Thursday, February 7, 2013

हिंदी त्रिकोणी सिनेमाला दिलेली आवडती मराठी भाबडी आदर्शवादी फोडणी: प्रेमाची गोष्ट

    भलतीच चांगली माणसं ,भलतेच आदर्श सुवचन पद्धतीचे संवाद आपल्याला झेपत नाहीत. उदाहरणार्थ 'पटत नसेल (म्हणजे अशा अर्थाचे आदर्श शब्द बरं का) तरी एकत्र राहिलं तर संसार होतो, पण सहवास नाही.' मला हे झ्याट (चालायचंच!)  कळलेलं नाही. अशा पद्धतीचे संवाद माझ्या पालकांत आणि माझ्यात झालेले नाहीत म्हणून असेल कदाचित. अर्थात माझे पालक लोकसत्ता शनिवार चतुरंग पुरवणीतले नसल्याचा हा दुष्परिणाम असावा. पण त्यामुळे मला 'प्रेमाची गोष्ट' जाम आवडलेला नाही, काही गोष्टी वगळून अर्थात.
      आता आपण काही फंडामेंटल सवाल पाहू.
१. साधारण ३०-३५ ची दिसणारी, एक आणि दोन घटस्फोट झालेली माणसे किती वेगाने एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात?
२. आपली एक आदर्श शैक्षणिक समजूत आहे की शिकवणाऱ्याने शिकणाऱ्यावर जाम विश्वास ठेवला की शिकणारा वाट्टेल ते शिकू शकतो. उदाहरणार्थ माझ्यावर माझ्या चित्रकला शिक्षकांनी विश्वास ठेवला असता तर आज मी सहज स्केचेस वगैरे काढली असती. किंवा समजा मी उद्या टेनिस क्लास लावला आणि जर तिथला कोच, जमेल तुला, जमेल, असं (विथ बाकी समजूतदार वाक्य) बगैरे सांगत राहिला तर दोन-चार एस, दोन-चार ड्रॉप तर कुठेच नाहीत. सगळ्यांत सगळी क्षमता असतेच. त्यामुळे वर्ड, एक्सेल, टॅली येत असेल आणि तुम्ही एका समजूतदार पटकथा लेखकाकडे असाल तर तुम्ही आठवड्याभरात पटकथा लिहू शकता? (असेलच. उगाच का एवढे सनिमे येतात?)
३. अपार ठासून भरलेली नैतिकता हा एक सहज आढळणारा सद्गुण आहे. आता आपण ही नैतिकता एका घटस्फोटीत आदर्श पुरुषाला लावू. बायकोला घटस्फोट घेऊ द्यायचा आणि त्याचवेळी ती परत येईल असा अपार विश्वास ठेवायचा. जबरदस्त भाषणीय शब्दांत समोर बसलेल्या अपरिचित व्यक्तीला तो सांगायचा. मग कथा लिहायच्या. त्यातली एक कथा, त्यात एक प्रेम त्रिकोण (ही एक वेगळी कथा आहे बरं! अशा कथा झालेल्याच नाहीत!!) आणि मग आपणहून पडून जाणारा त्रिकोणाचा एक बिंदू आणि मग उरलेल्या दोन बिंदूंची सात्विक समाधानी गट्टी (पडलेल्या बिंदूच्या कृतज्ञ विस्मरणासह). हेच प्रेम. बरं हे भलतंच टिकाऊ प्रेम. लग्न संपलं तरी नातं उरतंच, नातं संपलं तरी प्रेम. असं?
४. काही संदर्भांचे फ्लो. वाईन पिणारी, डिस्कमध्ये नाचणारी, बहुतेक एकटी राहणारी मीरा जोशी, हातातला चीज सदृश्य गड्डा खिसून म्हणते 'पानं घेऊ? म्हणजे एकदम उंच माझा झोकाच झालं माझं. (असो. संस्कार टिकतात ते असेच हो!!) मुंबईचा समुद्र किनारा म्हणून अलिबाग? राम सुब्रमण्यम यांच्या आई सतत एवढ्या तयारीत का असतात? असो. मज वाचाळाला क्षमा असावी.
  आता काही जमेच्या बाजू
१. अतुल कुलकर्णी यांचा चेहरा, विशेषतः पहिल्याच प्रसंगात.
२. गोष्टीत घडत जाणारी गोष्ट ही थीम.
३. सोनलने रामला केलेलं हग, उर्फ मिठी.
४. योगायोग्स  
आता काही हातच्या घालवलेल्या बाजू. रामचं द्वंद्व, म्हणजे स्वतःच्या उद्दात प्रेमाच्या कल्पनेच्या प्रतिबिंबात           असलेला राम आणि सोनलचा सहवास प्रत्यक्षात आवडू लागलेला राम आणि तो आवडत असला तरी आधीच्या नात्याच्या अनुभवाने त्याला पुढे न्यायला कचरणारा राम हे कुठेच पकडलं गेलं नाहीये. एकदा सोनल आणि एकदा रागिणी त्यांच्या संवादात हे द्वंद्व पकडतात, पण तेवढंच.
     नातं म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, लग्न म्हणजे काय यांच्या उदात्त, उन्नत व्याख्यांत खूप वेळ गेला आहे. पण मुळात चित्रपटातली पात्रे या नात्यांपायी अडकताना, धडपडताना फार दिसत नाहीत, अपवाद रागीणीचा एक टेक.
