Tuesday, February 16, 2016

ब्लड टेलीग्राम

अमेरिकन डिप्लोमॅट आर्चर ब्लड, जे १९७१ मध्ये ढाका मध्ये होते त्यांनी त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्याने बांगलादेशात (त्यावेळचा ईस्ट पाकिस्तान) जे अत्याचार केले त्याबाबत वेळोवेळी आपल्या अमेरिकेतील वरिष्ठांना माहिती कळवली. एका टप्प्याला त्यांनी आणि त्यांच्या ढाका कौन्सुलेटमधील सहकाऱ्यांनी अमेरिकेच्या धोरणाचा निषेध करणारा संदेशसुद्धा आपल्या वरिष्ठांना पाठवला. त्यावरून ‘ब्लड टेलीग्राम’ हे नाव Gary Bass ह्यांनी आपल्या पुस्तकाला दिलेले आहे.
       हे पुस्तक १९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाबद्दल आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे सहकारी किसिंजर ह्या दोघांनी जाणीवपूर्वक बांगलादेशातील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले, पाकिस्तानची पाठराखण केली आणि भारतावर दबाव आणला. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी हुकूमशहा याह्या खान हे अमेरिकेला चीनसोबत परराष्ट्र संबंध पुनरुज्जीवित करण्यात मदत करत होते आणि अमेरिकेसाठी ही चीनी संधी महत्वाची असल्याने निक्सन आणि किसिंजर ह्यांनी याह्या खान ह्यांच्या बांगलादेशमधील असंतोष चिरडण्याच्या क्रूरतेकडे दुर्लक्ष केले. किसिंजर आणि निक्सन ह्यांना तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये काय चालू आहे ह्याची माहिती होती, पण त्यांनी पाकिस्तानची पाठराखण करण्याचा, आणि पर्यायाने मुजीब रेहमान आणि भारत ह्यांच्या लोकशाहीविरुद्ध उभा रहायचा निर्णय घेतला अशी मांडणी हे पुस्तक करते.
       किसिंजर आणि निक्सन ह्यांच्या टेप्सचा अभ्यास करून केलेली त्यांच्या निर्णयांची छाननी हा पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे. पण त्याचसोबत भारतीय राजनैतिक अधिकारी, भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी, भारतीय आणि अमेरिकन मिडिया ह्या सर्वांच्या भूमिकांचीही पडताळणी ह्या पुस्तकात आहे.
       पुस्तकाची मांडणी उत्कंठावर्धक आहे. पण कुठेही सांगण्याचा सोस हा होलसेल विधाने करण्यात रुपांतरीत होत नाही. (हे साऱ्याच वेल रिसर्चड आणि वेल रिटन पुस्तकांचे वैशिष्ट्य असते!). अनेक मुलाखती आणि राजकीय कागदपत्रे ह्यांच्या सहाय्याने ही गोष्ट उलगडत जाते.(अर्थात इंदिरा गांधी ह्यांचे पेपर्स हे अजून रिसर्चसाठी उपलब्ध नाहीत!) पुस्तक frank आहे, म्हणजे बांगलादेशमध्ये मारले गेलेल्यांमध्ये आणि भारतात निर्वासित म्हणून आलेल्यांमध्ये प्रामुख्याने हिंदू होते आणि असे अर्ग्युमेंट आर्चर ब्लड ह्यांनी थेट आणि भारतीय सरकारने अप्रत्यक्षपणे केले होते हे पुस्तक सांगते. त्याचवेळी पाकिस्तानकडून अधिकृतरित्या(!) युद्ध सुरु व्हायच्या अगोदरच भारतीय लष्कराने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील मुक्तीबाहिनीला प्रशिक्षित करणे आणि वेळप्रसंगी सीमारेषा ओलांडून मुक्तीबाहिनीला मदत करणे ह्या गोष्टी सुरु केल्या होत्या अशीही मांडणी पुस्तकात आहे.
