Wednesday, June 23, 2010

११३ वर्षे आणि भुसभुशीत जाणीव

प्रत्येक काळात जगण्याकडे बघायची, स्वतःच्या आणि आपण ज्या समूहात स्वतःला identify करतो त्या समूहाच्या म्हणून असणाऱ्या जगण्याची एक धाटणी असते. प्रत्येक माणूस जरी असं विचार करून जगत नसलं तरी त्याच्या निर्णयांमध्ये त्याने हे implicit norms पकडलेले असतात. मला काय हवं आणि काय नको हे प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धीने ठरवत नसतो, किंवा प्रत्येक गोष्टीत ठरवत नसतो. अशा वेळी त्या त्या काळात असणारे चांगल्या-वाईटचे निकष लावून निर्णय घेतला जातो. अर्थात हे निकष मान्य नसणारे कोणी ना कोणी समाजात असते. मग केवळ बंडखोरी म्हणून काही संकेत धुडकावून लावले जातात. काही वेळा 'मी हे का करतो आहे' ह्या मूलभूत प्रश्नाला साद घालून प्रस्थापित आणि दृढ वाटणार्या संकेत किंवा नियमांविरुद्ध काही जण वागतात. जेव्हा समाजातले काही स्वतःच्या कृतीतून, स्वतःला आलेल्या अनुभवातून नियम धुडकावण्याची किंवा समाजमान्य नसलेले आचरण करण्याची कृती करतात तेव्हा ताबडतोब समाज त्यांच्या पाठी उभं रहात नाही. पण समाज हा कधीही पूर्णपणे स्थिर अशा अवस्थेत नसतो. प्रत्येक माणूस हा त्याच्याभोवतीच्या बदलांचा धांडोळा घेतच असतो. त्या बदलांना दिले जाणारे प्रतिसाद माणसागणिक बदलत राहतात. अगदी ताबडतोब पचनी न पडणारे बदलही कालांतराने रुजतात कारण सर्वसामान्य माणूस किंवा त्या बंडखोरीला सहानभूती असणारे प्रस्थापित छोटे छोटे बदल घडवतात. समाजात होणारा बदल हि बहुतेकवेळा एक सलग चालणारी प्रक्रिया असते. त्यात सुरुवातीचे, समाजाचा रोषही पत्करू शकणारे जितके महत्वाचे असतात तितकेच हा रोष अंगावर न घेता शक्य तितके स्वतःला बदलत जाणारे आणि ह्या पहिल्या दोन टप्प्यांना पाहून जुन्या व्यवस्थेला शेवटचा धक्का देणारे अशा सगळ्यांनी बदल पूर्ण होतो किंवा नव्या बदलाकडे जातो. मागचा १५० वर्षात महाराष्ट्रातच घडलेल्या कुठल्याही सामाजिक बदलात हि प्रक्रिया दिसेल किंवा अजूनही घडत असेल. स्त्री-शिक्षण, अस्पृशता निर्मूलन, पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली, आंतरजातीय किवा विधवा पुनर-विवाह अशा अनेक ठळक सामाजिक बदलात या प्रक्रिया दिसतील.
'न्याय' हि एक भुसभुशीत संकल्पना आहे. तिची काल-किंवा स्थल निरपेक्ष व्याख्या करणे कठीण आहे. तसेच एखादी कृती हि अनेक बाह्य संदर्भांवरून आणि करणाऱ्याच्या हेतूनुसारही न्याय्य किंवा अन्याय्य ठरते. पण हि भुसभुशीत संकल्पना समाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक सूक्ष्म नियम बनवून 'न्याय' आणि त्या अनुषंगाने माणसाचे deviant वर्तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न कोण करतं? तर त्या त्या वेळी राज्य करणारी शासन व्यवस्था किंवा समूह. जर शासन व्यवस्था हि अंतिमतः लोकाभिमुख (answerable to people) असेल तर 'न्याय' हा भुसभुशीत असला तरी त्याला सामाजिक नेतृत्वाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आधार मिळतो. जर शासन हे एखाद्या गटाच्या हितासाम्बंधाशी निगडीत असेल तर 'न्याय' नावाची भुसभुशीत जाणीव आणि सरकारी प्रक्रियेची ताकद यांची मिळून एक दलदल निर्माण होते. मग काहीजणांना स्वतःला त्यात रूतावतच, प्रसंगी विसर्जित करत, चालता येईल अशी जमीन बनवावी लागते. तत्वाद्यानाचा एवढा मोठा डोस द्यायचे कारण म्हणजे आज चाफेकर बंधूंनी केलेल्या Rand हत्येला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत.