   मला असं वाटतं की जर राम-रागिणी ह्यांना एखादं मूल आहे असं किंवा रामची आई आजारी आहे असं दाखवलं असतं तर पेच नीट पकडता आले असते.
    वैवाहिक जीवन, त्यातले तणाव ह्यावरचे काही चित्रपट मला आठवतायेत- अ सेपरेशन,  इन अ बेटर वर्ल्ड, लिटील चिल्ड्रेन. पण यातल्या कशातही प्रेम, नातं यांचं फार सोज्वलीकरण नाही. अर्थात हॉलीवूडमध्येही असे सोज्वलीकरण, उदात्तीकरण होतंच. आशावादी शेवट हा खास अमेरिकन नशा आहे, आणि थोड्या थोड्या दिवसांनी तो लागतोच. पण हे चित्रण असल्याने काय होतं? लोक मुळात कसे वागतात? नाती, संबंध मुळात कसे असतात?
   अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे लिहिणारा माणूस, वेगळं वगैरे काही लिहू पाहणारा माणूस हा प्रेम, नाती, बाकीची माणसे यांच्या बाबतीत कसा असेल? त्याची प्रेम, नाती, स्त्री-पुरुष संबंध यांच्या बाबतीत काय भूमिका असेल? केवळ चांगली, सात्विक, सौंदर्यवादी प्रकारची भूमिका घेणारे लोक मला भोंदू वाटतात किंवा बालिश किंवा खरंच पार पोचलेले. पण अशी पात्रे लोकांना का आवडतात? ते स्वतः कितीतरी ठिकाणी सोयीस्कर वागत असताना त्यांना अशी दैवी पात्रे का आवडतात? अनेक सिरियल्सच्या नायिका अशाच दाखवलेल्या असतात. ह्यात मागणी तसा पुरवठा आहे की सतत झालेल्या पुरवठ्याने निर्माण झालेली निरंतर आवड?
    स्टेनबेक च्या 'ग्रेप्स ऑफ रॅथ' वर एका टीकाकाराने म्हटलं होतं की यातल्या पात्रांना एकच मिती आहे, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाची. त्यांच्या बाकीच्या मिती जवळपास येताच नाहीत, म्हणजे स्त्री-पुरुष संबंध, किंवा आवडी, आठवणी वगैरे. एका चरचरीत वर्तमानात गोष्ट होत राहते. 'प्रेमाची गोष्ट' मध्येही एका प्रचंड आदर्श मितीत नायक आहे, थोड्याफार त्याच प्रकारात बाकीची पात्रे. वास्तवाच्या, किंवा अगदी कल्पनेच्या बाकीच्या मिती नाहीतच जणू. अशी असतात का माणसे? नायक एका ठिकाणी म्हणतो की सिनेमा हा काही आपल्या जगण्यापासून फार वेगळा नसतो. आणि त्याचवेळी 'प्रेमाची गोष्ट' ही फारकत घेतंच राहतो.
  घ्यावीच. गोष्टीने अशी फारकत घ्यावीच. पण ही फारकत आदर्शाचा भुलभुलैय्या नसावी. माणसांच्या वागण्याच्या बऱ्याच शक्यता एकमेकांशी गुंफूनही ही फारकत घेता येते. कदाचित हाच मास्टर दिग्दर्शक आणि यशस्वी दिग्दर्शक यांतला फरक असावा.
  आता उरलेलं तेल. एका स्त्री आणि पुरुषात जे संबंध असतात त्यात खरोखर किती असतं, त्या दोघांच्या मनात एकमेकांच्या ज्या प्रतिमा असतात त्यात किती असतात आणि त्यांच्या समजेत किती असतं? मुळात प्रजोत्पादन सोडलं तर स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते का? आपण ज्याला प्रेम, नाती म्हणतो त्यात सवयीचा भाग किती असतो, गरेजेचा किती? हे प्रश्न रुक्ष आहेत, कदाचित त्यांची उत्तरे निरर्थकतेचे वैराण वाळवंट दाखवणारी आहेत. मला काहीवेळा वाटतं की जर दोन स्त्री-पुरुषांना त्यांना खरोखर प्रेम आहे का नाही हे पहायचं असेल तर त्यांनी वेगळं राहून पूर्ण क्षमतेने जगून पहावं. तरच त्यांना खरोखर काही सांगता येईल. पण मिलन कुन्देरा म्हणतो तसं एकच असतं आयुष्य.मग उगाच कशाला अंगाशी येणारे प्रयोग करा. असतं बुवा प्रेम. परमेश्वरासारखं अव्याख्येय आणि संपूर्णपणे वैयक्तिक.
   आता दोन प्रकारचे तिरसटपणा करून ही ओकारी किंवा वैचारिक मैथुन थांबवू.
   मी लहानपणी असे वाचत असे की पाश्च्यात्य संस्कृतीवरचे एक मोठे संकट, जे त्या संस्कृतीमुळेच आहे ते म्हणजे घटस्फोटांचे वाढते प्रमाण. पण भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्था आहे (जाती व्यवस्था, ना ना, ते इंडियात.) 'प्रेमाची गोष्ट' घटस्फोटाने सुरु होतो. अ अ असो...
