Thursday, June 12, 2014

अ लोनली अँड फ्रेंडली जिबरीश

सकाळी हगताना माझ्या डोक्यात दिवसभराच्या अडाणचोटपणाचे प्रश्न येत असतात. माझ्या मते माझ्या भिरभिरत जगायची सवय झालेल्या मेंदूला कालच्या दिवसाचा हँगओव्हर उतरत असताना आज साठी काहीतरी चढवून घ्यायची गरज असते. मग मी असे प्रश्न घेतो.
       तर हा प्रश्न काय होता की आपण सत्य असं जे काही असतं त्याला फिक्शनने सबस्टिट्यूट करू शकतो काय. सकाळी सकाळी वाटतं तसं मला हा प्रश्न एकदम फंडामेंटल वाटला. मग ब्रश करताना, दातांचे एक एक प्रकार टप्प्याटप्प्याने घासताना मी माझ्या प्रश्नाचा तुकड्या-तुकड्याने आणि टप्प्या-टप्प्याने विचार करू लागलो. आणि पहिल्या टप्प्याला हिंदकळलो.
       तुम्ही गेस केलं असेल तर हा पहिला तुकडा म्हणजे ‘सत्य’ काय असतं बुवा. म्हणजे ह्यावर थोर थोर विचारवंत वगैरे खल करून गेले आहेत. आणि आपला काही असला पाड नाही. पण म्हणजे काही गोष्टी मला माहिती आहेत, मी त्या ऐकल्या-पाहिल्या आहेत, आपल्या त्वचेने, जिभेने अनुभवल्या आहेत. पण उद्या तुम्ही मला विचारलात की हं, कर पाहू सिद्ध आता तुला सत्य वाटणाऱ्या ह्या गोष्टी तर मी त्यातल्या काही गोष्टी सिद्ध करूच शकणार नाही. आता हे सिद्ध करणं काय आहे? तर म्हणजे तुम्ही तुमच्या तर्काच्या आधाराने निष्कर्ष काढू शकाल असं काहीतरी पुराव्यासारखा मी तुम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे मी अमुक एक बाईचे अपत्य आहे हे सिद्ध करायचं आहे मला तर मी तुम्हाला डी.एन.ए. टेस्ट वगैरे करून त्याचे निर्णय देऊ शकतो. पण वयाच्या अमुक एक वर्षी मी पहिल्यांदा हस्तमैथुन केलं ह्याचा काही पुरावा सद्यस्थितीत मी तुम्हाला देऊ शकणार नाही. हे उदाहरण थोडं असांस्कृतिक आहे, पण ते जबरी असल्याकारणाने दिलं होतं. थोडं मधलं घ्यायचं म्हणाल तर मी अमुक एक दिवशी अमुक एक माणसाबरोबर चित्रपट पहायला गेलो होतो ह्याच पुरावा मी तुम्हाला काय देऊ शकतो? माझ्याकडे आता त्या शोचे तिकीट तर नाही. पण मग मी तुम्हाला त्या अमुक माणसाचे होकारार्थी उत्तर देऊ शकतो. पण आता हे सत्य तुम्ही मी अमुक एक बाईचा मुलगा आहे ह्या सत्याच्या एवढेच पक्के सत्य मानाल का थोडे कच्चे सत्य मानाल? कारण असं असू शकतं की त्या माणसाने अंदाजे हो म्हटलं आहे किंवा तो धादांत खोटं बोलत आहे. सत्याच्या अशा पातळ्या असतात काय? सत्य हे वैयक्तिक अनुभवांचा भाग असते का सार्वत्रिक? म्हणजे आम्ही ३ मित्रांनी मिळून ग्रहण पहिले होते ह्याला तीन वैयक्तिक सत्ये मानायची का एक सार्वत्रिक सत्य?
       आधी म्हटलं तसं हे अडाणचोट प्रश्न आहेत आणि त्यांचा व्यवहारकुशल माणसाला काही उपयोग नाही. व्यवहारात सत्य ही पॉप्युलर चॉईस सारखी गोष्ट असते. म्हणजे ५०० रुपयाच्या नोटेचे मूल्य ५०० रुपये आहे कारण आपण सगळे तसं मानून चालतो आहोत. उद्या समजा ५०% लोकांना एकदम असं वाटायला लागलं की नाही, बहुतेक ५०० रुपयाच्या नोटा ह्या खोट्या आहेत तर तिची किंमत १०० च्या ५ नोटा अशी राहणार नाही. किंवा शाळेत माझा एक मित्र असे प्रश्न विचारून मार खायचा, की तीनला तीन का म्हणतात, चार का नाही, खडूला खडू का म्हणतात असं. पण असं काही नाही.
       माझे एक शिक्षक म्हणायचे की सत्य असं काही नसतं. प्रत्येक विधान हे संभाव्यता असतं. म्हणजे खरंतर आपण बतुतेक, बऱ्याचदा असे शब्द वापरून बरीचशी वाक्ये बोलली पाहिजेत. जसं मी बहुतेकदा च्युत्याप करतो. किंवा ‘क्ष’ व्यक्ती हा बहुतेकदा महापुरुष होता. पण काही वाक्य आपण निर्विवाद सत्य म्हणून सांगू शकतो, जसं मी होमो सेपियन आहे. मी नर आहे. अमुक एक माणूस माझा बाप आहे. इथे बहुतेक वगैरे नको.
       पण अमुक एक माणूस माझा खापर पणजोबा होता असं म्हणताना मी हे विधान सत्य का नाही हे कसं पारखावं? म्हणजे माझ्या घरात त्या माणसाचे फोटो आहेत, त्यांच्या नावाचे दस्ताऐवज आहेत. पण तरी हा माणूस माझा खापर पणजोबा आहेत ह्याचा थेट जैविक पुरावा मौजूद नाही. मग इथे काय करावं? हा माणूस बहुतेक माझा खापर पणजोबा आहे असं म्हणावं का माझ्या निर्विवाद सत्य होऊ शकणाऱ्या बापावर विश्वास ठेवावा? का तो खापर पणजोबा नाही असे सिद्ध करणाऱ्या पुराव्याच्या अभावाने सध्यातरी त्याला माझा खापर पणजोबा मानून चालावं?
       म्हणजे काही सत्ये अशी असतात का ज्यावर आपण विश्वास ठेवल्याने ती सत्य होतात? का असत्य म्हणून न दाखवता आल्याने उरलं काय ते सत्य अशी रेसिड्यूअल भूमिका घेऊन आपण सत्य काय ते ठरवतो? पण मग असत्य म्हणजे काय ते आपण कसं ठरवतो? म्हणजे तर्काच्या आधाराने आपण काहीतरी एकच जाणून घेऊ शकतो, सगळी साखळी नाही. सुरुवातीचा बिंदू म्हणजे आपला विश्वासच, बऱ्याचदा ठोकून घट्ट बसलेल्या खुंट्यासारखा.
पण हे एवढे प्रश्न आले कुठून? सत्य म्हणजे काय? आणि एखादी गोष्ट सत्य आहे का नाही हे माहीत  नसेल पण तरीही ती गोष्ट बोलायची असेल तर? माझा एक मित्र म्हणायचा, की आपण अॅबसुल्युटली फ्री नसतो. दुसऱ्यांना हानी न करता येईल एवढंच आपलं फ्रीडम असतं. म्हणजे आपलं सत्य आहे का नाही ह्याची शाश्वती नसलेलं काही बोलायचं फ्रीडम कुठपर्यंत आहे, तर दुसऱ्यांची हानी त्यात होत नाही तिथपर्यंतच? आणि कोणाची हानी होतीये म्हणजे नेमकं काय होतंय, हानी होते म्हणणारा खरंच हानी होतीये म्हणून म्हणतोय का, आणि न म्हणणाऱ्या कोणाची खरंच हानी होतीये एवढं सगळं तपासून घेईपर्यंत काय बोलायचं शिल्लक राहणार? बोलायचं असतं ते जिकीर करून, फिकीर करून नाही असं का?
असा सत्य वगैरे गोष्टींचा काही उपयोग असतो का लोकांना? माझा एक अॅस्ट्रॉनॉमी करणारा मित्र म्हणतो की काय उपयोग ह्या रिसर्चचा? आपण शोधलेल्या एखाद्या गोष्टीचा उपयोग, म्हणजे ती ओरबाडून आपल्या भुका भागवायला काही एक प्रकार अस्तित्वात येईपर्यंत आपल्या किती पिढ्या संपतील, त्यापेक्षा फिनान्स करावा. औषधं शोधणारे लोक असं म्हणत नसतील. व्हायग्रा नसती आली तर तोटा झालाच असता. आणि ती येण्यासाठी सत्य कळावं लागलंच. असं म्हणू नये खरं, पेनिसिलीन म्हटलं असतं तरी चालतं.
