Saturday, November 26, 2016

द हाफ लायन आणि अन्य काही राजकीय चरित्रे

       विनय सीतापती ह्यांच्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव ह्यांच्याबद्दलच्या ‘द हाफ लायन’ ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अगदी थोडक्यात म्हणायचं झालं तर पुस्तकाचा मुख्य उद्देश, जो कुठल्याही चरित्राचा असतो, तसं चरित्रनायकाला मुख्य झोतात आणणं हा आहे. इथे हा झोत अनसंग हिरो असण्याचा आहे. १९९१-१९९६ ह्या पंतप्रधान असण्याच्या काळात, अल्पमतात असलेले सरकार असूनही, नरसिंहरावांनी केलेल्या बदलांचा श्रेय त्यांना दिलं जात नाही, त्यांची लीगसी मानली जात नाही ह्या मुद्द्यांचा परामर्श हे चरित्र घेतं. १९९१-९२ च्या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या नियमन चौकटीत घडवून आणलेल्या बदलांची, त्या पाठच्या व्यक्तींची विस्तृत चर्चा इथे येते.
       विनय सीतापती हे political science चे विद्यार्थी आणि पत्रकार आहेत. कदाचित त्यामुळे हे आत्मचरित्र उधळ बेलभांडार पद्धतीत नाही असं म्हणता येईल. ते राव ह्यांचे सहकारी असते तर कदाचित अशा चरित्राचा नूर वेगळा राहिला असता. काय मिळवले आणि काय गमवले ह्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा, चरित्रनायकाला सहानुभूतीदार प्रयत्न अशा पद्धतीने ‘हाफ लायन’ कडे बघता येईल.
       नरसिंहराव ह्यांच्या व्यक्तिमत्वाला परस्परविरोधी असे दोन पदर होते आणि त्यामुळे समाजवाद मानणाऱ्या, left of centre अश्या पार्टीचे loyalist आणि तरीही मार्केट फ्रेंडली reformer अश्या विरोधाभासाला ते सांभाळू शकले ही ह्या चरित्राची सेन्ट्रल थीम म्हणाला येईल. ‘नरसिंह’ हेच ह्या परस्परविरोधी तरीही एकत्रित नांदणाऱ्या द्वैताचे रूपक अशा अर्थाने ‘हाफ लायन’ असे पुस्तकाचे नाव आहे.
       नरसिंहरावांकडे १९९१ च्या आधीचा स्टेटस-को चालू ठेवायचा किंवा काही radical बदल घडवायचे अशी निवड होती आणि त्यांनी दुसरी निवड केली असे सीतापती ह्यांचे अर्ग्युमेंट आहे. IMF च्या दबावाखाली, ते जे म्हणत गेले ते घडत गेलं अशी टीकेची भूमिका, डावे आणि उजवे, दोन्ही घेत आलेत, त्याला प्रतिवाद द्यायचा हा प्रयत्न आहे. (डाव्यांची भूमिका आणि विश्लेषण ‘Intelligent person’s guide to Liberalization ह्या पुस्तकात नीट मांडलेली आहे. उजवे, हे मुळात थेट दार्शनिक असल्याने, चिकित्सा आणि त्यात ती पुस्तकवगैरे रुपात अशा व्यर्थ पसाऱ्यापासून लांब आहेत.) रावांनी त्यांची टीम कशी उभारली, विरोधकांना धूर्तपणे कसे तोंड दिलं, तीनदा विश्वासदर्शक ठरावांना कसे सामोरे गेले, कॉंग्रेसवरील आपलं नियंत्रण कसे वाढवलं ह्याचे चांगले विवेचन, आणि शक्यतो साधार आलेले आहे. हे करताना पार्टी हायकमांडला डावलणे आणि बाबरी मशीद प्रश्नाची चुकीची हाताळणी ह्या दोन चुका त्यांनी केल्या आणि सरतेशेवटी त्यांच्या पार्टीनेच त्यांना कसे पूर्णपणे दुर्लक्षित केले हे लेखक मांडतो.
       रावांचे बालपण, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना आणि त्यांचे राजकीय निर्णय ह्यांना एका सूत्रात गोवण्याचा, मराठी वाचकांना अतिशय आवडता असा खास चरीत्री प्रकारही ह्यात आहे.