    डीडोचं गाणं आहे एक 'व्हाईट फ्लॅग'. प्रेमाची गोष्ट हिट जाणारे बॉस. राजवाड्यांची पुण्याई आहे तेवढी आणि त्यावर कुलकर्ण्यांच्या टाईमली मुलाखतीचे, त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेचे डिव्हिडंड. तुम्हालाही तो चित्रपट बघून वाईट वाटणार नाही. पण समजा अशी फिलिंग आलीच, आणि हा नतद्रष्ट लेख तुम्ही इथपर्यंत वाचाल तर 'व्हाईट फ्लॅग' चा अॅन्टिडोट घ्यावा.
   पुणे-५२ ची क्षमा मागून...
       

Wednesday, February 6, 2013

डेव्हिड: सनिमा, शेंदूरी दगड आणि गोंधळी प्रयोग

    बिजोय नंबियारचा 'शैतान' मला आवडला होता. माणसाची स्वाभाविक नकारात्मक बाजू, त्याला मजा देऊ शकणारे आसुरी आनंद. नियम तोडायची, संकेत मोडायची उर्मी. 'शैतान' खूप डार्क नव्हता. पण वेगळा नक्की होता. असं ऐकलं होतं की अनुराग कश्यपला अगोदर 'पांच' नावाचा चित्रपट प्रदर्शित करायचा होता जो पुण्यातल्या कुप्रसिद्ध 'जोशी-अभ्यंकर' प्रकरणावर आधारित होता. पण सेन्सॉर बोर्डाच्या दृष्टीने तो फारच होता. तो कधी खुलेआम प्रदर्शित झाला नाही. मग पुढे अनुराग कश्यपने 'शैतान' ची निर्मिती केली.
    शैतान मधले काही प्रसंग आठवतात. एक जेव्हा शिव पंडित, चित्रपट दुष्यंत साहू, रस्त्यावर असलेल्या कडक लक्ष्मिवाल्याला बघून स्वतःचा बेल्ट काढतो आणि बेभान मारून घ्यायला लागतो. दुसरा जेव्हा के.सी. त्याच्या मैत्रिणीशी फ्लर्ट करणाऱ्याच्या डोक्यात टी.व्ही., का काहीतरी टाकतो आणि हसतो. नंतर जेव्हा किडनॅप करून पैसे मिळवायचा प्लॅन फसत जातो आणि त्यांचा ग्रुप खिळखिळा होत जातो तेव्हा एका भांडणाच्या प्रसंगात कल्कीचा थंड चेहरा. 'खोया खोया चांद' चं रिमिक्स तर अफलातून. खरंतर मी त्याच्यासाठी दोनदा पाहिला पिक्चर. चित्रपटात नसलेलं 'हवा हवाई' पण सही होतं. कदाचित राजीव खंडेलवाल च्या साईड स्टोरीने चित्रपटाचा डार्कनेस कमी झाला. कदाचित थोड्याफार व्यावसायिक यशासाठी ते जरूरीपण होतं. आणि राजीव खंडेलवालने विस्कळीत आयुष्याच्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली पण आहे चांगली.
   'डेव्हिड' चे ट्रेलर लक्ष वेढून घेत होते ते नील नितीन मुकेश आणि 'दमा दम मस्त कलंदर' ने. नील नितीन मुकेशचे मी बघितलेले चित्रपट म्हणजे 'जॉनी गद्दार', लफंगे परिंदे, आणि आत्ता डेव्हिड. मला काहीवेळा उगाच हॉलीवूड आणि बॉलीवूड मधले काही अभिनेते एकमेकांशी जुळणारे वाटतात, म्हणजे अमीर खान आणि टॉम हॅंक्स आणि आता नील नितीन मुकेश आणि रायन गोस्लिंग. रायन ग्सोलिंग ची 'ड्राईव्ह' 'आयरिस ऑफ मार्च' किंवा 'गॅंगस्टर स्क्वाड' मध्ये असलेली थंड, मितभाषी अभिनयाची शैली आणि नील नितीन मुकेशचा 'डेव्हिड' मधला १९७५ लंडनचा डेव्हिड हे खूप मिळते जुळते आहेत. विक्रम ने केलेला २०१० चा गोव्यातला डेव्हिडही छान आहे. मुंबईत घडणारी स्टोरी मला घीसीपिटी वाटली. पण जॉन विजय आणि रोहीणी हत्तंगडी यांनी त्यातही छोटे पण सबळ रोल केले आहेत. मुंबईत घडणाऱ्या गोष्टीतले संवाद फार पुस्तकी शैलीतले आहेत. नीलम आणि डेव्हिड ह्यांच्यात होऊ शकणारी गोष्ट खूप अर्धवट संपते, पण बरोबर आहे ते कदाचित.
   लक्षात राहणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे लंडनच्या गोष्टीत वापरलेला ब्लॅक अन्ड व्हाईट. ह्या दोन रंगानी त्या गोष्टीला खोल परिमाण लाभलं आहे. आणि मर्यादित बाह्य दृश्यांनी सुद्धा ३८ वर्ष जुन्या काळाचा परिणाम बनला आहे. पात्रांची निवड, त्यांना दिलेले वेश, मेकअप, संवाद आणि तीन गोष्टींचे तुकडे सांधतानाही परिणामकारकपणे सांगण्यात आलेली गोष्ट म्हणून लंडनचा डेव्हिड लक्षात राहतो.
