Wednesday, June 23, 2010

नेमेचि

थोड्या वेळापूर्वी इथे
हवेला ओला शहारा होता,
तरल थेंबांच्या पडद्याआड लपलं होतं शहर
रस्ता होता ओलाकच्च
माणसे लपली होती छत्र्या रेनकोटच्या आड
कुणी एकटा उगाच भिजणारा उनाड
उजेडाचा नव्हता कुठलाच ठसा
विजेचाच तेवढा क्षणभंगुर दृक-श्राव्य प्रयोग

आता, रस्यावर उरलेल्या डबक्यात तेवढे
पावसाचे वारस तग धरून आहेत
बाकीचे वाहून गेले गटारातून
रस्त्यानेही ओली ओळख सुकवून घेतलीये
आता सत्तेवर आलेल्या विरळ सूर्यकिरणात
ढगानी घेतलीये मुत्सद्दी माघार आणि
दूरच्या डोंगरांच्या आड दबा धरून आहेत
छत्र्या मिटत माणसे चालू लागलीयेत गपगुमान
झाडांनी पांघरालय नव्या उन्हाचा सदरा
मनसोक्त अंघोळीनंतर

आता हे ढग अजून कुठे बरसत असतील
वार्याच्या भुलावणीला हुरळून
हे कुठचे दूर देशाचे वारे
दरवर्षी हिमालयाची भिंत तोडू पाहतात
आणि करत राहतात धिंगाणा दरसाल येणाऱ्या अपयशाचा
आधी पळवतात ओलावा समुद्राच्या अथांग निळाईवरून
आणि मग येन-केन नदी,नाले,ओढे बनवून परतवून टाकतात

होत आलंय असंच आपल्या बापजाद्यांनी डोळे उघडले त्याच्याही आधीपासून
हा मान्सून येताना त्या समुद्राच्या पोटातले शब्द घेऊन येत असावा
उगाच का एवढ्या पावसाळी कविता उगवून येतात
एका पावसाहून काय वेगळा असेल दुसरा, तिसरा किंवा हजारावा पाउस
कि दरवर्षी निघावं कवितांचा पिक

आता परत ढगांनी चालवलाय गनिमीकावा
शरणागतीच्या छत्र्या उघडतीलाच माणसे आता
मी सांभाळून आणतोय हे शब्द, न भिजवता
अर्थात भीती नाही,
हा नाही तर आहेच पुढचा पावसाळा....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...