ग्रेसच्या कवितात त्याने संध्यासूक्त ओवूनच ठेवले आहे... नामविहीन व्याकूळ तालावर निनादणारे...
'हसतात माझे सगळे अवयव, स्वतःशीच, पृथकपणे.
प्रत्येकाची वेगळी साद ऐकू
येते मला.
संभवापूर्वीच गोळा करून ठेवले होते मी,
माझ्या निर्मितीचे पुरेसे क्षण. '
केव्हाचा सांगतो आहे माझ्या एकटेपणाचा अविभाज्य मंत्र तिला... आणि ती त्याला निरोपाची विराणी समजून बसते...
शहराने आता रात्रीच्या कृष्ण पटलावर तोडके रंग ओतायला सुरवात केली आहे.... पक्षी केव्हाचे फांद्यांवर ओथंबून बसले आहेत....रात्रीच्या भयाचे कंप त्यांच्या थरथरत्या पंखात....
कुठेच न पोचणारे शब्द मी त्या पडझडीच्या अवशेषात सोडून देतो...उत्खननात सापडतील तेव्हा शब्दांना सांजभूल येण्याची प्रक्रिया ते विशद करतील.....