Tuesday, June 29, 2010

मिणमिण

गर्दीच्या लोंढ्याबरोबर अपोआप तो स्टेशनावर उतरला. ह्याच्याआधी अनंत वेळेला आलेले त्याप्रमाणे का आपण असे चिलटसारखे जगतो आहोत असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने आता अगदी ताबडतोब येणारा विचारांचा ताफा रोखला आणि गर्दीत सामील होत, पाकीट आणि मोबाईल सांभाळत तो चालायला लागला. पडत्या पावलांबरोबर त्याचे विचारही लय पकडू लागले. जाऊन कोण कोण मित्रांना भेटायचे आहे हे तो ठरवू लागला. स्टेशनाबाहेर जाणार्या जिन्यावर खूपच माणसे एकवटली होती. आणि सगळ्यांना आधीच बाहेर पडायचा होतं. तो सावकाश गर्दीच्या कडेला उभं राहून रेटारेट करणाऱ्या माणसाना पाहू लागला. एक वृद्ध जोडपं कडेकडेने पुढे सरकू पहात होतं. एका बाईने तिच्या आजारी आणि मंद मुलाला खांद्यावर घेतला होतं आणि हतबलतेने समोरच्या माणसांकडे पहात ती उभी होती. त्याला परत उबल्यासारखा वाटायला लागलं. त्याच्या बाजूने एक ऑफिसहून आलेला त्याच्या एवढ्याच वयाचा तरुण कानात हेडफोन दाबून आणि मग्रुरीने त्याला धक्का देऊन पुढे गेला. त्याला खेचून, हिसडून जरा बाचाबाची करावी असं वाटलं, पण तळवे घामेजण्यापलीकडे तो डंख फार टिकला नाही. मग फॉर्मल कपडे घातलेलं एक विवाहित जोडपं त्याच्या समोरून जात होतं. ती पुढे चालत होती आणि तो मागून तिला सांभाळत जात होता. तिच्या कपड्यातून दिसणाऱ्या कमनियतेकडे काही वेळ तो पहात राहीला, मग त्या दोघांच्या मागून चालणारा एक मध्यमवयीन माणूस असाच तिच्याकडे बघतो आहे हे पाहून त्याला स्वताची किळस आली. अजूनही... अजूनही असे आपण का बघतो असं प्रश्न त्याला पडला. मग त्याने तेवढ्यात बिथरू पाहणाऱ्या मनाला शांत करायला सुरुवात केली. गर्दी थोडी कमी झालेली. ती हतबल बाई चालू लागली होती, म्हातारे जोडपे टोकाशी पोचले होते. त्यानेही होईलतितकं अंग चोरत पण वेगाने पुढे जायला सुरुवात केली.
स्टेशनाबाहेर अंधार होता. आणि मागचे २-३ दिवस झालेल्या पावसाने सगळी चिखलाची रिपरिप होऊन गेलेली. रिक्षा मिळताच नव्हत्या. ज्या होत्या त्यात जे होते ते सगळे अटीतटीने चढत होते. एका ४० एक वर्षाच्या सुखवस्तू जाडसर बाईने समोरच्या थोड्या नेभळ्या तरुणाला ढुशी देत रिक्षाची कडेची सीट मिळवली. तो तरुण ह्या आकस्मिक हल्ल्यात बावरून त्या बाईकडे अन्यायाची दाद मागणाऱ्या काकुळ नजरेने पाहू लागलं. ती बाई आत जाऊन, 'काय बाई गर्दी आणि त्यात हे लाईट गेलेले' असे उस्कारे टाकत वितभर रुमालाने वारा घेऊ लागलेली. ह्यात उतरून पराक्रमाने रिक्षा मिळवण्यापेक्षा चालत रस्ता पकडावा ह्या विचाराने त्याने, त्या नेभळ्या तरूणापाठोपाठ चालायला सुरुवात केली.
