Sunday, June 20, 2010

संध्याकाळच्या विखुरण्याची प्रक्रिया

कुठेतरी अडकून पडलेली आहे हि संध्याकाळ. काही पत्रं आलेली आहेत आणि त्यावरच्या अक्षरांची शाई काल रात्री जाळलेल्या स्वप्नांच्या काजळीतलीच आहे. वाचल्यावर समोर काहीच न दिसणारं राखाडी आकाश तेवढं आहे. दूर कुठेतरी क्षितिजाच्या रेघेपाशी उडत चाललेत पक्षी. ते जातील का जिथून हि पत्रं आली आहेत? ढगांनी दिवसाचा झळाळ केव्हाच झाकोळला होता. आणि अस्तरंगांची उधळणही त्यांनी सावळ्या पडद्याआड दडवून ठेवली आहे. कविताही वाचवत नाहीत. कविता संपल्यानंतर उरणारे विराण शहर, आणि ओळखीचे सारे कोपरे बोथट झालेत धुळीच्या वादळात. काल इथे काही मित्र बसले होते, एकजण सहज त्याच्या कविता म्हणत होता. त्याच्या कवितांची अक्षरे अजून आसपास विखुरलेली असावीत, पण एकट्याने लागणारा अर्थ वेगळा आणि कोणी ऐकताना लागणारा अर्थ वेगळा.
ग्रेसच्या कवितात त्याने संध्यासूक्त ओवूनच ठेवले आहे... नामविहीन व्याकूळ तालावर निनादणारे...
'हसतात माझे सगळे अवयव, स्वतःशीच, पृथकपणे.
प्रत्येकाची वेगळी साद ऐकू
येते मला.
संभवापूर्वीच गोळा करून ठेवले होते मी,
माझ्या निर्मितीचे पुरेसे क्षण. '

केव्हाचा सांगतो आहे माझ्या एकटेपणाचा अविभाज्य मंत्र तिला... आणि ती त्याला निरोपाची विराणी समजून बसते...

शहराने आता रात्रीच्या कृष्ण पटलावर तोडके रंग ओतायला सुरवात केली आहे.... पक्षी केव्हाचे फांद्यांवर ओथंबून बसले आहेत....रात्रीच्या भयाचे कंप त्यांच्या थरथरत्या पंखात....
कुठेच न पोचणारे शब्द मी त्या पडझडीच्या अवशेषात सोडून देतो...उत्खननात सापडतील तेव्हा शब्दांना सांजभूल येण्याची प्रक्रिया ते विशद करतील.....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...