पण साहित्यिक, ऐतिहासिक सत्यांचा काय उपयोग असतो? म्हणजे महापुरुष क्र.१०४ हे दिवसातून ५ वेळा चहा पीत असं त्यांच्या किराणा मालाच्या बिलावरून आपण ९५% आत्मविश्वासाने म्हणू शकतो असं कळल्याने काय होईल? आणि समजा असं झाल्याने, आजवर ते दिवसातून दोनदाच चहा पीत असं वाटणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या तर? ५% च्या नसलेल्या आत्मविश्वासाला एवढे बळी? हे अगदीच फाचाट हायपोथेटिकल आहे म्हणा, सिरीयस काय लिहिणार आपण ते सत्य आहे का नाही हे ठाऊक नसताना. मूळ प्रश्नाशी दगाबाजी नाही.
खूप झालं सत्याबद्दल. आता फिक्शनबद्दल बोलू.
--
मी एका पुस्तकात वाचलं होतं की फिक्शनल गोष्टी खऱ्या गोष्टींहून अधिक वास्तववादी असतात. अशा वाक्यांना मैलाचे दगड मानायच्या अडाणचोट दिवसांत वाचलेलं. अजून काय लिहिणार फिक्शनबद्दल.
--
पण म्हणजे काय पुस्तकांवर बंदी घालावी काय? माझा एक मित्र म्हणतो की बंदी घातलेल्या गोष्टींची डिमांड वाढते खरंतर. दुसरा म्हणतो की असं काही नाही. डान्सबारवर बंदी नव्हती तेव्हा मी पण जायचो, आता परवडत नाही.
पहिला म्हणतो की पण मुळात टेक्स्टबुक आणि रेफरन्स सोडले तर बाकी पुस्तके तर मनोरंजन म्हणूनच असतात. दुसरा म्हणतो असं काही नाही, जसं आध्यात्मिक. पहिला म्हणतो तसं मी हे तुला दाखवू शकतो, माझ्या व्याख्या वापरून की सगळंच मनोरंजन असतं पण जाऊ दे. दॅट विल बी टू मच.
पहिला म्हणतो की भले एका ठराविक भाषेत आजपर्यंत एकही उपयोगी पुस्तक नसेल, पण येणार नाही का ह्यापुढे. बंदी घातली तर समाजोपयोगी प्रतिभा वाया जाईल. दुसरा म्हणतो यू ब्लडी युटिलेटिरियन.
पहिला म्हणतो की का रे पण असं की एका भाषेत फिक्शन नाहीच. दुसरा म्हणतो की जिथे नशेला मान नाही, तिथे फिक्शनला कुठे. फिक्शन नशा यार, फिक्शन मॅजिक.
पहिला म्हणतो असं काही नाही यार. वी हॅव टू मॅच डिफरंट करंटस्. आपलं सोडून आपण सगळं असं दुसऱ्याचं कसं घेणार? दुसरा म्हणतो तुझं म्हणजे काय, युर पास्ट, ऑर युर फादर’स पास्ट का तुझी ही बॉडी, तुझी त्वचा, तुझी भूक, तुझी तहान, तुझे प्रश्न का तुझी मेमरी? वी आर डिफाइंड इन सो मेनी मॅनर्स माय फ्रेंड, ओन्ली कनक्ल्यूजन अॅव्हेलेबल टू अस इज टू मेनी कनक्ल्यूजनस्.
पहिला म्हणतो आय अॅग्री टू डीसअॅग्री. दुसरा म्हणतो यू फकिंग लिबरल. कम ऑन फाईट.
--
फिक्शन आणि सत्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? डोन्ट आस्क बिग क्वेश्चन्स फॉर सच अ पेटी मॅटर. आपले पेचात टाकणारे नैतिक प्रश्न आपण मोक्याच्या वेळेसाठी राखून ठेवू.
पण तुला हा श्रद्धा, बहुतेकांचे पत, न्यायनिवाडा आणि लिहिणाऱ्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवावाच लागेल.
चील ड्यूड. तुला एक सांगू, हे लिहिणं, विचार ही अशी गोष्ट आहे ना जिचं मोठेपण सेल्फ प्रोक्लेमड आहे. तू जर दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये टाकलंस तर तुला खरी गंमत दिसेल. इट्स कमोडिटी माय फ्रेंड. अ ड्युरेबल कमोडिटी. आणि इतर कुठल्याही कमोडिटीसारखी तिच्या डिमांडमुळे तिच्या इनपुट्सची किंमत ठरते. तिच्यात इंन्ट्रिसिक महत्वाचे काही नाही. असे महत्व हा फक्त मार्केटिंगचा प्रकार आहे, अ व्हेरी सक्सेसफुल मार्केटिंग. पण इथले लोक सगळं जाणून आहेत. म्हणूनच ते अग्रलेख सगळ्यात जास्त वाचतात, त्या खालोखाल इतिहास आणि उरलेले बाकीचे. दे नेव्हर बॉट धिस मार्केटिंग.
टू मच ड्यूड. यू टेक इट टू फार. मी तर एवढंच म्हणतोय की एव्हन फॉर अ कमोडिटी, यू कॅननॉट स्टॉप प्रड्यूसर जस्ट कॉज समवन हॅज अ साइड इफेक्ट. पॅसिव्ह स्मोकिंगने त्रास होतो म्हणून सिगरेट्सवर बंदी नाही घालत.
रीडीक्युलस उदाहरण, पण मुद्दा पोचला. पण तू श्रद्धेला अंडरएस्टिमेट करतोयेस मित्रा. मी तुला एक मूलभूत प्रश्न करतो मित्रा. जर तुला एखाद्या माणसाला विचार किंवा श्रद्धा ह्यापैकी एकच शिकवू शकणार असशील तर काय शिकवशील?
आह, हे असलं गुळचट नको मित्रा, डोळस श्रद्धा वगैरे. श्रद्धा इज फकिंग श्रद्धा, त्यात डोळस-अंध काही नाही. तुमचा विश्वास की असं एक ठाम काहीतरी आहे जे तुमच्या आयुष्यातले स्पष्टीकरण ण देता येणारे एक्स-फॅक्टर्स कंट्रोल करतं. आणि असं जे ठाम आहे ते बरोबर तुमचा हात पकडून तुम्हाला तुमच्या नियोजित आणि इप्सित ठिकाणी ठेवेल. आणि विचार म्हणजे तुम्ही असं एक्स-फॅक्टर काही मानणार नाही. फॉर यू, इट्स कॉज आणि इफेक्ट किंवा सरळ अर्थहीनता. त्यांच्या त्यांच्या प्युअर फॉर्मस् मध्ये ह्या दोन गोष्टी एकमेकांबरोबर जाऊच शकणार नाही. सो सांग मला, काय शिकवशील, स्केप्टिकल, सोलत सोलत जाणारा विचार का श्रद्धा?
तुझा सायलेन्स काय सांगतोय माहितीये की जरी तुला ‘विचार’ सांगावसं वाटत असलं तरी तुला असं ठाम सांगता येत नाही की श्रद्धेपेक्षा विचार बरा. कारण तू विचार करतोस. पण जर तू श्रद्धावान असतास तर तुझं उत्तर सोपं होतं. आणि इतक्या सगळ्यांना इतकं सगळं सोपं, सहज, गुळगुळीत ज्याने घसरता यावं आणि सावरताही यावं असं करून देणारी गोष्ट सोडून तू विचारांचं स्वातंत्र्य वगैरे सांगायला जातोस आणि खरंतर तुलाही माहिती नाही की ह्यातलं लोकांना जास्त उपयोगी काय.
       कदाचित. पण म्हणजे तू छुपा संस्कृतीरक्षक तर नाहीस? असे हुशारीचे शब्द वापरून तू मला जाळ्यात अडकवतोयेस आणि सांगतोयेस की जाळ्यातच भलाई आहे.
       नाही. तुझ्यासारखा मी पण कोड्यात पडलेला आहे, एका कोड्यातून दुसऱ्या कोड्यात. पण मला असं दिसतंय की श्रद्धेचे, विश्वासाचे हे सारे भक्कम अडसर का आहेत, त्यांच्या आड काय एवढं सांभाळलं जातं हे तर मला आधी शोधायला लागेल. पण म्हणून मी ते अडसर मोडून टाकत नाही की त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. असं केलं तर? समजा आपण असं ठरवलं की ह्यापुढे असं होतं का नाही असे प्रश्नच सोडून दिले तर? आपण ह्या सगळ्या गोंधळाला फिक्शनलाइज केलं तर? कदाचित ते जास्त खरं असेल का?
