Friday, March 25, 2011

मोठी, मधली आणि धाकटी


मोठी पाय पसरून बसली होती. ९ वाजत आले होते. सकाळी ६ ला जाग आल्यानंतर दात घासून इथे येऊन बसायचं. म्हणजे खरं एका कोपर्यातच. गुडघे निकामी झाल्यापासून चालणं खूपच मंदावले होतं. अगदी ५-६ फूट चालत जायलाही ५ मिनिटं आणि छोटी छोटी ७-८ पावलं टाकायला लागायची. वळायचं  म्हणजे तर कशाचा तरी आधार घेऊन अगदी सावकाश वळायचं . अशा सगळ्या गतीने जर आपण सकाळी आवरत बसलो तर कोणालाच काही करता येणार नाही असा एकदा सुनेने जाहीर केलं आणि मग दुसर्या दिवसापासून मोठी, सून आवरून नोकरीला निघून जाईपर्यंत अशी एका कोपर्यात बसून असायची. मध्ये एकदा कपभर चहा सून आणून ठेवायची. मुलगा ८.३०च्या सुमारास पेपर आणून ठेवायचा. त्यागोदर ६ ते साडेआठ आपल्या पुरता आवाजात लावलेला रेडियो,  एक पुस्तक, मध्ये मध्ये गुडघ्यांचा मालिश यांत मोठी वेळ काढायची. रेडियोचे सेल संपलेले दोन दिवसांपूर्वी. आणि नातवाला तिने ते आणायला सांगितलेले. पण त्याला काही लक्षात रहात नव्हतं. एका बँकेत मनेजर असलेल्या मुलाला दोन सेल आणायला सांगावेत असं मोठीला वाटत नव्हतं. सुनेला काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर अडीच तास असं बसवत नाही. गुडघे आखडून जातात. पहायला गेला तर डॉक्टर म्हणाले आहेत कि सकाळी उठल्यावर १५-२० मिनिटं चाललं पाहिजे. तरच गुडघे जास्त साथ देतील. पण सून, मुलगा आणि नातू यांची आवर-अवरीची गडबड सकाळी असते. आणि म्हणून आपण असं कोपर्यात बसून रहायचं. तसंही आपण वाळीत टाकले गेलो आहोतच. सुनेकडून, अगदी मुलाकढूनही ... तो आपली जबाबदारी झिडकारत नाही एवढंच ...
   खरंतर आपल्या घरात आपण एकटे राहायचो. आपापल्या परीने जीव रमवायचो. सकाळी उठून रेडियो लावला कि त्या आवाजाच्या गतीने हळूहळू कामं करत राहायचो. अगदी वाशिंग मशीनही वापरायला शिकलो. संध्याकाळी थोडसं बाहेर फिरून यायचो. त्यावेळी जे लागेल ते जवळचा  दुकानदार द्यायचा. कोणावर अवलंबून नव्हतो. पण मग एकदा घसरून पडायचा निमित्त झालं आणि मुलाने  आणि मुलीने मिळून ठरवलं कि आता मी असं एकटी राहू नये. त्याधी जेव्हा हिंडत फिरत होते तेव्हाही एकटी होतेच कि. पण आजारपणाची धावपळ नको म्हणून मी मुलाकडे रहावं. एका कोपर्यात बसून रहावं, सगळे निघून गेले घरातून कि घरात वेळ काढावा. कशाला हात लावू नये कारण मला नीट हाताळता येणार नाही, फोन करायचा नाही कारण मग मी तासन-तास बोलत बसते. टीव्हीवर मराठी चानेल बघणं एवढाच विरंगुळा. पण त्याचाही कंटाळा येणार. कंटाळा सगळ्याचाच येतो आहे, आणि आज तर सगळ्या आठवणींनी नको केलं आहे....
    आज धाकटी ७५ वर्षाची होईल. तिघा बहिणींमध्ये सगळ्यात लाडकी. मागच्या ५ वर्षात तिला भेटले पण नाही. ती मागची जवळपास १७ वर्ष अशी ना तशी आजारी आहे. म्हणून ती येऊ शकत नाही. आणि मी एकटीने काही तिला भेटायला जाऊ शकत नाही. मधली दोघींना भेटत रहायची, त्यामुळे काही कळत रहायचं. अगदी वर्षापूर्वी पर्यंत मधलीशी फोनवर बोलत होतो. पण मग एक दिवस मधली एकदम फोनवर एवढं काही बोलली आपल्याला, आणि तिथेच तिला धाप लागली. मग त्यानंतर मुलांचा एकमेकांशी बोलणं झालं आणि माझं मधलीला फोन करणं संपलं. धाकटीच्या घरच्यांशी आपलं कधीच पटलं नव्हतं. १० वर्षामागे जेव्हा ती जाते कि काय असं झालं होतं तेव्हाही तिच्या मुलाने आपल्याला तिला भेटू दिलं नव्हतं. का म्हणे, तर तुमच्या रडण्याने तिची तब्ब्येत अजून बिघडेल. 
    धाकटी अशीच आहे नाजूक..५ वर्षाची होती तेव्हा टायफोइड झाला होता. आई ३-४ महिन्यापूर्वीच गेलेली. आपण आणि मधली मिळून तिला साम्भालायचो. आपण नाही मधलीच....धाकटी तापाच्या ग्लानीत आपला हात पकडून म्हणायची, 'ताई, ताई.....मला भीती वाटते. मला पकडून ठेव ग. 'आणि तिच्या कपाळावर घड्या ठेवणं विसरून आपण रडत राहायचो. मधली तेव्हा १२  वर्षाची होती. पण स्वैंपाक करायची, औषधांचं पहायची. मग एकदा धाकटीचा ताप जास्त झाला, ती काही न बोलता फणफणलेल्या अंगाने नुसतीच पडून होती, बाबा पण घरात नव्हते तेव्हा मधलीनेच  शेजार्या-पाजार्यांना बोलावून तिला सरकारी हॉस्पिटलात नेलं. खरी धाकटी तेव्हाच जायची, पण वाचली आणि आपल्या तिघीत सगळ्यात चांगलं नशीब घेऊन....
     सरकारी नोकरी करणारा नवरा आणि मग इंजिनिअर झालेला मुलगा. आणि पहिल्यापासून आईभक्त. लग्नापूर्वी अमेरिकेत होता. पण नंतर आईबरोबर रहायचं म्हणून परत गेलाच नाही. सून पण समजूतदार आहे. सासूचं आजारपण, नवर्याचा तिरसटपणा यांत पण सगळ्यांशी सांभाळून आहे. २-३ महिन्यामागे नवर्याला न कळवता  केव्हातरी  दुपारची  फोन करते आणि धाकटीची खुशाली सांगते. 
     मधलीला तरी फोन करावा. तिला धाकटीला आवडणारं काहीतरी घेऊन जायला सांगावं, म्हणजे अर्धा डझन हातरूमाल, किंवा लिमलेटच्या गोळयांचा एक अख्खं पाकीट...पैसे मी पाठवते म्हणून. 
