातली अजून एक पायवाट दाखवतात. त्या पायवाटेचा अर्थ त्या वाटेवर न चालता ती वाट पाहणाऱ्या दुसर्या कोणाला गवसलेला असतो. मग तो Steinbeck चा डॉक्टर असतो, मिनू खंबाटा असतो किंवा नदीशी बोलणारा वसुदेव असतो.

Thursday, July 29, 2010

'हिन्दू' अणि पुन्हा एकदा Stream of Consciousness

'कोसला' ची आणि पर्यायाने नेमाड्यांच्या 'stream of consciousness' ची ओळख म्हणजे १० वीच्या मराठीतला 'बुद्धदर्शन' धडा. अजूनही कोणाशी, म्हणजे ज्याला दहावितले धडे आठवतायेत अशा कोणाशी बोलला, कि मी ऑप्शनला टाकलेला तो धडा असे सांगणारेच भेटतात. मला तरी काय कळलेला तेव्हा? पण ती सरळ रेशेसारखी, किंवा टोकदार सुईसारखी समोर दिसणारं दृश्य आणि त्याच्या सोबत मनात उमटणारा अर्थ सलगपणे एकमेकांना शिवत जाणारी नेमाड्यांची भाषा लक्षात राहिली. पुढे कोसला वाचलं, एकदा, दुसर्यांदा, मग एखाद दुसर्या संवाद किंवा ओळींसाठी परत परत. पुढे कुठेतरी 'Catcher in the Rye' आणि कोसला एकच धाटणीचे आहेत असं वाचलं, Catcher बद्दल अजूनही ऐकलं होता म्हणून Catcher हि वाचलं. सारखेपणा वगैरे फारसा काही जाणवला नाही, पण सभोवतालचा जगणं आणि लहानपणापासून आपल्यावर छापले जाणारे संस्कार, त्यातून आणि स्वतःच्या जाणीवेतून भोवतालात घडणार्या आणि जाणवणाऱ्या घडणांची मनात उठणारी वर्तुळे यांच्याकडे कुठलीही चौकट न घेता दिसेल तसा बघणारा 'Stream of Consciousness' डोक्यात गेला, म्हणजे माझ्या लिहिण्याच्या पद्धतीत आला, बोलण्याच्या प्रकारात आला. त्याची चीडही आली, पण तो आहे तसा आहे म्हणून तसा बघत रहायची, स्वतःमधल्या स्वतःच्या निरिक्षकाशी बोलायची सवयही लागली.
मागचे ३ रात्री 'हिंदू' वचन म्हणजे कोसलाचा गारूड, चांगदेव पाटलाच्या चातुष्ट्यामधली धुंद आणि बघणार्याचा सार्वकालिक निश्चित एकटेपणा आणि तरीही सभोवतालच्या माणसांच्या, वस्तूंच्या, परिसराच्या त्याच्याशी जोडले जाण्यानं आणि नंतर तुटले जाण्यानं त्याला होणारी अविभाज्य दुखाची मूलभूत जाणीव. कोसला मधला पांडुरंग सांगवीकर शिकाऊ पहाणारा आहे. त्याचं भवताल प्रामुख्याने त्याचं कॉलेज आणि त्याच्या कुटुंबात असलेली त्याच्या कडू-गोड आठवणींची मुळे एवढाच आकाराला आलेला आहे. तो वाचणारा आहे, लेखकाने दडवू पाहिली तरी त्याच्यात जगणं चवीने घेण्याची आसक्ती आहे. जगाला लाथाही मारलेली नाही आणि मिठीही नाही अशा विचित्र अवस्थेत सापडलेला पांडुरंग सांगवीकर. 'ती गेली. तिच्यापाठोपाठ तिचे इवलेसे गर्भाशय. तिच्यापाठोपाठ येणारी खानेसुमारीची एक मोठी ओळच वाचली.' अशा संक्षिप्त शब्दांत बहिणीचा मृत्यू मांडणारा पांडुरंग अजन्ठ्माधली लेणी पाहताना ह्या बहिणीच्या जाण्याच्या दुखानेच बुद्धाला जाणवलेल्या दुखाशी नाळ जोडून घेतो. 'हिंदू' मध्ये हा बघणारा रापला आहे. म्हणजे तो जेव्हा स्वतःचे लहानाचे मोठे होणे पाठी वळून पाहतो तेव्हा त्याच्या संदर्भांची चौकट त्याच्या कुटुंबाच्या, गावाच्या किंवा जातीच्या अक्षांना ओलांडून मोठी होते. पुरातत्व संशोधक खंडेराव आपल्या जगण्याची आणि जगण्यापाठी असेल तर असणाऱ्या अर्थांची संगती त्याला आलेल्या आणि येत असणाऱ्या अनुभवांचे तुकडे त्याने वाचलेल्या किंवा विचाराने मिळवलेल्या अर्थाने जोडून लावून पाहतो. अर्थात कादंबरीच्या निर्मितीचा काल लांबल्याने आणि मधल्या काळात लेखकाच्या वाढत-घाटात जाण्याच्या काम-अस्सल प्रक्रियेचा अपरिहार्य प्रभाव खंडेराववर आहे. त्यामुळे त्याची संदर्भ चौकट फार काल माणसाच्या अस्तिवात येण्याच्या आणि संस्कृती,संस्कार, समाज, चाली-रिती बनण्याच्या शोधत टिकत नाही. दरवेळी इतक्या खोलवर शोध घेणं हे 'Stream of Consciousness' ला न पेलवणारा आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी 'हिंदू' केवळ बघण्याकडे येते. पण काही ठिकाणी तिने अफलातून उंची गाठली आहे. अर्थात तेही अनपेक्षित नाही.
