Friday, June 18, 2010

प्राजक्त

अगदी एकटी अशी गोष्टच सापडणार नाही. झाड तर अजिबात एकट नसतं. ते मातीशी, हवेशी, ऋतूंशी, पक्ष्यांशी आणि सरतेशेवटी अपिराहार्यपणे माणसांशी जिवंत संबंध ठेवून असतं. काही वेळा झाड आणि माणूस दोन्ही गेले तरी आठवणींची मुळे मरत नाहीत. ती तशीच काळाच्या जमिनीखाली निश्चल पडून राहतात. कधीतरी एखाद्या जुन्या संदर्भांचा उबारा मिळाला कि पुन्हा त्यांना अंकुर फुटतो, आणि थोडाफार उगवून कोमेजून जातो. हि फुलांची एक साधी आठवण आहे. पण कोणतीच गोष्ट एकटी नसते आणि तिच्या, अगदी छोट्याश्या का होईना, अस्तिवाच्या इतिहासात कित्येक न उलगडलेले धागे दोरे असतात. 'Collapse' नावाच्या पुस्तकात Jared Diamond ने उंदरांच्या विष्ठेतून एका बेटाच्या विनाशाची कहाणी उलगडली आहे. फुलांमध्ये एवढी विलक्षण कहाणी नसेल, पण अनेक अबोध कविता नक्की सापडतील.
अंगणात प्राजक्ताचं एक झाड होतं. जुनं. त्यावर चढूनही बसता यायचं, अर्थात फार वर नाही, पण जमिनीपासून ३-४ फूट वर एक खोबण तयार झाली होती. सकाळी उठून अंगणात आलं कि झाडाने फुलांचा भार जमिनीवर हलका केलेला असायचा. ५-६ पाकळ्या, एकमेकांशी सुरेख अंतर आणि जवळीक ठेवून असलेल्या, त्यांच्या गोलसर आणि मध्ये किंचित बाक घेतेलेल्या कडा आणि वर त्या शुभ्रतेला साजेसा एक केशरी देठ. आणि अगदी नाजूक जीव. खाली पडली फुलं कि पाकळ्यांवर कुठेतरी एखादं डाग यायचा, वेचता वेचता एखाद्या फुलावर पाय पडायचा, किंवा एखादं फूल मुळातच अधुरं उमललेलं असायचं. मग त्यांना बाजूला सारायचं. अंगणाच्या कुंपणाच्या कडेशी ठेवून द्यायचं, त्यांचं छोटसं साजिरा आयुष्य संध्याकाळ पर्यंत निर्माल्य होऊन गेलेलं असायचं. वेचलेली फुला देव्हरयातून निर्माल्यात जायची. अंगणात उरलेली फुलं कचरा म्हणूनच गणली जायची. पण आदल्या रात्री झाडावर उमलून येताना कुठल्याच फुलाला त्याच्या प्रवासाची रेष माहिती नसणार. कधीतरी मी हि फुलं ओवून त्यांचा हार बनवायचो. प्राजक्ताच्या फुलांचा हार करणं एकदम सोपं. देठाच्या वरच्या छिद्रातून सुई घालायची आणि पाकळ्यांच्या थराच्या केंद्रातून अल्लद बाहेर काढायची. एक काळजी मात्र घ्यावी लागते. सुई देठातून कुठेही घुसता कामा नये. त्या केशरी देठाचा तोरा अगदी नाजूक असतो. सुईच्या इवलाश्या वेदनेनेही ते सारं फूल मिटून घेणार. सुईच टोक बोटाला टोचणार असं देठातून घुसला कि, आणि त्यासोबत त्या किंचित धसमुसलेपनानेही संपलेल्या फूलपणाचा एक ओलसर स्पर्श व्हायचा बोटावर. जसं काही त्या फुलाने त्याच्या सार्या लहान पण तजेलदार अस्तिवाला साजेसा एखादा अश्रू मागे ठेवलेला असायचा. मग ते फूल परत परडीत ठेवून द्यायचं. आरतीच्या शेवटी परडीतली उरली सुरली सारी फुलं देवावर वाहिली जायची, त्यात हेही असणार. गर्दीत नाही जसे आंधळे, लंगडे, पांगळे कोणी चटकन समजून येत नाहीत, तसं हे फूलही लपून जाणार. आणि उद्या निर्माल्य तर सार्यांचाच आहे, हाराचही आणि त्या आधीच पंगू झालेल्या फूलाचही.