       पळतोयस तू
       असेल. आहेच कदाचित. पण असंही असेल की तपशिलांचे टवके उडवले की आतला सगळा कंटेंट मला मिळेल. कदाचित मी निवड करतोय आणि तू अडेलतट्टूपणा.
--
       चल आपण नॉस्टेल्जिक होऊ. शाळेत कसं शिकवलं तसं सुरुवात नाही पण शेवट कवितेच्या एका ओळीने कर. आणि नॉस्टेल्जिक होतोयेस तरी मुद्रण हक्क वगैरे एथिकल हवं बरं. चल सांग.
साल्या, कॅपिटलिस्ट, ऐक, तुकाराम महाराज म्हटलेले बरं असं, बाकी ठाऊक नाही, हवं तर खटला टाक.
काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले
हा,हा. माझ्या लिबरल शहामृग मित्रा, तू असा इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून राहणार आणि तरीही म्हणणार की मला नवं दिसतं. अर्धी वापरलीस, पुढच्या ओळीसकट घेतास तर वेगळा राहता अर्थ.  काही म्हणूच नकोस पुढे, आपण इथेच मारू आधुनिक झेंडा आणि जाऊ मॅजिक पोएट्री चे प्याले रिचवायला.
जगती की शीतल हाला सी पथिक, नाही मेरी हाला
जगती के ठंडे प्याले सा पथिक नाही मेरा प्याला
ज्वाला सुरा जलते प्याले में दग्ध हृद्य की कविता है
जलने से भयभीत न हो आए मेरी मधुशाला
(काळ बदलले, भाषा, तरी अर्थ कसे जुळतात अशी कुजबुज मागे फक्त..)
१  १.  http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता
२ .‘http://www.ics.uci.edu/~ashish/madhushala.pdf’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता 

Saturday, June 7, 2014

तीन मरणांच्या बातम्या

      बघ्या सकाळी उठतो. उठल्या उठल्या तो घड्याळ बघतो. बघ्याला असं उगाच एक वाटतं की समजा आपण एका ठराविक वेळेच्या आधी उठू शकलो तर आपण वेळेची जी निर्दय गती आहे तिला फसवून दिवसभर हवं ते करत राहू शकतो. पण समजा आपण अशा कुठल्या एका वेळेच्या नंतर उठलो तर गेला आपला दिवस. बघ्याची दिवस असतात कुठे आणि जातात कुठे असे प्रश्न त्याने फार वर येणार नाहीत ह्याची काळजी घेतलेली आहे. बहुतेकवेळा घड्याळ बघितल्या बघितल्या जगाच्या गर्दीभरल्या चक्राचा एक एक आरा आपल्यापासून निसटून चालला आहे आणि आपण आता दिवसभर त्यांच्यापाठी कसेबसे धावत असणार आहोत अशी जाणीवेची खप्पड थोबाडीत बघ्याला बसते. आजही बसली. त्या अदृश्य फटक्याचा मार जिरवत जिरवत बघ्या जागे व्हायच्या लहानपणापासून शिकवलेल्या एक एक प्रक्रिया पर पाडत जाऊ लागला. त्या उरकून खुर्चीत कॉफी पीत बसत बातम्यांच्या वर्षावात भिजायला आतुर बघ्याला मोबाईल वर मित्रांनी फार काही मेसेजेस टाकले आहेत असं दिसलं. आणि तिथे बघ्याला पहिली मरणाची बातमी मिळाली.
       ह्या बातमीत मेलेल्या मनुष्याचा बघ्याच्या अमुक एक प्रकारच्या जातीय, अमुक एक प्रकारच्या विचारसरणीय, आणि अमुक एक प्रकारचे लोक आसपास असण्याच्या प्रकाराशी बादरायण संबंध आहे. असं आहे की काही एक दैवी योगांचा भाग किंवा लहान मुलांची अत्यंत सजग अनुसरणक्षमता ह्यामुळे आपल्या अख्खी सकाळ खुर्चीवर बसून पेपरवाचन करणाऱ्या आजोबांना बघून बघ्याही लवकरच बातम्या वाचण्यास शिकला. आणि पुढचा दैवी योग म्हणजे बघ्याचे हे स्वाभाविक सहजशिक्षण घडत असताना देशात एक इमारत पाडली जात होती. बघ्याची आजोबा ह्या इमारत पाडण्याच्या प्रकाराचे खुर्चीवर असलेले प्रखर समर्थक होते. बघ्याच्या आजूबाजूच्या कुटुंबातही अशा कार्याबद्दलची कदर होती. आपण (गांडू असल्याने, अर्थात बघ्याला हे पुढे जाऊन कळले) अशा पाडापाडीत्मक विधायक कार्यात जाऊ शकलो नाही, पण आपण अशा कार्याच्या आदराचा फैलाव तर करू अशा भावनेने एक व्हिडीओ सुद्धा बघ्याच्या शेजार-पाजारच्या कुटुंबांनी मिळून बघितला. बघ्या काहीतरी खात खात मध्येच झोपून गेला, पण त्याच्या लक्षात राहिले ते मोठया फळ्यासदृश्य ढाली घेतलेले सैनिक, त्यांच्या लाठ्या आणि घोषणा देत त्यांच्या कडे येणारे लोक आणि सैनिक काठ्या चालवू लागले की पळापळ करणारे लोक.
       तिसरा दैवी योग म्हणजे बघ्याची आजोबा हे ज्वलंत स्वरूपाची वृत्तपत्रे वाचत. आणि त्यानंतर त्या वृत्तपत्रांची आजूबाजूच्या घरांशी अदलाबदली करताना कसले जबरी लिखाण आहे किंवा कसे मारले भोसडीच्याना अशा प्रतिक्रियाही दिल्या जात. बघ्या एकदा घरात ‘भोसडीच्या’ असे म्हटल्यावर त्यास संस्कारक्षम मार मिळाल्याने त्याने असे शब्दप्रयोग केवळ शाळेत करायचे असतात हे समजून घेतले.
       तर अशा ह्या बालपणीच्या सुखावह काळात, जिथे बाकी मुले नव्याने लागू लागलेले केबल चॅनेल, डब्ल्यू.डब्ल्यू.एफच्या कुस्त्या, हिंदी सिनेमातील गाण्यातून शारीरिक शिक्षण अशी बोधप्रद गाणी अशा गोष्टीत व्यस्त असताना बघ्याला हे समजले होते की हा देश आपला आहे आणि काही लोक इथे परके आहेत. ज्वलंत लिखाण करणारे हे बरोबर आहेत आणि ते ज्यांना शिव्या देतात ते चूक आहेत. परदेशातून येणारा एक प्रकल्प समुद्रात बुडवायचा आहे. दुबईतील एक गुंड हा विमानाने आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत फिरतो. आणि एक माणूस आहे जो सहजी हा प्रकल्प समुद्रात बुडवू शकतो आणि त्या गुंडाला पकडून आणू शकतो.
       बघ्याला अशा माणसाबद्दल तेव्हा नवल वाटत असे, आणि त्याने बरोबर मार्गावर असलेल्या ज्वलंत लोकांबरोबर युती केली आहे ह्याचेही बघ्याला नैतिक समाधान असे.
       त्या बालपणानंतर पुढे बघ्या हा शाळेतील मुली, शाळेतील स्पर्धक आणि संध्याकाळचे क्रिकेट ह्यांत जास्त रमू लागला. त्याने भारतीय क्रिकेट टीम आणि सैनिक ह्यांवर देशभक्ती सोपवून दिली. त्याच्या वयाला झेपणारी आणि तापणारी अशी सारी पुस्तके त्याने वाचली. त्यात ह्या माणसाबद्दल फार काही वाटायचे राहून गेले.
