Thursday, March 24, 2016

बघ्या, होळी आणि आवाहनांना आलेले रंग

        बघ्याचा एक मित्र बघ्याला सांगत होता, अरे, अनेक पंचांगकर्त्यांनी येऊन लोकांना आवाहन केलं आहे की प्रतीकात्मक होळी खेळा. केवळ टीळा लावा वगैरे. पुढे बघ्याच्या मित्राला आत्यंतिक धार्मिक आनंद झालेला की बघ आपला धर्म कसा युगानुकूल आहे वगैरे. बघ्याने आपल्या मित्राकडे नीट बघितलं आणि तो एकूणातच आपल्यापेक्षा च्युत्या आहे हे ठरवलं. मग तो दार्शनिक वगैरे अविर्भाव आणून म्हणाला की अरे युगानुकूल वगैरे नाही, तर केवळ ह्यावर्षी पाण्याची टंचाई असल्याने पैसे वाचवण्याचा हा गतानुगतिक मध्यममार्ग आहे. ह्यावर्षी मान्सून नीट होतो तर पुढच्यावर्षी छान सार्वजनिक होळी खेळली जाईल.
       बघ्याने आपल्या मित्राकडे बघितलं तेव्हा त्यांच्यात एवढंतरी होतं का, चमत्कारावर लिहिलेला अग्रलेख गायब होण्याचा चमत्कार असे सगळे प्रश्न आपल्या मित्राच्या जिभेवर ओथंबलेले पाहून बघ्याने पळ काढला. आणि पळता पळता कुठल्याही सार्वजनिक चर्चेत आपले मत न नोंदवण्याचे मत अधिक ठाम केले.
       पळत पळत आपल्या उपजीविकेच्या दैवताच्या नित्य नियमाच्या पाट्या किंवा प्रदक्षिणा उरकून बघ्या आपल्या बिळाकडे आला. तर तिथे लोकांचे घोळके २-३-४ च्या पुंजक्यात उभे असून चेहऱ्यावर हसणे येणार नाही ह्याची दक्षता घेऊन अनुक्रमे मृत माणूस आणि त्याचे कुटुंबीय, मग वाढती उष्णता, मग नोकरी, मग आप्तेष्ट, मग खरेदी-गुंतवणूक अशा विषयांवर चर्चा करीत उभे होते. बघ्यानेही चेहऱ्यावर सचिंत भाव आणत नेमके कोण मेले ह्याची माहिती घेतली आणि मग समाजहितार्थ तो ही माहिती पसरवू लागला. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या एका पुंजक्याकडून त्याने मृत इसमाच्या मरणाबद्दल तपशील मिळवले.
       त्यानंतर तेथील अन्य सह-शोक प्रदर्शकांसोबत शिळोपा करण्यापेक्षा अंत्यविधीसाठी प्रेत आणि अन्य घटक तयार करणे ह्या कामाला बघ्या लागला. एकूणातच आय.टी., फायनान्स, ह्युमन रिसोर्स अशा स्कीलमध्ये पारंगत लोक धार्मिक रूढीने प्रेत जाळणे ह्या स्कीलकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि त्यामुळे बघ्यासारखे लोक अत्यंत फायद्याचे ठरतात, जे पोटतीडीकीने प्रेताची शेवटची गरज, जसे जाळून घेण्यासाठी तयार होणे ह्यावर काम करीत रहातात. हजारो वर्षाच्या धर्मामुळे प्रेताला जाळणे ही क्रियाही सोपी राहिलेली नाही. पीठ, मीठ, दगड, ब्लेड, बांबू, काथ्या, मडके, काही किलो लाकडे आणि ती इकडून तिकडे पोहचवणे, मृत व्यक्ती मृत आहे ह्याची विविध जिवंत प्रमाणपत्रे, पंचे, फुले-हार, चंदन, बुक्का, अबीर आणि हे सर्व दबत्या कुजबुजत प्रकारात करणे ह्या आणि अशा अनेकविध गोष्टींचा अंतर्भाव ह्या सगळ्यात आहे. बघ्याच्या मनात हे सगळे शाब्दिक प्रवाह उमटून असताना वरकरणी त्याने घट्टपणे दोरीने प्रेत तिरडीला बांधले. त्यांनतर नातेसंबंधांच्या उतरंडीप्रमाणे लोक खांदे देऊ लागले तसा आपले कपडे झटकत झटकत बघ्या बाजूला झाला.
