Tuesday, January 11, 2011

प्रिय मी,

प्रिय मी, 
तू काय करतोयेस असं प्रश्न पडल्याने आता असे पत्र पाठवण्याची वेळ आली आहे....
                     तू वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून अस्वस्थ वगैरे होतोस, आणि मग पुस्तकांच्यात वगैरे डोकं
खुपसून वर्तमानपत्रातल्या प्रश्नंची उत्तरे शोधू पाहतोस....
त्या वर्तमानपत्रात असणारा वर्तमान केव्हाच पळवला गेला आहे, आणि तिथे मायावी भविष्यकाळ पुरवला जात आहे
वर्तमान म्हणून.... लख्ख उजळ किंवा गडद अंधारा....
ज्यांच्या बापाने स्वतःच्या पायाने चालणं सोडून कित्येक वर्षे झाली आहेत आणि जे छान सोनेरी पाळण्यात जन्मले होते,
ज्यांच्या वाटा आणि त्यावरची संकटे गोष्टीतल्या राजकुमार-राजकुमारी सारखी होती तेच आता
रस्त्यांवर चालणाऱ्या आणि पाऊलभर सावली जपून ठेवणाऱ्या लोकांच्या आयुष्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढतायेत....
त्यांच्या भरपेट ढेकरांमध्ये कसे तुला अदृश्य आयुष्याचे आवाज ऐकू येतील?
पानोंपान अक्षरात दिवेसेन दिवस पिचत जाणार्या माणसांची स्वप्ने, तोकडे आनंद आणि अनंत अतृप्त इच्छा उमटत नाहीत....
त्या जगून पाहाव्या लागतात आणि त्यांचे वळच आयुष्याच्या वाटांना आकार देतात....
हे लिहिणारे, स्तंभ, सदरे आणि अग्रलेख ह्यांच्या चरबितला एक हिस्साही वितळणार नाही  डाळीची किंवा कांद्याची किंमत वाढल्याने...
जाहिरातींच्या बांबूवर तोललेले हे लोकशाहीचे स्तंभ आता इतके उंच झाले आहेत कि त्यांना दिसितीये समृद्धीची मठ्ठ सूज तेवढी....
बाबारे, व्यवस्था बदलायला व्यवस्थेच्या सुस्त बैलाला द्यावा लागतो एक निष्पक्ष, निस्पृह रट्टा..
हे हस्तिदंती मनोरे त्या बैलांवरची गोचीड, ते प्रेमळ चावेच घेणार... आणि बैल सहज विसरून जाणार....
   जाऊ दे, विषयांतर झालं.... तुला पडलेल्या 'आपण का जगतो आहोत' अशा घनघोर प्रश्नांबाबत कळलं....
   पूर्वीही असे प्रश्न पडत....आणि अशा प्रश्न पडणाऱ्या येडझव्यांकडे माणसे पहात कौतुकाने....
   आता असे प्रश्न पाडू नयेत याची तजवीज करतात पार आधीपासूनच....आणि पडला तर डबल डीजीट बर्फी खाऊ
घालून पार सुस्त करतात....पोट भरलं कि प्रश्न गार पडतातच.....
तर लक्षात घे.... धोपट मार्ग सोडू नको....मार्ग धोपट, पैसा चौपट....
अगदीच थांबली नाही प्रश्नांची मळमळ तर जात, धर्म, इतिहासाच्या उत्थानाचे झेंडे घे खांद्यावर....
शहामृग बन भूतकाळाच्या वाळूत डोकं खूपस....पण भाऊ, जे चाल्लय ते काय असं विचारू नकोस.....
तुझा प्रश्नही ते सहज विकत घेतील, तुला शाल-श्रीफळ देऊन करतील आपल्यातला एक आणि मग
हळूहळू तुझ्या प्रश्नांकडे न मरणाऱ्या म्हातारीची बडबड जसं कोणीच ऐकत नाही तसं कोणीच ऐकणार नाही....
जग....हळूहळू मजा येतेच....
अरे राजा....स्वार्थच खरा अर्थ आहे... आणि स्वार्थाच्या टोकाला परमार्थ म्हटले जाते....केव्हा कळणार तुला, आता २५ वर्षाचा होशील...
छान रहावं, गाड्या वगैरे घ्याव्यात, चर्चा कराव्यात चकण्याच्या डिश उडवत आणि देणगी द्यावी एक स्मरणार्थ....
तेवढाच असतो वाटा आपला....उगाच मोठ्या बदलांच्या दिवस्वप्नांवर आपले आणि इतरांचे जीव वाया घालवू नयेत....
देव तुला सदबुद्धी देवो आणि तुझ्या वडलांना गुंतवणुकीवर १८% रिटर्न्स....
तुझाच....


ता.क. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी धमाकेदार आवाजच करावा लागतो असं भगतसिंग वगैरे कोणी म्हणून गेला होता

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...