भाजीवाल्यांचे आवाज, सडलेल्या भाज्यांचा वास, गाड्यांचे होर्न, माणसांचे संवाद, भजी, वडे यांच्या तळणाचा उद्दीपक वास, कडेला बसलेले गर्दुले, चेहरा रंगवून उभ्या असलेल्या वेश्या असं सगळं पहात तो चालत होता. त्याच्या पुढच्या नेभळ्या तरुणाने त्या अंधारात उठून दिसणाऱ्या रंगीत चेहेर्यांकडे क्षण- दोन क्षण पाहिलं आणि मग एकदम पुढे बघत तो निघून गेला. त्या बायांकडे बघून त्याला कामाठीपुर्यात जायचा आजवर अधुरं असलेला प्लान आठवला. मग परत मगाशी आली तशी स्वतःची किळस त्याला आली. अजून आपण असे वासनांचे गुलाम आहोत असं उदात्त वाक्य त्याच्या मनात यायला लागलं. पण त्याचवेळी 'ह्यात काय चूक आहे? मागची १०-११ वर्षे जे शरीरात सळसळता आहे त्याला प्रतिसाद दिला तर काय चूक? ' असा प्रतिस्पर्धी विचार आणि त्यासोबत तिथे गेलं कि नेमकं काय असा तपशीलही त्याच्या मनात यायला लागला. त्या बाया मागे पडून आता तो एका गल्लीतून जायला लागलेला. त्याच्या पुढे २ मुली लो वेस्ट जीन्स आणि शरीराच्या वळणाना तलम स्पर्श देणारे टि-शर्टस घालून चालल्या होत्या. त्याने त्यांच्यावर थोडीही न संकोचता नजर फिरवायला सुरुवात केली. अशीच खेचावी का एखादीला? निदान या अंधाराचा फायदा घेऊन त्यांना कुस्कारणारा स्पर्श तरी करावा का? आणि मग एकदम भोवळ यावी तसे हे विचार गळून तो नुसताच चालायला लागला. यातली पुरुष म्हणून असणारी नैसर्गिक स्त्रीची ओढ किती आणि मागची १०-१२ वर्ष पाहिलेल्या, वाचलेल्या कथा आणि सिनेमांच्या कान्डीशानिंगचं भाग किती असं आता एकदम त्याला वाटू लागलं. म्हणजे हे काय आजच वाटतं नाहीये. त्याला एका क्षणी असं वाटण्यात काही गैर वाटलं नाही. मनात काहीही येवो, आपण असं काही करत तर नाही ना असं उत्तेजनार्थ बक्षीसही त्याने स्वतःला दिला. पण असं वाटतंच का? माजावर आलेल्या बैलासारखा येईल त्याला शिंगांवर घ्यावं, मनसोक्त चरावा , आणि मग जुगावं असं सणसणीत पाशवी भाव त्याला जाणवू लागले. त्या रस्त्याच्या मधोमधच आत्ता कोणालातरी गचांडी धरून बुकलवा, आपणही चार ठोसे खावे, मग कोणीतरी येऊन त्या जखमांवर फुंकर घालणारा स्पर्श करावा आणि मग..... मग काय? बस १५-२० मिनिटांचा बेभान वेळ, मग एक अनोळखी गर्ता, मग शरीरात अडकून पडलेल्या स्वतःचा झिडकार, हेच, हेच ना? मान खाली घालून तो चालू लागला. त्याला आता 'कोसला' आठवत होता. ''ती गेली. तिच्याबरोबर तिचे इवलेसे गर्भाशय गेले. खानेसुमारीची एक मोठ्ठी ओळ वाचली.' हे डोक्यात गेलेलं वाक्य त्याला आठवलं. आपणही असे आधीच मेलो असतो तर अशा रेताड, वांझ विचारांची भुणभुण तरी वाचली असती असं वाक्य त्याला वाटू लागलं. अशी वाक्य वाटण्याचा त्रास त्याला बरेच दिवसापासून वाटत होता. म्हणजे काही वाचलं कि तीच फ्रेम घेऊन जगाचा अन्वयार्थ लावायचा. सगळं दिसणं आणि असणं त्यात कोंबून भरायचं. वाक्य मनात