  दुसरी गोष्ट चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एकदा येणारं 'गुम हुये' आणि मध्ये येणारं 'युंही रे'. चित्रपटाला एकच एक संगीतकार नाही, तर ५-६ जणांची मोटली आहे. 'गुम हुये' हा तर ट्रांस प्रकारच्या जवळ जाणाऱ्या संगीताचा चांगला नमुना आहे. थेटराच्या अंधारात, ब्लॅक अन्ड व्हाईट मॅजिक मध्ये तर हे गाणं जाम भन्नाट वाटतं. रेमो फर्नांडीसनेही चांगली गाणी दिली आहेत. सतीश कौशिकचा भुताळी बापही सही आहे.
    एक वैयक्तिक सूडकथा, एक सामाजिक-वैयक्तिक टिपिकल भोंदू राजकारणी आणि सच्ची माणसे अशी आजकालची आवडती मेणबत्ती संघर्षकथा आणि एक बऱ्यापैकी हलकी फुलकी विनोदी कथा अशा तीन गोष्टी एकत्र आणणं हे कठीण आहेच. आणि त्यात त्या एकमेकांशी जोडणं तर त्याहून. त्यामुळे त्या एकमेकांशी जोडताना जेनेटिक साधार्म्याच्या किंवा तीव्र हृदयपरिवर्तनाच्या दिग्दर्शकीय उड्या मारल्या गेल्या आहेत त्या अपरिहार्यच आहेत. ह्या गोष्टी जोडायलाच हव्या होत्या का हाही प्रश्नच आहे, पण त्या जोडलेल्या असतात, असायला हव्यात हे तर आधीपासून  जाणवतच होतं एकप्रकारे. तब्बू आणि विक्रम यांची दाखवलेली निरागस मैत्री हा अशा शेवटातही लक्षणीय भाग आहे.
  तर हा झाला अशा प्रकारचा वर्तमानपत्रीय रिव्ह्यू. आपले स्टार्स वगैरे काही नाहीत बरं. हा तर माझा लिखाणाच्या सरावाचा उद्योग आहे किंवा मळमळ. खरेतर एकूणच कला किंवा निर्मिती ह्या प्रकाराबाबत मला काही गंमतीशीर गोष्टी वाटू लागल्या आहेत.
१. निर्मितीच्या, म्हणजे आपण काय दाखवू, चितारू, लिहू शकतो ह्याच्या शक्यता मर्यादित आहेत. छटा असतील अनेक, पण त्या कळण्याची कुवत मर्यादित आहे. त्यामुळे तुम्ही सलग दोन एक वर्षे जगातील वेगवेगळे चित्रपट पाहिले की तुम्हाला बसणारा धक्का खूप कमी होतो. तुम्ही आपोआप चित्रपट प्रेडीक्त करू लागता. हे तसं कुठल्याही सुखाशी होत असावं.
२. तरीही लॅपटॉपच्या १७ इंची पडद्यात आणि थेटराच्या अंधार आणि मोठ्या पडद्यात खूप फरक असतो. थेटराचा पडदा, आवाज तुम्हाला खेचू शकतो. लॅपटॉपवर असं होणं म्हणजे फारच!! म्हणजे बघणारा विपश्यी साधूच हवा किंवा जे चाललंय समोर ते जाम पॉवरफूल . मी पामर काय नेणे...
३. मनोरंजन हा कितीही म्हटलं तरी माझ्यालेखी चित्रपटाचा आवश्यक भाग आहे. चित्रपट का बनतात, चित्रं का काढली जातात, गोष्टी का लिहिल्या जातात, कविता का लिहिल्या जातात या प्रश्नांना करणाऱ्याची खाज हे उत्तर असेल. पण जेव्हा ह्या गोष्टी थेटरात, दुकानात, प्रदर्शनात ठेवल्या जातात तेव्हा प्रतिसाद हा अविभाज्य भाग बनतो. आणि हा प्रतिसाद केवळ कलेची दाद नाही तर पैसे म्हणूनही हवा असतो. मला तर वाटतं की कलाकाराचेही दोन टप्पे असतात. आर्थिक सुबत्तेच्या आधीचे आणि नंतरचे. आर्थिक सुबत्तेच्या आधी कलाकार एकटा, प्रयोगशील असेल. आर्थिक सुबत्ता, सोबत येणारी प्रसिद्धी आणि त्याच्या निर्मितीला, खरंतर त्या निर्मितीत जे लोकांना आवडलंय त्याला मिळणारी दाद हे सगळं आल्यावर आता जे हिट झालं ते पुढे चालू ठेवायचं, सातत्य आणायचं का परत सगळं झुगारून नव्या शोधात जायचं हा पेच आहे. आणि ह्यात काही दोष नाही. पोट भरून जगावसं वाटणं ही काहीतरी करावसं वाटण्याएवढीच मुलभूत गोष्ट वाटते मला. आणि मग आपल्या निर्मितीला जेव्हा प्रेक्षक, वाचक, बघे यांच्या गर्दीत उतरवलं जातं तेव्हा कलेला दाद मिळावी ह्याबरोबर किंवा याहून अधिक तिला आर्थिक दादही यावी असं असणारच. आणि हे दाद केव्हा येऊ शकते? जेव्हा समजेच्या, जाणीवेच्या साऱ्या स्तरांची सरमिसळ असलेला, आणि सरासरी वकूबाचा समाज त्या निर्मितीला स्वीकारेल. आणि तो स्वीकारेल जेव्हा त्याची मनोरंजनाची गरज भागेल. सरासरीमध्ये सौंदर्य आणि मनोरंजन ह्या दोन गोष्टी एकमेकांत जाम गुंततात असं मला वाटतं. सौंदर्याची जाणीव ही खोल आहे, आणि तिच्या पूर्तीसाठी कंटाळा स्वीकारायला हवा, वाट बघायला हवी. पण मनोरंजांची भूक अधिरी आहे. तिला चटकन येणारे समाधान हवे. हा म्हणजे लक्ष्मणची बॅटिंग आणि सेहवागची यातला फरक झाला. माझ्या स्वतःकरता चित्रपट, पुस्तक हे मनोरंजन आहे आणि सौंदर्यही. पण प्रेक्षक म्हणून माझी मनोरंजनाची निकड जास्त आहे तर लिहिणारा म्हणून सौंदर्याची.
