Sunday, May 4, 2014

गोंगाटचिंतन

       माझ्या एका मित्राचा मला आज सकाळी फोन आला. आदल्या रात्री १२.३० वाजता त्याने पोलिसांना फोन करून त्याच्या बिल्डिंगजवळ चालू असलेल्या डी.जे. बद्दल सांगून तो आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच वेळाने फोन उचलला गेला आणि नंतर फोन उचलणेच बंद झाले. मी हा अनुभव अगोदर घेतलेला आहे.
       पोलिसांना असे किती फोन गेले होते ह्याचा काही डेटा नाही. आणि अर्थात पोलिसांनी काही केलेले नाही हे स्पष्ट आहे. कारण १२.३० पर्यंत डी.जे. चालू होता ही घटनाच ते दर्शवते. माझ्या मित्राचा प्रश्न साधा आहे की जर पोलिसांनीच अशा पद्धतीने फाट्यावर मारले तर मग काय करायचे?
       काय करायचे ह्याचे पर्याय नाहीत असे नाही. आपल्यात खाज असेल तर आपण कायदेशीर मार्ग वगैरे वापरू शकतो. पण स्वाभाविकपणे त्यात अनेक मर्यादा आहेत. म्हणजे त्या असा मार्ग वापरू शकणाऱ्या माणसाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक मर्यादा आहेत. कायद्याचे हात तर लांब कितीही होऊ शकतात, पण ते इतके खेचायची क्षमता आहे का हा खरा प्रश्न आहे.
       मुळात असा गोंगाट होतो आहे हे पोलिसांना माहित नाही असं नाही. पोलिसांचे पथक रात्री रस्त्यावर फिरत असते आणि त्यांना किमान रस्त्यालगत असणाऱ्या भागांत काय काय चालू आहे ह्याची माहिती असते. ह्यातून काही निष्कर्ष संभवतात. पाहिला म्हणजे गोंगाट करणाऱ्याचे आणि पोलिसांचे सूतगूत. दुसरा म्हणजे पोलिसांनी तक्रार यायची वाट पाहिली आणि कोणी १२.३० पर्यंत ती केली नाही. अर्थात हा प्रश्न उरतोच की १२.३० वाजता पोलिसांनी का दखल घेतली नाही. त्यामुळे असे मानायला वाव आहे की वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून गोंगाट चालू ठेवायला पोलिसांनी हातभार लावलाच.
       मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाहीये. व्यक्तिशः मला पोलिसांच्या मदतीचे चांगले अनुभव आहेत. पण ह्या अनुभवांचे निष्कर्ष काढले तर काय दिसतं की मला व्यक्ती म्हणून मदत केली गेली नाही. एका अनुभवात स्त्रियांच्या छेडछाडीचा प्रसंग होता तर दुसऱ्या प्रसंगात मी अमुक एका इन्स्टिट्यूटमधला आहे ह्यावरून मला मिळालेली वागणून आणि सल्ला ठरला. मी जेव्हा गोंगाट/आवाज थांबवण्यासाठी फोन केला तेव्हा माझ्या मित्राला आलेल्या अनुभवाच्यासारखाच अनुभव मला आलेला आहे.
       पण मी असेही प्रसंग अनुभवले आहेत जिथे मी गोंगाट निर्माण करणाऱ्या गटात होतो आणि साडेदहा वाजता पोलीस येऊन म्हटले की आम्हाला आसपासहून फोन येत आहेत की दहा वाजून गेले तरी गोंगाट होतो आहे. आवाज होत होता तो फेअरवेल पार्टीच्या आवाजाचा आणि फोन केला होता आमच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या एका प्रोफेसरने.
       म्हणजे ध्वनीप्रदूषणाच्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाचे मुद्दे दोन आहेत. एक आवाज निर्माण करणारे एक नगण्य प्रकारचे लोक हवेत आणि आवाजाचा त्रास होणारा हा आर्थिक, सामाजिक, संस्थात्मक बाजूने दांडगा माणूस हवा.
