Saturday, June 26, 2010

पुन्हा पावसालाच सांगायचे

हि शेवटचीच रात्र. ते दूर शहराचे दिवे चमचमतायेत. पाउस पडतोय, कधीच, आणि धारांच्या पडद्याआड दूरवर पसरलेलं हे शहर. पण हे माझं गाव नाही ग. मी ओळखत नाही इथे कोणाला. रस्त्यातून चालताना शोधत चालतो, तुझा चेहेरा, तुझ्या चेहेर्यावर माझ्यासाठी असणारी ओळख. तू खरंच ओळखतेस ना मला? मला प्रश्न पडतो हा आजकाल, म्हणजे इथे एक पक्षी मरून पडलेला काल, आणि मग झाडावर उगाच कल्लोळ होता कोणीतरी हरवल्याचा. त्यांना जाणवत असेल ना कोणी एक कमी आहे. पण कोणी येऊन थांबत नाही त्या मेलेल्या पक्ष्याच्या शवापाशी. फक्त उद्ध्वस्त हाका ऐकू येतात फडफडीत लपलेल्या. आणि संध्याकाळ उगाच अजून दाटत जाते.... ओळखतेस ना तू मला?
आणि गातंय कोणीतरी, का मीच गातोय? uncertain narrator झालोय मी. म्हणजे मी सांगतोय त्यावर नंतर माझाच विश्वास बसत नाही. मीच आधी लिहिलेल्या कविता वाचतो तेव्हा वाटतं हे लिहिणारा माणूस कुठे गेला? नदीचा काठ प्रवाहाने क्षरण होत जावा तशी झीज होतीये माझी, आणि तीही पार पेशी-पेशीतून. वरकरणी हसतो मी तसा, पण पोकळ होत चाललोय आतून. कुणाशीही बोललो कि थोडावेळ तिथेच थांबतो मी. दुसरं माणूस गेलं कि तिथे उरलेल्या आवाजांना कोणीतरी सांभाळायला हवं ना... आपलेच शब्द का कोणी इतके पोरके सोडतं ?
मोठा झाड होतं घरासमोर. उन्हातून जाताना हाक मारून सावलीत घेणारं. एक संध्याकाळी त्याला तोडायला सुरुवात केली. खूप घाव घातल्यावर झाड हलायला लागला, आणि मग त्याच्या फांद्यात, ढोलीत अडकलेले पक्षी उडायला लागले. आणि त्यांना माहीतच नव्हतं कुठे जायचय. फिरून तिथेच परतायचे. यायचे तोवर त्यांची घरटी तुटलेली असायची. मग आक्रोश त्यांचा. तेव्हाही पाउस होता. मग पावसात भिजणारे बेघर पक्षी मिळेल त्या आडोशाला थांबले, सकाळी झाड नव्हताच तिथे. त्याचं न उखडता आलेलं मूळ तेवढं उरलं होतं. आता खूप मोठा रस्ता आहे, धूळ आहे, आवाज आहे, झाडाची वाळली पानं आता अंगणात येऊन थांबत नाहीत, ना झुळूक येतेशीळ घालत. त्या पक्ष्यांचा आवाज तेवढा उरला आहे, कुठल्याच शब्दांत न लिहिता येणारा.
आठवणींचा तर केवढा तरी गोंधळ आहे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जाणवणार कि सकाळ काही खरी नाही, कुठेतरी आत्ता संध्याकाळ पण असणार. पाऊसही खरा नाही, कुठेतरी आत्ता नुसतंच कोरडं आकाश असणार. मग मी काखरा आहे? कुठेतरी अशी वेळ असणार जिथे मी नाहीच आहे? यात आठवणी कुठे आल्या म्हणा? पण, आता जे वाटतय ते एकदम पुढच्या क्षणी आठवण होऊन जातं ना?
जपून जगत असतात इथे सगळे. म्हणजे केव्हातरी हसतात, अगदी वेड्यासारखे... पण बहुतेकदा ते पहात असतात कि त्यांच्या सोबत जे आहे ते कसं टिकत राहील, वाढत राहील? मग त्यांना काही हसता येत नाही.
हे काही पत्र नाही तुला लिहिलेलं. आणि हा आत्मचरीत्रातला उतारा पण नाहीये माझ्या. हे काय आहे तेवढं विचारू नकोस....
