Friday, June 11, 2010

Easing Out

सकाळ अशी वेगळी नसतेच....म्हणजे मुळात रात्र अशी झालेलीच नसते.....कसलीही दगदग न घेता उगवणारे दिवस फार थोडे असतात....पावसाच्या अस्पष्ट आवाजात झोप चालवली जाते....कुणाचातरी फोन येऊन सुरु होते सकाळ...आणि सुरुवातीलाच तिच्यात एक मुग्ध अबोली संध्याकाळ गोंदली जाते. शब्दांच्या तराफ्यावरून जे बोलायचं त्याच्या कडेनेच चाललेले संभाषण....हळूहळू अलोख्या-पिलोख्यातून निसटत जाणारी रात्र...आठवणींच्या रानात जमा होणारी....
म्हणजे माणसांचे दोन प्रकार असावेत....म्हणजे आनंदासाठी जगणाऱ्या माणसांचे...बाकीच्यांच्या कितीही प्रकारचा मी काय करणार...तर पहिला प्रकार म्हणजे साला गाडून मेहेनत करणारे...कामाच्या छोट्या छोट्या कोपर्यांना तासणारे, आकार देणारे....मग ते कामच बोलत असता अशा माणसातून...अशा प्रकारांना एकूण येणारा दिवस हा एक नवीन कॅनवास वाटत असावा, रंगवा, चित्र, आणि अवघा अस्तित्व थकवणारी एक धुंद पांघरुन घ्या....
दुसरा प्रकार, आपण ह्या पहिल्या प्रकारात असं वाटणार्या पण सरतेशेवटी पहिल्या प्रकरणी निर्मिलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यातच रमलेल्या माणसांचा प्रकार....म्हणजे माझा प्रकार...माझ्या बर्याचश्या मित्रांचा प्रकार...आणि जगावर चौफेर धुळवड करण्याच्या मैफिलीत ज्यांची नावं आदराने घेतली जातात असे पहिल्या प्रकारातले लोक...
मग काय....पाउस येतो....आधी असं सगळ्या झाडांशी लागत, मग त्यांना घुसळत, त्यांना बेभान स्पर्शत तो खिडक्या दारातून खोलीत शिरतो....मग त्याला जाणवतं खोलीत आधीच आलाय पाउस...मग तो आपलं रेशमी वलय सोडतो त्या वेळेभोवती....
'ती गेली तेव्हा रिम-झिम पाउस निनादत होता....'
कधीही न आलेली ती अशा वेळेला, 'घनव्याकूळ' वेळेला वेड्यासारखी आठवायला लागते....पाउस ना नर आहे...तसं तो असेल लिंग-आकार-विभक्तीहीन, पण मला तो आदिम नरासारखा वाटतो... गूढ काळोख्या रानातून, अपार पसरलेल्या समुद्रानवरून, बेलाग फकीर पर्वतांवरून, आवेगी फेसाळ प्रपातातून येणारा आदिम हुंकार.... आणि तो हिंडत असतो, शोधत असतो प्रणयाचा दिसेल ते रूप, उमलवत, जोपासत, खेळवत आणि प्रसंगी उद्ध्वस्त करत.... कोणासाठी...कोणाचा होऊ शकतो तो....जमिनीचा, त्याच्यावर ओवाळून जाणार्या विजेचा,त्याच्या वेगात उखडून निघणार्या वेड्या वेलींचा कि त्याच्यातूनच उमलणार्या आणि त्याच्या विराट सागर रूपात स्वतःला संपवणाऱ्या नदीचा...
मला माझ्या आतही असे आदिम हुंकार जाणवतात, स्वतावर चढवलेल्या अनेक मुखवटे कोलमडून येणारी जाणीव.... आणि त्या जाणीवेला पेरावं असं वाटतं एखाद्या आश्वस्त जमिनीत... हाच असेल ना माणसाला असलेल्या पुनरुत्पादन जाणीवेचा खरं अर्थ.... आधी स्वताची जाणीव उमलणं आणि मग हि जाणीव बहरला येऊन कोमेजनारही आहे त्या आधी, तिच्या बहराच्या उन्नत अवस्थेत तिला जोडणं, अस्तित्वाच्या अविरत प्रवाहाशी हेही समजणे.....
पावसाचा असं असतं वेडे, तो कानात सांगून जातो कविता आणि बोटांवरून घेऊनही जातो अलगद... माझ्या त्वचेवर उरतात ते हे थेंब....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...