४. काल २७०-३०० क्षमतेच्या चित्रपट गृहात ३०-४० लोक चित्रपट बघायला होते. काहीवेळा मला हा परदेशी आधुनिक निर्मिती कंपन्या, जाहिराती, महाग तिकिटे असलेले मॉल असा नवा डोलारा फार अस्थिर वाटतो. म्हणजे भारतीयांची चित्रपटांची भूक आणि त्याचवेळी पैसे वाचवण्याची अनुवांशिकता ही ओळखण्यात काहीतरी गोंधळ वाटतो मला. म्हणजे समजा आता 'डेव्हिड' चित्रपट बनवायला 4-5 करोड तरी खर्च आला असेल. आणि हा चित्रपट जास्तीत जास्त दोन आठवडे टिकेल. कालचा शो तर स्वतात होता. सरासरी शोचे तिकीट १५० पकडू. आणि ६० लोक येतात असं. झाले ९०००. समजा असे २५ शो झाले. झाले २२५०००. ही झाली पी.व्ही.आर. ओबेरायसारख्या उच्चभ्रू ठिकाणाची कमाई. पी.व्ही.आर. भारतात ४५ ठिकाणी आहे. असे अजून जे काही आहेत ते पकडून असतील २००. समजा अशा सगळ्यांचा गल्ला आहे ५ करोड. छोटी थेटरं असतील अजून ५००, पण तिथे गल्ला अजून कमी असेल. तो समजा २ करोड. हा फायदा मला फारसा वाटत नाही. अर्थात ही फार तकलादू मांडणी आहे. मुद्दा असा की असं होऊ शकतं की काही दिवसांनी मनोरंजन उद्योग जरा कोलमडेल आणि टिपिकल हिंदी चित्रपटच जास्त येतील. हे काही वाईट नसेल, पण..                    
     असो, डेव्हिड च्या दगडाला शेंदूर लाऊन केलेला ह्या गोंधळी प्रयोगाचं चांगभलं हो....

Saturday, February 2, 2013

मिडनाईटस् चिल्ड्रेन: बराचसा पोकळ सौन्दर्याविष्कार

    काल रात्री झोपताना 'डेव्हिड' बघावा का 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' अशा द्विधा मनस्थितीत झोपी गेलो. उठलो तेव्हा ९.१० वाजलेले. १०.१५ चा ९० रुपये तिकिटात पाहता येणारा 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' पहायला गेलो. ३० एक जण चित्रपट बघायला होते. त्यात दोन ७-८ जणांचे ग्रुप, बाकी नवरा बायको, मित्र-मित्र प्रकारचे काही. माझ्या शेजारच्या सीटवर मिलिंद शिंदे.
     मी जवळपास ४ वर्षामागे जेव्हा सिरीअसली वाचायला लागलो तेव्हा वाचलेली पाहिली कादंबरी 'मिडनाईटस् चिल्ड्रेन'. तेव्हा त्यातला मॅजिकल  रिअॅलिझ्म' खूप वेगळा वाटला होता. आणि मुख्य थीम, १५ ऑगस्ट १९४७ च्या रात्री, १२ ते १ च्या दरम्यान जन्मलेली मुले. त्यातला एक , एकदम १२ च्या ठोक्याला जन्मलेला कथानायक. त्याची गोष्ट. खरंतर १९४७ ते १९८० या काळातला भारताचा इतिहास. रश्दींनी १९८१ साली ही कादंबरी लिहिली. म्हणजे ३२ वर्षांपूर्वी. मला ही कादंबरी आवडली. त्यानंतर मध्यपूर्वेतल्या इतिहासावर आधारित रश्दींची एक फिक्शन मी वाचायचा प्रयत्न केला होता. पण ती फिक्शन इतिहास, फिक्शन आणि सेक्स यांत जाम फसून गेली आहे. मग मी ती अर्धवट सोडून दिली. 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' मात्र लक्षात राहिली. म्हणजे तपशील तसे ढासळत गेले. पण मुख्य थीम, रश्दींची वास्तविकतेला जादुई अस्तर देऊन सांगण्याची बेमालूम हातोटी, आणि सुमारे ३३ वर्षांचा एका देशाचा इतिहास, कोरडा, रुक्ष नाही, तर त्या इतिहासाशी बांधलेल्या काही माणसांच्या आयुष्यातून पडलेले त्या इतिहासाचे कवडसे.