सगळेच पुढे निघून गेलेत, आणि मी म्हटलं कि येतो मागून सावकाश. पण आता असं वाटतंय कि चालताना सोबत हवं कुणीतरी. नाहीतर एका जागी थांबलो काय, किंवा चाललो काय. कशाच्यातरी सापेक्षच एकूण हा जगण्याचा खटाटोप आहे. आता हे अगदीच philosophical होऊ लागलं. म्हणजे आपल्याच पायात प्रश्नचिन्ह अडकवून घ्यायचा प्रकार, आणि मग जिकडे जाऊ तिकडे प्रश्न, हे असं का, हे तसं का?
आणि केवढं लिहून ठेवलाय? सगळीच दुख आणि सुख गाळून त्याचा अर्क एव्हाना उतरवून झाला असेल. पण तरी दुसर्या कोणाचा काही आपल्याला जगता येतच नाही. उगाच काही वांझ भास जाणवतात , पण शेवटी हाडा-मासाचा जगणं हेवेगळंच....
बर झालं कि तू नाहीयेस इथे....नाहीतर अशी शकलं सांभाळता सांभाळता काय उरली असतीस तू? सारं सौंदर्य कुरुपतेच्या गृहीतकावरच उभं असतं ना?
अजूनही ओळखतेस तू मला.... माणसे का एकमेकांना एवढी धरून राहतात...
एक गृहस्थ राहायचे आमच्या शेजारी.... त्यांना एक मंदबुद्धी मुलगा होता... त्याला दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. वाटेत भेटणार्यांची ओळख करून द्यायचे. मग तो हसायचा. त्या हसण्यात ओळख नसायची, पण दुरावाही नाही. फेन्गाडे फेन्गाडे हात-पाय सांभाळत बापाचा हात धरून चालायचा तो. आणि तिरकस कुठेतरी आकाशात बघायचा. पाय ओढायचा, बापाच्या खांद्यावर लाळ गाळायचा. देवळात देवाकडे पाठ करून हात जोडायचा. मग बाप फिरवून मूर्तीकडे तोंड करायचा. मग मेला तो एकदा. मग तो बापही आक्रसत गेला. म्हणजे त्याचं जगायचं प्रयोजनच संपलं असावं. ते दुख तरी का होईना त्याला धरून जगता येत होतं, त्या पोराला जन्म दिलेली बायको तर मेली, तिची हि अशी आठवण, तीही गेली..... मग? एक दिवशी तो माणूस गेला. पण म्हणजे आता कोणीच दिसत नाही रस्त्यात असं नाही. आत अजून एक माणूस चालतो, गोरापान, उमदा, आणि त्याचं बोट पकडून तशीच एक तिरकस नजर. कशाशीही हेवादावा नसलेली.....
मलाही आहेत आई-बाप. आणि मध्ये-मध्ये ते आठवतात मला. आजकाल बाप जास्त आठवतो. म्हणजे मी होऊ शकलो तरी बापच होऊ शकतो म्हणून कदाचित. किंवा लहानपणी बाप एवढा आठवला नसावा त्याची भरपाई म्हणून. लंगडतो आता. मला पुस्तक आणता आणता साले त्याचे पाय तेवढे झिजले रस्त्यात, त्याच्या खांद्यांना घत्ते पडले. कधीच आयुष्याला नजर भिडवली नाही त्याने, आणि मोठा झालाच नाही कधी. मग मरेल आता एक दिवशी. तेव्हा खूप रडेन मी, म्हणून आत्ताच लिहितो काय...
असं सगळं आहे.. म्हणजे होतंच....
आता जातो काय... असेच एकदा जात होतो... रिक्षात बसून...आई आणि मी...एकदम एक ६-७ वर्षाची मुलगी आली...हातात मोगर्याचे ताजे गजरे...'ताई ,घ्या ना, ताई ताजा आहे, ताई एकतरी घ्या ना. सकाळपासून एक पण गेला नाही ताई, एक घ्या ना ताई..' कदाचित शिकवला असेल तिला असं बोलायला. पण म्हणून मला तिला खोटं नाही पाडता येत... अजून रस्त्यात भिक मागणारा कुणी दिसलं कितीच आठवते... असं लाचार का होतं कुणी...
पण मी असाच निघून जातो.... म्हणजे तसं तू कधीचच सारं आवरून ठेवलं आहेस...पण मी असा आठवणींच्याच पडक्या राज्यात रमलोय....
पाउस पडतोय... आणि आता गाण्याच्याही शेवटच्या ओळी आहेत.....
या पावसाचा जमाखर्च मांडून घेशील तेव्हा तुला काय आठवेल? तू तरीही ओळखशील मला?
पाउस आता स्पर्शतोय मला....केसात, खांद्यावर, पाठीशी.... पावलात.... डोळ्यांमध्ये आहे तोही पाऊसच समज.....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...