       रावांचा व्यासंग, नोकरशाहीचे आकलन, राजकीय विजनवासात असताना त्यांनी स्वतः मधल्या लेखकाला, विद्यार्थ्याला दिलेला वाव ह्या बाबी लेखक ठासून मांडतो.
       मुख्य म्हणजे लेखन प्रवाही आणि योग्य ब्रेक घेणारे आहे.
--
       राजकीय-आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींची चरित्रे मी फार वाचलेली नाहीत. पण राजकीय-आर्थिक घटनांसोबत असणारा व्यक्तींच्या महत्वाकांक्षा, जुने परिचय आणि अन्य काही संदर्भ ह्यांचा अंडर-प्ले समजणं आवश्यक आहे असं जाणवायला लागल्याने मी अशी चरित्रे वाचायला लागलो आहे.
       त्यात शरद पवार ह्यांचे आत्मचरित्र आहे. अर्थात ते पुस्तक आपल्या हातात बघूनही लोक आपल्याकडे ‘काय राव, माहित नाही का साहेब कसे आहेत तुम्हाला’ असे पाहतात हे मी वडगाव-बुद्रुकमध्ये पुस्तक वाचताना अनुभवले आहे! सगळ्यात जास्त मला पुस्तकातले फोटो आवडले आहेत. पुस्तक म्हणाल तर आपल्याबद्दल एकूण जो समजांचा बरबट पसरला आहे तो एकदम लक्झरी टिश्यू पेपरने पुसून काढायचा प्रयत्न आहे. पवारांच्या डोक्यातील कल्पना आणि त्यांनी त्या कश्या वापरल्या, त्यांचे नोकरशाहीवरील नियंत्रण आणि त्याची समज ह्या बाबी काही प्रमाणात अधोरेखित होतात.
       माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांचे ‘The Turbulent Yearsह्यात कॉंग्रेस, इंदिरा गांधी हत्येनंतरची निर्णयप्रणाली, आणि मुखर्जी ह्यांना साईड-लाईन केलं जाणं (१९९० चे दशक) हे आलेलं आहे. पण हे पुस्तक हातचं राखून आहे हे सतत जाणवत राहतं. अर्थात पुस्तक आत्मचरित्रात्मक आहे हे त्याचं कारण असावं.
       माजी CAG विनोद राय ह्याचं Not just an Accountant: The Diary of Nation’s Conscience Keeperहे इंटरेस्टिंग पुस्तक आहे. 2G, कोळसा खाण आणि अन्य काही सरकारी निर्णयांमधल्या त्रुटी दाखवण्यात CAG चा रोल महत्वाचा होता. ह्या त्रुटी कशा होत्या आणि त्यावरील टीका काय होती ह्याचा चांगला आढावा ह्या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचताना मी कायम विचार करत राहिलो कि CAG ची भूमिका २०१४ च्या सत्ता-बदलात एकदम pivotal आहे. अर्थात राय आपण कसे केवळ आपली ड्युटी निभावत होतो आणि मिडियाने कसा गदारोळ घातला हे पुस्तकात स्पष्ट करतात.
       अजून एक उल्लेखनीय नोंद म्हणजे तमल बंदोपाध्याय ह्यांचे ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक.
       आर.बी.आय. चे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव ह्यांचे ‘हू मूव्हड माय इंटरेस्ट रेट?’ वाचायच्या यादीत आहे. तसेच कौशिक बसू (माजी CEA) ह्यांचेही त्यांच्या भारतातल्या कार्यकाळाचा आढावा घेणारे पुस्तक वाचायचे आहे.   
--           

अमेझॉनच्या किंडल अनलिमिटेडमध्ये भारतीय राजकारण आणि पत्रकारिता ह्यातील व्यक्तींची आणि त्यांच्याशी संबंधित अनेक पुस्तके आहेत. जर झपाट्याने पुस्तके वाचता येत असतील तर १९९ रुपयांच्या मासिक शुल्कात किमान ५-६ पुस्तके वाचता येऊ शकतात.      