या कादंबरीत सांगितलाय ते हिंदू धर्माचे निखालस सत्य आहे असं लेखकाचं दावा नसावा. आणि ह्यात लेखकाने सांगितलाय ते आणि तेच असं माझं आंधळा समर्थनही नाही. ६०० पानांच्या विस्तारात आणि कोणा एका खंडेरावच्या आत्मशोधात सापडेल इतका उथळ हिंदू धर्म नक्कीच नाही. मुळात साहित्य हे तत्वज्ञान नाही की ते होईल तितक्या निरपेक्षपणे एखाद्या शक्यतेचा तार्किक उहापोह करेल. आणि हिंदू धर्मासारख्या आकार, उगम आणि व्याख्याहीन वस्तुस्थितीवर तत्वाज्ञानातही भाष्य करणे कठीण. 'हिंदू' ची गम्मत अशात आहे की खंडेराव जेव्हा जेव्हा त्याच्या हिंदू असण्याशी, त्याच्या आजूबाजूला घडणार्या घटना ज्यांची मूळे बर्याच अर्थाने हिंदू असण्याशी अथवा नसण्याशी संबंधित आहेत अशा घटनांकडे पाहताना, पुरातत्व संशोधक म्हणून इतिहासाचे प्रसंगी लयबद्ध आणि प्रसंगी विस्कळीत संबंध जोडताना त्याची जाणीव मांडतो त्यात आहे. त्याने जे मांडलाय ते त्याला जाणवलेला आहे. 'Stream of consciousness' म्हणजे केवळ एका झापडे लावलेल्या जगात राहणे नाही तर Consciousness चा आवाका जिथवर जातो आहे तिथवर तो Consciousness मांडणं. 'कोसला' मध्ये शेतकरी वडील, अजंठाची लेणी आणि पुण्याचे कॉलेज, होस्टेल आणि सिंहगड एवढ्यात मावणारी जाणीव 'चांगदेव चातुष्ट्यात' महाराष्ट्र, जाती, शिकणं आणि शिकवणं, कार्या माणसाच्या तीव्र पण दबलेल्या लैगिक आणि वैयक्तिक जाणीवा आणि खूप वाचून, शिकून आयुष्यावर काहीच स्थिरतेने उमटवू न शकलेला 'चांगदेव' अशी विस्तारते. 'हिंदू' मध्ये ती तत्कालीन काळातला खंडेरावच्या आयुष्याचा परीघ व्यापातेच पण त्याचबरोबर इतिहासाच्या अंधुक विवरात आणि अभिव्यक्तींच्या दाट जाळ्यांत विस्तारते. हा विस्तार एका अपूर्ण वर्तुळात फार खुबीने ठेवला आहे. जिथे जाईल तिथल्या अवकाशाशी ठाम निगडीत माणसे, त्याच्या भाषा आणि जाणीवा आणि हे संबंध टिपणारा इतिहास 'हिंदू' च्या ६०० पानी विस्तारात प्रकटत जातो.
खंडेरावचा मोहोन्जो- दडो ते मोरगाव प्रवास, क्षय पावणाऱ्या यक्षाचे आणि खंडेरावचे यक्षप्रश्न, खंडेरावचे भावडूला पत्र, खंडेरावचे फेलोशिपचे भाषण आणि 'हिंदू' ची सुरुवात, सिगारेटी, टक्क जाग्या रात्री, कविकुलगुरू गालिब....
'हिंदू' वाचत असताना एके ठिकाणी हिंदू असण्याच्या संदर्भात काही तात्विक वादावादी झाली. त्याच्या मध्ये कुठेतरी असं वाटलं की वाटेल त्या अंगाने धांडोळा घेता येणं हे वैशिष्ट्य किती वेगळे आहे. लोकपरम्परा, लिखित आणि मौखिक साहित्य, ऐतिहासिक जय-पराजय, प्रथा, रूढी, चाली-रिती, खाद्यपदार्थ, सण, आणि झाकून ठेवलेल्या पण अपरिहार्य मानवी लालसा, इच्छा, समाधान आणि तृष्णा. ह्या धर्माच्या अस्तित्वाची कुठलीही मोठी खूण दररोजच्या जगण्यावर न बाळगताहि तो जगत आलेली कोट्यावधी लहान-थोर माणसे, त्यांच्या जाणीवा, त्यांचं प्रकटीकरण आणि त्यावर फिरणारा काळाचा निबर हात. आणि तरीही ह्या सगळ्यात 'मी कोण आणि हा माझ्या भोवतालचा पसारा भरणारी हि अडगळ किंवा संदर्भ म्हणजे काय' हे शोधायची विचार करणाऱ्या माणसाची आकांक्षा. हे ज्याचं-त्याचं. Stream of Consciousness. भूतकाळ समृद्ध असण्याचा अभिमान आणि त्या संदर्भांची रसद आणि अडगळ. येणाऱ्या दिवसांची हुरहूर आणि मानवी आयुष्याच्या चक्रीयेतेची जाणीव होऊन येणारी सुन्न शांतता आणि पायाखालच्या टीचभर वर्तमानावर मस्तीत उभं राहून बघत राहणं, जाणिवांचे परीघ आणि पंख विस्तारणं, कोसळणं आणि तरी परत उठणं...
है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब
हमने दश्ते-इम्काँ को यक नक़्शे पा-पाया