   एवढ्या इच्छेसारशी मोठीच्या त्या कोपर्यात अडकून पडलेल्या दिवसाला गती आली. सून गेली हे दिसताच ती सावकाश चालत नाश्ता करत बसलेल्या मुलाजवळ आली. आई बाथरूममध्ये जायचं सोडून इकडे का आली असा प्रश्न चेहेर्यावर घेऊन मुलाने विचारलं कि काय ग आई, ठीक आहेस ना. मोठी नेहेमीपेक्षा वेगाने चालली होती. थोडा दम खाऊन ती मुलाला म्हणाली, 'आज धाकट्या मावशीला ७५ पूर्ण होतील. मला मधल्या मावशीला फोन लावायचा आहे. ' 
 'आई, झालं तेवढं पुरे नाही झालं का? परत तुम्ही जुनं-पुराणा काही उगाळून गळे काढणार. आणि मग मधल्या मावशीच्या घरचे आम्हाला नावं ठेवणार. ' 
'अरे, हे काही नाही बोलणार बरं. फक्त जमलं तर धाकटीला घे काहीतरी एवढं सांगायचं आहे. ' मोठी लाचारीने, जवळपास रडवेल्या चेहेर्याने मुलाला म्हणाली. 
'आई, देतो फोन लावून. सकाळ सकाळी रडू नकोस. '
 मुलाने फोन लावून दिला. मधलीच्या सुनेने फोन उचलला. सुरुवातीला थोडसं बोलून मुलाने मोठीला फोन दिला. 'फार बोलू नकोस. मावशीला त्रास होतो' एवढं सांगून बूट घालत मुलगा निघून गेला. 
  'अगं आज धाकटीला ७५ पूर्ण होतील. '
  'ठाऊक आहे ताई. ' मधलीचा कोरडा आवाज 
  'तिला भेटशील केव्हातरी? तिला तिच्या आवडीचं घे काहीतरी. तिची तब्येत बरी आहे का ग आता? '
  'ताई, तुम्हा दोघींच्या घराशी आता काही संबंध नाही हे सांगितलय ना मी. ती मेली असा मला फोन आला कि मी तुला कळवेन. '
   'असं नको बोलूस ग. कसला एवढा राग धरून बसली आहेस. ' मोठीला रडायला यायला लागलं. 
   'ताई, रडायची काही गरज नाही. आज तुम्हा दोघींची पोरं एवढी करती-सवरती आहेत. पण त्यांच्या लहानपणी तुम्हा दोघींचे संसार ठिगळ लावून चालवायला लागले तेव्हा मावशी आली होती हे ते विसरले. जाऊ दे. मला काही उकरायचा
 नाही. फोन ठेव. ' मधलीने फोन ठेवून दिला. 
    मोठी फोन हातात ठेवून रडत बसली. रिकाम्या घरात तिचे हुंदके कोणी ऐकणार नव्हतं. मधली  वर्षापूर्वीपर्यंत हिंडती-फिरती होती. पण मग एकदा सकाळी छातीत दुखायला लागला. अन्जिओप्लास्टी करायला लागेल असं डॉक्टर म्हणले. मधलीच्या मुलाची तेवढी अवस्था नव्हती. मधलीने धाकटीला पैशासाठी विचारलं. धाकटीचा मुलगा नाही म्हणाला, पण त्याने इथे कळवलं. सुनेने साफ नाही म्हटलं आणि सांगितलं कि आपल्याला काही कळलंय हेच कळू देऊ नका. पण मधलीला जे कळायचं ते कळलच. पुढे २-३ महिन्यांनी तिने फोन केला आणि तिथेच तिला बोलता बोलता धाप लागली. परत दवाखान्यात न्यावं लागलं.  तिथून पुढे काही उरलंच नाही. 
    मधली खरी....शाळेत शिक्षिका झाली. पहाटे चारला उठून घरचं आवरून ३५ वर्ष सकाळच्या शाळेत गेली.  अगदी मुख्याधापिका म्हणून रिटायर झाली तरी ह्या क्रमात खंड नव्हता. पुढे घरी शिकवण्या घेतल्या. विणकामाचे क्लास चालवले. आजही तिच्या पेन्शनवर घर चालते आहे.  एक मुलगा झाल्यावर नवर्याला ऑपरेशन करून घ्यायला लावलं. आपलं, धाकटीच घर धड चालत नव्हतं तेव्हा लागेल तिथे जमेल तेवढे पैसे उचलून दिले. आपला मुलगा मैट्रिक झाला तेव्हा त्याला  घड्याळ घेऊन दिलं. 
  पण आपण तिला ऑपरेशनला लागणारे लाखभर रुपये कुठून देणार होतो? सगळे पैसे मुलाच्या हाती सोपवलेत. आणि आपण असे अवलंबून, कुठून माझ्या पैशातले पैसे दे मधलीला असं सांगणार.....
    सांगायला हवं होतं का? आपल्याला नेहेमीसारखी भीती वाटली का...का आपल्या मुलाची धन व्हावी म्हणून आपल्याला बहिणीच्या आयुष्याचीही फिकीर वाटली नाही. आपण कोणत्या नात्याला वर-खाली ठेवलं......
    फोन हातात धरून, समोरच्या भरल्या घराकडे पहात मोठी बसून राहिली. 
                         ************

मधलीने फोन ठेवला. दोन दिवसापासून तिलाही धाकटीला ७५ पुरी होणार हेच आठवत होतं. लिमलेटच्या गोळ्यांचा पाकीट कपाटात पडून होतं. आज तिचा फोन आला नसता तर कदाचित ती गेलीही असती धाकटीला भेटायला हॉस्पिटलमध्ये.....
    ३ दिवसांपूर्वी धाकटीला परत दवाखान्यात ठेवलंय....मागच्या २ वर्षात ८व्यांदा...
    आपण हेही तिला सांगितलं नाही......आणि आता आपण धाकटीला भेटायलाही जाणार नाही....
    समोरच्या नवर्याच्या भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे बघत ती मागचे दिवस आठवू लागली, आपण कसं सासूचं, बहिणीचं करत राहिलो हे पुटपुटत राहिली. कामात असणाऱ्या सुनेने सासूकडे लक्षही दिलं नाही. 
    मधलीला वाटलं असंच निघावं, धाकटीला भेटावं. आता जा समाधानाने बाई असं सांगावं. 
    नाही. ही कृतघ्न माणसे आहेत.....
   एकमेकांना कापणार्या विचारांच्या द्वंद्वात मधलीच्या श्वासांची लय चुकली. तिला धाप लागली. घोंघावणारे विचार, धाप आणि तिच्याकडे न बघणारी सून ह्यात मधली जिथे बसलेली तिथेच कलंडली. 
                       *********************

   धाकटी हॉस्पिटलमध्ये पडून होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. पलंगाच्या टोकाशी, तिच्या डोक्याच्या बाजूच्या टेबलावर तिच्या नातवाने तिच्या ७५ व्या वाढदिवसानिम्मित्त आणलेली फुलं होती. धाकटीला हे सगळं अर्धवट जाणवत होतं. 
  ती खिडकीतून बाहेर बघत होती. मळभ होतं, आणि रिकामं आकाश.....ढग, पक्षी काही नसलेलं..... 
   धाकटीचे डोळे मिटले....आता समोरची खिडकी ७० वर्ष मागच्या घराची खिडकी होती. तिचे केस विंचरत मोठी बसली होती. मधली बाजूला तांदूळ निवडत होती. तिन्ही बहिणींच्या गप्पा चालल्या होत्या. 
   'ताई...ताई....  धाकटीच्या तोंडातून अस्पष्ट आवाज निघाला.  
