Friday, September 24, 2010

नको पाठवू असे कितीदा

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

कवयित्री - इंदिरा संत


एकदम हे पत्र वगैरे का आठवलं मला ते आठवत नाहीये, कदाचित तेच जी.ए. -सुनीताबाई वाचत बसण्याचं व्यसन असावं... पण ही कविता वेगळी आहे.... विशेषतः ३ रे कडवे 'शब्दामधूनी नको पाठवू अक्षरामधले अधिरे स्पंदन , नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण' आणि शेवट.... वाचायचे राहून जाते....


आपल्याला दुसरं माणूस काय म्हणून माहित असेल ह्याचं उत्तर बदलत चाल्लय... म्हणजे मी ज्यांच्याशी बोलतो असे कित्येक जण माझ्यासाठी फोन नंबर किंवा मेल आयडी एवढेच आहेत... प्रत्यक्षात भेटले तर कदाचित मी अडकेनच बोलायला... माध्यम समोरच्याकडे बघायचा नजरिया देतं कदाचित... किंवा ते माध्यमच एकूण त्या संवादाची identity बनून जातं

मला समोरासमोर बोलायचय लोकांशी... बोलताना त्यांचे डोळे, नाक, खांदे, बोटं पाहायचेत... कानात त्यांचे वेगवेगळ्या पोताचे आवाज ऐकायचेत... त्यांच्या खांद्यावर थाप मारायची आहे... किंवा आपल्या जगण्याचा सल सांगताना ओलावलेले डोळे पाहायचेत...

उद्यावर विश्वास नाही माझं... आजची तहान आज भागवावी ना... उद्याच्या पावसाने आजची तडफड कशी शमेल... निब्बर व्रण उरेल तिचा... उपहासाची एकटी धार असलेला...

माझ्या शब्दातला काल्पनिक माणूस नाही व्हायचं मला... किवा माझ्या शब्दांची सपाट सावलीही...

.

सार्त्र म्हटलाय एके ठिकाणी 'live your passions before you analyze them' .तुला असं वाटतं का कि एका अर्थाने आपण आपल्या आयुष्यातली माणसंही जगून टाकत असतो...किंवा जगत असतो.. समोरचा माणूस analyze करण्याजोगा झाला कि मला काहीतरी संपल्यासारखा वाटतं... समोरच्यात जितके न समजणारे आणि तरीही बोलावणारे कोपरे राहतात तितके गुंतून राहतो आपण त्या माणसात...आणि इतकी खोल माणसे काही ढीगभर मिळत नाहीत...खरतर आपल्या आयुष्यातले बहुतेक जण रंगीत घोटीव कागदांसारखे काही घड्यात उलगडतात म्हणा, पण नंतर सवयीने आपण त्याच त्याच घड्या बदलून , दुमडून नवं काही शोधू पाहतो...मग तसं काही नाही म्हणून कंटाळतो, चांगले राहायच्या ओझ्याने गिरवत राहतो ओळख... असं माणूस निघून गेला कि दुखावते ती सवय,मिळायचं, सापडायचं सगळं, जवळपास सगळं संपलेलच असतं...


मला सगळंच सांगायचं नाहीये तुला... एखादं पुस्तक कसं संपावं अस वाटत नसतं, मग ते पुरवून पुरवून वाचतो ना आपण... तसं मला आता पुरवत राहिलं पाहिजे आपलं बोलणं. मला लोकांना हात हलवून कोरड्या चेहऱ्याने निरोप द्यायचा ना जाम कंटाळा आलाय... पण तू जर माझी पूर्वीची पानं चाळलीस तर तुला माझं माझ्यांतर्गत होणारं विस्थापन जाणवेल...


Ignorance is bliss म्हणतात ते एकदमच खरय. कळलं कि कंटाळाही येऊ लागतो. कळायला सुरुवात झाली कि हे सगळं संपणार हेही कळतच.. ठाम रोवून ठेवलेल्याखूणेसारखा..


शेवटी मी कोणाशीही बोलतो ते एखादा गर्दुल्ला नशा विकत घ्यायला तडफडतो तसंच... बोलत राहण्याची सवय, मग व्यसन असं झालंय... अगदी स्वतः स्वतःला सांगतानाही मी शब्द वापरतो...दुकानदाराने घरातले किराणा सामान दुकानातून विकत घ्यावे, पावतीसकट तसं...

पत्रही तेच... मला सलग बोलायला एक स्पेस उभी करणं, आणि मग त्या स्पेस मध्ये असण्या-नसण्याची एक आभासी दुनिया विणत जाणे, .... त्या पत्रात गहिरं काही नाही, लीपिरेषांची जाळी नाही, अक्षरांचा ढीग, त्यावर वाढलेले खुरटे गवत.... वाचणारा म्हणजे अगदी आपलं प्रतिबिंब असावा असं समजून लिहित जाण्यात काय होत असेल? वाचणार्याला कळतच नाही, हे कोणाला लिहिलंय नेमका, का चुकीच्या पत्यावर आलंय...

स्वतःच्या दुखाचे अक्षांश-रेखांश बदलले म्हणजे लेखक होता येतं... आणि स्वतःचं सांगणं कोण एकाला न सांगता कागदावरून किवा कसंही करून अंतराळात प्रसारित केलं कि ते वाचता येतं... कारण मग त्या दुखाशी जोडून घ्यायची, त्याला प्रतिसाद द्यायची सक्ती उरात नाही... काय सोय आहे असं लेखक होण्यात... किंवा वाचक होण्यात... पण पत्र वगैरे लिहू नये... किंवा बोलायला जाऊ नये कोणाशी... आपल्या दुबळ्या सांध्यांना आधार द्यायला इतरांच्या असण्याच्या कुबड्या का हो...


सोकावत जातो ना आपण जसे जसे संपलेल्या अनेक संवादांचे सांगाडे आपण स्मरणाच्या काळोख्या दरीत ढकलून देतो... मग नव्या माणसाशी बोलताना आपण अदमास घेत राहतो... लांबवू पाहतो कंटाळा किंवा संपूर्ण उलगडणं...अनेक धागे ठेवतो अस्पष्ट लोंबकळत ... आणि अनेक नाद उमटणार नाहीत याची दक्षता घेतो... निरोप देत नाही पण बोलवतही नाही कुणाला...

तुटण्याच्या वेदनांना इतके घाबरतो आपण... जोडले जाण्याचं विष भिनूच देत नाही पुरते...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...