चाफेकारांचे हे कृत्य हा त्या वेळच्या समजत असणाऱ्या असंतोषाची परिणीती होती. जरी ह्या हत्येमागचे तात्कालिक कारण हे चाफेकरांचा वैयक्तिक क्षोभ हे असले तरी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर शासन काही लादण्याचा प्रयत्न करत आहे, हि बाबही त्यांच्या क्षोभाला कारणीभूत होती. त्यांच्याकडे ब्रिटीशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून कोर्ट-कचेरी करण्याचा मार्ग होता. किंवा अन्य मार्गांनी स्वतःचा निषेध नोंदावायचाही विचार त्यांना करता आला असता. चाफेकरांनी हिंसा शेवटचा पर्याय म्हणून निवडली किंवा अन्य पर्यायांचा विचार न करता निवडली हे आज सांगता येणार नाही. पण मला ११३ वर्षानंतर ह्या घटनेच्या तपशिलाची चिकित्सा करायची नाही किंवा भूतकाळातून एक नवा नेता आणि पर्यायाने अनुयायांची आंधळी गर्दीही उभारायची नाही. मला महत्वाची वाटते ती चाफेकरांनी त्यांच्या भोवतालच्या घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया. मला, मी ज्यांच्या सोबत जगतो आहे त्यांना, त्यांना मान्य असलेल्या पद्धतीप्रमाणे जागू न देता, त्यांच्या बळजबरीने बदल लादला जात असेल किंवा त्यांना बदल हवा असता करू दिला जात नसेल, त्यांच्या जगण्याच्या मूलभूत सुरक्षिततेलाच जर धोका निर्माण होत असेल आणि शासन ह्या सार्यात सहभागी असेल, निष्क्रिय किंवा जाणीवपूर्वक शिथिल असेल तर मला हि विस्कटलेली प्रक्रिया परत सुरळीत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी हे केलं. असं करणारे ते काही पहीले नव्हते. आणि त्यामुळे हा त्यांच्या कृतीचे ढोल वाजवण्याचा प्रयत्न नाही. पण आज आपण काही विसरतो आहोत त्याची ह्या दिवसाचे निमित्त करून आठवण करून द्यायचा प्रयत्न आहे.
भोपाल वायूगळतीच्या खटल्याचा निकाल आणि त्यानंतरची धूळवड आपण वाचतो, पाहतो आणि विसरतो आहोत. २६ वर्षाच्या दिरंगाईनंतरही परत एकदा न्यायालायांचाच दरवाजा ठोठावला जात आहे. मला कोणत्याही मार्गाने हा न्यायसंस्थेवरचा विश्वास वगेरे वाटत नाही. हि शुद्ध हतबलता आहे. जेव्हा तथाकथित 'न्याय' ज्यांच्याकडून मिळतो तेच अन्यायाच्या उभारणीचे वाटेकरी असतात, तेव्हा स्वतःच्या सारासार विचाराने न्याय-अन्याय्य ठरवायचे असते. वायू गळतीत जे मेले ते परत येणार नाही आहेत. कंपनीच्या अधिकार्यांना शिक्षा व्हावी हि मागणी जरी रास्त असली तरी त्यात मृतांच्या नातलगांची सूडभावना किती आणि हि शिक्षा उदाहरण बनून असे निष्काळजीपणाचे प्रसंग टाळावेत असं विचार किती? जर सूड हवाच असेल तर तो काय न्यायालय घेऊन देणार नाही. तो ज्याला हवा आहे त्याने परिणामांची पर्वा न करता स्वतःच घ्यायला हवं. उधमसिंगने जालियानवाला बाग हत्याकांडाचा सूड घेताना रस्ता दाखवलाच आहे. आणि ११३ वर्षापूर्वी चाफेकरानीही. अशी हत्या, वैयक्तिक क्षोभातून केलेली राजकीय किंवा व्यापक सामाजिक सूडहत्या हि कितीही क्रूर वाटली तरी बेलगाम आणि स्वार्थी शासनावरचा शेवटच अंकुश तोच आहे. मुळात अशी हत्या हि अजूनही समाजातल्या दररोज शांतपणे जगणाऱ्या माणसाचे मन त्याच्या भवतालासाठी संवेदनशील आहे आणि वेळप्रसंग पडल्यास, हिंसेचा धाक म्हणून वापर करण्यास सिद्ध आहे ह्याची निदर्शक आहे. 'खटासी असावे खट, उद्धटसी उद्धट' ह्या व्यावहारिक सत्याचाच तो क्रूर अविष्कार आहे.