       बघ्याच्या बाजूला त्याच्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि गुरखा होते. सेक्रेटरी गुरख्याला उद्या पाणी कसे सोडणार हे समजावून सांगत होता. त्यावर गुराख्याने ह्यावर्षी टँकर नाही का असे विचारताच एकदम ब्लास्फेमीचे भाव आणून बघ्याकडे आणि मग सात्विक संतापाने गुराख्याकडे बघत सेक्रेटरीने टाकीचा कॉमन नळही बंद ठेवण्याची सूचना केली. बच्चोंको खेलने दो और डी.जे. भी उस साईड बजाव असं ठरवून सेक्रेटरी आणि बघ्या अंत्ययात्रेत मार्गस्थ झाले.
--
       बघ्याला ह्या नॅचुरल एक्सपिरिमेंटसाठी उत्सुक होऊन राहिला होता. आज ही एक व्यक्ती मेली आहे. ह्या व्यक्तीची इच्छा, जी बघ्याने मृत इसमाकडूनच ऐकली होती ती म्हणजे त्याच्या मुलाचे लग्न ती बाकी आहे. त्यात मरणाअगोदर फसक्या शस्त्रक्रियेवर आणि रुग्णालयात राहणे नि तपासणी अशावर ३ एक लाख रुपये उडालेले आहेत. पाठी एक काल तुळतुळीत गोटा केलेला मुलगा, जो बाकीवेळ अन्य गोटा केलेले लोक आणि पितर किंवा देव ह्यांच्यामध्ये एजंट म्हणून काम पाहतो, एक ३५० स्क्वेअरफीट ब्लॉक, एक अर्धांगवायूने त्रस्त बायको, एक अद्याप अपग्रेड न झालेला टी.व्ही. ज्यावर मृत इसम बातम्या आणि सिरीयल बघत असे, आणि थोडे पेन्शन, आणि अन्य घटक ज् बघ्याच्या सिनिकल फिटमध्ये सापडलेले नाहीत असे शिल्लक आहे. पण आजूबाजूच्या लोकांना काय आहे?
       आजूबाजूचे लोक जसे एक कुटुंब जे मियां, बीबी आणि एक मुलगा आहे, अजून एक कुटुंब जे थोडे गरीब मियां-बीबी आणि एक मुलगी आणि मुलगा आहेत, अजून एक कुटुंब जे एक आजी-आजोबा, आणि दोन जोडपी मुलगा-सून आणि प्रत्येकी एक अपत्य असे आहेत. आणि वरील वर्गीकरणात मोडणारी बाकी कुटुंबे आणि बघ्या. म्हणजे एकूणात भारत हा तरुणांचा देश असल्याने, आणि ह्या तरुण-तरुणींचे एकमेकांशी विवाह होऊन अनेकानेक अपत्ये निर्माण झाल्याने अपत्यांचाही देश आहे. आणि त्यात परत अनेक तरुण-तरुणी त्यांचेच आई—बाप अजून तेजतर्रार असल्याने काहीच पर्याय नसल्याने मजा करीत आहेत पण त्याचवेळी ते पालक बनून गेल्याने त्यांना आता संस्कार वगैरे पण करावयाचे आहेत.