   

Saturday, March 12, 2011

निखळ आनंदाचे वर्तुळ

त्याच चित्र-विचित्र आकृत्या, तेच चेहेर्यांचे आणि शरीराचे असहाय्य करणारे आवाज आणि राहून गेलेल्या आठवणींचे संदर्भ..... स्वप्नांची मालिका एकदम तुटली ती खिडकीतून सरळ अंगावर येणाऱ्या प्रकाशाने, आईच्या झाडूच्या आवाजाने आणि एकूणच दिवसाने जी गती पकडली होती तिच्या ठळक होत जाणार्या अस्तित्वाने.... तो जागा झाला.. ९.३० वाजले होते.... आईने त्याला हाक मारली नव्हती... तिला वाटलं असणार कि हा रात्रभर  काही वाचत होता, अभ्यास करत होता.... म्हणून तिने उठवलं नाही ८ वाजण्याच्या अगोदर.... त्याला शाळेत असतानाचा एकही दिवस आठवत नव्हता जेव्हा तो ७च्या अगोदर उठला नव्हता.
      थोडसं झोपावं अजून....एकही चित्र न उमटणारी १० मिनिटांची का होईना एक झोप घ्यावी अजून. असं वाटत असताना तो उठला. ११ वाजता त्याला शिकवायला जायचं होता. तसं हा रविवार आहे....तमाम दुनिया तिच्या हक्काची झोप घेत असणार. ५ किंवा ६ दिवस एका सलग रेषेत काम करून दमलेली माणसे आज झोपणार, मग छान जेवणार, मग ... आणि मी मात्र आता शिकवायला जाणार आहे...... त्याने झटकन हे सारं झटकून टाकलं आणि आवरायला सुरुवात केली..
    हे सगळं सरांनी केलेलं आहे. स्वतःला जे कळता ते दुसर्याला सांगितलं पाहिजे ही सरांनी स्वतःवर घातलेली अट होती.... १९७० मध्ये M.Sc झालेले सर एका शाळेत शिक्षक बनले.. आपली त्यांची शेवटची तुकडी....जुलै ते जानेवारी सगळे दिवस. सर स्वतः खोली झाडून, सतरंजी घालून शिकवणार, स्कोलरशीप  च्या परीक्षेसाठी...आणि वर्षाची फी १०० रुपये....
    
बादलीभर पाण्यात अंघोळ उरकताना त्याच्या मनात सरांचे विचार होते....दार रविवारी हेच होतं....आपण घरी येतो, शिकवतो, आणि जातो ....नेमके कुठे आहोत ह्याचा विचार टाळून....
   तो टेबलापाशी बसला.... आज संच म्हणजे काय ते शिकवायचं आहे.... हे सगळं सुरु करून चार वर्ष झाली.... ज्यांच्या  पालकांना मुलांसाठी खास काही करणं शक्य नाही आशांच्या संधी हुकु नयेत म्हणून सुरु केलेला हा उपक्रम.... जेमतेम १५ मुले आहेत....आणि आपण त्यांना शिकवत स्वतःच्या स्वप्नांना धार काढत असतो त्यांच्यातून काही करून दाखवू म्हणून....
     अरुण म्हणतो ते खरं आहे....अशा मुलांना उगाच वेगळं काही करण्याची स्वप्ने का दाखवावीत.... दिनेशची आई शाळेत सफाई कामगार म्हणून काम करते..का दिनेशने चांगला पगार देणारी नोकरी मिळवू नये.... त्यांना स्वप्ने दाखवूच   नयेत....त्यांना आयुष्याला भौतिक रित्या समृद्ध करत जाणारा वाट दाखवावी  फक्त....समाधान, आनंद, देश, समाज अशा वांझोट्या प्रश्नाचे बीज त्यांच्या बुद्धीत का उगवून आणायचे ....
  सरांनी माझ्या बुद्धीत का उगवून आणले हे....दहावीला ब्याण्णव टक्के मार्क मिळवल्यावर सरांना पेढे द्यायला गेलेला दिवस अजून आठवतोय....मोतीबिंदू झालेली सरांची बायको...इंजिनीर होणारा सरांचा मुलगा...आणि दोन खोल्यांच्या पसार्यात दुसर्या दिवशी शिकवायच्या अंश-छेदांच्या गणिताचे कागद पसरून बसलेले सर... आयुष्यभर चौथी आणि सातवीच्या मुलांना शिकवत राहिले सर...आणि त्यातल्या काही जणांना गणिताची दुनिया दाखवली....आणि सगळ्यांनी भर-भक्कम पगाराच्या नोकर्या मिळवल्या...अमेरिकेत स्थायिक झाले...आणि सर तिथेच...चौथी आणि सातवी.... पेढे दिल्यावर सर एवढेच म्हणले कि  जमलं  तर गणित शिका...आणि शिकवाही....मुलांचे कुतुहल जागवू शकेल असं कोणीतरी शिकवायला हवं....
    
काय करतोय आपण.... अजूनही भाड्याच्या घरत राहतो.. बाप दररोज १५-२० किलोचं ओझं घेऊन विकायला जातो, आई दिवसाचे १४ तास काम करत बसते आणि आपण मुलांना गणित शिकवू पाहतो.... धरली तर २०-३० हजार देणारी नोकरी मिळेल... अजून थोडं मोठं घर घेता येईल.... आई-बाबांना एकदा निवांत गावी जाता येईल....  रोहितने नवे घर घेतले आहे... आई परवाच सांगत होती... दोन वर्षापूर्वी रोहित एम. बी. ए. झाला. आई कधीच काही म्हणत नाही, नोकरी कर धड, आम्हाला सोडव म्हणून आणि आपण जवळपास असे फुकटे.....
    B .Sc  च्या शेवटच्या वर्षात असताना तो सरांना भेटायला गेलेला... सर त्याच वर्षी रिटायर झालेले...तेव्हा सरांनी पहिल्यांदा शिकवण्याबद्दल विचारलं.... आणि पण सहज हो म्हटलं.... दुसरा काय म्हणणार होतो.... जे काही आहे ते सरानीच तर दाखवलं  आहे.... आणि मग दुसर्या वर्षी सर एकदम गेले अपघातात.... काही न बोलता, न सांगता एक दिवस सर नाहीत हीच वस्तुस्थिती झाली....सरांच्या भाषेत 'given condition' आणि मग पुढे आपसूक जसं आहे तसं चालू ठेवणं....     आपण तेव्हाच ही जबाबबदारी  सोडायला हवी होती. कदाचित बंद पडलं असतं सगळं, पण आत्ता आपण मुलांना शिकवतोय म्हणजे काय शिकवतोय.. सर म्हणायचे कि गणित हा एक आनंद  आहे, आणि तो आनंद मिळवणं हे आपल्या जीवनाचं  उद्दिष्ट झालं पाहिजे....आपण आनंदी आहोत? आपण मुलांना देतोय का तो आनंद?
     सारे विचार झटकून त्याने आज जे शिकवायचं आहे त्याच्या नोटस काढायला सुरुवात केली.... आज संख्यांचे प्रकार शिकवायचे आहेत....तसं आपण हे आधी शिकवलं आहे त्यांना...पण अजूनही मुलांना परिमेय आणि अपरिमेय संख्या कळत नाहीत... नैसर्गिक संख्यांची उदाहरणे येत नाहीत.... हळूहळू गेलं पाहिजे....पण दरवेळी एक पाऊल तरी पुढे सरकलं  पाहिजे.... पुढच्या वर्षी श्रीकांत गणिताची परीक्षा देणार आहे.... त्याला तरी नवे काही सांगता आलं पाहिजे.....