       खरे आत्ताही त्याला असे काही वाटायची गरज नाही. एकाद्या माणसाबद्दल भले-बुरे काही वाटलेच पाहिजे अशा कुठल्या भाबड्या नैतिक कवचात बघ्या नाही. बघ्याला खरे ह्या एका मृत्यूच्या घटनेचे काही वाटतही नाही. त्याला गंमत वाटते आहे ती त्या मरणावर उठणाऱ्या सार्वजनिक हुंदक्यांची आणि ज्यांचे हुंदके झाले त्यांच्या अन्य उमटण्याची. बघ्याला आठवतं की सार्वजनिक नैतिकतेच्या डूज अँड डोन्टस् मध्ये ‘मरणान्ति वैराणी’ असं पण असतं. मरेपर्यंत चालवावं असं वैर बघ्याचं अद्याप कोणाशी नाही आणि जर ‘मेरे झिंदगी का एक्के मक्सद है, बदला’ असं झालं आणि त्यात कोणी एक मेला तर पुढे काय नेमकं व्हावं ह्याचं मेमेल्याला काय पडलं असेल असं बघ्याला वाटतं. पण बातम्यांची वेबसाइट, त्याच्या सोशल मिडीयाच्या भिंती ओल्या होतात, ज्यांच्या जास्त ओल्या झाल्यात ते कारस्थान-कारस्थान असं ओरडू लागतात, आणि ज्यांना असं ओरडायचं नाही ते कोण नाही रडलं बरं, चला घेऊ त्याची असं करू लागतात. ज्यांना एवढं सकळिक काम करायचं नसतं ते रिपरिप करू लागतात. बघ्या बघबघ करू लागतो.
       मध्ये एकदा, म्हणजे नाश्त्याची प्लेट घेऊन जे चाललंय त्यावर सावकाश रवंथ करताना बघ्या असा विचार करतो ‘मरणान्ति वैराणी किया मरणान्ति अतिशयोक्तिनि?’ पण बघ्याला अशा कुठल्या थोर व्यक्तीचे वैयक्तिक अनुभव नाहीत. तो त्याच्या स्थानिक नगरसेवकाला ओळखतो. पण उद्या हा नगरसेवक अपघातात मेला तर बघ्या त्याच्या अंत्ययात्रेला जाईल असे नाही.
       बघ्या एकदा कॉलेजात एक खूप प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवात गाण्याचा कार्यक्रम ऐकत असताना असेच एक स्थानिक नेते गेले म्हणून कार्यकम आध्यात्मिक गाणे गाऊन बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्या नेत्याच्या आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल जाळले. मग बघ्याला एक मित्र म्हटलेला की हा काही अपघात नव्हता, त्यांना मारलं होतं. इट्स ऑल पोलिटीक्स.
       मध्ये बघ्याचा मित्र त्याच्याशी चॅट करताना म्हणतो की आता त्यांच्या घरातच तिकीट मिळेल कोणालातरी. पुढे एका न्यूजमध्ये पण तो असंच काही वाचतो एका तज्ञाने लिहिलेलं.
       बघ्याला असं कोणालाच विचारत नाही की ते इतके ग्रेट होते तर त्यांचा जिवंतपणीचा परफॉर्मन्स त्यांच्या श्रद्धांजली लेखांहून छोटा का वाटतो. पण बघ्याला ठाऊक आहे की बघ्याच्या एक भौगोलिक, आर्थिक, जातीक, शैक्षणिक कोपऱ्यातून त्याला जे कळतं आणि जे कळत नाही ते एकमेकांशी जुळतंच असं नाही. बघ्या गुमान आपला प्रश्न दुमडून, दडपून ठेवतो आणि परत गंमत बघू लागतो.
--
       त्याच्या बघण्यात त्याला परत एक बातमीचा छटाकभर कोपरा दिसतो ज्यांत एक ऐंशीहून अधिक वर्षाच्या, प्राध्यापकी सोडून संपादकी वगैरे करणाऱ्या माणसाच्या मृत्यूबाबत असतं. बघ्यासाठी हा मृत्यू त्याच्या जवळच्या पेरीफरीत आलेला आहे. कधीकाळी, जेव्हा वेगवेगळया माणसांना भेटून बोलल्याने काही होतं असं बघ्याला वाटत असे अश्या अशा कोवळ्या च्युत्या काळात त्याने केव्हातरी ह्या माणसाला भेटायचा बेत आखलेला होता. त्याच्या एका मित्राच्या ओळखीने तो भेटायला जाणार होता. पण असं काही झालेलं नाही. परत एकदा बघ्या थोर माणसांच्या वैयक्तिक ओळखीपासून पारखा राहिला आणि त्याची ज्यांच्याशी ओळख आहे ती माणसे थोर होण्यापासून.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्यासाठी हा मृत्यू जवळच्या पेरीफरीमध्ये आहे कारण बघ्याने ह्या माणसाने लिहिलेलं एक पुस्तक वाचलेलं आहे. आणि तेही अशा दिवसांत, जेव्हा कधीकाळी हमखास भावूक होऊन टिपे गाळू शकणारा बघ्या हमखास कोडगा होऊन राहिला होता. आणि तरीही त्या पुस्तकाच्या शेवटानंतर बघ्याला एक आतल्याआत खेचत जाणारी अवस्था आली, जशी त्याला ‘लिटल प्रिन्स’ नंतर आली होती आणि तेव्हा बघ्याला जाणवलं की आपण जगत जातो त्याचा एक निष्कर्ष असा असतो की आपण सुरुवात करतो तेव्हा आपण नाव ना देता अनेक गोष्टींना आपले मानत जातो, पण पुढे पुढे ह्या एक एक गोष्टी संपून, हरवून जायच्या अनुभवांनी, किंवा नुसत्या भीतीने, किंवा पोट आणि अन्य अवयव भरायच्या धबडग्याने आपण असे होतो की आपल्याभोवती असतं बरंच काही आणि आपण कशाचेही नसतो. आपल्या आत असलेले निरागस भाबडेपण आपणच मध्ये मध्ये निर्दय ठेचत जातो आणि असे करावेच लागेल अशी एवढी समजूत आपण आपली घालतो की मोजमाप करून छाटून नीट बनवलेल्या आयुष्यापलीकडे जे काही दिसेल त्याला आपण खोटे समजू लागतो. किंवा असे शब्दांत काही कन्क्ल्युजन नाही. पुस्तक संपल्यावर आपण आपल्याशी थोडे फार दाटलो तेवढा वेळेचा तुकडा खरा. बाकी शब्द नुसते दिखावा.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्याला आठवलं की लहानपणी त्याच्या एक उनाड आयुष्य जगलेल्या रीश्तेदाराने त्याला एक मांजराचं पिल्लू भेट दिलेलं. बघ्याने त्या पिल्लाला त्या पिल्लाला न कळणारं पण बघ्याला कळणारं एक नाव दिलेलं. असं तर झालं नाही की ते पिल्लू बघ्याच्या कुशीत येऊन झोपत असे की बघ्याच्या मागेमागे फिरत असे. जे होतं ते बघ्याचं इमॅजिनेशन आणि त्या इमॅजिनेशनमध्ये एक आपल्याला हवं तेव्हा म्यांव म्यांव करणाऱ्या आणि आपल्याला नको तेव्हा शेपूट वर करून निघून जाणाऱ्या, झोपल्यावर मांडीवर मावणाऱ्या मांजराच्या पिल्लाला एक खास राखीव जागा होती. पण बघ्याच्या घराच्या रिअॅलिटीमध्ये त्या पिल्लाच्या हगण्याचा वास आणि घाण होती, दूध सांडणं-लवंडणं होतं, आणि रात्री-बेरात्री त्या पिल्लाने घरात ओरडणं हा प्रचंड न्यूसंस होता. बघ्याच्या ऑब्जेक्शनला दूर सारत पिल्लाला रात्री घराबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. दुसऱ्या दिवशी कचरेवाल्या बाईने त्या कोणीतरी मारलेल्या पिल्लाला शेपटाने पकडून घरातील भाज्या, कागद, प्लास्टिक, बल्ब ह्यांच्या कचऱ्यावर भिरकावलं. आणि शाळेतून दुपारी घरी येऊन पिल्लाला नावाने हाक मरत रडवेल्या झालेल्या बघ्याला त्याच्या आईने असं सांगितलं. रात्री मध्येच केव्हातरी बघ्याला जाग आली, त्याला असं वाटलं की ते पिल्लू त्याच्या उशीपाशी बसलेलं आहे आणि मग एकदम त्याला आठवलं आणि बघ्या आवाज न करता उशीवर तोंड दाबून रडत केव्हातरी झोपला.
       कदाचित बघ्याच्या चौकटबंद आयुष्यातील ह्या छटाकभर अनुभवाची आणि ‘ज्योडी’ च्या गोष्टीची बघ्याने आपल्यापुरती गाठ मारून घेतली. आणि मग अपरिहार्य नोस्टॅल्जियाच्या नशेत बघ्या व्याकुळ होऊन गेला.
