Tuesday, September 28, 2010

Shadow Lines

भूतकाळ जसा आहे तसा कळतच नाही. जसा वर्तमान उलगडत जातो, तसे भूतकाळाच्या विस्तीर्ण पसरलेल्या आणि बर्याचश्या अनाकलनीय रानात बघण्याचे कवडसे मिळत राहतात. जेव्हा हा भूतकाळ एका माणसाचा नसतो, तर नात्यांच्या मृदू-कोरड्या धाग्यांच्या जाळ्यांचा असतो, तेव्हा तर एखाद्या साध्याश्या घटनेचा अन्वयही सोपा रहात नाही. आणि जर हा त्या आठवणींचा सारीपाट एखाद्या संवेदनाक्षम मनात साठला असेल, आणि आयुष्याच्या विस्तारत जाणार्या परिघात ते मन एखाद्या अबोध भावनेचा किंवा एखाद्या मनाला मुळापासून हादरवून गेलेल्या घटनेचा जेव्हा शोध घेतं, तेव्हा त्या शोधात काय सापडतं ह्या पेक्षा ते शोधत राहणंच गुंतवून टाकते. अमिताव घोष ह्यांची 'Shadow Lines' हा असाच एक शोध, खरतर पाहणार्याच्या स्वतःच्या, आणि त्याने मनाशी अलगद जपलेल्या संवादातून उलगडणारी गोष्ट. केवळ कोलाकात्तात वाढलेल्या आणि मग लंडनच्या रस्तांवर आणि रुंद-अरुंद वळणांवर चालणाऱ्या एकाची नाही, तिला कोलाकात्तामधल्या भद्र बेंगाली आणि ब्रिटीश यांच्या मैत्रीची, ढाका आणि कोलकत्ता या अंतराने जवळ पण इतिहासाने दुरावलेल्या शहरांची, परंपरा आणि स्वातंत्र्य यांच्या ताणात राहणाऱ्या नव्या आयुष्याची तरल पण न पुसता येणारी पार्श्वभूमी आहे. कथेच्या नायकाला, किंवा कथा ज्याच्या माध्यमाने उलगडते त्याला नावच नाही, आणि तसंच असणार ना, कारण हि गोष्ट त्याच्या एकाची करणं म्हणजे काळाच्या ओघात, इतिहासाच्या आणि भूगोलाच्या घुसळणीत हरवून गेलेल्या अनेक कथांना त्या नाहीच असं समजणं. अशा अनेक असू शकणार्या पण सत्य मानण्यासाठी पुरेसे संदर्भ नसलेल्या कथांवर, किंवा त्यांच्यात असणाऱ्या माणसांच्या, त्यांच्या संबंधांच्या खोल डोहावर पडलेला प्रकाश, आणि त्या सावल्यांचा हा नाजूक खेळ, Shadow Lines.
Shadow Lines अमिताव घोष यांची १९८९ ची कलाकृती आहे. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. अमिताव घोष यांच्या Wikipedia नोंदीमध्ये त्यांच्या लिखाणाला Indo-nostalgic असं म्हणण्यात आलेला आहे. Shadow Lines मध्ये हा nostalgia तितका दुखरा नाही. लेखकाच्या स्वतःच्या बालपणाची आणि त्यात त्याने मिसळलेल्या संदर्भांची संदिग्ध कहाणी म्हणजे Shadow Lines. Going Away आणि Coming Home अशा दोन वरकरणी विरोधी दिशांना जाणार्या भागांमध्ये गोष्ट उलगडते. पहिल्या भागात नायक, त्याच्या बालपणापासून, त्यावेळच्या नात्यांपासून, अबोध पण मनाशी पक्क्या जपलेल्या भावनांपासून लांब जातो आहे. दुसर्या भागात, नायक जो लंडनमध्ये शिकणारा तरुण विद्यार्थी आहे, तो त्याच्या लहानपणी घडलेल्या एका प्रसंगाला उलगडतो. त्या आधी अर्धवट उमजलेल्या किंवा त्यावेळी मन बधीर झाल्याने उमजूच न शकलेल्या प्रसंगाला समजून घेताना तो केवळ स्वतःच्या बालपणात, त्यातल्या ठसा उमटवून गेलेल्या आठवणीत, त्याच्या व्यक्तित्वाला तासानार्या माणसातून परत एकदा जात नाही; तर त्याच्या भूतकाळाला वेढून असलेल्या, आणि त्याच्या आयुष्यातला घटनांशी अगदी जवळचे पण संदिग्धतेच्या छायेतले संबंध असणाऱ्या इतिहासाला, भूगोलाला, रस्त्यांना, इमारतींना समजूनही घेतो. आणि त्याचं हे समजणं हा त्याने त्याच्याशी लावलेला अन्वयार्थ आहे. त्यात विसंगती आहे, पण त्याच्या आयुष्यात आलेल्या, आणि त्याच्या भाषेत, त्याच्या असण्याचा एक एक भाग व्यापून राहिलेल्या माणसांच्या एकमेकांशी असणर्या संबंधांशी ही विसंगती सुसंगत आहे.