    दीपा मेहता यातल्या फार काही दाखवू शकलेल्या नाहीयेत असं म्हणावं लागेल. चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणजे कथा नायकाच्या जन्माच्या अगोदरची पार्श्वभूमी मांडताना चित्रपट फारच वेगाने सरकतो. म्हणजे कसलीच मजा येत नाही, अनुपम खेरने साकारलेला काश्मिरी खानदानी सोडला तर. चित्रपट थोडा स्थिरावतो तो अहमद सिनाई आणि अमिना सिनाई मुंबईत येतात तिथपासून.
    खरंतर इतक्या मोठ्या आवाक्याच्या फिक्शनवर चित्रपट काढणं ह्याला काय म्हणावं? मला स्वतःला चित्रपट हा कथा या प्रकारच्या जवळ जातो असं वाटतं. म्हणजे प्रेक्षक किती वेळ चित्रपट पाहू शकतो, अगदी तीन तास म्हटलं तरी, फार मोठा कालखंड चित्रपटात घेणं हे धाडस आहेच. अनुराग कश्यपने 'वासेपूर' मध्ये ते केलंय. पण तिथे हा फार मोठा कालखंड प्रामुख्याने एका छोट्या शहराभोवती फिरतो, त्यात बिहारचे, भारताचे संदर्भ नाहीत असं नाही, पण ते पार्श्वभूमीला. 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' कादंबरीत जी खोली आहे, त्यात वास्तविकता आणि जे सांगायचं आहे त्याच्या सोयीसाठी घेतलेला जादुई वास्तववाद यांचं जे मिश्रण आहे ते तसं, किंवा अगदी थोडं बदलून का होईना पडद्यावर आणणं हे तसं तर वेडं धाडस. दीपा मेहतांनी ते केलं आहे, तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीत , स्वतः सलमान रश्दी यांचा आवाज अशा अनेक बाबतीत ते सुंदर आहे. पण चित्रपट संपताना, कादंबरी जशी अपुऱ्या स्वप्नांच्या जखमेची, आणि तरीही पुन्हा नव्याने स्वप्न पाहणाऱ्या मानवी स्वभावाची किंवा अपरिहार्यतेची रुखरुख लावून संपते तसा चित्रपट संपत नाही.
     चित्रपट बघायला जे दोन ग्रुप आले होते त्यात कोणी बहुतेक मूळ कादंबरी वाचली नव्हती. चित्रपट तंतोतंत मूळ कादंबरीवर घेतलेला नाही, पण मूळ कादंबरीचा ढाचा सोडलेलाही नाही. तर हे दोन्ही ग्रुप शेवटला, जेव्हा आणीबाणीच्या कैदेतून बाहेर आल्यावर सलीम सिनाईला त्याच्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टी योगायोगाने परत मिळतात त्यावेळी हसत होते. मला गंमत वाटली आणि त्याचवेळी दिग्दर्शक फसला याची पावतीही. ते हसले कारण युद्ध, आणीबाणी अशा गंभीर गोष्टींबाबत बोलणाऱ्या चित्रपटात एक क्षुल्लक योगायोग कसा काय घडू शकतो यामुळे? आणि त्या योगायोगामुळे चित्रपट एकदम आशावादी, भावनिक शेवटाला जाऊन संपतो. असं कुठेही वाटत नाही की तो योगायोग काहीतरी जे सांगायचं आहे त्याच्यासाठीच आवश्यक हिस्सा होता. कादंबरी वरून एकदम दैवी कृपेने डोळे येणाऱ्या हिंदी पिक्चर वर उडी येते आणि खास आशावादी डोस देऊन सम्पेश.
     रश्दीना 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' मधून नेमकं काय सांगायचं होतं हे त्यांनी लिहिलेलं मी वाचलेलं नाही. पण मला वाटतं की 'मिडनाईटस् चिल्ड्रेन' हा १९४७ ते १९८० दरम्यानच्या एका नव्याने राजकीय अस्तित्व घेणाऱ्या देशातल्या, ह्या नव्या पर्वात जन्मलेल्यांचा, विशेषतः त्यातल्या संवेदनशील गटाच्या अनुभवांचा प्रवास आहे. सलीम सिनाईला आवाज ऐकू येतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येतात, ते या संवेदनशील मनावर त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे उमटणारे घाव, ठसे किंवा स्पर्श आहेत. रश्दींनी ही संवेदनशीलता बेमालूमपणे फिक्शनलाईझ केली आहे. आणि ही संवेदनशीलता सामाजिक आणि वैयक्तिक अशा दोन कधी एकमेकांसोबत जाणाऱ्या तर कधी एकमेकांना कापत जाणाऱ्या प्रवाहांतून जाते. एक आहे सलीम सिनाईचे आयुष्य, त्याचे, स्वतःचे. आणि दुसरे आहे ते नेहरूंच्या 'नियतीशी करार' मधून जन्माला आलेल्या, या देशात जगणाऱ्या माणसांच्या जीवनाची जवळपास सारी अंगे बदलण्याच्या, आधुनिक होण्याच्या स्वप्नांचे आयुष्य. आणि हे स्वप्नांचे आयुष्य राजकीय पटलावर एखाद्या फाश्यासारखे खेळते आहे.
    भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास म्हणजे आपल्याला नेमकं काय ठाऊक असतं? मला वाटतं शाळेत मला इतिहास शिकवला त्यात प्रामुख्याने शिवाजी महाराज आणि भारतीय स्वातंत्र्य लढा यांच्यातल्या रोचक गोष्टी होत्या आणि तपशील. गोष्टी आवडायच्या आणि तपशील कंटाळवाणे वाटायचे. प्रश्न होते, पण ते मुद्देसूद लांब उत्तरांचे जी पाठ करायची होती. पण इतिहासात भूगोल नव्हता, अर्थशास्त्र नव्हतं, सामाजिक प्रश्न तोंडी लावायला होते. सगळं वेगवेगळया पुस्तकांत विभागून ठेवलं होतं. आणि ही पुस्तकं यशस्वी आयुष्याच्या प्रवासात रद्दी होती हे शिकवलं जात होतं. पुढे मी भरकटलो ही बाब अलाहिदा. मागच्या वर्षी रामचंद्र गुहांचा 'इंडिया आफ्टर गांधी' वाचताना कितीतरी गोष्टी नव्या कळत गेल्या, नवे प्रश्न आले, अनुत्तरीत.
   आज चित्रपट पाहून निघताना असे प्रश्न आठवले नाहीत असं नाही. दीपा मेहतांनी इंदिरा गांधी, आणीबाणी हा भाग दाखवताना प्रतीकात्मकता जबरदस्त वापरली आहे. आणि कथा नायकाच्या आयुष्यातून, १९८० साली देशभर जाणवत असेल असं ३३ वर्षांचं फसलेपणही आलं आहे. आज २०१३ साली, आर्थिक उदारीकरणाची २० वर्षे भोगल्यावर त्याचा चटका हवा तेवढा मला बसला नाही कदाचित. माझ्या सोबत बघणाऱ्यानाही बसला नाही बहुतेक.
   तरीही चित्रपट बघावा असा आहे. तो दृश्यात्मकरित्या सुंदर आहे. दर्शील शेफारी आणि सत्या भाभा दोघांनीही ताकदीने काम केलं आहे. सिद्धार्थ त्याच्या निगेटिव्ह रोलमध्येही जमला आहे, आणि पार्श्वसंगीत तर सहीच. पण ह्या सगळ्या सुंदर गोष्टींच्या आत टोचणारं, डाचणारं फार काही मिळत नाही एवढंच.
   टोचणारं, डाचणारं मिळायला हवंच असं नाही. पण ज्या मूळ गोष्टीवर आधारित ही निर्मिती आहे, त्या गोष्टीत, त्या काळात ही फसगत आहे. माणसांच्या आयुष्याचे जवळपास सारे कप्पे व्यापू पाहणारी सरकार नावाची व्यवस्था, त्या व्यवस्थेच्या ताकदीच्या जवळ जाण्यासाठी होणारी धडपड आणि त्या व्यवस्थेचा गदारोळ. भारतातून गरिबी, अज्ञान, रोगराई आणि संधींची विषमता नष्ट करण्याचे स्वप्न कुठे होते? स्वप्न होतेच, त्याचेच गाजर दाखवून निवडणुका लढवल्या जात होत्या. आणि त्या स्वप्नासाठी उभारलेली सरकार नावाची व्यवस्था, वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी राबवली जाणारी राक्षसी यंत्रणा बनते आहे हे वैफल्य.
   आज हे वैफल्य तितकं नसेल. कारण संवेदनशील मन ज्यांच्यात असू शकतं असे बहुतेक मेंदू आणि पोटे आज संपन्नतेच्या इन्क्युबेटरमध्ये आहेत. प्रश्न आहेत, मांडलेही जात आहेत. गरिबी हटली असेल, संधी नक्कीच विषम आहेत. पण या वास्तविकतेकडे पाहू शकणारी संवेदनशीलता आणि वास्तव ह्याच्यामध्ये माध्यमांची काच आहे. ती दाखवते, अगदी भेसू  असंही काही दाखवते, दाखवून दाखवून नम्ब करते. काचेच्या पलीकडे जे चालू आहे ते चालूच रहातं.सरकार आहेच, आणि जोडीला जी.डी.पी.चे गाजर आलं आहे. गंमत म्हणून वाटतं ,२०२५ साली, 'लिबरलायझेशन्स चिल्ड्रेन' लिहिलं जाईल तेव्हा काय असेल?                       

Friday, February 1, 2013

ग्रेटर एलिफंट

        हा चित्रपट आहे, हिंदी. तुमच्यापैकी काही जणांनी ऐकला असेल, आणि बऱ्याच जणांनी नाही. मला पण काहीच माहिती नव्हतं. पण माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचा चित्रपटाच्या निर्मितीत बराच भाग आहे. तिने सांगितलं म्हणून आम्ही काही मित्र गेलो पिच्चर बघायला.