       बघ्याला आठवतं की पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या क्वार्टरभर अॅनॅलिसिसमध्ये बघ्याला असं वाटलं होतं की आपल्या आयुष्यात आपले शारीरिक वय आणि मानिसिक वय ह्याच्या मध्ये एक मोठ्ठा खड्डा आहे. त्या खड्यात आपल्याला खेचून तळाशी नेऊन गुदमरवून टाकेल असा नोस्टॅल्जिया आणि फुकाचे प्रश्न आहेत. आणि आपण त्या खड्ड्याच्या अत्यंत धोकादायक जवळून चालत आहोत. आणि समजा आपण अशी कोणतीही पुस्तके वाचत राहिलो तर केव्हातरी आपण ह्या खड्ड्याच्या तळाशी जाऊ. आपण जबाबदारी नावाचा एक दोर स्वतःला बांधून घेतला पाहिजे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडण्यापासून वाचले जाऊ, म्हणजे कोण न कोण आपल्याला दोराने ओढेल. आणि मग जमेल तशी ह्या खड्ड्यातील, आसपासची सुपीक माती वापरून आपण त्यांत कविता, लेख, कथा अशी फुलझाडे लावू. ती फुलझाडे बाल्कनीत लावू. आणि आरामखुर्चीवर निवांत रेलून त्यांना न्याहाळू.
       तेव्हापासून बघ्या त्याचा संबंधही येत नाही अशा देशांबद्दलची किंवा इतिहासाची पुस्तके वाचतो. तरीही केव्हातरी बघ्याला वाटतंच की असा कुठला ना कुठला खड्डा बघ्याला ओढणारच. इंजिनिअर किंवा एम.बी.ए. न होऊन त्याने प्रगतीचा रस्ता सोडला तिथेच त्याचे खड्ड्यात जाणे अटळ होते असा तो आपल्या अल्कोहोलिक रिअलायझेशनचा शुद्धीतला अर्थ काढतो. पण जेव्हा तो अल्कोहोलिक होतो तेव्हा सारे अर्थ त्याला एक मोठया दरीकडे जाणाऱ्या साईनबोर्ड सारखे वाटतात.
--
       वर उद्धृत केलेल्या आशयाची स्वप्ने आणि भास असणाऱ्या झोपेतून बघ्या उठतो आणि परत आपल्या सोशल प्रोफाईलला जुगतो. त्याला एक तरुण मुलाची प्रोफाईल दिसते. तिथे त्याच्या मित्रांनी लिहिलेलं असतं, आणि कोणी थेट लिहिलेलं नसलं तरी बघ्याला अर्थ जाणवतो.
       बघ्याला इथे एक सूक्ष्म हादरा बसतो. बघ्या ह्या तरुण मुलाला ओळखतो, त्याच्या घरच्यांना ओळखतो. बघ्याला वाटतं की शिक्षण पूर्ण केलेल्या, नोकरी करू लागलेल्या ह्या मुलाने आत्महत्या तर केली नाही ना. पण त्याच्या मित्रांच्या शोकसंदेशांत असलेली अटळता बघ्याला अशा निष्कर्षांपासून मागे आणते. बघ्या कोणालातरी विचारतो आणि मग कळतं की ब्लड कँन्सर.
       एक बाजूने बघ्या स्तब्ध कोडगेपणाने हळहळ व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला तो विचार करतो की त्याच्या कुटुंबात कोणाला कँन्सर झाला तर तो काय काय करेल. तिसऱ्या बाजूला तो त्याच्या शेजारच्या एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या आजींचा विचार करतो ज्या मरतील तर सुटतील असे सहानुभूतीदार मत आसपास बनलेले आहे. चौथ्या बाजूला तो प्रश्न टाकतो की आयुष्याची कसलीही धड चव न घेता हा मुलगा मेला ह्या घटनेला काय एक्स्प्लेन करणार. मग बघ्या आपल्या वर्तुळातले कोणी न मेल्याने जमू शकणारी स्थिरचित्त मुंडी हलवतो.
--
       बघ्या क्रमाक्रमाने विचार करतो की तो मेला तर बाकीच्यांना असतात.काय काय वाटेल. समजा बघ्या दैवी कृपेने थोर झालाच तर त्याच्या पश्चात कशा प्रकारचे हुंदके येतील. आणि नाही झाला तर किस तरीके की मौत बघ्या मारेल. मग बघ्या पलटून विचार करतो आणि त्याच्या आजूबाजूच्या एकेकाला मारून त्याला काय वाटेल ह्याचा विचार करतो. म्हणजे बघ्याची आजोबा, आई, बाबा, बायको, काका, मित्र, वीस वर्षे राहिलेले घर. बघ्याला आठवतं की त्याची नळ्या-नळ्या खुपसलेली आजी मेली हाच त्याचा क्लोजेस्ट अनुभव आहे. आणि तेव्हा ती मरावी अशीच प्रार्थना नास्तिकतेच्या वाटेवर असलेल्या बघ्याने आपल्या रेअर मागणीत केली होती. तिच्या प्रेताला जाळून झाल्यावर बघ्या घरी येऊन चहा प्यायला होता आणि तिसऱ्या दिवशी कोलेजला पण गेला. पुढे केव्हातरी मध्येच घरात रिकामी खुर्ची दिसली तेव्हा बघ्या भडभडून रडला. बघ्याच्या आत्ताच्या इमॅजिनरी इक्सरसाईज मध्ये त्याच्या आवडत्या स्थितप्रज्ञपणे तो एक एक मृत्यू निभावून नेतो. प्रत्येकाला तो शब्दांमध्ये नीट समराइज करतो आणि त्याच्या एक एक कप्प्यांत ठेवून देतो.
--
       बघ्याला दरी दिसते, तळ न दिसणारी, काळीशार, थंड हवेचे झोत वर सोडणारी दरी. त्याच्या आजूबाजूला कोणी तिथे जाऊ नये म्हणून लावलेले एक एक साईनबोर्ड्स. बघ्या एक एक साईनबोर्ड वाचत वाचत जातो. सर्वांत शेवटी एक साईनबोर्ड असतो ज्यांवर लिहिलेलं असतं ही काही खरी दरी नाही, ही काल्पनिक आहे. तरी कृपया इथे जाऊ नका.
       बघ्या दरीकडे पाहतो. तिथे एक मुलगा त्याला बोलवत असतो. बघ्या साईनबोर्ड ओलांडत पुढे जातो तेव्हा त्याला साईन बोर्ड्सच्या मागच्या बाजू दिसतात. त्यांना त्याच्या ओळखीच्या माणसांचे चेहरे असतात. दरीकडे चालणाऱ्या बघ्याला पाहून ते चेहरे माना फिरवतात, टिपे गाळतात, हाका मरतात. बघ्या बिचकतो.
       तो मुलगा बघ्याला त्याचे हात वर करून दाखवतो. त्याच्या हातात बघ्याच्या घराच्या कचऱ्यात मेलेलं मांजरीचं पिल्लू असतं, त्या मुलाच्या हाताला मान घासत. मग त्या मुलाच्या पाठून, दरीच्या काठाने बसलेली एक म्हातारी बाई तिच्या हातातलं पुस्तक मिटत बघ्याकडे पाहते. मुलगा पुढे येऊन बघ्याचा हात पकडतो, पिल्लू त्याच्या हातांत ठेवतो. बघ्या त्या पिल्लाला साशंक कुरवाळतो तशी तो मुलगा त्याच्या कोपऱ्याला ओढत दरीकडे नेतो. बघ्या दरीच्या काठाला पोचतो. ती म्हातारी म्हणते ऐका मी तुम्हाला ह्या दरीच्या तळाला काय ह्याची गोष्ट सांगते. बघ्या त्या मुलाच्या आणि म्हातारीच्या मधे बसतो. ते पिल्लू त्याच्या पायाच्या बोटांना आपली मान घासत पुढे-मागे फिरत राहते.    
     

          

Tuesday, June 3, 2014

सिटीलाईट्स: (थोडा/माझा) गंडलेला फोकस

       एकच गोष्ट सांगणारा चित्रपट दोन भाषांत पाहणं ह्यात म्हटलं तर तोचतोचपणा आहे. नवा शॉक काही नाही, नवी किक नाही. पण समजा ती गोष्ट नव्या संदर्भाने सांगायचा प्रयत्न असेल तर मग त्यात उत्सुकता आहे. कारण कुठल्याही गोष्टीत एक असतं घडणं आणि एक असतं तिचे संदर्भ. म्हणजे ‘द गुड, द बॅड अँड ड अगली’ हा चित्रपट पाहिला तर त्याची स्टोरी आहे आणि ती घडते त्या भूगोलाचे, तिथल्या राजकारणाचे, तिथल्या लोकांच्या वागण्यात काही ठाशीव पॅटर्न असतील त्याचे संदर्भ आहेत. जेव्हा केव्हा एखादी स्टोरी दुसऱ्या भाषेत आणि दुसऱ्या संदर्भांत बनवायचा प्रयत्न केला जातो तेव्हा तिला नवे संदर्भ कसे दिले जातात हे इंटरेस्टिंग असते. काही वेळा निव्वळ भाषा बदलली जाते. (केवळ भाषा बदलून पण सेम संदर्भात चित्रपट म्हणजे ‘द गर्ल विथ द द ड्रॅगन टॅटू’. पण त्याच्या इंग्लिश व्हर्जन पेक्षा स्वीडिश मूळचा चित्रपट जाम भारी आहे.)