   पण कशाला शिकवायचं मुलांना...आणि आपण कोण शिकवणारे...आपण दुनियेची नाडी  न समजू शकलेले. आदर्शाच्या वगैरे मृगजळात बुडून जात चाललेलो आहोत आणि जे काही जगायचं  आहे त्याचा काठ काही हाताला लागत नाहीये...मग आपण काय सांगणार त्या मुलांना....आधी उद्या एखाद्याने असंच गणित शिकायचं वगैरे ठरवलं आणि मग तोही असंच त्याच्या सरासर पुढे सरकणाऱ्या मित्रांत काजळी पकडलेलं  एक आयुष्य बनून राहील...नकोच अशी ओझी...बंद करावा हा उद्योग...किंवा मग त्यांना दहावीला, बारावीला, प्रवेश परीक्षांना शिकवायचा कारखाना टाकूया.. नवा, वेगळा आकार आपल्या आयुष्याला नाही, आणि कदाचित अजून कोणाच्या आयुष्यालाही देता येणार नाही...पण ह्या छोट्या-मोठ्या खोक्यांच्या घरांनी, वाढत-वाढत जाणार्या रस्त्यांनी बनलेल्या शहरात बिनचूक बसणारी कितीतरी आयुष्ये बनतील....कशाला विचारांची  वगैरे कीड लावायची त्यांच्या अजून अंकुरही न फुटलेल्या रोपांना....
    सरांना हे सगळं सांगताच आला नाही. पी.एचडीला प्रवेश मिळाला नाही तेव्हापासून असे भेलकांडत जातोय फक्त....आणि  ह्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडायची, किमान हा सगळा वैताग कोणाच्या माथी मारता यायची सोय हवी. पण अडचणी बद्दल बोलूच शकत नाही आपण कोणाशी. सर म्हणायचे कि अडचण सांगता आली कि सोडवताही  येते....गणित नीट मांडता आलं कि सोडवता येतं तसं.... सर जायच्या आधी ५-६ महिने भेटलोही नव्हतो त्यांना आपण....परीक्षा, शिकवणं आणि ... आणि काहीच नाही....कदाचित आता सरांकडून नवं काय मिळणार शिकायला असं  वाटत होतं आणि मग एकदम एक दिवस फोन आला, सर गेले....गावी चाललेले, रस्त्यात अपघात झाला आणि जागच्या-जागीच गेले....स्मशानातही गेलो  नाही आपण. दोन दिवसानी भेटायला गेलो घरी, तेव्हा त्यांच्या मुलाने म्हटलं, सर आठवण काढायचे तुझी, तो करेल पीएचडी म्हणायचे, मग शांत बसून रहायचे....सरांनी काही पुस्तकं ठेवली होती.... काही जुनी, त्यांनी घेऊन जपून ठेवलेली, काही नवी, त्यांच्या चर्चेत आलेली, काही गणिताची, रशियन गणितींची १९६०मध्ये खास भारतासाठी छापलेली, सरांचा आवडता रुडीन आणि एक नवं पुस्तक...जवळपास अगदी नवं-कोरं. 
    त्याला त्या पुस्तकाबद्दल काहीच आठवेना. झटकन तो खुर्चीतून उठला. टेबलाच्या खणात अगदी मागे होता तो सरांनी दिलेला पुस्तकांचा गठ्ठा. त्याने तो बाहेर काढला. त्यावरची धूळ झटकली. ते नवीन पुस्तक म्हणजे, एक अमेरिकन गणिती आणि त्याचे शाळेतील गणिताचे शिक्षक ह्यांच्यातला पत्र-व्यवहार होता. हा शाळेतला शिक्षक गणितात फार काही पुढे गेला नाही. पण त्याच्याकडे गणित शिकवायची हातोटी होती आणि कदाचित आपण फार शिकू शकलो नाहीये ही खंतही....त्याचा विद्यार्थी पुढे मोठा गणिती झाला आणि त्याच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आपल्या शिक्षकाला लिहित राहिला. त्या पत्रात गणित फार राहिलं नाही, कारण शिक्षक शिकवायचं ते शाळेतलं गणित आणि हा विद्यार्थी खूप पुढे गेलेला,,,,हे सगळं त्या विद्यार्थ्याने लिहिलंय प्रस्तावनेत...तो शिक्षक गेल्यावर त्याने ही पत्र छापली.  प्रस्तावनेच्या पुढे वाचू लागला. पत्रांना सुरुवात होण्यापूर्वी ह्या विद्यार्थ्याने एका पत्रातला एक भाग लिहिला होता.... हा  विद्यार्थी लवकरच त्याचे प्रोफेसर म्हणून पहिले लेक्चर घेणार होता. त्याने आधीच्या पत्रात आपल्या शिक्षकांना स्वतःची अस्वस्थता सांगितली होती. आणि विचारलं होतं कि तुम्ही एवढे वर्षे शिकवलंय, तेही शाळेत, मला थोडक्यात काही सांगा...त्यावर त्या शिक्षकाने लिहिला होतं... गणित म्हणजे थोडक्यात सांगणं आणि तरीही तेच आणि तेच सांगणं जे सांगायचं ठरवलं आहे. आणि तुला जे सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं हे त्याचा चेहेरा सांगेल. आणि जोवर असा चेहेरा तुला दिसणार नाही तोवर आपल्याला परत परत शिकावं लागतं... 
   त्याने पुस्तक बाजूला ठेवलं. १०.३० वाजून गेलेले. आवरून तो घराबाहेर पडला. आधी मुलांना विचारू, नैसर्गिक संख्यांना नैसर्गिक का म्हणायचं...परिमेय म्हणजे rational आणि ह्या शब्दात कसा अर्थ आहे...आणि मग ह्या संख्याच्या खुणा....त्यांचे संच आणि उपसंच....त्याला आठवलं कि मागच्या वर्षी एकाने विचारलेलं कि rational म्हणजे Q तर मग irrational  म्हणजे I  का नाही. असं R -Q का लिहितात....मग त्याने समाजावलेला त्याला, पण ते काही तितकं नीट नव्हता....मुळात असं त्या संख्यांमध्ये irrational  काय आहे....हेच आधी नीट सांगायला हवंय. कदाचित त्यांना समजेल असं...
   तो वर्गात पोचला. हसर्या चेहेर्याचा, दंगेखोर सिद्धेश तो पोचताच 'अरे, सर आज पण अर्धवट झोपेतून आलेत' असं ओरडत सगळ्यांना घेऊन वर्गात पोचलेला. गायत्रीने फळ्यावर तारीख लिहिलेली ... तो वर्गात पोचला, थोडावेळ गप्पा मारून त्याने डस्टर  उचलला....फळा अगदी साफ केला, कोपर्यातली तारीख ठेवून...आणि मध्यभागी लिहिलं....'numbers' 
  मग तो बर्यापैकी ठरवलं तसं, काही मध्ये मध्ये सुचेल तसं बोलत राहीला. एकात एक गुंफलेल्या वर्तुळांच्या आकृत्या काढून त्याने मुलांना संख्यांचे संच समजावले...नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक, आणि मग परिमेय-अपरिमेय....आणि मग वास्तव संख्या.... त्याने मुलांना विचारलं  'वास्तव' म्हणजे...सिद्धेश ओरडला 'संजय दत्त आणि देडफुट्याचा पिक्चर'   सगळे अगदी तो ही ह्या आकस्मिक उत्तराने हसायला लागले.... हसणं संपल्यावर तो म्हणाला कि हे उदाहरण झालं, आपल्याला काय हवंय ....मुलं एक सुरात म्हणाली 'व्याख्या'  'व्याख्या कशी हवी' , त्याने विचारलं, 'सोपी, आणि आधी माहित असलेल्या गोष्टींवर आधारित'  मुलांच्या हळूहळू कंटाळत चाललेल्या चेहेर्यंकडे पहात तोच म्हणाला. 'समजा तुम्हाला तुमच्या ५वी  मधल्या लहान भावा-बहिणीला सांगायचं आहे कि 'वास्तव' म्हणजे काय. मग कसं सांगाल' 
   मागच्या बेंचवर आपल्यातच गढून बसलेल्या प्रसादने म्हटलं कि 'वास्तव म्हणजे खरं-खुरा'...आणि मग एकदम गायत्री म्हणाली 'आणि मग खरं म्हणजे' आता प्रसाद पटकन तिला काही बोलणार एवढ्यात श्रीकांत म्हणाला 'खरं म्हणजे जे कळता, अनुभवता येतं'.... श्रीकांतचे उत्तर सगळ्यांना पटले...नेहेमीसारखं... 'मग आता सांगा वास्तव संख्या असं का म्हणतात'...'कारण त्या अनुभवता येतात' प्रसाद म्हणाला.. 'बरोबर' तो म्हणाला... त्याने एक रेषा काढली फळ्यावरती  तो सांगू लागला 'ही वास्तव रेषा. हिच्यावरचा प्रत्येक बिंदू म्हणजे एक संख्या. आपण फक्त शून्य आणि एक कुठे हे ठरवायचं. मग आपण अगदी कुठल्याही संख्येला अगदी हात लावून स्पर्श करून बघू शकतो. ' त्याने हळूच बोटाने त्या रेषेला स्पर्श करून दाखवलं. मुलांच्या चेहेर्यावरचा कंटाळा थोडा कमी झाला होता. 