आजोबांचा खूप जीव सगळ्याच झाडांवर. त्यात प्राजक्ताच्या झाडावर विशेष. घरासमोरच अंगण तुटून तिथे रस्ता होत असताना सगळी झाडं तोडली गेली. कुण्या गावाचे मजूर सहज पहारी पारून झाडं उपसून काढत होते. प्राजक्ताच्या झाडापाशी आल्यावर आजोबांनी सांगितला कि झाड तसच्या तसं परसदारात लावायचं. मग सावकाश स्वतः काम करून ते झाड तसच्या तसं उचलून परसदारी लावलं. आणि तिथेही त्याने काही वर्ष चांगली काढली. पण आपली मूळ जागा गेल्याचं दुख कुठेतरी आतवर त्याला होत असावं. अंगणात त्याला एक त्याचा कोपरा होता. परसदारात अनेक झाडांच्या भाऊगर्दीत, एखाद्या घरंदाज गायकाने नाईलाज म्हणून कोरस मध्ये गावं तसं ते बिचारं उभं राहिलं.
गणपतीच्या दिवसात सकाळी लवकर उठून प्राजक्ताची फुलं वेचायची. तोवर फुलं पडलेलीही नसायची. पावसाच्या एखाद्या सरीने ओलसर पानं, त्यांच्या खाली जाणवणारा ओलसर अंधार, आणि फांद्यात हात घालून वेचताना झाडाला लागणाऱ्या धक्याने अंगावर पडणारी फुलं. तेव्हा असं सांगता आलं नसतं, पण त्या वेळेत रमून जायला व्हायचं. अगदी परडी भरून, ओसंडून फुलं मिळायची. मग हौसेने त्या फुलांनी गणपतीची आधीच लहानशी मूर्ती भरून टाकायची. दुसर्या दिवशी, विसर्जन होऊन आल्यावर तलावाच्या पाण्यातली राख परसदरात फेकायला जाताना मन आणि तो प्राजक्त दोन्ही ओकबोकं वाटत रहायचं.
पुढे घुशीने प्राजक्ताची मुळे पोखरून काढली. त्याला पानं, फुलं येणं थांबलं आणि झाड वठून गेलं. मग एक दिवशी कोणी एकाने विचारून त्याचं जाडसर खोड तोडून नेला. एक खड्डा उरला, जिथं कधी टपटपणार्या फुलांचा घर होतं आणि प्रसन्न सकाळच्या आणि उदास पण शांत संध्याकाळच्या, आजोबांच्या निर्धास्त करणाऱ्या स्पर्शाच्या आठवणींची सुरुवात होती.
परवा असंच परसदारात उभा होतो. आता तिथे काय काय बांधून रया पार घालवलेली आहे. कधीतरी चाळ तुटणार म्हणून झाडांकडेहि लक्ष देणं थांबवलं आहे. आता त्या झाडांशी घुशी, उंदरा, एखादी चुकार खार, चिमण्या आणि मांजरं बोलत असतात. कोणीही त्यांना ओरबाडून त्यांची फुलं काढू शकतो. त्यांच्यावर उष्ट-खरकटे फेकू शकतो. मला आधी असा करणार्यांना ओरडवासा वाटायचं. कोणीतरी घरात घुसून काही चोरातायेत असं वाटायचं. मग कळलं कि परसदारच्या झाडांची कुटुंबाच्या assets मध्ये मोजणी होत नाही आणि ज्यापासून काही मिळणार नाही अशा ठिकाणी शहाण्या माणसाने जीव लावायचा नसतो. मीही सोकावत गेलो. पाउस पडून गेला होता नुकताच आणि आता उन्ह आलं होतं. झाडं शुचिर्भूत दिसत होती. पानांचा हिरवा रंग नव्या तजेल्याने चमकत होता. पावसाचे उरलेले थेंब पानाच्या कडांवरून सावकाश ओघळत जमिनीवर पडत होते. टोकांशी असणाऱ्या त्या लाम्बोळ्या थेंबात प्रकाश काही एक कोन करून शिरत होता आणि दुसर्याच कोनाने बाहेर पडत होता. त्यामुळे कोवळी चमक अजून वाढली होती. आत कुठेतरी पंखांची फडफड दिसली. पिसांचा फुलोरा करून एक नवीनच पक्षी तिथे बसला होतं. थोडा इकडे तिकडे उडायचा आणि परत मूळ जागी येऊन बसायचा. मग निवांत पंखांच्या फुलोर्यात चोच फिरवायचा, अंग झडझडवायचा. संपून जाणार्या प्रदेशातही हे नवे पक्षी का येतात?
मनातच उगवलेली झाडं खरी हि. आता दाट जंगल झालंय त्यांचं. त्यात एका कोपर्यात प्राजक्त उभा आहे. नवा पक्षी त्याच्या फांद्यांत रमला आहे. इवल्या पांढर्या केशरी फुलांचा सडा पडला आहे. आणि एक लहान मुलगा आजोबाच बोट धरून तिथे केव्हाचा उभा आहे.....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...