       मध्ये मी असंच ठरवलं की अमेरिकन मूव्ही उगाच काहीतरी ठोकळेबाज स्टोरी आपल्याला दाखवत चालले आहेत. त्यामुळे थ्रिलर असेल, त्यात काहीतरी अनपेक्षित घडण्याची किक असेल तर पहायचं. उगाच त्यांची श्रीमंत पर्सनल दुःख, किंवा आशावादी स्ट्रगल असले ठोकळे पहायचे नाहीत. पण नंतर मला असं जाणवलं की मी ज्या वेब साईट वरून चित्रपटांबद्दल माहिती मिळवत होतो त्याचा केंद्रबिन्दूच अमेरिका असावं असं दिसतंय. ऑस्कर वगैरे पण खरे देशी, केवळ मजा येईल एवढा विदेशी तडका दिलेले प्रकार असं मला वाटू लागलं. माझे गेस खरे आहेत का नाहीत ह्यावर संशोधनपर होण्यापेक्षा मी गुगल सर्च बॉक्स मध्ये कोणत्याही एका देशाचे नाव आणि बेस्ट मुव्हीज असं शोधायला सुरुवात केली. आधी ठळक आठवणाऱ्या देशांची नावे झाल्यावर मग रोमानिया, युक्रेन, चिली अशी नावं करता करता मला अनेक चित्रपट मिळाले. पण गुगल वर चित्रपट कसा असेल ह्याबद्दल रिलाय करणं काही वेळा फसवतं. मग मला आठवलं की माझ्या एका मूव्ही ब्लफ वाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या (पण आता जीवनमानाच्या रेट्याने तसे न उरलेल्या) मित्राने सांगितलेली साईट आठवली, सनडान्स फिल्म फेस्टिवल. आणि तिथे एक नाव मिळालं, आणि थोडकं वर्णन, मेट्रो मनिला.
       इंटरनेटवर (अर्थात कॉपीराईटची मारून) सिनेमा आणि त्याबद्दल सारं काही असेल.
       राजकुमार राव मला आवडला होता तो ‘शैतान’ मधला करप्ट इन्स्पेक्टर आणि ‘गॅंगस् ऑफ वासेपूर’ मधल्या त्याच्या रोलमुळेही. आर्थिक शिस्तीचे प्रयोग आणि वाईट पायरेटेड कॉपी ह्यामुळे त्याचा ‘शाहीद’  बघायचा राहिला. एकदा दररोजचा न्यूजचा ब्रेकफास्ट घेताना मला दिसलं की ‘सिटीलाईट्स’ रिलीज होतो आहे, आणि म्हटलं आहे की शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ वर आधारित आणि मुंबईत घडणारी गोष्ट. चित्रपटाचा ट्रेलर बघून मला वाटलं की कदाचित बऱ्यापैकी फ्रेम टू फ्रेम मेट्रो मनिला उचलला आहे का. परिणाम: मी ‘सिटीलाईट्स’ बघताना सुरुवातीपासून क्रिटीकल होतो.
       चित्रपट आवडला का नाही असा निष्कर्ष न काढता समीक्षकी होण्याचा (आणि मग वैचारिक उत्सर्जन आणि त्यातून निष्कर्ष करण्याचा) चष्मा मला लागलेला आहे. आणि त्या चष्म्यातून, म्हणजे जो पूर्णतः माझा आणि बऱ्यापैकी मी बनवलेला चष्मा आहे त्यातून मला सिनेमा गंडला आहे असं वाटलं. अगदी एक वाक्यात म्हणजे एका महानगरात एका माणसाची गोष्ट असं असणारा मेट्रो मनिला इथे आर्थिक विषमता आणि मुंबईचे स्टिरिओटाईप चित्रीकरण ह्यात जातो. राजकुमार रावला वापरायचा आणि दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्याने त्याला न्यायही दिलेला आहे. पण काहीवेळा तपशिलांच्या मला वाटलेल्या गलत्या इंटेन्सिटी कमी करतात. जसे गावाहून केवळ दोन मिडीयम साईज बॅगांमध्ये कपड्यांचा प्रचंड साठा, भांडी आणि कोरलेल्या भुवया घेउन आलेली बायको, सैन्यात नोकरी केला आहे ह्याबद्दल एक फोटो दाखवला तर बाकी काही विश्वसनीय नसलेला हिरो, १५ हजाराच्या पगारात डान्सबार मध्ये मनसोक्त पिणारे लोक(आपलं असं करायचं राहून गेलं हंसल भाय!), जात आणि सोशल नेटवर्क ह्यांना अनुक्रमे शून्य आणि चुटपुटता केलेला स्पर्श, एका पात्राचे घर दाखवताना दोन वेगळया प्रसंगात दोन वेगळी घरं वापरली गेली अशी माझी वैयक्तिक आशंका, एक वगळलेली उपगोष्ट, हिंदी चित्रपट म्हणजे असलेच पाहिजे अशा सांस्कृतिक बाण्याचे पार्श्वसंगीत आणि मूळ कथेत शेवटी जो हलवू शकेल असा धक्का आहे त्याची केलेली मिळमिळीत अवस्था. असो. उत्तेजनार्थ शाबासकी देता येईल, पण तपशील आणि कथेच्या साच्याबद्दल आणि त्यातून बघणाऱ्याला मिळू शकणाऱ्या रंजकतेच्या परिणामाबद्दल काटेकोरपणा ही बेसिक अट हवी. अर्थात माझ्या निष्कर्षांत मी अगोदर मूळ चित्रपट पाहिला असल्याचे भरपूर मीठ आहे. (आणि तशी एक शंका पण आहे की ‘मेट्रो मनिला’ आणि ‘सिटीलाईट्स’ ज्या प्रकारचा सेक्युरीटी बिझनेस दाखवला आहे तसं मुंबईत करायला मान्यता आहे का? त्यापेक्षा ए.टी.एम. साठी कॅश घेऊन फिरणारे गार्ड्स दाखवता आले असते का?))
--
       माझ्या डोक्यात नंतर एक विचार आला. ‘मेट्रो मनिला’ पाहिल्यावर हे मनिलामध्ये राहणाऱ्या गरीब, व्हल्नरेबल लोकांची प्रातिनिधिक कथा आहे असं मी एकदम गृहीतच धरलं होतं कदाचित. आणि ‘सिटीलाईट्स’ बघताना मी अशा कुरापती काढण्याचा प्रयत्न करत होतो की अरे ही काही प्रातिनिधिक वगैरे स्टोरी नाही. लोक तर ह्यापेक्षा खूप वेगळं जगत आहेत. कदाचित मी चुकतो आहे. मला मनिला बद्दल काही माहिती नाही. कदाचित मूळ चित्रपट ही सुद्धा एक वन ऑफ स्टोरी असेल.
       हे प्रातिनिधिक असण्याचे विचार ही मला माझ्या एैदू शैक्षणिक वाचनाने दिलेली देन आहे. त्याला काही अर्थ नसावा. पण असं वाटतंच मला की खरंच किती लोकांच्या सुखी किंवा भौतिक दृष्ट्या सुखी आयुष्यांत अशी काही गोष्ट असते. फारच कमी. बहुतेक ठिकाणी एक साचा असतोच जगायचा, आणि थोडाफार फरक करता सगळे तेच साचे रेटत नेतात. गोष्ट कुठे असते तर जिथे कोणीतरी एका गतानुगातिक साच्यातून दुसऱ्या साच्यात जायला बघतो, खरचटतो, पोचतो किंवा संपतो. पण असे किती?