--
       मी खरंतर किसिंजरचं ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचत होतो. चूक-बरोबर माहिती नाही, पण किसिंजर ह्यांची शैली आणि वाचकाला ग्रीप करण्याची क्षमता जबरी आहे. मी ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचायला लागलो कारण मार्क झुकरबर्गबद्दलच्या एका फोटोत मला हे पुस्तक दिसले. त्याबद्दल बोलताना एका मित्राने मला ‘ब्लड टेलीग्राम’ बद्दल सांगितले. आता मला किसिंजर ह्यांचं ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचायला थोडी शंकाच आहे. आपल्या चुका आणि आडाखे बरोबर होते हे ठरवण्यासाठी तर त्यांनी पुस्तके लिहिली नाहीत ना ह्या शंकेनेच मी ते वाचेन.
--
       देशभक्ती आणि देशद्रोह ह्यांच्या (बहुतांशवेळा वेळा निरर्थक) वाद-विवादात काही महत्वाचे प्रश्न, गृहीतके असतात. उदारमतवादी लोकशाही का बहुमत दहशतवादी लोकशाही हा असाच एक महत्वाचा प्रश्न आहे. भारतासारख्या देशात, जिथे सामाजिक आणि आर्थिक प्रक्रियांच्या विरोधाभासात राजकीय आणि सामाजिक उदारमतवाद रोपण करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नांची तात्विक पार्श्वभूमी समजून घेणे मला महत्वाचे वाटते. ही तात्विक पार्श्वभूमी समजून घेताना घटनांची होईल तितकी न्युट्रल मांडणी लक्षात येणे महत्वाचे असते. पुढे दिलेली पुस्तके मी ह्या अर्थाने, माहिती आणि चिकित्सा, वाचण्याचा बेत करतो आहे किंवा मी वाचली आहेत. आणि ही यादी एकदम तोकडी आहे.
१.       इंडिया आफ्टर गांधी : इट इज अ मस्ट बुक. आणि तुम्हाला गुहांची मते पटतात किंवा नाही म्हणून नाही, तर १९४७ नंतरच्या देशाच्या प्रवासाचे factual ओघवते प्रवासवर्णन अशा अर्थाने हे पुस्तक फार महत्वाचे आहे.
२.       आयडिया ऑफ इंडिया : सुनील खिलनानी – छोटे पण डेन्स पुस्तक. सध्या वाचतो आहे.       
३.       1971- A Global History of the Creation of Bangladesh : श्रीनाथ राघवन
४.       India’s China War – Nevil Maxwell : हे तसे जुने पुस्तक आहे.


Thursday, February 11, 2016

स्मार्ट सिटी आणि च्युत्या बघ्या

बघ्या सकाळी आपल्या झोपेच्या आणि भयंकर दृकश्राव्य स्वप्नांच्या झांगड्गुत्त्यात असताना बेल वाजली. तसं आपल्या चड्डी-बनियानमध्ये बघ्याने किलकिलं दार उघडलं. तेव्हा वॉचमन म्हटला, आज पानी नही.
       बोचा.
       काल सकाळी वॉचमन असेच शब्द बोलला होता. थोडे आशावादी, २ घंटा पानी आयेगा असे.
       बघ्याने तपासणी केली तर पाण्याची अर्धी बाटली, एक टमरेल आणि १ पिंप. ह्यात दात घासायचे, हगायचं, कॉफीचं भांडं धुवून मग धुवून कॉफी करायची, अंघोळ करायची. बघ्याने सुरू होताच गांड लागलेला दिवस अशी काल्पनिक फुली मारून अशा अनेक दिवसांच्या सुकलेल्या चळतीत हाही दिवस टाकला. मग उपजिविकेस जाण्याच्या क्रिया उरकून अपरिहार्य ताजातवाना होत धुरके आणि थेंबभर विरका हिवाळा ह्यातून तो रस्त्याला लागला.
