Sunday, September 12, 2010

पुनरागमनाय च

समोर दीड दिवसाच्या गणपतीची उत्तरपूजा चालू आहे. मागची काही वर्ष मनातली श्रद्धा खुरटून सुकून गेली आहे. कुणा एका नावावर, मूर्तीवर, मंत्रावर श्रद्धा उरलेलीच नाही. तरीपण अजून पार बुडखा साफ झाला आहे असं वाटत नाही. श्रद्धा ओरबाडली गेली तरी विश्वास कोसळलेला नाही. 'हेची दान देगा देवा' ऐकताना हा देव आहे का नाही हा प्रश्न डाचत नाही, तर तो असेल किंवा नसेल त्याच्याकडे सारं काही सोडायचा अन सारं काही मागायचा आर्त विश्वास जाणवतो. पंढरपूरला जावसं वाटत नाही, पण त्या विठलापायी वेडावलेल्या संतांच्या भक्तीला, रूढार्थाने केवळ दुख मिळत असतानाही त्यालाही 'बरे झाले देवा' म्हणण्याच्या घट्ट रुजलेल्या विश्वासाचा नवल वाटतं. आता उत्तरपूजा संपेल, परडीतली फुले समोरच्या गणेशाच्या मूर्तीवर वाहिली जातील, आणि शब्द उमटतील, 'पुनरागमनाय च' ..... विसर्जित हो नाही, जा आत्ता पुरता, परत येण्यासाठी....
दुख थेट पत्करतच नाही आपण. लहान मुलाला घरात कोणाचा मृत्यू झाला कि त्या मृत्यूची आडवळणाने ओळख करून दिली जाते. देवाघरी म्हणजे कुठे तर खूप लांब, आकाशात, किंवा अशा ठिकाणी जिथे काही दिवसांनी सगळेच परत एकत्र येणारेत. घरातून बाहेर पडताना, आपल्या किंवा दुसर्याच्या, येतो म्हणावा, जातो नाही हे शिकवलं जातं. का? तर म्हणावं असं. जे एक अटळ सत्य आहे तेवढं टाळून बोलायचं. 'जगलो वाचलो तर भेटू' असं म्हणून जर सगळे एकमेकांचा निरोप घ्यायला लागले तर बघा कसं वाटेल. आशेचा गळ लावून ठेवला कि मृत्यूची थंडगार भीती जरा रोडावते. मृत्यू वगैरे तर बराच मोठा प्रकार झाला. समजा पाहुण्यांकडे गेलो आणि पहिल्या क्षणी असा विचार मनात आला कि दोन दिवस जातील खरे मजेत इथे, पण मग यांचा निरोप घ्यायचाच आहे, मग ते दोन दिवस तरी मजेत घालवता येतील का. संपण्याची जाणीव तीव्र आणि धारदार आहे, एकदा ती उमटली मनात कि जेवढा वेळ ती रहाते तेवढा वेळ सारं रिकामं करत जाते. थेट न बोलतं, चर्चा न करतासुद्धा आपण कायम मरणाची, स्वतःच्या किंवा आपल्या जिवलगांच्या, जाणीव जवळ बाळगून असतो. म्हणून तर आपण विमा उतरवतो, नोमिनीज देतो आणि कुठे कुठे हात जोडत राहतो.... जेव्हा केव्हा ते होईल तेव्हा ते होईल तेवढा सुसह्य व्हावं, किंवा त्याचा विचार न करता आपण सरकत जातो.... त्याच अटळ टोकाकडे
जर माणसाला आशा ठेवणं माहीतच नसतं तर शेवटाच्या जाणीवेने जाणवणारा कोसळलाच असता. आशावाद सारं संपणारं आहे, क्षणभंगुर नसेल पण नाशिवंत आहे ह्या स्वच्छ जानिवेतच जन्माला येतो. 'even this will pass' हे न समजत उमटणारी आशा ही फारसा भक्कम पाया न बांधता उभारलेल्या इमारतींसारखी आहे. एखादी वावटळ आणि मग आयुष्यभराची काजळी. पण एका क्षणी हे सगळं मिटेल हे जाणवूनही जेव्हा जगावंसं वाटतं तेव्हा 'कशासाठी जगायचं' जी असहाय्य व्यर्थता किंवा वैफल्य घेऊन जगताच येणार नाही. असं वैफल्य एका बेसावध क्षणी स्वतःच्या चिंधड्या उडवूनच संपेल. अर्थात वैफल्याच्या एवढ्या टकमक टोकालाही कोण जातात? अनेकांना अशी जाणीव होत नाही हे चांगलंच आहे, नाहीतर आयुष्यभर सुतक पालानार्यांची एक मोठी जमात जन्माला आली असती. अनेकांना हे जाणवत नाही ही त्यांची कमतरता नव्हे, तर देणगीच. म्हणून तर दीड दिवसासाठी का होईना लोकांनी मातीची एक मूर्ती घरात आणली नसती, तिच्यात प्राण उतरले अशी समजूत करून घेतली नसती, आणि मग डबडबल्या डोळ्यांनी तिला पाण्यात सोडताना 'पुनरागमनाय च' असं म्हटलंच नसतं.
पण हे सारं संपणार जरी असेल तरी एखादं धुंद क्षण असं असेल कि आयुष्य केवळ क्षणांचा गुंता किवा सरळ दोरा उरणार नाही. त्या आयुष्याची वाट करून त्याला उजळत संपवणारे एखादे बेभान वेड त्याला लागेल आणि मग हे सगळं असो किंवा नसो, त्या धुंदीत उरणं एवढा एक सरळ सोपा हिशोब राहील. मुळात काही संपेल ही जाणीव जास्त कुरतडते, त्रागा करायला लावते, पण तो कोसळीचा क्षण झाला कि तितका काटेरी वाटतच नाही. एक कोरडेपण तेवढं रहात. त्या कोरडेपनापेक्षा इतर सार्या जाणिवांच्या पार घेऊन जाणारे काही एक ना एक दिवस समजेल ही आशा का वाईट?
ती आशा आहे म्हणून ही लक्षावधी माणसे जेवढा वेळ आहेत तेवढा वेळ जगू पाहतायेत. स्वप्ने पाहतायेत, कोसळत, पडत-झडत चालत राहतात. ही दुर्दम्य आशा टिको, वाढो, आणि एखाद्या क्षणी ती संपली अशी वाटेल तर कोणीतरी पुन्हा म्हणो, 'पुनरागमनाय च' .

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...