Wednesday, November 23, 2016

बिफोर द फ्लड

चलनबदली किंवा लोकसत्ताच्या शब्दांत ‘निश्चलनीकरण’ च्या चर्चा चालू असताना एका मित्राच्या फेसबुक वॉलवर मला ‘बिफोर द फ्लड’ बद्दल वाचायला मिळालं. लिओनार्डो डी कॅप्रिओ असल्याने आणि क्लायमेट चेंजसारख्या विषयावर (जो केवळ हॉक्स आहे असं म्हणणारे, कुठल्याही प्रकारच्या सांख्यिकी पुराव्याशिवाय काहीही छातीठोक म्हणू शकणारे शहाणे आता भारतातही उदयाला आलेले आहेत. दिवाळीच्या वेळेस धुरामुळे होणारे प्रदूषण, किंबहुना दिवाळीच्या धुरामुळे प्रदूषण होते असं म्हणणंच हा कसा हॉक्स आहे हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहेच.) असलेली, काही गंभीर अर्ग्युमेंट करणारी डॉक्युमेंटरी असा थोडा गवगवा ऐकिवात आल्याने मी ती पाहिली.
       माझ्या लक्षात आलेले अमेरिकन मिडिया प्रॉडक्टचे काही ठराविक गुणधर्म: त्यातले हे ढोबळ दोन गट: एक म्हणजे सिनिसिझम+सेक्स+हिंसा किंवा टोकाची देखणी प्रतिकूलता+आशावादी उपायांचा उदय+सोबत भावनिक वगैरे गुदगुल्या किंवा रगडा. ही डॉक्युमेंटरी दुसऱ्या प्रकारात आहे.
       लिओनार्डो अर्ग्युमेंट जरूर करतो: आपण आपली जीवनशैली बदलायला हवी, निवडी अधिक काळजीपूर्वक करायला हव्यात असं. तो कॉन्सपिरसी मांडतो (ऑईल कंपन्या आणि त्यांच्या राजकीय लॉब्या, पाम तेल आणि त्याला निगडीत जगभरचे खाद्य उद्योग), कसे छोटे बदल केल्याने आपण मोठा फरक आणू हे दाखवतो (बीफ विरूद्धचे अर्ग्युमेंट, जे इथल्या इन्टरनेट गो-रक्षकांनी उचललेले आहे पण ते एकूण त्यांच्या अस्मिताधारी आरड्या-ओरड्यापेक्षा फारच जास्त बौद्धिक आहे. लिओनार्डो लंडन मधील कुठल्या संस्कृतीसोहळ्याला येणार आहे असंही काही मी मध्ये वाचलं होतं. पण इथे हे अर्ग्युमेंट आहे ते ‘बीफ उत्पादनात म्हणजे गाईंच्या पालनपोषणात अधिक कार्बन इमिशन होते. त्यापेक्षा कोंबडी पाळा आणि खा असे आहे. म्हणजे गोरक्षा करा, पण त्यांचे संतती नियमन पहिले करा असं.), पोप-अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्यांची सूज्ञ मते आणतो, धुरकट बीजिंग आणि त्याच्या तुलनेत फारच स्वच्छ वाटणारी दिल्ली आणतो, तुम्ही अमेरिकन पहिले स्वतःला सुधारा असं आवेशाने सांगणारी सुनिता नारायण आणतो, एरीअल शॉटस, व्होईसओव्हर आणि त्याला साजेसे पण न घडलेल्या घटना प्रतीत करू इच्छिणारे व्हिज्युअल्स आणतो, कर्करोगाने काही दिवसांत मरण्याची दाट शक्यता असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञाचे कूल सिम्युलेशन्स आणि मानवी स्वभावातील बदलाच्या शक्यतेवर विश्वास ठेवणारे आशावादी झालरीचे भाकीत आणतो. एक प्रपोगंडा, वैयक्तिक हित किंवा कळपाच्या दबावाचा दर्प नसलेला, जगाच्या कल्याणाचा प्रपोगंडा म्हणून ‘बिफोर द फ्लड’ मध्ये सर्व आहे. माझ्या स्वतःच्या मते आवश्यकतेपेक्षा जास्त भावनिक मामला झालेला आहे, पण तीच मुख्य सेलिंग स्ट्रॅटेजी असण्याची शक्यता जास्त आहे. एकूणात क्लायमेट चेंज काय आहे ह्याची कोणाला पहिल्यांदा ओळख करून द्यायला ही चांगली फिल्म आहे.