       रस्त्याच्या कोपऱ्याला रिक्षा दाटल्या होत्या. त्यांचा स्टँड सोडून त्यांनी इकडे दाटी का केली ह्याचं कारण एकदम वाजू लागलं. भक्तीपर गीतांच्या आवाजाने बघ्याच तोंड वळलं तिकडे भंडाऱ्याचा मांडव पडलेला होता. बाया-बापड्या पाया पडायला येत होत्या. रस्त्याच्या समोरच्या बाजूला हार-फुले विकायला आलेल्या कुटुंबांनी बस्तान मांडलं होतं. बाया-पोरी फटाफट हार बनवत होत्या. बापे बिडी पीत मांडणी करत होते. काही पोरं आईला लुचत होती, बाकीची झोपली होती. लोकही जमेल तसे विविध भावमुद्रा आणि योगमुद्रा, जसे छातीला उजवा हात टेकवून मान तुकवणे, उजव्या हाताचे बोट दोनदा तोंडासमोर हलवणे आणि मग छातीला लावणे, काही क्लासिक नमस्कार, काही सुपर चपला काढून देवळाच्या बाहेरून नमस्कार असे आपापल्या श्रद्धेची नोंद करत होते. नावाला जागून बघ्याने हे पाहून घेतलं. मग नुकत्याच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत टपरी हरवलेल्या आणि त्यामुळे सरतेशेवटी एकदम रस्त्यावर आलेल्या चहावाल्याकडे चहा पीत तो समोरील मंदिराकडे पाहू लागला.
       एक भव्य कमान, त्यावर एक पूर्ण पुरुष, बाकी शुभेच्छुक मुंडकी. जवळ कार्यक्रम पत्रिका. त्यात संध्याकाळी याग. आणि बाजूला भंडारा.
       म्हणजे संध्याकाळी ह्या चौकात ट्राफिकचा राडा अशीही नोंद बघ्याने केली. तेवढयात भडजी लोकांचा जथ्थ्या तिथे आला. आपापल्या दुचाक्या पार्क करून, तिथेच पुढे मांडवाच्या कडेला, आपापल्या पिशव्या घेत ते मांडवात प्रवेश करते झाले.
       आपल्यालाही असंच लोकल काम असतं तर कित्ती मज्जा असं दैनंदिन हळहळत बघ्या रस्त्याला लागला.
       पुढे रिकामी भांडी, बादल्या, बुधले, पिंप असं घेऊन बाया, बुढया, घरात उरलेली पोरं असे सगळे लाईन लावून उभे होते. मागच्या दुकानांचे रखवालदार त्यांच्याकडे सहानुभूतीने बघत होते.
       वाट पाहणं आणि आणि मग लाईन लावून त्या वाट पाहण्याची मेरिटोक्रसी बनवणं हे ह्या शहरात कायम घडतं. मग कोणीतरी स्मार्ट येतं, रांगेच्या बाजूने. रांगवाले आपल्या च्युत्येपणाची उघड-वाघड सिद्धता बघत राहतात. आपल्या ह्या मूलभूत स्टेटस अपडेटवर बघ्याला बरं वाटू लागलं. 
       पुढे फ्लेक्स होता. स्मार्ट सिटीबद्दल निबंध आणि लोगो स्पर्धा.
--
       लोकल ट्रेनमध्ये हातातले पुस्तक, बाकीच्यांच्या मोबाईलवरील पिक्चर आणि चर्चेचे उष्टे तुकडे ह्या सगळ्यांत बघ्या यथेच्छ डुंबत होता. जमेल तश्या पुढच्या मागच्याला ढुश्या देत होता. आणि आपली अच्छी सीट कधी येणार ह्याकडे काटेकोर लक्ष ठेवून होता.
       बायका आणि सेक्स ह्यांबद्दलचे नियमित जोक झाल्यावर कोणीतरी म्हटलं, आमच्याकडे पाण्याची बोंब आज.
       द्या अजून कमळाला मतं.
       आता पाऊस काय कमळ पाडतं का? काय बोलता..
