Tuesday, September 14, 2010

मी मलाच सांगितलेली एक कविता



समुद्रावर जाऊन उभं रहावसं वाटतंय...
आता कोणीच नसेल समुद्राजवळ... लाटा निवांत येऊन किनार्याच्या खांद्यावर आपलं मन मोकळं करत असतील
थंडगार वारा वाळूवर त्याने वाहून आणलेल्या कविता उमटवत असेल आणि एका वेडसर क्षणी सारं पुसूनही टाकत असेल..
चांदणं झिरपत असेल ओल्या वाळूत, परतणाऱ्या लाटांत, ओलसर झुळूकीत
मंत्रमुग्ध करणारा मंद हळवा प्रकाश...
मागच्या निर्मनुष्य रस्त्यावर एखादं क्षण येणारी अस्तिवाची खूण
नाहीतर सारंच तरल, नितळ, स्तब्ध आणि म्हणून शब्दांत न येणारं
मी आहे का नाही याचाही प्रत्यय न यावा...
पावलांना स्पर्शत जावं पाणी..चांदण्याच्या प्रतीबिम्बांचे भासस्पर्श
समोरच्या क्षितिजाच्या काजळरेषेवर थांबलेले काही प्रकाश...

ये धूप किनारा शाम ढले,
मिलते हैं दोनो वक़्त जहाँ,
जो रात ना दिन, जो आज ना कल,
पल भर को अमर, पल भर में धुआं

विरघळत जावं या आरस्पानी जाणीवेत....
अगदी आपणही आपल्याला काही सांगू शकणार नाही अशा शांततेत

स्वतःला उलगडणं एवढं सोपा नाहीये प्रश्न...माझा असणं म्हणजे माझ्या भोवतालच्या या लक्षावधी माणसांचा असणं
अस्तित्वाचा अर्थ लावायचा म्हणजे केवळ माझ्या एकेरी अस्तिवाचा नाही
क्षणी विस्मित करणारी, क्षणी गुदमरवून टाकणारी एकमेकांच्या असण्याची ही पिंजण
तिलाच उलगडायचं आहे...

कोणाच्याच मनात डोकावून बघता येत नाही...
उमटलेल्या कृती किंवा शब्दांतूनच अदमास घ्यावा लागतो...
दुसरं माणूस समजणं म्हणजे त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या मनावर उमटणा..एकाही हेलाकाव्याशिवाय
आणि अशा असंख्य प्रतीबिम्बातून काही गवसेल सांगता येत नाही...
कदाचित काहीच नाही...हे सारं का आहे कारण आहे म्हणून एवढंच एक गोल गोल उत्तर
कुत्रा, मांजर, चिमणी, पोपट, वाघ, बकरी, घार आणि माणूस
का माणूस, फक्त माणूस
तो, ती, ते, बाकीचे म्हणून मी का मी, फक्त मी
प्रश्नांचं वाढत जाणारा वारूळ...

का माणसे एवढं काही सांगत जातात एकमेकांना,
स्वतःच्या असण्याच्या एवढ्या खुणा निर्माण करतात
इतिहासाच्या पानांत वर्तमानाची कारणीमिमांसा करू पाहतात
भूगोलाच्या स्थिरतेवर आकांक्षांची नक्षी कोरु पाहतात
आणि मग हरप्पा बनून मातीत जातात...

एका कवी म्हणे कविता लिहायचा आणि ठेवून द्यायचा
तो मेल्यावर सापडल्या कविता...याचं अर्थ म्हणे त्याने केवळ स्वतःसाठी लिहिलं
स्वतःसाठी लिहिलं तर स्वतःच्या मनावरच का नाही लिहिलं
त्याच्यासोबत त्याच्या कविताही मिटल्या असत्या
एक खूण ठेवायची असते...एक संवाद साधायचा असतो...
माहित नसेल पण एक तीर गाठायचा असतो...

हे सारे शब्द, माहिती, संदेश, अर्थ, प्रतिमा, संकेत...
कशासाठी...
कोण कोणाला काय सांगतंय नेमकं
का सांगणारा शोधू पाहतोय स्वतःलाच
कारण स्वतःच्या आत त्याला बघतच येत नाहीये....

म्हणून ह्या गर्दीत पळतयेत का सगळे..
कि एक दिवस ते टोक गाठता येईल...

जाऊ दे... गेला तो दिवस... सगळे निवांत झोपले आहेत...
येणाऱ्या उद्याच्या आशा-निराशांचे असंख्य तंतू
एकमेकांना द्यायच्या घ्यायच्या अगणित शब्द अन अर्थांच्या आधी
उरलेल्या या निवांत शांततेत पाहून घेऊ दे माझंच मला
आणि मग शब्दांच्या पार घेऊन जाणारी एक लाट
येऊ लागलीये चांदण्याने अधोरेखित क्षितिजापासून
तिच्यात सामावून जाऊ दे
अलवार जाणीवेच्या या क्षणांचे निर्माल्य
मी मलाच सांगितलेली एक कविता बनून

(
प्रतिमा सौजन्य http://www.panoramio.com/photo/१८१२४९५ )

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...