       क्लायमेट चेंजबद्दल एकदम टोकाची निराशावादी, उशीर झाला आहे पण आपण अंत लांबवू शकू अशी, उशीर व्हायच्या आधी संकटांची चाहूल घेऊन पावले उचलूया अशी आणि वेळीच काही केलं तर क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे परतवताही येईल अशा सगळ्या भूमिका ह्यात आहेत. वेगवेगळी अर्ग्युमेंट मांडायला व्हिज्युअल्स तगडी आहेत.
       एलॉन मस्क आणि पिअर्स सेलर्स ह्यांच्या मुलाखती मला सर्वात जास्त आवडल्या आहेत. अर्थतज्ञ मॅनक्यू (Mankiw) ह्यांनी कार्बन कर आणि लोकांची डिमांड बदलणे हे राजकीय भूमिका आणि एकूण उपभोग बदलायला कसे प्रभावशाली अस्त्र असू शकते हे थोडे पुस्तकी पण अचूक मांडले आहे.
       आपले बालपण, त्यातले पाळण्यावरचे (बायाबलिक रेफरन्स असलेले) चित्र, आपले वेगळेपणा असणारे पालक, मग माझे पर्यावरणीय जीवन ह्या सगळ्या लिओनार्डोच्या वापरातून अनेकदा फोकस गंडलेला वाटतो. लिओनार्डोची क्लायमेट चेंजला प्रतिसाद जनरेट करायची क्वेस्ट अशीच एकूण मांडणी होते. विशेषतः पोपला भेटणे, त्याच्या हाताचे चुंबन आणि पोपने क्लायमेट चेंजबाबत जनतेला आवाहन करणे कसे थोर हे सगळं केवळ आपल्या प्रमुख उपभोक्त्यांना खूष करायला का काय असं मला वाटलं का कडवट औषध साखरेच्या (अफूच्या म्हणा!) वेष्टनात द्यायचा प्रकार?
--
       डॉक्युमेंटरी बघताना मला मध्ये मध्ये दर्दभरे उसासे सोडणाऱ्या सत्यमेव जयते’ च्या आमीर खानची आठवण आली. सध्या सत्य जे अजिंक्य होऊन राज्य करतच असल्याने शोची गरजच राहिलेली नाही का धोबीपछाड मिळाल्याने पाणी पाणी होऊन शो करायची अवस्थाच राहिलेली नाही हे आता लवकर कळेलच.
--
       मी स्वतः ‘क्लायमेट चेंज’ बाबत कुठल्याही टोकाला नाही. असेलच तर पर्यावरण अन-प्रेडीक्टेबल होतं आहे आणि माणसाने निसर्गाच्या काही संरचना उद्ध्वस्त केल्या आहेत इतपत मी कललेलो आहे. पण घरात बेसिनला, अंघोळीला आणि मल-मूत्र विसर्जनाला पुरेसं पाणी असावं आणि वर्षभरात कधीही भयावह उकडू नये ह्याच माझ्या पर्यावरणाकडे मागण्या असतात. माझी कार्बन फूटप्रिंट मला वाटते तेवढी थोडकी नसून फारच जास्त असेल ह्याची मला जाणीव आहे. पण माझे सारे संभाव्य उपभोग टाळून मी पर्यावरणीय संन्यासी होईन हे तर मी बिलकूल करणार नाही. पूर्वी मी असा होतो. शॉवरने अंघोळ केल्यास फार पाणी वाया जाईल आणि पृथ्वीला उजाड केल्याचे पातक माथी येईल म्हणून मी बादलीत मर्यादित पाणी घेऊन अंघोळ करीत असे. आता मी आली लहर केला शॉवर (अर्थात जल-नियमन नसेल तर!) असा राहतो. सांभाळण्याची कटकट जास्त आणि चालवायला रस्ते नाहीत म्हणून माझ्याकडे चारचाकी नाही. माझे उपद्रव मूल्य वधारले की मी सांड गाडी घेईन एखादी ही आपली कामना आहे. ए.सी. च्या बाबतीत मी डायसी आहे. पण एलॉन मस्क म्हटलंय डॉक्युमेंटरीमध्ये की अनेक लोक लँडलाईन न वापरता मोबाईल वापरू लागले तशा अर्थाने जर मला माझे उपभोग न काटता पर्यावरण स्नेही उर्जास्त्रोत वापरायची संधी मिळाली तर मी ती नक्की घेईन. म्हणजे आचरणाने मी पर्यावरणाच्या tragedy of commons मधला एक हपापलेला मेंबर आहे, पण मी क्लायमेट चेंज हॉक्स आहे असं म्हणत नाही.