अमिताव घोष यांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य (अर्थात माझा त्यांच्या लिखाणाशी परिचय Shadow Lines आणि The Hungry Tide एवढाच आहे) म्हणजे ते करत असलेली जवळपास सार्या व्यक्तिरेखांची समतल मांडणी. Shadow Lines मध्ये जी काही माणसे आहेत ती सारी, किंवा त्यांच्या सांगणार्याच्या वर उमटलेल्या सावल्या ह्यात एक तोल आहे. प्रत्येकाचे सांगणार्याशी जुळलेले आणि त्याला खुपलेले, दुखावून गेलेले कोपरे खुबीने मांडले आहेत. त्याच्या आठवणींच्या डोहात असलेल्या प्रतीबिम्बांच्या खोलीशी अनुरूप प्रत्येकाचा त्या गोष्टीत वाटा आहे. साहजिक त्यात त्याला आजूबाजूच्या जगाकडे बघायची दृष्टी देणारा त्याचा भाऊ, त्याची मैत्रीण आणि नेमकं काही न होऊ शकलेली चुलत बहिण, त्याचं एकुलता एक असणं जपलेली त्याची आजी, आई, बाबा, आणि तशी त्याची कोणी नसलेली पण त्याच्या आतल्या सावल्यांच्या असम्बद्धतेला प्रत्यक्षाची साक्ष बनणारी एक यांचे तरंग जास्त आहेत. पण माणसा-माणसातल्या गुंतवणार्या, थकवणाऱ्या, फुलवणाऱ्या, निशब्द करणाऱ्या नात्यांनाजसा लेखक स्पर्श करतो तितकाच परस्पर संबंधांच्या दुनियेला प्रत्यक्षाची मिती देणाऱ्या भोवतालालाही त्या जिवंतपणाचा एक भाग बनवतो. कोलकाता, लंडन आणि काहीसं ढाका या तीन शहरांचे रस्ते, गल्ल्या, इमारती, पुतळे, मौसम आणि इतिहास ह्यांच्या प्रसंगी गडद -विरळ छायेतच गोष्ट विणली जाते.
गोष्ट सांगणं म्हणजे आपल्याला हवं ते सांगणं नाही, काय घडला ते सांगणं असही नाही. गोष्ट सांगणं म्हणजे एक tranquil संध्याकाळ उभी करणं. एकदम आलेला काळिमा, आकाशावर आलेली विलक्षण उदासी, गोठून अडकलेला मंद प्रकाश आणि अडकलेली वेळ. आर्त, स्तब्ध होत घरंगळत जाणारी संध्याकाळ. रंगांच्या क्षणभंगुर छटा डोळ्यांच्या दारातून स्मरणांचा तवंग बनत जाव्यात तशीच गोष्ट असते. ज्याची त्याची ज्याला त्याला समजणारी. त्यातला सारखेपणा हा तुमची माझी आयुष्ये ज्या एकच मांजरपाट किंवा मलमलीने बनली आहेत त्यांच्या पोताचा आहे. आणि त्यातलं वेगळेपण हे सांगणार्याचा आहे. जे घडू शकत नाही, घडलं नाही त्याचीच गोष्ट बनते. पण तिचं प्रत्याक्षापासूनचे अंतर जितके कमी, तितकी तिची सावली अधिक खरी. तिचं खरं नसणं तितकं अधिक टोचणारा आणि अशी गोष्ट आपल्या संदर्भात नसण्याचा किंवा त्या गोष्टीतला एक धागा आपला नसण्याचा दाह जास्त. Shadow Lines वाचताना हे आणि याहीपेक्षा अधिक जाणवत रहाते. माणसांच्या अलगद उमलणार्या भावना, आणि त्यांचं कोमेजत जाण, भीती, निषिद्ध आहे त्याला स्पर्शण्याची असोशी, मग येणाऱ्या कल्पिताला सामोरं जाण, गुंतणं, आणि मग तुटण्याच्या हादर्यापासून सावरायला गुंतलो हेच विसरायचा प्रयत्न करणं... आपल्याच सावलीचा माग, आपल्याच रस्त्याचा पाठलाग....
एका रात्री हातात घेतली shadow Lines, एका secondhand बुकस्टाल वर मिळालेली, आणि मग पुढच्या काही रात्री सावल्यांच्या या अबोध- क्वचित परिचित वळणात, रस्त्यात आणि व्याकूळ आसमंतात हरवून गेल्या. काही जागी तर एखाद्या सेपिया डार्क दुनियेत जाऊन पोचते गोष्ट, अलगद छेडलेल्या तारांवर भरून टाकणारे सूर, खरे नसणारे आणि तरीही स्पष्ट ऐकू येणारे.... काही ठिकाणी वास्तवाची अनाकलनीय भयावहता

That particular fear has a texture you can neither forget nor describe.It is like the fear of the victims of an earthquake who have lost faith in the stillness of the earth. And yet it is not the same. It is without analogy, for it is not comparable to the fear of nature, which is the most universal of human fears, nor to the fear of the violence of the state, which is the commonest of modern fears.It is a fear that comes of the knowledge that normalcy is uttterly contingent, that the spaces that surround one, the streets that one inhabits, can become, suddenly and without warning, as hostile as a desert in a flash flood. It is this that sets apart the thousand million people who inhabit the subcontinent from the rest of the world -- not language, not food, not music -- it is the special quality of loneliness that grows out of the fear of the war between oneself andone's image in the mirror

काय सांगणार पुढे. ज्याला त्याला ज्याची त्याची गोष्ट... इतकेवेळा सांगितलेली आणि तरीही पुरती न समजलेली....
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...