Thursday, September 16, 2010

घटकाभर गम्मत

'भले-बुरे काहीतरी बोलायला कुणी नाही' ... कोणाच्या नसण्याला शंब्द वापरून भरून काढायचं....बोलायला कोणी नाही म्हणून लिहायचं...कोण एका अज्ञात वाचकाला, गणितात 'क्ष' मानून गणित सोडवतात, तसं मला जे सांगायचं आहे ते त्याला कळेल, असं समजून लिहायचं. पण संध्याकाळी कोणासोबत चालत सहज होणार्या गप्पा संध्याकाळी कागद-पेन घेऊन बसलं तर लिहिता येतील? आधी वाचलेल्या गोष्टी, कविता हातात घेतो, परत वाचू पाहतो, त्यातही काही सापडत नाही. मला माझं आयुष्य भोगायचं आहे, जगायचं आहे, दुसर्या कोणाच्या कितीही खोल विचारांनी मी माझ्यातली असोशी भरून काढू शकत नाही. माझ्या अंगात उसळू पाहणाऱ्या जाणीवांना मी दृक-श्राव्य माध्यमे वापरून कितीकाळ थोपवू शकेन? आणि मग एक असेल असा उद्या जेव्हा अशी तगमग उरणार नाही, जेव्हा प्रत्येक कृतीमागे विषादाचा झाकोळ असणार नाही अशा आशेवर तरंगत रहायचं, हात-पाय मारत राहायचे. 'Every misery is in some sense deserved one'... हे म्हणजे कर्मविपाक प्रकारात झालं. आधी चूक म्हणून आत्ता चूक, आणि म्हणून याच्या पुढेही... मग स्वतःला संपवून का टाकायचा नाही... का जगावं याचं उत्तर मिळत नाही आणि का जगू नये याचंही नाही.....आणि नसणारच याचं उत्तर....हीच Camus ची Absurdity....कशाचंच उत्तर नाहीये.... म्हणजे असं प्रश्नांचा टळटळत घेऊन जगणं हेच प्राक्तन तर...म्हणून आधीपासूनच प्रश्न पडू नयेत, चाकोरीबाहेर जावसं वाटू नये....जसं आयुष्य येईल तसं वागावं, त्याला आकार द्यायचा प्रयत्न करू नये.... हा तर Fatalism. साला स्वतःच्या दुखला स्वतःचं नावही देता येऊ नये....सगळी नावं साली आधीच कोणीतरी वापरून टाकलेली.... आधी कोणी एक बुद्ध झालेला...आधी कोणी एक थोरो...एक कामू...एक मार्क्स....त्यांनी आयुष्याला तसू तसू सोलत सगळं सालं मांडून ठेवलं...आता नुसता त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलायच्या....घोटभर उथळ आयुष्य, ते असं त्यांनी लिहून ठेवलेलं...आता दुखाला अजून डेप्थ नाही...त्याचा नवा आयाम नाही...बाजारात विकत ठेवलेल्या अनेक गोष्टी क्रमाक्रमाने घेत राहणं, त्यासाठी एका टप्प्यात स्वतःला विक्रीयोग्य बनवणं आणि कधीतरी ह्या चक्रनेमिक्रमाचा कंटाळा आला कि असं दिसेल तिथे ओकण. कुणी सापडला तर त्याला, कुणी नाही सापडला तर तर असं 'क्ष' मानून.... किंवा मग आठवणींच्या फडताळात उडी मारायची.. त्यातला बोचत राहिलेलं काही होईल तसं सांगून मोकळं होऊ पाहायचा....म्हणजे मग बाकीचे म्हणणर वा! वा!! आपण मोकळे होणार तर नाही.. वर आपल्या आतल्या सलाला लोकांनी वा वा म्हटल्याचं जखमेवर मीठ आहेच.... पण तरी बर...नुसत्या जखमेपेक्षा मिठासकट काय वाईट! चरचरेल, ओरडवासा वाटेल... कुठे ओरडणार....घाल आपल्याच गुडघ्यात डोके.... दाब कढ...दाबून ठेव..... हम्म अस्सं.... स्टेनबेक म्हणालेला ना anybody can break. It takes a man not to....आठव आठव अजून अशी उत्तेजक....जिवंत ठेव आशा भौ....आशेशिवाय तरणोपाय नाही... नाहीतर ह्या घुम्या एकटेपणालाच दोस्त मान आपला.... बस आपली आपल्या पावलापुरती दुनिया.... अशी जायची नाही ती कोणाबरोबर बोलायची उर्मी....तेवढंच तर करत आला तू.... स्वतःचं प्रश्नचिन्ह शोधलं पाहिजे भौ, म्हणजे मग कोणीतरी त्या सारं व्यापणाऱ्या, शोषणाऱ्या विराट प्राश्नाखालचा टिंब तरी होऊ शकतं. प्रश्न शोध, तूच तुझं... बाकी कोणाचे प्रश्न चालणार नाहीत.... हे पण आधी कोणी लिहिलंय म्हणतोस... लिही ना का...तू तुझाच शोध घेतोयेस ना भौ.... हे पण स्वप्नच... बरोबर आहे.... किंवा चूक... आहे ना.. असणं महत्वाचं....
गालिब याद कर भाऊ...
जिंदगी यूँ ही गुजर जाती थी
क्यों तेरा राहगुजर याद आया...
काही नाही भाऊ.... हे असं एकटाच आपलं आपलं आहे... आणि एक दिवस जायचाही... आरती प्रभूंच्या कवितेसारखा... 'तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार सोडूनी मी जाईन दूर गावा'.... कुठे जायचं हे ठाऊक नसतच कधी... काय सोडून जायचं एवढं मात्र आपल्याला सुरुवातीपासून ठाऊक असतं...आणि गम्मत म्हणजे तेच तेवढं हवं असतं आपल्याला... हे एवढंच दुख...
बराय भाऊ... मजा आली...घटकाभर गम्मत...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...