       एक जण तर मध्येच झोपून गेला. मी आणि उरलेला एक असे आम्ही मध्ये मध्ये कंटाळत पाहिला. इंटर्वल नाही, ९० मिनिटांचा पिक्चर. खूप फ्रेश टायटल सॉंग आणि तुम्हा आम्हाला दिसणाऱ्या वास्तविकतेत खोचलेली एक संपूर्ण फिक्शन. संपूर्ण. क्लीशेड, जाणीवपूर्वक क्लीशेड. जे चाललंय त्यावर उपरोध करणारी आणि काहीवेळा स्वतःचा रस्ता पकडणारी. अशी फिक्शन पाहणं ही एक वेगळी गोष्ट असते. एकदा मी असंच बऱ्याच मोठ्या ग्रुप सोबत 'वेटिंग फॉर गोदो' पाहायला गेलो होतो. हे जागतिक रंगभूमीवर गाजलेलं नाटक आहे, त्याला पोस्ट-मॉडर्निस्ट, अॅबस्ट्रॅक्ट ड्रामा वगैरे म्हणतात असं. सुमारे दोन तास आणि थोडा जास्त हा प्रयोग चालतो. नसरुद्दिन शाहने काम केलं होतं. म्हणाल तर चार ओळींची गोष्ट, म्हणाल तर खूप खोल काही दर्शवू शकतील अशी. तो प्रयोग संपवून बाहेर पडताना बहुतेक जण 'काय होतं हे' अशा अवस्थेत होते.
        काही गोष्टी, म्हणजे चित्रपट, पुस्तकं जबरदस्त हिट करतात. कशामुळे होत असावं असं? अभिनय, गोष्ट, आपल्या आजूबाजूच्या जगातली झपक्कन अंगावर येणारी एखादी गोष्ट, सादरीकरण. काहीवेळा तर संपूर्ण पिक्चर किंवा पुस्तक डोक्यात जात नाही, एखादा तुकडा डोक्यात अडकून राहतो.
       'वॉल्ट्झ विथ बशीर' चा शेवट, जिथे अॅनिमेटेड असणारा पिक्चर एकदम खऱ्या, अंगावर शहारे आणणाऱ्या फोटोग्राफवर संपतो.
       'ग्रेप्स ऑफ रॅथ' किंवा 'कॅनरी रो' चे शेवट. अगदी 'मायकेल क्लेटन' चा शेवट. ग्रेटर एलिफंटला असा शेवट जमला आहे, अगदी पूर्ण नसेल तरी बराच आणि त्यामुळे आधीच्या ९० मिनिटात जे काही वाटू शकतं ते सारं पालटून एका प्रश्न पडणाऱ्या सुखद अवस्थेत ग्रेटर एलिफंट संपतो.
   स्तुती करण्यासारखं अजूनही काही आहे चित्रपटात. अभिनय, जो मुद्दामून थोडासा नाटकी वाटावा अशा धाटणीने करून घेतला आहे कदाचित. गाणी, वेगळी, साधी, फ्रेश. गोष्ट, जी वास्तवाच्या तीरावरून फिक्शनची जोरदार छलांग घेते. आणि पुण्यातलं शूटिंग!! (बोला हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, हे हे....) आणि बराचसा जाणीवपूर्वक वेगळं रहायचा प्रयत्न. म्हणजे पात्रांचे संवाद, त्यात मध्येच पटकन न समजणारं वेगळं काहीतरी. बरेच शब्द आहेत अशा प्रयोगांना, समांतर, प्रायोगिक, त्यांच्या व्यक्ती तितक्या व्याख्याही. पण ग्रेटर एलिफंट एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो. छोटी, तशी दुर्बळच. पण केवळ वेगळं काही दाखवावं असा 'टोकदार भाष्याचा' अट्टाहास वाटत नाही. येणाऱ्या वेगळेपणात आधी प्रयत्नपूर्वक वाटणारी, पण नंतर जमलेली सहजता आहे.
   मला पडणारा प्रश्न तर नेहमीचा आहे. का बनवतात चित्रपट? एक- खाज म्हणून. दोन- धंदा म्हणून. चित्रपट का बघतात? एक- नोकरी, धंदा, कुटुंब कबिला, प्रेम वगैरे करताना बहुतेक जण करतात असे मनोरंजन आपणही करू म्हणून. म्हणजे जसे बागेत जातात तसे थेटरात. हसा, गुद्दागुद्दी किंवा प्रणय पहा, संपला की घरी या. टिश्यू पेपर फेकावा तसं मनोरंजनाची किंवा पैसे वाया गेले वगैरेची बेगडी ढेकर देऊन फेकून द्या.  दोन- खाज म्हणून. प्रश्न पडावेसे वाटतात म्हणून.
   पिक्चरच्या मध्ये झोपलेला माझा मित्र शेवटी म्हणाला, 'ये तो क्रिएटिव्ह मास्टर्बेशन हुआ' ..
   असेल, त्यांना करताना जाम मजा आली असेल. किंवा त्यांनी करून संपवलं असेल, ठाऊक नाही.  मला बघताना मजा आली, थोडा कंटाळाही जो शेवटी निघून गेला होता. आणि माझ्या प्रश्नाच्या उत्तराची एक बाजू मला परत दिसल्यासारखी वाटली, आपण काहीही करतो ते आपल्याला मजा येण्यासाठी. दॅट इज ग्रेटर एलिफंट.      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...