--
       पर्यावरण म्हटलं कि मला दिलीप कुलकर्णी आठवतात. त्यांच्या ‘निसर्गायण’ मध्ये आनंद म्हणजे काय ह्यावर एक प्रकरण आहे. उपभोग, आनंद आणि उपभोगाची अविरत भूक ह्याचं लॉजिक कळायला मला त्याने मदत झालेली.
       जवळपास वर्षभरापूर्वी दिलीप कुलकर्णी ह्यांचं एक भाषण मी ऐकलं. अपारंपरिक उर्जास्त्रोत हेही सरतेशेवटी पर्यावरणस्नेही नाहीत ह्याची entropy च्या आधारे, तात्विक वाटावी अशी मांडणी त्यांनी केली होती. उपभोगांना आळा घालणं, शहरांची वाढ थांबवणं अन्यथा सर्वनाश अशी त्यांची एकूण बैठक आहे. आणि आपल्या विचारांना जोडलेलं टोकाचं आयुष्य ते जगतात.
---
       माझ्या मते ‘पर्यावरण वगैरेची जाणीव’ हे एक लक्झरी गुड आहे. उत्पनाच्या वरच्या पातळ्यांवर ते हवंहवसं वाटू लागतं, जसं परदेशातले हॉलिडेज, आयफोन, सेकंड होम्स, गेटटुगेदर हेही वेगवेगळ्या वरच्या पातळ्यांना हवंहवं वाटू लागतं. लिओनार्डो आणि अमेरिका, विकसित देश ह्यांना जाणीव आहे ह्याचं कारण त्यांची उत्पन्न पातळी आहे.
भारताला ती उत्पन्नाची पातळी आली कि जाणीवही येईल. आधी पोटभर खायला मिळेल, मग ओरबाडून घेतलं तरी उरेल इतकी सुबत्ता येईल आणि मग आपण ओरबाडतो आहोत ह्याची जाणीव येईल. फार ब्रॉड ब्रश मॉडेल आहे हे.
       पण हे ठीक आहे जर क्लायमेट चेंज सावकाश होणार असेल. पुढच्या काही दशकांत काही भाग उजाड होणार असतील, काही भाग पाण्याखाली जाणार असतील, पुरेसं अन्नही पिकणार नाही असं होणार असेल (म्हणजे असं होणार आहे ह्याचे ठाम पुरावे किंवा तशी मनोभूमिका बनेल) तर काय हा मोठा प्रश्न आहे.
--
       अमिताव घोष ह्यांचं ‘द ग्रेट डीरेंजमेंट’ वाचायचं आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे मला पर्यावरणीय संकटाचे रीफ्युजी, त्यांचे नुकसान, संभाव्यता जवळून अभ्यासायच्या आहेत.
       आपले उपभोग घटवून, बेअर मिनिमममध्ये राहण्याची stoic शक्यता मला खुणावते अधून-मधून, पण त्यात पर्यावरण वगैरेपेक्षा स्वतःच्या आसक्त थुलथुलीतपणाची चीड असते.
       ह्या शहराने दूर-दूर पर्यंत आपले बुभिक्षित ठसे मारून स्वतःला हरवायचे सारे निवांत, सिमेंटच्या प्रवाहात न आलेले कोपरे हद्दपार केले आहेत. आय हेट इट.
       उद्या प्रचंड दुष्काळ पडला, लोक, मी, माझे सगे-सोयरे अन्नाला मोताद झाले किंवा पुरात सापडले तर, ह्यावर मी विचार करतो. असा अनुभव नाही ही कमतरता का? का माझ्या पूर्वजांचे लकी स्ट्रोक्स? का असे अनुभव कमीत-कमी लोकांना असणं ही आत्ताच्या काळाची स्वाभाविकता? 