       मग तू टॉवेल आणि चड्डी घेऊन ऑफिसमध्ये अंघोळ करणार का? हागतो तर रोज तिथेच. ह्यावर न राहवून बघ्यापण हसला.
       नाही रे. पण अजून चार महिने जायचे आहेत. कसं होणार?
       स्टोअर करा. मी दुसरी टाकी लावली आहे घरात.
       अरे पण धरणात पाणी नको का? तू टाकी लावून काय फायदा?
       त्यात एक अनेक वर्षाचे अनुभवी सरकारी नोकर, घरी चार एसी आणि १६००० महिना इलेक्ट्रीसिटी बिल असलेले म्हटले, अहो पाणी आहे. आणि तुम्ही सोसायटीवाले मिळून सगळे नगरसेवकाला घ्या कोपऱ्यात. देईल तो टँकर. निवडणुका होत्या म्हणून आधी भरपूर पाणी दिलं. आता टँकर देईल.
       पुढे एकदम स्टेशन आलं. परत गर्दी हिंदकळली. परत थोडे सेक्सचे, थोडे दारूचे, थोडे आज न आलेल्या माणसांचे जोक्स झाले. मग परत लोक आपापल्या मोबाईलमध्ये बुडून गेले.
       बघ्या विचार करत राहिला, धरणात नेमकं पाणी किती शिल्लक आहे? आणि हा मान्सूनपण वाईट गेला तर? म्हणजे एल निनो तर उष्ण आहे, प्रेडिक्शन आहे तसं भयंकर उन्हाळा आणि...
       बघ्या कासावीस झाला. च्युत्या..
--
       बाकी ऑफिसात ए सी होता. बघ्याचे प्रश्न निवले. त्याचा बॉस म्हटला की अरे स्मार्ट सिटीच्या फंक्शनमध्ये एक सेमिनार आहे मुंबईवर. तुझ्याकडे आहेत का काही पॉइंट्स.
       बॉस साला जुहू मध्ये राहतो. बॉस मुळातच स्मार्ट आहे.
       ह्या टॉवरमधले लोक स्मार्ट आहेत. क्रेडिटकार्डधारी फॉर्मल. एम.बी.ए. आणि तद्भव किंवा तत्सम अशा डिग्र्यानी परिपूर्ण. ह्यांनाच ह्या शहरात रहायचा हक्क आहे. ह्यांनाच पाणी मिळायला हवे. चोवीस तास. स्वीमिंग पूल. डीस्ट्रेस व्हायला शॉवर.
       माझ्याकडे पॉइंट आहे बॉस. प्राईज रॅशनलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा. वापरेल तो पैसे देईल आणि पैसे देईल तो वापरेल.
       बॉस सखुश हसला. बघ्या म्हटला मनात, पगार वाढतो तर काय घेऊ?
       मग बाकी दिवस गेला सैल सैल. बाया-पोरी, त्यांच्याकडे बघणारे बापे, झुंडीने सिगरेट पिणारे पुरुष आणि थोडक्या बाया, इडली-सांबार किंवा हाफ मिल.
--
       मग परतीच्या वाटेवर, दिवसाचे थोडे तास उरले ते तरी आपले आपले जगू ह्या शीळपट उत्साहाने बघ्या नेमकी लोकल बघून त्यात दमदार चढाई करून टेचाने बसला. मग त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं. तसे परत सगळे मोबाईलला जुगलेले किंवा माना पाडून झोपी गेलेले.
आपल्या सराईत मिडीऑकर होण्याचं बघ्याला एकदम भडभडून आलं.