Friday, July 9, 2010

स्थिरचित्र

एक क्षण असा वेगळा काढता येत नाही। पण तरीही कुठल्या तरी एका क्षणाशी थांबून काय चाल्लय सभोवती असा बघायचा प्रयत्न असतोच। स्कॉलरशिपच्या परीक्षेत 'चित्रवर्णन' असा एक १० मार्कांचा प्रश्न असायचा. एखादं दृश्य असायचं त्यात. एका क्षणाशी बांधलेलं . वाहणारी नदी, झाडं आणि नदीवरचा घाट. गजबजलेला बाजार आणि त्यात चित्राच्या मध्यभागी असणारा फुलविक्रेता. शाळा सुटल्यानंतर बाहेर येणारी मुले आणि त्यांना घ्यायला आलेले पालक. किंवा नदीच्या घाटावर चाललेलं कपडे धुणं, अंघोळी आणि कोपर्यात एक मंदिर. मग आईचा हात धरून चालेल्या एखाद्या मुलाचा दुसरा हात हवेतच आहे, कपडे धुणार्या बाईने एक ओला कपडा हवेत वर उचललेला आहे, किंवा नदीच्या प्रवाहावर असणाऱ्या रेषा. मग शाळेत स्थिर चित्र असा विषयच होता चित्रकलेत. अर्थात काही न काढताच स्थिर रहायचं या चित्रकलेबद्दलच्या प्रेमाने आणि शाळेतील शिक्षकांच्या शाररीक शिक्षणाच्या अंगाने चित्रकला शिकवण्याच्या अभिनव पद्धतीने एकूणच स्थिर काय किंवा अन्य कोणत्याही चित्रप्रकाराबद्दल स्थिर अज्ञानच निर्माण झाले. पण एक गोष्ट लक्षात राहिली. स्थिर चित्रात केलेलं प्रकाशाचा चित्रण. अर्थात स्थिर चित्रांमधला रस तिथेच थांबायचा.
खरा तर कुठलही चित्र स्थिरच आहे. प्रवाहाचा एक क्षण त्या रेषात, रंगांत, वळणात आणि मर्यादेत पकडू पाहिला आहे. जो क्षण चितारला आहे तो मागच्या आणि पुढच्या क्षणांमधला एक थांबा आहे. त्या क्षणाला त्याच्या मागच्या क्षणांनी एक अर्थ आला आहे आणि पुढच्या क्षणांनी हेतू. अगदी एकच जागी ठेवलेली फुलदाणी जरी असली तरी कोणीतरी ती ठेवली आहे, तिला घासली पुसली असेल, तिच्यात ताजी फुलं ठेवली असतील किंवा फुलं ठेवायची, बदलायची विसरली असतील. तिच्यावर पडणारा प्रकाश एखाद्या झरोक्यातून, किंवा खिडकीतून येतोय. हे सगळं त्या एका क्षणात नाहीये. पण त्या फुलदाणीची स्थिरता हि त्या क्षणांमधल्या अस्थिरतेतून, कृतीतून आली आहे.
'क्रॉस सेक्शन' नावाचा एक प्रकार असतो statistics मध्ये. म्हणजे एका क्षणी, एका स्थिर मानलेल्या क्षणी, नोंदवलेली निरीक्षणं. म्हणजे एखाद्या वर्षाच्या शेवटी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उंची, भारतातील सर्व राज्यातील गरिबांचे प्रमाण, वेगवेगळ्या देशात जन्माला आलेली मुले असा काही. म्हणजे काळाच्या एका तुकड्यावर उभं राहून सभोवती पाहणं. म्हणजे परत स्थिरचित्र.