घोलावयाची. आठवायची. सांगायची. लिहिणार्यांच्या आणि स्वतःच्या आयुष्यात बादरायण संगती जोडायच्या. आणि मग काही दिवस कुठलंच पुस्तक किंवा सिनेमा पाहणं थांबवायचा. म्हणजे आपण दिवसेंदिवस त्याच एका चक्रात फिरतो आहोत. जितके बाहेर येवू म्हणतो तितके नव्या नव्या प्रकाराने अडकतच आहोत. स्वतःशीच बोलायचं, स्वतःचाच आवाज ऐकायचा आणि अर्थात सभोवतालचा जो काय येईल तो आवाज आणि कशावरही अर्थाचा रंग फसायचं नाही असा बेफाम निश्चय करून तो समोर बघून चालायला लागला. खरा म्हणजे त्याला आता एकदम सात्विक वगेरे वाटू लागलं होता, गीतेतल्या काही ओळी वगेरे आठवत होत्या. पण असं काहीही वाटणं कृत्रिमच आहे असा ठाम फटकारा देऊन तो परत एक निर्विकार बघणारा व्हायचा प्रयत्न करू लागला. आता नवीनच प्रकार त्याच्या डोक्यात सुरु झाला. समोर जे दिसेल ते तो जसं काही मनातल्या मनात जोराने बोलत होता. मग असं स्वतःलाच सांगताना शब्द हवेत कशाला असं वाटून तो थेट अनुभूती अनुभवण्याचा थोर प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात तो थकला.
बाकीची माणसा कशी काही ना काही उद्दिष्ट घेऊन चालत आहेत. त्यांचा त्यांचा संसार चालवणं हि एक फार मोठी कलाच त्यांना जमली आहे. त्याला पण एकदम कर्ता पुरुष वगेरे व्हावा असं वाटू लागलं. अगदी पै-पै करून पैसे वाचवावेत, घरी जाताना काही घेऊन जावं, इकडे तिकडे पैसे गुंतवू लागावेत असं एकदमच घरगुती त्याला वाटू लागलं. आणि कितीही आखूड वाटलं तरी असं आपल्या माणसाना धरून राहणं हाच की तो खरा विरंगुळा इतपत सिद्धता त्यांच्या मनात येऊ लागली. या नवजात स्थिरतेत तरंगत असतानाच त्याचं लक्ष समोर चाललेल्या जोडीकडे गेलं. गर्दीचे धक्के वाचवताना त्याच्या अंगालाही स्पर्श होणार नाही अशी कसरत करत ती चालली होती. तिला गर्दीत नीट चालता यावं असं प्रयत्न करत, खरतर तिचं एखादं चोरटा स्पर्श मिळावा असं इरादा पण त्याचवेळी तिला ते आवडणार नाही अशा भीतीने अंग चोरत तो चालला होता. तेवढ्यात बाजूने असेच एक तो आणि ती असलेली बाईक जाऊ लागली. बाईक वरील ती त्याला बिलगून, एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून बसली होती. तो आपण या गर्दीतल्या अनेकांच्या हेव्याचे केंद्र आहोत ह्या सुखद जाणीवेत ऐटीत बाईक चालवत होता. तिचे गाल त्याच्या मानेला स्पर्श करत होते. मधेच ती काही कुजबुजायची आणि दोघे हसायचे. त्या बाईककडे बघताना चालणारे तो आणि ती एका क्षणी थांबूनच गेले. समोरून येणाऱ्या रिक्षेने होर्न दिला आणि तो बेसावधपणे चालतो आहे असं वाटून तिने पटकन त्याचा हात पकडून त्याला बाजूला खेचले. शहराल्यागत दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, तिने एकदम ओठात हसत आणि गालात लाजत मान खाली घातली आणि तिच्या अजून काढून घ्यायच्या राहिलेल्या दोन बोटांत आपली दोन बोटं अडकवून तो चालायलालागला.