    'वास्तव संख्यांचे दोन भाग पडतात. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे?' श्रीकांतने बिनचूक व्याख्या सांगितली.. 'p /q  ह्या प्रकाराने लिहिता येणाऱ्या संख्या, ज्यात p आणि q पूर्णांक असतात आणि q ची किंमत शून्य नसते' 
   'आणि मग अपरिमेय संख्या म्हणजे?' 'अरे दादा, इतकं माहिती असतं तर इथे कशाला आलो असतो? ' सिद्धेश कंटाळवाण्या सुरात म्हणाला. सगळे परत हसले. तोही हसून म्हणाला, 'पण गणित असंच आहे सिद्धेश. आपण सगळ्याला प्रश्न विचारतो आणि काटेकोर व्याख्या बनवतो. अशा क्रमवार व्याख्या, पायरी-पायरीने विचार म्हाणजे गणित.' मुलांचे चेहेरे ह्या तात्त्विक विवेचनाने मख्ख झालेले....
   'हं. तर अपरिमेय संख्या म्हणजे?' त्याने irrational हा शब्द सांगितला . त्याचा अर्थही सांगितला. 'अपरिमेय संख्या ह्या भागाकारात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अचूकपणे लिहिता येत नाही. उदाहरणार्थ 'पाय' आपण २२/७ लिहितो ही पायची अंदाजे किंमत आहे, अचूक किंमत नव्हे...थोडक्यात काय तर अपरिमेय संख्या ह्या परिमेय संख्यांच्या मदतीनेच सांगाव्या लागतात. ' 
   आता मुलांच्या चेहेर्यांवर पार कंटाळा होता. १० मिनिटात संपवूया असं त्याने ठरवलं. 'परिमेय संख्यांना Q अशी खुण आहे आणि वास्तव संख्यांना R अशी' तो फळ्यावर लिहित म्हणाला. 'मग अपरिमेय संख्यांना काय खूण असेल?' 'I ' गायत्री पटकन म्हणली. 'नाही'. 'हे गणित आहे. इथे कमीत कमी खुणांमध्ये सारं सांगायचं आहे. अपरिमेय संख्यांना वेगळ्या खुणेची गरज काय? वास्तव संख्याच्या संचातून परिमेय संख्यांचा भाग काढून टाकला कि उरतात त्या अपरिमेय संख्या. आपण शिकलोय कि एका संचातून दुसर्या संचाचा भाग काढून टाकणं खुणेने कसं दाखवायचं. ' 
    सोडायला हवंय आता मुलांना. एवढं संपवूया आता. श्रीकांत तेवढा बघत होता उत्सुकतेने आणि त्याचे डोळे काहीतरी विचार करत होते. विचार नाही..जसं काही तो आत्ता जे बोलला ते श्रीकांताच्यापाशी  अगदी जवळ जाऊन थांबलं होतं, त्याला जाणवत होतं, पण समजलं नव्हतं.... तुला जे सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं हे त्याचा चेहेरा सांगेल. आणि जोवर असं चेहेरा तुला दिसणार नाही तोवर आपल्याला परत परत शिकावं लागतं. त्याला ते वाक्य आठवलं. आणि एकदम त्याला एक उदाहरण आठवलं. 
  'आपण मे महिन्यात आपला पुस्तकांचा कप्पा आवरतो. त्यावेळी पुस्तकं नीट लावतो आणि कचरा टाकून देतो. आता एखादा कागद कचरा आहे हे कसं ठरवतो आपण? ' 
   'दादा, जे कामाचं नाही तो कचरा. ' सिद्धेश म्हणाला. 
    'बरोबर, म्हणजे कचरा म्हणजे काय हे आपण काय कामाचं आहे ह्यावरून ठरवलं. कारण कचरा म्हणजे काय हे सांगता येणार नाही. तसंच अपरिमेय संख्यांचा आहे. मग समजा आता आपण आपली कचर्याची व्याख्या 'एकूण वस्तू- कामाच्या वस्तू अशी लिहिली तर बरोबर होईल का नाही? '
   'R -Q दादा'.... श्रीकांतचा आवाज आला मागून...'अपरिमेय संख्यांची खूण 'R -Q' मगाशी पर्यंत त्याच्या आसपास असलेलं ते आता श्रीकांतच्या चेहऱ्यात, डोळ्यात होतं....तो जे सांगत होता, ते त्याला समजलं होतं.आणि ते समजलंय असा विश्वास, आनंद त्या डोळ्यांत, चेहर्यात होता... तो एक पाऊल पुढे गेला होता, छोटं पण पक्कं पाऊल.... 
  'बरोबर. R -Q कारण अपरिमेय संख्या म्हणजे वास्तव संख्यांमधून परिमेय संख्या काढून टाकल्यावर उरणारा भाग, उरलेला संच....' 
    अजून काही सांगत, पुढच्या वर्गाची वेळ ठरवत त्याने फळा पुसला. 'चला. भेटू आता पुढच्या वेळी' असं म्हणताच सिद्धेश आणि पाठोपाठ बाकीची मुलं बाहेर पडली. श्रीकांत थोडावेळ घुटमळला. 'मस्त श्रीकांत.' त्याने त्याच्या पाठीवर हात मारला. श्रीकांत हसला. 'तू वाचतोयेस पुस्तक मी दिलेलं?' त्याने विचारलं. 'हो दादा' 'ठीके. सुट्टीत सुरु करायचा अभ्यास परीक्षेचा'. 'हो दादा. बाय दादा' म्हणत श्रीकांत गेला. 
     त्याने लाईट-पंखे बंद केले. हात खडूने पांढरे झालेले. ते त्यानेच तसेच थोडेफार झटकले. 
    सरांना असे किती क्षण, किती चेहेरे मिळाले असतील. सगळ्यात आधी उत्तर दिल्यावर हसणारे, किंवा भूमितीची  एखादी अवघड सिद्धता स्वतःहून लिहून आणलेला एखादा, आणि असं  R -Q सांगणारा.... 