       ‘सिटीलाईट्स’ वर एक ऑब्जेक्शन तर मी नक्की घेईल की त्यात गटारे आणि पाईपलाईन, चिंचोळ्या कचऱ्याने भरलेल्या गल्ल्या, १० बाय २० ची घरे आणि त्यांचे पोटमाळे, सार्वजनिक संडास आणि गटार, रस्ता अशा कुठल्याही कडा, कुपोषित प्रकाशात चाललेल्या स्वैंपाक आणि रात्री संबंधित अन्य घडामोडी हे सारं कुठे येत नाही. कुरुपतेचा, माणसाला चिणून त्याचा एका बटबटीत व्यवस्थेतील एक नियमित थडथडणारा प्रत्यय कुठे येत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’ किंवा कॅथरीन बू चे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स’ ह्यात तो आहे, पुस्तकात तर जबरी आहे. आणि तो नसेल तर मुंबईच्या तिसऱ्या स्तराच्या स्लमची गोष्ट, कधी प्रातिनिधिक किंवा जड शब्द घ्यायचा तर वास्तववादी होणर नाही असं मला वाटत राहतं. ‘सिटीलाईट्स’ राजकुमार राववर गोष्टीपेक्षा जास्त प्रमाणात फोकस करते, त्यांचे गावातल्या घरातले, मुंबईमधले आनंद स्लोमोशनमध्ये खास संगीतासह बघताना मला एकदा असंही वाटलं की एवढे आनंदी होते गावांत, स्वतःच्या अंगण, गच्ची असलेल्या घरात मिया-बीबी-मुलगी एवढेच राहणारे कुटुंब, सैन्यात ड्रायव्हर म्हणून नोकरी केलेला (आणि सोडलेला, आणि आधीच्या नोकरीचे काही पर्क्स मिळतायेत असं काही नसलेला) नवरा, मग खरंच कशाला आले मुंबईत? धंद्यात खोट येऊन कर्जात बुडायचा एक प्रसंग थेट शहरात धाडतो का? असं असतं का ह्या थाटाचे एवढे प्रश्न का विचारावेत असंही आहे. ‘चक्रव्यूह’ नावाचा प्रकाश झाचा सामाजिक जाणीवेची शेव पेरलेला भेलपुरी प्रकार पाहून लोक माओवादाबद्दल जाणीवेच्या ढेकर देताना मी पाहिलं आहे. आणि कळला बरं आपल्याला नक्षलवाद अश्या उथळ जी.के. ढेकरांचा मला नंतर त्या ऐकून ऐकून जाम त्रास झाला. त्यामुळे अगोदरच माहितीपूर्ण सामाजिक कायम चूर्णाच्या फैरी मी झाडून ठेवत आहे. होऊ दे साफ..
       गाव, तिथले लोक ह्यांच्याबद्दल एक फुकाचा आनंदी, हूळहूळणारा नॉस्टॅल्जिक दृष्टीकोन मी अगोदर मनात पाळून असे. जसं, जीवनाचं ध्येय काय असेल तर गावांत जाऊन काही सामाजिक स्वरूपाचं काम करणं, गाव खरं, शहर खोटं, खरा भारत खेड्यांत, खेड्यातले लोक कसे साधे, आनंदी, कोणालाही सामावून घेणारे. पुढे माझा च्युत्यापा माझ्यासाठी उघड झाला. त्यातले काही ज्ञानाचे फुगे म्हणजे:
१.       गावातले सगळ्यात गरीब हे काही मायग्रेट करीत नाहीत शहरांत. ते जवळपासच्या प्रदेशांत वर्तुळाकार मायग्रेशन करीत राहतात. गावातील मध्यम स्तरातले घरात थोडी बहुत शेती असलेले, शहरांत काही ना काही नेटवर्क असलेले लोक प्रामुख्याने मायग्रेट करतात. पोटासाठी किंवा स्वप्नांसाठी शहरात येणारे नाहीत असे नाहीत. पण एकूण मायग्रेशनच्या संख्येत ते काही एक अंकी पर्सेंट असतात. मुंबईत प्रत्येक उपनगरात, किंवा महत्वाच्या नाक्यांवर सकाळी हातात पिशवी, जुने शर्ट घेऊन उभे बाया-बापे दिसतात. कोणी साईबाबा किंवा तत्सम भक्त त्यांना सकाळी चहा वगैरे पाजत असतो. मग एक एक करून कोणी कोणी येऊन त्यांना, बहुतांश वेळा गटा-गटाने दिवसभराच्या मजुरीसाठी हायर करतो. ह्या गटात असे पोटासाठी आलेले आणि शहराच्या जवळपासच्या गावांतून ट्रक, टेम्पो मध्ये होलसेल बसून आलेले दोन्ही प्रकार असतात. जातीच्या हायरार्कीमध्ये तळाला असलेले लोक.
२.       ज्याला इनफॉर्मल सेक्टर म्हटलं जातं किंवा फॉर्मल सेक्टर मधली जी कॉंट्रॅक्चुअल नोकरी असते त्यात येणारे मायग्रंट हे ग्रामीण आर्थिक स्तरांमध्ये मध्ये कुठेतरी, अल्प किंवा मध्यम भू धारक, एक्स्टेंडेड  कुटुंबाचा थोडा बहुत आर्थिक आधार आणि शहरांत अपने जात का, अपने गाव का असे नोकरी/धंदा  लावून देण्याइतपत असलेला कोणी का कोणी असलेले असतात. थोडेफार कर्ज, त्याची सोयीस्कर परतफेड ह्या सवलती त्यांना मिळू शकतात.
३.       आनंदी होण्याचा चान्स असलेले लोक तर शेवटी तेच असतात ज्यांचे आई-बाप त्यांच्यासाठी पोटभर  मागे ठेवून जाण्याचा चान्स असलेले असतात. बाकीचे एकतर सतत रडत असतात किंवा अधून-मधून. किंवा आपल्याला काही रडायला नाही म्हणून बाहेरची रडणी उधार घेत असतात.
--
       ‘मेट्रो मनिला’ मध्ये बायको पेसो (फिलीपिन्स चे चलन) भरलेली बॅग घेऊन गावाकडे परतते, हातात नवऱ्याने दिलेलं काहीएक पकडून, मुसमुसत. कदाचित तिच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न सुटला असं एवढं तरी आपण म्हणू शकतो.
       नंतर मी ‘ब्रेकिंग बॅड’ बघून संपवली. आणि आता मला प्रश्न पडतो की समजा एकदम असे लाखो, करोडो रुपये, पेसो, डॉलर्स मिळाले तरी प्रश्न सुटत नाहीत. त्यांची अकाऊंटेबिलीटी हा प्रश्न उरतोच आहे. किंवा मग हे पैसे अगदी सावकाश, नजरेत भरणार नाहीत अशा मार्गाने वापरणं आलं. किंवा मग ते काळ्या अर्थव्यवस्थेत गुंतवणं. म्हणजे ‘सिटीलाईट्स’ मध्ये शेवटी गावी परतलेल्या राखीला पुढचे प्रश्न पडणार आहेत. कदाचित त्याच्याबद्दल काढलेला चित्रपट अस्सल भारतीय असेल आणि प्रातिनिधिकसुद्धा.
       ही एक चोरीची, कोणाला उघड सांगता येणार नाही अशा मार्गाने मिळवलेल्या पैशांची कोड्यात टाकणारी गंमत आहे. असा पैसा मिळवणं हे कठीण म्हणावं, तर त्याचा खरोखर वापर हे अजून कठीण. किंवा मग तो पैसा मिळण्याचा स्पीड एवढा नगण्य हवा की तो वापरताही येईल, आणि उघडकीस येणार नाही. पण मग काय फायदा?
       त्यामुळे मला असं कायम वाटतं की मोठे-मोठे दरोडे, चोऱ्या ह्या काही फक्त चोर करत नसणार. त्याच्यापाठी मिळालेलं घबाड चॅनेलाइज करणाऱ्यांची व्यवस्था असणार. (आठवा:शॉशॅंक रिडेम्प्शन) आणि चोर सापडले तरी ही व्यवस्था सापडणार नाही. ती नावं, जागा बदलत चालूच राहणार. चोरांना काय मिळत असेल अशा चोऱ्या, दरोड्यातून? ५०%, ४०%,३०%?
--
       हे बरंच भरकटून झालं.