       म्हणजे हे सगळे संस्कारोत्सुक आई-बाप आपल्या मुलांना उद्या सहज सांगू शकतात की ह्यावेळी होळी नाही कारण
-    आपल्या शेजारील मृत इसम आणि त्याच्या घराचे अद्याप ताजे फडफडते दुःख
-    आपल्या जवळील धरणांत नसलेले पाणी, जे पर्यायाने सोसायटीच्या टाक्यांत कमी येत आहे. (पण तू घाबरू नकोस, आपण सिंटेक्स लावली आहे. – दमलेला बाबा आणि आईही)
-    दुष्काळात होरपळणारे शेतकरी (जसे भेगा पडलेल्या जमिनींचे फोटो, असे नाना आवाहन करणारे कलाकार वगैरे)
-    काश्मीरप्रश्न आणि .....
(वरील कारणे एखाद्या क्रमाने दिसल्यास तो योगायोग समजावा!)
त्याचवेळी हे सगळं न सांगण्याचीही सबळ कारणे आहेत.
-    हे सांगण्यासाठी आपल्याला काही माहित/वाटत असणे हेच होत नसणे.
-    सोसायटीमधील इतर व्यक्तींना रंग लावण्याचा पूर्ण बिनडोक आनंद
-    लहान मुलांना मुलांशी, वयात येणाऱ्या मुला-मुलींना अन्य वयात येणाऱ्या मुली-मुलांशी, तरुण-तरुणींना तशा अन्य तरुण तरुणींशी रंग बरसे करण्याचा मौका मौका
-    रस्त्यावर घोळक्यात फिरणे, एखाद्याच्या घरी टोळधाड करणे, भांग आदी नशा करून तर्र आनंद अनुभवणे अशी पाशवी सुखे मिळवणे
-    माझी उपजीविका, माझे कुटुंब, माझे पैसे, माझे सुख वगैरे वगैरे कर्तुत्ववान असणे.
होळीच्या दिवशी बघ्या सकाळी बाहेर पडतो तो त्याला मुलांचे आनंदी चीत्कार ऐकू येऊ लागतात. त्यांनतर तळ-मजल्याचासारा भाग रंगीत झालेला दिसू लागतो. पुढे मुलांचे-मुलींचे टोळके सोसायटीत ज्याला त्याला रंगवत असते. मागच्या वर्षी ह्या प्रचारकी टोळक्याकडे असलेल्या बादल्या आणि पिशव्या ह्यावर्षी नसतात. ती मुले बघ्यालाही आपल्या घोळात घेतात आणि त्याचा चेहरा रंगवून टाकतात.
पुढे सोसायटीमध्ये डी.जे. चालू झालेला असून तिथे शांताबाई वगैरे तत्कालीन सांस्कृतिक गाणी सुरु आहेत. त्यात मुळातच रंगात दंग झालेले ५-६ बापे नाचत असून बाकी लोक हळूहळू आपण आणि आपण ज्यांच्यावर नजर ठेवून आहोत असे बाकी कोणी हे सगळेच नाचू अशा आशावादाने आजूबाजूला रंगून घेत उभे आहेत. बघ्या सोसायटीमधून बाहेर पडताना फलकावर पाहतो – आपल्या सोसायटीतील जुने रहिवासी...
--
       रस्त्यावर लोकांचे रंगीन जथ्थे चालत होते. कोपऱ्या-कोपऱ्यांवर लोक सेल्फी काढत होते. त्यात एकाने बघ्याला ओळखले आणि त्याला रंगवायला सुरुवात केली.
       ते झाल्यावर बघ्याने पाहिलं तर ह्याच इसमाच्या सोशल मिडिया प्रोफाईलवर काल पाणी वाचवायचा संदेश फिरत होता.
       त्या संदेशाप्रमाणे हा इसम आणि त्याचे साथी हे ड्राय होळी खेळत होते.
       त्यांचा अंगा-कपड्यांचा रंग, त्यांनी रंगवलेली वाहने आणि कंपाऊड हे सगळे थेट पावसाळ्यात धुतले जाणार आहे. आजची होळी ही ड्राय होळी.