   तो आपल्याशीच हसला. वर्गाला कुलूप लाऊन रस्त्याने तो चालायला लागला. त्याचा कोणीतरी एक मित्र, कोणी ओळखीचे त्याच्याकडे बघून ओळखीचे हसत होते. पण त्याच्या भोवती जसा एखादा गोल, नव्हे एक अगदी अचूक वर्तुळ झालं होतं. त्याच्या आता तो होता आणि एक निखळ आनंद, जे सांगायचय ते सांगितल्यावर दुसर्याला ते तसच्या तसं समजल्यावर त्याच्या डोळ्यात, चेहर्यात येणारा आनंद. सार्या शब्दांच्या पुढे असणारी अर्थाची टीचभर जागा, आणि आज त्याने ती कोणालातरी दाखवली होती आणि ती कोणालातरी दिसली होती. त्या चेहर्यात त्या समजण्याचा अगदी स्पष्ट प्रतिबिंब होतं. 
   तो चालत राहिला आणि त्याच्या भोवतीचं ते निखळ आनंदाचं वर्तुळही .... 

(टीप: संच- sets, वास्तव संख्या- real numbers) 

Thursday, March 3, 2011

घड्याळ आणि स्वप्ने

तो कंटाळला होता. त्याच्या कथा, कविता आणि अगदी कोणाला लिहिलेला साधासा मजकूरही एका चौकटीत फिरतोय हे त्याला जाणवत होतं. आणि त्या चौकटीचे सारे काने-कोपरे धुंडाळले तरी त्या लिहिण्यात कुठली धग, आरपार पोचणारा दंश किंवा अगदी क्षणभर तरी स्तिमित करणारी अनाकलनियता येईल असं त्याला वाटत नव्हतं. ही कसली चौकट आहे? किंवा एक बंदिस्त नियम, ज्यात कितीही बंड केलं तरी एखाद्या गुलामासारखा आपलं लिहिणं घुमतं आहे? आपल्या आतल्या डोहात, त्याच्या तरल पृष्ठभागावर, गडद-सावळ्या अंतरंगात सापडणारी चित्रे, त्या डोहाच्या तळाच्या अंधाराचा शोध लावताना येणारी हतबलता किंवा जीवघेणी कोसळती जाणीव हेच तर लिहितोय आपण.... आपल्या जगण्याचे झरे त्या डोहाला जाऊन मिळतायेत, वाटेत त्यांच्यात काय काय मुरतंय आणि डोहाच्या पाण्याला त्याची चव येतीये, त्याच रंग येतोय....आणि म्हणून आपल्या जगण्याशी तो डोह जोडलेलाय, आणि त्याची खोली माझ्या स्वतःला मी किती कळतोय ह्याच्याशी.... मी जिथे टाळतोय स्वतःला तिथे अंधार आहे, आणि माझ्या असण्याचा कवडसा मी जसा फेकतो तश्या दिसतात मला माझ्या आठवणी... आणि माझ्या स्वप्नांचे अंकुरही ह्याच डोहाच्या पाण्यावर पोसलेले.... म्हणजे मी काय होतो आणि मी काय होईन ह्यांनी बांधलेल्या असण्यात तेवढं माझं लिहिणं आहे.... आणि अगदी तो मी खोडून काढत दुसर्या कोणालाही उभा केला ह्या डोहाचा मालक म्हणून तरी ह्या भिंती तशाच आहेत. म्हणजे सार्या गोष्टी शेवटी भूतकाळाचा काढू पाहिलेला अर्थ आणि त्या अर्थाच्या कुशीत शोधू पाहिलेली भविष्याची वाट अशाच...  ह्या पलीकडे काय येणार ह्या गोष्टींमध्ये.... आणि हे टाळून अगदी जे उमटतंय त्वचेवर त्याचा प्रतिबिंबच ठेवू शब्दात असा म्हटलं तरी केव्हा ना केव्हा हा अर्थाचा किंवा वाटेचा प्रश्न येणारच.... मग का लिहायचं?
    ह्याच्या पलीकडेही गोष्टी असतील. कदाचित आपण एका जागी बांधले गेलोय म्हणून आपल्या गोष्टीही एकाच एक गाभ्याशी जोडल्यासारख्या झाल्या आहेत. इथून बाहेर पडायला हवं, ह्या अपूर्ण जगापलिकडे पूर्ण काही असेल जिथे भूतकाळ आणि भविष्य यांच्या अक्षांश-रेखांशात जगणाऱ्या माणसांच्या पलीकडे काही असेल....  बस, आता इथून निघायला हवं, तरच ती नवी गोष्ट सापडेल... त्याने सामान बांधलं आणि तो चालू लागला....
      पण नवी गोष्ट इतकी सहज मिळत नव्हती. तो जिथे मुक्काम करायचा तिथली माणसे पाहायचा आणि त्याला जाणवायचं हे सारेही त्याच नकाशा-बरहुकूम आहेत. त्यांच्या गात्रात त्यांचे अनुभव साठले आहेत, त्या अनुभवांचा उसना-तोकडा अर्थ त्यांनी लावलं आहे, आणि त्या गात्रातून त्यांच्या इच्छांचे, स्वप्नांचे झंकार येतायेत....त्यांच्या त्वचेचे, ते राहतात त्या शहराच्या मातीचे, झाडांचे रंग, प्रकार बदलतायेत, पण गोष्ट तीच आहेत, त्याच आवर्तात फिरणारी, आणि थकून उणी-पुरी समजणारी....
    तो चालत होता. निराशेचे मूळ छाटत होता. त्याने इतके दिवस पाहीले होते कि सापडण्याच्या बेभान आनंदाचा क्षण हरवून जाण्याच्या टोकानंतरच येतो हे त्याला ठाऊक होतं. आणि एक एक शहर ओलांडताना तो ह्या हरवून जाण्याच्या टोकाकडे पोचतोय हे त्याला जाणवत होता.
     कुठेतरी अशी माणसे आणि म्हणून त्यांच्या गोष्टी असतील कि त्यांना मागचा दिवस संपूर्ण आकळला असेल आणि येणारा दिवस त्यांच्या स्पंदानाना थिरकवत नसेल... अर्थाची अपूर्णता आणि पर्यायाने येणारी कृतीच्या परीघाची संभाव्यता ह्या अटळ नियमापेक्षा ते वेगळे असतील...
   का ही आपलीच आशा आहे, आपलं स्वतःला फसवणं... आहे का कोणी असं.....
   त्याने ठरवलं कि उद्या ज्या गावात पोचू तिथेही नवी गोष्ट मिळाली नाही तर मागे फिरायचं, सारे शब्द टाकून द्यायचे आणि.... ह्या विचारानेही तो घाबरला. आता ह्या दिवसाला तरी तो सापडण्याचा क्षण असला पाहिजे...
     संध्याकाळ पर्यंत तो नुसताच रस्ता तुडवत होता. दिवस आणि त्याची आशा दोन्ही मावळण्याच्या टोकाला असताना तो एका कमानीपाशी पोचला. कमानीतून एक रस्ता, अगदी सरळ, समोर जात होता. त्या रस्त्यावर कोणीच नव्हते...रस्त्याच्या दोन्ही बाजूला वस्ती असावी असं वाटत होतं, पण संध्याकाळच्या प्रकाशात वास्तव आणि भास वेगळे काढता येत नव्हते. तो कमानीतून आत गेला. डाव्या हाताला एक एक मजली घर होतं. तो घरापाशी गेला. तिथे 'प्रवाश्यांसाठी थांबण्याची सोय' अशी पाटी होती. दरवाजा उघडा होता. त्याने काही वेळ कोणी आहे का हे पाहिलं, आवाज दिला... कोणीच नाही हे पाहता तो आत गेला. जागा साफ होती, जरी वावराची खूण नसली तरी ओसाडही नव्हती. तो घराचे निरीक्षण करू लागला. उजवीकडे एक टेबल होते. त्यावर प्रवाशांसाठी सूचनेचा कागद होता. थांबायची जागा डावीकडच्या जिन्याने वर गेल्यावर होती. पाणी, अंघोळ, खाणे सार्याची सोय वर केलेली होती. कागदावर कोणाचेच नाव नव्हते.