       क्लायमेट चेंज हे भिंतीवर दिसणाऱ्या भयावह आकृत्यांसारखं विक्राळ आहे. पण त्या नेमक्या कशाच्या सावल्या आहेत? आपले खेळ आहेत कि काळाचे पडघम?

                       

Tuesday, November 1, 2016

मानलेल्या भाऊबीजेचा फराळ

    आपल्या मानलेल्या बहिणीकडे, जिची आई पूर्वी दोघांच्या घरी धुणी-भांडी करायची अशा बहिणीकडे, पुण्याच्या डावीकडच्या पडक्या भूत बंगल्यात अजून त्वेषाने राहणारा, पिढीजात सातवा मालक असा भाऊ आणि पूर्वी त्यांच्याच बाजूला केवळ ग्रंथ-पठण आणि ज्योतिष्य करून राहणारा, पण एकदम नागपूरला जाऊन नशीब काढणारा कर्तबगार भाऊ असे दोघी भाऊबीजेला आलेले होते. त्याच्यासमोर परंपरागत फराळ आणि नवऱ्याला दर दिवाळीला मिळणारा हलकासा सुकामेवा ठेवून बहीण स्वयंपाक घरात काम करत होती.
“मग? कधी काढताय वाडा? किती दिवस पडक्या वाड्यात राहणार? सगळे पूर्वज तुमचे विस्मृतीत गेले, तुम्ही कुठला अजून पीळ भरताय जळल्या मिश्यांना?” असं म्हणून नागपूरकर धाडधाड हसू लागले.
‘हसा. हसा. इथे लेकहो, लोकांना संस्कृतीच्या चिथावण्या द्या आणि तुम्ही लावा घरात कमोड. मान्य का करत नाही कि गरज हीच संस्कृतीची जननी आहे. बाकी सब झूट.’
‘अहो किती दिवस तुम्ही तात्विक सुसंगती घेऊन बसणार आहात. प्रेमात आणि युद्धात सारं क्षम्य असतं आणि रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यामुळे कधीही काहीही करणं योग्यच असतं.’
‘नाही. नाही. क्षम्य असलं तरी ते योग्य नाही. योग्य असेल तर क्षमा मागायची वेळच येत नाही. ‘ असं म्हणून पुणेकर थोडे खाकरले.
“तुम्ही अशा चिकित्सा करत बसा. जग किती पुढे जाऊन राहिलं आणि तुम्हाला वाड्याबाहेर पडता येईना राव”
“अहो, मी वाड्याबाहेर पडलो नसेन एकवेळ, पण लोकांना खड्ड्यात ढकलून त्यावर स्कायस्क्रेपर तर नाही बांधले.”
“कुठे अशा उपमा आणि उत्प्रेक्षात बोलता भाऊ. सिधी सिधी बात बोला कि. घ्या, थोडे अनारसे घ्या. काय जाळी पडली आहे ताई बाकी. व्यवसाय का करत नाहीस तू दिवाळी फराळाचा. आम्हाला लागतात आमच्या क्लायंटना द्यायला. “
चिवड्याची चिमूट पटकन तोंडात ढकलून पुणेकर म्हटले, “तुमचे क्लायंट म्हणजे तेच बीजिंगवाले ना, आणि दुबईवाले पण. आणि इथे लोकांना मारे सांगा चायनीज मालावर बंदी म्हणून. “
“अहो, उगाच वड्याचं तेल वांग्यावर काहून काढून राहिले भाऊ तुम्ही. मी तर कोणाला म्हटलं नाही घेऊ नका चायनीज माल म्हणून. “
“पण चूक आहे हे तरी कुठे म्हटलात. “
“काही न म्हणणं असंही काही असतं का नाही.”
“असतं ना. पण केवळ तुम्हालाच असतं असं ना. बाकी कोणी असं म्हटलं, कि अगर तुम हमारे साथ नाही, तो पाकिस्तान के साथ असं ना!”