       बघ्या बघत निघाला तो त्याला सगळीकडे असेच सांस्कृतिक वातावरण पसरलेले दिसले. म्हणजे-
-    लोक पंचांग वाचत नसावेत.
-    लोकांना होळीची गंमत हवी आहे, म्हणजे हवी आहे.
-    पाणी नसल्याने लोक ड्राय होळी खेळत आहेत. म्हणजेच त्यांना समज आहे. म्हणजेच पुढच्या वर्षी पाणी असेल तर लोक पाणी, चिखल, फुगे अशा सगळ्याने होळी खेळातील. रेन डान्स करतील. म्हणजेच पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्हज. आहा, शाश्वत सत्य!!   
म्हणजे आपण लोकांबद्दल काय म्हणू शकतो?
बघ्या काहीच म्हटला नाही. तो स्वतःलाच म्हणाला, च्युत्या!!
बघ्याला आठवलं की मध्ये एके ठिकाणी त्याने एक बोर्ड वाचलेला की अमुक एका स्त्रीला स्थानिक महिला मंडळातर्फे आयोजित खेळांमध्ये पहिले बक्षीस. त्या नावाने बघ्याला आठवलं की ह्या महिलेची मुलगी वयाच्या २८व्या वर्षी डेंग्यूने मेली, सुमारे वर्षभरापूर्वी. ह्या बाई खेळायला लागल्या.
   ही त्यांची जगण्याची जिद्द की काळापरिणीत अपरिहार्य निब्बरपणा?
   तसे हे रंग खेळणारे लोक. आपल्या शेजाऱ्यांचे दुःख आपले नाही, असे असेल. पण मग कोणाचे दुःख आपले आहे? आणि कोणाला खरेच दुःख आहे? ज्याचा बाप गेला तोही परवा-तेरवा आपापले सुख पाहिलच.
   मग हे संस्कार काय आहेत, जर आपण त्यात संवेदनशीलता शिकवत नाही?
   आपल्याला पडलेल्या प्रश्नाच्या नैतिक टोनने बघ्या एकदम गडबडून जातो.
--
       एकदम आलेल्या नैतिक पावित्र्याला शह द्यावा म्हणून बघ्या एक निकोटीन कांडी शिलागवतो आणि पुढे होणाऱ्या लंग कॅन्सरची नेमकी प्रोबॅबिलिटी काढत हळूहळू हलका होऊ लागतो.
       त्याच्या काही सोशल मिडिया फ्रेंडनी सगळ्या आवाहनाला डीच मारून लोकांनी केलेल्या सणाने त्रस्त कमेंट्स टाकल्या आहेत. बाकीचे सामाजिक बदलकर्ते लॉंग विकेंड पकडून बाहेर गेले आहेत. आपापल्या लोकेशन्सचे फोटो ते टाकत आहेत.
       होळी खेळलेले आपापले सेल्फी टाकत आहेत.
       बघ्या समोर हुल्लड करणाऱ्या जथ्यांकडे बघत सावकाश धूर बाहेर सोडत राहतो.
       त्याला जाणवतं की ह्याच मुलांत उद्याचे पालक, उद्याचे फेसबुक युजर्स, उद्याचे सोसायटी सेक्रेटरी, उद्याचे स्थानिक नगरसेवक, उद्याचे एन.आर.इन्व्हेस्टर्स, उद्याचे गुंड, उद्याचे च्युत्ये, उद्याचे शेती-जवान-देश-संस्कृती कैवारी, उद्याचे भांग पिणारे, उद्याचे पाणी वाचवणारे, उद्याचे मरणारे, उद्याचे खांदा देणारे, उद्याचे पितर, उद्याची भुते आणि उद्याचे बघे..
       बघ्या थोटूक चिरडतो, नेमस्तपणे उचलून कचऱ्यात टाकतो.
       लोक होळी खेळत राहतात.       

            

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...