एकदा असाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. म्हणजे मी स्पेसमधला एक तुकडा स्थिर केला. आणि मग एकदम समोर नजर ठेवून पाहू लागलो. मग थकलेल्या सायकल वरून जाणारा दमलेला मजूर, गरम चहा घेऊन लगबगीने जाणारा अण्णा, ऑफिसमधून परतताना फोनवर बोलत लाजणारी तरुणी, पुढे चालणाऱ्या मुलींकडे बघत टोमणे मारत जाणारे तरुण, आईचा हात धरून आणि मान इकडे तिकडे वेळावत जाणारा शाळेतला मुलगा, अंगावर एकही कपडा नसणाऱ्या बहिणीला घेऊन हलवायाच्या दुकानापुढे उभं रहायला निघालेला आणि अंगावर प्रचंड ढगाळ शर्ट तेवढा घातलेला आणि केस अस्तावस्त्य पिंजारलेला मुलगा, दाढी खाजवत आणि समोरच्या प्रत्येकाला 'देखा क्या अपने उसे' असं विचारात निघालेला वेडा, वेल्डीन्गच्या ठिणग्या, रंगाच्या दुकानातले रंगांचे डबे, रिकामी हातगाडी, सावकाश जाणार्या बसेस, सुळसुळीत बाईक्स, आणि अनेक एकसारखे एक चालणारे. अर्थात ह्यात मी स्थिर आहे. आणि माझ्या पुढे वेळ वाहतो आहे किंवा उगाच निवांत सरकतो आहे.
आता याक्षणी बाहेर गेलो आणि flash मारला तर काय दिसेल? थेंब, थेंब आणि थेंब. बहुतेक हवेच्या अधान्तरात तोललेले. सोडियम दिव्यांचा फिकट पिवळा प्रकाश, त्या दिव्यापांशी क्षणभर झळाळून उठलेले थेंब, काही थेंब पानांवर विसावलेले, काही त्यांना स्पर्शण्याच्या किंचित दूर, वारा दिसणार नाही चित्रात पण त्याने बदवलेले थेंबांचे आकार किंवा त्यांना दिलेला तिरकस कोन, रस्त्यावर साचलेल्या डबक्यात जाणारा थेंब, चालणाऱ्यांची पावले, काही उचललेली काही अर्धवट, त्यांच्या छत्र्या आणि रेनकोट यातून ओघळणारे आणि रस्त्याच्या पृष्ठभागावर पडून मिटून जाण्याआधी मिळालेले अल्प आयुष्य साजरे करणारे थेंब, वळचणीच्या पाण्याची धार, पाउस थांबण्याची वाट पहात वर पहात उभे असलेले चुकार वाटसरू, सिगारेटच्या धुराची ओलसर हवेत रेंगाळणारी वलये, खडबडीत, ओलसर आणि मध्ये मध्ये चमकणारा रस्ता आणि या सगळ्याच्या न जाणवणाऱ्या पार्श्वभूमीला असणारा प्रकाशाच्या छिद्रांचा अंधार.
असा 'एक क्षण' सापडत नाही. स्वतःचं अस्तित्व आणि क्षण वेगळा काढता येत नाही. काहीतरी एकच जाणवू शकतं.
स्वतःच्या आतले विचार याक्षणी पॉज केले आणि रेखाटायला घेतले तर? एखादं प्रवाह असेल, ज्यात हे जे लिहितो आहे त्याचे विचार असतील, त्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारा 'काय यार, काय बकवास लिहीतोयस? हे काय लिहिणं आहे? साला, यात काय दम नाही. पुचाट' हा एक प्रवाह. चित्राच्या कोपर्यात राहिलेलं वाचन, करू करू म्हणत उगाच गेलेला दिवस, ह्याला-त्याला सांगायचा काही-बाही , रेंगाळणारी कामे, नुसतेच ऐकू येणारे आवाज, मधेमधे असलेली शांततेची विरळ बेटे आणि या सगळ्या दृश्याला सावरणारा आणि त्यात मिसळूनगेलेला कंटाळा.