बघ्याने आपलं अपरिहार्य वाढत गेलेलं वय परत एकदा खुंट्याला लावलं. वापरायच्या आधीच कापायची घाई केलेल्या साऱ्या दोरांना श्रद्धांजली वाहिली. मग त्याने हेडफोन काढले. बर्फ पडणाऱ्या, भला मोठा एच.डी.आय. असलेल्या देशातला मानवी नातेसंबंधांचे तरल वगैरे पेच दाखवणारा एक मूव्ही सिलेक्ट केला. आणि प्रतिमांच्या भिरभिर नशेवर, डौलदार बिल्डिंग आणि मोकळ्या रस्त्यांच्या आयुष्यांना सहा इंची स्क्रीनवर पहात पहात तो आपल्या बिळाकडे निघाला.
--
       चौकात यागाचा धूर झालेला. बाया हार विकायला बसलेल्या, पोरं परत लुचलेली किंवा झोपलेली, बापे बिड्या पीत मागे निर्विकार.
       तेवढयात एका वाहनाने स्मार्ट पद्धतीने वाहन वळवलं. त्याची बायको उतरली. तिने हार घेतले. मग दोघेही गाडीतून उतरून यागाच्या रांगेत उभे राहिले.
       एक आजोबा हळहळले, राँग साईड, पार्किंग काही नाही असं. मग त्यानंतर टाकायचा तो नेमस्त सुस्कारा टाकून त्यांनी हातातला पुडका हार विकणाऱ्या बायांना दिला. चॅरिटीच्या हलक्या आनंदाने त्यांनी देवाला हात जोडले.
       हार विकणाऱ्या बाईच्या पोऱ्याने बिस्किटं खायला सुरुवात केली.
       रांगेतले स्मार्ट जोडपे दर्शनाच्या चरम सीमेला पोचले. कळकट शर्ट आणि अदृश्य चड्डी घातलेल्या अधाशी पोराच्या आईने बनवलेले हार त्यांनी पुजाऱ्याला दिले. मग ते क्षण-दोन क्षण हात जोडून उभे राहिले.
--
       बघ्याला वॉचमन दिसला आणि त्याच्या पोटात गोळा आला. एकदा गांड आणि एकदा तोंड धुता येईल एवढंच पाणी बाकी आहे.
       ‘साब, पानी छोडा था दो घंटा पहिले. आप थे नही.’
       आता उद्या सकाळची वाट पाहणं आलं.
       बघ्याने बिसलेरीच्या दोन बाटल्या विकत घेतल्या. स्मॉल टॉक करताना दुकानदार त्याला राजस्थान किती भयंकर हे सांगू लागला.
       आपल्या काडेपेटीकडे बघ्या जात असताना नेबरने बघ्याला छान स्माईल दिलं. आणि मगासचच वॉचमनने सांगितलेलं मर्फी लॉचं सत्यही.
       बघ्याला दुहेरी वाईट वाटलं, आपल्याकडे पाणी नाही आणि शेजारच्याकडे आहे.
       आपले डेली एक्झिस्टेन्शिअल ओझे आणि सोबत दूध, ब्रेड, अंडी, केक घेऊन बघ्या घरी परतला. बिळात आल्यावर त्याला हायसं वाटलं. त्याने झपाट्याने नळ फिरवले. त्यातून थोडे थेंब पडले.
       उद्या, पुढचे चार महिने, राज्यातला दुष्काळ, एल निनो, मान्सून, हांडे, पिंपे घेऊन वाट पाहणारे लोक हे सगळं पाहून बघ्याला एकच वाटलं, जे नेहमीच वाटतं. च्युत्ये आहोत आपण.
       ह्या प्रश्नांना बगल देऊन निघून जा आणि निखळ वैचारिक सहानुभूतीदार व्हा. किंवा सारं काही विकत घेण्याचे पॅकेज मिळवा. स्टोअर करा. स्टोअर करा.

       आपल्याला होणाऱ्या सत्याच्या विलक्षण पण सवयींच्या साक्षात्कारात बघ्या झोपून जाईल. उद्या नळातून सवयीच्या घूरघुरीची पाण्याची धार येईल आणि त्यात सारे साक्षात्कार वाहून सराईत मिडीऑक्रीटी तेवढी तवंग बनून राहील.                      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...