Sunday, September 26, 2010

यार...

इथे आलो तेव्हा संध्याकाळ कधीच ढळून गेलेली. मित्रांसोबत गप्पात रंगलो तेव्हासुद्धा एका कोपर्यात कधीही वेडसर होणारा एकटेपण ढुश्या मारत होतं. अर्थात आपलं पैसा जात नव्हता खाण्या-पिण्यात, बस मित्राची बडबड ऐकून घ्यावी लागत होती. आणि तेही बरोबर आहे म्हणा, ते माझी वटवट सहन करतात, मला पार्टी देतात, या सगळ्याचा कृतज्ञ म्हणून ऐकलच पाहिजे. किंवा तिथे आहोत असं भासवून आपल्या भोवती न दिसणाऱ्या तंतूंचा एक जग विणत राहिलं पाहिजे, मध्ये मध्ये हसून, एखादी कोटी करून असणं निभावून नेलं पाहिजे. समोरच्याची स्वप्नं पुरी होत असल्याच्या जल्लोषाची मैफिल आहे ही दोस्त, तिथे आपण एक रिकामी जागा भरली पाहिजे, दोन पेग रक्तात मिसळल्यानंतरच्या उष्ण सुखद धुंदीत आपणही एखाद्या अप्रप्याला स्पर्श करून पाहिलं पाहिजे. उद्या जग येईल तेव्हा जे जाणवेल ते जाणवेल, आत्ता तरी आपल्या आतली रिकामी जागा स्वप्नाच्या क्षणिक फुलोर्याने विसरली पाहिजे. आणि मग मित्र निघून गेल्यावर विरळ माणसांची एक लोकल पकडून इथे समुद्रापाशी येऊन बसला पाहिजे. इथल्या वाळूत उरलेल्या रेघात आधी असणारी जिवंत सळसळती बोटे, ओल्या वार्यावर उडणार्या केसांना सावरणारे हात, दूरच्या दिवांच्या तलम धगीवर शिजत आलेले संवाद या साऱ्यांपासून सांभाळून बसलं पाहिजे एका अस्पर्श कोपर्यात... एकही आठवण आठवायला नको या आधी इथे आल्याची....आणि आली तरी केवळ तोंडओळख असलेल्या माणसाकडे फक्त हसून पाहून आपण आपला रस्ता धरतो तसं पुढे जाता आलं पाहिजे....
पोकळ आहे यार जगणं आतून... हे असे पुस्तकांचे, सिनेमांचे, कवितांचे, जगाबद्दलच्या बाष्कळ शुष्क कुतूहलांचे त्यावर चढलेले पापुद्रे...ही समृद्धी नाही यार... हे एखाद्या जीर्ण घरात डागडुजी करून रहावं तसं आहे...घर सोडून बेघर होता येत नाही म्हणून...आपल्या अगदी जवळच्या माणसाचाही सारांश काढता नाही येणार आपल्याला, त्याच्या अशा चार छटा राहतात ज्या आपल्याला पटत, समजत, उमजत नाहीत. मग आपण ज्यांच्या आयुष्यातला एक नेमका दिवसही नाही आहोत अशा असंख्य आयुष्यांचा काय अर्थ लावणार? एखादा प्रश्न जेव्हा सुटत नाही ना खूप दिवस, तेव्हा एक तर तो प्रश्न तितका थोर कठीण असतोच किंवा त्याला आपल्या अर्थाच्या जाळीत सापडणारे उत्तर नसतंच.... ही माणसे अशी का वागतात, पिसाळतात, पाळीव बनतात, लाचार बनतात, स्वार्थाच्या टोकांना जातात, स्वतःला फेकून देतात, आपल्या पुरतंच कुंपण उभारतात, दुसर्याच्या जगण्यात बदल करायच्या ईर्ष्येने झपाटतात, स्वतःला लांघू पाहतात, जगण्याच्या फडताळातला अंधार स्पष्ट करू पाहणारी तत्वज्ञाने उभारतात, आणि मग त्यांचीच तोकडी चादर जिकडे तिकडे ओढू पाहतात. का? याचं उत्तर आज नाही, मागच्या हजारो वर्षाच्या प्रयत्नांना नाही, मग? नसेल उत्तर असं मानलं तर? एक ना एक दिवस येईल उत्तर म्हणून आपण आजच्या अपुर्णतेवर समाधान मानतो, जुगार खेळतो उद्या उद्याच्या अनिश्चिततेवर...आणि हळूहळू पोकळ होत जातो आपल्या केंद्राशी, समोरच्या अपार कंटाळ्याला ढकलायला किडूक-मिडूक धास्त्या आणि त्यांचे किडूक-मिडूक आनंद बनवतो, स्वतःला बेमालूम फसवायला शिकतो आणि झिजत जातो आतमधून...
स्वप्न हवं यार... आणि एका कोवळ्या क्षणी ते सहज पापण्यांवर उतरून जावं... त्याच्या आतुर बोलावण्यावर आयुष्य ओघळून जावं...स्वप्न शोधत नसतात यार...ते रुजून यावा लागतं शिंपल्यात येणाऱ्या मोत्यासारखा....आपल्या शिंपल्यात तो स्वातीचा थेंब अलगद यायला तेवढी एक जागा हवी....
शोधून सापडेल आपलं स्वप्न एवढा दम धरवत नाही आता... अशा शोधानार्यांचीही एवढी गर्दी इथे आणि नंतर त्यांच्या अंदाजे जगण्याचे वरवर कलाबुती पण आतून भयाण कोपरे... असं एक नको यार... त्यापेक्षा खिशात एखादी कविता ठेवून रस्त्यावरचं बेवारस प्रेत होण्यात जास्त मस्ती आहे दोस्त.... हे दुसर्याच्या आयुष्याचे, त्यांच्या नजरेला गवसलेल्या बिलोरी क्षणांचे लोलक लावून मला नाही सजवायचं आपलं आयुष्य,,,अशाने येणार्याला दिपवून टाकता येतं, संदर्भांच्या आतषबाजीने थोडावेळ उजळूनही निघता येतं, पण आपल्या गाभ्याशी असणारा अंधार आपणच जळत उजळायला लागतो.... ती ठिणगी कुठून आणणार? दुसर्यांच्या दुखांच्या शेकोट्या उब देतील एकटेपणाला, पण त्याने आपलं दुख पेट नाही घेत....
चल सोड, बस इथे... ही पश्मिनी रात्र सारं कवेत घेते, हा लाटांचा आवाज सार्या गाण्यांना छेडून उरलेल्या शांततेचा... ह्या वार्यातला स्पर्श, आपल्या माणसाच्या सारं जाणणाऱ्या स्पर्शासारखा... किती वेळ ह्या अपूर्ण शब्दांच्या असंबद्ध दुनियेत धडपडणार दोस्त... किती वेळ...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...