       मुंबई, तिची विषम संधींची निर्दय किंवा अनप्रेडिक्टेबल दुनिया, तिच्यातल्या माणसांचं वागणं हा चित्रपटांचा, पुस्तकांचा आवडता विषय आहे. काही पुस्तकं मी वाचली आहेत, काही सिनेमे पहिले आहेत, काही सर्व्हे केले आहेत. मला प्रश्न पडतात:
मुंबईची (बेट आणि उपनगरे) लोकसंख्येची घनता आहे जवळपास २३००० प्रति चौरस किलोमीटर. अगदी मुंबई महानगर प्रदेश (MRR)  पकडलं तरी लोकसंख्येची घनता आहे १८०००. मुंबईची तुलना फार वेळा झाली आहे त्या शांघायची लोकसंख्या घनता आहे ३८००. शांघाय लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठं शहरी एकत्रीकरण (Urban Agglomeration) आहे. ढाकाची लोकसंख्या घनता आहे ४५००० आणि हे मुंबईहून छोटं शहर आहे. दिल्ली शहर एकत्रीकरणाची लोकसंख्या घनता आहे ७४०० आणि शहराची जवळपास ११०००. मेट्रो मनिलाची लोकसंख्या घनता आहे जवळपास १९०००. न्यूयॉर्कची लोकसंख्या घनता आहे १०७००. लंडनची लोकसंख्या घनता आहे ५३००. कलकत्ताची लोकसंख्या घनता आहे २४०००. टोकियोची लोकसंख्या घनता ६०००. (सर्व आकडे विकिपीडिया)
कशाला हे आकडे बघतोय मी? हे आकडे बघून मला केव्हा केव्हा वाटतं की आपण एक अशक्यतेचा पाठलाग करीत आहोत. शहराच्या विस्तारात किती माणसाना किती दर्जाचं आयुष्य देता येईल ह्याच्या काही सांख्यिक मर्यादा असतील. त्याच्यापलीकडे जाऊन जर माणसे शहरात असतील तर त्यांना आपण काय देऊ शकू?
असं निराशावादी असणं चांगलं मानलं जात नाही आणि असा निराशावाद सिद्धही करता येत नाही. कदाचित अशी एक प्रचंड समृद्ध अवस्था असेलही की भौतिक गरजांच्या वस्तूंचं, कच्च्या मालाचं इतकं उत्पादन होईल की त्याची काही वानवा राहणार नाही. स्पर्धा करण्यासाठी जी टंचाई मुळाशी असावी लागते तीच संपून जाईल. पण असं होत नाही तोवर समृद्धीचं स्वप्न, आपल्यापुरता एक निवांत कोपरा बनवून राहण्याचं स्वप्न ह्यावर लाखो, करोडी लोक डाव लावत राहणार. आणि त्यांनी लावलेल्या डावावर राजकारण, साहित्य, चित्रपट, समाजसेवा अशा बाकी गोष्टींचे डाव लागणार. त्यामुळे नसलेल्यांनी असलेल्यांची स्वप्नं बघत राहणं ह्याला पर्याय नाही. ह्या स्वप्नांमधून, त्यांच्या पाठी धावण्याच्या, धडपडण्याच्या तडफडीमध्ये, त्यात येणाऱ्या वैफल्य, फसवणूक, आणि हाताला लागता लागता राहिलेले समाधान ह्यांच्या मधल्या स्पेसमध्ये आक्रंदणारी गोष्ट.
असं आहे का की ज्यांना कधी अशा तडफडीत जावं लागत नाही असा गट ह्या गोष्टींची चव घेण्यात जास्त मजा घेतो. फेसबुकवर माझ्या एका अतिउच्चशिक्षित,फिनान्स मध्ये वगैरे महिन्यास लाख रुपयांची नोकरी करून सध्या बाल संगोपनाचे लोभस फोटो अपलोड करणाऱ्या परिचिताने असा उसासा टाकला होता की हिरोपंतीला अधिक गर्दी होती, सिटीलाईट्स रिकामाच. असं होण्यात काही नैतिक चूक आहे का? असं होतं आहे ह्यांचं एक कारण कदाचित सिटीलाईट्स एका मूलभूत निष्कर्षावर माती खातो तो म्हणजे एन्टरटेनमेन्ट. ‘मेट्रो मनिला’ असं करत नाही. मनिलाच्या हाउसिंग इनइक्वॅलिटी किंवा आर्थिक विषमता ह्यांचे दृश्य किंवा मौखिक धडे देण्यापेक्षा ‘मेट्रो मनिला’ थंड, कोडगी गोष्ट सांगतो. तिचे तपशील साचेबद्ध बांधतो. ‘सिटीलाईट्स’ उगाच गरम अवस्थेत जातो (अर्थात भट्ट कॅम्प आहे म्हणा!) आणि जिथं खरी बीभत्स भीषणता आणता आली असती तिथे नुसतं चुकचुकल्यासारखे करून सोडतो. थोडा अजून रिसर्च, थोडी अजून प्रत्ययकारक ठिकाणी शूटिंग करण्याची निवड असं असतं तर ‘सिटीलाईट्स’चा पुणे-५२ झाला नसता.(हा हा)
समीक्षा (!) अपार्ट, पण तो प्रश्न राहतोच की भौतिक समृद्धीच्या, जीवनाच्या किमान पातळीच्या शाश्वतीच्या अभावात जगणाऱ्या माणसांचा अभाव नष्ट करता येईल असं खरंच शक्य आहे का? समजा असं मानलं की शक्य आहे जर आपण आपल्याला उपलब्ध संसाधने वापरू लागलो, प्रचंड उत्पादन करू लागलो, लोकांना मोठया मोठया कारखान्यात कामं मिळाली असं सगळं. पण मग प्रश्न दुसऱ्या बाजूला जातो, जे ओरबाडले जातील, जे ओरबाडलं जाईल त्याचं काय? आणि समजा कोणीही ओरबाडले न जाता बदल होतील अशी व्यवस्था बनेल असं मानलं तर मग कशाने सुरुवात करणार? आत्ता आहे तो संधींच्या दुर्मिळतेचा साचा बदलण्यासाठी कुठेतरी हातोडा मारावाच लागेल. तो कसा? अर्थात सध्या अवतारपुरुष आलेले असल्याने ह्या प्रश्नांना काही अर्थ नाही. पण आपण आपली धोब्याची भूमिका करू, ती स्वाभाविकपणे येते.
--
       मुंबईतील झोपडपट्ट्या (ज्यांना बहुतेक ठिकाणी चाळ म्हणतात! हा शब्द ऐकल्यावर मला माझ्या मराठी मध्यमवर्गीय सांस्कृतिक ठेव्याचा घोर अनादर केल्यागत झालं होतं. असो!), त्यातील अर्थव्यवस्था, त्यातील इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न्स ह्यांचा वापर विक्रम चंद्राचे ‘सेक्रेड गेम्स’ आणि कॅथरीन बू ह्यांचे ‘बिहाइंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ ह्यांत आहे. सुकेतू मेहता ह्यांचे ‘मॅक्सिमम सिटी’ ह्यातही. माझ्या मते ‘बिहाईंड द ब्युटीफुल फोरेव्हर्स’ सर्वात जबरी. (अर्थात विविध प्रकारच्या साहेबांबद्दल मनात सतत ठुसठुसणारा किंवा सुप्त आदर असलेल्याना पचावयास जड किंवा घातक लिखाण. आणि लोक असे साहेब, भाऊ, दादा का डोक्यावर घेऊ इच्छितात ह्याबद्दल ट्रिव्हिअल थिअरी असलेल्या हस्तीदंती लोकांस मोक्याच्या जागी गुदगुल्या करणारे लिखाण). थोडं अॅकॅडमिक व्हायचं असेल तर राजनारायण चंदावरकर ह्यांचे लिखाण आणि मीरा कोसंबी.
--
       असं होतं रस्त्यावर चालताना कधी, की एखादी चालणारं किंवा कडेला घेतलेलं मूल असलेली बाई, कधी कधी हातात आणि डोक्यावर बॅगा असलेला तिचा नवराही रस्त्यात हरवलेले असल्यागत सामोरे येतात. ‘गावाहून आलोय. काही खायला नाही.’,’गावी परत जायचं आहे, तिकिटाला पैसे नाही’,’वडापाव खायचा आहे’ असं काही ते म्हणत असतात. बहुतेक लोक, त्यांना विविध स्त्रोतातून मिळालेल्या माहितीमुळे असा पवित्रा घेतात की खोटारडे आहेत हे, अॅक्टिंग करतायेत. आणि पैसे देत नाहीत.
       एकदा माझ्या एका मित्राने अशा एका तिकिटासाठी पैसे मागणाऱ्या माणसाला अगदी बारीकसारीक तपशील विचारले, कुठे जायचंय, किती आहे तिकीटाची किंमत. आणि तो माणूस बरोबर सांगतोय हे कळल्यावर त्याला स्टेशनला जाऊन तिकीट काढून दिले.
       असे मागणारे खरे आहेत का खोटे असा विचार न करता मी दरवेळी पैसे देतो किंवा मी काही खात असेन तर खायला. आणि मग परत निवांत माझे एथिकल पझल्स चघळतो.
       ह्या शहरातल्या अशा मागणाऱ्या, गंडलेल्या, खऱ्या-खोट्या सगळ्या लोकांना...
--
(विशेष आभार: कॅफे अण्णा आणि अंतर्देशीय पत्रांच्या काळापासूनचे जुने मित्रवर्य)  

        

                   

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...