       काहीजण असे म्हणू शकतील की वरचे दोन मुद्दे हे ध्वनिप्रदूषण नव्हे तर साऱ्याच कायद्यांना लागू आहेत. मी म्हणेन की अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे राजकोय उपद्रवमूल्याचा. ध्वनी प्रदूषण ह्या मुद्द्याला काहीही राजकीय उपद्रवमूल्य नाही. गोंगाटाच्या तक्रारीने राज्य किंवा केंद्रशासनाची प्रतिमा डागाळणार नाही, वर्तमानपत्रे एखादा कॉलम किंवा एखादा प्रक्षुब्ध लेख ह्यापलीकडे ध्वनीप्रदूषणाला कव्हर करणार नाहीत.
       परत, मला मिडीयालासुद्धा काही शिव्या द्यायच्या नाहीत. कारण मुळात मलाही हे जाणवतं की गोंगाट, आवाज ह्यांनी होणारा त्रास ह्याचे उपद्रवमूल्य वेगळया प्रकारचे आहे. गोंगाट चालू असताना त्याच्या आजूबाजूच्या सर्वांनाच सारख्या प्रमाणात त्रास जाणवेल असेही नाही आणि जाणवेलच असेही नाही. दुसरी बाब सवयीची की समजा मला होतोय आज त्रास, पण सतत त्या आवाजात राहून मला त्याचं काहीच वाटेनासं होईल. गोंगाटाचे शारीरिक, मानसिक परिणाम ह्याबाबत भयावह वाटणारी आकडेवारी आहे. पण तो केवळ गोंगाटाचा परिणाम आहे का गोंगाट, जीवनशैली, आहार ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ह्याबद्दल किती तर्कशुद्धपणे आकडेवारी वापरता येईल ह्यात मला शंका आहे. त्यामुळे आवाजाचा, गोंगाटाचा त्रास हा वेगळा ठरतो.
--
       मी स्वतः एका महामार्गाच्या बाजूच्या घरात वाढलो. आमच्या घरी येणारे पाहुणे कायम त्याच्या पार्श्वभूमीला असलेल्या आवाजाबद्दल बोलायचे, तर आम्ही सांगायचो की इथून रिक्षा फार सहज मिळतात. आमच्या आजूबाजूला फार आवाज आहे ही गोष्ट मला जाणवली नव्हती कारण आजूबाजूला शांतता असलेल्या भागात राहणं म्हणजे काय हे मला ठाऊक नव्हतं. माझ्या पालकांनाही जाणीव नव्हती कारण त्यांच्यासाठी आवाजाची पातळी एकदम वाढली नव्हती. ती हळूहळू वाढत गेल्याने तिची धक्का पोचवायची क्षमताच संपली होती कदाचित. जी गोष्ट आवाजाची, तीच स्वतःच्या स्पेसची. टी.व्ही. चालू असताना अभ्यास करणं, आजूबाजूला कोणी झोपले असताना कॉम्प्युटरवर काम करणं ह्या गोष्टी सवयीच्या होत्या.
       मी नंतर स्वतःची खोली असलेल्या, आजूबाजूला शांतता, झाडे वगैरे असलेल्या एका होस्टेलवर राहू लागलो. आणि त्यानंतर मला आवाज, स्वतःची स्पेस ह्या गोष्टी जाणवू लागल्या. आणि आता मला परत आधी मला ज्या सवयी होत्या त्या परत मिळवणं जवळपास अशक्य वाटतं.
       पण असं ज्यांचं झालेलं नाही त्यांना जर आवाज, छोट्याश्या जागेत दाटीवाटीने राहणं ह्याची तक्रार वाटत नसेल तर नवल काय? मुंबईतल्या स्लमस् मध्ये सर्व्हे करताना मला असं दिसलं की आम्ही जिथे राहतो आहोत ते वाईट आहे असं तेच लोक म्हणतात ज्यांना झोपडीपेक्षा वेगळया जागेत रहायचा अनुभव आहे. बांद्र्याच्या बेहरामपाडा मध्ये आता अशी कुटुंबे आहेत ज्यांची तिसरी पिढी तिथेच वाढते आहे. ते लोक तक्रार करत नाहीत, तर सांगतात की इथून रेल्वे स्टेशन जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, सरकारी स्कूल जवळ आहे, सब सहुलीयत है.