   तो जिन्याने वर गेला. वर एक खोली, एक स्वैपाकघर, एक अंघोळीची जागा होती. स्वैपाकघरात खाण्याचे पदार्थ ठेवलेले होते, एका माणसापुरते. तो खोलीत गेला. खोली नीट आवरलेली होती. खोलीला खिडकी नव्हती, पण छपरापाशी असणाऱ्या काही झरोक्यातून येणाऱ्या हवेने खोली हवेशीर होती. त्याने सामान पलांगापाशी ठेवले. खोलीच्या उरलेल्या भागात एक टेबल होते आणि एक खुर्ची. तो टेबलापाशी गेला. टेबलावर कोरे कागद रचून ठेवले होते आणि बाजूला एक पेन.
   त्याने थोडसं खाऊन घेतलं. तो परत खोलीत आला. दमलेल्या अंगाने तो अंथरुणावर पडला तेव्हा त्याला फिकट काहीसं वाटलं कि त्याला ही नेमकी एकच खोली कशी, इथे कोणीच का नाही, असे कागद का रचून ठेवलेत, ह्या गावात कोण रहाता ह्याचा आश्चर्य, भीती किंवा उत्कंठा कशी काय वाटत नाहीये. पण ती फिकट जाणीव हळूहळू विरली आणि त्याच्या थकव्याने तो झोपून गेला.
              सकाळी तो उठला. त्याला थकवा जाणवत नव्हता. पण नव्या दिवसाची नवी आणि हळूहळू विरत जाणारी कोवळी जाणीव कुठेच नव्हती. एका सलग नाटकातला एक प्रवेश संपून दुसरा यावा तसं काहीसं... त्याने परत थोडसं खाल्लं, आवरलं आणि  तो खोलीत आला. बाहेर दिवस हळूहळू गती पकडत होता. तो टेबलापाशी बसला. त्याने कागद जवळ ओढले. पेन काढून लिहायला तयार झाला. पण पेनाचे टोक कागदाला स्पर्श करताक्षणी त्याला जाणवले कि तो काहीच लिहू शकत नाहीये. त्याने तो इथे कसा पोचला, आणि आता तो काय शोधणार आहे हे लिहायचा प्रयत्न केला. पण त्याच्या सार्या शब्दांची जुळवाजुळव त्या कोर्या पानावर एक अक्षर उमटवू शकत नव्हती. जणू त्याची जाणीव आणि त्याची कृती याच्यामधला एखादा महत्वाचा दुवा निखळला होता. पण त्याचे शब्द मूक होण्याचही त्याला काही फारसं वाटलं नाही. आपलं आयुष्य कोरून ठेवावं किंवा आपल्या अनुभवांच्या गाठोड्यानाच  निर्मिती म्हणून मानावे असे समझोते त्याने केव्हाच सोडून दिले होते. त्याने पेन आणि कागद जसे होते तसे ठेवून दिले आणि खोलीतून बाहेर पडत, जिना उतरून दरवाज्याने तो रस्त्यावर आला.
        तोच सरळ समोर जाणारा रस्ता...त्याचा दुसरा टोक दिसतही नव्हतं. आणि त्या रस्त्यावर कोणीच चालत नव्हतं. तो थोडं पुढे चालत गेला. काल त्याला जो भास जाणवला होता तशी घरे खरोखर तिथे होती. त्याने डाव्या हाताला पाहिलं. काही पडकी, काही चांगल्या अवस्थेतली तर काही अगदी नवी घरे एका सरळ रेषेत तिथे होती. जणूकाही कोणी एका क्रमाने ती घरे बांधत गेला होता. त्याने उजवीकडे पाहिलं. डाव्या बाजूचं प्रतिबिंब असल्यासारखी ती उजवी बाजू होती. तशीच घरे, नवी, जुनी... तोच क्रम, तीच बांधणी.... त्याच्या मनात परत एक फिकट विचार आला, कि हे कुठलं गाव, अशी तंतोतंत जुळणाऱ्या बाजू असलेला हा कुठला रस्ता, आणि इथे राहत तरी कोण,,,आणि ह्या सगळ्याच्या भीतीचा एकही चरा कसा नाही उमटला आपल्यावर... पण आदल्या रात्रीसारखा तो विचार अपोआप संपला आणि एका कोर्या मनाने तो डाव्या बाजूची घरे शोधू लागला.
       फार पडक्या घरात कोणी रहात नसेल असं वाटून तो जरा एका बर्यापैकी दिसणाऱ्या घरात शिरला. तो काल थांबलं तशाच बांधणीचं हे घर होतं. सराईतपणे तो जिन्याने वर गेला. वरच्या खोलीत एक १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याने मुलाकडे पाहिलं. पण एकाद्या चित्राच्या नजरेला नजर भिडावी तसे त्याच्या डोळ्यांनी त्या मुलाच्या डोळ्यांना पाहिलं. त्या नजरेत एक टक्क कोरेपणा होतं. भीती, कुतूहल, बोलायची उत्कंठा अशी कुठलीही भावना नसलेला कोरेपणा... जसं काही त्या दोघांच्यामध्ये एक काचेचं तावदान होतं. तो त्या मुलाकडे बघत राहिलं. तो मुलगा त्या खोलीच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे गेला. त्याने ते घड्याळ हातात घेतला. घड्याळावरची काच काढून तो मुलगा घड्याळाचे काटे मागे फिरवू लागला. काही वेळाने ते काटे स्थिर करून त्याने ते घड्याळ भिंतीवर परत लावले आणि तो मुलगा एकटक त्या घड्याळाकडे पहात बसला.
      तो घरातून बाहेर आला. काही घरे सोडून तो पुढच्या घरात शिरला. त्याच क्रमाने जिन्याने वरती गेला. ह्या खोलीत एक २०-२१ वर्षाचा माणूस होता. ह्या माणसाचा चेहेरा त्याने आधी पाहिलेल्या मुलाशी जुळत होता, जसं काही त्याचा मोठा भाऊ किवा त्याच मुलाचा काही वर्षांनी दिसणारा चेहेरा. पण इथेही तोच कोरेपणा आणि तेच तावदान.... आणि हा माणूसही घड्याळाचे काटे मागे फिरवून घड्याळाकडे पहात बसलेला.
    तो आता क्रमाने एक एक घर बघत गेला. सगळीकडे तोच माणूस होता. पण त्याचं वय पुढच्या पुढच्या घरात वाढत जात होतं. आणि कुठेही त्याची दखलही नव्हती. तेच घड्याळ, तेच मागे फिरणारे काटे, आणि मग तीच घड्याळाशी भिडलेली नजर.....