नवजात सिद्धता केव्हाची ओघळून पडली होती. त्याला आता अगदीच एकटा वाटू लागलं. आणि हे एकटेपण ह्या अंगावर येत चालेल्या शहरात अगदीच रुतत चाललं आहे असं त्याला जाणवू लागलं. बाकी काही नाही, पण या गर्दीत बोट पकडून चालता येण्यासारखं, फोनवर बोलत राहण्यासारखं, किंवा शांतपणे सोबत बसता येण्यासारखं कोणीतरी असायलाच हवं एवढं एकच त्याला वाटायला लागलं. आणि असं कोणी नाही हाच एक आपल्या सार्या दोलायामानतेचा मुलभूत उगम आहे हे त्याने ठरवून टाकलं. पण मग आता हा उगम कशा प्रकारात संगम करावा असा प्रश्न त्याला पडला. आणि हे सतत प्रश्नच पडत आहेत, कारण आपण प्रत्येक प्रश्नाची साल सोलत त्यात नवे प्रश्न पाडून घेत आहोत असा अगदीच दारुण शोध त्याला लागला. आणि तो चालत राहीला खरा, पण हे चालणं आणि विचार हे दोन्ही कुठेही न जाणारे आहेतअसा शेवट त्याने करून टाकला.
गुंतून पडण्यासारखा काही यायला हवं होता. म्हणजे एखादं वाद्य, बोटात एखादी कला किंवा मग वेड्यासारखा गणित. म्हणजे जिकडे तिकडे ते वेडच फक्त. त्यात अर्थ आहे का नाही अशा नपुंसक तर्कीकतेपेक्षा करण्याचा निखळ आनंद का नाही? कशावर विश्वास नसण्याच्या अधांतरापेक्षा एखाद का होईना पण जुळलेला आणि विचारांनी न पोखरलेला धागा ठेवायला हवा होता. ज्याला प्रश्न विचारताच येणार नाही असं काही पण जे जाणवेल माझं म्हणून. लहानपणी संध्याकाळी खेळून घरी आला कि आईने लावलेल्या समईच्या ज्योतीकडे बघून कसं आश्वस्त वाटायचं, मग ती ज्योत रात्री विझण्याआधी फडफडताना दिसली कि कसं त्यात लगबगीने तेल घालायचं आणि मगती ज्योत परत तिच्या शांततेत तिच्या भोवतालचा इवलासा आसमंत निर्धाराने उजळून द्यायची.
तो घरापर्यंत पोचला. दारापाशीच बसलेल्या आजीकडे बघून त्याला अजून पिचल्यागत वाटलं. आजीचा चेहेरा मागे टाकत, चपला काढत तो सैपाकघरात पोचला. आई अजून आली नसल्याने अंधार होता. त्याने पायावर पाणी घेतलं. चेहेर्यावर पाणी मारलं. देव्हार्यात झिरोचा दिवा अशक्तपणे तेवत होता. त्याने समई घेतली. वातीवरची काजळी काढली. समईमध्ये तेल घातलं. समई देव्हार्यात ठेवली. काडेपेटी घेवून त्याने वातीपाशी काडी पेटवली. वात पेटली आणि क्षण- दोन क्षणात त्याच जुन्या सवयीच्या शांततेने ज्योत तेवू लागली. बाजूचा अंधार तसाच होता पण त्या तेवढ्याश्या एका कोपर्यात एक आश्वस्त स्निग्धता होती. काडेपेटी जागेवर ठेवून तो देव्हार्यासमोर आला आणि समोरच्या ज्योतीकडे बघत, मायाळू भूतकाळ आणि बोचाकारणारे येणारे दिवस यांच्या मध्ये उरलेल्या त्या ओळखीच्या प्रकाशाकडे पहात बसला.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...