       कदाचित ह्यात थोडा सिलेक्शन बायस आहे. असे लोक असणार झोपडीत राहणारेसुद्धा ज्यांना तिथे रहायचं नाही. पण मग ते तक्रार करत तिथे राहणार नाहीत. ते जे काही करून बाहेर पडायचं तसे बाहेर पडतील. जे राहतील ते सारी सहुलीयत असणारेच. सगळ्याची सवय पडलेले, स्थितीशील.
--
       पण दादरला झालाय की सायलेन्स झोन का काय ते! आणि त्याची स्पष्टीकरणे पण सोपी आहेत. मुंबईच्या आर्थिक व्यापाला खेटून वाढणाऱ्या एका धर्मशाळा शहराला (जिथे लोक आठवड्याचे पाच-सहा दिवस रात्री झोपायला असतात असे शहर) शिवाजी पार्कची वैशिष्ट्ये असणार नाहीत. इथे राहणाऱ्यांना अपरिहार्यतेची विलक्षण जाणीव आहे. आणि फारच झालं, तर ते आपला त्रास कमी करून घेण्यापेक्षा ते अशा त्रासात उडी घेणं पसंत करतात. म्हणजे रस्त्याची गर्दी, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रिक्षा नको ना, मग गाडी घे असं. त्रास होणाऱ्यांचा हतबल भाग होण्यापेक्षा त्रास देणाऱ्यांचा निब्बर भाग होणं कधीही बेटर आहे.
       परत एकदा, ह्यात कसलाही क्लास कॉन्शसनेस वगैरे नाही. मला हे सगळं घडतं ते प्रचंड नैसर्गिक वाटतं. म्हणजे पोलिसांनी माझा, माझ्या मित्राचा फोन न घेणं, मिडीयाने गोंगाट कव्हर न करणं, रस्त्यावर वाहनांची दाटी वाढतानाही आजच्या पादचाऱ्यांना, रिक्षा-बस प्रवाश्यांना दुचाकी, चारचाकी घ्यावाशी वाटणं. प्रत्येकजण त्याच्या समोरच्या इंसेंटिव्हना प्रतिसाद देतो आहे. कायदा पाळून, माझ्या तक्रारीची दखल घेतल्याने मिळणारं आत्मिक वगैरे समाधान जाणवणारे पोलीस कथा-कादंबऱ्यांत असतात. प्रत्यक्षात गोंगाट घालणारा  स्थानिक बाहुबली जे देऊ शकेल त्याचं भौतिक मोल जास्त महत्वाचं असतं. मिडीया तर प्रॉफीट मॅक्सिमाइझ करणारा व्यवसाय आहे. आणि ध्वनी प्रदूषणाच्या स्थानिक स्वरूपाच्या तक्रारीने मिळणारा फायदा आणि त्याच जागेत अन्य काही छापून, किंवा न छापून मिळणारा फायदा ह्याचं गणित ते करत असतील. आठवड्याला पाच-सहा दिवसांची नोकरी करणारा माणूस भौतिक समृद्धीचा, बाकीच्याच्या भौतिक उपभोगाशी गती मिळती राखण्याच्या प्रयत्न करेल.
       पण मला तर होतो आहे आवाजाचा त्रास. मग मी काय करायचं?
१.       आपल्या गांडीत कुठवर खाज आहे हे बघून कायद्याने लढायचं.
२.       आपण काही ना काही एक मार्गाने स्थानिक बाहुबली बनायचं, आणि मग आपल्या एका फोन सरशी पोलीस येतील किंवा येणार नाहीत.
३.       निघून जायचं शांततेच्या शोधात.
४.       ह्यापैकी काहीही नाही. स्थितीशील, सवयशील होत सहुलीयत घेत रहायची.
वेळ चिकार आहे, उद्या, आज ज्यांच्याकडे हलदी असेल त्यांचा डी.जे. अजून वाजू लागलेला नाही. निवडणुकांचे निकाल लागलेले नाहीत, गणेशोत्सव, दिवाळी यायची आहे. ह्यांच्या अध्ये-मध्ये माझ्याकडे असलेल्या शांततेच्या फाटक्या चादरीवर उडत उडत मला पर्याय ठरवायचा आहे.     


आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...