    तो रस्त्यावर आलं. मधल्या कुठल्याही घरात न जाता तो अगदी टोकाच्या घरात गेला. अगदी काही क्षणांपूर्वी उघडलेला आहे अश्या दरवाज्यातून तो आत गेला. तो वरच्या खोलीत पोचला तेव्हा बाकी सारे तपशील तेच होते, पण वार्धक्याच्या टोकाला स्पर्श करणारा तो माणूस, ज्याची पोरसवदा, तरुण, पोक्त अशी सारी रूपे तो मागच्या घरांतून पहात आला होतं, तो माणूस इथे आधीपासूनच घड्याळाकडे बघत उभा होता. आणि ह्यावेळी जरी नजरेला नजर भिडली नसली तरी त्या समोरच्या माणसाच्या आणि ह्याच्या अस्तिवात कुठलाही थर नव्हता. पण त्याने काही बोलण्याआधी, त्याचे सारे प्रश्न आणि पूर्वायुष्य शोषून थेट अंतिम उत्तराने हाक द्यावी तसा त्या माणसाचा आवाज त्याच्या पर्यंत येऊ लागला.
      'तू आला आहेस ती जागा काळाच्या पकडीतून मुक्त आहे. इथे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या मितीत जगतो आहे आणि तो काळामध्ये पुढे-मागे कसाही चालू शकतो. हा सरळ रस्ता वर्तमान अस्तिवाचा टोकदार क्षण आहे. ह्या क्षणाची जाणीव नाही म्हणून ह्या रस्त्यावर तुला कोणी दिसत नाही. पण डावीकडे भूतकाळ आणि उजवीकडे भविष्य आहे. रस्त्याच्या बाजू एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारख्या आहेत कारण भविष्याच्या क्षणाची चित्रे ही न उलगडलेल्या अबोध आठवणी किंवा जाणीवा ह्यातूनच येतात. म्हणून उजवीकडचे घर, जो मी पुढे जगणार असा एक क्षण आहे तो मागच्या क्षणाशी चपखल जोडलेला आहे. पण इथे जगणं आणि जगण्याची जाणीव एकरूप आहेत. आधी इंद्रियांनी जगणं, मग मनाने त्या अनुभवांचे थर चाचापणा आणि मग कुठेतरी थेंबभर काही सापडणं ह्या तुझ्या मर्यादा इथे नाहीत. इथे सगळ्या अनुभवांचे अर्थ पूर्णपणे अविष्करीत आहेत आणि म्हणून कुठल्याही स्वप्नांना किंवा मीच केलेल्या माझ्या जगण्याच्या विस्तराला अपूर्णता नाही. पण माझ्या जगण्याची कुठलीही अनुभूती मी कोणालाही देऊ शकणार नाही. कारण इथे 'मी' एवढा परिपूर्ण आहे कि अजून कोणाच्यात डोकावून काही शोधावं असा प्रश्नच नाही आणि दुसर्या कोणालाही कुठलीच वेदना नसल्याने अशा सह वेदनांचे तुला नैसर्गिक वाटणारे बंधही मला नाहीत. '
           आता आवाज थांबला. आणि तो माणूस चालू लागला. तोही त्या मानसापाठोपाठ सहज चालू लागला. रस्ता ओलांडून ते त्या घराच्या प्रतीबिम्बात पोचले. पण कडा आणि कडा एकमेकांशी जुळणाऱ्या त्या घरांमध्ये एकच फरक होता. उजवीकडच्या ह्या घरात घड्याळ नव्हते. त्या जागी फक्त एक पोकळी होती. तो माणूस त्या पोकळीशी डोळे भिडवून उभा राहीला आणि परत तोच आवाज त्याच्याशी बोलू लागला.
   'ह्या पोकळीत मी माझे पुढचे क्षण पाहतो. आणि मला हेही कळतं कि त्यांचे तपशील माझ्या स्वप्नांशी कुठे जुळतायेत आणि कुठे ते अपुरे आहेत. ते अपुरेपण जाणवलं कि मग मी शोधतो कि 'हवं आणि आहे' ह्यांच्या मधले हे अन्तर कुठून आले आहे. मग मी परत भविष्याच्या ह्या क्षणाशी जोडलेल्या माझ्या मागच्या जाणीवेत जातो. तिथे तुला जे घड्याळाचे काटे फिरवणं वाटलं ते माझं माझ्या आयुष्याच्या आधीच्या संदर्भांना परत जगणं होतं. आणि जगत जाताना 'हवं आणि आहे' ह्यांच्यातला अंतर जन्माला घालणारे जे संदर्भ आहेत ते मी बदलतो आणि अन्तर शून्य करतो. मग मी पुढे सरकतो आणि नवे घर बांधतो. '
     तो माणूस त्या पोकळीत बघत राहीला. आणि आता परत एकदा मध्ये एक पारदर्शक पडदा आला होतं, त्या दोघांच्या अस्तित्वाना छेदत विलग करणारा.  
      तो बाहेर पडला. त्या रस्त्याने मागे चालत चालत रात्री तो जिथे थांबलेला त्या खोलीत परत आला. हीच तर ती नवी गोष्ट होती. आणि आता त्याला ती लिहायची होती. पण तरीही ह्या उर्मीने कुठलीच लाट त्याच्या मनात उसळत नव्हती. शांतपणे तो टेबलाशी बसला आणि त्याने कागद ओढले, पेन हातात धरलं.
   ....आणि तरीही तो काही लिहू शकलं नाही. आणि आता त्याला जाणवत होतं कि आयुष्याच्या अर्थाची अपूर्णता, माणसांची स्वप्ने आणि प्रत्यक्ष जगणं ह्यांच्यात येणारं अटळ अन्तर, आणि तरीही ह्या मर्यादा ओलांडायचा, अर्थाच्या गाभ्याला स्पर्शायचा सोस माणसाच्या काळजात, विचारात जिवंत आहे. जगून झालेल्या क्षणाचे, दिवसांचे रंग असण्याशी बेमालूम विरघळले आहेत आणि त्याच्याच छटा येणारे दिवस घेऊन येणारेत. पण हा नियम जितका खरं आहे तितकीच ह्याच्या पार जाऊन एखाद्या निखळ, निरव जागेपाशी पोचायची ओढही. ती जागा जी खेद, तृष्णा, विरत जाणारे सुख किंवा इंद्रियांचा झळाळता पण क्षणभंगुर आनंद  ह्या सगळ्याच्या खूप पुढे आहे. आणि ती सांगता येत नाही म्हणून ती सांगता यावी यासाठी गोष्ट, एक किंवा अनेक जन्माला येणार आहेत.
   आणि ह्या रस्त्यांवर, ह्या खोलीत आलेला, जाणिवेशी समरस माणूस पाहिलेला तो एकटाच नाही. आधीही कोणी इथे आले असणार, त्यानाही परिपूर्ण आयुष्याचा तोच अंतिम आवाज ऐकू आला असणार, आणि जेव्हा ते ही नवी गोष्ट लिहायला इथे असेच बसले असणार तेव्हा त्यांनीही हे कागद असेच कोरे ठेवले असणार....
   तो घराच्या बाहेर आला. संध्याकाळ झाली होती. तो कमानीतून चालत काल तो जिथे होता तिथे आला. त्याने मागे वळून पाहिलं. तो तसाच सरळ न संपणारा रस्ता, आणि तीच संदिग्ध घरांची ओळ....  त्याला तो आज जगला तो दिवसही आता एक तरल भास वाटत होता... आणि ती चमकती पारदर्शक जाणीव संपण्याआधी ही गोष्ट सांगावी अशी अस्थिर तहानही त्याला जाणवू लागली. तो मागे वाळला आणि झपाट्याने त्या कमानीपासून. काळाच्या पकडीतून मुक्त जागेपासून, परिपूर्ण जाणीवेच्या माणसांपासून दूर जाऊ लागला.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...