“वाड्याच्या कोनाड्यासारखे तुम्ही पुराणे पुराणे किस्से धुंडून राहिले भाऊ. अहो, वर्तमानात या.” असं म्हणून नागपुरी भाऊंनी वर्तमान पत्राच्या अनेकाविध पानांपैकी एक पुणेकरांना दाखवलं.
“आहा, दिवाळी म्हणजे ह्याच्या-त्याच्यासाठी दीप लावा आणि जुन्या गोष्टी दानाच्या नावाखाली दडपून वाटून टाका. अहो, एवढा जर समाजाचा, युद्धाचा शोक झाला आहे तर लावूच नका फटाके, घेऊच नका नवे कपडे. उगाच संस्कृती संस्कृती म्हणत आपली कळप बनवून आनंदी व्हायची भूक भागवायची.”
“कसलं डावरं तर्कट हे! भगवंता, नरेंद्रा, देवेन्द्रा, कधी निघणार ही आमच्या डोळ्यावरची झापडे.”
“करा, खिल्ली उडवा. प्रतिवाद नसेल तर हाच तुमचा क्षम्य प्रतिसाद मनाला पाहिजे.”
“अहो, तुमच्या भाबड्या प्रश्नांना कसला आलाय प्रतिवाद. इथल्या हजारो लोकांनी पाद जरी सारला तरी तुम्ही गाडले जाल. पण विचारलंच आहात तर मी तुम्हाला उकल सांगतो. सण साजरा करणं ही सुद्धा संस्कृती आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करणं ही सुद्धा. फटाके, नवे कपडे आपण सण साजरा करायला घेतो. आणि त्यावेळी अनेकांप्रती कृतज्ञता, बांधिलकी व्यक्त करतो.”
“केवळ व्यक्त करून संपते का कृतज्ञता आणि बांधिलकी? तिच्याशी सुसंगत वागत नसू तर आपण दांभिक आहोत असं नाही वाटत तुम्हाला? केवळ प्रदर्शनीय दिखावा करण्यापेक्षा लष्करी सेवा सक्तीची करा. आणि जमिनींचे समान फेरवाटप करा सगळ्या शहर-गाव-जंगल वासियांना. बंधुभाव आहे, तर एकाला भरपेट आणि एक भुकेने मेलेला का? त्यापेक्षा जे आहे ते वाटाच कि दोघांत समान.” प्रचंड सात्विक संतापाने चकलीचा खुरमुरीत तुकडा तोडत पुणेकर म्हटले.
“आलातच कि नाही शेवटी तुमच्या मूळ मुद्द्यांवर. अहो, सगळे लोक सारखे नसतात.”
“आता, द्या स्मृतींचे दाखले. पण ‘बोले तैसा चाले’ हे बरंच अलीकडलं वाक्य काही तुम्हाला आठवणार नाही.
”अहो, आचरणाची सुसंगती ही फार पुढची पायरी आहे. पहिले लोकांच्या मनात तर यायला लागू दे. तिथेही किती अडसर असे”
“वा! वा!! तुम्हाला प्रश्न विचारणारा अडसर.”
“प्रश्न विचारून काय साधलंय का हो. उत्तरं द्यायला हवीत. प्रश्न तर असा फराळ, किंवा गांजा वगैरे मारून कोणीही विचारेल.” नागपूरकरांनी चिरोटा तोंडात दाबत म्हटलं.
“खरंय. प्रश्नही तुम्हीच ठरवावेत आणि उत्तरंही. लोकांनी फक्त तुमच्या पाठी यावं. आणि न येणाऱ्यांना तुम्ही हाकलून द्यावं. एवढ्यासाठी मात्र तुम्हाला खरं सांस्कृतिक म्हटलं पाहिजेच.”
“दादा, आता ब्रेक घ्या जरा. वहिनींचा फोन आलाय. त्या आल्यात स्टँडवर. घेऊन या जरा. “ आतून ताईचा आवाज आला.
नागपूरकरांनी ड्रायव्हरला फोन लावला. डावीकडच्या पडक्या वाड्याचे मालक संतापाने कसेनुसे होऊन खिडकीबाहेर लावलेल्या, तीन-चार वर्षापूर्वी घेतलेल्या चायनीज आकाशकंदिलाकडे बघत राहिले.   
  

      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...