मी अशा रीतीने हिंसेचे समर्थन करतो आहे ते मी हि हिंसा अनावर होऊ शकते हे विसरून गेलो आहे म्हणून नाही. अनेकजण स्वतः घाबरत असतात आणि स्वतःचा भित्रेपणा लपवण्यासाठी हिंसा किंवा संघर्ष वाईट अशी भूमिका निर्माण करतात. ह्या on average घाबरटपणाचा फायदा घेऊनच काही थोडे जण अनेकांना वाकवत असतात. आपल्यातली हिंसा कुठेच गेलेली नाही. ती आपला मूळ भागच आहे. तिच्यात स्व-संरक्षणाची क्षमता आहे. कदाचित आता ह्या सुरक्षिततेची काळजी नसल्याने आपण हिंसेकडे एक कृत्रिम प्रवृत्ती म्हणून पहात असू तर तो आपल्या सुखासिनतेचा परिणाम झाला. स्वतःच्या आयुष्याची, नात्यांची किंवा सामाजिक स्थानाची, म्हणजे कशाचीच ओढ नसणारा निसंग माणूसच अहिंसक होऊ शकेल. बाकी जो कोणी समाजात आहे त्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने हिंसेला स्वीकारलेच आहे. पोलीस हे हिंसेचेच नियंत्रित रूप आहे (काही भागात अनियंत्रित!) शासन जर समाज टिकेल, मिळवेल आणि मिळवलेले टिकवून वाढवेल अशा प्रकाराने वागत नसेल तर असे शासन उलथून टाकावे लागते. सैद्धांतिक दृष्ट्या हे उलटणे मतपेटीद्वारे करावे लागते. पण प्रत्यक्षात शासन विविध स्तरावर आहे, एकच मतपेटी सारे स्तर बदलू शकत नाही आणि हे सारे स्तर सुसंघटीत नाहीत. निवडणुका आणि सत्ता टिकवण्यासाठी करावयाच्या उलाढालींचा खर्चच एवढा आहे कि उद्योगांना favor दिल्याशिवाय पक्ष चालूच शकणार नाहीत. आणि हि बाब भारतात नाही तर सर्वच देशांत लागू आहे. प्रश्न असं आहे कि अशा उलाढाली होताना त्यात अनेक सामान्य लोक चिरडले जातील अशा तडजोडी होऊ नयेत.
भोपाल वायू गळतीशी थोडीफार सारखी घटना मेक्सिकोच्या आखतात घडते आहे, ती म्हणजे बी.पी. च्या तेलाविहीरीच्या गळतीची. याविरुद्ध अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अध्यक्षांनी ठराविक मुदतीसाठी मेक्सिकोच्या अखातातील तेल काढण्याची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बी.पी. कडून बंद पडणाऱ्या तेल विहिरीचे कर्मचारी, बेकार झालेले मच्छिमार आणि वेटर, किनारपट्टीचे नुकसान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय भरून काढण्यासाठी २० billion dollars घेण्यात येणार आहेत. फ्री मार्केट व्यवस्था लोकांचा विचार करत नाही असे नाही आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील. अमेरिकेत असे घडू शकते कारण अशा घटनेनंतर तिथे माणसाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून विचार केला जातो. अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे लेख पाहीले तर घटनेच्या किती बाजूंचा विचार मांडला जात आहे ते दिसतं. पण ह्या विचाराबरोबरच अशी कृती व्हावी म्हणून राजकीय दबावही निर्माण केला जातो. बी.पी. च्या C.E.O.ला अमेरिकन संसदेसमोर शपथेवर बोलावे लागते आणि Anderson भारत सरकारच्या विमानातून जातो. बी. पी. हि ब्रिटीश म्हणजे अमेरिकच्या पिल्लू देशातील कंपनी आहे आणि तरीही तिच्याकडून नुकसान वसूल केले जाईल असे बराक ओबामांनी म्हटले आहे. चीदम्बरमनी नुकसान भरपाई वाढवली आहे आणि ती सरकारच देणार आहे. Dow ने भरपाईची जबाबदारी घ्यायला नकारच दिला आहे. आणि त्याबद्दल सरकारकडून काहीही विधान नाही. हि चूक सरकारची नाही. आपली आहे. आपण प्रतिक्रिया द्यायला हवी. ज्या स्केलवर आपल्याला शक्य आहे तिथे. प्रतिक्रिया हि स्वतःला तोशीस पाडूनच द्यावी लागेल.
त्यात निदर्शने असतील, लिखाण असेल, भाषणे असतील, राजकारणात सहभाग असेल, अ-सरकारी संस्थांमध्ये काम असेल आणि निर्वाणीचा उपाय म्हणून 'गोंद्या आले रे' हि वापरायला लागेल.
भगत सिंगच्या डायरीमध्ये एक वाक्य होतं- I am a man and whatever affects mankind affects me. हि mankind म्हणजे समस्त मानवजात असली तरी तिचं सर्वात जवळचं रूप मी ज्यात जगतो तो भवताल असतो. आणि तो जगण्याला अनुरूप ठेवण्याची, त्याला विकसत ठेवण्याची जबाबदारी माझी असते. कोणी जर यात अडथळा आणत असेल तर तो दूर करण्यात मी सहभागी झालो पाहिजे. माझ्या कृतीतून मी विरोधाचे पर्याय निर्माण केले पाहिजेत.
झोपलेत माळ अजून तापवित काया
असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया
अजून हे अपार दुख वाट पाहताहे
अजून हा प्रचंड देश भिक मागताहे
-केव्हातरी ह्या ओळी खोट्या ठरायला हव्यात....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...