Friday, July 2, 2010

नवीन झाडांचा प्रकाश

मी पाहतोय माझ्या शब्दांवर कोणाकोणाच्या खुणा आहेत
कोणाकोणाच्या अभिव्यक्तीची नक्षी उमटलीये माझ्या कोरीव कामावर
आपलेच शब्द शोधणं म्हणजे परत जाण स्वतःच्या पहिल्या टाहोकडे परत,
जगात आल्यावर उमटलेला पहिला स्वर तेवढा असतो अभिजात

आता हा परत उलट प्रवास, आणि आता परत जाण कठीण होत चाल्लय
सोपं असतं हजार वर्षांआधी आपले शब्द, आपला अर्थ शोधणं
आता कशालाही आपलं म्हंटला कि दिसतं कोणीतरी एक चालला होता हि वाट
मग ते चालणं तेवढं माझं रहात नाही

रस्ता रुंद करणं सोपं आहे, त्यात आखलेली असते मूळ दिशा
नवे रस्ते शोधायला आता नवी ठिकाणे उरली आहेत का
काढून झालेत इतके स्तर अस्तित्वाच्या कोड्याचे
आता गाभ्यालाच लागतोय धक्का
कुरतडून ठेवल्यायेत सार्याच श्रद्धा, तार्कीकतेच्या बोथट सुरीने
आपला तर्क हाही विश्वासच असतो, केवळ उघड्या डोळ्यांवरचा

मीच असेन एवढं अनाकलनीय कोणालाही
मी कसा कोणाला समजू शकतो
असा निर्मनुष्य बेट असताना माझं
संवांदांची एवढी जाळी का सभोवती

का स्वीकारत नाही आपण आपली अपूर्णता
का सोडवू पाहतो आपण यच्चयावत कोडी अर्ध्या-मुर्ध्या गृहीतकांवर

का इतके शब्द उधळतायेत चौफेर
खूप झालंय का पिक का लिहिणं सोपं झालंय
इतका भरभरून सापडतोय का अर्थ का
लिहिणारा दंगलाय प्रतीबिम्बात

अर्थ पोचवता यावा कमीत कमी नुकसानीने म्हणून शोधले होते शब्द
आता अर्थ गृहीत धरला जातो शब्दांत

होत जाणारे नवीन काही दिवेसेन दिवस कठीण
जुना होणारे माणसाचा इतिहास तितकी
भव्य होणारेत जुनी झाडे
आणि नवीन झाडांचा प्रकाश आधीच अडवला जाणारे

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...